कॅडबरीजची ही सुरेख जाहिरात तुम्हाला आठवत असेल. भारतातील आय-टी कंपनीत एक पाश्चिमात्य तरूण रूजु झाला आहे. त्याच्या स्थानिक भारतीय सहकार्यांचे पेहराव अद्ययावत आहेत पण त्यांचे वेगळे खाणे-पिणे, देशी विनोद, काही विचारले की ’तुम नही समझोगे’ म्हणत जाणवून दिलेला दुरावा, या सगळ्यात तो बावचळून गेलाय- एकटा पडलाय. ते ओळखून एक सहृदयी सहकारी दिवाळी साजरी करण्याच्या निमित्त्याने त्याला चॉकोलेट भरवून आपलसं करतो. पाश्चिमात्य स्वीटला चतुराईने भारतीय मिठाईच्या पंक्तीत बसवून बाजारपेठेचा एक भाग काबीज करणे हाच जाहिरातीचा व्यावसायिक हेतू असला तरी यात कल्पकतेने सांधलेला सांस्कृतिक दुवा मनाला गुंफून घेतो. देशाटनाचे वाढते प्रमाण बघता, या जाहिरातीच्या निमित्त्याने कल्चरल कोशंट(CQ) म्हणजेच सांस्कृतिक गुणांकाचे महत्व अधोरेखित होते.
आहे तरी काय हा CQ?
CQ म्हणजे तुमची सांस्कृतिक समज. विशीष्ट मानवसमूहाची मूल्य, श्रद्धा, दृष्टीकोन, राहणी आणि आचार-विचार म्हणजेच संस्कृती समजून घेऊन, तिच्याशी जुळवून घेण्याची तुमची क्षमता. मैत्र जीवांचे. बुद्ध्यांक (Intelligence Quotient) मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती आहेत आणि तो वाढवण्याचा प्रयत्न मूल बालवाडीत गेल्यापासून पालक करू लागले आहेत. भावनांक (Emotional Quotient) वाढीसाठी देखील आवर्जून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या दशकापासून CQ बाबत विशेष चर्चा होऊ लागली आहे, या विषयावर सर्वप्रथम पी. ख्रितोफर अर्ले आणि सून ऍन्ग यांनी २००३ मधे ’कल्चरल इंटेलिजन्स’ हे पुस्तक लिहीले. वर्षभरातच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू नुसार CQ चा विकास ही एकविसाव्या शतकातील व्यावसायिक यशाची गुरूकिल्ली मानली गेली. पुढे डेव्हीड लिव्हर्मोर यांनी ही कल्पना ’लीडींग विथ कल्चरल इंटेलिजन्स’ या पुस्तकात विस्ताराने मांडली. मिशीगन येथील ’कल्चरल इंटेलिजन्स सेंटर’ मधे CQ मापनाच्या चाचण्या केल्या जातात. अमेरिकेत असे प्रयत्न होत असूनही त्यांच्या CQ वर प्रश्नचिन्ह उमटवणार्या घटना घडत आहेत. तेथे एका शीख प्राध्यापकांची नुकतीच हत्या झाली. शीख लोकांची पगडी, दाढी राखावयाची पद्धत आणि त्यामुळे ९-११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लादेन याच्याशी वाटणारे दर्शनी साम्य या सांस्कृतिक गैरसमजातून असे हल्ले यापूर्वीही तेथे घडले आहेत. अनेक भारतीयांवर युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलिया सारख्या पुढारलेल्या प्रांतात वर्णद्वेषातून हल्ल्यांना बळी पडावं लागल्याच्या घटना अजूनही घडत आहेत. तथाकथित पुढारलेल्या देशांसाठी ते म्हणजेच जणू सारं जग आहेत. इतर देशातील संस्कृतींची त्यांना माहिती नाही. त्या नागरिकांना दुय्यम लेखणं, त्यांचा तिरस्कार करणं, त्यांच्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होणं या सार्याचं मूळ सापडतं ते सांस्कृतिक विरोधाभासात. सांस्कृतिक प्रभुसत्तेच्या संकल्पनेनुसार आपलीच संस्कृती नैसर्गिकरित्या सर्वश्रेष्ट मानून ती जगावर लादण्याचा प्रत्येक समाजातील प्रस्थापितांकडून नकळत प्रयत्न केला जातो. त्यातून एक प्रचंड सांस्कृतिक दरी आणि इतर संस्कृतींप्रती द्वेष निर्माण होतो. स्वत:ची अशी मूळ संस्कृती नसलेल्या उण्यापुर्या ४०० वर्षांच्या अमेरिकेला CQ या विषयाचे गांभीर्य आता कुठे जाणवू लागले आहे.
