Tuesday, June 22, 2010

नागरिकत्व...

सामाजिक बांधीलकी, लोकशाही आणि नागरिकत्व...
(
दिवाळी अंक २०१० साठी सामाजिक बांधीलकी विषयक एक राज्यव्यापी निबंधस्पर्धा पुण्यातील ’जनसंवाद’ या संघटनेद्वारे आयोजित केली जाणार आहे. संघटनेची सदस्य या भूमिकेतून त्यासाठी मी लिहीलेली ही एक प्रकारची प्रस्तावना .....)

चीनमधे मध्यंतरी बराच मोठा भूकंप झाला होता. जगभरातून मदतकार्य सुरू होते. त्याविषयीच्या बातम्या दूरचित्रवाणीवर सुरू असताना एक स्नेही घरी आले, आणि ती दृष्ये पाहून हेलावले, तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की हे चीनमधे घडले आहे..भारतात नव्हे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली,"अच्छा, तिकडे चीनमधे होय!! मला वाटलं इकडेच !" आणि जणू काही त्यांचा जीव भांड्यात पडला. भारतात असे घडले असते तर त्यांना अधिक दु:ख झाले असते हे (proximity concept) आपण एक वेळ समजू शकतो, चीनमधे घडलय म्हटल्यावर त्याची तीव्रता कमी झाली हे ही समजू शकतो पण ’काहीच वाटू नये’ हे मात्र समजणे अवघड आहे. ’सहसंवेदना’ किंवा ’आपण आणि आपला समाज’ या संकल्पनेची व्याप्ती नक्की केवढी असते? आपल्या कुटंबापुरती ,आपल्या जाती वा धर्मापुरती? परिसरापुरती वा देशापुरती? काही लोकांसाठी ती सापेक्ष असू शकते... उदा: माल्कम ह्या कृष्णवर्णीय अमेरिकी नेत्याने १९६० च्या सुमारास वंशभेदाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधीलकीची संकल्पना अशा शब्दात मांडली होती “I believe in the brotherhood of all men, but I don't believe in wasting brotherhood on anyone who doesn't want to practice it with me. Brotherhood is a two-way street.”

तेव्हा सामाजिक बांधीलकीचे स्वरूप हे विवीधांगी असले तरी किमान ’being concerned' ही भावना प्रत्येक सुजाण माणसात असायला हवी याबाबत दुमत नसावे. एक नागरिक म्हणून जगताना आपला अनेकांशी संबंध येतो. परस्परावलंबन ही अपरिहार्य बाब आहे. यांत्रिकीकरणामुळे आपल्याला आता इतरांची गरज उरलेली नाही असे मानणे अयोग्य आहे.
यंत्रांची देखभाल करायची तरी परस्परावलंबन आलेच, आजारपणात अद्यावत वैद्यकीय सोयी उपलब्ध असल्या तरी, डॉक्टर,परिचारिका हव्यातच, संगणकीकरण झाले तरी ते चालवण्यासाठी,परिवहनाच्या सोयी असल्या तरी त्या सुरळीत चालवण्यासाठी ,आपत्कालीन परिस्थीतीतून बाहेर पडण्यासाठी, माणसे हवीत. खरे तर ’नुसते जगण्यासाठी’ ही माणसे हवीतच. अगदी उदात्त भावनेतून असो, साधी माणुसकी म्हणून असो किंवा ’उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते’ या भयापोटी असो सामाजिक बांधीलकीविना परस्परावलंबन शक्य नाही. आपले आणि इतरांचे जगणे सुखकर करायचे असेल तर सामाजिक बांधीलकी जोपासण्याला पर्याय नाही.

