Tuesday, May 10, 2016

शनि आणि आत्मसन्मान


"’काका हलवाईच’ का? आता ’काकू हलवाई म्हणा. चितळे बंधूच का?चितळे ’भगिनी’ म्हणा, इ-मेल का? आता ’फिमेल’ म्हणा’ वगैरे छापाच्या तृप्ती देसाई आणि मंदीर प्रवेशासाठी लढा देणार्‍या बायकांवरील विनोदांची सध्या चलती आहे. चला, श्री आणि जान्हवी सुटले. विनोद हवेच, त्याने तणाव हलका होतो, गंमत वाटते पण काही जण आता सभ्यतेची पातळी ओलांडून बोलू किंवा पोस्ट करू लागले आहेत. ’आता बापाच्या श्राद्धाला स्त्रियाही टक्कल करणार काय’, यासारख्या शब्दात त्यांची आणि पर्यायाने स्त्री वर्गाची खिल्ली उडवली जात आहे. तर्कहीन आक्षेप घेतले जात आहेत. चारित्र्यहननापासून अर्वाच्य शिव्यागाळीपर्यंत शस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. एक साधा अधिकार मागितला यात समाजाने इतका थयथयाट करण्य़ासारखे आहे तरी काय हे मला कळू शकलेले नाही. व्यक्तीश: माझ्यासाठी ’शनी’ हा एक ’ग्रह’ आहे, साहजिकच त्याचे ’दर्शन’ अवकाश विभागाच्या दुर्बिणीमधून घ्यायचे असते. तरीही शनीचा चौथरा, एखादा गाभारा, किंवा देवस्थानातल्या प्रवेशासाठी या स्त्रियांनी केलेलं बंड हा टवाळीचा विषय नक्कीच नाही. ’शनी मला नाकारत असेल तर मीच त्याचं दर्शन नाकारते,’ असा आक्रमक पवित्रा घेऊ शकणार्‍या काही तरूणींना अशा आंदोलनांची गरज वाटत नाही. ’धार्मिक परंपरा निमूटपणे पाळायलाच हव्यात’ असं म्हणणार्‍या स्त्रियांनाही डोक्याला ’नसते ताप’ नको आहेत. या दोन टोकांमधल्या, ’का?’ हा प्रश्न मनात येऊ लागलेल्या, सर्वसामान्य स्त्रियांसाठी हा लढा आहे हे मुळात लक्षात घ्यायला हवे.

अर्थात हे पटवून देण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्या स्त्री संघटनांनी विवीध व्यासपीठांवरून करायला हवा होता. त्यांना आपली भूमिका आक्रस्ताळेपणा न करता, वैचारिक चर्चा करून, ठामपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडता आलेली नाही , त्यामुळॆ या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा मिळवण्यात त्या कमी पडल्या. यामागे त्यांचा केवळ तात्कालिक आवेश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. स्त्रियांच्या प्रश्नांची सखोल जाण किंवा पुढच्या वाटचालीबद्दल स्वच्छ भूमिका तृप्ती देसाई आणि मंडळींच्या विचारात दिसून येत नाही. आपण हिंदूविरोधी नाही हे सिद्ध करायला आता दर्ग्यात प्रवेश करून दाखवायलाच हवा अशा स्वत:च निर्माण केलेल्या भोवर्‍यात त्या गरगरत आहेत. त्यांनी आपले भरकटत चाललेले तारू वेळीच सावरायला ह्वे आहे. अन्यथा मंदिरप्रवेश हा प्रतीकात्मक लढा न राहता, स्त्रियांना प्रवेश नाकारलेल्या जागांची यादी करणॆ आणि तिथे प्रवेशाची मागणी करत ठिय्या देणे हेच त्यांचे अनुत्पादक जीवितकार्य होऊन बसेल. त्यांची उर्जा अधिक विधायक कामांऐवजी ह्यातच खर्च होईल. त्यामुळे एकूणच त्यांच्या आंदोलनाची पद्धत आणि दिशा योग्य आहे किंवा नाही याबद्दल दुमत असू शकते, पण हेतूबद्दल शंका घेणे, हीन टीका करणे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला शोभत नाही.

’पुरोगामी विचारसरणी' हे महाराष्ट्राचे नेहमीच एक वैशिष्ट्य़ मानले गेले आहे. परंतु मुलभूत मूल्यांशी फारकत घ्यायची असेल तर महाराष्ट्राने स्वत:ला पुरोगामी नेमके कशासाठी म्हणवून घ्यायचे, फक्त नेत्यांच्या भाषणापुरते?  प्रत्येक धर्मात कोणत्या तरी काळी काही कारणामुळे पडलेला पायंडा आधी प्रथा मग नियम मानला जाऊ लागतो. तो कालसुसंगत आणि तर्कशुद्ध आहे काय, हे आपण तपासायचे की नाही? मूल्ये शाश्वत असली तरी त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे तपासले गेले नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एके काळी सर्वात महत्वाची ठरलेली पुरोगामी विचारसरणी नव्या विचारप्रवाहांसह पुढे जाणे थांबवून गाळासारखी साचून राहील. तसे घडू नये म्हणून काही नाकारलेली सत्ये एका टप्प्यावर स्वीकारावी लागतात तर काही बदलांचे स्वागत करावे लागते. जुनाट विचारांची कावड झापडे बांधून वाहणार्‍यांचा प्रवास अखेर विनाशाकडे होतो हा जगाचा इतिहास आहे. मग ’धर्माची चिकित्सा’ हे अतिशय महत्त्वाचे मूल्य ’आमच्या भावना का दुखावल्या’ या बडग्याखाली चिरडले जाऊ द्यायचे का! खरं म्हणजे मागे वळून पाहिलं तर गेल्या शंभर वर्षापासून सुरु असलेल्या कठोर धर्मचिकित्सेमुळे हिंदु समाजाचे नेहमीच भले झाले आहे.