दहा हजार वर्षाच्या देदिप्यमान, प्राचीन आणि संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारताला मात्र CQ चा परिचय फार पूर्वीपासून आहे. अर्ले आणि ऍन्ग यांचे या विषयावरील पुस्तक प्रकाशित होण्याच्या हजारो वर्षी आधीच तो या मातीत सहिष्णुतेच्या रूपाने रूजला. (तो आजच समजून घेतला नाही तर पाश्चात्य लोक त्याचेही ’पेटंट’ घेतील) सांस्कृतिक समन्वय साधणार्या संतसाहित्यात, संत कबीरांच्या दोहयांमधे CQ नेमकेपणाने प्रतिबिंबीत होतो.
’पंछी, मानव, फूल, जल, अलग-अलग आकार ,
माटी का घर एक ही, सारे रिश्तेदार..
छोटा कर के देखिए जीवन का विस्तार,
आँखों भर आकाश है बाँहों भर संसार.. ’
बौद्धिक, भावनिक आणि भौतिक गरजा पूर्ण करण्याची आपली धडपड म्हणजेच आयुष्य. संगीत, नृत्य, शिल्प, आहार, प्रतीकं, उदात्त अध्यात्मिक विचारप्रणाली अशा अनेक कंगोर्यांमधून भारतीत संस्कृती या सार्या गरजा भागवते. मूल्ये, आचार-विचार हा तिचा गाभा. गाभ्यातून येणारा आवाज मात्र क्षीण होत चालला आहे. गेल्या महिन्यात CNN iReport वर एका अमेरिकन महाविद्यालयीन तरूणीने आपला भारतभेटीचा अनुभव "India: The Story You Never Wanted to Hear" या शीर्षकासह मांडल्यावर खळबळ उडाली. ८ लाख पेज व्ह्यूजची तेथे नोंद झाली आहे. पुण्यातला जगप्रसिद्ध गणेशोत्सव पाहायला गेल्यावर गर्दीने त्यांच्याभोवती केलेले कोंडाळे, प्रवासात पाहिलेले अचकट्विचकट इशारे, इतर गावात खरेदी करताना जाणवलेल्या सहेतुक नजरा आणि बीभत्स स्पर्श, दोनवेळा बलात्काराचे झालेले प्रयत्न या सगळ्या अनुभवांमुळे व्यथित आणि विमनस्क होऊन परतलेली ती तरूणी सध्या मानसोपचार घेण्यासाठी रजेवर आहे. ’पर्यटकांसाठी स्वर्ग पण स्त्री असाल तर नरक’ असे तिने भारताचे वर्णन केले आहे. ते वाचून ’यत्र नार्यस्तु पुज्यन्ते रमन्ते तत्र देवत:’(!) म्हणणार्या भारतीयांची मान शरमेने खाली जावी. एखाद्या आदिवासी तरूणीने तिच्या संस्कृतीनुसार किंवा अपरिहार्यतेमुळे अपुरे कपडे घातले असतील तर यात आपल्याला काही वावगे वाटत नाही. उलट ’aesthetic sense' (!) असलेले स्थानिक प्रवासीसुद्धा त्यांचे फोटो काढतात पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात प्रवासाला सुटसुटीत म्हणून शॉर्ट्स घालून फिरणारी एखादी परदेशी तरूणी आपल्या नजरेत ’अर्धनग्न’ का ठरते? तिचा हेतू ’अंगप्रदर्शन’च असला पाहिजे हे गृहीत धरून तिला ’सावज’ का मानले जाते? ’जैसा देश वैसा भेस’ हे न समजण्याची सांस्कृतिक चूक तिने केली म्हणून....? भारत सरकारला अशा घटनांमुळे ’अतिथी देवो भव’ या आपल्या संस्कृतीची आठवण करून देणार्या जाहिराती प्रदर्शित कराव्या लागणं हे आपल्या खालावलेल्या CQ चं जळजळीत उदाहरण आहे.
