Tuesday, November 29, 2011

आमिश


" निसर्ग बघायला म्हणून निघालो तर
गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती..."

आपल्या तथाकथित निसर्गप्रेमाला कवी अशोक नायगावकरांनी असा मिश्कील चिमटा घेतला आहे. आपण पर्यटनाला गेलोच तर निसर्गाला बघतो ते ही कॅमेर्‍याच्या भिंगातून. तिथे दूरचित्रवाणीशी संपर्क आला नाही तर आपण जगापासून तुटू की काय अशी भिती वाटू लागते. एकदाचा मोबाईल ’रेंज’ मधे आला की आपल्या जीवात जीव येतो. माणसाला शेवटी गरज असते फक्त चार हात जमिनीची, हे तत्वत: मान्य असलं तरी प्रत्यक्ष जगताना भौतिक साधनांशिवाय- इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांशिवाय पान हालत नाही. म्हणूनच चंगळवादाचा मुकुटमणी असं ज्या अमेरिकेला म्हटलं जातं तिथे मात्र एक समूह-पंथ या सगळ्या पासून दूर निसर्गाच्या कुशीत निवांत आयुष्य जगतो आहे यावर विश्वास बसेना. आधुनिक जीवनशैलीच्या धकाधकीपासून अलिप्त असणार्‍या त्यांच्या प्रांतातून प्रत्यक्ष बग्गीतून फेरफटका मारल्यावर कुतूहल, आश्चर्य, आनंद, समाधान अशा संमिश्र भावना मनात दाटून आल्या. या समाजाचं-पंथाचं नाव आहे "आमिश"...जगण्याच्या सगळ्या आमिषांपासून मुक्त असलेल्या या आमिश मंडळींचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विलक्षण आहे.

जेकब अमान (या नावावरूनच "आमिश" म्हटले जाऊ लागले) यांनी सुरू केलेल्या या आमिश चळवळीने युरोपात सन १६४४-१७२० च्या दरम्यान चांगलेच मूळ धरले. यातले बहुसंख्य लोक १७ व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत स्थलांतरित झाले. पेनसिल्व्हेनिया भागात त्यांचे वास्तव्य जास्त प्रमाणात आहे. ख्रिश्चन धर्मातील वेगवेगळी तत्वे अनुसरणारे गट (प्रोटेस्टंट, अनाबाप्टीस्ट इ.) त्यांच्यात निर्माण झाले असले तरी त्यांची जीवनपद्धती साधारण सारखीच आहे. जणू ते सगळे निसर्गपुत्र आहेत. पवनचक्की आणि केरोसिन, लाकूड, कोळसा अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ते त्यांची वीजेची माफक गरज भागवतात. (त्यामुळे भारनियमन हा ’सहिष्णू’ शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही) अमेरिकेत सर्रास आढळणारा दिव्यांचा लखलखाट त्यांना आवश्यक वाटत नाही. बहुतेक सगळे आमिश वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त टुमदार घोडागाडी वापरतात. काही कामासाठी आमिश शहरात जातात तेव्हा अद्यावत कार्सच्या बाजूला सिग्नलला थांबलेली त्यांची देखणी बग्गी (खिडकी असलेल्या पेटीसारखी दिसणारी) लक्ष वेधून घेते. प्रत्येक घरी बग्गीसाठी ऐटबाज घोडे तर शेतीसाठी खेचरं पाळली जातात. एका खोलीच्या शाळेत आठवीपर्यंत औपचारिक शिक्षण घेतल्यावर आमिश मुले शेतीचं शिक्षण घेतात. शेती व शेतीशी संबंधित उद्योग हेच त्यांच्या चरितार्थाचं साधन आहे.

