वैवाहिक सहजीवन : कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील
’शयनगृहाची खिडकी उघडी असेल तर जिला झोप येत नाही आणि तीच खिडकी बंद असेल तर ज्याला झोप येत नाही, अशा स्त्री-पुरूषाच्या युतीस विवाह असे म्हणतात.’ ’जॉर्ज बर्नार्ड शॉ’नी केलेली ही विवाहाची मार्मिक व्याख्या ! विवाहापूर्वीच्या स्वप्नरंजनात अशा रूक्ष गोष्टींचा विचार कोणी करत नाही त्यामुळे नंतरचे अपेक्षाभंग अपरिहार्य असतात, त्या धक्क्यांच्या तीव्रतेवर आणि स्वीकारावर संसाराची गाडी कशी धावणार ते अवलंबून असते. हल्ली शहरात तरी विवाहाचं वय पंचविशीपलिकडचे असते त्यामुळे सहजीवनाच्या कल्पना बालीश नक्कीच नसतात पण त्या परिपक्व असल्याचेही विशेष आढळून येत नाही कारण घटस्फोटांचे वाढते प्रमाण य़ाच भागात अधिक आहे. अर्थात घटस्फोटांची संख्या हे काही त्या त्या भागातील ’सहजीवनाच्या गुणवत्तेचे’ सरसकट मोजमाप असू शकत नाही पण ढोबळ अनुमान असू शकते.
’पुरूष जेव्हा स्त्री साठी गाडीचे दार उघडून धरतो तेव्हा एक तर ती गाडी तरी नवी असते नाही तर ती स्त्री तरी’ असे गमतीने म्हटले जाते. कल्पनेतला तो असे स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा असला तरी तो प्रत्यक्षातला तो तिची सामानाने जड झालेली पिशवी उचलेलच असे नाही. त्याच्या कल्पनेतील ती वाफाळत्या चहाने आणि टवटवीत चेहर्याने त्याचे स्वागत करत असली तरी प्रत्यक्षातील ती मोलकरणीने दांडी मारल्याने तिची किती पंचाईत झाली हे त्याला करवादत सांगत असते. तेव्हा तिचा अवतार आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो. कल्पनेत ते दोघे सहलीला जाऊन विहरत घरी येतात, प्रत्यक्षात त्या दरम्यान नेमका गॅस सिलेंडरवाला येऊन जातो. एखादीच्या कल्पनेतला तो तिच्यासह कवितेत रमणारा वगैरे असतो ,प्रत्यक्षात तिची ’फर्स्ट लॅंग्वेज’ नेमकी त्याची ’थर्ड लॅंग्वेज’ असते. किंवा त्याला उत्तम शायरी अवगत असते आणि तिची आस्वादक्षमता ट्रकच्या मागे लिहिलेल्या चारोळ्यांपलिकडे जाणारी नसते.स्वप्नातल्या सुंदर शयनगृहात प्रत्यक्षात त्याचा स्नानानंतरचा ओला टॉवेल तस्साच रोज गादीवर पडलेला असतो आणि टापटीपीची आवड असणार्या त्याच्या जेवणात नेमका तिचा केस सापडतो. सामिष भोजन आवडणार्या एखाद्या त्याच्या प्रत्यक्षातल्या तिला अंड्याचा वासही सहन होत नाही, याउलट एखाद्या सुगरणीला नेमका ’जाणिजे यज्ञकर्म’ भावनेने खाणारा तो प्रत्यक्षात मिळतो.
साहित्य, कलेत रमणारी आणि उत्तम अभिरूची असणारी कल्पनेतील ती प्रत्यक्षात दागिने, साड्या आणि टीव्ही मालिकांबद्दल बोलायला लागते तेव्हा तो वैतागतो तर याउलट तिच्या शैक्षणिक,व्यावसायिक प्रगतीचा अभिमान असणारा कल्पनेतला एखादा तो प्रत्यक्षात खुशाल तिला चारजणात बावळट म्हणतो तेव्हा ती अवाक होते. द्विपदवीधर असलेल्या एखाद्या तिला साधा डीडी काढता येत नाही हे बघून तो थक्क होतो तर आधी रेस्टॉरंटमधे तिच्यासाठी खुर्ची सरकवून धरणारा तो नंतर स्वत:चा चहाचा कप देखील विसळत नाही हे पाहून ती हतबुद्ध होते.
