’नगारे की तरह बजते शब्द’ हे संथाली भाषेतील कवयित्री निर्मला पुतुल यांच्या एका कवितासंग्रहाचे नाव आणि तेच त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य देखील आहे. एका संवेदनशील उपवर निसर्गकन्येचे स्वप्नचित्र रेखाटणारी , ’उतनी दूर मत ब्याहना बाबा’ ही त्यांची (मूळ संथाली) कविता आपल्याला अंतर्मुख करून जाते. समृद्ध सहजीवन म्हणजे नक्की काय याचा, कुठलाही साहित्यिक आव न आणता सजगपणे शोध घेते. वैचारिक परिपक्वतेचा एक निकष शैक्षणिक गुणवत्ता असायला हवा असा शहरी अट्ठाहास आज सर्वत्र आढळून येतो. समृद्ध सहजीवनाच्या पाश्चात्य व्याख्या जगावर नकळत लादल्या गेल्याचे चित्र सगळीकडे दिसते. त्याला अनुसरूनच ’२९, ५-९", एम.बी.ए, ३ लाख’ अशा स्वरूपाच्या जाहिरातीतील माहितीभोवती वर्तुळ काढून जोडीदाराची निवड केली जाते. परस्परपूरकता, आस्वादकता, रसिकता, दोन कुटुंबांची सांगड, या बंधनाबरोबर आयुष्यात येणार्या इतर माणसांचा गुणदोषांसह सहज स्वीकार, रसरसून आणि समरसून एकमेकांसह जगण्याची आकांक्षा हे सगळं त्या छोट्याशा वर्तुळात कसं सामावणार! वैवाहिक आयुष्याकडेच नव्हे, एकूणच सकस जगण्याकडे आपले दुर्लक्ष होते आहे. जिंकण्याच्या शर्यतीमधे धावणार्यांना निसर्गाचे हुंकार ऐकू येईनासे झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर एक पारदर्शी मनाची ग्रामीण युवती आपल्या भावी सहचराकडून-सासरकडून ज्या प्रगल्भ अपेक्षा करते त्या आपल्याला स्तिमित करतात. ती खर्या अर्थाने आधुनिक आहे. ती केवळ स्वप्नाळू नाही, तिला वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव आहे. विवाहानंतर देखील माहेरी मायेची फुंकर घालता यावी ही तिची धडपड आहे. म्हणूनच ’खजुर का गुड बनाकर भेज सकू सन्देश’ किंवा ’शाम को लौट सको पैदल’ एवढ्याच दूर तिला जायचं आहे. ’पहाडीपर डूबता सूरज’ दिसू शकेल असं निसर्गाच्या कुशीत वसलेलं, केवळ माणुसकीचा दागिना ल्यालेलं सासर तिला हवं आहे. मी आणि तो ,एवढच तिचं मर्यादित जग नाही. तिला माणसांची नांदती गजबज हवी आहे पण शहरी कोलाहल नको आहे. ’मान से भी ज्यादा जहा तेज दौडती हो मोटरगाडीया’ अशी शहरं तिला नको आहेत. श्रीमंतीच्या बेगडी हव्यासात आपलं कोवळं भावविश्व करपून जाऊ नये याचं भान ती जपते. ’काहिल निकम्मा’ , ’बात बात मे बात करे लाठी डंडे की’ असा मुजोर किंवा ’जिसके हाथोने कभी कोई पेड न लगाया हो’ असा रूक्ष पती तिला मुळीच नको आहे. ’कबूतर के जोड की तरह’ साथ देणारा, ’जो बजाता हो बासुरी सुरीली’ असा आगळा पती तिला हवा आहे.
या तरूणीचं आत्मभान चकित करणारं आहे. आयुष्याकडून असणार्या तिच्या निखळ पण स्पष्ट अपेक्षा, सुटू पाहणार्या माहेराची ओढ, तिच्यासारख्याच सृजनशील निसर्गावरचं तिचं प्रेम आणि त्यातून निर्माण झालेली, रूजवणार्या हातांनी सर्वार्थानं जगणं वाटून घेणार्या जोडीदाराची आस, अशा अनेक छटातून ते ठळक होत जातं. या सार्या छटांचे प्रतिबिंब सामावणार्या निर्मला पुतुल यांच्या कवितेचा हा मराठी भावानुवाद....
