Tuesday, December 29, 2020

कोविड- सरते वर्ष आणि भारतीय महिला

 २०२० हे वर्ष अवघ्या जगात प्रचंड उलथापालथ करून आता निरोपाच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोविड प्रादुर्भावानंतर अनेकांनी जानेवारीत लिहायला घेतलेल्या डायर्‍या मार्चनंतर कोर्‍या सोडल्या किंवा अनेकांचे हाती घेतलेले संकल्प अपुरे राहिले. आधी लॉकडाउन आणि नंतरच्या अनलॉकचे समाजावार, अर्थव्यवस्थेवर, नातेसंबंधांवर खोलवर परिणाम झालेत. या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाने भारतीय महिलांना काय दिले आणि काय हिरावून नेले याचा हा लेखाजोखा. 

भारतात आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ७०% आहे. वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला तर नर्सेस आणि सुईणी यांचे प्रमाण तब्बल ८८.९% इतके आहे. कोविडशी लढा देताना या क्षेत्रातील बहुसंख्य महिलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण महिला सरपंचांनीही आपल्य स्तरावर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. खरे तर प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका या महिलांना होता. दुय्यम लेखले गेल्याने भारतीय स्त्रीच्या आरोग्याबाबत समाजात आजही अनास्था दिसून येते. अशा परिस्थितीतही कोविडचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक चकित करणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत. महिलांमध्ये असणाऱ्या X क्रोमोझोममुळे त्यांच्याबाबत या विषाणूचा धोका कमी होत असावा याशिवाय भारतीय महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ध्रूमपानाचे प्रमाण खूपच कमी असल्याने कॅन्सर, श्वसनसंस्थेचे आजार किंवा हृदयरोग यांचा धोकाही कमी असतो, ही त्यामागील कारणे असू शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. 

मिशेल टेरटिल्ट या जर्मनीतल्या माईनहाईन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ सध्या कोरोना संकटाच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यामते येत्या काळात वाढत्या बेरोजगारीचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होणार आहे. एरवी मंदीची पहिली झळ पुरुषांना लागते कारण ते अर्थव्यवस्थेची मदार असलेल्या क्षेत्रात काम करतात तर महिला मात्र शिक्षण, आरोग्य, शेती आणि सेवा क्षेत्रात जास्त प्रमाणात काम करत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसत असल्याने महिलांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतीचा विचार केला तर ८० टक्के जमीन पुरुषांच्या नावे मात्र शेतातील ८० टक्के कामे स्त्रिया करतात. दुसर्‍याकडे शेतमजुरी किंवा औद्योगिक क्षेत्रात मजुरीचे काम करणार्‍या महिलांना, अगदी गर्भवती महिलांना सुद्धा वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुलाबाळांसह पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. उद्योग बंद झाल्याने कंत्राटीपद्धतीने दिल्या जाणाऱ्या पगारी रजांच्या धोरणाचा लाभ देखील त्यांना मिळू शकला नाही. बेताची पण दुहेरी कमाई असलेल्या अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांनी नोकरी गमावण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात करताना सुरुवात महिलांपासून केली. महिला घराच्या पोशिंद्या नसतात असे समाज आजही मानतो हे यावरून सहज लक्षात येईल. परंतु विजिगीषु वृतीच्या महिला राज्य ते राष्ट्रीय स्तरावर मास्क तयार करणार्‍या बचतगटांपासून ऑनलाईन क्लासेसपर्यंत आणि गृहोद्योगांपासून मधापासून वाईन तयार करणार्‌या विविध उद्योगापर्यंत विविध स्टार्टअप्स स्वत: सुरु करून परिस्थितीवर मात करत आहेत.  


अर्थात अनेक पुरुषांनीही नोकर्‍या गमावल्या आहेत किंवा पगारकपातीला तोंड दिले आहे. सतत घरी राहावे लागल्याने जिथे जागेची अडचण आहे, कुटुंबात जास्त सदस्यसंख्या आहे अशा घरातून विसंवाद, त्रागा वाढू लागला. खासगीपणावर मर्यादा आल्या. शाळाही बंद झाल्या. याची परिणीती म्हणजे बाललैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झालेली वाढ. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सहजसाध्य नसल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, विशेषत: ग्रामीण भागात, आधीपासूनच असलेले औदासिन्य आणि त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले. देशातील सर्वात जास्त बालविवाह होणार्‍या ७० जिल्ह्यात महाराष्ट्रातील १७ जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील २५ % विवाह हे बालविवाह असल्याचे वास्तव अतिशय गंभीर आहे. ज्येष्ठ किंवा एकट्या महिलांना असुरक्षित अवस्थेत दिवस काढावे लागल्याने नैराश्य, मनोविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. 


२०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. घरातल्या महिलांना काहीवेळा मानसिक छळ तसेच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे --लागले आहे. नारी समता मंचच्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये १०% टक्के महिलांचा अमानुष छळ झाला. अर्थात सर्वेक्षण ऑनलाईन केल्याने इंटरनेट परवडू शकणारा सुशिक्षित वर्गच यात सहभागी होऊ शकला, १०% महिलांनी ’हिंसेत वाढ झाली आहे का’ हा रकाना रिकामा सोडला आहे. हे मौन पुरेसे बोलके आहे. शक्य ती कामे ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांविषयक सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वर्षाच्या अखेरीस या संदर्भात आलेली सकारात्मक बातमी म्हणजे महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, यासाठी राज्यसरकार 'शक्ती कायदा’ करणार आहे. या विधेयकानुसार बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी फाशीची शिक्षा प्रस्तावित केली आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरून धमकावणे, बदनामी करणे, खोट्या तक्रारी करणे या नवीन गुन्ह्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २० मार्चला घडलेली एक मह्त्वाची व आश्वासक घटना म्हणजे निर्भयाला तब्बल ८ वर्षांनी मिळालेला न्याय. महिला वकील सीमा कुशवाहा यांनी प्रतिकूल स्थितीला ताकदीनिशी तोंड देत हा लढा अखेर जिंकला.


२०२० च्या मधल्या काळात हाताला काम नसल्याने सतत घरात पडून असलेल्या व्यसनी पुरुषांच्या अरेरावीमुळे व आर्थिक चणचणीमुळे दारिद्र्यरेषेखालील महिला मेटाकुटीला आल्या. 

त्यांच्या तुलनेने आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो यात समाधान मानणार्‍या मध्यमवर्गीय महिलांनी सुरुवातीला हौस म्हणून नवनवे पदार्थ कुटुंबियांना खाऊ घातले. नंतर मात्र सततच्या फर्माईशींमुळे आणि स्वयंपाकाचा बोजा वाढल्याने त्या वैतागून गेल्या. गृहिणी असलेल्या महिलांनी नवरा-मुले आपापल्या कामाला गेल्यानंतर मिळणारा हक्काचा मोकळा वेळ गमावला. 