प्रकल्पात बरोबरीने काम करणारा तो नवरा होताच घरी येताच वृत्तपत्र उघडून चहाची फर्माईश करतो आणि त्याच्याच बरोबर दमून आलेली ती चरफडत गॅस पेटवते. करिअरची स्वप्न बघणार्या तिने पुढे काय करायचे हे ती दोघं नव्हे तर तो आणि तिचे सासरचे ठरवतात तर कधी कल्पनेतली त्याची स्मार्ट सहचरी प्रत्यक्षात अगदी ’काकूबाई’ निघते..
इथवर अपवादाने सुरळीत पार पडले तरी अपत्याच्या आगमनानंतर बाळाच्या आजारपणात, संगोपनात (बहुतांशी) तिलाच जागावे लागते, तो निवांत झोपतो. जरा बदल म्हणून नाटक सिनेमाला गेले तर चरम बिंदूवर (बहुतांशी) त्यालाच बाळाचे रडे बाहेर नेऊन शांत करावे लागते, ती निवांत असते. पुढे मुलांचे वय आणि जबाबदार्या वाढत जातात तसतसे कल्पनेचे इमले कोसळायला लागतात. कलांचा आस्वाद घेत,करिअर घडवत, एकमेकांना जपत, आयुष्य फुलवूया या स्वप्नाला प्रत्येक अपेक्षाभंगाबरोबर तडे जाऊ लागतात आणि कल्पनेतले ते सुखी त्रिकोणी/चौकोनी कुटुंब प्रत्यक्षात फक्त फोटोमधे हसताना दिसते.
वरवर निरूपद्रवी वाटणारे हे चिमुकले अपेक्षाभंग असोत की शारिरीक, मानसिक शेअरिंगच्या परस्परविरोधी कल्पनांमुळे होणारे असह्य अपेक्षाभंग असोत, विसंवादाचे बीज रोवले जाते. संस्कृतीच्या किंवा सामाजिक दडपणांमुळे पुरूष आणि स्त्री हे वेगवेगळ्या (मानसिक) ग्रहांवरून आल्यामुळे ,त्यांच्या मेंदूंच्या रचनेतील फरकामुळे त्यांच्या विचार व कार्यपद्धतीत फरक असतो, पुरूषांना निमूट स्वीकार अपेक्षित असतो तर स्त्रीला सहानुभूती, हे सगळे समजावून सांगणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत. पण सभा तीच असली तरी श्रोता म्हणून जाणे आणि वक्ता म्हणून जाणे यात फरक असणारच. कल्पनेतल्या सहजीवनातला पद्य भाग वस्तुस्थितीत नकळत गद्य होऊन जातो. ऍरिस्टॉटलने म्हटले आहे की प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगली नागरिक असतेच असे नाही, त्याच धर्तीवर पुढे म्हणता येईल की, प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगला पती वा पत्नी होऊ शकेलच असे नाही. उदा: काही लेखिकांनी नोंदवलेले अपेक्षाभंग. सोललेले सगळे डाळिंबाचे दाणे एकटयाने मटकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचा सुनीताबाईंच्या ’आहे मनोहर तरी’ मधला उल्लेख विस्मयकारक आहे. त्याही पेक्षा कवितेत लीलया चांदणं गुंफणार्या पाडगावकरांना भर उन्हात बायको मागून चालते आहे, तिच्या एका हातात जड पिशवी आणि दुसर्या हातात मूल आहे याची जाणीवही न झाल्याचा उल्लेख यशोदाबाईंच्या आत्मवृत्तात आहे. प्रिन्सेस डायना, हिलरी क्लिंटनचे किंवा ’तत्सम’ वलयांकित आत्मवृत्ते आणि त्यांचे सहजीवन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
झोकून देऊन काम करणारी दांपत्य मात्र याला अपवाद असावीत. उदा: सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दांपत्य बंग किंवा आमटे. यांचं कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवन यात फारसा फरक नसावा असे त्यांच्या मुलाखती, लेखांमधून वाटते. "जीवनातली उदात्त ध्येय, समान मूल्य, असामान्य त्यागी वृती आणि परस्परांवरील निरपेक्ष प्रेम" हे याचं सूत्र असू शकेल.
