Sunday, September 6, 2015

विनोबांचं कारागृहातलं साहित्य

(पोर्ट ब्लेअर- अंदमान येथे ५-६ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित विश्व मराठी साहित्य संमेलनातील ’कारागृहातील साहित्य’ या परिसंवादातील माझा सहभाग - त्यात मी विनोबांच्या कारागृहातील साहित्यावर मांडलेले विचार. विनोबांच्या पुस्तकांशिवाय काही संदर्भांसाठी vinobabhave.org)

या परिसंवादाचा विषय ऐकल्यावर मनात येतं कारागृहातलं साहित्य किंवा प्रिझन लिटरेचर याचं नेमकं वेगळेपण काय ? याच विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक या जानेवारीत प्रकाशित झालं. यात तिने अ‍ॅन फ्रॅंक, ओ हेन्री, ऑस्कर वाईल्ड यासारख्या लेखकांच्या कारगृहातील साहित्याचा परामर्श घेतला आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, तळ्याकाठी-घरी-कार्यालयात बसून लिहीणे आणि कारागृहात लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची चर्चा तिने या पुस्तकात केली आहे. बहुतेक प्रश्नांची उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या जास्त जवळ असतात, हे यातलं समान सूत्र आहे.

vinoba bhave साठी इमेज परिणाम
(photo : google- not for commercial purpose)

भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी उत्तम लेखन केलेलं आहे त्याचा धांडोळा इतर वक्ते घेतीलच. परंतु वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलें लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक भावनात्मक फरक नाही असं मला वाटतं. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार निर्मम, बोचरी नव्हती, कायम मॄदु होती. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. तरीही विनोबा म्हणत , तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.

विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. मुळात सर्वात आधी गीतेनेच तीन वर्णांच्या बंदिवासात अडकलेलं वेदोपनिषदातील ज्ञान मानवजातीला खुलं केलं. तरीही संस्कृत भाषेचा अडसर होताच. १२ व्या शतकात प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून माऊलीने तोही दूर केला. ज्ञान समाजाच्या केवळ एका घटकापुरते सीमित न राहता, ते सर्वांपर्यंत पोहोचावे, हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे सूत्र विनोबांनी आचरणात आणले, आणि भाषक भिन्नतेमुळॆ अवरूद्ध झालेली ज्ञानगंगा विनोबांनी मराठीत आणली, ती देखील इतक्या ममत्वाने की गीतेची गीताई झाली. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. गीताईचं लेखन हे वर्ध्याच्या महिलाश्रमात ऑक्टोबर १९३० ते फेब्रुवारी १९३१ या कालावधीत झालेलं आहे. मग त्यांच कारागृहातलं लेखन नेमकं कोणतं! झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ईशावास्य वृत्ती हे पुस्तक लिहीलं. शिवणीच्या कारागृहात त्यांनी स्थितप्रज्ञ लक्षणांवर व्याख्यानं दिली. ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अद्भुत अशी प्रवचनं दिली ही दोन्ही प्रवचनं पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झाली, त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. अर्थात गांधीजींचे अध्यात्मिक वारसदार, पहिले सत्याग्रही, अहिंसा आणि मानवतावादाचे पुरस्कर्ते म्हणून भारतीयांच्या आदराला पात्र झालेल्या विनोबांच्या इतर साहित्याला मात्र गीताई इतका सन्मान लाभला नाही. मुळात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा. या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

आज पांडूरंगाच्या ओढीने पंढरीला निघालेली एखादी सात्विक वारी सोडली तर सभोवताली दिसतो तो फक्त अध्यात्माचा तमाशा. अमकेतमके बुवा- बापू, राधे माँ सारखे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू पाहून जाणवतं की अध्यात्म ही उन्नत मनोवस्था वगैरे राहिली नसून एक बाजारशरण उत्पादन झालेलं आहे. भंपक उच्चभ्रू अध्यात्मवाद्यांची ’असा मी असामी’ मधे उडवलेली रेवडी आठवून आजही गंमत वाटते. त्यातली ती who are you, who is he, he is the who of the you in the eye of the he अशी अनाकलनीय प्रवचनं आणि आजचे बाबांचे दरबार यात काही फरक नाही. जगण्य़ातल्या प्रश्नांची उत्तरं या थोतांडात नाही हे माझ्यासारख्या सामान्य पण विज्ञानवादी व्यक्तीला कळतं, ही उत्तरं वेद उपनिषदात गीतेत दडली आहेत हे नक्की, पण ती सोप्या भाषेत समाजावून सांगणार तरी कोण, याचं खणखणीत उत्तर म्हणजे विनोबा.