आजच्या भारताच्या भ्रष्ट, अस्वच्छ रूपात त्या महन्मंगल संस्कृतीचे अवशेष उत्खनन करून शोधायची वेळ आलेली आहे. अभिमान बाळगायचा तर आपली संस्कृती मुळात समजून घ्यायला हवी. जग जेव्हा आपल्याला ’हमारे पास पैसा है, पॉवर है, तंत्रज्ञान है, तुम्हारे पास क्या है’ असे विचारते तेव्हा आपल्याजवळ ’हमारे पास संस्कृती है’ असे एक(मेव) बाणेदार उत्तर असते. परंतु आपल्या संस्कृतीचे गुणगान गातेवेळी सांस्कृतिक गृहीतके किती वेगवेगळी असू शकतात हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. दोन नैसर्गिक प्रेरणांचा विचार करू. पाश्चिमात्य देशात चुंबन सार्वजनिकरित्या घेतले जाऊ शकते परंतु देहधर्म हे खाजगीरित्याच केले जातात याउलट भारतात एकवेळ देहधर्म सार्वजनिकरित्या केले तरी कोणाला वावगे वाटत नाही पण चुंबन मात्र खाजगीरित्याच घ्यायला हवे नाहीतर संस्कृतीच्या संकेतांचा भंग होतो. यातला विनोदाचा (आणि खेदाचा) भाग सोडला तरी भारतीय संस्कृतीला पूर्वीचा सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी आत्मपरिक्षणाची गरज आहे हे नाकारता येणार नाही.
एकीकडे जग जवळ आले, जणू ते वैश्विक खेडे झाले असे म्हणताना जी एक प्रचंड सांस्कृतिक सरमिसळ होते आहे ती स्वीकारण्याची मानसिकता मात्र अद्याप तयार झालेली नाही हे दुर्दैव आहे. जगातील कित्येक समस्यांचे तेच मूळ आहे. परंतु आधी आपण आपला विचार करू या. भारतातील रस्त्यांवरून साप, साधू, हत्ती फिरत असतात हा आत्ताआत्ता पर्यंत( आयटीवाल्या मंडळींची येजा सुरू होईतो) परदेशी मंडळींचा गैरसमज होता.(गायी, म्हशी, कुत्री, गाढवे अद्यापही फिरत असतात, आणि त्यांना चुकवून आपण लीलया गाड्या चालवू शकतो हे मात्र खरे आणि आजही परदेशी मंडळींसाठी तितकेच धक्कादायक आहे.) एका सांस्कृतिक आदान-प्रदान दौर्यात एका बड्या अमेरिकन अधिकार्याने त्याच्या भारत दौर्यात बरेच सिनेमे पाहिल्याचे सांगितले. त्याने नेमके सगळे करण जोहर किंवा शिफॉन साडी-फेम यश चोप्रांचे प्रेमपटच पाहिले होते. त्यामुळे उठसूट रंगीत कपडे घालून जोडीने किंवा एकत्र जमून नाच करणे एवढेच भारतीयांचे जीवितकार्य असावे की काय अशी त्याला शंका होती. पण तो अभारतीय तरी होता. आपल्या देशाबद्दल आपले सांस्कृतिक ज्ञान जेमतेम आहे. पूर्वांचलातील आपल्याच देशबांधवांना सरसकट ’चिनी-जपानी’ संबोधले जाते. मराठी शिवाजीराव रजनीकांतच्या रूपात ज्यांच्या गळयातला ताईत आहे त्या दाक्षिणात्यांच्या द्राविडी संस्कृतीची उर्वरित भारतीयांकडून काहीशी चेष्टा केली जाते. अपवाद वगळता हिंदू-मुस्लीम-ख्रिश्चन अशा भिन्नधर्मीय संस्कृती गुण्यागोविंदाने फक्त ऐशी-नव्वदच्या दशकातील सिनेमात नांदताना दिसतात. भाषावादापासून परप्रांतीयांच्या आक्रमणापर्यंत अनेक सांस्कृतिक वाद आहेत. एकीकडे शहरी मॉल संस्कृतीचा लखलखाट तर खेड्यातून भारनियमनाचा अंधार म्हणजेच आहे रे-नाही रे अशी दरी आहे.
