Monday, October 1, 2018

हयवदन


परवा एक व्हिडिओ पाहिला. आईचा मृत्यु झाला आहे. नवजात बाळ रडतं आहे. त्याला शांत करण्य़ाचा बरेच जण प्रयत्न करतात पण बाळाचं आक्रंदन सुरुच आहे. इतक्यात एक पुरुष त्या बाळाला छातीशी धरतो आणि बाळ हळूहळू रडायचं थांबतं. खाली ओळ लिहुन येते की मरणापूर्वी बाळाच्या आईचं हृदय काढून त्याचं प्रत्यारोपण या पुरुषाच्या शरीरात करण्य़ात आलं आहे. मग प्रश्न आला की त्या आईची किंवा कोणत्याही माणसाची ओळख म्हणजे त्याचं हृदय/मन की मेंदू/बुद्धी ? बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ओळखले असं म्हणावं तर बाळाला ही उमज त्याच्या मेंदूतल्या सूचनांमधूनच आली. हा व्हिडिऒ पाहून नुकतच पुन्हा वाचनात आलेलं ’हयवदन’ आठवलं कारण मेंदू (बुद्धी/विचार) सर्वात श्रेष्ठ आणि तीच माणसाची ओळख हेच हे नाटक सांगतं.

हे समजावं म्हणून यात वापरली गेलेली शरीर आणि मस्तक अदलाबदलीची कल्पना भन्नाट. ही कल्पना थॉमस मॅनच्या ’द ट्रान्स्पोज्ड हेड्स’ वरुन घेतल्याचे लेखक गिरिश कर्नाड यांनी स्वत:च स्पष्ट केलंय. देवीला झोप येणं, मेलेली माणसं जिवंत होणं, बाहुल्यांनी चर्चा करणं हे सगळं अनाकलनीय वाटतं पण हे अर्थातच रुपक आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यात किंवा पुराणात अशा घटनांचा संदर्भ असलेल्या अनेक कथा आहेत. अगदी इसापनीती, वेताळ पंचविशीमध्ये, कितीतरी लोककथांमध्ये सुद्धा असं घडतं. चिरंतन प्रश्न मांडणार्‍या या बोधकथेमध्ये अशा मिथकांचा वापर केल्याने भारतीय परंपरेतली प्रतीकं नवनाट्याशी जोडण्याचा कर्नाडांचा प्रयोग वेगळा ठरतो. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा झाली असावी.

नाटकाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे? अपूर्णतेचा शाप घेऊनच आपण जन्मतो. त्यावर मात करुन पूर्णत्वाचा धरलेला अंतहीन ध्यास म्हणजेच आपलं जगणं. या नाटकातल्या पद्मिनीला दोन्ही पुरूष आकर्षित करतात. एकाच्या रुपवान शरीरावर तर दुसर्‍याच्या तेजस्वी बुद्धीवर ती भाळते. मस्तक आणि धड यांची अदलाबदल झाल्यावर तर तिला देवदत्तची बुद्धी आणि कपिलचं देखणं शरीर असा पूर्ण पुरुष लाभतो. परंतु आता कपिलचं शरीर देवदत्तच्या बुद्धीनुसार वर्तन करतं, त्याचा कणखरपणा, चपळाई, क्षमता कमी होऊ लागतात. थोडक्यात अपूर्णत्व कायम राहतं. काहीही मिळालं,तरी काहीतरी ’मिसिंग’ असतंच. अगदी ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच. हा अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलनं आणि कूटप्रश्न या नाटकात फार छान मांडले आहेत. मन आणि बुद्धीमधला अंतर्विरोध हा मुद्दा केवळ भारतीयांशी संबंधित नाही तर जागतिक आहे त्यामुळे या थिमवर लोकनाट्याचा बाज घेऊन सादर होणारं आणि नेपथ्य प्रकाशयोजनेचे अनोखे प्रयोग करणारं हे नाटक भारताबाहेर सुद्धा गाजलंय.

नाटक वाचलं, पाहिलं, समजून घेतलं तरी शेवटी प्रश्न उरतो की हे द्वंद्व आणि पूर्णत्वाचा शोध कधी संपणार की नाही. याचं उत्तर ईशावास्योपनिषदातल्या ’ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!’ या ओळीतच आहे. परंतु अपूर्णत्वातलं पूर्णत्व समजणं सोपं आहे, सापडणं कठीण. 

