Friday, October 16, 2015

जनरेशन गॅप -वाचन


’वाचनाने मला काय दिले’ या विषयावर खास पालकांसाठी आयोजित एका निबंध स्पर्धेचे परिक्षण करण्याची मला संधी मिळाली. सगळ्या निबंधांमधे एक समान धागा होता तो म्हणजे आजची पिढी पुस्तकांशिवाय ’घडते’ (!) आहे याबद्दलची खंत आणि अस्वस्थता. कवी गुलजार हीच खंत व्यक्त करताना म्हणतात..
 "जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का
अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है
वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी,
लेकिन .....
किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "
एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय.

यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. हे खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही. पुस्तकातल्या माहितीचा ज्ञानात आणि ज्ञानाचा ’शहाणीवेत’ हळूहळू रूपांतरित होत जाणारा सुंदर प्रवास, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली अनुभवता येत नाही. आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. त्यात दोन धोके आहेत, मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. यावर जर पालक नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरले तर या माध्यमांच्या मदतीने कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो.

 आजीआजोबांनी मुलांना गोष्टी सांगण्याची प्रथा विभक्त कुटुंबांबरोबर कमी होत गेली आहे. एकत्र कुटुंबांमधेही आजीआजोबांना आता टीव्ही मालिका पाहायच्या असतात. ज्या आजीआजोबांना आजही नातवंडाच्या बौद्धिक विकासासाठी काही करावसं वाटतं त्यांच्यात आणि नातवंडांमधे तंत्रज्ञानाच्या मार्‍यामुळे खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आपोआप येणारे वाक्प्रचार, म्हणी, जुने शब्द याला नातवंड मुकतायत. शब्दकोडी सोडवणं, वर्डगेम्स अशा प्रयोगातून शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर त्या शब्दातून उमटणार्‍या चित्रांवर, गीतांवर, निसर्गावर, पर्यावरणावर प्रेम करायला मुलं आपोआप शिकतील. मात्र त्यांच्या बालसुलभ कुतुहलाला आपण संवादातून प्रोत्साहन द्यायला हवं.

 परंतु आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलांशी बोलायचं केव्हा! ती सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात. या संदर्भात जेनेल हॉफमन या अमेरिकन आईचं उदाहरण वाचनात आलं. मुलाला तिने मोबाईल बरोबर एक १८ कलमी नियमावली दिली. मुलांनी फोन कसा, किती, कुठे, का वापरावा याची ती जणू आचारसंहिताच होती. अशी काळजी घेतली मोबाइलच्या अतिरेकी वापरामुळे पुढे उद्भवणारे प्रश्न आधीच निकाली निघून त्याचा सकारात्मक वापर होण्याच्या शक्यता वाढतील. मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांच्या तंत्रप्रेमाचा उपयोग करून त्यांना ई-बुक्स, ऑडीओ बुक्स ची ओळख करून द्यायला हवी. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. awesomelibrary.org ह्या साईटवर इंग्रजी तर मराठी आणि हिंदीत हा खजिना उपलब्ध आहे arvindguptatoys.com या साईटवर. भारतीय पात्र असणा-या कथांसाठी pitara.com ही साईट उत्तम आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवर http://www.britishcouncil.org/kids हा वाचनिय आणि माहितीपूर्ण बालविभाग आहे. (संदर्भ:पालकनीती) पण हे सगळं घडून यायचं असेल तर पालकांनी आधी स्वत: तंत्रज्ञानाशी मैत्री करायला हवी. तंत्रज्ञान आणि मुलं ही जोडी फोडणं आता अवघड आहे पण पालकांना त्यांच्यामधला दुवा म्हणून काम करणं प्रयत्नांती शक्य आहे. डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफीक सारख्या वाहिन्यांवरचे साहित्यातही न सापडणार्‍या अनेक विषयांवरचे दर्जेदार माहितीपट मुलांसह पालकांनी आवर्जून बघावेत. वाचनापासून दुरावलेल्या मुलांच्या वैचारिक कक्षा रूंदावण्याचे इतर पर्याय शोधणे आता भाग आहे. ’आमचा मुलगा अजिबात वाचत नाही हो’ अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं की ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी त्यांना एक महिन्याने पुन्हा बोलावले आणि मग त्या मुलाला गोड खाणे बंद कर असे समजावून सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की हे तुम्ही तेव्हाच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली आणि मग त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला". मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी पालकांनी स्वत:ला विचारावं, आपलं वाचन whatsapp च्या मेसेजेस पुरतं मर्यादित आहे, पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! घरातील वातावरण वाचनाला पोषक असेल तर मुलं आपोआप पुस्तकांकडे वळतील. मात्र त्यातूनही ती वाचत नसतील तर किमान त्यांना वर्तमानपत्रातल्या ठळक बातम्या वाचायचा आग्रह करायला हवा. ते ही होत नसेल तर आपण त्यांना त्यातल्या महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, त्यावर मुलांसमोर सोप्या भाषेत चर्चा करू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो.