’सब कि पूजा एक सी, अलग अलग है रीत
मस्जिद जाये मौलवी, कोयल गाए गीत’
हे समजून न घेतल्याने धर्मापासून जाती (उदा: ओपन-ओबीसी-दलित), ते अगदी पोटजातीपर्यंत (उदा: कोकणस्थ,देशस्थ,९६ कुळी,कुणबी) समाजाच्या नसानसात हा सांस्कृतिक भेदभाव झिरपत गेलेला दिसतो. कधी तो दहशतवादाच्या रूपाने तर कधी ’ऑनर किलींग’ च्या रूपाने उग्र स्वरूप धारण करतो. CQ वाढला तर या प्रश्नांची तीव्रता नक्कीच कमी होईल.
माणूस जगात कुठेही गेला तरी त्याची नाळ आपल्या मुळांशी या भेदभावांसकट जोडलेली असते. कदाचित त्यामुळेच अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय दांपत्याला सून मात्र ’शक्यतो आपल्यापैकीच’ हवी असते. आपल्याला ऑलीव्ह ऑईलच्या वासाने अस्वस्थ वाटते तसेच आपल्या फोडण्यांच्या वासाने इतर खंडातील लोकांना कसेसे वाटते. सनईच्या स्वरांनी उमटणारे मंगल भाव भारतीय वगळता इतर कोणत्याही वेगळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या मनात निर्माण होणार नाहीत आणि चर्चबेल चा नाद आपल्या घंटानादाइतका पवित्र वाटणार नाही. त्यांच्या ’ऑपेरा’ गायकीवर आपल्याकडे कपबशा तडकल्याच्या विनोदी जाहिराती केल्या जातात. पुलं म्हणतात तसे ’हिच्या हातच्या थालीपीठाला कशाकशाची सर नाही’ या वाक्याचे भाषांतर कसे करता येईल? त्यातल्या शब्दांचे होईलही पण त्यातल्या भावना दुसर्या भाषेत कशा प्रतिबिंबीत होतील. तसच दोन संस्कृतींमधे साम्य स्थळे आढळतीलही पण तिची संकेतांमधून, प्रतिकांमधून, पेहरावांमधून ,मूल्यांमधून, आचार-विचारातून होणारी अभिव्यक्ती अतिशय वेगळी असते. असणार. सामायिकता अशी सहजगत्या निर्माण हो ऊ शकत नाही, त्यात संघर्ष होणारच.. संस्कृती लोकांना जोडते आणि त्यातले वेगळेपणच लोकांना तोडतेही.. हे वेगळेपण स्वीकारता यावे आणि भेदभावांची धार बोथट व्हावी यासाठी CQ म्हणजे सांस्कृतिक गुणांक वाढवण्याचा एकच पर्याय उरतो.