’पण मग बायका पुन्हा कर्मकांडाकडेच तर जात आहेत, मग ही कसली डोंबलाची धर्मसुधारणा!’ असा जोरदार आक्षेप घेतला जातो आहे. आस्तिक समाजाच्या ’देव’ या संकल्पना विविध स्वरूपाच्या असतात. आस्तिकतेमुळे जगणं आश्वासक होतं. मात्र बहुसंख्य आस्तिक हे कर्मकांड मानणारे असतात. त्यातूनही महिलांवर कर्मकांडांचा आणि त्यातून तयार झालेल्या धार्मिक संकेतांचा प्रचंड पगडा असतो. आयटी इंजिनीयर मुलींनाही डिझाईनर नऊवारी नेसून केलेल्या पूजाअर्चेचे फोटो शेअर करायला आवडतात. जगण्य़ातल्या समस्यांशी लढताना काव्य शास्त्र विनोदातील आनंदापासून अजून खूप दूर असलेल्या ग्रामीण महिला व्रतवैकल्यांच्या निमित्त्याने थोडीफार हौसमौज करून आपला आनंद शोधतात ही वस्तुस्थिती आहे. इथवर कर्मकांडांचा त्यांना स्वत:ला किंवा समाजाला त्रास नसतो. मात्र कर्मकांडाच्या कह्यात गेलेल्या महिला ’साडेसातीतून’ सुटका होण्य़ासाठी शनीला साकडे घालतात, मासिक धर्माच्या काळात त्या देवालयात पाऊल टाकत नाही. असे नियम स्त्रियांनी मोडले तर ’पाप’ लागते हे त्यांच्या मनावर पक्के बिंबलेले आहे. काहींची तर हे नियम ’देवानेच’ केले आहेत अशी ठाम समजूत आहे. आंदोलनकर्त्यांना विरोध करणार्‍या महिला याच मानसिकतेच्या बळी आहेत. परंतु कायद्याने खणखणीतपणे आणि विश्वस्तांनी नाईलाजाने का होईना, प्रवेशाला दिलेल्या परवानगीमुळे एवीतेवी कर्मकांडे सोडू न शकणार्‍या श्रद्धाळूंना एक नवा दॄष्टीकोन तर गवसला. तो म्हणजे, ’काळानुसार विचार आणि नियम बदलणे म्हणजे पाप नाही, धर्म ही पुरूषांची मक्तेदारी नाही आणि स्त्रिया अपवित्र नाहीत, त्यांनाही दर्शनाचा समान अधिकार आहे.’ शनीला तेल वाहत राहणे कालांतराने बंद होईलही पण निदान आपण अपवित्र असल्याची भावना या स्त्रियांच्या मनातून आज जात असेल तर ते सुचिन्ह नाही का! तरी देखील, ’हाजी अली दर्गाप्रवेशाचं नाव काढताच पाहा, कडव्या मुस्लीम संघटना कशा चवताळून उठल्या, एकत्र झाल्या, नाहीतर आपण! ’ अशी अजब मते व्यक्त होतात तेव्हा खेद वाटतो. धार्मिक कट्टरतेचे समर्थन करून आपल्याला तालिबानकडे वाटचाल करायची आहे काय? या घडामोडींमुळे उलट हिंदु धर्म हा काळानुसार बदलणारा सहिष्णु धर्म आहे हे सिद्ध करता आले आहे. पूर्वीचे शाहबानो, आजचे शायराबानो प्रकरण किंवा दर्गाप्रवेश विरोध पाहता मंदीर प्रवेशाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे हिंदू धर्माचे काही बिघडले तर नाहीच उलट हिंदू धर्माची मान उंचावली हे लक्षात घ्यायला हवे. मग ही प्रगतीशील धर्मसुधारणा नव्हे काय?

दुसर्‍या बाजूला, कर्मकांडाशी संबंधित अधिकार मागितल्याने, स्त्री-पुरूष समानतेच्या प्रश्नासाठी गंभीरपणे लढणार्‍या चळवळींची यामुळे हानी झाली असे काही बुद्धीवादी मंडळींना भय वाटू लागले आहे. उलट ज्या सर्वसाधारण महिला अशा चळवळींना ’नास्तिक शहरी बायकांचा गट’ समजून त्यापासून चार हात दूर राहत होत्या, त्या या निमित्त्याने बदलाची भाषा शिकू लागल्या आहेत. कमीत कमी चाकोरीबाहेरचा विचार करू लागल्या आहेत. त्यांना कर्मकांडापासून पूर्णत: तोडण्याचा हेका धरला तर स्त्रीवादी चळवळी आणि सर्वसामान्य स्त्रिया यांच्यातली दरी कधीच भरून निघणार नाही. प्रस्तुत समाजव्यवस्थेतच समानतेचा आग्रह धरण्य़ाच्या उद्देशाने, स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मंदिरप्रवेशासाठी याचिका दाखल करून समंजस मार्ग निवडला. धर्म नाकारून आततायी क्रांती करण्य़ापेक्षा धर्मातील कालबाह्य रूढींना फाटा देऊन हळूहळू बदल घडवणे अधिक व्यवहार्य आहे हा विचार या निमित्त्याने रूजतो आहे.