समूहाच्या भौगोलिक मर्यादांमुळे असेल, बाहेरच्या जगाशी संपर्क न ठेवताही आमिश आरामात जगतायत, उलट त्यामुळे त्यांचे आपसातील संबंध (मोबाईल किंवा सोशल नेटवर्किंग साईट्स न वापरताही) अधिक दृढ झाले आहेत आणि त्यांची संख्या गेल्या अर्धशतकात तिपटीने वाढली आहे असं त्यांच्या समाजप्रमुखांचं मत आहे. आमिश चर्चपरिवारातच त्यांचे विवाहसंबंध होतात. मोठं कुटुंब ही देवाची देणगी आहे असे ते मानतात. मुलांचं उत्तम संगोपन करणं, नाती जपणं याला त्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक व्यक्तीवर त्याच्या कुटंबाचा अतिशय प्रभाव असतो. मुलांची मानसिक, शारिरीक आणि आध्यात्मिक प्रगती होते आहे ना याकडे कुटंबाचा कटाक्ष असतो. मुले वडिलांना शेती व इतर बाहेरील कामात मदत करतात तर मुली आईला गृहोद्योगात मदत करतात. कुटुंबाला हातभार लावणे हे प्रत्येक जण आपले कर्तव्य समजतो. वृद्ध माणसे शेवटपर्यंत कुटुंबाच्या आधारानेच जगतात. पाण्यापासून निर्माण होणारी उर्जा वापरून, डिझेल जनरेटरवर चालणार्‍या हत्यारांच्या सहाय्याने १००% लाकडी फर्निचर-घरे बनवण्याचे कौशल्य आमिश लोकांच्या प्रत्येक पिढीत आढळते. काही आमिश जर्मन भाषा बोलतात तर बहुसंख्य आमिश इंग्रजीचा वापर करतात. चर्चमधे जर्मन तर इतर ठिकाणी इंग्रजी गीते जुन्या पद्धतीनेच गायली जातात. फक्त खाजगी कार्यक्रमात वाद्ये वाजविली जातात, जाहीररित्या नाहीत. सण समारंभांना नातेवाईक-मित्र आवर्जून एकत्र येतात. सामाजिक एकोप्यामुळे आणि संयमी, सरळ, सोप्या जगण्यामुळे माध्यमातून रोरावत येणार्‍या "मनोरंजनाच्या" महापुरात ते वाहून जात नाहीत. माध्यमं त्यांच्या विश्वात शिरलेलीच नाहीत.


अमेरिकेतील मुक्त लैंगिक जीवन-पद्धतीच्या पार्श्वभूमीवर अमिश स्त्री-पुरूषांच्या सहजीवनातले वेगळेपण उठून दिसते. यांत्रिक जगातल्या ताणतणावांपासून, जीवघेण्या स्पर्धेपासून दूर असल्याने वैवाहिक तसेच कौटुंबिक आयुष्यात सौख्य आणि स्थैर्य आपसूक येते. रविवारी संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तरूण-तरूणींना एकमेकांसह वेळ घालवण्याची मुभा असते. मात्र त्यांना उघड्या टपाच्या बग्गीतून फिरायला जाणे बंधनकारक असते. जोमदार पीक झाल्यावर म्हणजे नोव्हेंबर महिन्यातले मंगळवार विवाहासाठी निश्चीत केले जातात. वधू निळा पोशाख घालते. माणसांमधे असूया, तणाव निर्माण करणार्‍या गोष्टी (उदा: दागदागिने) विवाहप्रसंगी देखील निषिद्ध असतात.(असे आपल्याकडे चुकून जरी घडले तर केवळ या विषयाला वाहिलेल्या मालिका माथी मारणार्‍या तमाम दूरचित्रवाणी वाहिन्या बंद पडतील..असो.) लग्नानंतर नवदांपत्य मित्रपरिवार आणि नातेवाईकांना भेटण्यात काही दिवस घालवतात आणि मग संसाराला सुरूवात करतात. कपड्यातही बटन किंवा झिप ऐवजी हुकचा वापर केला जातो आणि ते घरी शिवले जातात. पांढरा शर्ट, काळी पँट,काळे जॅकेट-कोट व विशीष्ट प्रकारची हॅट असा साधारणपणे पुरूषांचा तर स्कार्फ, पायघोळ झगा, त्यावर ऍप्रन असा स्त्रियांचा पोशाख असतो. मुलांचे छोटेसे पोशाख सुद्धा अशाच स्वरूपाचे असतात, थंडीचा मोसम वगळता मुले चक्क अनवाणी चालताना आढळतात. स्त्रियांचे तपकिरी, सोनेरी लांब केस मागे अंबाड्यासारखे बांधलेले असतात. त्यावर बांधलेल्या "केप" वरून त्यांचे वय आणि वैवाहिक स्थिती कळते. विवाहित पुरूष चाळीशी नंतर मिशी नाही परंतु दाढी राखतात. या प्रतीकांमुळे अमेरिकन पद्धतीप्रमाणे विवाहाची अंगठी घालायची त्यांना गरज वाटत नाही. दागिने आणि कपड्याचा सोस हा मुद्दा एकूणच निकालात निघतो आणि तुलना, हेवा असे प्रश्नच निर्माण होत नाहीत.