 आईने मुलाला झोपवताना गोधडी पांघरली काय आणि ब्लॅंकेट पांघरलं काय, खरी उब त्या पांघरूणापेक्षाही तिच्या स्पर्शात असते. मुलांच्या वाचनाच्या प्रश्नाकडे, वाचनाच्या बदलत्या माध्यमांकडे आता आपण याच दृष्टीने पाहायला हवं. जगातलं उत्तमोत्तम साहित्य डिजीटल स्वरूपात उपलब्ध होऊ लागलं आहे. भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा पुस्तक वाचनाचा खरा हेतू तर निखळ आनंद हा त्याचा आणखी एक फायदा. छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक सारखं डिजीटल माध्यम (अर्थात अतिरेक टाळून) त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो मुलांपर्यंत पोचला म्हणजे झालं. -

Friday, October 2, 2015

भारतीय सौंदर्याला ओहोटी ??


तुम्हाला आदिती आर्या कोण हे माहीत आहे? तिने या वर्षीचा मिस इंडीय़ा किताब पटकावला आहे. बरं, गेल्या वर्षीची विजेती ,कोयल राणा आठवत असेल. ती ही नाही? तुम्हाला ऐश्वर्या, सुश्मिता, प्रियांका, लारा मात्र अजूनही लगेच आठवतात. लकाकते मुकुट घातलेले त्यांचे रूपवान चेहरे, त्यांचे निकाल ऐकून विस्फारलेले चमकदार डोळे आजही तुमच्या नजरेसमोर आहेत, मग या आजच्या सुंदरी तुम्हाला का आठवत नाहीत? कारण सोपं आहे, या आजच्या मुली फक्त भारतसुंदरी आहेत, त्या जगतसुंदरी किंवा विश्वसुंदरी होऊ शकलेल्या नाहीत. ९० च्या दशकानंतर कुणीही भारतीय सुंदरी विश्वसुंदरी ठरलेली नाही.

अचानक असे काय झाले की जागतिक पातळीवर पोचलेल्या भारतीय सौंदर्याला पार ओहोटी लागली? कारण सोपे आहे, ते जागतिकीकरणाचे दशक होते. भारतातील नव्या मध्यमवर्गाचे रूपांतर ग्राहकामधे करण्याचा, या स्पर्धांचे प्रायोजक म्हणून मिरवणार्‍य़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मनसुबा या सहस्त्रकाच्या आगमनापावेतो सफल झाला.

आज भारतात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंतरच्या सुधारणांतून तयार झालेल्या या मध्यमवर्गाची लोकसंख्या सुमारे 30 कोटीहून अधिक आहे. सौंदर्याचे अभारतीय मापदंड स्वीकारून त्यानुसार आधुनिक(!) जीवनशैली घडवण्य़ाची अहमहमिका तेव्हा पासूनच मध्यमवर्गात लागली. जागतिकीकरणामुळे निम्नमध्यमवर्गाचीही राहणी बदलू लागली. त्या विशिष्ट जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या तमाम उत्पादनांच्या खपात प्रचंड वाढ झाली. एसटी चा जेथे थांबा देखील नाही अशा दुर्गम खेड्य़ातही शाम्पूचे पाऊच, कोकाकोला सहज पोचू लागले. सौंदर्याची ही अद्भुत दुनिया सिनेमा, टीव्ही आणि सोशल नेटवर्क वरील वेगवेगळ्या जाहिराती व कार्यक्रमांच्या माध्यमातून, चकचकीत चित्रणाच्या मदतीने दररोज आपल्या समोर अवतरते आहे. त्यामुळे ९० च्या दशकात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हेतुपुरस्सर घडवलेला भारत नावाचा ’बाजार’ एव्हाना स्थिरावलाच नाही तर वेगाने वाढतो आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला एकदा अशा उत्पादनांची चटक लावल्यानंतर या सार्‍या घातचक्राचे केंद्र असलेल्या जागतिक सौंदर्यस्पर्धांच्या विजेतेपदावर भारतीय नावे कोरण्यातले बहुराष्ट्रीय कंपन्यांचे स्वारस्य संपले असेल तर यात नवल काय!

