Sunday, November 21, 2010

समृद्ध अडगळ

"व्यक्त होणं' ही बहुसंख्य माणसांची गरज असते, आपल्याच कोषात राहणार्‍या काहींचा अपवाद! कलावंत व्यक्ती सृजनशीलतेमुळे पण त्याचबरोबर व्यावसायिक गरजेतूनही व्यक्त होतात,व्यावसायिक व्यक्ती प्रतिमानिर्मीतीच्या हेतूने व्यक्त होतात किंवा निव्वळ जगण्यातून निर्माण होणारी संवादाची भूक भागवण्यासाठीही लोक व्यक्त होऊ पाहतात.
अशा सर्वांसाठी सोशल नेटवर्किंग साईट वरचा वावर हा प्रत्यक्ष जगातील वावराइतकाच अपरिहार्य ठरतो आहे. मायस्पेस,ट्वीटर,लिंक्ड इन,ऑर्कुट,फेसबुक यासारख्या साईट्स पैकी एकावरही ज्याचे प्रोफ़ाईल नाही असा नेटीझन विरळाच. .. कुतूहलापोटी किंवा आपण अगदीच मागासलेले वाटायला नको म्हणून आपले प्रोफ़ाईल एखाद्या सोशल नेटवर्किंग साईट वर बहुसंख्य नेटीझन तयार करतातच. शहरी वर्गात याचे आकर्षण अधिक आहे, या साईटद्वारे संपर्क करणे व उर्वरित वेळात त्याबद्द्ल बोलणे ही जीवनपद्धती रूढ होऊ लागली आहे.

ब्लॉग प्रकार सर्वांना आपलासा वाटत नाही, स्वत:च्या कवितांचे पुस्तक स्वत:च छापून ते समोरच्याला जबरदस्ती वाचायला लावण्यासारखाच तो एक प्रकार आहे. त्यात प्रतिसाद नेमका आणि त्वरित येत नाही, ई-मेल चे महत्त्व अबाधित असले तरी तो एका अर्थी एकांगीच संवाद प्रकार आहे, यामुळेच परस्परसंवादाची गरज थेटपणे भागवणार्‍या सोशल नेटवर्किंग साईट प्रचंड लोकप्रिय झाल्या असाव्यात.

शिवाय या साईट्स देखील तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत, हा बघा अमुक अमुक आणि एवढे तुमचे कॉमन मित्र, चला चला आपला मित्रपरिवार वाढवा... काही उत्साही मंडळी मग अशा साईट्स वर भरमसाठ मित्र जमवतात, ’आज काय मस्त पाऊस पडतोय’ इथपासून ’अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगच्या धोरणा’ पर्यंत या सगळ्यांशी स्क्रॅप, वॉल वर बोल बोल बोलतात किंवा ट्वीट करतात.आपण लोकांना जसं दिसावं असं त्यांना वाटतं त्यानुसार प्रोफाईल तयार करतात.. मग हळूहळू या सगळ्या आभासी जीवनाचा... ’मित्राच्या बहिणीच्या लग्नातल्या फोटोवर कमेंट करण्याचा’, ’परदेशात कुठेतरी धुके पडले म्हणून इथे बसून चीत्कारण्याचा”, उगाच बसता उठता ’wow’ म्हणण्याचा कंटाळा येऊ लागतो... आणि ही मंडळी वास्तवात येऊ लागतात. काही जणांना जगण्याच्या प्रवाहात गहाळ झालेले सुह्रृद पुन्हा सापडतात ते अशाच साईट्स च्या कृपेने. त्यांचं आणि आपलं मधल्या काळातल जगणं अपडेट करून झालं की मात्र निर्माण झालेल्या पोकळीत ते आपापल्या टोकांना धरून पूर्ववत जगू लागतात. बर्‍याच जणांच्या प्रोफाईलचे आयुष्य हे मित्रमंडळाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. कलाकार आणि व्यावसायिकांना मात्र या साईट्स म्हणजे यशस्वी होण्याचा एक स्वस्त आणि मस्त मार्ग आहे. याशिवाय त्यांच्या सृजनशीलतेलाही येथे अफाट वाव आहे...

मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या शब्दात सांगायचे तर " लेखनाचे अनेक फॉर्म्स हाताळूनही विचारांचे तुकडे, काही अनुभव शिल्लक राहतात.तुमची मन:स्थिती तुम्ही इथं मोकळेपणे शेअर करू शकता. तसच समोरच्याचा अनुभव आपण स्वीकारायचा की नाही याचीही मोकळीक आपल्याला असते, जी फोन,एसएमएस किंवा प्रत्यक्ष भेटीत मिळणं कठीणच."
सिनेसृष्टीतले तारे तारका आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जनसामान्यांना असणारे सुप्त आकर्षण या साईट्स च्या माध्यमातून वाढवत राहतात, आगामी कलाकृतीची प्रसिद्धी करून याचा पुरेपूर वापर करून घेतात. शशी थरूर सारख्या राजकारणी मंडळींना मात्र समाजाशी असलेली ही आभासी जवळीक कधी कधी महागात पडते.
व्यावसायिक कंपन्यांना बाजारातली पत सांभाळायला याच साईटस चा आधार घ्यावा लागतो. मोबाईल कंपन्यांना याचा किमान टेक्स्ट भाग ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागतो.

एअरवाईड सोल्युशन्स च्या अहवालानुसार या साईट्स एसएमएस ला पर्याय म्हणून वापरण्याचे प्रमाण वाढणार आहे.
आता काही जणांना ऑर्कुट चे स्क्रॅप फेसबुकच्या दिलखुलास वॉल च्या तुलनेने कंटाळवाणे वाटू लागलेत,(कॉमस्कोअर या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार भारतात फेसबुकने ऑर्कुट व याहूला मागे टाकले आहे.) काही ’लिंक्ड इन’ वाली मंडळी इतर सोशल नेटवर्किंग साईट्स वापरणार्‍यांकडे ’फक्त डिस्कव्हरी वाहिनी पाहणार्‍यांनी’ सामान्य प्रेक्षकांकडे पाहावे तसे पाहतात तर काहींना ट्वीटर ची एसएमएस सारखी शब्दमर्यादा भावते आहे..

अर्ध्या अब्जाहूनही अधिक युजर्स असलेल्या फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याची १५ नोव्हेंबरला सॅन फ्रॅन्सिस्को येथे पत्रपरिषद झाली. त्यात त्याने म्हटले आहे की भविष्यात इ-मेल ची जागा ऑनलाईन संभाषण घेईल. @facebook.com या पत्त्यावर ही मेसेजिंग प्रणाली काम करेल.

हे सारे तंत्रज्ञान एखाद्या प्रपातासारखे आपल्यावर कोसळते आहे, यापासून दूर न पळता याचा समंजस स्वीकार करायला हवा.
मानसशास्त्रज्ञांना अशा साईट्स च्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटते कारण यात बर्‍याचदा मूळ व्यक्ती व तिची प्रोफाईल प्रतिमा यात तफावत असते. मला वाटतं एरवी जगतानाही लोक मुखवटे घालतातच ना! नेहमीच्या आयुष्यात जशी भलीबुरी माणसे असतात तशीच ती यावरही असतात आणि असणार.पण या माणसांबरोबरच सलील कुलकर्णीपासून शकीरापर्यंत, पुलंपासून पाऊलो कोएलो पर्यंत, आर आर पाटीलांपासून ओबामापर्यंत, कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंत कशाशीही स्वत:ला जोडणं अगदी सोप आहे फक्त साईन इन करायचा अवकाश.

वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती नेटवर खुली करताना काळजी घेतली, यातून निर्माण होणार्‍या तोतया प्रोफाईल बाबत सावधगिरी बाळगली, हाडामासाच्या माणसांना पुरेसा वेळ देऊन मग यावर किती वेळ घालवायचा याचे भान ठेवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मित्र निवडताना संख्या वाढवण्यापेक्षा गुणात्मक निकष वापरले तर या साईट्स नक्कीच तुमचे जगणे समृद्ध करतात. नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे ’इंटरनेटवरची एक समृद्ध अडगळ.’