भारतासारख्या देशात अनेक आदिवासी किंवा वनवासी थोड्याफार फरकाने याच पद्धतीने जगतात, असे वाटेल पण तसे नाही. त्यांच्या घराला जगाकडे उघडणारी खिडकीच नसल्याने आदिवासी लोक निसर्गपुत्र म्हणून नाईलाजाने जगतात, त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कार होत नाही, अंधश्रद्धेचा पगडा मनावर असतो. गरीबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचे शोषण केले जाते. आमिश लोकांनी मात्र ही जीवनशैली स्वेच्छेने स्वीकारली आहे. ते स्वयंपूर्ण आहेत. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची "मन ,बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण" अशी व्याख्या केली आहे. या नजरेतून पाहिले तर आमिश सर्वार्थाने सुशिक्षीत आहेत. त्यांना बाहेरच्या बेभान जगापासून अलिप्त राहायचे आहे.

आमिश जीवनाबद्दल जाणून घेतल्यावर मनात आले, एखादा छंद, लेखन, संशोधन, व्यवसाय यासाठी स्वत:ला झोकून द्यावं किंवा खूप पैसा कमवावा, त्याचा उपभोग घ्यावा, जग पाहावं, नाव कमवावं अशा आकांक्षा आमिश तरूणाईमधे निर्माण होत नसतील का? निरीक्षणातून तरी असेच उत्तर मिळते की आमिश संस्कृतीच्या स्थैर्यासाठी, हितासाठी आणि भवितव्यासाठी वैयक्तिक महत्वाकांक्षेला गौण स्थान दिलं जात असावं. काही समाजशास्त्रज्ञांना ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी वाटते. मात्र प्रेम आणि त्यागाच्या पायावरच, ’जगा आणि जगू द्या’ म्हणत आमिश जीवन कणखरपणे उभे आहे. काही बंडखोर आमिश तरुणांनी व्यक्तिपेक्षा समूहाला महान ठरवणार्‍या या जीवनपद्धतीला नकार देण्यासाठी त्यातून पलायन करणे, सार्वजनिक स्थळी गोळीबार करणे असे विरोध दर्शवणारे मार्ग अवलंबले आहेत. पण अशा घटनांचे प्रमाण तुरळक असल्याचे कळले.आधुनिकीकरणाच्या प्रभावामुळे आमिश मंडळींमधे कट्टर विरूद्ध बदलांचा माफक प्रमाणात स्वीकार करणारे असे गट देखील पडू लागले असले तरीही "निसर्गाकडे चला" हा मूलमंत्र आमिश लोकांनी आजही जपला आहे.

माध्यमांचा अतिरेक, निसर्गाची लूट, व्यसने, व्यभिचार, हव्यास अशा आचार, विचार आणि विहारातील सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून लांब राहून मनमोकळा श्वास घेणारे आमिश आजच्या जगात वेगळे ठरतात ते यामुळेच. काही जणांना असं जगणं, वैज्ञानिक प्रगतीचा आस्वाद न घेणं हा मागासलेपणा, विचीत्रपणा वाटतो. यातलं तथ्य ज्यांना प्रश्न पडतायत त्यांनी शोधावं, आमिश आजही शांतपणे जगत या व्यवहारी जगाला केवळ कृतीनेच ठाम उत्तर देत आहेत.

Friday, November 25, 2011

देव


बर्‍याच व्यावसायिक चित्रपटांमधे हे दॄश्य हमखास असते. कोणतेतरी एक महत्वाचे पात्र मृत्युशय्येवर पहुडले आहे, डॉक्टरांनी ’अब सब कुछ उपरवाले के हाथ मे’ असल्याचं सांगून टाकलं आहे. नायक वा नायिका मंदीरात येऊन देवाला आळवत आहेत, वादळ सुरू झाले आहे, देवळात टांगलेल्या शे पाचशे(!) घंटा वेड्या-वाकड्या हलत जोरात वाजत आहेत. अचानक कुणी तरी येऊन ’वो होश मे आ गये’ असं सांगतं आणि टँग टँग सतार वाजू लागते. ’तेरा लाख लाख शुकर है भगवान’ असं ऐकत प्रेक्षकही सुटकेचा निश्वास टाकतो. या तद्दन फिल्मी ईश्वरभक्तीला छेद देत ’देव म्हणजे नक्की काय’ याचा शोध घेण्यास मराठीतील ‘देऊळ’ चित्रपट प्रवृत्त करतो. या चित्रपटाद्वारे उमेश व गिरीश कुलकर्णी या द्वयीने समाजमनातला देव शोधण्याचा धाडसी प्रयत्न नर्मविनोदी पण मार्मिक पद्धतीने केला आहे.