Friday, September 14, 2018

रुपाच्या अरुपाचा शोध


"श्रावणातल्या निम्म्या दिवशी आई देवाला गोडाचा नैवेद्य करीत असे.
पण शुक्रवारच्या सकाळी पुरणाचा वास उदबत्तीच्या वासात एकजीव गुंफून गेल्यासारखा घरभर पसरे.
ताम्हनात आई पुरणाचा लहानसा उंडा ठेवे. बोटांनी मऊ कालवून अंगठ्याने चार खळगे केले कि त्यात तुपाची धार पडे. त्यात फुलवाती भिजल्या की पुरणाचे रूप उरत
नसे.....ते एक चार दिव्यांचे निरांजन होई.
आई आधी देवाला ओवाळी. देवावर अक्षता टाकी.
मग मला विचारी,," दिलीप, भोर कुठल्या दिशेला आले ? ''
मग त्या दिशेने ओवाळी. अक्षता टाकी.
आम्ही चारी भावंडे चार दिशांना पांगलो.
आई आज कऱ्हाडच्या घरात देवाजवळ नुसती बसलेली असेल. आणि हातात अक्षत घेऊन अजयला विचारत असेल.
पुणे कुठे आहे ?
अदितीचे अमेरिकेतील गाव कुठल्या दिशेला ?
मी मनाने आत्ता आईच्या शेजारी आहे. आणि श्रावणातला शुक्रवार जगतो आहे.."
माझे फेसबुक स्नेही दिलिप लिमये यांची ही पोस्ट गेल्या श्रावणातल्या शुक्रवारी वाचली आणि प्रकर्षाने जाणवलं, आजच्या रुक्ष, धावत्या जगात आपल्या आतला ओलावा, मनस्वास्थ्य शाबूत ठेवण्याचं आणि आध्यात्मिक समाधान देण्याचं सामर्थ्य या सणवार-व्रतवैकल्यांमध्ये आहे. त्यात आस्तिक्य ओघाने आलंच. हे सगळं नाकारुनही जगता येतंच परंतु अशी आयुष्य़ बघताना ’नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते’ हे सुनीताबाईंचं ’आहे मनोहर तरी’ मधलं वाक्य हमखास आठवतं.

अष्टांगयोगाप्रमाणे धर्माचेही दोन भाग मानले जातात. ’यम’ नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. उदा: सत्य, प्रेम, भूतदया इ. मूल्यं या भागात येतात. दुसरा भाग म्हणजे नियम. आपले नित्यवर्तन कसे असावे आणि कसे नसावे या विषयीचे संकेत. जे अर्थातच कालसुसंगत असायला हवे. परंतु आजचा समाज बहुतांशी दोन गटात विभागला गेलाय. एका गटाला नियम अपरिवर्तनीय वाटतात. आपल्या परंपरेतल्या प्रत्येक गोष्टीचा ते विज्ञानाशी बादरायण संबंध जोडतात. ’का’ असे न विचारता, आपल्या पूर्वजांनी सांगितलंय म्हणजे ते सरसकट बरोबरच असले पाहिजे याची त्यांना खात्री असते. तर दुसरा गट आपल्या संस्कृतीतलं सगळं काही वाईट, जुनाट, बुरसटलेलं आणि कालबाह्य आहे यावर ठाम असतो. इतर संस्कृतींशी तुलना करत आपण किती मागास याचे रडगाणॆ गाण्य़ात किंवा सांस्कृतिक प्रतीकांची खिल्ली उडवण्यात ते व्यग्र असतात. या दोन्ही गटांच्या कचाट्यात न सापडता आपण खुल्या मनाने या सगळ्य़ाचा विचार करतो का?