स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेच्या दरम्यान कफनीवजा भगव्या पेहरावाबद्दल त्यांची चेष्टा झाली. त्यावर त्यांनी ’मी अशा देशातून आलो आहे जिथे माणसाचे व्यक्तिमत्व त्याचे चारित्र्य घडवते, असे उत्तर दिले होते. स्वामी विवेकानंदांच्या आध्यात्मिक, बौद्धिक, सांस्कृतिक, भावनिक अशा सर्वच क्षमता उच्च कोटीच्या होत्या. सांस्कृतिक संघर्षातून ज्या चकमकी घडतात त्यांना तोंड देण्याचे असे कौशल्य सर्वसामान्यांमधे कुठून येणार. ते टाळण्याचा उपाय म्हणून किंवा हुकूमशाहीचा भाग म्हणून जेत्यांची एक सरधोपट संस्कृती लादली जाते, त्यात एकारलेपण येते. चीनमधे १९६५-७५ मधे असा प्रयत्न अयशस्वी झाला. रशियाचे तर नव्वदच्या दशकात एकारलेपणाच्या अट्टाहासापोटी विघटन झाले. तालिबानी संस्कृती दडपशाहीने रूजवण्याचा दुराग्रह त्या देशाला मध्ययुगीन काळात घेऊन जातो आहे. एकारलेपणाचे दुसरे टोक म्हणजे जागतिकीकरणामुळे रूजायला लागलेली जनसंस्कृती (’मास कल्चर’ म्हणजे खरं तर ’नो कल्चर’). या नव्या ’संस्कृती’(?)मुळे जगण्याचे सपाटीकरण झालेले दिसते. उदा: जगातल्या कोणत्याही कोपर्यातला शहरी तरूण पाहा. ’जीन्स, इंग्रजी, स्मार्टफोन, फेसबुक, पिज्झा हट, कोकाकोला, गुगल’ हा त्याच्या आवडींचा लसावि. सांस्कृतिक स्वत्व मात्र तळाला गेलेले. सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपली जायलाच हवीत. ती लयाला गेली तर जगणे अळणी होईलच पण त्याचे गंभीर सामाजिक परिणाम होतील. एक तर एकारलेली किंवा मग ही कणाहीन जनसंस्कृती, या दोन्हीपैकी एकीला शरण जाण्यापेक्षा स्वत:च्या संस्कृतीचा आदर टिकवून, पूर्वग्रह आणि दुराग्रह न बाळगता इतर संस्कृतींचे विश्लेषण करता यायला हवे. १) motivation २) Knowledge ३) Strategy आणि ४) Action या मापन पद्धतींच्या मदतीने आपला CQ वाढविणे शक्य आहे. (cq-portal.com या संकेतस्थळावर याची तंत्रशुद्ध चाचणी उपलब्ध आहे.)
उत्तम CQ असलेल्या लोकांना विवीध प्रकारची परिस्थिती सहज हाताळता येते, निर्णय घेणे सोपे होते, असे लोक उद्योगविश्वात स्वत:चा ठसा उमटवू शकतात (उदा: नारायण मूर्ती) त्यांना व्यावसायिक यशाबरोबरच आत्मिक समाधानही लाभते. आऊटसोर्सींगविना व्यवसायाचा विस्तार अशक्य झाला आहे. इंटरनेटवरून व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे मिटींग्ज ही अत्यंत सामान्य बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर एका पाहणीनुसार CQ वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणार्या कंपन्यांपैकी ९२% कंपन्यांचा लाभदर केवळ दीड वर्षात वाढला. त्यांची आंतरराष्ट्रीय व्याप्ती वाढली. सीमांतर्गत चर्चा, सामंजस्य करार, उत्पादन विक्री मोहिम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, आंतरराष्ट्रीय उद्योगांच्या बैठका, आंतरराष्ट्रेय रूग्णसेवा क्षेत्र, पर्यटन वृद्धी अशा अनेक उद्देशांच्या पूर्ततेसाठी उत्तम CQ हवा. कॉर्पोरेट क्षेत्रात मनुष्यबळ, पर्सोनेल, निर्यात विभागाच्या अधिकार्यांना CQ कसा वाढवायचा याचे प्रशिक्षण दिले जाऊ लागले आहे. अर्थात निव्वळ नफा कमावणे हा यामागचा उद्देश आहे.