एका गुराख्याला (केशा) ’दत्त’ दिसल्याचा भास किंवा त्याच्या मते ’साक्षात्कार’ होतो. हा आधी चर्चेचा आणि मग राजकारणाचा विषय होतो. ठरलेल्या रूग्णालयाऐवजी दत्ताचे देऊळ बांधण्याला प्राधान्य दिले जाते. जनतेच्या धार्मिक भावनांचा फायदा घेऊन राजकारणी दत्तमंदीराच्या विस्तारीकरणाच्या नावाखाली बेकायदा कामे सुरू करतात. गावातले संतुलित विचार करणारे कुलकर्णी अण्णा जेव्हा ही फसवणूक आहे असे म्हणतात तेव्हा त्यांना उत्तर मिळते "बेकायदा कामं आणि कायदा यांच्यामधे भक्तांची मोठी रांग उभी आहे, ती भेदून आमच्यापर्यंत कुणीही पोचू शकत नाही." हे सगळे पाहून विषण्ण झालेला केशा (गुराखी) देवळातली मूर्ती घेऊन पळून जातो तेव्हा दुसरी मूर्ती बसवून देवस्थानाच्या अवतीभवती असलेली बाजारपेठ सुरू ठेवली जाते. मना-मनातल्या ’देव’ या संकल्पनेला तपासून पाहायला हवे आहे याची जाणीव निर्माण करून चित्रपट संपतो..

तुमचा भविष्यावर विश्वास आहे काय? असे विचारले की बरेच जण होय म्हणत हात पुढे करतात आणि काही जण ’अजिबात नाही- क्योंकी तकदीर तो उनकी भी होती है जिनके हाथ नही होते’ असे म्हणतात (यातले बहुतेक जण नंतर हळूच ’राशीभविष्य’ वाचतात). तुमचा देवावर विश्वास आहे काय? या प्रश्नाचे काहीसे तसेच आहे. ठाम हो किंवा नाही असे उत्तर साधारणपणे मिळत नाही. ती व्यक्ती बुद्धीजीवी किंवा अल्प-अशिक्षीत, ग्रामीण किंवा शहरी, विचारी किंवा भाबडी, यशस्वी किंवा अयशस्वी यापैकी जशी असेल त्यानुसार स्पष्टीकरणासह उत्तर मिळते. विज्ञानाला अद्याप न सुटलेली काही कोडी निसर्गात आहेत आणि हाच ईश्वरी अस्तित्वाचा पुरावा आहे असे काही जण म्हणतात तर जगातली प्रत्येक घटना ही कोणत्यातरी वैज्ञानिक घटनेचीच परिणीती आहे असं काही जणांना वाटतं. खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात "जीवनातील घटना आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, काही वेळा बाह्य परिस्थिती किंवा संभाव्यशास्त्राच्या नियमाप्रमाणे घडत असतात त्यामागे कोणतीही पारलौकिक शक्ती नसते" तर ज्योतीर्भास्कर जयंत साळगावकर ’देव’ या संकल्पनेबाबात म्हणतात, "हजारो वर्षापूर्वीचे आपले पूर्वज रानावनात राहात असताना त्यांना कधी पशुपक्षांची, जनावरांची, वाऱ्यावादळाची, धरणीकंपाची तर कधी शत्रूंच्या टोळयांची भीती वाटत असली पाहिजे आणि त्यावेळी आपल्याला कोणत्या तरी गूढ शक्तीकडून सहकार्य मिळावे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली असली पाहिजे. कदाचित एखादेवेळी लहान-मोठा प्रत्यय आला की यामागे सूत्र चालविणारी गूढ शक्ती असल्याची खात्री पटून तिच्याबद्दल वाटणारा आदर आणि आधार अधिक वाढला असला पाहिजे.अशा रीतीने ही संकल्पना मूर्त स्वरुप धारण करीत असताना देव या कल्पनेचा जन्म केव्हा तरी झाला असला पाहिजे".