अर्थात या काळ्या ढगांना रुपेरी कडाही आहेत. भारतीय बायका दररोज सहा तास घरकाम करतात, तर पुरुषांचा हा वेळ आहे फक्त ५२ मिनिटे. 'करोना'मुळे घरात अडकून पडल्यामुळे हा वेळ चक्क वाढला, म्हणजेच मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि परिस्थितीची गरज म्हणून का होईना पुरुषांनी घरकामाला हातभार लावायला सुरुवात केली. मार्च ते डिसेंबर या काळात ’गरज- हौस- कौतुक- वैताग- जमल्यास मदत- वेळच नाही’ असे पुरुषांचे घरकामातील मदतीबाबत उत्क्रांतीचे टप्पे असले तरी किमान घरकाम कमीपणाचे नाही तसेच मदतनीस महिलांना किती कष्टाची कामे करावी लागतात याची जाणीव मात्र नक्कीच निर्माण झाल्याचे चित्र आता दिसते आहे. कामाचे वाटप करु शकलेल्या अनेक महिलांना आपले जुने छंद जोपासता आले. कुटुंबाला वेळ देता आला. नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेली मुले घरी राहत असल्याने आनंद आणि समाधानाचा अनुभव घेता आला.


मनोरंजन क्षेत्राला या वर्षी आर्थिक फटका बसला असला तरी महिलाकेंद्री विषय असलेले चित्रपट यशस्वी होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय आहे. ’गुल मकाई’ हा मलाला युसूफजाईच्या जीवनावरील चित्रपट वगळता दीपिका पदुकोनचा स्त्रियांवर होणार्‍या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित ’छपाक’, संसारातल्या जबाबदार्‍यांमुळे कबड्डीपासून दुरावलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूच्या कमबॅक वरील ’पंगा’, मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’शकुंतलादेवीं’चा विद्या बालन अभिनीत बायोपिक, जान्हवी कपूरने साकारलेली कारगिल गर्ल ’गुंजन सक्सेना’, स्त्रियांना गृहित धरण्याबाबत भाष्य करणारा तापसी पन्नूचा ’थप्पड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट यंदा गाजले. भारतीय महिलांनी याही वर्षी नवनव्या क्षेत्रात आपले नाव कोरले. क्रीडाक्षेत्रात मणीपूर पोलिस विभागातील बालादेवी ही एखाद्या नामवंत (स्कॉटीश जायंट रेंजर्स) फूटबॉल क्लबशी करार करणारी पहिली भारतीय महिला ठरली. डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय सैन्यदलातल्या ३ र्‍या महिला लेफ्ट्नंट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिशन मंगळच्या पदाधिकारी रितू करिधल यांनी फोर्ब्सच्या सेल्फमेड महिलांच्या वार्षिक यादीत स्थान पटकावले. शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालणार्‍या बायजू रवींद्रन यांच्या पत्नी व सहसंस्थापक दिव्यांका गोकुळनाथ यांनी २८०० करोड रु.चे रेव्हेन्यू टार्गेट साध्य केले. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची याच वर्षी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. कमला यांच्या मूळ भारतीय तमिळ आईची त्यावर प्रतिक्रिया होती ‘अनेक गोष्टी करणारी तू पहिलीच असणार आहेस. मात्र, तू शेवटची नसशील, याची खात्री द्यायला हवी.’ 

कठीण परिक्षा घेणार्‍या सरत्या वर्षाने जाता जाता ननवर्षाच्या शुभेच्छांसह भारतीय महिलांनाही हाच संदेश दिला असावा.  


*(लेखातील टक्केवारी ही युनेस्को, वर्ल्ड बॅंक तसेच नारी समता मंच सर्वेक्षण अहवालांनुसार दिलेली आहे)

-Published in Divya Marathi -Madhurima - 29/12/21


Monday, November 30, 2020

न नुरलेले निर्विष देणे


विनोद निखळ आणि मार्मिक असेल तर तो हसवता हसवता अंतर्मुख करतो. वैचारिक खुजेपण दूर करण्यासाठी, समाजात हळू हळू का होईना, सकारात्मक बदल घडवण्यासाठी विनोदाइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. समाजाची विनोदबुद्धी आणि मनाचे उमदेपण बेताचे असेल तर मात्र ’ट्विट’मधला उपरोध लक्षात न आल्याने या वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेतून बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार्‍या निधी चौधरींसारखी परिस्थिती वाट्याला येते. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील विनोदाची गंगोत्री मानल्या जाणार्‍या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या (जून २९, १८७१ - जून १,१९३४) निर्विष आणि सहज आकलन होणार्‍या विनोदाची प्रकर्षाने आठवण होते. नवल म्हणजे त्यांच्या खुसखुशीत लेखनातून अधोरेखित झालेल्या सामाजिक विसंगतींचे बरेच संदर्भ तब्बल एका शतकानंतर आजही तंतोतंत लागू पडतात. पु.लं. देशपांडे यांच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे ’सबकुछ पुलं’ असे कौतुक होत असताना पुलं गमतीने म्हणाले होते, "त्यामध्ये प्रेक्षक पण धरले नसावेत म्हणजे मिळवली." याच चालीवर कोल्हटकरांच्या विनोदाचा मासला द्यायचा झाला तर त्यांनी स्वत:च्या ’संगीत मूकनायक’ या नाटकाच्या १९०१ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत मिश्कीलपणे नमूद केले आहे ,"प्रस्तुत नाटक १८९७ साली लिहिले गेले आहे. ते संपूर्ण झाल्यावर तीन वर्षे नायकाप्रमाणेच मूक होऊन बसले होते." नाटककार, विनोदकार आणि वाङ्‍मयसमीक्षक म्हणून एके काळी प्रचंड गाजलेल्या कोल्हटकरांचे आज विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक म्हणजे 'सुदाम्याचे पोहे'. ही वस्तुस्थिती बघता कोल्हटकरांचे साहित्यही आज जणू मूक होऊन बसले आहे. या वर्षी (२०२०) त्यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्ताने न. चिं. केळकरांनी ’मराठी साहित्यातील विनोदपीठाचे आद्य आचार्य’ अशा शब्दात गौरवलेल्या या वैदर्भीय सारस्वताच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि विस्मृतीत जाऊ पाहणार्‍या साहित्यकृतींना बोलतं करण्यासाठी, हा लेखनप्रपंच. 


कोल्हटकरांनी विषयानुसार गंभीर किंवा विनोदी शैलीत, चिंतनाची डूब असलेले समीक्षालेख, पुस्तकपरीक्षणे, प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे, अभ्यासलेख आणि निबंध लिहिले. ’दुटप्पी की दुहेरी’ आणि ’श्यामसुंदर’ ह्या कादंबऱ्या लिहिल्या. गीतोपायन हा त्यांचा कवितासंग्रह. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या प्रसिद्ध महाराष्ट्रगीताची रचना त्यांचीच. त्यांचे प्रभावी साहित्य तत्कालिन वाङ्‍मयव्यवहाराला दिशादर्शक ठरले. कोल्हटकर ही व्यक्ती न राहता जणू संस्था बनले असे म्हणूनच म्हटले जात असावे. त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान त्यांना १९२२ साली कविसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद व १९२७ साली १३व्या साहित्यसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद देऊन करण्यात आला. ’भारतीय ज्योतिर्गणित’ ह्या ग्रंथाद्वारे या विषयातल्या आपल्या व्यासंगाची प्रचिती देत सांगलीला भरलेल्या ज्योतिष संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचा जन्म आणि १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे तर उच्चशिक्षण पुणे व मुंबईत झाले. त्यांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. एल.एल.बी नंतर कोल्हटकरांनी अकोला, खामगाव येथे व्यवसाय केला आणि १९०१ साली ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.एकूण जन्मापासून ते कारकीर्दीच्या आणि वयाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य विदर्भातच होते. 

