Saturday, July 24, 2010

भांडण

भांडण हा माझा अगदी आवडता विषय आहे.(!!!) म्हणजे स्वतः भांडणे नव्हे (काही अपवाद सोडून! शेवटी Men are from Mars and Women are from Venus म्हणजेच ’अपवाद’ कोण ते सुज्ञास सांगणे न लगे) तर भांडण बघणे (हा माझ्या मते बर्‍याच जणांचा आवडता विषय आहे पण लोक कबूल करत नाहीत ),अर्थात भांडण म्हणजे निखळ भांडण! आईमाई वरून शिव्या घालून मारझोड करत होणारी कचाकचा भांडणं किंवा ’दखलपात्र गुन्ह्या’पर्यंत पोचणारी भयंकर भांडणं किंवा एकदम ’भारत-पाक’ ’तिबेट-चीन’ ’अमेरिका- इंग्लंड सोडून उर्वरित जग’ इ. प्रकारची ’मुरलेली’ भांडणं यात मोडत नाहीत.

मला आवडणारी भांडणं म्हणजे क्षुल्लक कारणावरून होणारी, तर्कशास्त्राशी सुतराम संबंध नसणारी, मनातल्या वैतागाचा निचरा करणारी.......आणि प्रचंड मनोरंजन करणारी! (अर्थात प्रेक्षकांचे!).तर्कशास्त्रावरून आठवलं, परवाच आमच्या दोघांपैकी मंगळवासीयांनी त्यांच्या मातोश्रींना विचारले की ’तुझी फोडणीतली मोहरी नेहमीच कशी जळते?’ यावर मातोश्री म्हणाल्या ’आज खोबरेलतेलाची बाटली तू उघडीच टाकलीस, त्याला झाकण लावायच असतं हे शीक आधी’ मग हे उत्तर किंवा विधान तर्कसंगत आहे की नाही आणि मुळात मुद्दा काय आहे (तसा ’तेल’ हा सामाईक मुद्दा दोन्ही विधानात होता असे म्हणून मला तेल ओतता आले असते....) यावर त्या दोघांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि ’एकमेकांशी बोलण्यात काही अर्थ नाही’ या मुद्यावर अखेर त्यांचे एकमत झाले. खरं म्हणजे मुळात या प्रश्नातील ’नेहमी’ या शब्दावर माझा आक्षेप होता कारण मग त्यातून ’मी काहीच करत नाही की काय’ असा अर्थ ध्वनीत होतो पण हा मुद्दा मी सध्या, पुन्हा कधी तरी, योग्य वेळी चपखलपणे वापरण्यासाठी ठेवून दिला आहे (मंगळवासी याचा उच्चार नेहमी ’चपलख’ असा करतात व मी तो दुरूस्त केल्यास ’नुसत्या भाषेच्या ज्ञानापेक्षा माणसाला व्यवहारज्ञान अधिक असायला हवे’ असे ’तर्कसंगत’(!!) उत्तर देतात मग त्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली तरी ’अपवादा’ला सुरूवात होते).असो.

अगदी पुराणकाळातही भांडणे असावीत. पाहा :पौराणिक मालिका. इकडे शंकर आणि पार्वती ढगात बसून चौपट खेळतायत ,तिकडे विष्णू शेषावर कायम पहुडलेले आणि लक्ष्मी पाय चेपतेय. नारदमुनी उगवतात आणि काहीतरी कळ लावतात. लगेच इकडे शंकराचे तांडव आणि तिकडे विष्णूचे सुदर्शन चक्र ! बाकी देवांची धावपळ ,मग कायम कमळात बसून मंदस्मित करणारे ब्रह्मदेव ते भांडण मिटवणार आणि बाकीचे सगळे देव पुष्पवृष्टी करणार... मंदस्मित,चौपट आणि पाय दाबणे पूर्ववत सुरू!( नारदमुनींचा पुन्हा प्रवेश होईतो).
आता राजकारणापासून सोसायटयांच्या मिटींगपर्यंत कुठेही अनेक कळलावे नारद त्यांचे काम चोख बजावतात. नारद अनुपस्थित असेल तरी लोक सांभाळून घेतात. उदा: रेल्वेमधली भांडणे (एसी चा अपवाद, जिकडे ’संवादच’ नाही तिकडे ’वाद’ कुठून होणार!... (हे वाक्य ’वपुं’ना अर्पण!)) सामान ठेवण्यावरून एकमेकांना ’एक टिकट क्या खरीदी जैसे पूरी गाडी खरीद ली, रेल्वेमिनिस्टर हो क्या?’ अशी प्रेमळ प्रृच्छा करणारे थोड्या वेळाने एकमेकांच्या मुलांना खिडकीतून गंमत दाखवत केळी खाण्याचा आग्रह करू लागतात. ज्या गुजराथ्याच्या बॅगेतले लोणच्याचे तेल अंगाला लागले म्हणून भांडण होते तो गुजराथी तेच लोणचे मग कोरडी बटाटाभाजी पोळी (रोल करून) खाणा‍र्‍या मराठी माणसाला वाढतो. ’बाहेरचे’ ’आतले ’होईपर्यंत दर स्टेशनवर एक नवी चकमक उडत असते. (हे वाक्य पुलंना अर्पण)पुन्हा असो.