पण सर्वसामान्य दांपत्यांचं काय ! त्यांच्या कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवनात एवढी तफावत का !.
एक तर लग्न करतानाच्या निकषांमधेच याचं एक कारण दडलेलं आहे. ’many a men in love with a dimple, make the mistake of marrying the whole girl' या स्टीफन लेकॉक च्या मिस्कील विधानानुसार वधूची निवड केली जाते आणि ’२८, ५.९", MBA, ९ लाख’ अशा चमत्कारिक माहितीभोवती वर्तुळ काढून वराची ! नंतर चष्मा, मंगळ, मुलीला भाऊ आहे की नाही अशा ’महत्वपूर्ण’ माहितीला प्राधान्य असते. दिसणार्या गुण-अवगुणांपेक्षा मुळात ज्याची खात्री नाही त्या जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिका अंतिम निर्णय देतात. courtship च्या वेळात तर सगळे स्वत:वर आणि एकूण जगावर एवढे खूष असतात की एकमेकांची सकारात्मक बाजूच दाखवली वा पाहिली जाते. असे नसते तर मग प्रत्येक प्रेमविवाह यशस्वी ठरला असता. थोड्क्यात ’परस्परपूरकता’ हा मुद्दा चर्चेला येतच नाही, एक दोन भेटीत माणूस कळणे कठीण असते पण निदान या चर्चेमुळे परस्परांच्या आकांक्षा, जीवनमूल्य कळली तर पुढच्या अपघातांच्या शक्यता निश्चीत कमी होऊ शकतात.
याशिवाय दोन वेगवेगळ्या आचार, विचार, संस्कृतीच्या कुटुंबात १/३ आयुष्य घालवलेली दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सहजीवनविषयक कल्पनांमधे फरक असणार हे गृहीत धरायला हवे. तो पचवायला एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. मनोराज्यात अदृष्य असणारी ’सासू’ (दोन्हीकडच्या) नामक प्रधान व्यक्तिरेखा किंवा इतर नातेवाईकांचा प्रत्यक्षात हस्तक्षेप असतो. त्यावर कुरघोडी करण्यापेक्षा इतर शक्यता तपासायला हव्यात. अनपेक्षित आजारपणं, आर्थिक संकट असे कसोटीचे क्षण असतात त्यातल्या समंजस वर्तनावर सहजीवनाची मदार असते.
एका मुलाखतीत बायकोने, 'लग्नानंतर माणूस बदलतो हे खरं आहे' असं म्हणताच त्या नवर्याने 'नाहीतर मी माणूस आहे हे सिद्ध झालं नसतं म्हणूनच मी बदललो', असही प्रत्युत्तर दिलय. :-) यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सत्य आहे. या बदला मागे जागतिकीकरणामुळे होणार्या सामाजिक उलथापालथीमुळे एकूणच बदलत जाणार्या जीवनविषयक संकल्पना (उदा: सोशल नेटवर्किंग साईट्सचा, आभासी विश्वाचा प्रभाव,चौकोनापासून DINK(double income no kids) असा कुटुंबाचा संकोच.., यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा, स्त्रियांचे जागे झालेले आत्मभान आणि त्याचा दांपत्यजीवनावर होणारा परिणाम) कारणीभूत असावा. एकमेकांना धरून ठेवण्यासाठी प्रेम करण्याऐवजी प्रेम करण्यासाठी एकमेकांना धरून ठेवायची वेळ या धावपळीच्या आयुष्यामुळे आलेली आहे. या शारिरीक व मानसिक कुचंबणेची परिणीती कळत नकळत विवाहबाह्य संबंधांमधे होताना दिसून येते.
