साधनाताई गेल्या.. अगदी आतून वाईट वाटले.
मान्यवरांच्या हृद्य प्रतिक्रिया वाचल्या, माझा त्यांचा वैयक्तिक परिचय असावा अशी मी कोणीही नव्हे पण आपल्याला त्यांना निदान एकदा तरी भेटता, बघता आले आणि त्यांच्याशी बोलता आले याचे खूप समाधान वाटले. बोलता आले म्हणजे ऐकता आले कारण अशा व्यक्ती केवळ आपल्या भावनांचा आदर म्हणून आपल्यासारख्या सामान्यांशी बोलतात. त्याचा फायदा घेऊन त्यांना मुलाखत घेतल्यासारखे प्रश्न विचारणे मला तरी योग्य वाटत नाही. पण अशी स्थिती आम्हा सगळयाच मैत्रिणींची झाल्याने त्यांना बोलते करण्यापुरते मी काही तरी विचारले असेन. आनंदवनात (आणि हेमलकसा) आमच्या बुकक्लबचे जायचे ठरले, समिधा, नेगल, बाबांच्या कविता ,प्रकाश आमटयांचे लेख सगळ्या जणींनी वाचलेले.. आता ते सगळं फक्त प्रत्यक्ष बघायचं होतं आम्हाला. मला विशेषत: साधनाताईंना बघायचं होतं. पण त्या वेळ देतील का शंका होती.
आम्ही वेगळ्याच मनोवस्थेमधे पोचलो. समोर एका कुटीमधे आनंदवनाचा स्वागतकक्ष, स्वच्छ परिसर, वाफाळत्या चहाने स्वागत.. येण्यापूर्वी प्रभूकाकांशी फोनवर बोलणं झाल्याने सगळी व्यवस्था आधीच झालेली. खोलीत हात लावला तर मळेल की काय असे वाटावे इतका शुभ्र परीटघडीचा पलंगपोस, उश्या ,चादरी. लख्ख खोली, स्वच्छता सुगंधासारखी भरून राहिलेली. प्रभूकाकांनी एक सोबती दिला त्याच्याबरोबर आम्ही सगळा परिसर हिंडून आलो. वेगवेगळ्या वसाहतींमधे, संगणक कक्षात, लघुद्योग केंद्रात सगळे ’परित्यक्त’ लोक आपापल्या कामात मग्न होते, चार जणांसारखे जगत होते. याचक नव्हते. कलाकुसरीच्या वस्तू तर थक्क करणार्या होत्या..
एक अंध मुलगा झाडाखाली आपल्याच विश्वात बासरी वाजवत होता, तर एक मूकबधीर मुलगा विणत बसला होता. बाबांच्या-मुलांच्या एकूण प्रवासावर व कार्यावर आधारित ’अंधारातील प्रकाशवाटा’ ही चित्रफीत देखील पाहिली. सगळं भारावून टाकणारं होतं पण कुठेतरी हेच सगळं अपेक्षित देखील होतं. विकास व भारती आमटे अंध वाद्यवृंदासह दौर्यावर गेले होते.
