Monday, February 28, 2011

काळ

जावेद अख्तर यांच्या उर्दूमिश्रीत हिंदी कवितेच्या भावानुवादाचा माझा प्रयत्न..

काळ


काळ म्हणजे आहे तरी काय?
जो निरंतर सरतो आहे तो काळ असेल तर मग सरण्याआधी तो कुठे होता?
कुठे तरी असेल,
सरल्यानंतर तो कुठे जात असेल?
कुठे तरी असेलच..
कुठून येतो आणि कुठे जातो?
कुठपासून कुठवरचा प्रवास असेल हा ?

हा काळ आहे तरी काय !
एखादी घटना, दुर्घटना, योगायोग ?
सुख, दु:ख ,संकट ?
की आनंद ,हसू आणि अश्रू सुद्धा !
का एखादे गीत, क्षणिक सुगंध की जखमेच्या चिरंतन यातना
किंवा स्पर्शाची जादू !
हा स्वत:चा आवाज की भोवतालची साद
जी अंतस्थ निनादते आणि सारं बदलवून टाकते...
हा अस्वस्थ मनाचा विस्फोट की हृदयाची तरलता ?
की या सगळ्याच भावना म्हणजे काळ !

काळ... जणू प्रवाहासह वाहणारे पान
आत्ता इथं तर आत्ता तिथं
काळ ...अदृष्य पण अस्तित्वात असणारा ...सतत सरणारा !
जशी एखादी नदी...
कोणत्या तरी डोंगरात उगम पावून कुठल्याशा समुद्रात विलय होणारी.

प्रवासात असताना विचार येतो
गाडीतून दिसणारी झाडं विरूद्ध दिशेने पळतायत
वास्तवात ती तर स्थिर आहेत मग असं तर नाही की ...
काळ थांबलेला आहे आणि आपण चालत आहोत..
आताच्या या क्षणात..सारी युगं दडलेली आहेत
ज्याला आदि नाही आणि अंतही नाही
जो घडून गेलाय पण घडायचा आहे अजून आणि अगदी आत्ता ही घडतोय...
असा विचार येतो,
चालतो आहोत ते आपण आणि जो सरतोय असं वाटतं
तो काळ मात्र स्तब्ध आहे..
एकजीव आहे की क्षणांक्षणांतून विखुरलेला
गोठलेला आहे की विरघळणारा
कुणास ठाऊक काय आहे हा काळ !

हा धागा अथांग आहे
पण कुठेतरी त्याचं टोक असायला हवं ना!
मानवाला वाटतं या काळाच्या पिंजर्‍यात तो जन्मला,
या काळानेच त्याला जोपासलं...
पण आता कळतय त्याला
या काळाच्या पलिकडे देखील एक विश्व आहे..
आणि मग तो विचारतोय
काळ म्हणजे आहे तरी काय?