जगातील बहुतेक धर्म देवाचे रूप अमूर्त आहे असे मानतात, देवाचा दूत असणार्‍या प्रेषिताला आदर्श मानतात, तर हिंदू धर्मात देवाला निर्गुण आणि सगुण दोन्ही रुपात पाहिले जाते. धर्म जगण्याची पद्धत ठरवतो. तो जन्माला चिकटून येतो आणि मग त्यानुसार देवाची व्याख्या स्वीकारुन माणूस जगत राहतो. वातावरण, संस्कार, विचारशक्तीनुसार प्रत्येक धर्मात कडवे, शक्य तोवर धार्मिक परंपरा पाळत राहणारे आणि नाकारणारे असे तीन गट तयार होत असतात. देवाचे अस्तित्व मानायचे वा नाही या संवेदनशील प्रश्नाबाबत मतभेद आहेत. स्टीफन हॉकिंगने तर ब्लॅक होल थिअरी द्वारे आस्तिक्यच नव्हे तर रिचर्ड डॉकिन्स सारख्या विचारवंतांनी स्वीकारलेली ’अज्ञेयवाद’ ही कल्पना सुद्धा मोडीत काढली. ते म्हणतात, "बिग बँग/स्फोटाआधी काळाचाच जन्म झाला नव्हता - त्यामुळे देवाकडे विश्व बनवण्यासाठी वेळ कुठून येणार? हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. पृथ्वीच्या शेवटच्या सीमेपर्यंत जाण्याचा मार्ग विचारण्या सारखा आहे.पृथ्वी गोल आहे. त्याला कडा नाहीत. सीमा नाहीत. तिथे जायचा मार्ग विचारणे हा प्रश्न अडाणीपणाचा आहे. अर्थात प्रत्येकाला आपला विश्वास आणि श्रद्धा जपायचे स्वातंत्र्य आहेच - मला मत विचाराल तर मी म्हणेन की - देव नाही . देवाने विश्व निर्माण केलेले नाही . ईश्वर मार्गदाता नाही . ईश्वर प्रेमळ काळजीवाहू नाही . ईश्वर मुक्तिदाता नाही . कारण तो अस्तित्वातच नाही. यातून सरळ निष्कर्ष असा निघतो की , स्वर्ग खोटा , नरक असत्य आणि मरणोत्तर आयुष्य आत्मा हे सारे झूट आहे. आपल्याला हे एकच भौतिक आयुष्य , हे एकच वास्तव अस्तित्व आपल्याला लाभले आहे. विश्वाच्या अथांग निरंतर रचनेचा आस्वाद घ्यायला आणि ते शिकून घ्यायला हे जे आयुष्य मला लाभले आहे त्याबद्दल त्या विश्वरचनेचा मी ऋणी आहे."

परंतु नास्तिक्याबरोबर येणार्‍या जबाबदार्‍या पेलण्याचे सामर्थ्य सर्वसामान्य माणसांमध्ये नसते आणि त्यामुळे जगायला त्यांना देवाचा टेकू लागतोच.

गाडगेबाबा आणि एकूणच साधू-संतांनी मानवसेवेत ’ईश्वर’ शोधला, तशी शिकवणही समाजाला दिली. मात्र सामान्य माणसाचे प्रयत्न संपतात तिथून नकळत त्याच्या देवावरच्या विश्वासाची सुरूवात होते, ती देखील धार्मिक स्वरूपातच. हा विश्वास श्रद्धेच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा जगण्याचे बळ वाढते. पापपुण्याचा विधीनिषेध बाळगला जातो आणि अशी श्रद्धा माणसाला अधिकाधिक समाधानी, आश्वस्त करते. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली सीमारेषा फार नाजूक आहे. ती वेळीच ओळखता आली नाही तर हाच विश्वास अंधश्रद्धेचे रूप घेतो. योग्य-अयोग्य हा विवेक संपतो.
 "परमेश्वराची पूजा करा पण बेकायदा प्रार्थनास्थळे बांधू नका " अशी ताकीद नुकतीच उच्च न्यायालयाने सोसायटयांना दिली आहे. बुवाबाजी, गंडेदोरे याचा अतिरेक माणसामधला प्रयत्नवाद हिरावून घेतो, दैवावर सगळी भिस्त ठेवली जाते, देवाच्या नावाने बाजारीकरण केले जाते. भोळ्याभाबड्या जनतेच्या या विश्वासाचाही व्यापार केला जातो. आज आपण अनेक धार्मिक संस्थानांमधून देणगीच्या नावावर मिळालेल्या जनतेच्या पैशाची लूट बघतो, अध्यात्माच्या खास दूरचित्रवाणीवाहिन्यांवर यंत्र-ग्रहखड्यांच्या जाहिरातींचा मारा बघतो, देवळांमधून देवापेक्षा स्वत:चे स्तोम माजवणारे भोवतालचे बडवे बघतो, अनेक ठिकाणी तेला-दुधाने चिकट झालेले अस्वच्छ गाभारे बघतो, गणेशमिरवणुकीतले बीभत्स नाच बघतो, दर्शनासाठी देखील वेगवेगळ्या किमतीच्या रांगा बघतो, काळा पैसा चित्रपटनिर्मितीला वापरून आणि तो चित्रपट चांगला चालावा म्हणून देवालाच कौल लावणारे महाभाग बघतो, गावात मुलभूत सोयी नसल्या तरी गावातल्या देवळाचा कळस मात्र सोन्याच्या पत्र्याने मढवण्याचा अट्टाहास बघतो, आयुष्यात होरपळले गेलेले लोक तर्कबुद्धी गहाण टाकून बुवा-बाजीला लागलेले बघतो, भक्तांच्यातच गटातटाचे राजकारण बघतो, नवसाच्या नावाखाली देवालाच लाच देऊ करणारे भाबडे भक्त बघतो, धार्मिक ग्रंथांचे संदर्भच योग्य मानून केलं जाणारं स्त्रियांचं शोषण बघतो, आणि अशा अपप्रवृत्तींना कोणत्याच धर्माचे अनुयायी अपवाद नाही हे बघतो तेव्हा तेव्हा मन व्यथित होते.
समर्थांची उक्ती आठवते , 'जनाचा लालची स्वभाव। आरंभीच म्हणती देव। म्हणिजे मला कांही देव। ऐसी वासना।।
काहीच भक्ती केली नस्तां। आणी इच्छिती प्रसन्नता। जैसें काहीच सेवा न करितां। स्वामीस मागती।।'
इथे सेवा- भक्तीचा अर्थ प्रयत्न असावा. प्रयत्नांती परमेश्वर हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवे.