समाजसेवा ही उत्स्फूर्त गोष्ट आहे. प्रत्येक सामान्य माणूस काही आमटे, बंग परिवारासारखे सामाजिक योगदान देऊ शकत नाही हे खरे आहे पण सामाजिक बांधीलकीचा आपला परीघ तर निश्चीत विस्तारू शकतो. बहुसंख्य सामाजिक गरजा या स्थानिक स्वरूपाच्या असतात हे समजून घेऊन परिसरातील सेवाभावी संस्थांशी स्वत:ला जोडून घेऊन खारीचा वाटा उचलू शकतो. आर्थिकदृष्ट्या आवाक्यात नसले तरी वेळ देऊन, कामात वाटा उचलून मदत करू शकतो. तेही शक्य नसेल तर अशा व्यक्तींना मानसिक पाठबळ, प्रोत्साहन तरी नक्कीच देऊ शकतो. काही वलयांकित संस्थांच्या समाजकार्यात दिखाव्याचा भाग जास्त असतो, काही व्यक्ती स्वत:च्या प्राथमिकता डावलून हे काम करतात, किंवा काही संस्था केवळ अनुदान लाटण्यासाठी समाजसेवेचे कातडे पांघरतात. अशा उदाहरणांमागे दडून ’म्हणून मी या फंदात पडत नाही’ अशी पळवाट काढणे अयोग्य आहे. ती व्यक्ती वा संस्था कोणत्या राजकीय, वैचारिक विचारधारेची आहे ,संघाची आहे की समाजवादी आहे, ग्रामीण आहे की शहरी आहे, ’आहे रे’ वा ’नाही रे’ यापैकी कोणत्या गटासाठी काम करते आहे, अशा सीमारेषांची चिकीत्सा करत वेळकाढूपणा करण्यापेक्षा ’काय कार्य करते आहे’ हा डोळस निकष त्यामागे असायला हवा. उदा: एका प्रथितयश डॉक्टरांनी या वर्षी १०००० वृक्षरोपणाचा संकल्प केला आहे, त्यांनी त्यासाठी मनुष्यबळ देखील उपलब्ध केले आहे. वृक्षांची ३ वर्षे काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे, यासाठी प्रति वृक्ष एक लहानशी रक्कम त्यांना दात्यांकडून अपेक्षित आहे. ज्यांना निसर्गाबद्द्ल आस्था आहे असे लोक यात वेगवेगळ्या पातळीवर मदत करू शकतात. दृष्टीबाधितांसाठी आज केवळ शैक्षणिक साहित्यच उपलब्ध आहे..त्यांच्यासाठी अवांतर पुस्तके संगणकाच्या सहाय्याने ब्रेलमधे तयार करायला एका संस्थेने सुरूवात केली आहे. वंचितांसाठी काम करणे,आपत्कालीन सेवा स्वयंस्फूर्त देणे असे असंख्य प्रकल्प योजणारी आणि कार्यान्वित करणारी माणसे सभोवताली आहेत, त्यांना शक्य तेवढा प्रतिसाद दिला जायला हवा. वैयक्तिक पातळीवर नेत्रदान, देहदान, रक्तदान हे देखील ही बांधीलकी जपण्याचे काही मार्ग आहेत. आपले दैनंदिन आयुष्य जगतानाच ते जगणे समृद्ध करण्याचे असे अनेक सोपे उपाय आहेत.

पण मुळात एक सुजाण नागरिक म्हणून जगायला तरी आपण भारतीय शिकलो आहोत का? बिरबल-बादशहाची ही कथा सर्वपरिचीत आहे. बिरबल रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड ठेवतो... कुणी दुर्लक्ष करतं,कुणी बादशहाच्या कारभाराला नावे ठेवत तो दगड टाळून पुढे जातं, कुणी त्याला आपटून पडतं... राज्यात ’डोळस, सजग नागरिक ’ किती हे एका छोट्याशा प्रयोगातून बिरबल दाखवून देतो. ’दगड उचलायचा कुणी’ हा प्रश्न इतक्या वर्षांनी आजही सोडवता आलेला नाही. लोकशाही हे लोकांचे राज्य मानायचे आणि इकडे सगळी जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे ही मानसिकता आजही बदललेली नाही. सरकारातील लोक हे देखील त्याच मानसिकतेचे बळी असल्याने ते ही जबाबदारी आणखी कुणावरतरी ढकलतात असे हे दुष्टचक्र आहे.
अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या आपल्या या देशात,उत्तम प्रकारे लोकशाही राबवूनही ती सुदृढ का होऊ शकली नाही याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ज्या अभिजन वर्गाने सरकारला जाब विचारायचा त्या वर्गाची मतदानाबाबतची उदासीनता (मुळात भारतात स्थायिक होण्याबाबत अनास्था).दुसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ’नागरिक’ म्हणून समाजाची घडणच झालेली नाही. अभिजन वगळता उर्वरीत समाज दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार अशा मुलभूत समस्यांशी झगडण्यात गुंतलेला असताना आणि जेमतेम तग धरून जगत असताना त्यांच्याकडून लोकशाहीचे सबलीकरण व्हावे, नागरिकत्वाचे भान जपले जावे अशा अपेक्षा करणे चुकीचे आहे. मॅस्लोच्या सिद्धांतानुसार माणूस आधी मुलभूत मग सुरक्षाविषयक गरजांना प्राधान्य देतो, सामाजिक गरजा त्यानंतर आणि आत्मभान वगैरे तर अगदी शेवटी! मग या प्रश्नावर उपाय काय?