तरीही ’आत्ताच बरे यांना हे सुचले’ असा सवाल केला जातो आहे. याची सुरूवात नेमक्या कोणत्या घटनेने झाली ते आठवून पाहा, एक मुलगी चुकून चौथर्‍यावर गेली तर तो चौथरा गोमूत्राने ’शुद्ध’ करण्यात आला, याला स्त्रियांनी अपमान समजायचा नाही का? ज्या स्त्रियांना स्वेच्छॆने नियम पाळायचेत त्यांनी पाळावे, परंतु स्त्री प्रवेशाने ती जागा अपवित्र होते या अंधश्रद्धेला आव्हान द्यायचे की नाही? मग सावित्रीबाई, जिजाऊंची जयंती-पुण्य़तिथी साजरी करायची कशाला? कर्वे ,फुले, आगरकरांचा वारसा सांगायचा, तो कशाला? ’बरं, मिळाली ना एकदाची परवानगी, मग आता जाणार आहेत का या ’दांभिक’ बायका रोज दर्शनाला?’ असा प्रश्न विचारणार्‍यांना हे ’प्रतीकात्मक’ दर्शन होते हे कळायला हवे. स्त्रियांना देवाजवळ प्रवेश हवा आहे तो फक्त धार्मिक भावनेपोटी नाही. दलित हिंदूंना प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह आठवा. त्यांनी सांगितले होते ’आम्हाला देवाचे दर्शन घेऊन काहीही पुण्य कमवायचे नाही, परंतु ’प्रवेशबंदी’ हा अपमान आहे, कलंक आहे, तो आम्हाला पुसायचा आहे’.

सध्या विरोधकांमधे प्रत्येक घटनेचा दोष मोदींना देण्याची आणि मोदी समर्थकांनी सगळ्य़ाचे खापर गेल्या ६० वर्षाच्या अकार्यक्षमतेवर फोडण्य़ाची स्पर्धा सुरू आहे. अशा काही मंडळींना हे विरोधकांचे राजकीय कारस्थान वाटते. या बायकांना प्यादे म्हणून वापरून फडणीस सरकारविरूद्ध केलेलं षडयंत्र वाटते. तसे असेल तर उलट हे पुरोगामी बदल फडणीस सरकारच्या पथ्यावरच पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सकारात्मक कौल दिला होता. विरोध केला तर प्रतिगामी ठरू या भीतीने का होईना ,या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे निर्णय फडणीस सरकारच्या कार्यकाळात झाल्याने उलट त्या सरकारला याचे श्रेय जाते आहे. थोडक्यात विरोधकांनी सरकारच्या शिरपेचात आयता तुरा खोवून दिल्याबद्दल समर्थकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. आंदोलनकर्त्या स्त्रियांचा हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, असा काहींचा आक्षेप आहे. आंदोलनकर्त्या संघटनेतील फूट आणि दर्शनाला सर्वात आधी पोचायची चढाओढ बघता यात तथ्य असावे. परंतु ’२४ तास काय बरे दाखवावे’ या चिंतेत असल्याने देसाई यांच्या प्रत्येक शब्दाला ’मथळा’ बनवणार्‍या माध्यमांची ही देण आहे. अर्थात ही प्रसिद्धी देसाईंना पूनम पांडे छाप सवंग पद्धतीने फुकटात मिळालेली नाही. या बदल्यात धमक्यांचे फोन, शारिरीक मारहाण आणि मानसिक दडपणाचा ’आहेर’ त्यांना समाजाने दिला आहे. शिवाय ’आपण काय जेवलो, आत्ता काय करतोय’ हे जगाला सतत सांगून प्रसिद्धीचा खटाटोप करण्य़ाच्या फेसबुकी जमान्यात समाजात काही सकारात्मक बदल घडवून प्रसिद्धी मिळवणे केव्हाही श्रेयस्कर!

या बायकांवर बहुतेक जणांचा आरोप आहे असा आहे की, ’ मंदीर प्रवेशाचा हट्ट कशाला? स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्य़ासाठी छळ अशा शंभर समस्या आहेत, त्या सोडवा ना आधी’ हातात कधीही बॅट न धरलेली मंडळी ’धोनीचे’ काय चुकले यावर तावातावाने चर्चा करतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आपण स्वत:लाच विचारावं, १०० तल्या एका तरी प्रश्नाला या महिलांनी हात घातला. आपण यातल्या किती प्रश्नांना भिडलो? आयुष्यात एका तरी ध्येयासाठी आपण असा जिगरबाज लढा दिला आहे काय? नसेल तर हरकत नाही, आपलं रोजचं काम नीट करणं सुद्धा कमी महत्वाचं नाही पण जे त्या पलीकडे काही करू पाहतात त्यांच्यावर किमान विखारी टीका करून आपण त्यांचं खच्चीकरण करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांशी संबंधित तमाम समस्यांच्या मुळाशी ’स्त्री दुय्यम आणि अपवित्र आहे’ ही घट्ट बसलेली भावना आहे, ती आपापल्या बुद्धी आणि कुवतीनुसार उखाडण्य़ाचा प्रयत्न तरी करण्य़ाचे धाडस या महिलांनी दाखवले आहे. वर्षानुवर्षे बंद असलेली दारे किलकिली करण्य़ाचा प्रयत्न केला तर ती करकर वाजणारच पण त्याशिवाय नवे मार्ग चोखाळता येत नाहीत. आपण अशा धडपडींना, अडखळत्या पावलांना समजून घ्यायला हवे. बदल पचवून पुढे जायला हवे, हेच खर्‍या प्रगत आणि प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. तेव्हा मंदिर अथवा गाभारा अथवा दर्गा प्रवेश हे अंतिम ध्येय नाही हे देसाईंनी समजून घ्यावे. त्याचबरोबर आपण देखील हा आत्मपरिक्षणाच्या मार्गावरचा केवळ एक टप्पा मानायला हवा.