टोकाला गेलेले वैवाहिक संबंध वगळता बर्याच वेळेस समुपदेशनाची मदत घेऊन ताण कमी करता येऊ शकतो. दुर्दैवाने सुशिक्षीत वर्गातही (विवाहपूर्व तसेच विवाहोत्तर) समुपदेशन घेणे हे मनोचिकीत्सकाकडे (म्हणजे वेडयाच्या डॉक्टरकडे जाणे हा गैरसमज) जाण्यासारखेच निषीद्ध मानले जाते. "आमचे नाही का संसार झाले","हा पैसे देऊन गप्पा मारण्याचा आधुनिक आचरटपणा आहे" इ. टीकाही होते. पण बर्याचदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे समुपदेशनातून कळायला मदत होते.
स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला तर बरेच संसार सुरळीत चालतील. थोडे आत्मपरीक्षण केले आणि स्त्री/पुरूष या पलिकडे जाऊन एकमेकांचा खुल्या मनाने विचार केला तर कित्येक नाती नव्याने फुलतील.
Time (एकमेकांसाठी वेळ) ,Trust(परस्परांवर विश्वास), Talk (आपसातला संवाद) आणि Touch (आश्वासक स्पर्श) या चार T मधे कल्पनेतील सहजीवन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आहे... मानवी मन आणि नातेसंबंधाची संपूर्ण उकल ही अवघड बाब आहे. अगदी भाबडा आशावाद ठेवला नाही तरीही हा गुंता कमी करण्याचा प्रयत्न या कारणांना आणि शक्यतांना समजून घेऊन केला गेला तर ’आणि ते सुखाने नांदू लागले’ हा शेवट परिकथेपुरता मर्यादित राहणार नाही ..ती एक नवी डोळस सुरूवात असेल.
(’विमेन्स नेटवर्क, पुणे’ आणि ’मिळून सार्याजणी’ तर्फे या विषयावर राज्यस्तरीय निबंधस्पर्धा होती..त्यांनी या निबंधाला प्रथम पुरस्कार दिला आहे.)
’शयनगृहाची खिडकी उघडी असेल तर जिला झोप येत नाही आणि तीच खिडकी बंद असेल तर ज्याला झोप येत नाही, अशा स्त्री-पुरूषाच्या युतीस विवाह असे म्हणतात.’ ’जॉर्ज बर्नार्ड शॉ’नी केलेली ही विवाहाची मार्मिक व्याख्या ! विवाहापूर्वीच्या स्वप्नरंजनात अशा रूक्ष गोष्टींचा विचार कोणी करत नाही त्यामुळे नंतरचे अपेक्षाभंग अपरिहार्य असतात, त्या धक्क्यांच्या तीव्रतेवर आणि स्वीकारावर संसाराची गाडी कशी धावणार ते अवलंबून असते. हल्ली शहरात तरी विवाहाचं वय पंचविशीपलिकडचे असते त्यामुळे सहजीवनाच्या कल्पना बालीश नक्कीच नसतात पण त्या परिपक्व असल्याचेही विशेष आढळून येत नाही कारण घटस्फोटांचे वाढते प्रमाण य़ाच भागात अधिक आहे. अर्थात घटस्फोटांची संख्या हे काही त्या त्या भागातील ’सहजीवनाच्या गुणवत्तेचे’ सरसकट मोजमाप असू शकत नाही पण ढोबळ अनुमान असू शकते.