दोन मित्र होते. एक इतिहासप्रेमी तर दुसरे संतसाहित्याचे अभ्यासक. दोघांचा व्यासंग दांडगा. इतिहासकार म्हणाले मी इतिहासावर व्याख्यानं देत जाईन, तुम्ही संतसाहित्याचं निरूपण करा, आपण दौरे करून उभा महाराष्ट्र हलवून टाकू. दुसरे मित्र हसून म्हणाले," तुमचं ठीक आहे हो, राणा प्रताप च्या शौर्याचं वर्णन करताना तुम्हाला स्वत:ला तलवार चालवता येत नसली तरी चालतं. ज्ञानेश्वरीतला अमृताचा डोह जनतेला दाखवायचा तर आधी माझ्या जगण्यात, माझ्य प्रत्येक कृतीत त्याचे थेंब तरी असायला हवेत ना!", आणि हेच विनोबांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. त्यांच्या साहित्यात आणि जगण्यात एकवाक्यता होती.

त्यांनी नागपूरच्या कारागृहात असताना लिहीलेलं ईशावास्य वृत्ती हे पुस्तक म्हणजे जगावं कसं याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी शेष पूर्णच राहतं या शांतिमंत्राचा ते किती सोपा दाखला या पुस्तकात देतात पाहा. कुंभार मातीचा घडा बनवतो, मुळात तो घडा त्या मातीतच लपलेला असतो. चित्तशुद्धी म्हणजे काय हे सांगताना विनोबा अधिक सोपी उपमा देतात. ते म्हणतात पानकोबीला जशी पानांची एकावर एक अनेक आवरणे असतात तसे मनावरचे एक एक थर भेदत आत जाता आले तरच आत्मदर्शन होईल. यातले ९ ते ११ हे मंत्र बुद्धीच्या शुद्धीबद्दल आहेत. अविद्या आणि विद्या यातला फरक समजावून सांगणारे. आजच्या भाषेत prospective learning आणि cognitive learning. दोघी असल्या तरच आत्मविकास, एकेकट्य़ा असल्या तर! तर विनोबा म्हणतात मग अविद्या बरी, एकटी विद्या म्हणजे अहंकाराला जागा जास्त. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं.

’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.या परिसंवादाच्या निमित्त्याने पुन्हा हे पुस्तक चाळत असताना माझ्या मुलाने स्थितप्रज्ञ या शब्दाचा अर्थ विचारला. त्याचं वय बघता मी त्याला ,तटस्थ असा अर्थ सांगितला. त्यावर तो म्हणाला, म्हणजे आत्ता पुरस्कारावरून जो वाद झाला त्यात त्या कुणा कर्त्या माणसाने घेतलेली भूमिका म्हणजे स्थितप्रज्ञ का ! स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. या पुस्तकात विनोबा म्हणतात ,बुद्धी तीन प्रकारच्या असतात. सांख्यबुद्धी- जीवनाचं ज्ञान, मग योगबुद्धी- जीवनाची कला आणि तिसरी स्थिरबुद्धी. मात्र माझ्या बालबुद्धीला हे कळले नव्हते की जगातल्या रूप रस गंधाचा आनंद लुटायचा सोडून अलिप्त का आणि कसं राहायचं या सार्‍य़ापासून! त्याचं उत्तर विनोबा देतात, ते ही माऊलींचा दृष्टांत देऊन, ’आपणचि विऊनी दुहिता...न मम म्हणे पिता.’ विनोबा इंद्रियदमन करा असं म्हणतच नाहीत. ते इंद्रीयनिग्रहाबद्दल बोलतात. गुजराथीत एक म्हण आहे, माणसनी परिक्षा ..खाटले न पाट्ले. कितीही संतुलित माणूस असला तरी जेवण आणि आजार हे दोन प्रसंग असे आहेत ज्यात आतला खरा माणूस बाहेर येतो. तेव्हा इद्रियनिग्रह कसा, तर संकटसमयी कासव कवचाखाली अंग चोरून घेतं तसा.
घेइ ओढूनि संपूर्ण विषया तील इंद्रिये,
जैसा कासव तो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली
एकूण विनोबांच्या साहित्याचा आत्मा आणि त्यांचा श्वास सुद्धा गीताच आहे. एकेश्वरवाद्यांनाही ज्ञान देण्य़ाचं सामर्थ्य असलेली, वैश्विक तत्त्वज्ञान कवेत घेणारी गीता विनोबांचा प्राण आहे