१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ’काव्य स्वर्गीय असते तर विनोद हा प्रत्यक्ष जगण्याचा भाग (born on earth)’ असे म्हणणार्‍या मार्क ट्वेन यांनी विनोदाला प्रादेशिक गंध दिला तर ओ हेन्रींनी धक्कातंत्राचा उत्तम वापर करून आपल्या विनोदी व इतर कथा लिहिल्या. रशियन लेखक चेकोव्हनी कथालेखनाचा प्रारंभ विनोदी कथेनेच केला होता. कॅनडातील स्टीफन लीकॉक असतील किंवा इंग्लंडमधील पी. जी. वुडहाऊस, यांचे बोट धरूनच मराठीतील विनोदी साहित्याने आपली सुरुवातीची पाऊले टाकली आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीला, व्हॉल्टेअर, स्टर्न, पास्कल, ट्वेन इ. पाश्चात्त्य लेखकांच्या विनोदनिर्मितीची तंत्रे अनुसरल्याचे खुलेपणाने मान्य करून कोल्हटकरांनी लेखन सुरु केले. त्याआधीच्या साहित्यात विनोद असलाच तर दुय्यम स्वरूपात किंवा तमाशासारख्या कलाप्रकारांपुरता मर्यादित होता.  ’सिगारेट सोडणं अत्यंत सोपं असतं, मी कित्येकदा सोडलीय’ किंवा ’अमेरिकेने भूगोल शिकावा म्हणूनच बहुधा परमेश्वर युद्ध घडवत असावा’ अशा सणसणीत कानपिचक्या देणार्‍या मार्क ट्वेन या आपल्या विनोद-बंधूप्रमाणे कोल्हटकरांचा विनोदही धारदार होता. अत्रे ज्यांना गुरुस्थानी मानत त्या राम गणेश गडकरी यांनी 'प्रेमसंन्यास' नाटकाच्या अर्पण पत्रिकेत लेखनगुरु कोल्हटकरांबद्दल लिहिले आहे," माझ्या लेखनातले जे चांगले असेल ते आपलेच आहे व जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्ण उदारतेने कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार." गडकऱ्यांच्या विनोदाला कारुण्याचा स्पर्श होता तर ’माय आईज हॅव कम’ लिहिणार्‍या चिं. विं. जोशींच्या विनोदाला चेष्टेची झालर. विषयाचा तिरस्कार न वाटता त्याबद्दल अंत:करणात जिव्हाळा निर्माण होणे, हे उत्तम विनोदाचे लक्षण असल्याचे ’मुद्दे आणि गुद्दे’ मध्ये आचार्य अत्रे म्हणतात. बौद्धिक मेजवानी देणार्‍या कोल्हटकरांच्या विनोदात हे लक्षण पुरेपूर आढळते. 

अत्यंत सुधारक विचारांच्या कोल्हटकरांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, र. धों कर्वे अशा कर्तृत्ववान पण समाजाने अव्हेरलेल्या व्यक्तींना कायम प्रोत्साहन दिले. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे कोल्हटकरांवरचा! ’घंटानादाच्या कंपनांमधून निर्माण होणार्‍या उर्जेमुळे कोरोनाचे विषाणू मरून जाणार असल्याच्या’ अशास्त्रीय आणि विनोदी म्हणाव्या अशा पोस्ट्स आजही समूहमाध्यमांवर भाबडेपणाने व्हायरल होतात, राजकारण जातीभोवती घुटमळत राहते मग विसाव्या शतकाच्या सुरूवातीची सामाजिक स्थिती किती कठीण असेल! जातीभेदाच्या वेटोळ्यात पुरत्या अडकलेल्या समाजाबाबत कोल्हटकर लिहितात,‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. अशा समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं." कोल्हटकरांनी लिहिलेली शेकडो पत्रे आणि त्यातून हाताळलेले विषयवैविध्य पाहता ते त्या काळाचे एक रंजक भाषेतले सामाजिक दस्तावेजीकरण म्हणता येईल. मात्र या पत्रांमधील विषयांच्या केंद्रस्थानी त्यांचे माणूसपण आहे. 

कोल्हटकरांनी आपल्या वाङ्‍मयीन कारकीर्दीची सुरुवात ’संगीत विक्रम-शशिकला’ नाटकावरील टीकेने (१८९३) केली. न. चिं. केळकरांच्या ’तोतयाचे बंड’ या नाटकाच्या समीक्षेत त्यांनी नाट्यलेखनकले विषयी तर ’रागिणी’ या वामन मल्हार जोशी लिखित कादंबरीच्या समीक्षेत कादंबरीलेखनकले विषयी विवेचन केले आहे. त्यांची समीक्षा जडजंबाळ नसायची पण तर्कशुद्ध आणि सखोल असायची. मराठीतील स्त्री लिखित पहिले गद्य नाटक म्हणजे गिरीजाबाई केळकरांचे ‘पुरुषांचे बंड’. यालाही कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, जन्मरहस्य, परिवर्तन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि मायाविवाह अशी पंचाक्षरी शीर्षकाची नाटके लिहिली. पैकी आठच रंगभूमीवर येऊ शकली. असे म्हणतात खुद्द कोल्हटकरांची सुद्धा खाडिलकर किंवा देवलांसारखी, रंगभूमी गाजवून टाकणारी एखादी तरी सांगितिका आपण लिहावी अशी मनीषा होती पण त्याच वेळेस ’सुदाम्याचे पोहे’ हा आपला हुकुमी एक्का असल्याचे ते जाणून होते. 


कोल्हटकरांनी १९०२ साली लिहिलेला 'साक्षीदार' हा आधुनिक मराठी वाङ्‌मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. ’शपथेशिवाय तोंडून एकही शब्द न काढणारा’, काढलाच तर ’धादांत खोटे बोलणारा’, माणसाच्या पागोट्याचा रंग वगैरे बारीकसारीक तपशीलात कालापव्यय करणारा पण स्वत:चे नेमके वय सांगू न शकणारा, कायद्याला नाचवणारा, व्यावसायिक साक्षीदार त्यांनी खुबीने रंगवला. 
’जर्मनीच्या बादशहावर एक वर्षाने एक चमत्कारिक प्रसंग येणार आहे’, ’यंदा काही भागात पाऊस चांगला तर काही भागात कमी पडेल’ अशा ’धोरणी’ भविष्यकथनांची गमतीदार उदाहरणे देत स्वघोषित भविष्य़वेत्त्यांच्या लेखनातून टोप्या उडवल्या. 
त्यांचे ’कुलुपा’वरचे व संमेलनबाजीचे विडंबन असणारे ’चोरांच्या संमेलना’वरचे रुपक गाजले. ’गवई’ या लेखात गवयांच्या स्वभावातला विक्षिप्तपणा व गायनातील खोडींवरचे भाष्य, पोशाखी वृत्तीच्या गवयांना शाब्दिक चिमटे घेत ’जरीची टोपी व शालजोडी वापरावी म्हणजे गवयाचे तेज दुणावते. यजमानांशी शक्य तितके बेपर्वाईने वागावे. तबलजीस चुकवण्याचा प्रयत्न करावा व तो चुकत नसल्यास त्याच्याकडे धिक्काराने पाहावे.’ यासारखे दिलेले सल्ले, खास कोल्हटकरी शैलीचा नमुना म्हणता येतील. 
'म्हातारपणाचे फायदे' निबंधात म्हातारपणाकडे जितके खेळकरपणाने पाहता येईल तितके ते कमी क्लेशकारक वाटते हे जाणून ते म्हणतात, "ठेच लागून पडल्यास दात पडण्याची म्हाताऱ्यास मुळीच भीती नसते. त्याने सांगितलेली गप्प केवळ 'दंतकथा' आहे, असे त्याच्या तोंडावर कोणासही सांगता येत नाही. विस्मृतीमुळे पुष्कळदा आदल्या दिवशी वाचलेली गोष्ट दुसऱ्या लक्षात राहात नाही; त्यामुळे तेच ते पुस्तक त्याला दरखेपेस तितकेच मनोरंजक वाटू लागते व या रीतीने नवी नवी पुस्तके घेण्याचा उपद्व्याप व खर्च वाचतो. सर्वांत मोठा फायदा तो हा की, म्हाताऱ्यांशी तरुण मुली अगदी मोकळ्या व निष्कपट मनाने वागतात.'' अशा सर्व लेखमुष्टींची पुरचुंडी म्हणजेच ’सुदाम्याचे पोहे’.

