Friday, November 20, 2015

जनरेशन गॅप - परदेश


’आजीबाई आजीबाई थकलात का? नेटवर नातवाला भेटलात का?
मुलांना शिकवून केला गुन्हा (!), परदेशी गेल्या लेकी सुना
नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हाऊन जा
नातवाने वाचला नन्नाचा पाढा, रिकामा राहिला आजीचा वाडा’
या विषादपूर्ण ओळी व्हॉट्स ऍप वर वाचल्या. सहानुभूती साहजिक आजीच्या वाट्याला जाते आणि आजची पिढी- मुलं, सुना, नातवंडं दुष्ट ठरतात. खरं तर कुठलीच पिढी सरसकट काळी किंवा पांढर्‍या रंगाची नसते. मागच्या पिढीला येथेच सोडून परदेशी गेलेले सगळेच निष्ठूर, कृतघ्न वगैरे नसतात.

एका स्नेह्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला, संशोधन केले आणि पुढे लग्न करून तेथेच स्थायिक झाला. सुरूवातीला ते मुलाच्या प्रगतीचे गोडवे गाताना थकत नसत कारण मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होताना बघणे हेच प्रत्येक पालकाप्रमाणे त्यांच्याही आयुष्याचे ध्येय होते. त्यातले अप्रूप आणि नावीन्य ओसरल्यावर आणि विशेषत: पत्नी निवर्तल्यावर त्यांना एकटे वाटू लागले. मुलाने तिकडे राहण्यास बोलावले परंतु तिथले हवामान, तिथली संस्कृती याच्याशी जुळवून न घेऊ शकल्याने ते भारतात परतले आणि एकटे राहू लागले. काही नातलगांनी ’एवढं शिकवलं मुलाला पण संस्कार तेवढे करायचे राहिले, आता घ्या’, ’आपल्या देशासाठी काही करायला नको, नुसती डॉलरची हाव!" वगैरे मुक्ताफळे उधळली. अशा नातलगांपैकी कित्येकांना परदेशी गेलेल्यांबद्दल असूया असते, आपल्याही मुलांनी परदेशी जावं असं स्वप्न असतं आणि नाहीच जमलं तर त्यांना एकदम ’देशप्रेम’ वगैरे आठवतं. आपल्याकडेही स्वेच्छेने किंवा नाईलाजाने गावी राहणारे आईबाप आणि शहरात स्थायिक झालेली पुढची पिढी हे चित्र काहीसे असेच नाही का! भारतात राहणारे सगळेच आपल्या देशासाठी काही महान कार्य वगैरे करतात का? कित्येक जण इथेच आयुष्य घालवूनही मॉल संस्कृतीचे गुणगान करीत येथील प्रत्येक गोष्टीला नाके मुरडत असतात. आजच्या काळात नवनवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, वैश्विक अनुभव घेण्यासाठी परदेशी जाणे म्हणजे पाप नाही. अर्थात आजन्म तिथे राहून स्वत:ला अकारण श्रेष्ट समजणे आणि स्वदेशाला नावे ठेवणे नक्कीच गैर आहे.

 'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात अपर्णा वेलणकर यांनी मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. विदेशात व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर परत आलेले अनेक जण भारतातील लाल फीतीच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला कंटाळून पुन्हा परदेशी जातात. आपल्या समाजात अनेक रुढी,परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते त्यामुळे काहींच्या पत्नीचा परत येण्याला विरोध असतो. तिकडे जाऊन लोक संस्कृती विसरतात असाही एक आक्षेप घेतला जातो. ते तिकडे पूर्ण समरस होऊ शकत नाहीत आणि इकडे पुन्हा स्वीकारले जात नाहीत. एक अनुभव वाचनात आला, त्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका स्त्रीला तिच्या भारतातल्या आईने सुचवलं, "दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस." त्यातल्या त्यात तिथे भारतीय सणवार एकत्र येऊन साजरे करून भारतात नसल्याची उणीव भरून काढण्याचा ते आपल्या परीने प्रयत्न करतात. भारतीय कार्यक्रमांचे, कलाकारांचे तिकडे आवर्जून स्वागत करतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली नाळ देशाशी जोडून ठेवतात. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत त्यांच्यामुळे भर पडत राहते. अनेक परदेशस्थ भारतीयांनी येथील अनेक सामाजिक प्रकल्पांना भरघोस मदत दिलेली आहे. ती घ्यायला आणि त्यांच्यातल्या कुणाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला की लगेच ते ’भारतीय वंशाचे’ आहेत म्हणून श्रेय घ्यायला मात्र आपण तयार असतो.

थोडक्यात परदेशी गेलेल्या सगळ्यांना एक तर नायक नाहीतर खलनायक ठरवण्याची टोकाची मानसिकता आपण बदलायला हवी. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या देशाचे काही देणे लागतो की नाही! निश्चितच. विशेषत: येथील आयआयएम, आयआयटी सारख्या अनेक नामांकित शिक्षणसंस्थातील विद्यार्थी त्या संस्थांचा शिडीसारखा उपयोग करतात आणि परदेशी निघून जातात. या पिढीने हे विसरता कामा नये की येथील सवलतींचा फायदा घेऊन मिळवलेल्या विशेष ज्ञानाचा देशाला उपयोग करून देणे त्यांचेही कर्तव्य आहे. ते त्यांनी इथे राहून पार पाडावे अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथून. आजच्या पिढीत हे भान जपणार्‍यांची संख्या हळूहळू वाढते आहे ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्रेनड्रेनच्या प्रश्नाचा सुवर्णमध्य साधणार्‍यांची, परदेशात जाऊन उच्चशिक्षण आणि अनुभव घेऊन, जगाच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देऊ शकतील असे फॅशन, वैद्यकीय क्षेत्रा पासून सौर उर्जेपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी परतणार्‍यांची संख्या वाढते आहे. (संदर्भ: इकॉ. टाईम्स २४-१-१५) ’स्नॅपडील’ या वेबसाईटद्वारा येथील रोजगारनिर्मितीत भर घालणार्‍या रोहित बन्सल आणि कुणाल बहल सारखे, अनेक परदेशस्थ भारतीय तरूण विवीध उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी मायदेशाची निवड करू लागले आहेत. स्वदेशाबद्दलची बांधीलकी केवळ देशात राहूनच जपता येते आणि तरच देशप्रेम सिद्ध होते असे नाही तर देशासाठी असे काही तरी केल्यामुळे सिद्ध होते.

प्रत्येक दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आता पंचक्रोशी किंवा प्रांत ओलांडण्यापुरता उरला नाही तर सातासमुद्रापार पोचला आहे. वेलणकरांनी म्हटल्यानुसार जागतिकीकरणाची अपरिहार्यता म्हणून पुढच्या पिढीच्या रूपाने स्वदेश-परदेशाच्या निवडीचा संघर्ष तुमच्याही आयुष्यात रोरावत येईल तेव्हा मूल्यसंस्कारांची मुळे घट्ट रोवून त्याला आनंदाने आणि खुल्या मनाने सामोरे जायला हवे.