Friday, June 12, 2015

जनरेशन गॅप - वानप्रस्थाश्रम


’पुलं आजोबा’ हा प्रख्यात लेखक पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृती आजच्या पिढीपर्यंत पोचवणारा नवा कार्यक्रम. अलिबागला तो नुकताच पाहून आलेली मैत्रिण अगदी भारावून गेली होती. वाचनाच्या वाटेला फारसं न जाणार्‍या आजच्या पिढीला पुलंचा निखळ विनोद, त्यांनी निर्माण केलेली पात्र अनुभवता येतील याचा आनंद तिच्या शब्दांतून ओसंडत होता. आजच्या पिढीपर्यंत पोचण्याचं आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व होण्याचं भाग्य पुलंना लाभलं याचं श्रेय त्यांच्यातल्या दर्जेदार साहित्यिका बरोबरच त्यांच्या चिरतरूण वृत्तीलाही द्यायला हवं. पुलं आज हयात नाहीत. त्यांनी १९७९ साली त्यांच्या एका स्नेह्याला स्वत:च्या एकसष्टीच्या निमित्त्याने पत्र लिहीलं होतं. ’उतारवयात देखील जगाकडे किती उत्फुल्ल मनाने पाहातं येतं’ याचीच ग्वाही हे पत्र देतं.

 कालपरत्वे शरीर कुरकुरू लागणार पण त्याचा परिणाम नात्यांवर होता कामा नये याचं भान असलेले पुलं त्या पत्रात म्हणतात, " पिको हे मस्तक.. दुखोत गुडघे...मैतरीचे धागे..जैसे थे...’ त्यांच्या मिश्कील शैलीत ते पुढे म्हणतात ,"वयाबियाचे हिशेब इतिहास संशोधकांनी ठेवावेत, आपण नव्हे. ’हल्लीची पिढी बिघडली आहे, आमच्या वेळचं ते आता राहिलं नाही’ अशी रडगाणी काय कामाची. खरं तर हल्लीच्या मोगर्‍यालाही, आपले नाक चोंदलेले नसल्यास, कुठल्याही काळातल्या फुललेल्या मोगर्‍या इतकाच छान वास येतो. उन्हे उतरत चालली म्हणून त्यातले सोने बघणे टाळायची गरज नाही."

 अपवाद वगळता किती ज्येष्ठांना हा मोगर्‍याचा सुवास घ्यावासा वाटतो! उन्हातले सोने शोधण्याची नजर असते! आपण चार पावसाळे जास्त पाहिलेत एवढ्या भांडवलावर आजच्या पिढीला नाके मुरडण्यातच कित्येकांचा वेळ वाया जातो. अनुभवाची व्याप्ती कालसापेक्ष असली तरी त्याची खोली व्यक्तीसापेक्ष असते हे कित्येकांच्या लक्षातच येत नाही. “आमच्या काळात नव्हती ही थेरं” हा अनेकांचा परवलीचा शब्द असतो. आज जगण्याचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. प्रत्येक पिढीची एक आगळीवेगळी लय असते. ती ज्येष्ठांनी समजून घ्यायला हवी. प्रत्येक पिढीची एक बंडखोरी असते. ती उमजायला हवी. खरं तर आजच्या पिढीला स्मार्टफोनचे जितके आकर्षण आहे तितकेच त्या पिढीला रेडिओचे होते.

