’चालत जायचं ????’ मिनू जवळ जवळ किंचाळलीच. काही कारणामुळे आज तिचे नेहमीचे रिक्षावाले येऊ शकणार नव्हते. बाबा-दादा आपापल्या कामाला आणि आईची गाडी दुरूस्तीला. त्यामुळे आई म्हणाली, "शाळा फार लांब नाहीये तशी, जा एक दिवस पायी. त्यातही मजा असते." पायी जाणे हा पर्याय असू शकतो हे मिनूच्याच नव्हे तर आजच्या पिढीच्या गावी नाही. अर्थात काही खेड्य़ातून आजही अनेक मुलं शाळेसाठी बरीच पायपीट करतात. त्यामुळे शाळा गळतीचं प्रमाण काहीसं वाढत असलं तरी या प्रवासात मुलांचं नकळत जीवनशिक्षण आणि निसर्गशिक्षण घडतं. मात्र शहरी-निमशहरी भागातल्या आणि लगतच्या खेड्यातल्यादेखील जीवनपद्धतीतल्या बदलामुळे ही मुलं आता पूर्वीसारखी रमतगमत शाळा कॉलेजात जाऊ शकत नाहीत. वाहतुकीच्या सोयी असताना त्यांनी तसं करावं अशा अपेक्षाही नाहीत पण य़ा बदलांमुळे आणि एकूणच मुक्कामाला पोचण्य़ाच्या घाईमुळे अशा छोट्या प्रवासाबरोबरच जगण्याच्या प्रवासातल्या आनंदाला सुद्धा आजची पिढी मुकते आहे.
आजच्या पिढीपाशी वेळ नाही. पूर्वीसारख्या तासंतास चालणार्या मैफली, वन्समोअर घेणारी संगीत नाटके या ऐवजी ऑडीओ क्लिप्स आल्या. क्रिकेटचे कसोटी सामने पाहायलासुद्धा वेळ नाही त्याचे २०-२० झाले, बातम्या सुपरफास्ट झाल्या, अन्नाचं फास्ट फूड झालं. यात त्यांचा दोष नाही, स्पर्धेत धावायचे म्हणजे वेळ दवडून कसे चालेल? कॉर्पोरेट क्षेत्रात ठराविक काळात दिलेलं उद्दिष्ट साध्य करणं बंधनकारकच नाही तर अनिवार्य असतं. यामध्ये त्या प्रक्रियेपेक्षा साध्यावरच सर्व भर दिला जातो. यातून शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होतात. एक उद्दिष्ट साध्य होते परंतु ते यश क्षणभंगुर ठरते कारण तोवर व्यवस्थापनाने दुसरे उद्दिष्ट दिलेले असते. हे चक्र संपत नाही. या सगळ्य़ात वेळेअभावी जगण्याचा दर्जा खालावत जातो, कलेची अभिजातता काहीशी कमी होऊ लागते. रिअॅलिटी शो च्या चकचकाटात कलेची खरी ओळख करून देणारे गुरू, कलेची साधना, रियाज, त्यातल्या सौंदर्याचा शोध, त्यासह होणारे सादरीकरण, त्यातून मिळणारा आनंद आणि वाढणारा सांस्कॄतिक दर्जा असे टप्पे पार करण्य़ाइतका वेळ ,उत्साह आणि समज फार कमी होत चालली आहे. या पायर्य़ांना कुणी यश मानायलाच तयार नाही. कला आणि क्रीडेच्या क्षेत्रासारखीच परिस्थिती शिक्षणक्षेत्रात आहे. विद्यार्थी गुणवत्तेच्या नव्हे तर गुणांच्या मागे लागले आहेत. कोणताही प्रकल्प करायचा तो झोकून देऊन नवे काही शिकण्यासाठी नाही, तर ग्रेड मिळवण्य़ासाठी. शिकण्याच्या आनंदापेक्षा महत्त्वाचे त्याचे उपयोजित मूल्य. यश म्हणजे जिंकणॆ, यश म्हणजे चषक, यश म्हणजे विजेत्याला मिळणारा अमुक रकमेचा धनादेश.