’पुरूष जेव्हा स्त्री साठी गाडीचे दार उघडून धरतो तेव्हा एक तर ती गाडी तरी नवी असते नाही तर ती स्त्री तरी’ असे गमतीने म्हटले जाते. कल्पनेतला तो असे स्त्रीदाक्षिण्य दाखवणारा असला तरी तो प्रत्यक्षातला तो तिची सामानाने जड झालेली पिशवी उचलेलच असे नाही. त्याच्या कल्पनेतील ती वाफाळत्या चहाने आणि टवटवीत चेहर्याने त्याचे स्वागत करत असली तरी प्रत्यक्षातील ती मोलकरणीने दांडी मारल्याने तिची किती पंचाईत झाली हे त्याला करवादत सांगत असते. तेव्हा तिचा अवतार आणि त्याचा चेहरा पाहण्यासारखा असतो. कल्पनेत ते दोघे सहलीला जाऊन विहरत घरी येतात, प्रत्यक्षात त्या दरम्यान नेमका गॅस सिलेंडरवाला येऊन जातो. एखादीच्या कल्पनेतला तो तिच्यासह कवितेत रमणारा वगैरे असतो ,प्रत्यक्षात तिची ’फर्स्ट लॅंग्वेज’ नेमकी त्याची ’थर्ड लॅंग्वेज’ असते. किंवा त्याला उत्तम शायरी अवगत असते आणि तिची आस्वादक्षमता ट्रकच्या मागे लिहिलेल्या चारोळ्यांपलिकडे जाणारी नसते.स्वप्नातल्या सुंदर शयनगृहात प्रत्यक्षात त्याचा स्नानानंतरचा ओला टॉवेल तस्साच रोज गादीवर पडलेला असतो आणि टापटीपीची आवड असणार्या त्याच्या जेवणात नेमका तिचा केस सापडतो. सामिष भोजन आवडणार्या एखाद्या त्याच्या प्रत्यक्षातल्या तिला अंड्याचा वासही सहन होत नाही, याउलट एखाद्या सुगरणीला नेमका ’जाणिजे यज्ञकर्म’ भावनेने खाणारा तो प्रत्यक्षात मिळतो.
साहित्य, कलेत रमणारी आणि उत्तम अभिरूची असणारी कल्पनेतील ती प्रत्यक्षात दागिने, साड्या आणि टीव्ही मालिकांबद्दल बोलायला लागते तेव्हा तो वैतागतो तर याउलट तिच्या शैक्षणिक,व्यावसायिक प्रगतीचा अभिमान असणारा कल्पनेतला एखादा तो प्रत्यक्षात खुशाल तिला चारजणात बावळट म्हणतो तेव्हा ती अवाक होते. द्विपदवीधर असलेल्या एखाद्या तिला साधा डीडी काढता येत नाही हे बघून तो थक्क होतो तर आधी रेस्टॉरंटमधे तिच्यासाठी खुर्ची सरकवून धरणारा तो नंतर स्वत:चा चहाचा कप देखील विसळत नाही हे पाहून ती हतबुद्ध होते.
प्रकल्पात बरोबरीने काम करणारा तो नवरा होताच घरी येताच वृत्तपत्र उघडून चहाची फर्माईश करतो आणि त्याच्याच बरोबर दमून आलेली ती चरफडत गॅस पेटवते. करिअरची स्वप्न बघणार्या तिने पुढे काय करायचे हे ती दोघं नव्हे तर तो आणि तिचे सासरचे ठरवतात तर कधी कल्पनेतली त्याची स्मार्ट सहचरी प्रत्यक्षात अगदी ’काकूबाई’ निघते..
इथवर अपवादाने सुरळीत पार पडले तरी अपत्याच्या आगमनानंतर बाळाच्या आजारपणात, संगोपनात (बहुतांशी) तिलाच जागावे लागते, तो निवांत झोपतो. जरा बदल म्हणून नाटक सिनेमाला गेले तर चरम बिंदूवर (बहुतांशी) त्यालाच बाळाचे रडे बाहेर नेऊन शांत करावे लागते, ती निवांत असते. पुढे मुलांचे वय आणि जबाबदार्या वाढत जातात तसतसे कल्पनेचे इमले कोसळायला लागतात. कलांचा आस्वाद घेत,करिअर घडवत, एकमेकांना जपत, आयुष्य फुलवूया या स्वप्नाला प्रत्येक अपेक्षाभंगाबरोबर तडे जाऊ लागतात आणि कल्पनेतले ते सुखी त्रिकोणी/चौकोनी कुटुंब प्रत्यक्षात फक्त फोटोमधे हसताना दिसते.