१९३४ मध्ये डी मिले ने दिग्दर्शित केलेला ‘क्लिओपात्रा’ हा सिनेमा व त्याच्या निर्मितीची कथा यादृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे. त्यात कलेचा भागही होता पण अमेरिकन उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती हा अंतस्थ हेतू होता. जबरदस्त जाहिरातीमुळे या चित्रपटाने जगभरात जोरदार धंदा केला. मुख्य भूमिकेतली क्लाउडेटी कोलबर्ट ही अमेरिकन अभिनेत्री युरोपियन प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. मूळ युरोपियन संस्कृतीत अमेरिकन उत्पादनांविषयीचे आकर्षण रूजले. चित्रपट संस्थांशी जोडलेल्या साखळी-दुकानांतून पिनांपासून कपड्य़ांपर्यंत अनेक ’क्लिओपात्रा उत्पादने’ विक्रीस आली. लक्स साबणापासून ओल्ड गोल्ड सिगारेट पर्यंत अनेक कंपन्यांशी व्यावसायिक संधान बांधले गेले. (संदर्भ: मेरी हमर) कपडे किंवा वस्तूच नव्हे तर दृष्टिकोन, विचार, मूल्ये, श्रध्दा सगळ्यांचेच अमेरिकीकरण करण्याची ताकद हॉलिवूडच्या चित्रप्रदर्शनात होती आणि आहे. ९० च्या दशकात हीच क्लॄप्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय मानसिकतेला व राहणीला बदलवण्य़ासाठी सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून वापरली.

तसे पाहता भारतीय स्त्री विश्वसुंदरी होण्यात गैर काय, असे मनात येते. (प्रख्यात वृत्तपत्रांनी सुद्धा त्या यशाचे वार्तांकन ’world's envy, India's pride' असे केले होते). त्यासाठी या स्पर्धांची परिणीती लक्षात घ्यायला हवी. प्राचीन काळी मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी माहिती आढळते. यूरोपमध्ये ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे कलाकार, कवी, बुद्धिवंत, आणि सेनापती असत. (संदर्भ- विश्वकोश) १९५४ मध्ये ‘मिस् अमेरिका’ ही सौंदर्यस्पर्धा तेथील दूरचित्र-वाणीवर प्रसारित झाली आणि मग हे लोण जगभर पसरत गेले. जागतिकीकरणानंतर एकाएकी या स्पर्धा भारतीय सुंदरी जिंकू लागल्या, मग निदान यातून भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान वगैरे बदलले का! नाही. नव्वदच्या दशकानंतर तमाम मध्यम -उच्चमध्यमवर्गीय पालकांना आपली मुलगी जागतिक व्यासपीठावर चमकत असल्याची दिवास्वप्ने मात्र पडू लागली होती. असे निरिक्षण संतोष देसाई हे जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ नोंदवतात.

म्हणायला या स्पर्धांमधे बुद्धीचातुर्याचा समावेश होता परंतु प्रत्यक्षात स्त्रीने कसे दिसावे, बोलावे, चालावे, बसावे किंवा वावरावे याचे निकष यातून ठरू लागले. या बिरूदांमधे भारतीयत्वाचा सन्मान नव्हताच उलट आंतरराष्ट्रीय मानका नुसार चेहरा-३० टक्के, बांधा-२० टक्के, चाल-२० टक्के, व्यक्तिमत्व-२० टक्के आणि हजरजबाबीपणा-१० टक्के अशी चक्क विभागणी करून सौंदर्यवती(!) घडवण्य़ासाठी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. बाईची कचकड्याची बाहुली झाली, पण हे इथेच थांबले नाही.