हे खरय की हा हक्क झगडून मिळवल्याने आजच्या स्त्रियांच्या दैनंदिन जगण्यात फारसा (टीकाकारांच्या मते ’कवडीचा’) दर्शनी फरक पडलेला नाही. परंतु आत्मसन्मानाच्या भानाचा दिवा असाच अंतरी पेटता राहिला तर त्या प्रकाशात निदान पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या पाऊलवाटा निश्चित उजळून निघतील.

Sunday, April 17, 2016

विराट विचार


http://epaperdivyamarathi.bhaskar.com/akola/354/17042016/0/1/ published in Divya Marathi

  नुकताच क्रिकेट २०-२० विश्वचषक २०१६ सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीपर्यंतच पोचू शकला मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. क्रिकेटप्रेमी भारतीयांना तेव्हा आनंदाचे उधाण आले होते आणि त्या भावनांना सर्वांनी सोशल मिडीयावर वाट करून दिली. कथित प्रेमप्रकरणामुळे विराटबद्दलच्या संदेशांमधे अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले. एका मर्यादेपर्यंत गंमत म्हणून हे ठीक होते. परंतु अनेक संदेशांमधे सभ्य विनोदाची पातळी ओलांडली गेली. अश्लाघ्य पद्धतीने टीकाटीप्पणी केली गेली तेव्हा मात्र ही परिस्थिती विराटने अतिशय खंबीरपणे हाताळली. या अतिरेकामुळे उद्विग्न होउनही त्यांने खणखणीत शब्दात सुशिक्षितांना त्यांच्या वाढत्या ‘सवंग’पणाची जाणीव करून दिली. ‘‘माझ्या खेळातील गुण-दोषांनंतर अनुष्काला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या लोकांची मला कीव कराविशी वाटते. अशा व्यक्ती जर स्वत:ला सुशिक्षित समजत असतील तर ही शरमेची बाब आहे.’’असे त्याने सुनावले. अनुष्काशी त्याचे ‘ब्रेक-अप’ झाले की नाही ही खाजगी बाब चघळणार्‍यांना चपराक देत कोहली म्हणाला, "तिने मला कायम प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनच दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी टीकेचे लक्ष्य करत असेल तर ते कसे वाटेल, याचा एकदा विचार करा’’

ज्या सोशल मिडीयातून विराट-अनुष्का वर कॉमेंट्स झाल्या त्याच सोशल मिडीयाचा वापर करून विराटने सर्वांना भानावर आणले. याची प्रशंसनीय परिणीती म्हणजे भारतीय संघ वेस्ट इंडीजविरूद्धचा सामना हरल्यानंतर विराट-अनुष्कासंबंधात एकही पोस्ट आली नाही. आपल्या परिचयातील सहकारी किंवा नातलग स्त्रिया, मैत्रिणी यांची आपल्यामुळे अकारण बदनामी होत असेल तर त्यांची प्रतिष्ठा कशी जपावी याचा धडाच यानिमित्त्याने विराटने घालून दिला. विराट एक उत्तम खेळाडू आहेच पण तो विचारांनीही उमदा आहे हे त्याने त्याच्या सडेतोड वक्तव्याने आणि नेमक्या कृतीने दाखवून दिले आहे. आजचे तरूण विराटला आदर्श (आयडॉल) मानत असतील तर त्यांनी फक्त त्याच्या खेळाचे, केशरचनेचे किंवा त्याच्या हातांवरील टॅटूचे अनुकरण न करता त्याच्या विचारांचे आणि वर्तनाचे अनुकरणही करायला हवे.

हल्ली ’व्हायोरिझम’ म्हणजेच ’दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात डोकावायचे आणि त्यातून विकृत आनंद मिळवायचा’ ही वृत्ती वाढत चालली आहे. विकृतीच्या टोकाला न जाता कमी अधिक प्रमाणात ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात असते, पण त्यावर मात करणे आणि सामाजिक संकेत जपणे यालाच आपण सुसंस्कृतपणा म्हणतो. दुर्दैवाने सोशल मिडीयासारखे हत्यार मिळाल्याने ही दडपलेली भावना अजूनच वर येऊ लागली आहे. याच व्हायोरिझम चा वापर करून ’बिग बॉस’ सारख्या कार्यक्रमांचे उखळ पांढरे होते कारण आपल्या मनोरंजनाच्या कल्पना सवंग होऊ लागल्या आहेत. समाजधुरीणांसह प्रत्येक संवेदनशील व्यक्तींने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्य पुरूषांनाही याचे चटके बसू लागले आहेत. परंतु याचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे महिलांविषयक वाढते सायबर गुन्हे. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाला यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण यांची मी मुलाखत घेतली होती. त्यांनी खंत व्यक्त केली की सायबर सेल, ’दृष्टी’ सारखे अ‍ॅप, ’जागर तरूणाईचा’ यासारखे उपक्रम असे पर्याय देऊनही मुली-महिला तक्रार करायला पुढे येत नाही. मुळात गुन्हे कमी होण्य़ासाठी ,झालेच तर दाद मागण्य़ासाठी आणि समाजभान जागे करण्यासाठी मुलींना त्यांच्या परिचित सहकारी-नातलग पुरूष, महाविद्यालयीन मित्रांकडून विराटसारखी भक्कम साथ मिळायला हवी. तसे घडले तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.