धुळयाच्या कारागृहात असताना विनोबांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली आणि सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तीने ती टीपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. या जेलमधून विनोबांची सुटका झाली, तेव्हा सर्व कैद्यांनी जेलरला विनंती केली की, आमच्या श्रमाने मिळवलेल्या पैशांतून दोन आणे कापा आणि आम्हाला 'गीताई' द्या. या पुस्तकाची किंमत तर एक आणा होती. पण कैदी म्हणाले, 'एक आणा 'गीताई'साठी आणि एक आणा विनोबांच्या कार्यासाठी.' हे भाग्य किती लेखकांना लाभते? याचं कारण उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना त्यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात आणि गीतेत होती.
गीतेमध्ये केवळ आध्यात्मिक नाही तर व्यावहारिक मार्गदर्शन आहे अशी त्यांची श्रद्धा. गीतेच्या सांगण्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत गेल्याने अपार शांती मिळते असा त्यांना अनुभव येत गेला. म्हणून सर्वसामान्य जनतेची निष्ठा गीतेवर स्थिर व्हावी हाच त्यांच्या साहित्यकृतींचा हेतू होता.
गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर
’गीताई माझी माऊली मी तिचा बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनि कडेवरी’. 

गीतारहस्याचं विवेचन ऐकल्यावर लक्षात येतं की टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता. तर विनोबा म्हणत, तर्काला छाटून श्रद्धा आणि प्रयोगाचे पंख लावून मी गीतेच्या अस्मानात भरार्‍या मारत असतो. विनोबांचं तब्बल १४ भाषांवर प्रभुत्व होते. कुराण मुळातून नीट समजावे म्हणून ते थेट अरबी भाषा शिकले, बायबल मधले कोणते वचन कितव्या पानावर आहे हे ही त्यांना मुखोद्गत होते मग गीतेचा त्यांचा व्यासंग किती प्रगाढ असेल! परंतु ते म्हणत ज्या तात्विक चर्चेचा जीवनाशी संबंध नाही, त्याचा उहापोह माझ्या गीताप्रवचनात नाही. ज्यातून श्रमिकाला सांत्वना मिळते, थांबलेल्याला प्रेरणा मिळते तीच माझी गीताई. टिळकांच्या मते गीता हा कर्मयोगावर आधारित युद्धोपदेश होता तर विनोबांनी गीता ही भगवंताची उक्ती आहे हा शंकराचार्यांचा दृष्टीकोन स्वीकारला होता. गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पितरूपक आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर धृतराष्ट्र जेव्हा संजयला विचारतो,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामका: पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ||
गीताई मधला याचा सहज अनुवाद
त्या पवित्र कुरु-क्षेत्रीं पांडूचे आणि आमुचे ..युद्धार्थ जमले तेव्हां वर्तलें काय संजया ||
आणि यावर विनोबांची प्रवचनातली सुरेख टिप्पणी -
मानवी शरीरातच एक सनातन- देवासुर्-संग्राम चालल्याचे उपनिषदात वर्णन आहे. तामसी कर्मासक्त कौरव म्हणजे आपली आसुरी वृत्ती आणि  प्रज्ञावान पांडव म्हणजे आपली सात्त्विक बुद्धी असे ह्या युद्धाचे गीतेत दुहेरी स्वरुप आहे.