कार्ल मार्क्सच्या उक्तीनुसार, उत्पादनं आणि देवाणघेवाणीची इतकी प्रचंड साधनं तयार केली गेली आहेत की आता त्याची परिस्थिती एका गोष्टीतल्या जादूगारासारखी झाली आहे. त्याने जगावर राज्य करण्य़ासाठी आपल्या जादूटोण्याने इतकी भुतं निर्माण केली की त्यांच्यावर ताबा ठेवण्याला आता त्याची स्वत:ची शक्ती अपुरी पडू लागली आहे. या साधनांच्या धुंदीमधे सौंदर्याचे सारे संदर्भ बदलू लागले. भारतीय स्त्री सौंदर्य किंवा शरीरसौष्ठवाच्या व्याख्या राजा रविवर्मा किंवा दीनानाथ दलालांच्या चित्रांमधे अडकून पडणं शक्य नव्हतं, त्या कालानुरूप नैसर्गिकपणॆ बदलत गेल्या असत्या. मात्र सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून पाश्चात्य जगाने त्यांच्या व्याख्या भारतीयांवर लादल्या आहेत. भारतीय सिनेअभिनेत्रीच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियादेखील त्या व्याख्येला अनुरूप होण्य़ासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. भारतीय आहारशास्त्राला अव्हेरणारे ’झीरो फिगरचे’ खूळ त्यातूनच निर्माण झाले. कुपोषित मॉडेल्सच्या फौजा रॅम्पवर चालू लागल्या. यातून झालेली रोजगारनिर्मिती काही अंशी फायद्याची मानली तरी या ग्लॅमरजगातली स्पर्धा आणि त्यातून जगाला स्त्री शोषणाचा मिळालेला नवा मार्ग हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ग्लॅमरचे वेड आणि दिखाऊपणाच्या नादात आजची तरूणाई सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात आणि स्वप्रतिमेत गुरफटत गेली आहे. जगण्य़ातली साधी सोपी मूल्य झाकोळून गेली. सौंदर्यस्पर्धा किंवा फॅशन शोकरिता अनेक मॉडेल बोटॉक्स उपचार करून घेत. पण आता मात्र लहान मोठ्या समारंभाला जाण्यासाठी केवळ तीन-चार माहिनेच परिणाम टिकणार्‍या अशा उपचारांना तरुणी प्राधान्य देत आहेत. मानसोपचारतजज्ज्ञ म्हणतात, त्याच्या अतिवापराने चेहरा निर्विकार होतो. कित्येकदा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसतात, तसे झाल्यास ती तरुणी नैराश्याने ग्रासली जाण्याचीही शक्यता असते. सध्या भारतात चरबी काढण्य़ासाठी होणार्‍या लिपोसक्शन शस्त्रक्रियेला जास्त मागणी आहे. याचा खर्च दोन लाखांपर्यंत असतो. पुरूषही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत स्त्रियांच्या जगणय़ाभोवती असलेल्या कृत्रिमतेच्या विळख्यात पुरूषही सापडले आहेत.

गोर्‍या रंगाचे आकर्षण भारतात ब्रिटीश राजवटीपासून रूजले, जेत्यांचा रंग आपल्यालाही लाभावा यासाठीच्या आकांताला सौंदर्यस्पर्धांमधल्या विजेत्या युवतींनी जाहिरातींमधून खतपाणी घातले.  ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपयांवर वर होता ,तो दरवर्षी १८ % इतक्या वेगाने वाढतो आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन अशा जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने मात्र ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे.’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची प्रचारकर्ती नंदिता दास म्हणते, आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या. आपण सुंदर, आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी  ही साधी सहज मानवी भावना आहे. त्यात काहीही गैर नाही पण ही भावना आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपल्या मनांमधे कधी डोकावणार की नाही !

