Saturday, July 21, 2012

वाल्या ते वाल्मिकी

वाल्या ते वाल्मिकी - चांगुलपणाच्या शोधाचा प्रवास

माणूस जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. मात्र चुकांची कबुली देण्याचं धाडस त्याने दाखवलं तर आयुष्य त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. बर्‍याचदा साधे सरळ जीवन जगणारे लोक क्षणिक उद्वेगात, रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात आणि जन्मभरासाठी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळी येतो. काही जण नशेमधे, काही जण आत्मसंरक्षणासाठी तर काही जण दबावामुळे असे काही कृत्य करतात ज्याचा त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागतो. शिक्षा भोगता भोगता त्यांच्यातले माणूसपण आतच विझू लागते. अट्टल गुन्हेगारांच्या संगतीत निर्ढावायच्या आत त्यांच्या आतल्या माणूसपणाला साद घालण्याचा प्रयत्न केला गेला तर तो प्रयत्न त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गुन्हेगाराला माणूस म्हणून पुन्हा एकदा जगण्याच्या प्रवाहात आणू शकतो.
"वाल्मिकी प्रतिभा" ही रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेली नाटिका, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची ही कथा. या नाटिकेत क्रूर डाकूंची एक टोळी जंगलात वास्तव्य करीत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून आणतात. मला मारू नका-मारू नका असे ती मुलगी आर्तपणे विनवू लागते पण डाकूंना धुंदी चढली असते. ते तिला बळी देणार इतक्यात त्या कोवळ्या मुलीचा करूण चेहरा पाहून, त्या डाकूंच्या सरदाराचे मन एकदम द्रवते, तलवार फेकून तो त्या मुलीला हृदयाशी धरतो. इतर डाकू हे पाहून संतापतात आणि सरदाराला बोल लावतात. परंतु त्या क्षणी हृदयपालट झालेला सरदार आमूलाग्र बदलतो..वाटमारीचा धंदा सोडून त्या बालिकेचा सांभाळ करू लागतो. सरस्वती देवी प्रकट होऊन त्याला म्हणते "मीच या बालिकेचे रूप घेऊन तुझी परिक्षा पाहिली व त्यात तू उत्तीर्ण झालास", एवढे बोलून आपली वीणा सरदाराच्या हाती सोपवून सरस्वती अंतर्धान पावते. नाटिका संपते.

या नाटिकेचा प्रयोग मध्यंतरी पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. त्याचे वेगळेपण म्हणजे यात भूमिका करणारे सगळे कलाकार कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी जेलमधले कैदी होते. या कैद्यांची राहायची-ने आण करण्याची व्यवस्था पुणे पोलिसांनी केली होती असा या बातमीत आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यातील सरदाराची- मुख्य भूमिका करणारा कलाकार तर जवळपास १७ केसेसमधे अडकलेला गुंड. या कैद्यांना घेऊन ही नृत्यनाटिका बसवणार्‍या आलोकनंदा यांच्यामुळे या गुन्हेगाराचे मन:परिवर्तन झाले. ही नाटिका म्हणजे जणू त्याचीच कथा. एक मनस्वी व्यक्ती, एक उत्तम कलाकृती आणि त्या कलेचा गुन्हेगाराच्या हृदयातील मरू घातलेल्या भावनांना झालेला हळुवार स्पर्श, काय करामत करू शकतो त्याचेच हे उदाहरण!