Saturday, March 19, 2016

कारागृहातील साहित्य

’शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाये’

संत कबीर यांचा हा सुरेख दोहा. अनुभूतीतून उमटणारं सच्चेपण मांडणारा. प्रतिभा जर प्रखर अनुभवाच्या मुशीतून गेली तर त्यातून निर्माण होणारं साहित्य अधिक तावून सुलाखून अविष्कृत होतं हे सांगणारा. कारागृहासारख्या विपरीत पार्श्वभूमीचा विचार केला तर अशा परिस्थितीत होणारी साहित्यनिर्मिती अस्सल असते. लेखकाच्या वैचारिक प्रकृतीनुसार वेगवेगळी असली तरी ती जीवनाला थेटपणे भिडते. बोथस या सहाव्या शतकातील रोमन तत्त्ववेत्त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. त्या तुरूंगवासात लिहीलेलं ’कॉन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी’ हे कारागृहातलं पहिलं महत्वपूर्ण लेखन मानलं जातं. कारागृहातलं साहित्य( प्रिझन लिटरेचर) या विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक गेल्या जानेवारीत प्रकाशित झालं. कधी मृत्युच्या काळ्या छायेमधे तर कधी सश्रम यातना सहन करत तुरूंगवास भोगणार्‍या विख्यात व्यक्तीं यात व्यक्त झाल्या आहेत. यात सामाजिक मान्यता आणि मतांतरे यावरचं ऑस्कर वाईल्ड आणि जॉन बन्यान यांचं लेखन आहे, मादाम रोलंड तसेच अ‍ॅन फ्रँक यांचं बखरवजा लेखन आहे, जीन कॉसोचं हुकूमशाहीविरोधातील कवन आहे, प्रायमो लिव्हाईचं हत्याकांडाच्या सामाजिक परिणामांवरचं लिखाण आहे, ओ हेन्रीच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, एखाद्या रम्य स्थळी-घरी-किंवा अभ्यासिकेत बसून लिहीणे आणि कारागृहात सजा भोगत असताना लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या अतिशय निकट असतात, ते साहित्य गांभीर्याची डूब असलेलं आणि वास्तवाशी निगडीत असतं, हे यातलं समान सूत्र आहे.

हे सूत्र वैश्विक असलं तरी प्रस्तुत लेखात फक्त निवडक भारतीय लेखकांच्या कारागृहातील साहित्याचा विचार केला गेला आहे. भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी अतिशय दर्जेदार, उत्तम साहित्यिक मूल्य असलेलं आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेलं आहे. कारावासातल्या एकांतात स्वत:ला एकाकी वाटू न देता, निराश न होता तो वेळ मनन, चिंतन आणि लेखनाला देण्य़ाला या मंडळींनी प्राधान्य दिले, ते केवळ या सर्व व्यक्ती असामान्य होत्या म्हणूनच. स्वातंत्र्योत्तर काळातल्या कारागृहातील साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी ही त्यापेक्षा वेगळी होती आणि आहे. देशांतर्गत समस्यांमधून निर्माण झालेली अस्वस्थता त्या लेखनामधून जाणवते.