गीतेचं सार आकळल्यानेच कदाचित चंबळ खोर्‍यातल्या ११ डाकूंचं हृदयपरिवर्तन करणयाची किमया विनोबा करू शकले. गीतेच्या प्रेरणेमुळेच विनोबांचा वैयक्तिक मोक्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक मोक्षाशी समव्याप्त झाला होता असं ग.प्र.प्रधान नोंदवून ठेवतात. त्यांच्या भूदान, ग्रामदान, सर्वोदय या सार्‍य़ा योजनांच्या मुळाशी गीतेतून उपजलेलं मानवजातीचं कल्याण हीच निखळ भावना होती. अर्थात विनोबांच्या काही मर्यादा होत्या. even homer nods, होमर लाही कधीतरी डुलकी येते या उक्तीप्रमाणे त्यांनी आणीबाणीच्या काळ्या पर्वाचा उल्लेख अनुशासन पर्व असा केला. ज्या पुलंनी विनोबांवर ’एक शून्य मी’ पुस्तकात स्तुतीपर लेख लिहीला त्यांनीच मग उद्वेगाने ’आम्ही सूक्ष्मात जातो’ हे विडंबनही लिहीलं. आजही नायपॉल सारखे लेखक विनोबांना भाबडे ठरवतात, १३ वर्ष भारत पालथा घालून मिळवलेल्या भूदानात काहींनी नापिक जमीन देऊन केलेली फसवणूक किंवा जमिनीचे वाटप करताना आलेल्या त्रुटी या सार्‍य़ामुळॆ ते रॅशनॅलिझम पासून दूर असल्याचा आरोपही केला गेला. ’सब भूमी गोपालकी’ मानणार्‍य़ा या आकाशपुत्राला साध्या संसारी माणसांचे संयुक्त महाराष्ट्रासारखे प्रश्न निरर्थक वाटले त्यामुळे अत्र्यांनीही विनोबांवर टीका केली. विनोबांची गीताई हेच सांगते की एक परमेश्वर सोडून कुणीही निर्दोष नाही. मानवी जीवन विणलं गेलं आहे ते अशा काळ्या पांढर्‍या तंतूंनी.
एक मात्र खरं की गीता उपदेशात ज्या सत्यनिष्ठेचा आग्रह धरला गेला आहे त्याबाबतीत विनोबांचे विरोधक देखील विनोबांपुढॆ नम्र होतात. सर्वात मी आहे, माझ्यात सर्व आहेत, मग सत्य लपवायचे ते कुणापासून इतकी त्यांची सत्यनिष्ठा प्रखर आणि स्पष्ट होती.

आजच्या कॉर्पोरेट युगात डॆल कार्नेगी-रॉबीन शर्मा सारखे मॅनेजमेंट गुरू माणसं कशी हाताळावीत याच्या टिप्स देतात. उच्च पदावरील अधिकार्‍य़ांना nervous break down होऊ नयेत म्हणून SQ म्हणजेच spiritual quotient कसा वाढवावा याचं हल्ली विशेष प्रशिक्षण दिलं जातं. खर तर जीवनशास्त्र शिकवणार्‍य़ा विनोबांच्या साहित्यात हे सगळं सुगमपणे मांडलेलं आहे. सततच्या नापिकीने बेजार होऊन आत्महत्येच्या टोकाला पोचलेला एखादा शेतकरी असो , सेल्फीच्या आत्मप्रेमात बुडून सैरभैर झालेला एखादा मध्यमवर्गीय असो, सतत यशस्वी होण्य़ाच्या दडपणाने नैराश्यग्रस्त झालेला  एखादा आयटी इंजिनीयर असो.. या सार्‍य़ांना कवेत घेऊन, त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजावून सांगण्य़ाची ताकद मातृहॄद्यी विनोबांच्या गीतेवर आधारलेल्या साहित्यात आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानेच विश्वकल्याण साधता येईल आणि साहित्य हे त्या दोघांना जोडणारं सूत्र आहे, ही या आधुनिक संताची भूमिका होती. या विश्वमानवाबद्दल कवी वसंत बापटांनी किती चपखल लिहिलंय..