संगणकाच्या भाषेत सांगायचे तर आपले सणवार-व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचे ’front end' आहे आणि त्यामागची मूल्यबैठक, दृष्टीकोन हे ’backend'. एकसुरी जगण्याला यामुळे चैतन्य, अर्थ लाभतो. आनंद मिळतो. त्या त्या ऋतुनुसार साजरे केले जाणारे सणवार माणसाला निसर्गाशी जोडतात. ’मी’पणाच्या परीघातून बाहेर काढून समष्टी, सृष्टी अन् परमेष्टीशी नातं जोडायला शिकवतात. त्या त्या ऋतुनुसार रांधलेले नैवेद्य शारीरिक पोषणाबरोबरच रसास्वादाचा आनंद मिळवून देतात. विशीष्ट पद्धतीच्या रांगोळ्य़ा, मेंदी, कला जतन करतात. वृषभपूजन, उर्जादायी विघ्नहर्ता, समृद्धीचं प्रतीक असलेल्या गौरी, सृजनाचं प्रतीक असलेले नवरात्राचे घट घरोघरी मांगल्याला आवाहन करतात. चित्राहुती, गोग्रास, शिवामुठीचं, राशीचं धान्य नंतर पाखरांच्या, प्राणीमात्रांच्या मुखात जातं. महानगरातली कित्येक कुटुंब यासाठी मूळ गावी येतात. एकत्र आलेलं कुटुंब, नातलग यामुळे माणसं एकमेकांना भेटतात, बोलतात, जवळ येतात. आजच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाना याची अधिकच असोशी असते.

भुलाबाईचे, मंगळागौरीचे खेळ आणि गाणी तत्कालिन स्त्रीजीवनाचे, कौटुंबिक सुखदु:खांचे प्रतिबिंब दाखवतात. त्यातले अनेक संदर्भ कालबाह्य झाले असले,अनावश्यक वाटले तरी यातले सासूसुनेचे खटके आजही  तितकीच गंमत आणतात. वर्षातून केवळ दोनचारदा असे खेळ खेळल्याने व्यायाम होतो वगैरे भलावण न करता हे खेळ म्हणजे मानसिक आनंदाचे, प्रफुल्लतेचे सोपे स्त्रोत आहेत हे स्वीकारायला हरकत नसावी.  हल्ली हे खेळ सादर करणारी मंडळं बोलावली जातात. सांस्कृतिक परंपरांचे हे एक दृकश्राव्य दस्तावेजीकरण म्हणता येईल. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, दाराशी येणारे वासुदेव, पोतराज अशा लोकसंस्कृतीचा संस्कार तर आज दुर्मिळ झाला आहे परंतु ही उणीव घरोघरची व्रतवैकल्ये काही अंशी भरुन काढू शकतात. जेव्हा स्त्रीला उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, तिला बाहेर पडता यावं म्हणून सामुहिक व्रत-वैकल्याचे हे प्रयोग आले असावेत. आता वेगवेगळ्य़ा निमित्तानी बायकांना एकमेकींना भेटता येतं तरीही व्रतवैकल्याच्या निमित्तानी एकत्र येणं खास असतं. ठेवणीतली पारंपरिक वस्त्रं, दागिने वापरता येण्य़ाची ती छानशी संधी असते. हल्ली ज्या थीम पार्टी चालतात त्याचेच हे पारंपरिक रुप म्हणूया. हल्ली माध्यमांच्या प्रभावामुळे मधल्या काळात ’आऊटडेटेड’ होऊ लागलेले सणवार प्रकाशात आले आहेत. त्याला रोमँटिक छटा आल्याचेही दिसते आहे.

