Friday, August 21, 2015

जनरेशन गॅप - अपरात्री ऑनलाईन


"हे ’ऑनलाईन’ म्हणजे नेमकं काय असतं ग?" नात्यातल्या एका वयस्कर बाईंनी अचानक विचारलं. "ऑनलाईन म्हणजे ’आपण आत्ता नेटवर्क वापरत आहोत’ याची खूण. का हो काकू!" "काही नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या नातीचं ठरलेलं लग्न मोडलं. आपला होणारा नवरा रात्रीबेरात्री ऑनलाईन असतो का हे तपासायला तिची नात स्वत: ऑनलाईन गेली म्हणे, झालं भलतच, इतक्या रात्री ऑनलाईन असणारी मुलगी ’चांगली’ नसणार या कारणाने त्या मुलाने लग्नाला चक्क नकार दिला" "अरेच्चा, पण मग तो मुलगा स्वत: अपरात्री ऑनलाईन होता त्याचं काय!" "खरय, पण शेवटी ’मुलीच्या जातीला’ कळायला पाहिजे नं !" इति काकू.

 पिढ्या बदलल्या तरी एक गोष्ट फार संथ गतीने बदलते आहे, ती म्हणजे समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर. मुळात महत्वाचे काम असल्याशिवाय अपरात्री मोबाईल वापरणे योग्य नाही, मग वापरकर्ता कुणीही असो. परंतु ’बाईच्या जातीने’ मोबाईल वापरला की पारंपरिक विचारसरणीच्या मंडळींच्या कपाळावर आठी पडते. मागे उ.प्रदेश चे एक खासदार सैनी यांनी मुक्ताफळे उधळली होती, "मुलींना मोबाईल वापरू देऊ नका. आमच्या आईबहिणींनी मोबाईल वापरला नाही, त्यांचे कुठे काय बिघडले!" बाघपत पंचायतीने तर मोबाईलमुळे मुली पळून जाऊन लग्न करतात तसेच त्यांचे संसारातले लक्ष उडते ,त्यामुळे ’४० वर्षांखालील स्त्रियांनी मोबाईल वापरू नये’ असा अचाट फतवा काढला होता. त्यानंतर म.प्र तील एक खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले होते, "लग्नाआधी मुलींना मोबाईल दिला तर त्या मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे." माध्यमातून टीका झाल्यावर या मंडळींनी मग सारवासारव केली हा भाग वेगळा. मुळात मुली लग्न करायला एकट्या तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच या सगळ्या उदाहरणात त्या मुलींसह ’मर्यादा’ वगैरे ओलांडणारी मुले ही आहेत. ती मात्र या मोबाईलबंदी पासून मुक्त आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वेडापायी तरूण पिढी वेळेचा अपव्यय करते आहे,