सैगलचा ’देवदास’ पाहिलेली पिढी दिलीपकुमारच्या ’देवदास’ला नावे ठेवत होती. दिलीपकुमारचा ’देवदास’ पाहिलेली पिढी मधली पिढी शाहरूख खानच्या ’देवदास’कडे पाहून डोक्याला हात लावते. त्यापुढची पिढी अभय देओल च्या ’देव डी’ च्या माध्यमातून देवदासचे आधुनिक रूप पाहते. बदलत्या काळानुसार प्रत्येक पिढीची आस्वादक्षमता आणि योग्य, अयोग्य हे निकष बदलत जातात. आजच्या तरूणाईची वेगवान जीवनशैली आणि मागच्या पिढीचे काहीसे संथ आयुष्य काही सामाईकता राहत नाही आणि पिढीमधील अंतराचे पीळ वाढत जातात. यावर उपाय म्हणजे या अंतराची अपरिहार्यता समजून घेणे आणि काळानुसार स्वत:ला बदलवणे. मात्र हे सोपे नसते. निवृत्त झाल्यावर देखील अनेक ज्येष्ठांच्या डोक्यातून पदाचा रूबाब जात नाही. मग ते घरच्या ज्युनिअर मंडळींना हुकूम सोडू लागतात. कित्येक ज्येष्ट स्त्रियांना स्वयंपाकघराचा ताबा सोडवत नाही. हात पूजेत पण मन मात्र संसारातच गुंतलेलं असतं. राजकारणा सारख्या क्षेत्रात तर निवृत्तीचे अधिकृत वय नाही. त्यामुळे कितीतरी जुनी खोडे तरूण कार्यर्त्यांना संधी द्यायला अजिबात तयार नसतात. कित्येक संस्थांचे प्रमुख वयोवृद्ध झाले तरी संस्थेवरची आपली पकड आणि पद सोडायला तयार नसतात, नवीन पिढीच्या वेगाशी जुळवून तर घेता येत नसते. मग संस्था डबघाईला जाऊ लागतात. अशा ज्येष्ठांचे खरे तर हसे होत असते. ’कुठे थांबावे’ हे आजच्या पिढीला कळत नाहीये असा आरोप करताना ते जुन्या पिढीला तरी नीटसे कळले का याचा त्यांनी विचार करावा.

या ’थांब्या’ बद्दल पांडुरंगशास्त्री आठवले म्हणत, "परिवार आणि समाजाचा 'सांधा' म्हणजे वानप्रस्थाश्रम. ' वन ' शब्दाचा अर्थ आहे ' वन्यते सेव्यते इति वनम्। ' वृक्षांचे वन असते. वृक्ष सेवेची दीक्षा देतो. वृक्ष शिकवतो की स्वत: मोठे व्हायचे असते आणि दुसऱ्यासाठी पण काम करायचे असते. माझे अस्तित्वसुद्धा दुसऱ्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वृक्ष स्वत: मोठा होतो, व्यापक होतो आणि नंतर नि:स्वार्थ भावाने लोकांना छाया देतो, फळे देतो. केवळ शांती नव्हे विश्वशांती देतो म्हणून वृक्ष हा सेवेचा आदर्श आहे. वृक्षाचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसाने वानप्रस्थ स्वीकारला पाहिजे." या संदर्भात इन्फोसिसच्या नारायण मूर्तींचे उदाहरण आठवल्याशिवाय राहत नाही. आयटी सर्व्हिसेसमधली, आज जगात पंधराव्या क्रमांकावर असलेली कंपनी स्वकर्तृत्त्वावर उभी करणार्‍या मूर्ती यांनी विशाल सिक्का यांच्या नेतृत्त्वाखाली एक उत्तम टीम तयार केली. गतवर्षी त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन, सारा मानमरातब सोडून, सारी सूत्रे नव्या टीमच्या हाती सोपवली. इन्फोसिस फाऊंडेशनचे काम बघणार्‍या, सेवाभावी वृत्तीच्या ’सुधा’ या पत्नीसह नातींच्या सहवासात मूर्ती रमले आहेत. भारतीय संस्कृतीतील वानप्रस्थाश्रमाची व्याख्या आज खर्‍या अर्थाने जगत आहेत.

असे घडते तेव्हा
 ’पाव सुखे हुए पत्तो पे अदब से रखना.. धूप में मांगी थी तुमने पनाह इनसे कभी..’
 ही जाणीव अशा ज्येष्टांबाबत नवीन पिढीमधे सहज रूजते. त्यांना सन्मान मागावा लागत नाही, आपसूकच मिळतो.