माणसाची ’देव’ ही संकल्पना त्याच्यावरील संस्कारांनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार, त्याच्या आयुष्यातील अनुभवांप्रमाणे, सहवासातील व्यक्तींच्या-विचारपद्धतींच्या-संस्कृतीच्या प्रभावामुळे बदलत जाऊ शकते. गांधीजींच्या आस्तिकतेला धार्मिकतेपेक्षा सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरीण एकाच आयुष्यात या भूमिका बदलतानाही दिसतात पण त्यामागे सर्वंकष विचार, विशीष्ट अनुभूती असते. सुरूवातीला आपल्या कवितेतून
’तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन’
असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्त्वाबद्दल प्रश्न विचारतात तेव्हा त्यांच्याच कवितेचे उत्तर असते..
’स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही |
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||’

मग वाटतं एखाद्याला इतकी आश्वस्त करणारी श्रद्धा, नाकारुन काय मिळणार आहे. केवळ नास्तिकतेच्या आग्रहाने जगाचे गाडे नीट चालू शकणार आहे का? त्याचा आंतरिक ओलावा टिकून राहील का? त्यापेक्षा मानू देत देवाला. कुणाला देव आपल्या पाठीशी दिसेल, कुणाला देव आपल्याच अंत:करणात सापडेल, कुणाला तीर्थयात्रेत, नामजपात, व्रतवैकल्यात, ध्यान-धारणेत सापडेल, कुणाला एखाद्या संशोधनात, प्रकल्पात, संगीतात किंवा एखाद्या सुंदर कलाकृतीत सापडेल तर कुणाला दुसर्‍याचे अश्रू पुसण्यात परमेश्वर गवसेल. एका बोधकथेत माणूस परमेश्वराला म्हणतो "तू जर माझ्याबरोबर चालतोस तर मग या वाळवंटात उमटलेली पाऊले दोनच कशी, चार का नाहीत?" परमेश्वर उत्तरतो "ती दोन पावले माझीच आहेत कारण वाळवंट पार करताना मी तुला उचलून घेतले होते". अंधश्रद्धेची वाट वगळता  देवाचा असा शोध घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे, असावे. त्याचा आदर व्हावा.  