वरवर निरूपद्रवी वाटणारे हे चिमुकले अपेक्षाभंग असोत की शारिरीक, मानसिक शेअरिंगच्या परस्परविरोधी कल्पनांमुळे होणारे असह्य अपेक्षाभंग असोत, विसंवादाचे बीज रोवले जाते. संस्कृतीच्या किंवा सामाजिक दडपणांमुळे पुरूष आणि स्त्री हे वेगवेगळ्या (मानसिक) ग्रहांवरून आल्यामुळे ,त्यांच्या मेंदूंच्या रचनेतील फरकामुळे त्यांच्या विचार व कार्यपद्धतीत फरक असतो, पुरूषांना निमूट स्वीकार अपेक्षित असतो तर स्त्रीला सहानुभूती, हे सगळे समजावून सांगणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत. पण सभा तीच असली तरी श्रोता म्हणून जाणे आणि वक्ता म्हणून जाणे यात फरक असणारच. कल्पनेतल्या सहजीवनातला पद्य भाग वस्तुस्थितीत नकळत गद्य होऊन जातो. ऍरिस्टॉटलने म्हटले आहे की प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगली नागरिक असतेच असे नाही, त्याच धर्तीवर पुढे म्हणता येईल की, प्रत्येक चांगली व्यक्ती एक चांगला पती वा पत्नी होऊ शकेलच असे नाही. उदा: काही लेखिकांनी नोंदवलेले अपेक्षाभंग. सोललेले सगळे डाळिंबाचे दाणे एकटयाने मटकावणार्या महाराष्ट्राच्या लाडक्या पुलंचा सुनीताबाईंच्या ’आहे मनोहर तरी’ मधला उल्लेख विस्मयकारक आहे. त्याही पेक्षा कवितेत लीलया चांदणं गुंफणार्या पाडगावकरांना भर उन्हात बायको मागून चालते आहे, तिच्या एका हातात जड पिशवी आणि दुसर्या हातात मूल आहे याची जाणीवही न झाल्याचा उल्लेख यशोदाबाईंच्या आत्मवृत्तात आहे. प्रिन्सेस डायना, हिलरी क्लिंटनचे किंवा ’तत्सम’ वलयांकित आत्मवृत्ते आणि त्यांचे सहजीवन हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
झोकून देऊन काम करणारी दांपत्य मात्र याला अपवाद असावीत. उदा: सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते दांपत्य बंग किंवा आमटे. यांचं कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवन यात फारसा फरक नसावा असे त्यांच्या मुलाखती, लेखांमधून वाटते. "जीवनातली उदात्त ध्येय, समान मूल्य, असामान्य त्यागी वृती आणि परस्परांवरील निरपेक्ष प्रेम" हे याचं सूत्र असू शकेल.
पण सर्वसामान्य दांपत्यांचं काय ! त्यांच्या कल्पनेतील आणि प्रत्यक्षातील सहजीवनात एवढी तफावत का !.
एक तर लग्न करतानाच्या निकषांमधेच याचं एक कारण दडलेलं आहे. ’many a men in love with a dimple, make the mistake of marrying the whole girl' या स्टीफन लेकॉक च्या मिस्कील विधानानुसार वधूची निवड केली जाते आणि ’२८, ५.९", MBA, ९ लाख’ अशा चमत्कारिक माहितीभोवती वर्तुळ काढून वराची ! नंतर चष्मा, मंगळ, मुलीला भाऊ आहे की नाही अशा ’महत्वपूर्ण’ माहितीला प्राधान्य असते. दिसणार्या गुण-अवगुणांपेक्षा मुळात ज्याची खात्री नाही त्या जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिका अंतिम निर्णय देतात. courtship च्या वेळात तर सगळे स्वत:वर आणि एकूण जगावर एवढे खूष असतात की एकमेकांची सकारात्मक बाजूच दाखवली वा पाहिली जाते. असे नसते तर मग प्रत्येक प्रेमविवाह यशस्वी ठरला असता. थोड्क्यात ’परस्परपूरकता’ हा मुद्दा चर्चेला येतच नाही, एक दोन भेटीत माणूस कळणे कठीण असते पण निदान या चर्चेमुळे परस्परांच्या आकांक्षा, जीवनमूल्य कळली तर पुढच्या अपघातांच्या शक्यता निश्चीत कमी होऊ शकतात.