अजून साधनाताई दिसल्याही नव्हत्या. संध्याकाळी त्या स्वागतकक्षात थोडावेळ बसतात असं कळल्यामुळे आम्ही सगळ्या तिथेच जाऊन बसलो. थोड्या वेळाने त्या निवासस्थानातून बाहेर पडल्या, अशक्त वाटल्या पण झपझप पावले टाकत आल्या. आत कुणाकुणाशी काही बोलत स्वागतकक्षात बाबांच्या फोटोखालच्या कोचावर बसल्या. सुती साडी, मोठं कुंकू आणि हसरा सात्विक प्रसन्न चेहरा! आम्हा सगळ्यांना जवळ बोलावलं आणि पाठीवर हात ठेवत खूप ओळख असावी अशा सहजतेने चौकशी करू लागल्या. त्यांच्या मनातली शांतता त्यांच्या शब्दात, डोळ्यात आणि स्पर्शातून जाणवत होती. आमच्याजवळ काहीच शब्द नव्हते, पण त्यांनी बोलावं म्हणून काहीकाही विषय काढले. आठवण म्हणून काढायच्या फोटोसाठी त्या ’अगं, शेजारी बसा की’ म्हणाल्या पण आमची तेवढी पात्रता असायला हवी ना! नक्षलवादी भागातून आम्ही मैत्रिणीच ५/६ तास प्रवास करून उद्या हेमलकशाला जाणार म्हटल्यावर त्यांनी तिथल्या सोयीसाठी आत लगेच सूचना दिल्या..जेवलात का? विचारलं. मला तर त्या वेळ देतील हेच जिथे अवघड वाटत होतं तिथे इतकी आपुलकी पण ओझं वाटायला लागली. त्या मग सहज काही अनुभव सांगू लागल्या..त्यात कुठेही मोठेपणाचा लवलेश नाही.. संध्याकाळच्या मंदावलेल्या प्रकाशातही त्या कक्षात उजेड भरून राहिल्यासारखं वाटत होतं
बाबांसारख्या, म्हटलं तर निस्संग सेवाव्रताची सहचारिणी म्हणून त्या जगल्याच पण स्वत:चा वेगळा ठसा उमटवत. पतीच्या अस्तित्वातच स्वत:ची आहुती दिली या अर्थाने त्या मला ’समिधा’ वाटत नाहीत कारण त्यांचा सेवायज्ञ बाबांबरोबर संपला नाही, मुलांच्या साथीने अव्याहत सुरू राहिला. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या मार्दवतेमुळेच
’वाडगे घेऊन हाती, जिद्द प्राणांची निघाली..
घाबरी करूणा जगाची ’लांबूनी’ चतकोर घाली...
माझिया रक्तासवे अन चालली माझी लढाई..
दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही...’
असे काळीज चरचरून टाकणारे शब्द लिहीणार्या बाबांच्या हृदयातलं वादळ त्यांना पेलता आलं असावं. तडजोड म्हणून नाही तर वसा म्हणून. श्रद्धेच्या, विचारपद्धतीच्या, सहजीवनाच्या सर्वसामान्य परिभाषा बदलून स्वीकारलेला वसा. सोमनाथपासून सगळे प्रकल्प मिळून पाच हजारांवर कुटुंबांचं स्वीकारलेलं पालकत्व.. दलितमित्र, मिलेनीयम, मातोश्री, चतुरंग-जीवनगौरव सारख्या कित्येक पुरस्कारांचा वर्षाव आणि तरीही निगर्वी वृत्ती. पारितोषिक स्वीकारताना राष्ट्रपतींआधी ’हिचा’ उल्लेख करीन ही बाबांची अट त्यांच्यातल्या अनोख्या बंधाची जाहीर पावती म्हणायला हवी.
साधनाताई आस्थेने, मायेने बोलल्या आणि बाबांच्या समाधीकडे निघून गेल्या.
हेमलकशाला साधनाताईंच्या नवविवाहित नातसुनेने अगत्याने केलेली सोय, विचारपूस, रात्रीच्या जेवणानंतर शेकोटीभोवती झालेली डॉ. प्रकाश आणि मंदाताईंची भेट, त्यांच्या घराचा भाग झालेलं प्राणीविश्व, त्यांच्या सुना, मुलींसह आदिवासी स्त्रियांबरोबर अनुभवलेलं संक्रांतीच हळदीकुंकू, ’नेगल’कार मनोहर काकांनी साधलेला मन:पूत संवाद ,आमटे परिवाराचा कुठेही उदोउदो न करता सादर केलेला २६ जानेवारीचा भव्य, शिस्तबद्ध कार्यक्रम, सावळ्या,काटक आदिवासी मुलांची आत्मविश्वासपूर्ण भाषणं, सगळंच अविस्मरणीय !
बाबा-साधनाताईंच्याच मुशीतून घडलेली पुढची-त्याहीपुढची पिढी..
साधनाताई गेल्याची बातमी दूरचित्रवाणीवर बघताच हे सगळं अधोरेखित झालं.
आम्ही हेमलकशाला निघण्यापूर्वी प्रसन्न सकाळी आनंदवनातल्या बाबांच्या समाधीस्थळी गेलो होतो.. पहाटे तिथे साधनाताई दिवा ठेवून गेलेल्या असत. त्याच समाधीवर आता त्यांचा अंत्यसंस्कार झालेला आहे... साधनाताई आता केवळ कार्यरूपाने उरल्यात.
या ओंजळभर सुवासिक स्मृती मात्र मनात कायम दरवळत राहतील.