Friday, November 11, 2011

स्त्रिया, पोशाख आणि समाज

परवा चित्रपटगृहात समोरच्या रांगेत एक तरूण फौज येऊन बसली. बहुतेकांनी चेहरा रूमालाने झाकला होता जणू तो त्यांच्या पोशाखाचाच एक भाग होता. चित्रपट सुरू होताच त्यांनी रूमाल बाजूला केले.. तेव्हा त्या कॉलेजकन्यका असल्याचा उलगडा झाला. आजूबाजूला काही ’जोड्याही’ येऊन बसल्या होत्या,त्यांचे रूमाल मात्र त्यांच्या चेहर्‍यावर तसेच होते. त्वचेचे संरक्षण हा साहजिकच त्या ’पडद्या’मागचा हेतू नव्हता. जगातील काही देश बुरखाबंदीसाठी चर्चा, वादविवाद करत असताना या मंडळींनी स्वेच्छेने हा ’बुरखा’ स्वीकारला आहे. धार्मिक कारणासाठी किंवा ऊन-वार्‍यापासून संरक्षण हा हेतू असेल तर अजिबात हरकत नाही पण काही मुलींना टवाळखोर मुलांपासून बचाव करण्यासाठी चेहरा झाकावा लागतो तर काही जण जगापासून आपले कृत्य दडवण्यासाठी रूमालाचा आडोसा वापरतात... ही मात्र समाजासाठी चिंतेची बाब आहे.

खरं तर पोशाख आपले व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी निर्माण केले गेले आहेत. आपण एखादया व्यक्तीला भेटल्यावर आपले त्या व्यक्तीबद्दल जे मत तयार होत असते ते त्या व्यक्तीचा पोशाख /पेहराव हयावरूनच. मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. कुणी काय पेहराव करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असला तरी मुलींनी/स्त्रियांनी काय घालावे हे मात्र समाज ठरवत असतो. परदेशी स्त्रियांनी भारतात प्रवास करताना कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भातील वेबसाईटवर स्पष्ट सूचना आहेत "Women travellers in India should pay attention to local dress code for two reasons: to avoid sexual harassment and to avoid looking disrespectful" एका हिंदी सिनेमातील एक प्रसंग आठवतोय. तोकड्या कपड्यातली झीनत अमान एका सडकछाप मजनूला पकडून पोलीस अधिकारी असलेल्या अमिताभ बच्चनकडे घेऊन येते आणि तिला बघून त्या मजनूने शीटी वाजवली अशी तक्रार करते. यावर अमिताभ तिला सुनावतो "तुला अशा पोशाखात बघून लोक शीटी नाही तर काय देवळातली घंटा वाजवतील काय!" प्रेक्षक यावर मनापासून हसतात. म्हणजे असा पोशाख घातलेल्या मुलीला असाच प्रतिसाद मिळणार यात काही वावगं वाटत नाही. विद्यार्थिनींचे आखूड स्कर्ट हा सध्या ब्रिटनमधील शाळांसमोरचा एक मोठा प्रश्न आहे. शाळांनी मिनी स्कर्ट्सवर बंदी आणून ट्राउझर्स घालणे सक्तीचे केले आहे. ही समस्या एकट्या ब्रिटनमधील नाही . अमेरिका आणि युरोपीय देशांतही हा प्रश्न गंभीर बनला आहे . पण ' मिनी स्कर्ट्सवर बंदी ' हे त्याचे नेमके उत्तर नव्हे . शाळांच्या व्यवस्थापनांचा तसा दावाही नाही . एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर शोधलेल्या उपायांपैकी हा एक छोटासा प्रयत्न आहे , असे त्यांचे म्हणणे आहे . आपल्या देशातही अनेक शिक्षणसंस्थांमध्ये ड्रेसकोड हा वादाचा विषय झाला आहे . तो लागू झाल्यानंतर शिक्षणसंस्थांची डोकेदुखी थोडी तरी कमी झाली असावी असे वाटते.

विद्यार्थी विश्वासाठी हे रास्त आहे कारण शरीराबद्दलचे त्यांचे कुतूहल त्यांना अस्वस्थ करत असते. परंतु कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने मध्यंतरी ’आपल्यावरील अत्याचार टाळायचे असतील तर स्त्रियांनी सभ्य कपडे घालावेत’ असे विधान केले. या मानसिकतेला उत्तर म्हणून आणि ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच ,त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा मूर्ख स्त्रियांनी त्या मोर्चात मुद्दाम वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला, साहजिक त्या मोर्चाने समाजाला योग्य तो बोध न मिळता ’बेशरम मोर्चा’ म्हणून त्याची संभावना झाली. सामाजिक संकेतांपेक्षा वेगळा पोशाख करणे याचा अर्थ आमंत्रण देणे असा होतो हे नाईलाजाने स्वीकारुन त्यामुळे स्त्रीवरील अत्याचारांची शक्यता वाढू शकते हा वस्तुनिष्ठ विचार प्रत्येक सुजाण स्त्री करते पण मुळात हे प्रकरण ’संस्कृती सापेक्ष’ आहे. एकेकाळी पुण्य़ात सकच्छ की विकच्छ (पाचवारी साडी/ नऊवारी साडी) हा वाद रंगला होता. केरळ राज्यात तर काही वर्षांपूर्वी स्त्रियांनी उत्तरीय वापरणे असभ्यपणाचे मानले जाई. यासाठी लढा देत कालांतराने उत्तरीय न वापरणॆ म्हणजे असभ्यपणा इथे आपण येऊन पोचलो आहोत, तर हा विचार अद्याप ज्या सामाजिक स्तरापर्यंत झिरपला नाही त्या आदिवासी समाजातील काही गटांमध्ये उत्तरीय आजही वापरले जात नाही. मग याला श्लील अश्लील परिमाण लावणारे आपण कोण? काळाच्या एका तुकड्यावर उभे राहून आपण हे कसं ठरवणार? आणि तो अधिकार आपल्याला दिला कुणी?