तुलनेने इतर देश आता या संदर्भात बदलू लागले आहेत. नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी दोन वषापूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. पुरूषसत्ताक समाजाने निर्माण केलेली ही स्पर्धा आहे या भावनेतून आजच्या सुविद्य मुली यापासून काहीशा दूर राहायला लागल्या आहेत. मिस ग्रेट ब्रिटन साठी गेल्या वर्षी फक्त एका भारतीय वंशाच्या मुलीची प्रवेशिका आली होती. तरूणाईने दर्जेदार व्यक्तिमत्व स्पर्धा जरूर गाजवाव्यात परंतु तथाकथित सौंदर्याच्या छोट्य़ा आणि कोत्या व्याख्यांपलीकडे जाऊन स्वत:ची रेघ मोठी करावी. संस्कॄतीतल्या उत्तम मूल्यांशी तडजोड न करता आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्य़ाचे आव्हान पेलायला हवे. भारतीय स्त्रीने खुज्या आणि तकलादू स्पर्धांच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या आंतरिक सौंदर्याची मोहोर जगावर उमटवता येईल इतकी उंची गाठायला हवी.

('दिव्य मराठी' मध्ये कॅन्व्हास पानावर प्रसिद्ध झालेला लेख )

Sunday, September 6, 2015

विनोबांचं कारागृहातलं साहित्य

(पोर्ट ब्लेअर- अंदमान येथे ५-६ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनातील ’कारागृहातील साहित्य’ या परिसंवादातील माझा सहभाग - त्यात मी विनोबांच्या कारागृहातील साहित्यावर मांडलेले विचार. विनोबांच्या पुस्तकांशिवाय काही संदर्भांसाठी vinobabhave.org)

या परिसंवादाचा विषय ऐकल्यावर मनात येतं कारागृहातलं साहित्य किंवा प्रिझन लिटरेचर याचं नेमकं वेगळेपण काय ? याच विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक या जानेवारीत प्रकाशित झालं. यात तिने अ‍ॅन फ्रॅंक, ओ हेन्री, ऑस्कर वाईल्ड यासारख्या लेखकांच्या कारगृहातील साहित्याचा परामर्श घेतला आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, तळ्याकाठी-घरी-कार्यालयात बसून लिहीणे आणि कारागृहात लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची चर्चा तिने या पुस्तकात केली आहे. बहुतेक प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या जास्त जवळ असतात, हे यातलं समान सूत्र आहे.

vinoba bhave साठी इमेज परिणाम
(photo : google- not for commercial purpose)

भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी उत्तम लेखन केलेलं आहे त्याचा धांडोळा इतर वक्ते घेतीलच. परंतु वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलें लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक भावनात्मक फरक नाही असं मला वाटतं. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार निर्मम, बोचरी नव्हती, कायम मॄदु होती. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. तरीही विनोबा म्हणत , तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.

विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. मुळात सर्वात आधी गीतेनेच तीन वर्णांच्या बंदिवासात अडकलेलं वेदोपनिषदातील ज्ञान मानवजातीला खुलं केलं. तरीही संस्कृत भाषेचा अडसर होताच. १२ व्या शतकात प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून माऊलीने तोही दूर केला. ज्ञान समाजाच्या केवळ एका घटकापुरते सीमित न राहता, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सूत्र विनोबांनी आचरणात आणले, आणि भाषक भिन्नतेमुळॆ अवरूद्ध झालेली ज्ञानगंगा विनोबांनी मराठीत आणली, ती देखील इतक्या ममत्वाने की गीतेची गीताई झाली. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. गीताईचं लेखन हे वर्ध्याच्या महिलाश्रमात ऑक्टोबर १९३० ते फेब्रुवारी १९३१ या कालावधीत झालेलं आहे. मग त्यांच कारागृहातलं लेखन नेमकं कोणतं! झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ईशावास्य वृत्ती हे पुस्तक लिहीलं. शिवणीच्या कारागृहात त्यांनी स्थितप्रज्ञ लक्षणांवर व्याख्यानं दिली. ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अद्भुत अशी प्रवचनं दिली ही दोन्ही प्रवचनं पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. अर्थात गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार, पहिले सत्याग्रही, अहिंसा आणि मानवतावादाचे पुरस्कर्ते म्हणून भारतीयांच्या आदराला पात्र झालेल्या विनोबांच्या इतर साहित्याला मात्र गीताई इतका सन्मान लाभला नाही. मुळात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा. या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