कोल्हटकरांनी हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट आणि खुळचट प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा म्हणून आपले विनोदाचे हत्यार प्रतिगामींच्या वर्तनातील विसंगतीवर चातुर्याने चालवले. कर्मकांडाच्या अतिरेकावर टीका करताना कोल्हटकरांनी म्हटले आहे," दुष्काळात गरिबांस पोटास पुरेसे अन्न व पाठीस पुरेसे वस्त्र मिळत नसताना बायकांच्या लक्ष वाती तुपात जळत असतात. परकीयांनी आमची संपत्ती लुटून न्यावी पण आमच्यामधील पराक्रमी पुरुषांस ती परत खेचून आणण्यासाठी देशाची मर्यादा ओलांडण्याची सक्त मनाई? कोणत्याही कार्यास यश येण्यासाठी त्याच्या साधनांचे पूर्ण ज्ञान व त्यावर विश्वास असावा लागतो पण आपण मात्र प्रत्येक कार्याचा संबंध दैव, कर्म, ग्रह, घुबडे, मांजर, पाली अशा असंबद्ध गोष्टींशी लावतो." 

आपण प्रथेच्या बाजूचे असल्याचे भासवून त्या प्रथेतला फोलपणा वक्रोक्तीचा वापर करून दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. उदा: ’माझी भीष्मप्रतिज्ञा’ या निबंधात तत्कालिन लग्नपद्धतीवर कोरडे ओढताना प्रतिगामी ’उपवधू’ निवेदकाचे दिव्य विचार कोल्हटकर या शब्दात मांडतात, "मुलींना शिक्षण दिले म्हणजे त्यांना वल्लभास प्रणयपत्रिका पाठवता येऊन त्या वाममार्गास प्रवृत्त होतात अशी माझी पक्की समजूत असल्याने मी तिच्या बापास म्हटले, ती हे धडे विसरुन जाईल याची आपण काळजी घेऊ." आज ’मुली मोबाईलमुळे बिघडत असून त्यामुळे त्या पळून जाऊन लग्न करतात’ अशी मुक्ताफळे उधळणारे खासदार पाहिले की समाज आतून अजिबात बदललेला नाही फक्त साधने बदलली आहेत आणि कोल्हटकरांसारख्या लेखकाची अजूनही गरज नुरलेली नाही हेच ठळकपणे जाणवते. 

समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी ओळखलं. शिमग्यातील अश्लाध्य चालीरीतींवर त्यांनी उपहासाचा वापर करत यथेच्छ टीका केली. प्रवृतीपेक्षा निवृत्तीचे वर्चस्व वाढलेल्या समाजातल्या पापपुण्याच्या हास्यास्पद कल्पनांची ’चित्रगुप्ताचा जमाखर्च’ लेखातून रेवडी उडवली. ’उपासाच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करायला’ पत्नीस सवडही न देणार्‍या पांडुतात्यांच्या तथाकथित निर्जळी एकादशीवर मिश्कील भाष्य़ करत तर कधी सनातनी आणि सुधारक अशी परस्पर विरोधी पात्रे उभी करून सनातनी समाजाच्या वर्तनातल्या विरोधाभासाचे आणि बेगडीपणाचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडवले. ’साहित्यपरिषदेची तयारी’ या निबंधात त्यांचा प्रतिगामी विचारांचा कथानायक लेखकराव होण्यासाठी परदेशातून कथावस्तू चोरतो. मूळ कथेनुसार शेवट करायचा तर सुधारकी जोडप्याला सुखात पडलेले दाखवण्याचे धर्मसंकट त्याच्यावर ओढवते. मग तो लेखक त्यांच्या गाडीचा अपघात करवतो आणि त्याच डब्यातील सनातन्यांच्या पुण्याईने ते जोडपे त्यातून वाचल्याचे दाखवून तो आपली कशी सुटका करवून घेतो या घटनाक्रमाचे खोचक पण मनोरंजक चित्रण कोल्हटकर लीलया करतात. 


"कोल्हटकरांच्या विनोदात्मक लेखनपद्धतीमध्ये व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे मुख्य घटक असून हास्योत्पादन व तदद्वारा करमणूक व बोध हे तिचे परिणाम होत. कोल्ह्ट्करांच्या विनोदाचे हत्यार कल्पनेवर पडते. व्यक्तीवर ते उचललेही जात नाही." असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न. चिं. केळकर लिहितात. "कवी हा संवादित्व शोधतो तर विनोदी लेखकाचे लक्ष विसंवादित्वावर असते." असा भेद केळकर त्यात स्पष्ट करतात पण कोल्हटकर जेव्हा याच विसंवादित्वाची मानसपुत्रांच्या माध्यमातून नेम साधून हजेरी घेतात तेव्हा "भाविक समाजाच्या दृष्टीने यातून काही भाग वगळले असते तर बरे झाले असते" असे केळकर सुचवतात. 
’विविध ज्ञानविस्तार’ मधील कोल्हटकरांच्या काही लेखांमुळे खवळलेल्या वर्गणीदारांनी संपादकांना धमक्या दिल्याची नोंद आहे. एकूण कुणी आपले दोष दाखवताच ’भावना दुखावणे’ हे आपल्या समाजाचे जुनेच दुखणे आहे. या संदर्भात कोल्हटकरांचे म्हणणे असे की ’आपली (आपल्या समाजाची) व्यंगे पाहून जसे अंत:करण तुटते तसे इतरांच्या व्यंगांनी तुटणे अशक्य आहे.’ 
’माझे टीकाकार’ या लेखात ’सुदामा’ या पात्रासंबंधी ते लिहितात, "माझ्या पुराणमताभिमानी वाचकांच्या शिव्याशापांचा उपसर्ग मला लागू नये म्हणून ’सुदामा’ नावाचा मानसपुत्र मी उत्पन्न केला आणि आपल्या काही वेडगळ चालींची उपयुक्तता सिद्ध करण्य़ाकरता भीरु लोक ज्या बालिश व हास्यास्पद कोट्यांचा अवलंब करतात त्या खुशाल सुदामाच्या तोंडी घालून दिल्या." समाजाची वाटचाल ही समाजातले सुबुद्ध लोक इष्ट-अनिष्ट गोष्टींबद्दल जो भाव बाळगतात त्यानुसार होते असे इमर्सनने म्हटले आहे. कोल्हटकरांनी बंडूनाना, पांडूतात्या या अजोड दुक्कलीचा प्रातिनिधीक वापर करत समाजाला विचार करायला भाग पाडले. सुदामा हा आपल्याला हिणवणारा हितशत्रू नसून आपली वैगुण्ये हसत हसत दाखवणारा आपला निस्सीम मित्र आहे, अशी वाचकाची अंतिमत: खात्री पटणे हेच ’सुदाम्याचे पोहे’ चे यश. 

