’वाचनाने मला काय दिले’ या विषयावर खास पालकांसाठी आयोजित एका निबंध स्पर्धेचे परिक्षण करण्याची मला संधी मिळाली. सगळ्या निबंधांमधे एक समान धागा होता तो म्हणजे आजची पिढी पुस्तकांशिवाय ’घडते’ (!) आहे याबद्दलची खंत आणि अस्वस्थता. कवी गुलजार हीच खंत व्यक्त करताना म्हणतात..
"जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी,
लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय.
यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. हे खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही. पुस्तकातल्या माहितीचा ज्ञानात आणि ज्ञानाचा ’शहाणीवेत’ हळूहळू रूपांतरित होत जाणारा सुंदर प्रवास, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली अनुभवता येत नाही. आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. त्यात दोन धोके आहेत, मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. यावर जर पालक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले तर या माध्यमांच्या मदतीने कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो.
आजीआजोबांनी मुलांना गोष्टी सांगण्याची प्रथा विभक्त कुटुंबांबरोबर कमी होत गेली आहे. एकत्र कुटुंबांमधेही आजीआजोबांना आता टीव्ही मालिका पाहायच्या असतात. ज्या आजीआजोबांना आजही नातवंडाच्या बौद्धिक विकासासाठी काही करावसं वाटतं त्यांच्यात आणि नातवंडांमधे तंत्रज्ञानाच्या मार्यामुळे खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आपोआप येणारे वाक्प्रचार, म्हणी, जुने शब्द याला नातवंड मुकतायत. शब्दकोडी सोडवणं, वर्डगेम्स अशा प्रयोगातून शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर त्या शब्दातून उमटणार्या चित्रांवर, गीतांवर, निसर्गावर, पर्यावरणावर प्रेम करायला मुलं आपोआप शिकतील. मात्र त्यांच्या बालसुलभ कुतुहलाला आपण संवादातून प्रोत्साहन द्यायला हवं.
परंतु आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलांशी बोलायचं केव्हा! ती सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात. या संदर्भात जेनेल हॉफमन या अमेरिकन आईचं उदाहरण वाचनात आलं. मुलाला तिने मोबाईल बरोबर एक १८ कलमी नियमावली दिली. मुलांनी फोन कसा, किती, कुठे, का वापरावा याची ती जणू आचारसंहिताच होती. अशी काळजी घेतली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे पुढे उद्भवणारे प्रश्न आधीच निकाली निघून त्याचा सकारात्मक वापर होण्याच्या शक्यता वाढतील. मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांच्या तंत्रप्रेमाचा उपयोग करून त्यांना ई-बुक्स, ऑडीओ बुक्स ची ओळख करून द्यायला हवी. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. awesomelibrary.org ह्या साईटवर इंग्रजी तर मराठी आणि हिंदीत हा खजिना उपलब्ध आहे arvindguptatoys.com या साईटवर. भारतीय पात्र असणा-या कथांसाठी pitara.com ही साईट उत्तम आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर http://www.britishcouncil.org/kids हा वाचनिय आणि माहितीपूर्ण बालविभाग आहे. (संदर्भ:पालकनीती) पण हे सगळं घडून यायचं असेल तर पालकांनी आधी स्वत: तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी. तंत्रज्ञान आणि मुलं ही जोडी फोडणं आता अवघड आहे पण पालकांना त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं प्रयत्नांती शक्य आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीक सारख्या वाहिन्यांवरचे साहित्यातही न सापडणार्या अनेक विषयांवरचे दर्जेदार माहितीपट मुलांसह पालकांनी आवर्जून बघावेत. वाचनापासून दुरावलेल्या मुलांच्या वैचारिक कक्षा रूंदावण्याचे इतर पर्याय शोधणे आता भाग आहे. ’आमचा मुलगा अजिबात वाचत नाही हो’ अशी तक्रार करणार्या पालकांनी स्वत:ला विचारावं की ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी त्यांना एक महिन्याने पुन्हा बोलावले आणि मग त्या मुलाला गोड खाणे बंद कर असे समजावून सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की हे तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली आणि मग त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला". मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी पालकांनी स्वत:ला विचारावं, आपलं वाचन whatsapp च्या मेसेजेस पुरतं मर्यादित आहे, पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! घरातील वातावरण वाचनाला पोषक असेल तर मुलं आपोआप पुस्तकांकडे वळतील. मात्र त्यातूनही ती वाचत नसतील तर किमान त्यांना वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचायचा आग्रह करायला हवा. ते ही होत नसेल तर आपण त्यांना त्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, त्यावर मुलांसमोर सोप्या भाषेत चर्चा करू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो.
आईने मुलाला झोपवताना गोधडी पांघरली काय आणि ब्लॅंकेट पांघरलं काय, खरी उब त्या पांघरूणापेक्षाही तिच्या स्पर्शात असते. मुलांच्या वाचनाच्या प्रश्नाकडे, वाचनाच्या बदलत्या माध्यमांकडे आता आपण याच दृष्टीने पाहायला हवं. जगातलं उत्तमोत्तम साहित्य डिजीटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागलं आहे. भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा पुस्तक वाचनाचा खरा हेतू तर निखळ आनंद हा त्याचा आणखी एक फायदा. छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक सारखं डिजीटल माध्यम (अर्थात अतिरेक टाळून) त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो मुलांपर्यंत पोचला म्हणजे झालं. -