शिवाय स्त्रियांबाबत दुर्दैवी घटना केवळ त्या त्या काळानुसार किंवा सामाजिक चौकटीनुसार अनुचित मानल्या गेलेल्या पोशाखामुळे घडतात असे नाही कारण विकृतीला वय, नाते, रूप, रंग कळत नाही. तरूणीच नव्हे बालिका, नात्यातील गरजू परित्यक्त वृद्ध स्त्रिया, अगदी रस्त्यावरील बेवारस, मतीमंद स्त्रियांवर देखील अत्याचार होतात. पण मुलींच्या विनयभंगाचे किंवा बलात्काराचे प्रकार जेव्हा समाजात घडतात तेव्हा सर्वात आधी मुलींच्या कपड्यांविषयी , त्यांच्या वर्तनाविषयी प्रश्न उपस्थित केले जातात .म्हणजे मुलांवर समाजस्वास्थ्याची काहीच जबाबदारी नसते का! त्यांनी ’सिक्स पॅक्स’ दाखवत फिरणे अयोग्य मानले जात नाही, त्यांच्या ड्रेसकोड बद्दल कुणाला आक्षेप नाही पण स्त्रियांच्या पेहरावाकडे मात्र समाजातील स्वयंघोषित पोलिस डोळ्यात तेल घालून पाहणार, असे का!

आपण चांगले दिसावे, आकर्षणाचे केंद्र असावे असे बहुतेक प्रत्येक मनुष्यप्राण्याला वाटते. स्त्रियांमधे ही भावना निसर्गत: अधिक प्रमाणात असते. पुरूषप्रधान समाजात या साध्या गोष्टीचा बाऊ केला जातो. उदा: एखाद्या पुरूषाची बायको निवर्तली तर त्याच्या राहणीत, पेहरावात फारसा फरक पडत नाही पण जोडीदार गमावलेल्या स्त्रीने चांगला पोशाख केला, दागिने घातले तर ती टीकेचा विषय ठरते आणि टीका करण्यात दुर्दैवाने इतर स्त्रियादेखील पुढे असतात. हे कितपत योग्य आहे!

पोशाख सभ्य असावा यात वादच नाही पण तो काय असावा हा मात्र वादाचा मुद्दा आहे. उदा: साडी हा भारतीय सभ्य पोशाख मानला जातो पण बर्‍याच चित्रपटांमधे साडीमधली ओलेती नायिका जे काय अंगविक्षेप करते किंवा सिनेमाचं जाऊ द्या ,काही स्त्रिया ज्या दिव्य तर्‍हेने साडी नेसतात ते पाहून साडीला सभ्य पोशाख म्हणायला जीभ रेटत नाही. त्यापेक्षा काही वेळा जीन्स वर व्यवस्थित टॉप हा देखील योग्य पोशाख असू शकतो. पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे सोयीचे आहे ना, ज्या समाजात आपण वावरतो तिथे तशा पोशाखाने काही औचित्यभंग तर होणार नाही ना एवढा विचार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य ते लैंगिक शिक्षण दिले गेले आणि मुळात स्त्रीकडे ’मादी’ म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून पाहण्याचा संस्कार रूजला तरच स्त्रियांची सामाजिक सुरक्षितता मजबूत होईल. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोषाख आहे असं आपल्याच संस्कृतीत म्हटलं जातं. हे आपल्याला उमगलं, आंतरिक सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विकसित झाला आणि व्यक्तीस्वातंत्र्य व स्वैराचार यामधली सीमारेषा आपल्याला नीट कळली तर अशा लेखाचे प्रयोजनच उरणार नाही..नाही का !

published in matrubhumi 10-11-11