मनाबरोबरच जीवनपरिवर्तनाचं उदाहरण ठरलेलं एक वृत्त येथे सांगायलाच हवं. चाळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करणार्‍या लक्ष्मण गोळेने वयाच्या १६व्या वर्षी भांडणातून एकावर वस्त-याने वार केला आणि तो तुरुंगात गेला. पुढे त्याच्यावर हाफ मर्डरसह जवळपास १९ गुन्हे दाखल झाले. घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. महात्मा गांधींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने हळूहळू स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. त्याची वर्तणूक पाहून त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगीही झाली. चांगलं बनण्याचा प्रयत्न केवळ समाजाच्या साथीने यशस्वी होऊ शकतो असं म्हणणारा लक्ष्मण "it's never too late" या उक्तीचा प्रत्यय देतो.
लक्ष्मण तर गुन्हेगार असून बदलला. मुळात आपली कायद्याची प्रक्रिया इतकी संथ आहे की गुन्हा सिद्ध न झालेले कित्येक आरोपी केवळ खटला प्रलंबित आहे म्हणून नाईलाजाने तुरूंगात खितपत पडलेले असतात. याचा अर्थ ते निर्दोषच असतात असा नसला तरी तुरूंगातील वातावरणात छोट्या गुन्हेगार्‍यांना अट्टल गुन्हेगारांकडून मोठ्या गुन्ह्यांचे जणू प्रशिक्षणच मिळत असते. यामुळे त्यांच्या सुधारणेच्या शक्यता मावळू लागतात. अर्थात हे सगळ्या गुन्हेगारांना लागू होत नाही. क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या कसाब सारख्या नराधम गुंडांच्या वर्तणूकीत पश्चातापाचा लवलेशही आढळत नाही, अशा खुनशी गुन्हेगारांना मानवाधिकाराच्या नावाखाली माणसात आणण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणाच नव्हे तर त्यांच्या अमानुषतेचे बळी ठरलेल्या निरपराध जीवांचा घोर अपमान आहे. मात्र माणूसपणाची धुगधुगी उरली आहे असे ज्या गुन्हेगारांच्या वर्तनातून जाणवते त्यांना शिक्षा करणार्‍या हातांऐवजी पुनर्वसन करणार्‍या हातांचा आधार मिळायला हवा. तरच त्यांना आयुष्यात नव्याने उभं राहता येईल.

१९९४ चा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या माजी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलचे रूपांतर तिहार आश्रमात करून हे सिद्ध करून दाखवले होते. पृथ्वीवरचा नरक म्हणावा अशा वातावरणातला, केवळ २५०० कैद्यांची क्षमता असूनही ८००० पेक्षा जास्त कैदी कोंबलेला तिहार तुरूंग अंमली पदार्थ, कमालीची अस्वच्छता, टोळीयुद्ध, माफिया कैद्यांचे साम्राज्य, हतबल अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी यांच्या विळख्यात सापडला होता. किरण बेदींनी आधी कैद्यांशी सुसंवाद सुरू केला. तुरूंग पंचायत सुरू केली. ग्रंथालय सुरू केले, ध्यान-केंद्र सुरू केले, मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले, कैद्यांना पुढील शिक्षणाला प्रवृत्त करून मुक्त विद्यापीठाचे दालन सुरू केले, कैद्यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्यातल्या माणसाला जागवले. किरण बेदींचे हे प्रयत्न कित्येक कैद्यांना नवजीवन देऊन गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तुरूंगाधिकार्‍यांनी या योजना राबवायला सुरूवात केली.

वाल्या ते वाल्मिकी हे दोन माणसांमधलं द्वंद्व नाही तर एकाच मनाचा अविष्कार असलेल्या दोन वृत्तींमधील द्वंद्व आहे. या द्वंद्वाची जाणीव होणे हीच माणसाच्या बदलण्याची सुरूवात असते मग तो माणूस आमूलाग्र बदलू शकतो. खरं तर परिवर्तन हा माणसाचा स्थायी भावच आहे. त्याचे प्रकट मन नकारात्मक विचार करत असते पण अप्रकट मनाची स्वत:ला बदलण्याची आस चांगुलपणाच्या पहिल्या पायरीवर त्याला घेऊन जाते. गरज आहे ती चांगलं बनण्याची त्याची धडपड समजून घेऊन समाजाने त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची.. त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट शोधायला मदत करण्याची. एखादी व्यक्ती, कला, पुस्तक, विचार, शैक्षणिक यश, शाबासकीची थाप, मायेचा शब्द... यापैकी कशातही हा टर्निंग पॉईंट दडलेला असू शकतो. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या एका संशोधनाने जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते पण आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून ते हादरले..बदलले.. इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल प्राईझ जगविख्यात आहे. तिहार तुरूंगातल्या एका सुशिक्षीत कैद्याचे हे शब्द किरण बेदी यांच्यावर लिहीलेल्या "आय डेअर" या पुस्तकात नोंदले गेले आहेत. तो आपल्या कैदी विद्यार्थ्यांना सांगत असे "भूतकाळात जे घडून गेले ते तुमच्या हातात नव्हते पण भविष्यकाळात तुमच्यातील माणुसकीच बाहेर यायला पाहिजे, तोच प्रयत्न आपण आता करायचा आहे".