याशिवाय दोन वेगवेगळ्या आचार, विचार, संस्कृतीच्या कुटुंबात १/३ आयुष्य घालवलेली दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या सहजीवनविषयक कल्पनांमधे फरक असणार हे गृहीत धरायला हवे. तो पचवायला एकमेकांना थोडा वेळ द्यायला हवा. मनोराज्यात अदृष्य असणारी ’सासू’ (दोन्हीकडच्या) नामक प्रधान व्यक्तिरेखा किंवा इतर नातेवाईकांचा प्रत्यक्षात हस्तक्षेप असतो. त्यावर कुरघोडी करण्यापेक्षा इतर शक्यता तपासायला हव्यात. अनपेक्षित आजारपणं, आर्थिक संकट असे कसोटीचे क्षण असतात त्यातल्या समंजस वर्तनावर सहजीवनाची मदार असते.
एका मुलाखतीत बायकोने, 'लग्नानंतर माणूस बदलतो हे खरं आहे' असं म्हणताच त्या नवर्याने 'नाहीतर मी माणूस आहे हे सिद्ध झालं नसतं म्हणूनच मी बदललो', असही प्रत्युत्तर दिलय. :-) यातला विनोदाचा भाग सोडला तरी हे सत्य आहे. या बदला मागे जागतिकीकरणामुळे होणार्या सामाजिक उलथापालथीमुळे एकूणच बदलत जाणार्या जीवनविषयक संकल्पना (उदा: सोशल नेटवर्किंग साईट्सचा, आभासी विश्वाचा प्रभाव,चौकोनापासून DINK(double income no kids) असा कुटुंबाचा संकोच.., यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा, स्त्रियांचे जागे झालेले आत्मभान आणि त्याचा दांपत्यजीवनावर होणारा परिणाम) कारणीभूत असावा. एकमेकांना धरून ठेवण्यासाठी प्रेम करण्याऐवजी प्रेम करण्यासाठी एकमेकांना धरून ठेवायची वेळ या धावपळीच्या आयुष्यामुळे आलेली आहे. या शारिरीक व मानसिक कुचंबणेची परिणीती कळत नकळत विवाहबाह्य संबंधांमधे होताना दिसून येते.
टोकाला गेलेले वैवाहिक संबंध वगळता बर्याच वेळेस समुपदेशनाची मदत घेऊन ताण कमी करता येऊ शकतो. दुर्दैवाने सुशिक्षीत वर्गातही (विवाहपूर्व तसेच विवाहोत्तर) समुपदेशन घेणे हे मनोचिकीत्सकाकडे (म्हणजे वेडयाच्या डॉक्टरकडे जाणे हा गैरसमज) जाण्यासारखेच निषीद्ध मानले जाते. "आमचे नाही का संसार झाले","हा पैसे देऊन गप्पा मारण्याचा आधुनिक आचरटपणा आहे" इ. टीकाही होते. पण बर्याचदा एखाद्या व्यक्तीच्या वागण्यामागे ती स्वत: कारणीभूत नसून परिस्थिती कारण असते हे समुपदेशनातून कळायला मदत होते.
स्वत:च्या अहंभावाशी काडीमोड घेतला तर बरेच संसार सुरळीत चालतील. थोडे आत्मपरीक्षण केले आणि स्त्री/पुरूष या पलिकडे जाऊन एकमेकांचा खुल्या मनाने विचार केला तर कित्येक नाती नव्याने फुलतील.
Time (एकमेकांसाठी वेळ) ,Trust(परस्परांवर विश्वास), Talk (आपसातला संवाद) आणि Touch (आश्वासक स्पर्श) या चार T मधे कल्पनेतील सहजीवन प्रत्यक्षात उतरवण्याची ताकद आहे... मानवी मन आणि नातेसंबंधाची संपूर्ण उकल ही अवघड बाब आहे. अगदी भाबडा आशावाद ठेवला नाही तरीही हा गुंता कमी करण्याचा प्रयत्न या कारणांना आणि शक्यतांना समजून घेऊन केला गेला तर ’आणि ते सुखाने नांदू लागले’ हा शेवट परिकथेपुरता मर्यादित राहणार नाही ..ती एक नवी डोळस सुरूवात असेल.
(’विमेन्स नेटवर्क, पुणे’ आणि ’मिळून सार्याजणी’ तर्फे या विषयावर राज्यस्तरीय निबंधस्पर्धा होती..त्यांनी या निबंधाला प्रथम पुरस्कार दिला आहे.)