सूर्यवीर्य शशिशांती, भ्रांती वार्‍याची भिनली अंगी
समिधेपरि वरि शुष्क असुनि, अंतरंग नित रसरंगी
नित्य नव्या यज्ञाचे दीक्षित, विस्मरला अपसव्य तुम्ही
मातीहुनि तुम्ही माती असुनि हिमालयाहुनि भव्य तुम्ही

Friday, August 21, 2015

जनरेशन गॅप - अपरात्री ऑनलाईन


"हे ’ऑनलाईन’ म्हणजे नेमकं काय असतं ग?" नात्यातल्या एका वयस्कर बाईंनी अचानक विचारलं. "ऑनलाईन म्हणजे ’आपण आत्ता नेटवर्क वापरत आहोत’ याची खूण. का हो काकू!" "काही नाही, त्यामुळे माझ्या मैत्रिणीच्या नातीचं ठरलेलं लग्न मोडलं. आपला होणारा नवरा रात्रीबेरात्री ऑनलाईन असतो का हे तपासायला तिची नात स्वत: ऑनलाईन गेली म्हणे, झालं भलतच, इतक्या रात्री ऑनलाईन असणारी मुलगी ’चांगली’ नसणार या कारणाने त्या मुलाने लग्नाला चक्क नकार दिला" "अरेच्चा, पण मग तो मुलगा स्वत: अपरात्री ऑनलाईन होता त्याचं काय!" "खरय, पण शेवटी ’मुलीच्या जातीला’ कळायला पाहिजे नं !" इति काकू.

 पिढ्या बदलल्या तरी एक गोष्ट फार संथ गतीने बदलते आहे, ती म्हणजे समाजाची स्त्रियांकडे पाहण्याची नजर. मुळात महत्वाचे काम असल्याशिवाय अपरात्री मोबाईल वापरणे योग्य नाही, मग वापरकर्ता कुणीही असो. परंतु ’बाईच्या जातीने’ मोबाईल वापरला की पारंपरिक विचारसरणीच्या मंडळींच्या कपाळावर आठी पडते. मागे उ.प्रदेश चे एक खासदार सैनी यांनी मुक्ताफळे उधळली होती, "मुलींना मोबाईल वापरू देऊ नका. आमच्या आईबहिणींनी मोबाईल वापरला नाही, त्यांचे कुठे काय बिघडले!" बाघपत पंचायतीने तर मोबाईलमुळे मुली पळून जाऊन लग्न करतात तसेच त्यांचे संसारातले लक्ष उडते ,त्यामुळे ’४० वर्षांखालील स्त्रियांनी मोबाईल वापरू नये’ असा अचाट फतवा काढला होता. त्यानंतर म.प्र तील एक खासदार रघुनंदन शर्मा म्हणाले होते, "लग्नाआधी मुलींना मोबाईल दिला तर त्या मर्यादा ओलांडतात. हे मोबाइल म्हणजे कर्णपिशाच्च आहे." माध्यमातून टीका झाल्यावर या मंडळींनी मग सारवासारव केली हा भाग वेगळा. मुळात मुली लग्न करायला एकट्या तर पळून जाऊ शकत नाहीत म्हणजेच या सगळ्या उदाहरणात त्या मुलींसह ’मर्यादा’ वगैरे ओलांडणारी मुले ही आहेत. ती मात्र या मोबाईलबंदी पासून मुक्त आहेत. मोबाईलच्या अतिरेकी वेडापायी तरूण पिढी वेळेचा अपव्यय करते आहे,