आपण नागरिक म्हणून अजूनही परिपक्व का होऊ शकलो नाही.......कारण आपल्या शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र शिकवले जाते, नागरिकत्वाचे भान म्हणजे काय हे मात्र शिकविले जात नाही. सुशिक्षीतांना वाटते त्यात काय शिकायचे पण ऍरिस्टॉटल यांचे हे वाक्य बोलके आहे "प्रत्येक चांगला माणूस हा एक चांगला नागरिक असतोच असे नाही."
अगदी आदर्श नाही पण चांगला नागरिक होण्याची चतु:सूत्री अगदी सोपी आहे, ’रहदारीच्या नियमांचे पालन, कचरा व्यवस्थापनाची समज, रांगेची शिस्त आणि वक्तशीरपणा’ एवढे जरी या प्रशिक्षणात प्राथमिक स्तरावर शिकवले व अवलंबले गेले तरी समाजात प्रचंड सकारात्मक बदल घडून येऊ शकतो..लोकशाही आणि नागरिकत्व हे मुद्दे खरे तर वेगळे नाहीत, नागरिकांमधे आदर्श लोकशाही रूजवण्यासाठी उपलब्ध असलेले पण वापरले न जाणारे सर्वात सशक्त माध्यम म्हणजे सामाजिक बांधीलकी. माध्यमांसह जगण्याचा विवेक,विज्ञानवादी दृष्टीकोन,कलेबाबतची आस्था,विवीध सामाजिक प्रवाहांचा संतुलितपणे विचार या सगळ्या त्यानंतरच्या माध्यमिक प्रशिक्षणाच्या पायर्‍या....

सुजाण नागरिक म्हणून घडणं आधी आणि अधिक महत्वाचं.... ही निरंतर तसेच टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया आहे..... संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी हे सोप्या शब्दात मांडले आहे, "No one is born a good citizen; no nation is born a democracy. Rather, both are processes that continue to evolve over a lifetime. Young people must be included from birth. A society that cuts off from its youth severs its lifeline."
मूल्यशिक्षण ही संस्कारातून शिकवण्याची बाब जर शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकते तर ’समाजशिक्षणाचा’ अंतर्भाव का होऊ नये! जगातील काही देशांमधे ’नागरिक प्रशिक्षण” शाळांमधून आवर्जून दिले जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात सुसूत्रता यावी म्हणून प्रशिक्षणाला जसे आणि जितके महत्व आहे, तितक्याच गांभीर्याने या गोष्टीकडे बघितले गेले पाहिजे.या क्षेत्रातील एक तज्ञ व्हर्जिनीया लेरी यांनी नागरिकत्वाची संकल्पना अशी मांडली आहे "citizenship is a bundle of rights -- primarily, political participation in the life of the community, the right to vote, and the right to receive certain protection from the community, as well as obligations." हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव असणे हेच नागरिकत्वाचे भान...
शालेय स्तरापासून हे प्रशिक्षण भावी पिढ्यांना दिले जाणे ही काळाची गरज आहे...खर तर दहशतवाद, धार्मिक कट्टरतेमुळे होणारी सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी, लादलेले आर्थिक निर्बंध अशा अनेक समस्यांची उकल करण्याचे सामर्थ्य या प्रशिक्षणाच्या संकल्पनेत दडलेले आहे.
’जनसंवाद’ सारख्या संस्था याचा पाठपुरावा करत आहेतच, गरज आहे ती अशा संस्थांचे हात बळकट करण्याची! सकारात्मक प्रतिसादाची !