आज पांडूरंगाच्या ओढीने पंढरीला निघालेली एखादी सात्विक वारी सोडली तर सभोवताली दिसतो तो फक्त अध्यात्माचा तमाशा. अमकेतमके बुवा- बापू, राधे माँ सारखे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू पाहून जाणवतं की अध्यात्म ही उन्नत मनोवस्था वगैरे राहिली नसून एक बाजारशरण उत्पादन झालेलं आहे. भंपक उच्चभ्रू अध्यात्मवाद्यांची ’असा मी असामी’ मधे उडवलेली रेवडी आठवून आजही गंमत वाटते. त्यातली ती who are you, who is he, he is the who of the you in the eye of the he अशी अनाकलनीय प्रवचनं आणि आजचे बाबांचे दरबार यात काही फरक नाही. जगण्य़ातल्या प्रश्नांची उत्तरं या थोतांडात नाही हे माझ्यासारख्या सामान्य पण विज्ञानवादी व्यक्तीला कळतं, ही उत्तरं वेद उपनिषदात गीतेत दडली आहेत हे नक्की, पण ती सोप्या भाषेत समाजावून सांगणार तरी कोण, याचं खणखणीत उत्तर म्हणजे विनोबा.

दोन मित्र होते. एक इतिहासप्रेमी तर दुसरे संतसाहित्याचे अभ्यासक. दोघांचा व्यासंग दांडगा. इतिहासकार म्हणाले मी इतिहासावर व्याख्यानं देत जाईन, तुम्ही संतसाहित्याचं निरूपण करा, आपण दौरे करून उभा महाराष्ट्र हलवून टाकू. दुसरे मित्र हसून म्हणाले," तुमचं ठीक आहे हो, राणा प्रताप च्या शौर्याचं वर्णन करताना तुम्हाला स्वत:ला तलवार चालवता येत नसली तरी चालतं. ज्ञानेश्वरीतला अमृताचा डोह जनतेला दाखवायचा तर आधी माझ्या जगण्यात, माझ्य प्रत्येक कृतीत त्याचे थेंब तरी असायला हवेत ना!", आणि हेच विनोबांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या साहित्यात आणि जगण्यात एकवाक्यता होती.

त्यांनी नागपूरच्या कारागृहात असताना लिहीलेलं ईशावास्य वृत्ती हे पुस्तक म्हणजे जगावं कसं याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी शेष पूर्णच राहतं या शांतिमंत्राचा ते किती सोपा दाखला या पुस्तकात देतात पाहा. कुंभार मातीचा घडा बनवतो, मुळात तो घडा त्या मातीतच लपलेला असतो. चित्तशुद्धी म्हणजे काय हे सांगताना विनोबा अधिक सोपी उपमा देतात. ते म्हणतात पानकोबीला जशी पानांची एकावर एक अनेक आवरणे असतात तसे मनावरचे एक एक थर भेदत आत जाता आले तरच आत्मदर्शन होईल. यातले ९ ते ११ हे मंत्र बुद्धीच्या शुद्धीबद्दल आहेत. अविद्या आणि विद्या यातला फरक समजावून सांगणारे. आजच्या भाषेत prospective learning आणि cognitive learning. दोघी असल्या तरच आत्मविकास, एकेकट्य़ा असल्या तर! तर विनोबा म्हणतात मग अविद्या बरी, एकटी विद्या म्हणजे अहंकाराला जागा जास्त. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं.

