Friday, April 24, 2015

जनरेशन गॅप - अलिया आणि आयक्यू


आजच्या पिढीची स्मार्ट सिनेतारका, ’अलिया भट्ट’ वरून केलेला विनोद कुणीतरी आपल्याला (आणि साधारणपणे आपणही कुणालातरी) पाठवल्याशिवाय सध्या कित्येकांचा दिवस मावळत नाही. एक बरय की हे विनोद निखळ असतात, अश्लील नसतात, फक्त तिच्या बुद्धूपणाची खिल्ली उडवणारे असतात. या विनोदांना हसताना आपला बुद्ध्यांक तिच्यापेक्षा किती बरं उच्च आहे हे जाणवून वाचणारा आतून खूष होतो. मुळात ही आजची अभिनेत्री विनोदाचा विषय ठरली ते एका वाहिनीवरील ’कॉफी विथ करण’ या शोमुळे. यात प्रश्नांच्या फैरीला उत्तर देताना, पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या अचाट 'सामान्य ज्ञाना'ची झलक दाखवली होती. तिच्यावर ’मूर्खशिरोमणि’ असा शिक्का बसायला हे निमित्त झाले. आता किमान देशाच्या राष्ट्रपतींचं नाव तिला माहीत असायला हवं होतं हे निर्विवाद. मात्र केवळ स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नाही आणि 'टीका सकारात्मकपणे, खिलाडूवृत्तीनेही घेता येते' हे दाखवून देण्यासाठी आलियाने तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा ’जीनीयस ऑफ द इयर’ हा एक झकास व्हिडिओ पोस्ट केला आहे. ’ब्रेन जिम’ च्या मदतीने ती तिचं सामान्यज्ञान चांगलच वाढवते हे यात अगदी गमतीदार पद्धतीने दाखवलय. तरीही ’तिला माहीत नाही’ असं काहीतरी या जगात शिल्लक राहतच असा या व्हिडीओचा मार्मिक शेवट, बुद्ध्यांकाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीवर शब्दांवाचून भाष्य करतो.

आयुष्य़ प्रसन्न मनाने जगण्यासाठी त्यात थोडा विनोद हवाच परंतु अलियावरच्या विनोदांच्या निमित्त्याने आपला बुद्ध्यांक किती आहे हे विशेषत: आजच्या पिढीने तपासून पाहायला हवं. स्मरणशक्तीला कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, प्रतिभा आणि विवेक यांची जोड असेल तरच ती सर्वंकष बुद्धीमत्ता. ह्याची जाणीव नसलेली मुलं केवळ घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवतात आणि पालकांसह समाजही त्यांना बुद्धीमान मानू लागतो. इतर चार पैलूंचे ज्ञान नसले तर ही मुलं यशाचं सातत्य राखू शकत नाहीत. आजच्या शिक्षणपद्धतीत केवळ विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅटिकल स्किल्स) विकसित करण्यावर भर असतो. एकाग्रतेचे कौशल्य (अटेन्शन स्किल्स), सर्जनशीलता वाढवणे, चिंतन-मननाची कौशल्ये याकडे लक्ष दिले जात नाही. या कौशल्यांशिवाय व्यवहाराचा आणि यशापयशासह जगण्याचा तोल सावरता येणे कठीणच.

 मध्यंतरी एका स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला. मुलं निमशहरी भागातली पण चुणचुणीत वाटली. त्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. बहुतेक उत्तरं मुलांनी अचूक आणि त्वरित दिली. बरे वाटले, मग सहज त्यांना विचारले,’ ’नक्षलवाद’ म्हणजे काय?’ एकदम शांतता पसरली. जेमतेम एकदोन मुलांनी ’सरकार अन्याय करतं त्याला विरोध’ अशी ढोबळ उत्तरं दिली. उद्या करियर करताना या मुलांना चर्चा, मुलाखती, ग्रुप डिस्कशन्स याला सामोरे जावे लागेल. तिथे बाजी मारण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी नाही तिथे खर्‍या बुद्धीमत्तेचा कस लागेल तेव्हा रोजचे वर्तमानपत्र देखील वाचायचा कंटाळा असलेली ही मुलं त्याला कसं तोंड देणार ! मोबाईलचे नवनवे मॉडेल्स आणि ऍप्स सहजतेने हाताळणार्‍या तरूणाईला बरेचदा अनेक मुलभूत गोष्टी माहीत नसतात. ’पेपरमधे छापून आलय ना! मग ते खरच असलं पाहिजे’ असा मागच्या पिढीचा भाबडा समज असायचा. आजच्या पिढीतील अनेकांचा ’इंटरनेट वर असलेलं सगळं शंभर टक्के अचूक असतं’ असा समज आहे. सर्च इंजिन हा फक्त माहिती पर्यंत पोचवणारा दुवा आहे हे लक्षात घेतलं जात नाही. ’गुगल’ वापरून सामान्यज्ञान उत्तम असण्याचा आभास
म्हणजे चांगला बुद्ध्यांक नव्हे. गुगल किंवा एकूणच तंत्रज्ञानाची मदत घेण्यात गैर काहीच नाही परंतु त्याला व्यासंगाचा, विचारांचा पाया हवा. अन्यथा ही मुलं बरेचदा वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात अयशस्वी ठरतात, वैफल्यग्रस्त होतात. ह्याला जबाबदार आहे ’हुशारी’ ची तोकडी व्याख्या.

 मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित असतो असे मानले जाते. तरीही मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची मदत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते असे या क्षेत्रातले एक तज्ञ डॉ. आनंद जोशी सांगतात. सखोल वाचन, बहुश्रुतता, पर्यटन, वेगवेगळ्या कलांचा आस्वाद, विशेष प्रशिक्षण अशा अनेक मार्गांनी या दोन्ही मेंदूंना चालना दिली जाऊ शकते. हे सगळे केवळ व्यावसायिक यशासाठी करायचे नसून निखळ बौद्धिक आनंदासाठी आणि जगणं सुंदर करण्यासाठी करायचे आहे. तेव्हा विनोदांवर हसता हसता, आपल्यातही एक ’अलिया भट्ट’ लपलेली असते, तिला शोधून काढून तिचा बुद्ध्यांक वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करायला हरकत नाही.