कारागृह म्हणजे प्रतिकूलतेचा कहर. अशा स्थितीत महाकाव्याची रचना महाकवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. लालित्यपूर्ण पण ओजस्वी शब्दरचना, भावनांची उत्कटता, प्रासादिकता त्यांच्या साहित्यकृतींमधे नेहमीच आढळते पण त्याहीपलीकडे जाऊन सावरकरांची लेखणी मनाचा ठाव घेते ती तर्कशुद्धपणे मांडलेले स्पष्ट विचार आणि  खणखणीत अभिव्यक्तीमुळे. ’तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण’ इतका दिव्य समर्पण भाव मातृभूमीप्रती व्यक्त करणार्‍या सावरकरांना ब्रिटिश सरकारने दोन जन्मठेपेची म्हणजे तब्बल पन्नास वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावून अंदमानच्या काळ कोठडीत डांबले. इथल्या अमानुष छळाला कंटाळून कित्येक कैदी आत्महत्या करीत किंवा विकल स्थितीत मरणाची याचना करत. सावरकरांना आठ बाय सहाच्या खोलीत डांबलेले होते. इतक्या विदारक स्थितीतही त्यांच्या प्रतिभेला काव्य स्फुरे. ’कमला’ आणि ’गोमंतक’ या महाकाव्यांची निर्मिती इथेच झाली. मृत्यूच्या दाढेत असूनही विजीगिषु वृत्तीने महाकाव्य लिहिणारे सावरकर हे जगातले एकमेव उदाहरण असावे. सावरकरांना काव्य सुचले तेव्हा त्यांनी जणू आभाळाला "माझा कागद होशील काय?' असे विचारले असणार अशी कल्पना करून लोककवी मनमोहन यांनी
"आभाळ म्हणाले ’नाही’ भूमीही म्हणाली ’नाही'।
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही"
अशी बोलकी कविता लिहीली आहे.
’कमला’ या काव्यसंग्रहातील
’अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची’
यासारख्या ओळीतून त्यांचा तेजस्वी ’राष्ट्रवाद’ प्रत्ययाला येतो.
अंदमानातली त्यांची शिक्षा दहा वर्षानंतर काहीशी शिथील झाली. लेखन साहित्य मिळू लागले. अंदमानातच सावरकरांनी उर्दू भाषेत गझलाही लिहिल्या होत्या, तब्बल 80 वर्षांनंतर या गझलांची त्यांच्याच अक्षरातली वही मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकाला मिळाली. अंदमानच्या तुरुंगातले लेखनिक प्यारेलाल यांच्याकडे सावरकरांनी ही वही दिली होती. या गझलेत आनंद आहे, विषाद आहे पण निराशा नाही. काळ्या पाण्याची शिक्षा हे देशसेवेकडे जाणारे , भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी उचललेले पहिले पाऊल अशा भावभावनांचा समुच्चय म्हणजे या गझला. जगाच्या अंतिम दिवशी देखील मी उच्चरवाने हेच सांगत असेन की मी हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थान माझा आहे, असं सांगणारी सावरकरांची प्रतिभा आपल्याला विस्मयचकित करून जाते. ते लिहीतात
’यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयां मेरा,
मै बंदा हिंदवाला हूँ, या हिंदोस्तां मेरा पहले।’

सावरकरांच्या जाज्वल्य देशाभिमानाच्या, कडव्या राष्ट्रवादी भूमिकेच्या तुलनेत विनोबा भावे वेगळे, ’सब भूमी गोपालकी’ या विचारधारेचे प्रणेते. वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलेंलं लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक, भावनात्मक फरक नाही. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार बदलली नाही, ती कायम मॄदु होती. तरीही विनोबा म्हणत, तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.
विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. परंतु ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ’ईशावास्य वृत्ती' हे पुस्तक लिहीलं. हे पुस्तक म्हणजे ’जगावं कसं’ याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. ’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.
ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात डांबले गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली. सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तिने ती टिपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना या सार्‍यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात होती. गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर ’गीताई माझी माऊली... मी तिचा बाळ नेणता, पडता रडता... घेई उचलुनि कडेवरी’. अर्थात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा, या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

’गीता’ हाच प्राण असलेल्या विनोबांच्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरूंगवासात असताना लिहीलेल्या ’गीतारहस्या’तून गीतेचे वेगळेच पैलू समोर येतात. याचे कारण विनोबा आणि टिळक यांची वैचारिक बैठक भिन्न होती. टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता तर गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पित रूपक. मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा टिळकांच्या ’गीतारहस्य’ ग्रंथाचा गाभा आहे. यात गीतेचा महाभारताशी असलेला संबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहेच त्याशिवाय गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण विवेचन स्वरूपात केलेले आहे.
बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांची तुलना अशा अनेक विषयांवर यात लोकमान्यांनी विद्वत्तापूर्ण भाष्य केले आहे. टिळकांचा झंझावाती कार्यकाळ बघता तुरूंगवासामुळेच हा भव्य लेखनप्रकल्प पूर्ण होणे शक्य झाले असावे. त्याअर्थी ही इष्टापत्ती म्हणता येईल.

किंग्जफोर्ड या न्यायाधिशाने बंगालच्या फाळणीला विरोध करणार्‍या तरुणांना फटक्यांची शिक्षा सुनावली होती; साहजिकच या काळातले टिळकांचे अग्रलेख अधिकच जहाल होत गेले. न्यायमूर्ती दावर यांनी २२ जुलै १९0८ रोजी टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात पोचेतो त्यांची सक्तमजुरीची शिक्षा एका ठरावाने रद्द होऊन साध्या कैदेची केली गेली, हा त्यातल्या त्यात दिलासा. मंडाले आणि काही काळ मेकटिलाच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ आणि ‘गीतारहस्य’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. हिंदू धर्माचा इतिहास, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, प्रांतिक कारभार, हिंदू कायदा, शिवाजी महाराजांचे चरित्र अशा अनेक विषयांवर लिहीण्य़ाचा त्यांचा मानस होता. परंतु कैद साधी असली तरी हा तुरूंग किती भयानक होता त्याचा अनुभव त्यांच्यानंतर पाच वर्षांनी त्याच कारागृहात गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांना आला. मंडालेची हवा इतकी खराब असताना एवढे बौद्धिक श्रम करणे लोकमान्यांसारख्या एखाद्या ज्ञानयोग्यालाच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. लोकमान्यांनी परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हे जागतिक संदर्भ देऊन सिद्ध करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला जागवेल आणि शमवेल अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते त्यामुळेच हा ग्रंथ इतका सरस सिद्ध झाला. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी एकंदर सामाजिक परिस्थिती बघता आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची तितकीच आवश्यकता आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंच्या कारागृहातील लेखनाचा पिंड मात्र अध्यात्मिक किंवा धार्मिक चिंतनाचा नव्हता. ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात त्यांना विशेष रूचि होती. सुरूवातीला ब्रिटीशांच्या कलाकलाने घेऊन आपल्या मागण्या रेटून धरणार्‍या कॉंग्रेसने १९३२ मधे नेहरूंच्या नेतॄत्वाखाली खणखणीतपणे पूर्ण स्वराज्याची मागणी करून स्वतंत्रपणे झेंडा फडकावला. ब्रिटीशांनी यावर दडपशाहीचे तंत्र अवलंबले आणि नेहरूंची रवानगी तुरूंगात झाली. त्याआधी नेहरू नुकताच युरोप दौरा करून आले होते. सुमेरियन, युरोपियन संस्कृतीची निरीक्षणे आणि इतिहासाच्या दांडग्या अभ्यासातून नैनी व डेहराडून येथील तुरूंगात असताना विश्लेषकाच्या भूमिकेतून त्यांचं ’Glimpses over world history' हे जगाच्या इतिहासाचं ओझरतं दर्शन घडवणारं पुस्तक साकार झालं. हे पुस्तक त्यांनी त्यांच्या मुलीला, इंदिरा गांधींना उद्देशून लिहीलेल्या पत्रांच्या स्वरूपात आहे. प्राचीन भारतीय इतिहास किती समृद्ध होता याची जाणीव तोवर फक्त अभ्यासकांपुरती मर्यादित होती. या पुस्तकाच्या निमित्त्याने त्याचं दर्शन जगाला घडवता आलं.