’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.या परिसंवादाच्या निमित्त्याने पुन्हा हे पुस्तक चाळत असताना माझ्या मुलाने स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ विचारला. त्याचं वय बघता मी त्याला ,तटस्थ असा अर्थ सांगितला. त्यावर तो म्हणाला, म्हणजे आत्ता पुरस्कारावरून जो वाद झाला त्यात त्या कुणा कर्त्या माणसाने घेतलेली भूमिका म्हणजे स्थितप्रज्ञ का ! स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. या पुस्तकात विनोबा म्हणतात ,बुद्धी तीन प्रकारच्या असतात. सांख्यबुद्धी- जीवनाचं ज्ञान, मग योगबुद्धी- जीवनाची कला आणि तिसरी स्थिरबुद्धी. मात्र माझ्या बालबुद्धीला हे कळले नव्हते की जगातल्या रूप रस गंधाचा आनंद लुटायचा सोडून अलिप्त का आणि कसं राहायचं या सार्‍य़ापासून! त्याचं उत्तर विनोबा देतात, ते ही माऊलींचा दृष्टांत देऊन, ’आपणचि विऊनी दुहिता...न मम म्हणे पिता.’ विनोबा इंद्रियदमन करा असं म्हणतच नाहीत. ते इंद्रीयनिग्रहाबद्दल बोलतात. गुजराथीत एक म्हण आहे, माणसनी परिक्षा ..खाटले न पाट्ले. कितीही संतुलित माणूस असला तरी जेवण आणि आजार हे दोन प्रसंग असे आहेत ज्यात आतला खरा माणूस बाहेर येतो. तेव्हा इद्रियनिग्रह कसा, तर संकटसमयी कासव कवचाखाली अंग चोरून घेतं तसा.
घेइ ओढूनि संपूर्ण विषया तील इंद्रिये,
जैसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली
एकूण विनोबांच्या साहित्याचा आत्मा आणि त्यांचा श्वास सुद्धा गीताच आहे. एकेश्वरवाद्यांनाही ज्ञान देण्य़ाचं सामर्थ्य असलेली, वैश्विक तत्त्वज्ञान कवेत घेणारी गीता विनोबांचा प्राण आहे

धुळयाच्या कारागृहात असताना विनोबांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली आणि सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तीने ती टीपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'साठी आणि एक आणा विनोबांच्या कार्यासाठी.' हे भाग्य किती लेखकांना लाभते? याचं कारण उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना त्यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात आणि गीतेत होती.
गीतेमध्ये केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक मार्गदर्शन आहे अशी त्यांची श्रद्धा. गीतेच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत गेल्याने अपार शांती मिळते असा त्यांना अनुभव येत गेला. म्हणून सर्वसामान्य जनतेची निष्ठा गीतेवर स्थिर व्हावी हाच त्यांच्या साहित्यकृतींचा हेतू होता.
गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर
’गीताई माझी माऊली मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनि कडेवरी’. 

गीतारहस्याचं विवेचन ऐकल्यावर लक्षात येतं की टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता. तर विनोबा म्हणत, तर्काला छाटून श्रद्धा आणि प्रयोगाचे पंख लावून मी गीतेच्या अस्मानात भरार्‍या मारत असतो. विनोबांचं तब्बल १४ भाषांवर प्रभुत्व होते. कुराण मुळातून नीट समजावे म्हणून ते थेट अरबी भाषा शिकले, बायबल मधले कोणते वचन कितव्या पानावर आहे हे ही त्यांना मुखोद्गत होते मग गीतेचा त्यांचा व्यासंग किती प्रगाढ असेल! परंतु ते म्हणत ज्या तात्विक चर्चेचा जीवनाशी संबंध नाही, त्याचा उहापोह माझ्या गीताप्रवचनात नाही. ज्यातून श्रमिकाला सांत्वना मिळते, थांबलेल्याला प्रेरणा मिळते तीच माझी गीताई. टिळकांच्या मते गीता हा कर्मयोगावर आधारित युद्धोपदेश होता तर विनोबांनी गीता ही भगवंताची उक्ती आहे हा शंकराचार्यांचा दृष्टीकोन स्वीकारला होता. गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पितरूपक आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर धृतराष्ट्र जेव्हा संजयला विचारतो,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ||
गीताई मधला याचा सहज अनुवाद
त्या पवित्र कुरु-क्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे ..युद्धार्थ जमले तेव्हां वर्तलें काय संजया ||
आणि यावर विनोबांची प्रवचनातली सुरेख टिप्पणी -
मानवी शरीरातच एक सनातन- देवासुर्-संग्राम चालल्याचे उपनिषदात वर्णन आहे. तामसी कर्मासक्त कौरव म्हणजे आपली आसुरी वृत्ती आणि  प्रज्ञावान पांडव म्हणजे आपली सात्त्विक बुद्धी असे ह्या युद्धाचे गीतेत दुहेरी स्वरुप आहे.