Wednesday, June 27, 2012

पाऊस कवितेतला

पाऊस कवितेतला....पाऊस मनातला
पहिला पाऊस पडला आणि मृद्गंध दरवळला की बहुतेक प्रत्येक माणूस मृण्मय होत असावा.. पर्जन्याच्या रूप-गंध-स्पर्शाने कवी होत असावा. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामनात अशा कविता सहजपणे लिहून जाते. (मात्र इतरांच्या कानांवर अत्याचार न करता त्या कविता स्वत:च स्वत:ला ऐकवायच्या असतात...) एरवी निसर्गाकडे पाहायला वेळ नसलेलं मन पावसाच्या आणि काव्याच्या सरीत न्हाऊन निघतं. आपल्यासारख्या सामान्यांची ही तर्‍हा, मग प्रतिभेचं देणं लाभलेल्या प्रज्ञावंत कवींना पावसाने आकृष्ट केलं नाही तरच नवल! हिरव्या वाटेवरचे, ना.धों. महानोर हे संवेदनशील निसर्गकवी. त्यांचा शब्द न शब्द हा ओला प्रत्यय देतो..
"मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले.. घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले..
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी... शिडकावा संथ येता पाने निळी कुसुंबी.."
पाऊस पडून गेल्यानंतरचे निसर्गाचे सौंदर्य कवी बा.भ.बोरकर शब्दबद्ध करतात तेव्हा आपणही ते निसर्गचित्र नकळत पाहू लागतो..
"पाऊस रात्री होऊन गेला रानामाळांवर सोन्याचे ऊन
अजून माती कोवळी ओली पानापानातून कालची धून.."
पाऊस कसा पडतो याचं पाणी-वाफ-बाष्पीभवन अशा रूक्ष शब्दांमधलं उत्तर आपल्याला माहीत आहे पण हेच सूत्र कवी ग.दि.माडगूळकर किती गोजिरवाण्या शब्दात मांडतात..
"नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर... अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर..
सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर... तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर...
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन.. नदी तरंगत जाते पंख वार्‍याचे लेऊन...
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा...पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा..."

पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण काहीसं बेचैन करणारं असतं. पण पावसाच्या नुसत्या चाहुलीने आठवणींच्या सरी बरसू लागतात.. हीच मनोवस्था कवी मंगेश पाडगावकर अशा शब्दात गुंफतात
"संथ संथ सरकणारे पहिले वहिले पावसाळी ढग
गढूळ डोळ्यांच्या घरांचे मोर झाले अचानक..."
पावसाआधीची हुरहूर कवयित्री इंदिरा संतांच्या शब्दातून अचूक व्यक्त होते..
"ओथंबून आलेले पावसाळी आभाळ... घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ..
काहूर भरला व्याकूळ वारा.... मनोमनींच्या छेडतो तारा.. "
पावसाकडे तरूण मन काहीशा रोमँटिक भावनेने पाहतं. पावसाळी संदर्भाशिवाय प्रेमाला पूर्णत्व येत नाही.
"अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे.. उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहूर थरारते रानभर.. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर" (कवी संदीप खरे) असे "त्याला" पावसाच्या साक्षीने वाटते तर "तिची" स्थिती कवयित्री शांता शेळकेंच्या शब्दात अलगदपणे उलगडते..
"वीज कडाडतां, भय दाटे उरीं ..एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग .."
मनस्वी माणसाच्या मनोवस्थेला कवी वा. रा. कांत "पाऊस जरि बाहिर पडतो ..आतून कुणीतरी भिजतो.." असे समर्पक शब्दरूप देतात.

काही आयुष्यांना गरिबीचा, अवहेलनेचा, विरहाचा शाप असतो, "जीवनाची" कडवट सत्य पचवलेल्यांना पाण्याची रूपं मोहं तरी कशी घालणार! पावसाच्या मार्‍यापासून आपला गळक्या छपराचा-गाडग्या-मडक्यांचा संसार जपू पाहणारी एखादी ती त्या पावसाला कशी कळवळून विनवते हे सांगून कवयित्री इंदिरा संत आपल्याला अंतर्मुख करतात. ती म्हणते..
"नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली.."
अशा वेळी चार्ली चाप्लीनचे शब्द आठवतात.. "मला पाऊस आवडतो कारण पावसात माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत" कवी चंद्रशेखर गोखलेंनी चितारलेलं पाण्याचं हे रूप तर अंगावर काटा आणतं...
"पाण्याचं वागणं.. किती विसंगत... पोहोणार्‍याला बुडवून.. प्रेताला ठेवतं तरंगत.."
बळीराजासाठी पाऊस म्हणजे वरदान आणि अतिवृष्टी किंवा अवर्षण दोन्हीही शाप.. वाट पाहून डोळे शिणायच्या आत जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकर्‍याचे डोळे आनंदाने पाणावतात. पेरणी होते. सृजनाचा हा उत्सव कवी वसंत सावंतांच्या या शब्दांनी साजरा होतो..तो अंकुर जणू म्हणतो..
"उरी नांगराचा रूते फाळ माझ्या.. भुईतून मी सारखा वाढतो
असा वाढताना नभोमाऊलीचा.. उमाळून पान्हाच मी चाखतो.."