याच तुरूंगवासातल्या पुढच्या काळात त्यांनी ’ Towards freedom' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहीलं. हे पुस्तक त्यांनी पत्नी कमला नेहरूंना अर्पण केलं आहे. पूर्ण स्वराज्याच्या मागणीची पार्श्वभूमी या शीर्षकामागे होती. नेहरूंची वैयक्तिक आणि कॉंग्रेसची एकूणच जडणघडण कशी होत गेली, नेहरूंवर असलेला गांधीजींचा प्रभाव आणि वेगळेपण, त्यांना टिळक तसेच ना. गोखले यांच्याबद्दल असलेलं वैचारिक आकर्षण अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यांनी यात केला आहे. नेहरूंची विचारपद्धती समजून घेण्य़ासाठी अभ्यासकांना हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. या तुरूंगातल्या सुटकेबरोबरच हे पुस्तक विराम घेतं. १९४२ च्या ’चले जाव’ चळवळीतील सहभागामुळे नेहरूंवर कडक कारवाई होऊन त्यांना अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. या सलग चार वर्षाच्या तुरूंगवासात नेहरूंनी पुढे अतिशय गाजलेले ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहीले. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा आलेख यात मांडलेला आहे. यात प्राचीन, मध्ययुगीन काळापासून ते १९४५ पर्यंतचा भारताचा इतिहास सामावलेला आहे. प्रचंड आवाका असलेल्या या ग्रंथलेखनासाठी मौलाना आझाद तसेच गोविंद वल्लभ पंत यांची नेहरूंना मोलाची मदत झाली. याशिवाय 'bunch of old letters' हे एस.गोपालन यांनी संपादित केलेलं, पं. नेहरूंच्या कारागृहातून लिहीलेल्या विवीध पत्रांचं संकलन हे देखील नेहरूंचं कारावासातलं लेखन म्हणता येईल. नेहरूंचे एरवीचे काहीसे राजेशाही पद्धतीचे ऐटबाज जीवन आणि ब्रिटीशांकडून त्यांना जहाल क्रांतीकारकांच्या तुलनेत मिळणार्‍या सवलती यामुळे त्यांना बंदिवासात लेखन करणं सहजसाध्य होतं असं मानलं जातं. परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीनंतर ब्रिटीशांचा प्रचंड रोष त्यांना पत्करावा लागला, शिवाय त्यांची पुस्तक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर थेट भाष्य करणारी असल्याने ब्रिटीश सरकारची करडी नजर आणि सहकार्यात अनेक अडचणी यावर मात करतच नेहरूंना आपलं लेखन पूर्ण करावं लागलं.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या महानुभावांच्या कारावासातल्या लेखनाने समाजाला जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणार्‍या आशयगर्भ साहित्याची अपूर्व भेट दिली.

कारावासाचा अर्थ फक्त गजामागचं कोंडलेलं जीवन इतकाच न घेता लेखन स्वातंत्र्यावरील बंधन, वैचारिक मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्तीविरोध असा घेतला तर १९७५ मधील आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यकृतींना देखील कारागृहातील लेखन म्हणता येईल. आणीबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारे महत्त्वाचे लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेल्या अवस्थेतील एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर बाळ आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते बाळ निसटून खाली पडतं. क्षणभर तिचा चेहरा वेदनेने पिळवटतो आणि परत निर्विकार होतो. संवेदना गोठलेल्या त्या आईला जीवाच्या आकांताने ते बाळ उचलून घ्यावंसं वाटत नाही. युद्धामुळे किंवा टोकाच्या सामाजिक परिस्थितीत कशी बधिरता येते असं दिग्दर्शकाने यातून दाखवलं. हर्डीकर म्हणतात की आपल्या लेखकांनी तर अनुभवाची धग सोसण्याआधीच आविष्कार स्वातंत्र्याचं, मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं.
शासकीय दबावतंत्राला तळपत्या शब्दात विरोध करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांची आणीबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटेखानी पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यात दुर्गाबाईंनी एरवी विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे तेंडुलकरांसारखे साहित्यिक सार्वत्रिक बंदी आल्यावर मूग गिळून गप्प का बसले, असा खडा सवाल केला आहे. याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेल्या बंधनांना ठाम विरोध करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’

महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी जोडले गेलेले, साठीच्या दशकात मराठी अनियतकालिकांमध्ये कवितालेखन करणारे एक महत्त्वाचे कवी तुळसी परब. त्यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता म्हटल्या जातात. प्रेम आणि मृत्यु सारख्या जाणिवांवर असलेला सामाजिक आणि राजकीय अंकुश यातून दिसून येतो. बंदिवासातील दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. आणीबाणीविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या पुन:स्थापनेकरता संघर्ष करताना कारावास भोगणार्‍या अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या आठवणी, तसेच कारावासातील नोंदी स्फुट स्वरूपात ठिकठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. या संकलित स्वरूपात प्रसिद्ध झाल्यास या विषयाचा आणखी एक लुप्त पैलू उजागर होईल.
या उलट स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर जे साहित्यिक पुरस्कारांसाठी, अनुदान किंवा शिष्यवृत्तींसाठी लांगूलचालन करत शासनकर्त्यांना रूचेल पचेल अशीच साहित्यनिर्मिती करत आले त्यांनी मात्र आपले साहित्य स्वह्स्ते कारावासात डांबले असेच म्हणायला हवे.

आजही कारावासातल्या अनुभवांवर किंवा प्रत्यक्ष कारावासात साहित्यनिर्मिती होते आहे. अर्थात आज तुरूंगात डांबले जाणारे कैदी हे बहुतांशी गुन्हेगार किंवा आरोपी असतात, ती पूर्वीसारखी राजकीय नजरकैद नाही आणि त्या बंदिवासामागे पूर्वीसारखे उदात्त ध्येय नाही. साहजिकच उन्नत आंतरिक प्रेरणेतून, वैचारिक मंथनातून साकार झालेल्या तत्कालिन साहित्याची आणि आजच्या तुरूंगवासात केलेल्या लेखनाच्या गुणवत्तेची तुलना होऊ शकत नाही. आज जागतिकीकरणाने जगण्य़ाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. तत्कालिन साहित्यातून विस्तारत गेलेला मानवतेचा विशाल पट संकोचत जाऊन विश्वमानवाचा प्रवास ’मी’ वर येऊन स्थिरावल्याचे चित्र दिसते आहे. या सार्‍या छटांचा परिणाम साहित्याच्या दर्जावर होत गेलेला दिसून येतो.

 क्षणिक रागाच्या भरात ज्यांच्या हातून विघातक कृती घडली आणि कैद वाट्याला आली अशा कित्येकांनी कालांतराने पश्चातापदग्ध मनस्थितीत कवितेतून भावनांना वाट करून दिली. त्या कवितांना प्रस्थापित साहित्यिक परिमाणात मोजता येणार नाही. अशा कवितांचे संकलन म्हणजे उत्तम कांबळे यांनी संपादित केलेला ’गजाआडच्या कविता' हा काव्यसंग्रह. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरीत कायम करण्य़ाचं आमिष दाखवून शिक्षण संस्थेच्या चालकानं एका होतकरू तरूणाला पाच वर्ष फुकट राबवून घेतलं, वर डोनेशन या गोंडस शब्दाआड लाच घेतली आणि नंतर त्याच्या तोंडाला पाने पुसली. पुरावा नसल्याने पैसाही परत मिळेना तेव्हा संतप्त मनोवस्थेत या तरूणाने संस्थाचालकाचा खून केला. अशा घटना कवितेत कुठं कुठं झिरपताना दिसतात. मूल्यांना पायदळी तुडवून व्यवस्था पुढे जात असेल तर गुन्ह्यांकडे वळणारी पावले ही त्याची अपरिहार्यता तर नाही! ही सारी तगमग, असहाय्यता, उद्रेक सारं काही या कवितांमधून डॊकावतं. मराठीच नव्हे, तर अन्य भाषांतही असा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही. तुरुंगातले सगळेच कैदी दोषी असतात असं नाही. ""मी जेव्हा तुरुंग महा निरीक्षकपदाची सूत्रं स्वीकारली, तेव्हा ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत असे ६५ टक्के कैदी तुरुंगात होते, त्यांच्या खटल्यांचा निकाल लागायचा होता,‘‘ असं उद्धव कांबळे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितलं आहे. कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या, किंवा खटला प्रलंबित झाल्याने अंधारलेलं आयुष्य जगणार्‍या अशा कित्येकांच्या काळजातल्या संवेदनशीलतेवर त्यांच्या कवितेने कवडसा पाडला आहे.

अस्तित्वाच्या प्रयोजनाचा शोध आणि त्यातून होणारा माणूसपणाचा बोध हे सत्र साहित्यात निरंतर सुरू राहील. कारागृहातल्या एकांतवासामुळे घडणारे आत्मपरिक्षण आणि गजाआडच्या जगातले अनोखे अनुभव यामुळे या शोधाला एक सत्यनिष्ठ आणि अधिक गहिरा आयाम लाभतो हे निर्विवाद.


(पूर्वप्रसिद्धी -तरुण भारत विशेषांक)
पं.नेहरुंच्या लेखनाबाबत चर्चा- संदर्भ- अभ्यासक श्री. राज कुलकर्णी