प्रसिद्ध जर्मन कवी गटे याचे ब्रीदवाक्य ’सत्य, कर्तव्य व सौंदर्य’ असून त्यात मनुष्याच्या बौद्धिक, नैतिक व भावनात्मक ध्येयांचे सार आले आहे असे कोल्हटकर मानत. या तत्त्वांची कसोटी तत्कालिन समाजाला लावताना कोल्हटकरांना त्यात जे अंतर आढळले त्याचा आरसा समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला. शाब्दिक कोट्यांचा आणि कल्पनाचमत्कृतीचा अतिरेक यामुळे क्वचित कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस आणि कृत्रिम झाला आहे असे त्यांचे टीकाकार म्हणत. पुलं कालबाह्य झाले आहेत किंवा कसे, वगैरे वाद समूहमाध्यमांवर झडत असतात. तेव्हा पुलंच्याही बर्‍याच मागच्या पिढीतल्या कोल्हटकरांच्या विनोदाचा आस्वाद आजचा वाचक घेऊ शकेल का याबाबत शंका असू शकते पण त्यांच्या निर्विष विनोदाने मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे आणि विवेकाने पाहायला शिकवले हे निर्विवाद. 

- मोहिनी महेश मोडक

----------------------------------------------------------------------------------------------- -----------------------------

संदर्भ - 

http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/bitstream/handle/123456789/7767/08_chapter%203.pdf?sequence=8&isAllowed=y

मराठी विनोदी कथा - संपादक डॉ. द. ता. भोसले 

सुदाम्याचे पोहे - श्री. कृ. कोल्हटकर

मराठी विश्वकोश

(Published in Maharashtra Times Diwali Ank 2020 )


 

Friday, November 20, 2020

बदलत्या जाहिराती.. बदलती ’ती’

 

या कोविड काळातली टाळेबंदी सुसह्य व्हावी म्हणून नव्वदच्या दशकातल्या ’रामायण’ मालिकेचे पुन:प्रसारण करण्यात आले होते. त्यात सीतेची भूमिका करणार्‍या दीपिका चिखलीयाला पाहून तेव्हाच्या सात्विक, सरधोपट जाहिराती आठवल्या. "मान गएँ दीपिकाजी, आपकी पारखी नजर और निरमा सुपर, दोनोकों." मग स्मार्ट गृहिणी असणार्‍या सर्फच्या ’ललिताजी’ आठवल्या. ’भला उसकी साडी मेरी साडी से सफेद कैसे’ म्हणत जाहिरातींमध्ये हळूहळू छानसा बदल होत गेलाय हे ही जाणवले. आता शुभ्र कपड्यांमुळे कमावलेल्या आत्मविश्वासाने आपल्या रिक्षाचालक वडिलांची आपल्या बॉसशी ओळख करुन देणारी एखादी आधुनिक तरुणी, कार्यालयात लाच देऊ पाहणार्‍याला आपले कपडेच नाही तर चारित्र्यही लख्ख आहे हे ठणकावून सांगणारी कर्तबगार अधिकारी स्त्री किंवा 

अमुक डिटर्जंट वापरुन वॉशींग मशीनमध्ये कपडे कसे धुवायचे हे मुलीबरोबरच मुलालाही शिकवणारी तडफदार आई रिन, टाईड किंवा एरिअलच्या जाहिरातीतून दिसू लागली आहे. 

अर्थात धुणी- भांडी करणे किंवा करवून घेणे, घराची स्वच्छता करणे, कुटुंबियांच्या चेहर्‍यावर हास्य फुलेल असा रुचकर पण आरोग्यपूर्ण स्वयंपाक करणे, कुटुंबियांची काळजी घेणे (आणि हे सगळे करुन पाठ वगैरे दुखली तर अमुकतमुक कंपनीचा बाम चोळून पदर खोचून पुन्हा कामाला उभे राहणे) ही कामे मुख्यत: बाईची हे गृहितक अद्याप तसेच आहे. घरातला पुरुष सहृदयी असेल तर तो तिला फार तर ’मदत’ करतो. आतापर्यंत ’बायको गेली माहेरी (तरच) काम करी पीतांबरी' हे प्रसंगापुरते म्हणणार्‍या बर्‍याच पुरुषांनी टाळेबंदीमध्ये मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि हाताशी बर्‍यापैकी वेळ असल्याने बायको घरात असूनही घरकामाला चक्क हातभार लावला.


काहींनी समाजमाध्यमांवर त्यावरुन विनोद व्हायरल केले असले तरीही किमान मध्यमवर्गी समाज बदलतोय असे चित्र दिसू लागले. टाळेबंदी शिथिल झाल्यावर, व्यवहार पुन्हा सुरु झाल्यानंतर, विशेषत: ज्या घरातील स्त्रिया नोकरी/व्यवसाय आणि घरकाम अशी दुहेरी कसरत करतात, त्यातील किती पुरुषांनी घरकामात मदत करणे अजूनही सुरु ठेवले आहे हा मात्र संशोधनाचा विषय ठरेल. या पार्श्वभूमीवर घरगुती-उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये जाणवलेला महत्वाचा सकारात्मक बदल म्हणजे कपडे धुणे किंवा घरकाम हे ’फक्त’ बायकांचे काम नाही हे निदान सूचित करायला त्यांनी सुरुवात केली आहे. 

या संदर्भात आजची डचेस ऑफ ससेक्स- मेगन मर्केल हिचा मध्यंतरी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ बराच गाजला. त्यात तिने या गृहितकांबद्दल अतिशय मार्मिक भाष्य केले आहे. ती अवघी ११ वर्षाची असताना वर्गातील एका मुलाने एका डिटर्जंटच्या जाहिरातीतील शब्दांवरुन हे केवळ मुलीं/ स्त्रियांचे काम असून ते त्यांचे समाजातले (दुय्यम) स्थानही आहे, अशा अर्थाचा शेरा मारला. ती अस्वस्थ झाली. असा चुकीचा संदेश समाजमनावर बिंबवणार्‍या त्या जाहिरातीच्या विरोधात अमेरिकेच्या तत्कालीन फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन पासून त्या उत्पादनाच्या निर्मात्यापर्यंत अनेकांना तिने पत्रे लिहिली. विशेष म्हणजे याची दखल घेतली जाऊन ’प्रॉक्टर अ‍ॅंड गॅम्बल’ कंपनीच्या त्या जाहिरातीतले शब्द बदलले गेले. लिंग-समानतेबाबत फक्त विचार पुरेसा  नाही, ती संकल्पना आचरणातही उतरायला हवी, हे ऋजु शब्दात परंतु निक्षून सांगणारी मेगन या व्हिडिओमध्ये तिच्या शाही लग्नाच्या व्हिडिओपेक्षा जास्त देखणी दिसते. मेगनच्या पिढीच्या भारतीय स्त्रीचेही आत्मभान जागे होते आहे, ती चौकटीपलिकडे जाऊन विचार आणि कृती करु लागली आहे. या वस्तुस्थितीचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होईना आजच्या जाहिरातींवर पडू लागल्याचे दिसते आहे. 