मात्र आयुष्य म्हणजे व्यवसाय नव्हे. भारतीयांच्या DNA मधे उपजतच असलेला पण खालावू लागलेला CQ वाढविण्यासाठी आज ’प्रशिक्षणाची गरज’ निर्माण व्हावी याचे शल्य न बाळगता जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. सामान्य जनतेचा CQ चांगला असेल तर त्याचा देशावर कसा सकारात्मक परिणाम होतो याचे उदाहरण म्हणजे जपान. जगाशी सांस्कृतिक समन्वय साधणार्या या देशाच्या उत्तम CQ चा परिणाम म्हणजे त्यांची प्रगती. त्यांच्या ’कार्यसंस्कृतीचा’ भाग असलेली ’कायझेन प्रणाली’ बहुसंख्य जपान्यांनी समजून घेतली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होताच हातातली वस्तू जागच्या जागी तशीच ठेवून शिस्तीने मॉलबाहेर पडलेल्या जपान्यांनी त्यांच्या कृतीतून त्यांच्या सुसंस्कृतपणाचे पुरावे जगाला दिले आहेत. ताठरपणा सोडला तर मनातल्या नव्हे तर देशातल्या भिंतीही तोडता येतात हे जर्मनीने जगाला दाखवून दिले आहे.
’सुधारणांचा रथ कितीही वेगाने धावला तरी त्याचे सारथ्य संस्कृतीकडून व्हायला हवे’- असे शिवाजीराव भोसलेंनी नेमकेपणॆ एका लेखात म्हटले आहे. भारत देशाने स्वत:हून कुणाच्या संस्कृतीवर कधीच आक्रमण केलं नाही. डोळ्या़च्या बदल्यात डोळा सर्व जगाला आंधळं करून सोडेल हे या देशाने कायम समजून घेतलं. हिंदू धर्मात एकच परमेश्वर, एकच धर्मग्रंथ किंवा एकाच प्रेषिताला मानण्याचीही सक्ती नाही.अर्थात या सहिष्णुतेचा घुसखोरांनी कायमच गैरफायदा घेतला, त्याला चोख प्रत्युत्तर द्यायलाच हवे. पण या सगळ्या आक्रमणांचा परिणाम होऊन भारतात अनेक पातळ्यांवर सांस्कृतिक विसंवाद निर्माण झाला आहे तो कमी करण्यासाठी सांस्कृतिक गुणांक (CQ)वंगणाचे काम करेल.
जग फार लांब राहिले, आधी शेजार्याची संस्कृती समजून घेण्यापासून सुरूवात करायला हवी. ’केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार’... हे तर खरेच पण जगाबद्दलची समज वाढण्यासाठी आणि एकूणच शहाणीव निर्माण होण्यासाठी इंटरनेटच्या आभासी युगात ही भ्रमंती प्रत्यक्ष करण्याची गरज राहिलेली नाही. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून आणि साहित्यातून देशोदेशीची संस्कृती जाणून घेणे आता सहज शक्य आहे. जीवनाचे सारे सौंदर्य संस्कृतीत सामावले आहे. संस्कृतीत सारखेपणा नसला तरी मुळात आपण सारी माणसे आहोत. ’माणूस’ असणे हीच खरी सामायिकता. या सामायिकतेचे वर्तुळ आपोआप संस्कृतीला येऊन भिडते. त्या पातळीवर घडतो तो खरा सुसंवाद. तो दोन संस्कृतींमधे घडत नाही तर दोन हृदयांमधे घडतो. CQ चा परमोच्च बिंदू आपल्याला ’भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ म्हणणार्या संत ज्ञानेश्वरांच्या ’विश्वकल्याणाच्या पसायदानात’ आढळतो. त्यांच्या या ओवीमधे, सुसंवादाचे म्हणजेच CQ च्या उन्नत पातळीचे यथार्थ वर्णन आढळते.
हृदया हृदय एक जाहले । ये हृदयीचे ते हृदयी घातले
द्वैत न मोडिता केले । आपण सारे अर्जुना ॥
(महाराष्ट्र टाईम्स दिवाळी अंक २०१३ (विदर्भविशेष) मधे प्रसिद्ध झालेला माझा हा लेख : ’मैत्र जीवांचे’)