मात्र 'का' हा प्रश्न न विचारता केवळ परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून आजही केली जाणारी व्रते आणि सणवार त्यांच्या मूळ भूमिकेशी आणि बदलत्या काळाशी सुसंगत नसतील तर त्यातला तो भाग त्याज्य मानायला हवा. गाभा योग्य असेल तर तोच ठेवून पद्धत बदलायला हवी. उदा: शहरी भागातून संक्रांतीच्या,चैत्राच्या हळदीकुंकवाचं स्नेहमिलनात रुपांतर होऊ लागलं आहे.  ’सौभाग्यवती’ स्त्रियांसाठीच असलेल्या सोहळ्यांमध्ये सगळ्य़ा स्त्रिया सामावल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु निमशहरी, ग्रामीण भागात मात्र असे बदल फार संथगतीने होत आहेत. कौटुंबिक सौख्यासाठी मनोभावे ही व्रतवैकल्यं करणार्‍या स्त्रियांनाच जर यातून सौख्य  मिळत नसेल तर कुटुंब सुखी होईल तरी कसे. मग एखादीला या सार्‍याचा तिटकारा येत असेल तर आश्चर्य नाही. श्रद्धा ही सापेक्ष बाब आहे. एखाद्या स्त्रीला सवड नसेल, आवड नसेल तर तिच्यावर हे कुळाचार अजिबात लादले जाऊ नयेत. हौशी स्त्रियांनीही सुपरवुमन होण्याचा नाद सोडून आनंदाने झेपतील तेवढेच सणवार करावेत. मुळात हे सगळं स्त्रीनेच का करायचं तर ती कुटुंबसंस्थेचा कणा असते म्हणून. ती घराला घरपण देते म्हणून. ती सृजनाचे प्रतीक आहे म्हणून. पण पुरुषांना गृहसौख्यासाठी काहीच करण्याची गरज वाटू नये का? आयत्या पुरणपोळ्या खाण्यापलिकडे, सामान आणणे, सजावटीला मदत या स्वरुपात दिसू लागलेला पुरुषांचा सहभाग अजून वाढायला हवा. अपवाद वगळता, सणासुदीला चारी ठाव स्वैपाकासाठी बायका घरात राबतायत आणि पुरुष निवांत लोडाला टेकून गप्पा मारतायत ही असमान श्रमविभागणी वरुन साजर्‍या दिसणार्‍या सणवारांमागचे वास्तव आहे. पुरुषांची नवी पिढी याकडे कसे पाहते यावरच या परंपरांचे आणि कुटुंबसंस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

कर्त्या पुरुषांवरही अनेकदा अशा कार्याचा आर्थिक ताण येतो. अशा वेळी लोक काय म्हणतील म्हणून ऋण काढून सण करण्य़ाचा, अतिरेकी प्रदर्शनाचा हट्ट कशाला! एका गुरुंची लाडकी मांजर त्यांच्या प्रवचनात व्यत्यय आणित असे. त्यामुळे तिला पकडून बांधून ठेवून मगच ते प्रवचन करु लागले. पुढे गुरु आणि मांजर दोघेही राहिले नाहीत तरी कोणतेतरी मांजर पकडून आणून, बांधून मगच प्रवचन करण्य़ाची प्रथा शिष्यांनी सुरु ठेवली. आपल्या काही प्रथांचे असे तर होत नाहीये ना? एकूण आपल्या प्रथांकडे डोळसपणे पाहून मागच्या पिढीनेही ’आम्ही नव्हतो का करत, अमुक केल’च’ पाहिजे, तमुक झाल’च’ पाहिजे’ असे व्रतांचा उल्हास झाकोळुन टाकणारे, लेकीसुनांचा मानसिक तणाव आणि शारीरिक दमणूक वाढवणारे ’च’ सोडून दिले पाहिजेत.

खुलभर दुधाच्या गोष्टीत खोल अर्थ आहे पण बहुतेक व्रतांच्या कहाण्य़ांमधल्या आटपाट नगरातल्या आवडत्या- नावडत्या राण्या, वंध्यत्वाचे, पतीवियोगाचे शाप-उ:शाप, पुत्रप्राप्तीचे आशीर्वाद, वसा घेतल्याबरोबर होणार्‍या जादू या सगळयाचा आजच्या तंत्रयुगाशी काही तरी संबंध आहे का? यात स्त्रियांचा कोणता सन्मान आहे? या अतार्किक कहाण्य़ा टाळून फक्त मनोभावे पूजा केली तर ती पुरेशी नाही का! उपासाचं उदाहरण घेऊ. उपवास का करता याची खरी उत्तरं असतात - नाही केला तर सासूबाई चिडतात म्हणून, चक्क खिचडी आवडते म्हणून. ती केव्हाही खावी पण साबुदाणा, दाणे, बटाटे अधिक अ‍ॅसिडीटी म्हणजे उपास हे कोणते समीकरण! पचनसंस्थेला जराशी विश्रांती किंवा योग्य हलका आहार किंवा जे एरवी केल्यावाचून राहवत नाही ते टाळणं, संयम पाळणं हा सुद्धा उपवासच. करिअर करणार्‍या स्त्रियांना वेळेचा प्रश्न असतो. त्यांनी सोयीनुसार बदल करायला काहीच हरकत नाही. घरी कुमारिका जेवू घालायला सवड नसेल तर सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन त्या मुलींसाठी काही केले तरी हे व्रत सिद्धीस जाईलच ना! मैत्रिणीला जेवायला बोलावून श्रावणाचा शुक्रवार रविवारी करता येतो. त्या मैत्रिणीचं वैवाहिक स्टेटस इथे आड का यावं? नवर्‍याच्या अस्तित्वावरच स्त्रियांची आपसातली नाती अजूनही अवलंबून असावी का?

