Monday, January 3, 2011

चूल-मूल

’सकाळ’ मधे दरम्यान चर्चा झाली.. महाराष्ट्रातील स्त्री गेलीय का ’ चूल-मूल ’ च्या पलीकडं ? या विषयावर, त्यावर माझं हे मत...
(picture courtesy : Ilayaraja)

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रीय स्त्रियांची परिस्थिती बरीच बरी आहे. हिंदी दूरदर्शन वाहिन्यांवरील सासबहू मालिकांमधील ’मध्ययुगीन’ वातावरणाच्या तुलनेने तर महाराष्ट्रीय स्त्रियांना आधुनिकच म्हणायला हवे.त्या निर्भयतेने घराबाहेर वावरताना, आर्थिक व्यवहार करताना दिसतात. त्यांच्या नोकरी, व्यवसायाकडे आता फारसे कुतूहलाने पाहिले जात नाही, स्त्री विषयक गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अगदी देशाच्या राष्ट्रपतीपदावर आज एक महाराष्ट्रीय स्त्री विराजमान आहे पण म्हणून सरसकट त्या ’चूल-मूल’ याच्या पलिकडे गेल्या आहेत असे मात्र अजिबात नाही.

ज्या पुरूषांना खूप जास्त तास बाहेर काम करावे लागते आणि तुलनेने त्यांच्या घरातील स्त्रियांना जास्त मोकळा वेळ मिळत असेल तर अशा पुरूषांकडून स्वयंपाकात/अपत्यसंगोपनात फारशी मदत होणे शक्य नाही हे महाराष्ट्रातील स्त्रियांनीही स्वीकारले आहे व ते साहजिक आहे, पण खेड्यात शेतावर पतीच्या बरोबरीने राबणारी ग्रामीण स्त्री वा मोठ्या शहरात पतीबरोबरच कामावरून थकून परतणारी स्त्री पतीच्या मदतीची अपेक्षा नक्कीच करते.स्वयंपाक ही एक सुंदर कला आहे आणि स्त्री अन्नपूर्णा आहे हे खरे असले तरी मनात आणले तर पुरूष देखील ’अन्नपूर्ण’ होऊ शकतो. विद्या बाळ म्हणतात तशी श्रमविभागणी समानतेच्या तत्त्वावर झालेलीच नाही पण कुटुंब चालवण्याची जबाबदारी मुळात पुरूषाची आहे हे जर आणि जोवर स्त्रिया सोयिस्करपणे म्हणत असतील तर मग ती होणेही अवघड आहे. प्राप्त परिस्थितीत पुरूषांचा लहानसहान मदतीचा हातदेखील(न पेक्षा) तिचे कष्ट कमी करू शकतो.... पण बहुसंख्य घरात पुरूष परंपरेने मिळणार्‍या सुखाचा आस्वाद घेत असतात (अपवाद असणार्‍या पुरूषांची क्षमा मागून...) ही सत्य परिस्थिती आहे. काही पुरूषांना मदत करावीशी वाटली तरी ’लोक काय म्हणतील..’ याचे प्रचंड सांस्कृतिक दडपण आहे( विशेषत: तालुकेवजा लहान गावांमधे). त्यातून अपवाद असलेच तर ’मला नाही बाई, पुरूषांनी स्वयंपाकघरात लुडबूड केलेली आवडत’ असे म्हणत असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या काही स्त्रिया त्यांचा हिरमोड करतात. ’संजीव कपूर’ वा तत्सम शेफच्या आकर्षणामुळे काही हौशी पुरूष क्वचित कौतुकाने एखादा खास पदार्थ (व भरपूर पसारा) करतात, त्यानंतर सूत्र पुनश्च स्त्रीकडेच येताना दिसतात.