मानवी तासांचा हिशेब केला तर देशाचाही वेळ अनुत्पादक कामात वाया घालवते आहे. त्यातून शारिरिक, मानसिक आणि सामाजिक समस्या देखील वाढत आहेत हे सारे खरे असले तरी आपल्या पाल्यांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ही त्यांच्या पालकांची जबाबदारी आहे. जेनेल हॉफमन या अमेरिकन आईने आपल्या टीनएजर मुलाला मोबाईल देताना तो कसा, केव्हा, कुठे आणि किती वापरावा याबद्दल एक आचारसंहिताच करून दिली होती. असे काही उपाय करायचे सोडून सगळ्या समस्यांचे खापर फक्त मुलींच्या मोबाईल वापरावर फोडणे कितपत योग्य आहे? ’तिखट झाला चहा आणि कालवण झालं गोड सासू म्हणते सुनेला तुझ्या ’व्हॉट्सअप’ ला उठू दे फोड’ अशा अर्थाच्या थोड्या खोचक, थोड्या मिश्कील ओळी सध्या मोबाईलवर फिरत आहेत. खरं तर लग्नानंतर संसाराच्या चक्रात अडकलेल्या स्त्रियांना या मोबाईलमुळे थोडा मोकळा श्वास घेता येतो आहे. शाळा-महाविद्यालयामधलं दुरावलेलं मैत्र पुन्हा जोडता येतं आहे. घरची-बाहेरची कामं, पैपाहुणा, सणवार, मुलं, त्यांच्या activities, स्वत:चं लहानमोठं करियर या सगळ्याशी ती आजही ’कनेक्टेड’ आहे, उलट या चाकोरीतही एक नावीन्य, चैतन्य, आत्मविश्वास तिला जाणवतो. मुलांच्या प्रश्नांना पटकन मोबाईलमधे पाहून उत्तर देणारी स्मार्ट आई आता जाहिरातींमधून दिसते. मोबाईलच्या नादात डाळ करपावी किंवा कामे विसरून जावी एवढी ती बावळट नक्कीच नाही. ’आमच्या वेळी नव्ह्तं असलं काही फॅड’ असं तिला म्हणणारी मागची पिढी आज स्वत: मात्र टीव्हीला खिळून बसलेली असते. त्यांच्या काळी या गोष्टी उपलब्धच नव्ह्त्या तर त्यात त्यांच्या संयमाची परीक्षा आली कुठे? आजच्या पुरूषांच्या बाबतीत तर, गोष्टीतल्या जादूगाराचा प्राण जसा पोपटात असायचा तसा त्यांचा मोबाईलमधे असतो, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. मोबाईल विना जगू शकणारे पुरूष अपवादात्मक तसेच मोबाईलच्या अगदीच आहारी गेलेल्या स्त्रियाही अपवादात्मक. स्त्रिया तंत्रज्ञानाचा, विशेषत: मोबाईलचा वापर करतात तेव्हा संपर्काचे, माहिती मिळवण्याचे, माणसांशी जोडले जाण्याचे, सुरक्षिततेचे आणि काही अंशी आत्मनिर्भर होण्याचे जणू आयुध त्यांना लाभते.

परंतु स्त्रीचं स्वत:चं विश्व असणं ही कल्पनाच मुळात समाजाच्या पचनी पडत नाही. बहुतेक स्त्रिया नवर्‍याने नवा मोबाईल घेतला की त्याचा जुना मोबाईल वापरताना दिसतात, अर्थात तिने कायम त्यागमूर्ती, वात्सल्यमूर्ती, संसाराचा कणा असणं हेच अपेक्षित असतं. असावं ना! पण तिला स्वत:चीही स्पेस असायला हवी की नको! मोबाईलमुळे स्त्रीचे संपर्कक्षेत्र वाढते, तिचे पतीवरील अवलंबित्व बरेचसे कमी होते याने काही पुरूषांचा अहंकार दुखावतो. वरवर स्त्रियांच्या प्रगतीच्या वल्गना केल्या तरी समाजाला मनातून ’जात्यावर बसून ओवी गाणारी नऊवारीतली सात्विक स्त्री’ ही प्रतिमा सर्वात जास्त भावते. अशा वृत्तीबाबत ना.ग.गोरे म्हणत, "या ओव्यांचं कौतुक करणं वेगळं आणि स्वत: जातं ओढणं वेगळं". एकूणच या चित्राला तडा जायला लागला की बर्‍याच घरातून तिच्या मोबाईल वापरावर तिरकस टीका होऊ लागते, समाजातले स्वघोषित नैतिक पहारेकरी स्त्रियांवरील मोबाईलबंदी सारखे आचरट उपाय शोधू लागतात.

 फ़ोक्सवॅगन ची एक सामाजिक जाहिरात आहे. जाहिरात सुरू होते ती सिनेमागृहात प्रेक्षक येऊन बसत असतानाच्या दृश्यासह. पड्द्यावर सिनेमा आधीची जाहिरात सुरू होते, त्यात फ़ोक्सवॅगन चालवणारे स्टिअरिंगवरचे हात तेवढे दिसतात, प्रेक्षक श्वास रोखून बघू लागतात, गाडीचा वेग वाढतो, आता गाडी नुसतीच सुसाट पुढे जात राहते. एव्हाना कंटाळलेले प्रेक्षक चुळबूळ करू लागतात. आपापला मोबाईल काढून सगळे त्यात डोकावू लागतात आणि अचानक जोरात आवाज येतो, पड्द्यावरील गाडीचा अपघात झालेला असतो. खाली मेसेज येतो, ’वाहन चालविताना मोबाईल वापरणे धोक्याचे आहे.’ खरं तर वाहन चालवतानाच नव्हे, आपल्या उद्देशांकडे, सुंदर जगण्याकडे, उत्तम पालकत्वाकडे आपला प्रवास सुरू असताना देखील मोबाईलचा अतिवापर हितकारक नाही हे सांगणारी ही जाहिरात सर्वांनाच लागू होते. फक्त स्त्रियांना नव्हे. -