पूजेला हवीतच म्हणून दुसर्‍याकडची, विकत जरी आणली तरी, फुले तोडून, झाडे ओरबाडून लक्ष वाहण्याने काय साधेल माहीत नाही पण यात कितीतरी मानवी तास वाया जातील. मंगळागौरीच्या पूजेलाही पत्री वाहण्याची पद्धत आहे. नववधूने वृक्षवेलींची व त्यांच्या गुणधर्मांची ओळख करुन घेत पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. आता पत्री म्हणून बाजारु पाल्याचा ढीग वाहण्य़ाऐवजी मोजकी चार सुंदर फुलं, पानं पुरेशी नाहीत का?
पतीच्या दीर्घायुष्याची कामना मनातून प्रत्येक स्त्री करतेच पण सोयीच्या नावाखाली वडाची फांदी घरी आणून पूजा करणं हा व्रताचा कोणता प्रकार! स्वेच्छेने वडापाशी पूजेला जावंसं वाटलं तर जरुर जावं कारण पती, पत्नीनी वैयक्तिक स्तरावर परस्परांसाठी काय करावं, हा त्यांच्या आपसातील भाव-बंधाचा भाग आहे. पण हा मागासपणा वाटू नये म्हणून वडाखाली गेल्याने वर्षभराचा ऑक्सीजन मिळतो असले समर्थन मात्र करु नये. घरादाराची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या आजच्या आधुनिक सावित्रींना कर्मकांडापेक्षा किंवा त्याबरोबर व्रतामागचा भाव ओळखण्य़ाची गरज आहे.

यथाशक्ती पूजा करण्याबरोबरच किंवा त्याऐवजीही आपल्याला रुचेल अशा एखाद्या सामाजिक उपक्रमाशी, वैचारिक संस्थेशी जोडलं जाण्य़ाचं, व्रत हे एक निमित्त व्हावं. जातीपातीपलिकडे जाऊन त्यात सगळ्य़ा स्त्रियांना सामावून घेण्याचा प्रयत्न व्हावा. नवरात्रीला नवरंग वापरण्याच्या, मार्केटिंग फंड्य़ातून साकारलेल्या नव्या  प्रथासुद्धा  मूर्ख ठरवण्य़ापेक्षा ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांना तो घेऊ द्यावा. कौटुंबिक रहाटगाडग्यातून बदल, सख्यांसह धमाल हे या व्रतवैकल्यांमागचे आकर्षण असले, त्या निमित्त्याने नटणं-मुरडणं, साडी-दागिन्यात जीव रमवणं हाही आनंदाचाच भाग असला तरी त्यातच गुंतून न राहता वसा घ्यायला हवा नवं काही शिकण्य़ाचा, नवं काही वाचण्य़ाचा, नवं काही बघण्य़ाचा. गरज आहे ती जगणं सुंदर करणार्‍या आपल्या रिवाजांकडे नव्याने पाहण्याची, त्यातलं कालबाह्य ते बदलण्य़ाची आणि उत्तम ते मन:पूर्वक जतन करण्याची.

 ऋतुनुसार बदल करुन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणं, तनामनातला उत्साह वाढवणं, फुललेल्या निसर्गाकडे लक्ष जाणं, कृषीसंस्कृतीचा आदर होणं, अनेक हातांना काम मिळणं असे अनेक हेतू या रिवाजांमागे आहेत.पण सदाचरण, निरामय जीवन, मनन, चिंतन, संयम, क्रियाशीलता याचं महत्व अधोरेखित करणं हे त्यामागचं खरं उद्दिष्ट्य. ते साध्य होतं का? इतकी आदर्श माणसं आपण असतो का? नसतो. म्हणूनच स्वत:मध्ये डोकावून पाहण्य़ासाठी आवश्यक असलेली उसंत माणसाला देणं आणि त्यांना एकमेकांशी जोडणं हेच या व्रतवैकल्यांमागचं अंतिम प्रयोजन उरावं.