एकूणच भांडण हा एक धमाल प्रकार आहे. त्यात सहभागी असलेल्या मंडळींचे निरीक्षण करणे, त्यांनी मांडलेले मुद्दे(?) समजून घेणे, त्यात ’विश्लेषणासाठी’ वापरलेल्या खास शब्दांचे अर्थ समजावून घेणे, त्यांचा विषयाचा उहापोह अनपेक्षित मुद्याकडे वळताना पाहणे हा सगळाच एक विलक्षण अनुभव असतो. त्यामुळे शक्य असल्यास मी अगदी हातातले काम टाकून ते भांडण ’बघते’.
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक वाडा होता, त्यातल्या दोन बिर्‍हाडातील मंडळींची कायम भांडणे होत.एक कुटंब अगदी उच्चभ्रू तर दुसरे निम्नमध्यमवर्गीय. पहिल्या कुटुंबातले काका शशीकपूरसारखे दिसायचे, कुठेतरी अधिकारी( ठेवा तुमच्या घरी...इति दुसरे काका) होते. काकू शासकीय नोकरी करत (आली मोठी नाक वर करून.. त्या पेक्षा घरात लक्ष दे म्हणावं....इति दुसर्‍या काकू) असत. त्यांची अत्यंत सुंदर व हुशार कन्या सायन्स कॉलेजमधे शिकत असे आणि कलात्मक टाईपचा मुलगा , तर दुसर्‍या टीममधील काका तृतीयश्रेणी कर्मचारी( ऑल टिनपॉटस....इति पहिले काका) होते, काकू तर साक्षात दुर्गेचा अवतार (यांच्यापेक्षा आमच्या मोलकरणीला सुद्धा मॅनर्स आहेत....इति पहिल्या काकू) होत्या. त्यांची मोठी मुलगी नेहमी ’योगिनी जोगळेकर टाईप’ कादंबर्‍या वाचत असे, एक सतत नापास होणारा मधला मुलगा आणि एक वात्रट लहान मुलगा. तपशील या कुटुंबांमधील ’सांस्कृतिक,वैचारिक,आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक(बाप रे!)’ फरक समजावा म्हणून दिला आहे. तर या विरोधाभासामुळे आणि घराची एक भिंत व गच्ची सामाईक असल्यामुळे त्यांच्यात खटके उडत व त्याचे पर्यावसान सार्वजनिक भांडणात होई. ते सुरू झाले रे झाले की वरच्याच मजल्यावर राहणारा माझा बालमित्र ’चल चल भांडण स्टार्टेड’ असे म्हणत धावत येई व आमच्या खिडकीतून ’योग्य ऍंगल’ पकडण्यासाठी आमचेच एक छोटेखानी भांडण होई.
’आमची कुंडी तुम्ही मुद्दामून पाडली’, ’वाळवणं आमच्या भागात का घातली’, ’तुमचा मुलगा आमच्या मुलीच्या परिक्षेच्या वेळेसच जोरजोरात गाणी म्हणतो’ अशा कोणत्याही मुद्दयावरून सुरूवात होऊन मग ते भांडण उत्तरोत्तर रंगत जाई. प्रकरण अगदी हातघाईवर गेले तर(च) आजूबाजूचे लोक मधे पडत.

दुसर्‍या कुटंबाचे अभावातून निर्माण होणारे नैराश्य असेल पण पहिल्या कुटुंबाला तसे काही सयुक्तिक कारण नव्हते. एकूणच भांडणे ही एक प्रवृती आहे आणि तिचा सांस्कृतिक,वैचारिक,सामाजिक, आर्थिक स्तराशी काही संबंध नसतो. हो,ते शैक्षणिक म्हणायचं राहिलं. साहित्य संमेलनातील मार्मिक शब्दःच्छ्ल केलेली भांडणे बघा....जसे द.भि. कुलकर्णी म्हणाले ’काही लोक चुकीच्या ठिकाणी टाळ्या वाजवतात, आता नाही समजत एखाद्याला’. झालं, ही अशी नांदी झाली की साहित्यिकांच्या कलगीतुर्‍याला सुरूवात होते. भांडण करायलाही एक कौशल्य लागतं, उदाः प्र.के.अत्रे. त्यांच्या विवीध क्षेत्रातल्या लोकांशी ( वरेरकर,फडके इ.किंवा संयुक्त महाराष्ट्रासाठी) भांडण्यालाही एक वलय असायचं. त्यांच्यासारखा मस्त भांडणारा माणूस (गेल्या दहा हजार वर्षात!) झाला नाही.
थोरामोठ्यांनाही न भांडता राहवत नाही तर सामान्यांची काय कथा!

खरं म्हणजे वयानुसार, प्रगल्भतेनुसार भांडण्याची खुमखुमी, बघण्याची उर्मी दाबण्याचे कौशल्य निर्माण होत असेलही पण मुळात ती नैसर्गिक भावना आहे. आपल्या मेंदूत म्हणे डोपामाईन नावाचे एक रसायन असते आणि त्यामुळे भांडतेवेळी आनंदाची एक विचीत्र संवेदना निर्माण होते. ती इतकी हवीशी वाटू लागते की भांडण्य़ाची वा ते भांडण बघावेसे वाटण्याची वृती बळावते. माझ्या मेंदूत ते रसायन जरा जास्तच प्रमाणात असावं. आता यात माझा काय दोष, नाही का!