मानवी तासांचा हिशेब केला तर देशाचाही वेळ अनुत्पादक कामात वाया घालवते आहे. त्यातून शारिरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या देखील वाढत आहेत हे सारे खरे असले तरी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. जेनेल हॉफमन या अमेरिकन आईने आपल्या टीनएजर मुलाला मोबाईल देताना तो कसा, केव्हा, कुठे आणि किती वापरावा याबद्दल एक आचारसंहिताच करून दिली होती. असे काही उपाय करायचे सोडून सगळ्या समस्यांचे खापर फक्त मुलींच्या मोबाईल वापरावर फोडणे कितपत योग्य आहे? ’तिखट झाला चहा आणि कालवण झालं गोड सासू म्हणते सुनेला तुझ्या ’व्हॉट्सअप’ ला उठू दे फोड’ अशा अर्थाच्या थोड्या खोचक, थोड्या मिश्कील ओळी सध्या मोबाईलवर फिरत आहेत. खरं तर लग्नानंतर संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रियांना या मोबाईलमुळे थोडा मोकळा श्वास घेता येतो आहे. शाळा-महाविद्यालयामधलं दुरावलेलं मैत्र पुन्हा जोडता येतं आहे. घरची-बाहेरची कामं, पैपाहुणा, सणवार, मुलं, त्यांच्या activities, स्वत:चं लहानमोठं करियर या सगळ्याशी ती आजही ’कनेक्टेड’ आहे, उलट या चाकोरीतही एक नावीन्य, चैतन्य, आत्मविश्वास तिला जाणवतो. मुलांच्या प्रश्नांना पटकन मोबाईलमधे पाहून उत्तर देणारी स्मार्ट आई आता जाहिरातींमधून दिसते. मोबाईलच्या नादात डाळ करपावी किंवा कामे विसरून जावी एवढी ती बावळट नक्कीच नाही. ’आमच्या वेळी नव्ह्तं असलं काही फॅड’ असं तिला म्हणणारी मागची पिढी आज स्वत: मात्र टीव्हीला खिळून बसलेली असते. त्यांच्या काळी या गोष्टी उपलब्धच नव्ह्त्या तर त्यात त्यांच्या संयमाची परीक्षा आली कुठे? आजच्या पुरूषांच्या बाबतीत तर, गोष्टीतल्या जादूगाराचा प्राण जसा पोपटात असायचा तसा त्यांचा मोबाईलमधे असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोबाईल विना जगू शकणारे पुरूष अपवादात्मक तसेच मोबाईलच्या अगदीच आहारी गेलेल्या स्त्रियाही अपवादात्मक. स्त्रिया तंत्रज्ञानाचा, विशेषत: मोबाईलचा वापर करतात तेव्हा संपर्काचे, माहिती मिळवण्याचे, माणसांशी जोडले जाण्याचे, सुरक्षिततेचे आणि काही अंशी आत्मनिर्भर होण्याचे जणू आयुध त्यांना लाभते.

परंतु स्त्रीचं स्वत:चं विश्व असणं ही कल्पनाच मुळात समाजाच्या पचनी पडत नाही. बहुतेक स्त्रिया नवर्‍याने नवा मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल वापरताना दिसतात, अर्थात तिने कायम त्यागमूर्ती, वात्सल्यमूर्ती, संसाराचा कणा असणं हेच अपेक्षित असतं. असावं ना! पण तिला स्वत:चीही स्पेस असायला हवी की नको! मोबाईलमुळे स्त्रीचे संपर्कक्षेत्र वाढते, तिचे पतीवरील अवलंबित्व बरेचसे कमी होते याने काही पुरूषांचा अहंकार दुखावतो. वरवर स्त्रियांच्या प्रगतीच्या वल्गना केल्या तरी समाजाला मनातून ’जात्यावर बसून ओवी गाणारी नऊवारीतली सात्विक स्त्री’ ही प्रतिमा सर्वात जास्त भावते. अशा वृत्तीबाबत ना.ग.गोरे म्हणत, "या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं". एकूणच या चित्राला तडा जायला लागला की बर्‍याच घरातून तिच्या मोबाईल वापरावर तिरकस टीका होऊ लागते, समाजातले स्वघोषित नैतिक पहारेकरी स्त्रियांवरील मोबाईलबंदी सारखे आचरट उपाय शोधू लागतात.

 फ़ोक्सवॅगन ची एक सामाजिक जाहिरात आहे. जाहिरात सुरू होते ती सिनेमागृहात प्रेक्षक येऊन बसत असतानाच्या दृश्यासह. पड्द्यावर सिनेमा आधीची जाहिरात सुरू होते, त्यात फ़ोक्सवॅगन चालवणारे स्टिअरिंगवरचे हात तेवढे दिसतात, प्रेक्षक श्वास रोखून बघू लागतात, गाडीचा वेग वाढतो, आता गाडी नुसतीच सुसाट पुढे जात राहते. एव्हाना कंटाळलेले प्रेक्षक चुळबूळ करू लागतात. आपापला मोबाईल काढून सगळे त्यात डोकावू लागतात आणि अचानक जोरात आवाज येतो, पड्द्यावरील गाडीचा अपघात झालेला असतो. खाली मेसेज येतो, ’वाहन चालविताना मोबाईल वापरणे धोक्याचे आहे.’ खरं तर वाहन चालवतानाच नव्हे, आपल्या उद्देशांकडे, सुंदर जगण्याकडे, उत्तम पालकत्वाकडे आपला प्रवास सुरू असताना देखील मोबाईलचा अतिवापर हितकारक नाही हे सांगणारी ही जाहिरात सर्वांनाच लागू होते. फक्त स्त्रियांना नव्हे. -