डीजेच्या गोंगाटात, थर लावण्य़ाच्या अहमहमिकेत, राजकारणाच्या, इव्हेंटच्या विळख्यात घुसमटू लागलेली आपली संस्कृती मन:शांती देणार्‍या व्रतवैकल्यांच्या सात्विक कवेत मोकळा श्वास घेऊ शकते. अखंड महत्वाकांक्षांनी धगधगलेलं अहंकारी अशांत मन आणि या सगळ्य़ाच्या पल्याड पोहचलेलं निवलेलं शांत मन यांच्या मधला प्रवास व्रतांमुळे सोपा होऊ शकतो. त्याचं मर्म समजून घेणं हाच आजच्या युगाचा नवधर्म ठरावा.

Tuesday, September 4, 2018

टेक केअर गुड नाईट



पाकीटमार स्वत:च गर्दीत ओरडतो ’खिसा पाकीट संभालो’, अनेकांचे हात नकळत पाकीट ठेवलेल्या खिशाकडे जातात. पाकीटमाराचं काम सोपं होतं. ’टेक केअर गुड नाईट’ बघताना वपुंचं हे वाक्य आठवलं. इंटरनेटवर यालाच फिशिंग म्हणतात. तुम्हाला तुमची माहिती विचारणार्‍या फसव्या मेल येतात. शहानिशा न करता तुम्ही त्यांना माहिती देता. खर्‍या जगात वावरताना अतिशय स्मार्ट असलेली माणसं सुद्धा याला बळी पडतात तिथे फारशी तंत्रमैत्री नसणार्‍या सर्वसाधारण लोकांबद्दल काय बोलावे. विद्या वॉक्सचं नवं गाणं, नेटफ्लिक्सच्या हिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेल्या कित्येक मुलींना इन्स्टा किंवा एकूणच सोशल मिडीयावर वावरताना, चॅट करताना, अनोळखी मित्रविनंती स्वीकारताना काय काळजी घ्यावी याची जाण नसते.
आपण याला डिजिटल धांदरटपणा म्हणूया. आता इंटरनेटवर रुळलेल्या लोकांनी सुद्धा सुरुवातीला कमीअधिक प्रमाणात तो केलेला असतो. याचे परिणाम किती भयावह असू शकतात हे सायबर गुन्हेगारीच्या बातम्यांद्वारे लोक पाहतात, वाचतात, ऐकतात, दुसर्‍या कानाने सोडून देतात. ’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचय,’ असं म्हणत, येतील त्या पोस्ट्स खात्री न करता फॉर्वर्ड करण्याचा परोपकार संतवृत्तीने सुरु ठेवतात.
’टेक केअर गुड नाईट’ या अशा मंडळींसह तुम्हा आम्हा सगळ्य़ांना भानावर आणणारा सिनेमा आहे.

सायबरयुगात बदलत चाललेल्या कौटुंबिक नातेसंबंधावरही तो सहज भाष्य करतो. पालकत्वाकडे बघण्याची नवी नजर देतो. हे नातेसंबंध केंद्रस्थानी ठेवायचे की ’डिजीटल साक्षरता फक्त पुरेशी नाही तर डिजिटल व्यवहारज्ञान असणं आवश्यक आहे’ हा संदेश द्यायचा याबाबत सिनेमा गोंधळलेला नाही. उलट ही दुपेडी रचना गुंतवून ठेवते. कोरड्य़ा वाटू शकणार्‍या तांत्रिक विषयाला भावनिक अस्तर देते. वेगवान आणि उत्कंठावर्धक घटनांमधून सायबर गुन्हेगाराचे सावज ठरलेल्या एका कुटुंबाची कहाणी उलगडत जाते. ताकदीचे कलाकार, बांधीव पटकथा आणि चांगली निर्मितीमूल्य असल्याने सिनेमा प्रेक्षणीय झाला आहे. यात कथेशी संबंध नसलेली गाणी गात बागडणारी पात्रे नाहीत, आयटम सॉंग किंवा कोणताही मसाला नाही, बर्‍याच सस्पेन्स थ्रिलर सिनेमांमध्ये असतं तसं अंगावर येणारं संगीत नाही. सर्व स्तरातल्या प्रेक्षकांना सहज समजेल अशी तंत्रभाषा, खुसखुशीत संवाद आणि योग्य कास्टींगमुळे सिनेमा रंजक झाला आहे. झकास संवादफेकीमुळे इन्स्पेक्टर पवारच्या भूमिकेतले महेश मांजरेकर विशेष लक्षात राहतात. सतत लादल्या जाणार्‍या तांत्रिक बदलांना नकार देणारे मध्यमवयीन वडिल सचिन खेडेकर यांनी, तर समुपदेशक असूनही पोटच्या तरुण मुलीच्या भावनिक गुंत्याबद्दल कल्पना नसलेली आई इरावती हर्षे यांनी नेमकेपणे उभी केली आहे. पर्ण पेठे, संस्कृती बालगुडे, आदिनाथ कोठारे आपापल्या भूमिकांमध्ये फिट बसले आहेत.