Friday, July 24, 2015

जनरेशन गॅप - पोशाख


"डोईचा पदर आला खांद्यावरी.. भरल्या बाजारी जाईन मी.." असं म्हणणार्‍या संत जनाबाईंनी तत्कालीन समाजातील स्त्रीच्या पेहरावाबद्दलच नव्हे तर तिच्या एकूण वर्तनाबद्दल असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलं. अर्थात यामुळे परिस्थिती फारशी बदलली नाही. पाश्चात्य पोषाख घालायचा नाही ही नवर्‍याची अट कटाक्षाने पाळण्याच्या बदल्यात पहिल्या महिला डॉक्टर, आनंदीबाई जोशींना तर अमेरिकेतील थंडी असह्य होऊन क्षयरोगामुळे स्वत:चा जीव गमवावा लागला. आता असे जाचक नियम काहीसे शिथील झाले असले तरी अजूनही मुलींच्या/स्त्रियांच्या पेहरावाकडे मागच्या पिढीचेच नव्हे तर सबंध समाजाचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.

 निर्भयावरील बीबीसी ने केलेल्या वादग्रस्त माहितीपटात आरोपीच्या वकिलानी जी काही मुक्ताफळे उधळली त्यात त्यानी आजच्या मुलींच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर आणि राहणीवर आक्षेप घेतला होता. त्याने आरोपीचे समर्थन करताना म्हटले होते की समाजाने घालून दिलेली चौकट ओलांडणार्‍या मुलीच अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आहेत. त्या वकिलाच्या मानसिकतेचा वरवर जोरदार निषेध होत असला तरी आतून कुठेतरी बहुसंख्य लोकांचे तेच मत आहे. अशा स्वरूपाचे विधान दोन वर्षापूर्वी कॅनडातील एका पोलीस अधिकार्‍याने देखील केले होते. या मध्ययुगीन काळातील विचारांना विरोध करण्यासाठी, ’शारिरीक बळाचा वापर करून एखाद्या पुरूषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच, त्याचा तिच्या कपडयांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशात स्लट वॉकचे (भारतात दिल्लीत देखील) आयोजन करण्यात आले होते. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा स्त्रियांनी त्या मोर्चात वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला. आपल्याही समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न समजलेल्या काही मूर्ख प्रसिद्धीलोलुप स्त्रियांमुळे, संस्कृती आणि अब्रू जपण्याच्या भितीने समाज सरसकट सर्वच स्त्रियांच्या पेहरावावर अंकुश ठेवू पाहतो. या बाबतीत पुरोगामी राहायचे की प्रतिगामी ह्याबाबत भारतीय समाज गोंधळलेला आहे. उदा: सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट्स घालणेच योग्य आहे, जलद हालचालींसाठी तोच पोशाख सोयिस्कर आहे हे भारतीय मनाला एव्हाना पटले आहे. (अर्थात तिलाही मौलवींच्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावेच लागले होते) पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात पर्यटनाला आलेल्या परदेशी तरूणींनी सुटसुटीतपणा या निकषाखाली तसा पोशाख घातला तर त्यांचा हेतू ’शरीरप्रदर्शन’ असा मानला जातो. (आठवा ’अतिथी देवो भव!’च्या सरकारी जाहिराती)

मग निदान ’भारतीय पोशाखातील’ मुलींना तरी बिनधोकपणे संचार करता यायला हवा, पण ते तसेही नाही. सोशल मिडीयावर एक व्हिडीओ बराच गाजतो आहे. त्यात एक भारतीय वेशातील तरूणी दिल्लीमधील गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकटी चालत जाते. नंतरच्या क्लिप मधे तीच तरूणी पाश्चात्य पोशाखात त्याच ठिकाणांवरून चालत जाते. दोन्ही केसेस मधे छुप्या कॅमेर्‍याने टिपलेल्या, तिच्याकडे बघणार्‍या नजरा, शेरेबाजी यात फारसा काही फरक नसतो. अभारतीय पोशाखामुळे स्त्रिया आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचाराला बळी पडतात या समजुतीला छेद देणारा हा व्हिडीओ आहे.

