काही बाबतीत मात्र भारतीय पिढ्यांमधे जनरेशन गॅप नाहीच की काय असं वाटायला लागतं. सन्माननीय अपवाद वगळता जुन्या मंडळींच्या कल्पना इतक्या पक्क्या झालेल्या असतात की, नवं सगळं त्यांना वाईट, अयोग्य, असभ्य वगैरे वाटत राहतं. नुकत्याच घडलेल्या शबरीमला मंदीरातील महिलांच्या स्कॅनिंग विषयीच्या विचाराचं उदाहरण घेतलं तर वरवर यावर नाराजी प्रकट करणार्या बहुसंख्य महिला सुद्धा मनातून मासिक धर्माला पिढ्या न पिढ्य़ा अपवित्रच मानत आल्या आहेत. शिवाय ते इतकं ठासून बिंबवलं जातं की आजच्या पिढीच्या देखील कित्येक तरूणी त्या बाबतीत विज्ञाननिष्ठ विचार करायला धजावत नाहीत. त्याच वेळेला दुसरीकडे भारतीय पिढ्यांमधे प्रचंड जनरेशन गॅप आढळून येते, उदा. द्यायचे तर आपणच कौतुकाने इंग्रजी माध्यमात घातलेला मुलगा किती सहजतेने संगणक, मोबाईल वापरतो, फाडफाड इंग्लिश बोलतो आणि आपण किती अडाणी आहोत, अशा न्यूनगंडाने अनेक पालक आज ग्रासलेले आहेत.
प्रत्येक मागच्या पिढीजवळ नव्या पिढीच्या तुलनेने संयम, आदर, त्यागी वृत्ती असते तर नव्या पिढीजवळ उमेद, बंडखोरी आणि ’मला काय हवय’ या बाबतीत स्पष्टपणा असतो. वेगाने धावू पाहणारी पिढी आर्थिकदृष्ट्या बऱ्याच लवकर सक्षम होत आहे. वडिलांनी निवृत्तीच्या वेळेतो केली तेवढी कमाई मुलं वर्षात करतात. त्यातून आत्मविश्वास वाढतो पण काहीसा अहंकार ही निर्माण होतो. यात समन्वय साधायचा तर मागच्या पिढीने दिलेल्या संस्कारांचे दोर बळकट हवेत. संस्कार म्हणजे फक्त ’शुभंकरोति’ म्हणणे नव्हे, माणूस घडवणे. कुठलीही असली तरी पौगंडावस्थेतील पिढी नेहमीच सैरभैर अवस्थेत असते. संस्कृतीतून, इतिहासामधून नेमकं काय घ्यायला हवं हे त्यांना समजत नसतं. परंतु सभोवतालातून, आजूबाजूच्या व्यक्तींमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांकडून ते अभावितपणे खूप काही घेत असतात. नैतिक अधिकार प्रत्यक्ष कृतीतूनच कमवावा लागतो हे निश्चित. मुलं आपलं सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण आपल्या मागच्या पिढीशी वागायला हवं.
पिढ्यांमधलं अंतर आवर्जून कमी करायचं तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या जागी उभे राहून परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित एकमेकांच्या वागण्य़ाचा कार्यकारणभाव समजणं सोपं जाईल. नव्या पिढीचे जगण्याचे मार्ग वेगळे असतील पण ते अयोग्य नसतील असा विश्वास निर्माण होईल आणि मागची पिढी तरूणाई ला ’आऊटडेटेड’ वाटणार नाही.
जुनं ते सोनं हे बहुतांशी खरं असलं तरी सर्वच जुनं ते सोनं नाही. सरसकट एखाद्या पिढीला दोष देण्य़ापेक्षा जुन्यातलं आजही काय लागू होतं किंवा ते नव्या रूपात लागू करता ये ईल का याचा विचार करणं आणि काळानुसार बदलणं खरच इतकं अवघड आहे का! आल्फ्रेड नोबेल यांनी डायनॅमाईट सारख्या विनाशकाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की एकीकडे संशोधनातून जगाला विध्वंसाची साधने उपलब्ध करून देणारे नोबेल आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून हादरले, बदलले, इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल पारितोषिक..विशेषत: शांततेसाठी, जगविख्यात आहे. म्हणजे माणसात अगदी आमूलाग्र बदल होणं सुद्धा अशक्य नसतं. बदलाच्या लाटांमुळे थोडी खळबळ होईलही पण अथांग काळाबरोबर वाहत चाललेलं माणूसपणाचं तारू भरकटणार नाही एवढं नक्की. असा विचार केला तर जगणं सुखकर आणि आयुष्य सुंदर होईल. त्यासाठी मागच्या ,आजच्या आणि सळसळत्या वयातल्या उद्याच्या पिढीनही एकमेकांना इतकच सांगावं, ’कुछ तुम चलो, कुछ हम चले, दूरियां यों मिटाते चलें’.