जयवंत दळवींच्या एका लेखात, त्यांच्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात एकत्र कुटुंबासाठी किलो किलोच्या पोळ्या करण्यात चुलीपुढे रापून गेल्याची खंत जाणवते. तुलनेने आज विकतचे पदार्थ मिळण्याचे व बाहेर खाण्याचे वाढलेले प्रमाण आणि उपकरणांची साथ य़ामुळे स्त्रियांवरचा ताण कमी झाला आहे. तरी अजूनही बहुसंख्य स्त्रियांची उर्जा आणि वेळ करियर ,छंद याऐवजी चिरणे, चारणे आणि चरणे (शिल्लक राहील त्यानुसार..नाहीतर पुन्हा चिरावे लागते) व त्यानंतर ’उद्याच्या चार्‍याची चिंता करणे’ या पुलंच्या ’च’काराच्या चक्रात खर्च होताना दिसतो आहे. काही कर्तबगार स्त्रियांनाही आपण या कामाला फारसा वेळ देऊ शकलो नाही याचा न्यूनगंड असल्याचे दिसते म्हणजेच ज्या स्त्रिया ’चूल-मूल’ या पलिकडे पोचल्या त्यांची अवस्था त्रिशंकू आहे तर काही स्त्रिया ’सुपरवुमन’ होण्याचा नादात पलिकडे जाऊ इच्छितच नाहीत. ज्यांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यांना फारसे यश आलेले दिसत नाही...’चूल-मूल’ हीच एखादीची आवड असू शकते किंवा ’नावड’ देखील असे समाज मान्य करीत नाही. ते आवडत नसेल तर मग लग्नच करू नका ना.. हया वस्तुस्थितीला अजून तरी पर्याय नाही. एकूणच ’तुझ्या हातच्या ... ला कशाची सर नाही’ किंवा ’... खावं तर तुझ्याच हातचं’ अशा वाक्यांच्या ’स्त्रीसुलभ’ मोहात पडून अजून तरी महाराष्ट्रीय स्त्री चुलीपासून लांब गेलेली नाही.

मातृत्व हे तर निसर्गाचे मूलतत्त्व आणि अपत्यसंगोपन हे आदिमकालापासून स्त्रीचे अंगभूत कौशल्य आहे. प्रजनन ते मूल सुटे होण्याच्या काळापर्यंत मुलाला आईची सर्वाधिक गरज असते तेव्हा या काळात स्त्री आई म्हणून आपली जबाबदारी पार पाडतेच आहे मग ती एखादी जिल्हाधिकारी असो वा गृहिणी. महाराष्ट्रीय स्त्री देखील याला अपवाद नाही. मात्र हा ’मूल सुटे होण्याचा काळ’ ’मूल बालवाडीत गेल्यापासून ते त्याचा विवाह होईपर्यंत’ (विवाह झाल्यावर देखील अजून तो आईचा पदर सोडत नाही..असे काही सुनांना वाटते.) असा कितीही असल्याचे त्या त्या आईच्या मानसिकतेनुसार आढळून येते. पाळणाघरे, मातृत्व रजा या सोयी सुरूवातीलाच वापरता येतात त्यानंतर मात्र काही आया सुट्या होऊच इच्छित नाहीत किंवा बहुतेक वेळा ती अपरिहार्यता असल्याचे सभोवताली आढळून येते. बर्‍याच वडिलांना (पुन्हा अपवादात्मक वडिलांची क्षमा मागून) ’ए झाला का रे अभ्यास, चल बंद कर तो टीव्ही, किती पैसे हवेत ट्रीपला’ एवढेच ’अपत्यसंगोपन’ पुरेसे वाटते. ’पितृत्व रजा’ वगैरेकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. विशेषत: शहरांमधे मुलांची क्लासेसला ने आण करणे,त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे , त्यांचे छंदवर्ग, खाणे-पिणे पाहणे (म्हणजे पुन्हा चूल..),पालकसभांना जाणे हे सगळे महाराष्ट्रीय स्त्रिया इतर राज्यातील स्त्रियांच्या तुलनेने जास्त प्रमाणात करतात. उत्तरेतील बहुतेक राज्यांमधे व्यवसायाची मानसिकता असल्याने हा फरक असावा. सवयीने मुलांनाही हे आईचेच काम आहे असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील शहरांमधे ’हम दो हमारा एक’ प्रकार जास्त असल्याने आईचे सगळे लक्ष एकुलत्या मुला/मुलीवर केंद्रित असल्याचे दिसते आहे. त्यासाठी कित्येक जणींनी करियरशी तडजोड केली आहे. त्यातूनही ती घराबाहेर पडलीच तरी ’घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ अशीच काहीशी महाराष्ट्रीय स्त्रीची परिस्थिती आहे.

समाजाची मानसिकता बदलली तर यातून मधला मार्ग निघू शकेल पण त्यासाठी काही पुरूषांना काही काळ ’बॅकसीट’ घ्यावी लागू शकते जे प्रत्यक्षात अवघड आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, बहुतेक सामाजिक बदल प्रथम महाराष्ट्रात होतात तेव्हा ’चूल-मूल ही स्त्रीची वैयक्तिक आवड किंवा निवड असावी..अपरिहार्यता किंवा प्राक्तन नव्हे’, असा बदल सर्वात आधी व्हायची शक्यताही याच राज्यात सर्वाधिक आहे. तसे घडले तरच दर्जाच्या समानतेबरोबरच संधींची समानताही मिळायला हवी या घटनेतील शब्दांना अर्थ प्राप्त होईल.