 मध्यंतरी एका नातेवाईकांकडे गेले होते. त्यांना त्यांच्या इंजिनीयर मुलीसाठी एक चांगलेसे स्थळ कळले होते आणि मुलामुलीने एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा कार्यक्रम दोन दिवसावर येऊन ठेपला होता. तिचे वडील म्हणत होते, निदान त्या दिवशी तरी साडी नेस. मुलीचे म्हणणे होते, लग्न ठरले तर लग्नात पारंपरिक विधी करताना नक्की नेसेन मी साडी. एरवी मी जशी असते आणि जशी दिसते तसच त्यांनी मला स्वीकारावं, त्या प्रसंगापुरते स्वत:ला उगाच कृत्रिम रूपात दाखवणे ही उलट त्यांची फसवणूक नाही का! मग आई पुढे आली, "अगं, साडी कशी भारदस्त दिसते, भारताच्या मंगळमोहिमेतील अनेक शास्त्रज्ञ स्त्रियांचे फोटो जगभर झळकले, साडीच नेसलेली होती ना त्यांनी. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या कितीतरी उच्चपदस्थ स्त्रिया आवर्जून साडी नेसतात." मुलगी उत्तरली, " माझा विरोध साडीला नसून साडी नेसण्याच्या सक्तीला आहे. काळानुरूप गैरसोयीचे म्हणून पुरूषांनी धोतर केव्हाच टाकून दिले. साडी तर त्याहून लांबलचक आहे. बहुसंख्य भारतीय स्त्रियांची जीवनपद्धती अतिशय कष्टाची आहे आणि त्यांच्यासाठी साडी हा पोशाख गैरसोयीचा आहे, त्या नाईलाजातून त्याची सवय करून घेतात. त्यातूनही काही स्त्रियांना असेल आवड तर त्यांनी नेसावी, पण ते त्यांनी ठरवावं, इतरांनी नव्हे." आता मात्र तिच्या आजीला राहवले नाही, त्या म्हणाल्या, "ते काहीही असलं तरी साडी हा भारतीय संस्कृतीतला सर्वात सभ्य पोशाख आहे, त्यातच बाई शोभून दिसते" यावर नात म्हणाली," आजी, पुण्यात शंभर वर्षांपूर्वी सकच्छ (कासोटा घालून नऊवारी) आणी विकच्छ (आजची पाचवारी साडी) असा वाद रंगला होता तेव्हा आज ज्या साडीला तू सभ्य वगैरे म्हणतेयस ना, तेव्हाच्या समाजाने हीच पाचवारी साडी नेसणार्‍या स्त्रियांना उच्छृंखल, कुळबुडव्या, वाया गेलेल्या वगैरे म्हटलं होतं. आता ते किती हास्यास्पद वाटतं!

कशाला सभ्य आणि कशाला अयोग्य म्हणायचं हे शेवटी काळाच्या कोणत्या तुकड्यावर उभे राहून आपण त्या गोष्टीकडे पाहतो ना यावर अवलंबून असतं." याचा अर्थ मुलींनी सर्रास तोकडे कपडे घालून फिरावे असा मुळीच नाही, तर त्या त्या परिस्थितीनुसार सोयीचा, सुखकर आणि आरामदायी पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. अर्थात करियर करताना, मुलाखतीला जाताना, विशीष्ट प्रसंग, सामाजिक समारंभ यात काय परिधान करायला हवे याची जाण त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते. मात्र पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे योग्य आहे ना, ज्या पार्श्वभूमीवर आपण तो पोशाख घातला आहे त्याने काही औचित्यभंग तर होणार नाही ना याचे भान स्त्री असो वा पुरूष दोघांनाही असायला हवे. समाजस्वास्थ्याची जबाबदारी स्त्री इतकीच पुरूषांची देखील आहे.