मुंबईच्या चंदना हिरन या २२ वर्षीय तरुणीने ’फेअर अ‍ॅंड लव्हली’ च्या जाहिरातीतील ’फेअर’ या वर्णभेदी शब्दावर आक्षेप घेतला व तो गाळला जावा म्हणून change.org वर सह्यांची मोहिम राबवली. तिला उत्तम प्रतिसाद मिळाला. याच सुमारास जॉर्ज फ्लोईडची वर्णद्वेषातून हत्या झाल्याच्या घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत होत्या. हिंदुस्थान युनिलिव्हरने अखेर आपल्या या उत्पादनाचे नामांतर ’ग्लो अ‍ॅंड लव्हली’ असे केले. इंग्रज देश सोडून गेले असले तरी जेत्यांचा रंग म्हणून गोरेपणाच्या आकर्षणाने भारतीयांच्या मनाला असे काही कह्यात घेतले आहे की सर्वसाधारण भारतीयांना, त्यातूनही स्त्रियांना आपल्या मूळ गव्हाळ किंवा सावळ्या भारतीय वर्णाचा अकारण न्यूनगंड वाटतो. गोरेपणा म्हणजेच स्त्रीचे सौंदर्य अशी वर्णभेदाचा पुरस्कार करणारी व्याख्या समाजमनावर बिंबवू पाहणार्‍यांना उत्पादनाच्या नावातून गोरेपणाचा उल्लेख अखेर काढून टाकावा लागला. उजळ होत जाणार्‍या रंगछटा दाखवणारे कार्ड देखील त्यांनी पाकीटातून काढून टाकले. याआधीही निवियाने जाहिरातीसाठी तयार केलेल्या बॅनरमध्ये white is purity म्हणजेच गोरेपणा म्हणजे शुद्धता असे अत्यंत आक्षेपार्ह वाक्य वापरले होते. वर्णभेदी म्हणून आरोप झाल्यावर कंपनीने क्षमा मागून ते मागे घेतले असले तरी समाजाच्या मनात ते आजही रुतून बसले आहे. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवे हे अशा जाहिराती ठासून सांगत होत्या. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता, तो तब्बल ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. दरम्यान शाहरुख खान सारखे प्रसिद्ध सिनेनट जाहिरातीत तालमीतले प्रशिक्षक बनून कुस्तीपटू मुलांच्या दिशेने गोरेपण बहाल करणार्‍या ’मर्दोवाल्या क्रीम’ची ट्यूब फेकत ’तुम्ही पुरुषासारखे पुरुष असून गोरेपणासाठी बायकी उत्पादनं काय वापरता” म्हणत या नवीन क्रीमचा प्रचार करत होते. हे सगळे बघता केवळ जाहिरातीतून नव्हे तर उत्पादनाच्या नावातून जरी सामाजिक विषमता ध्वनीत होत असेल तर संबंधित कंपनीला ते नाव बदलवायला भाग पाडण्याची किमया आज एका जनहित याचिकेने करुन दाखवली आहे.  #AllShadesAreLovely सगळ्या वर्णछटा सुंदर असतात, हे अधोरेखित करणारी ही मोहिम एका बलाढ्य कंपनीला स्त्री सौंदर्याचे कृत्रिम मापदंड बदलवायला भाग पाडू शकली, हे ही नसे थोडके. 

परंतु एक समाज म्हणून आपण मेगन किंवा चंदनाइतक्या गंभीरपणे जाहिरातीतून नकळत दिल्या जाणार्‍या संदेशांकडे पाहतो का! ते चुकीचे असल्यास आपल्याला खटकतात का! खटकल्यास आपण किमान वैयक्तिक स्तरावर याबाबतीत बदल करतो का, हे प्रश्न आता तरी आपण स्वत:ला विचारायला हवे आहेत. 

तांत्रिकदृष्ट्या भारतामध्ये टीव्हीवर जाहिराती दाखविण्यास १९७८ पासून सुरुवात झाली. या काळामधल्या जाहिरातीतल्या स्त्रिया कमालीच्या गृहकृत्यदक्ष असत. ते साहजिकही होते कारण स्त्रियांचे नोकरीसाठी, कामासाठी घराबाहेर पडण्याचे प्रमाण तेव्हा अत्यंत कमी होते. नव्वदच्या दशकात आणि जागतिकीकरणानंतरही घरगुती उत्पादनांचे आणि बाईचे नाते अबाधित राहिले असले तरी संसारी स्त्रीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सादर केलेली कॅडबरीजच्या मनोवेधक जाहिरातीतल्या क्रिकेट खेळाडूची उत्फुल्ल वृत्तीची प्रेयसी अनेकांना भावली. ही जाहिरात कलात्मकरित्या चित्रीत केली असली तरी कर्तृत्ववान पुरुष आणि त्याच्यावर भाळणे किंवा त्याचा संसार निगुतीने सांभाळणे या दोनपैकी एक भूमिका करणारी सुस्वरुप स्त्री अशा पठडीतल्या जाहिरातींची संख्या वाढू लागली. अपवाद वगळता बाईचे जाहिरातीत असणे आयपीएल मधल्या ’चीयरलीडर्स’सारखे अपरिहार्य ठरु लागले. सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीत बाईच दिसणार हे अपेक्षित असले तरी हळूहळू दाढीचे रेझर, बाईक, सिगारेट, सूट अशा पुरुष वापरत असलेल्या उत्पादनाशी संबंधित जाहिरातीतही बाई दिसणे अत्यावश्यक झाले. शिवाय या बायका मादक आणि आकर्षक असणे तसेच पुरुष कमावलेल्या पिळदार शरीराचे, ’मॅचो’ असणे अनिवार्य झाले. त्याच्या पौरुषत्वाला आव्हान देणारी एक तरी कमनीय युवती बाजूला त्याला लगटून दिसू लागली आणि जाहिरातीच्या शेवटी ती त्याच्यावर फिदा होऊ लागली. मग ते उत्पादन म्हणजे पुरुषांची अंतर्वस्त्रे असोत किंवा एखादी कार. विशेषत: डिओच्या जाहिराती तर स्त्रियांना आकर्षित करणे हे पुरुषांना जगाच्या पाठीवर करण्यासारखे एकमेव काम असल्यासारख्या केल्या जाऊ लागल्या. नुसत्या सुवासाने धुंद होऊन डिओ लावलेल्या अनोळखी पुरुषामागे धावत सुटलेल्या बायका जाहिरातीतून दिसू लागल्या. तुलनेने सर्जनशीलतेचा प्रत्यय देत ’मेन विल बी मेन’ म्हणत काही खुसखुशीत जाहिरातींनी स्त्रीविषयी पुरुषांचे नैसर्गिक आकर्षण अतिशय संयत पण मिश्कील पद्धतीने सादर केले असले तरी हे अपवाद. बहुसंख्य बटबटीत जाहिरातींनी बाईच्या शरीराचे वस्तुकरण तर केलेच परंतु लिंगभाव ही माणसांसाठी असलेली गोष्ट एव्हाना उत्पादनांशी जोडली गेली. २०१२ साली व्यायामाच्या उत्पादनांशी संबंधित कंपनीच्या पोस्टरमध्ये म्हटले होते 'cheat on your girlfriend not on your workout' म्हणजेच एकवेळ तुमच्या प्रेयसीला फसवा पण व्यायामाशी प्रतारणा करु नका. वादग्रस्त ठरल्यावर ही जाहिरात मागे घेण्यात आली. 