आजच्या शहरी तरुणांचे प्रश्न, मूल्यांच्या बदलत्या व्याख्या, सायबर गदारोळात वावरत असूनही जाणवणारं एकटेपण, सॅच्युरेशनमुळे आलेलं रिकामपण, सायबर गुन्हेगारीसाठी आवश्यक असलेलं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक व्यवहारांबद्दलचं त्यांचं सुप्त आकर्षण अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. विषय तंत्रज्ञानाशी संबंधित असूनही तो अजिबात किचकट वाटत नाही. स्वत: टेक्नोसॅव्ही असल्याने, नाट्यक्षेत्राचा दीर्घ अनुभव असल्याने, ’रुद्रम’ फेम लेखक-दिग्दर्शक गिरिश जोशी यांनी सिनेमाची ’डॉक्युमेंटरी’ होऊ नये याची काळजी घेत, त्यातले नाट्य रंगवत हा विषय अतिशय उत्तम हाताळला आहे. गुन्हेगाराबाबतच्या उत्सुकतेमुळे पूर्वार्ध खिळवून ठेवतो. मात्र शहरात चांगल्या कंपनीत मोठ्य़ा पदावर काम करणार्‍या, युरोप बिरोपला सहलीला जाणार्‍या, मुलाला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार्‍या, आणि केसमधल्या तपशीलांकडे बर्‍यापैकी लॉजिकली पाहणार्‍या डिप्लोमा इंजिनीयरला ओटीपी नामक भानगड माहितच नसते तसंच एवढा आटापिटा करुन गुन्हेगारापर्यंत पोचल्यावर त्याच्या ’जरा आत जाण्याच्या’ विनंतीला इन्स्पेक्टर पवार फारच प्रेमळपणे मान देतात, ये दो बाते कुछ हजम नही हुई. अर्थात त्याने एकूण सिनेमाच्या प्रभावावर फारसा परिणाम होत नाही. ’माणूस खोटं बोलतो म्हणजे काय करतो तर जे घडावसं वाटतं ते घडलं म्हणून सांगतो’ यासारखे संवाद किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलीचं बदलत गेलेलं मन तिच्या फोटोंमधल्या डोळ्य़ातून आई शोधू पाहते यासारखे प्रसंग, या पण-परंतु वर सहज मात करतात.

मी सिनेसमीक्षक नाही. सामान्य प्रेक्षक आहे पण चित्रपटाचा विषय माझ्या कामाशी निगडीत आहे. अर्थात यावर लिहावसं वाटण्य़ाचं आणखी एक कारण आहे. आपल्यासाठी सायबर जगावरचे सिनेमे म्हणजे बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग, अशा चित्रविचित्र विषयांभोवती घोटाळणारे ब्लॅक हॅट, फिफ्थ इस्टेट सारखे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमे. ते आपण आ वासून पण त्रयस्थपणे बघतो. त्या अजब विश्वाशी आपला फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. मराठी भाषेतल्या (सबटायटल्स अचूक आहेत- साऊथ इंडियन सिनेमांसारखे विनोदी नाहीत), मध्यम बजेटच्या ’टेक केअर गुड नाईट’शी मात्र आपला थेट संबंध आहे. तो काल्पनिक सायबर जगाबद्दल नाही तर सायबर थ्रेटची जाणीव नसलेल्या आपल्या रोजच्या जगण्याबद्दल बोलतो. वास्तवाबद्दल बोलतो. कुटुंबांमधल्या तुटत चाललेल्या संवादाबद्दल बोलतो. सावध करतो. tc.gn सहकुटुंब पाहावा असा सिनेमा आहे. खर्‍या अर्थाने आजचा सिनेमा आहे. आपला सिनेमा आहे.