असं सासर शोधा बाबा
बाबा,
इतकं दूरचं सासर नका शोधू या लेकीसाठी
जिथे मला भेटायला यायला..
घरच्या गाई विकाव्या लागतील तुम्हाला..
नका पाठवू अशा जागी नांदायला
जिथे साध्यासुध्या माणसांपेक्षा दैवी शक्तीचं स्तोम असेल
नसेल जवळ एखादी गर्द वनराई, डोंगरातून झुळझुळत येणारी नदी...
अन अशा गावचं स्थळ तर पाहूच नका मला
जिथे फक्त सुसाट धावणार्या मोटारगाड्यांनाच माणसांपेक्षा मान असेल..
असतील केवळ गगनचुंबी इमारती आणि दडपून टाकणारी भलीथोरली दुकानं..
अशा पतीशी नका जोडू माझं नातं..
ज्याच्या घरकुलाला अंगण नसेल, कोंबडा आरवून जिथे पहाट होत नसेल..
आणि हिरव्यागार परसातून, मावळणारा केशरी सूर्य दिसत नसेल...
नका पाट लावू अशा भ्रताराशी माझा
जो हंड्या झुंबरांच्या हवेलीत झिंगत राहील
नाकर्ता असेल..
जत्रेतून मुली उचलून आणण्याचा नाद असेल ज्याला..
नीट पारखून घ्या बाबा,
रा-वाईट पाहून वाटेल तेव्हा बदलून घ्यायला
तो काही तांब्या नाही एखादा..
असा दादला तर निवडूच नका माझ्यासाठी
जो उठसूट हाणामारी करेल.. उगारेल मस्तवाल कुर्हाड नाहीतर सुरा
एवढ्या तेवढ्या कारणावरून..
मनात आलं तर जाईल निघून.. बंगाल, आसाम, काश्मीर वाट्टेल तिथे..
अशा मुलाला नका देऊ माझा हात
ज्याच्या हाताने एखादं रोपही रूजवलं नसेल..नसेल वाढवलं एकही झाड
नसेल दिली कुणाची साथ.. नसेल उचलला कुणाचा भार
आणि ’ह’ हाताचा, एवढं देखील लिहायला ज्याला येत नाही
अशा वरासाठी नका करू माझे हात पिवळे..
असं सासर शोधा...
जिथे सकाळी आलात तर परतू शकाल संध्याकाळी पायी..
कधी रडू आलं तर... पैलतीरावर नदीमधे स्नान करताना ऐकू यावं ते तुम्हाला..
आणि येता यावं धावत माझे डोळे पुसायला..
तुमच्या आवडीचा माझ्या हातचा एखादा पदार्थ धाडता यावा तुम्हाला..
माझ्या शेताचा वानवळा चाखायला पाठवता यावा तुम्हाला..
बाजाराला जाता येता गावचा कुणी भेटावा..
त्याच्याकडून कळावी तुमची खुशाली..
चितकबर्या गाईला पाडस झाल्याची गोंडस बातमी..
अशा गोकुळात संसार करता यावा
जिथे देवमाणसं नसली तरी जितीजागती माणसं नांदतील भोवताली...
जणू वाघ आणि शेळी एका जागी पाणी पितील...
अशा कारभार्याशी लावा माझं लगीन
जो पारव्याच्या जोडीसारखा सदैव माझ्या सोबत राहील..
घरी दारी शेतात राबेल बरोबरीनं
आणि रात्री वाटून घेईल सारं सुखदु:ख...
असा जोडीदार शोधा..
सुरेल अलगुजाची मुलायम साद घालणारा
दणदणारे ढोल ताशे वाजवण्यात तरबेज असणारा...
ऐन वसंतात माझ्या केसात माळायला
पळसाचं लालबुंद फूल घेऊन येणारा..
मी उपाशी असताना
एक घासही जाणार नाही ज्याला
असा नवरा शोधा बाबा मला.....