आजच्या पिढीची यशाची व्याख्या जगण्य़ापेक्षा बाजाराशी नाते सांगते.
’आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक
हाती येताच म्हणतो दाणा, नेऊन मला विक’ याला काही अंशी मागची पिढी जबाबदार आहे. मुलांनी सतत शिखरावर राहावे हा पालकांचा अट्टाहास याला कारणीभूत आहे. त्यांच्या हे लक्षात यायला हवं की शिखरावर सर्वांनाच जागा मिळत नाही. खाली राहणाऱ्यांची संख्या नेहमी जास्त असते आणि तोच समाजाचा मुख्य भाग असतो. समाज जर निकोप घडवायचा असेल तर वैयक्तिक यशाइतकेच किंबहुना अधिक महत्व सामुहिक आनंदाला देता आले पाहिजे. सतत यशस्वी होण्य़ाच्या वेगवान शर्यतीपेक्षा जगणं समृद्ध असणं जास्त आवश्यक आहे. ‘कामात तल्लीन होणे’ हे सुदृढ मनाचं लक्षण आहे, असं मानसशास्त्रज्ञ सांगतात. (संदर्भ- पालकनीती) मग ते काम कोणतही असो. उत्तम श्रोता असणं, चांगला वाचक असणं, कलेचा रसिकतेने आस्वाद घेता येणं, निसर्गात रमता येणं, सामाजिक बदलांची जाण असणं, शिखरावर पोचलेल्या लोकांबद्दल निखळ भावना जपता येणं, खिलाडू वृत्तीने कौतुक करता येणं, स्वत:च्या क्षमता ओळखून आणि मर्यादा स्वीकारून मुक्त मनाने जगता येणं हे सुद्धा आयुष्याचं उद्दिष्ट्य असू शकतं, हे आजच्या पिढीला पालकांनी सांगायला हवं.
प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे म्हणत, मी जीवनाच्या जत्रेत रमणारा माणूस आहे. जगण्यातलं वैचित्र्य टिपत, वेगळेपण अनुभवत, आजूबाजूच्या गमतीजमती पाहत, वेगवेगळे प्रयोग करत, कधी स्वत:त मश्गूल होत तर कधी कुणाची सोबत करत मजेत जगता येतं हे अशी माणसं त्यांच्या निर्मितीतून आपल्याला सांगून जातात. इतरांचही जगणं समृद्ध करून जातात. एका मुलाला अंगणात फुलपाखराचा कोश दिसतो. त्यातला सुरवंट बाहेर पडण्य़ाची धडपड करताना दिसतो तेव्हा ते न पाहवून आणि त्याचं लवकर फुलपाखरू व्हावं या आशेने मुलगा कोश कापून टाकतो. सुरवंट बाहेर तर पडतो पण त्याचे पंख खुरटलेलेच राहतात. तो उडू शकत नाही. त्याची कोशाबाहेर पडण्याची धडपड ही त्या सुरवंटाची शक्ती वाढवण्य़ासाठी आवश्यक होती, तो टप्पा अनुभवताच न आल्याने त्याचं खर्य़ा अर्थाने फुलपाखरू झालच नाही. जगण्यातला टप्प्यांचा आनंद घेऊ न देता, घडण्य़ातली अनुभूती जाणवू न देता जेव्हा आजच्या पिढीला आपण स्पर्धेच्या नादात लवकर फुलपाखरू होण्य़ासाठी भाग पाडतो तेव्हा ती खरं तर खुरट्या पंखांची कीटकं होतात. त्या पंखांना स्वत:चे रंग लेवून विहरण्य़ातला आनंद आपण आता तरी देणार का?
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------