या जाहिराती अशा असण्यामागचे कारण म्हणजे समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक धारणा. गेल्या दशकातल्या युनेस्कोचा अहवालानुसार येत्या ७५ वर्षांत तरी माध्यमांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची आदर्श स्थिती येण्याची शक्यता नाही. याचा अर्थ ती स्थिती आणण्यासाठी समाजाला निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वसामान्य भारतीय स्त्री ही ‘सेक्सडॉल’ नाही आणि कुटुंबासाठी चोवीस तास राबणारी ‘महान त्यागमूर्ती’ही नाही. ती या दोन टोकाच्या प्रतिमांच्या मध्ये कुठेतरी स्वत:साठीदेखील जगू पाहणारी एक ‘हाडामासाची’ व्यक्ती आहे हे समजून घ्यावे लागेल. स्त्रियांना कर्तृत्व गाजवता यावे यासाठी संधींची समानता आवश्यक असते त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागेल. बीएसई वरील नोंदीनुसार विविध उद्योगसमूहांमध्ये ३२३ व्यवस्थापकीय पदांपैकी फक्त ८ पदांवर स्त्रिया कार्यरत आहेत तर त्यावरील ५४% कंपन्यांच्या संचालक मंडळावर एकही स्त्री नाही. मग सर्वसामान्य स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल काय बोलावे! साहजिक पितृसत्ता अधोरेखित करणार्‍या जाहिरातींची रांग सहजासहजी संपत नाही. 


जाहिरातविश्वात काम करणार्‍या स्त्रिया हे सारे मूकपणे का स्वीकारतात याचे कारण देखील तेथील पितृसत्ताच आहे. कंपनीच्या प्रमुखपदी असणारी मंडळी जाहिरातीचे स्वरुप व अपेक्षा निश्चित करतात आणि जाहिरातविश्वातली बलाढय मंडळी त्यानुसार जाहिरातीची संकल्पना ठरवतात. स्त्रिया येथे बहुतेक करुन मदतनीस किंवा मॉडेलच्या भूमिकेत असतात. निर्णयाच्या अधिकारापर्यंत फार कमी जणी पोचू शकतात. शिवाय समाजात रुजलेल्या धारणा तशाच राखून स्त्री आणि पुरुषाला आपापल्या पारंपरिक भूमिकाच योग्य असल्याचे सांगत राहणे बाजाराला व्यावहारिक दृष्टीने जास्त सोपे असते. याचा अर्थ स्त्रियांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत पुरुषांनी किंवा पुरुषांना लागणार्‍या उत्पादनांच्या जाहिरातीत स्त्रियांनी असूच नये का? त्यांच्यातील स्वाभाविक आकर्षण किंवा सामाजिक नात्यांना जाहिरातीत संदर्भ म्हणून वापरले जाऊ नये का? अर्थातच हवे परंतु तारतम्य बाळगून. ’एक हीरा आपके हीरे के लिए’ असे संयतपणे सांगणार्‍या जाहिराती हे सहजपणे करत आहेत. समाजाच्या वैचारिक चाकोरीत बदल केला आणि तो रुचला नाही तर उत्पादनाच्या विक्रीवर त्याचा घातक परिणाम होण्याची जोखीम पत्करणे व्यावसायिकांना परवडणारे नसते तरीही आता कूर्मगतीने का होईना जाहिराती बदलू लागल्या आहेत. हे धाडस करु लागल्या आहेत. 


स्त्रीची आणि पुरुषांचीही जाहिरातीतली रुपे बदलताना दिसू लागली आहेत. आजवर फक्त कुटुंबाचा विचार करणारी स्त्री स्वत:चा विचार करतानाही दिसू लागली आहे. कोलगेटच्या ताज्या जाहिरातीत एक देखणी वयस्कर विधवा स्त्री आपल्या कुटुंबियांसह बाहेर जेवायला गेली आहे. तिचे लक्ष उपहारगृहाच्या दरवाज्याकडे आहे. तो येतो. तिने निवडलेला समवयस्क सहचर. आपल्या अनामिकेतली अंगठी दाखवत ती आपल्या कुटुंबियांची त्याच्याशी काहीशा संकोचाने तरीही आत्मविश्वासाने आणि हसतमुख चेहर्‍याने ओळख करुन देते. क्षणभर अचंबित झालेले कुटुंबिय स्वत:ला सावरुन टाळ्या वाजवून तिच्या या निर्णयाचे स्वागत करतात. जाहिरातीत एकही संवाद नाही फक्त देहबोली सगळे काही पोचवते. खरंच, असं का असू नये! असा विचार करायला प्रेक्षकाला भाग पाडते. स्कूटीच्या जाहिरातीतल्या तारका ‘व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन?’ (सगळी धमाल नेहमी मुलांच्याच वाट्याला का!) असा थेट सवाल करु लागल्या आहेत. विशेष म्हणजे स्त्रीला

कायम ठराविक रुपरंगात आणि मोजमापात सादर करणारी बार्बी सुद्धा बदलते आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवसानिमित्त जागतिक पॅरा-बॅडमिंटन चॅम्पियन मानसी जोशी हिच्या नावाच्या बार्बी डॉलचा समावेश नुकताच बार्बी शिरोज या खास बाहुल्यांच्या मालिकेत करण्यात आला. अशाप्रकारच्या मान्यतांमुळे अपंगत्वाकडे लोक सहानुभूतीने नाही तर आदराने आणि सह-अनुभूतीने पाहू लागतील, असे मानसी म्हणते. या बाहुलीलाही मानसीसारखेच कृत्रिम अवयव (पाय) लावण्यात आले आहेत. मॅटल टॉईज इंडियाचे ​​विपणन प्रमुख याबाबत म्हणतात “प्रत्येक मुलीमध्ये तिचे स्वप्न साध्य करायची जिद्द असते. त्यांना या बाहुलीमुळे आणखी प्रेरणा मिळॆल असा आम्हाला विश्वास आहे." 

बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लान किंवा कोणतीही पोषणाचा दावा करणारी पूड ही फक्त उंची वाढण्यासाठी नाही तर सक्षम होण्यासाठी आहे हे या नव्या जाहिराती सांगू लागल्या आहेत. निर्मनुष्य रस्त्यात गाडी बंद पडल्यावर स्वत: गाडी चालवू शकत असूनही कावर्‍याबावर्‍या झालेल्या आईला धीर देणारी आणि जॅक लावून शांतपणे स्वत: चाक बदलणारी षोडशा यात दिसू लागली आहे. मुलाला स्पर्धेसाठी नुसते तयार न करता जाहिरातीतली आई सुद्धा त्याच्यासोबत धावू लागली आहे. दागिन्याच्या जाहिरातीत एकल पालकत्व निभावणार्‍या स्त्रीशी विवाह करताना तिचा नवा जोडीदार तिच्या रुसलेल्या मुलीला सहजपणे उचलून घेऊन सप्तपदी चालू लागला आहे. विवाह जुळवणार्‍या संस्थांच्या वेबसाईटच्या जाहिराती देखील बदलत आहेत. केवळ जात, उंची, रुप, पगार याभोवती न घुटमळता स्वभाव जुळणे जास्त महत्वाचे असते हे त्या सांगत आहेत. अशाच एका जाहिरातीतली वृद्ध आई मुलाला रागावून विचारते की तुझ्या कमाईत आपलं व्यवस्थित चाललेलं असताना ती नोकरी करतेच कशाला! त्यावर नवपरिणीत बायकोची खंबीरपणे बाजू घेणारा मुलगा म्हणतो, ‘तिला आवडतं, म्हणून’. बाईने नोकरी करायची ती केवळ घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी या जुन्या विचारांना ही जाहिरात छेद देते. टूथपेस्टच्या एका जाहिरातीत मुलांमध्ये फुटबॉल खेळायला गेलेली मुलगी पडते तेव्हा मुलगे तिची खिल्ली उडवतात, तिला हसतात तेव्हा ती सुरेख हसून विचारते, तुम्हाला भीती नक्की कशाची वाटतेय, माझ्या पडण्याची की तुमच्या हरण्याची? कॉर्नफ्लेक्सच्या


जाहिरातीतले बाबा आई घरी नसली तरी मुलीला नाश्ता करायला लावून मगच शाळेत पाठवताना तर दुसर्‍या जाहिरातीत ते तिची वेणी घालण्य़ाचा प्रयत्न करताना दिसू लागले आहेत. पूर्वी ज्या साबणाच्या जाहिरातीमध्ये बायका जीव खाऊन कॉलर घासताना आणि कपडे शुभ्र झाल्याचे पाहून त्यांचे नवरे आणि मुलं खूष होताना दाखवले जात, त्याच साबणाच्या जाहिरातीमध्ये आज कपडे खराब होण्याची तमा न बाळगता चिखलात बंद पडलेली रुग्णवाहिका ढकलणार्‍या बायका दिसत आहेत. सॅनिटरी पॅड ही लपतछपत काळ्या पिशवीतून विकत आणायची वस्तू नसून ती एक मासिक आणि आवश्यक खरेदी आहे, मासिक धर्म ही नैसर्गिक घटना आहे हे सांगणार्‍या जाहिराती बायकांना जन्मभराच्या संकोचापासून मुक्त करत आहेत. कोणत्याही व्यवसायात बाजारात टिकून राहण्यासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेला नफा शेवटी ग्राहकाकडून मिळतो. हा ग्राहक समाजाचाच एक भाग असतो ज्यात सुमारे पन्नास टक्के महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या बदलत्या मानसिकतेची नोंद ग्राहकानुययी माध्यमांना आणि जाहिरात विश्वाला घ्यावी लागते आहे. हे सुचिन्ह आहे.


मात्र या बदलाची गती फार मंद आहे. जाहिराततज्ज्ञ भरत दाभोळकर म्हणतात, ‘जाहिराती दोन प्रकारच्या असतात. ‘आयडेंटिफिकेशन’ म्हणजे जाहिरातीतली व्यक्ती म्हणजे आपणच आहोत असे भासवणाऱ्या आणि ‘अस्पिरेशनल’ म्हणजे या जाहिरातीतल्या कुणासारखं तरी आपणही असावं, असं वाटायला लावणाऱ्या." जाहिरातींचे स्वरुप वेगाने बदलावे असे वाटत असेल ग्राहकांना स्वत:ला आमूलाग्र बदलावे लागेल तरच त्याचे प्रतिबिंब जाहिरातीतून उमटेल. लिंगभावविषयक समतेची जाणीव समाजात जितकी रुजेल तितकी जाहिरातींच्या स्क्रिप्ट्सना अर्थकारण आणि समाजकारण याचा समन्वय साधायची प्रेरणा मिळेल. यासाठी सर्वप्रथम स्त्रियांना स्वत:मध्ये बदल करावे लागतील. कायम त्यानेच बिल द्यावे, त्याने आपल्याला सुरक्षित ठेवावे, अडचण आली तर त्यानेच पुढे व्हावे, सदैव स्त्री दाक्षिण्य दाखवावे, त्यानेच सांभाळ करावा अशा अपेक्षा लवचिक कराव्या लागतील. अन्यथा यातून जोपासली जाणारी स्त्रियांची परावलंबनाची आणि पुरुषांची स्वामित्वाची भावना आणि त्यातून निर्माण होणारा अहंभाव तसाच राहील आणि तोच जाहिरातीतून वर्षानुवर्षे झळकत राहील. शोभेच्या बाहुलीचे अल्पकाळ कौतुक होते पण तिला सन्मान मिळत नाही. सन्मान मिळवण्यासाठी स्त्रियांना आपले जागे झालेले आत्मभान जोपासत राहावे लागेल. स्त्री सौंदर्य म्हणजे केवळ तिचे शरीर आणि रंगरुपच नव्हे तर तिचा आत्मविश्वास ही नवी व्याख्या या नव्या जाहिराती रुजवू पाहत आहेत. त्यांना बळ देण्यासाठी स्त्रियांना जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. हे जग फक्त स्त्रियांचे किंवा पुरुषांचे नाही, दोघांचे मिळून तयार झालेले आहे हे आपल्या मुलाला आणि मुलीला स्पष्टपणे सांगावे लागेल. याचा अर्थ स्त्रियांनी आणि पुरुषांनी आपल्या नात्यातला गोडवा, नजाकत गमवावी असे नाही मात्र रूढ चौकटींना नवे आयाम अवश्य द्यायला हवे तरच जाहिरातींना सुपरवुमनचे उदात्तीकरण सोडून स्त्रीच्या अंगभूत वैशिष्ट्यांचा शोध घ्यावासा वाटेल. आपल्या व्यंगचित्रातून नेहमी ’सामान्य माणूस’ रेखाटणार्‍या आर.के.लक्ष्मण यांना ’तुम्ही कधी सर्वसामान्य स्त्रिया का रेखाटत नाही?’ असे एकदा विचारण्यात आले, त्यावर ते म्हणाले, कारण स्त्रिया असामान्य असतात. समाजात आणि पर्यायाने जाहिरातीत बदल घडवायचा असेल तर स्त्रीला तिच्या असामान्यत्वाचे भान सदैव राखता आले पाहिजे. ते नेमके कसे हे ही कविता अचूकपणे सांगते आहे. (मूळ हिंदी कविता - कवी नीलेश रघुवंशी , मराठी अनुवाद - मोहिनी मोडक)

लावण्यवतींनो

थांबवा तुम्ही सभा-समारंभात मिरवणं

तबकात शाल, श्रीफळ घेऊन

किंवा

दीप प्रज्ज्वलन होईतो 

देखाव्यासारखं नुसतं उभं राहणं

काडेपेटी हातात धरुन ....


नका मंचावर चढत जाऊ

फक्त मानपत्राच्या वाचनापुरतं

नका भासू देऊ

आपलं तिथलं अस्तित्व 

केवळ मोहक आणि प्रेक्षणीय...

 

लावण्यवतींनो

असं एकदा पाहा तर करुन

बदलून जाईल हे जग सारं

बदलून जाईल हे अवघं विश्व


- मोहिनी महेश मोडक

(This article is published in sakal diwali ank 2020 All editions)