गीतेचं सार आकळल्यानेच कदाचित चंबळ खोर्‍यातल्या ११ डाकूंचं हृदयपरिवर्तन करणयाची किमया विनोबा करू शकले. गीतेच्या प्रेरणेमुळेच विनोबांचा वैयक्तिक मोक्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक मोक्षाशी समव्याप्त झाला होता असं ग.प्र.प्रधान नोंदवून ठेवतात. त्यांच्या भूदान, ग्रामदान, सर्वोदय या सार्‍य़ा योजनांच्या मुळाशी गीतेतून उपजलेलं मानवजातीचं कल्याण हीच निखळ भावना होती. अर्थात विनोबांच्या काही मर्यादा होत्या. even homer nods, होमर लाही कधीतरी डुलकी येते या उक्तीप्रमाणे त्यांनी आणीबाणीच्या काळ्या पर्वाचा उल्लेख अनुशासन पर्व असा केला. ज्या पुलंनी विनोबांवर ’एक शून्य मी’ पुस्तकात स्तुतीपर लेख लिहीला त्यांनीच मग उद्वेगाने ’आम्ही सूक्ष्मात जातो’ हे विडंबनही लिहीलं. आजही नायपॉल सारखे लेखक विनोबांना भाबडे ठरवतात, १३ वर्ष भारत पालथा घालून मिळवलेल्या भूदानात काहींनी नापिक जमीन देऊन केलेली फसवणूक किंवा जमिनीचे वाटप करताना आलेल्या त्रुटी या सार्‍य़ामुळॆ ते रॅशनॅलिझम पासून दूर असल्याचा आरोपही केला गेला. ’सब भूमी गोपालकी’ मानणार्‍य़ा या आकाशपुत्राला साध्या संसारी माणसांचे संयुक्त महाराष्ट्रासारखे प्रश्न निरर्थक वाटले त्यामुळे अत्र्यांनीही विनोबांवर टीका केली. विनोबांची गीताई हेच सांगते की एक परमेश्वर सोडून कुणीही निर्दोष नाही. मानवी जीवन विणलं गेलं आहे ते अशा काळ्या पांढर्‍या तंतूंनी.
एक मात्र खरं की गीता उपदेशात ज्या सत्यनिष्ठेचा आग्रह धरला गेला आहे त्याबाबतीत विनोबांचे विरोधक देखील विनोबांपुढॆ नम्र होतात. सर्वात मी आहे, माझ्यात सर्व आहेत, मग सत्य लपवायचे ते कुणापासून इतकी त्यांची सत्यनिष्ठा प्रखर आणि स्पष्ट होती.

आजच्या कॉर्पोरेट युगात डॆल कार्नेगी-रॉबीन शर्मा सारखे मॅनेजमेंट गुरू माणसं कशी हाताळावीत याच्या टिप्स देतात. उच्च पदावरील अधिकार्‍य़ांना nervous break down होऊ नयेत म्हणून SQ म्हणजेच spiritual quotient कसा वाढवावा याचं हल्ली विशेष प्रशिक्षण दिलं जातं. खर तर जीवनशास्त्र शिकवणार्‍य़ा विनोबांच्या साहित्यात हे सगळं सुगमपणे मांडलेलं आहे. सततच्या नापिकीने बेजार होऊन आत्महत्येच्या टोकाला पोचलेला एखादा शेतकरी असो , सेल्फीच्या आत्मप्रेमात बुडून सैरभैर झालेला एखादा मध्यमवर्गीय असो, सतत यशस्वी होण्य़ाच्या दडपणाने नैराश्यग्रस्त झालेला  एखादा आयटी इंजिनीयर असो.. या सार्‍य़ांना कवेत घेऊन, त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजावून सांगण्य़ाची ताकद मातृहॄद्यी विनोबांच्या गीतेवर आधारलेल्या साहित्यात आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानेच विश्वकल्याण साधता येईल आणि साहित्य हे त्या दोघांना जोडणारं सूत्र आहे, ही या आधुनिक संताची भूमिका होती. या विश्वमानवाबद्दल कवी वसंत बापटांनी किती चपखल लिहिलंय..

सूर्यवीर्य शशिशांती, भ्रांती वार्‍याची भिनली अंगी
समिधेपरि वरि शुष्क असुनि, अंतरंग नित रसरंगी
नित्य नव्या यज्ञाचे दीक्षित, विस्मरला अपसव्य तुम्ही
मातीहुनि तुम्ही माती असुनि हिमालयाहुनि भव्य तुम्ही