पावसाचा प्रलयकारी अवतार सोडला तर त्याची सगळीच रूपं अतिशय मनोहारी असतात. काही गद्य माणसं असतात म्हणा... त्यांना पाऊस म्हटलं की चिखल, रबरबाट, निसरडं, तुंबलेली गटारं, नादुरूस्त छत्री, बंद पडलेली गाडी, शिंका, ओला वैताग हेच आठवतं....कुणी म्हणेल मुंबईच्या धावपळीत "मिठी " ओसंडून वाहिल्यावर आणि लोकल अडकल्यावर दुसरं काय आठवणार. हे खरं असलं तरी पाऊस या एका शब्दानेच बहुतेकांच मन निवतं आणि त्याच्या अनुभूतीने अगदी गारीगार होतं.. कल्पना करा..गरमागरम कांदाभजी- सोबत वाफाळता चहा- हातात एखादं छानसं पुस्तक किंवा एखाद्या आवडत्या गझलेचे-गीताचे सूर आणि खिडकीबाहेर निथळणारा पाऊस. सुख सुख म्हणतात ते हेच असावं. याहीपेक्षा रेनकोट न घालता, छत्री न घेता त्या पावसाला थेट जाऊन भेटून येण्यातला आनंद तर केवळ अवर्णनीय...
पावसाचा आणि मानवी भावनांचा अतिशय निकटचा संबंध आहे. भावना उत्कटपणे व्यक्त करण्याचं कदाचित पाऊस हे केवळ माध्यम असावं... मनातला गहिवर मेघांसारखा दाटून येतो आणि आनंदाश्रू किंवा दु:खाश्रूंच्या रूपाने ओघळतो-बरसतो म्हणूनच कुणी कवी असेही म्हणतो
"पाऊस ऋतुचे निमित्त करूनि दिसतो..
पाऊस पापणीआड कधिचा असतो.."

(पूर्वप्रसिद्धी- म.टा नागपूर)

अन्नब्रह्माचा अपमान

खवैयेगिरी की अन्नब्रह्माचा अपमान?
"एक और लड्डू ?" असे घाबरलेल्या चेहर्‍याने म्हणणार्‍या जावईबुवांची "इनो" ची जाहिरात आठवतेय? त्या जाहिरातीत "इनो" घेतल्यावर तेच जावईबुवा उत्फुल्ल चेहर्‍याने "हो ज्जाये लड्डू" म्हणत बाह्या सरसावतात. इनो घेऊ पण खाऊ म्हणणार्‍या आपल्या देशात खिलवण्यालाही खूप महत्व आहे. चांगलेचुंगले खाऊ घालूनच प्रेम व्यक्त करायची आपल्याला सवय झाली आहे. आग्रह खूप केला तरच पाहुणचार चांगला केला असे आपल्याकडे मानले जाते.
प्रख्यात साहित्यिक पु.लं.देशपांडे यांचा "माझे खाद्यजीवन" म्हणून एक सुंदर लेख आहे. खाण्याच्या त्या षोकामागे रसिकता आहे. पदार्थाबरोबरच त्याच्या रंग-रूप-रस-गंधाला दिलेली दाद आहे. सीमेवर रक्षण करत असताना अतिशय गारठून आत्महत्येचे विचार मनात येत असताना एका सैनिकाच्या हाती हा लेख पडला. असा खाद्यानुभव घेण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे या विचाराने त्याने सारे नैराश्य झटकून टाकले असे म्हणतात. विवीध प्रांतांचे खाद्यवैशिष्ट्य अनुभवण्याची कित्येकांना आवड असते. तर्‍हतर्‍हेचा स्वैपाक करून कुटुंबाला खाऊ घालण्यात गृहिणींना कृतार्थता वाटते. जागतिकीकरणाबरोबर लोकांच्या रूचीमधे बदल होऊ लागला आहे. २४ तास चालणारी फूड चॅनेल्स आवडीने पाहिली जाऊ लागली आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच पाचकांच्या जाहिरातींनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. "माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो" याचे उत्तर आज तरी माणूस खाण्यासाठी जगतो, हेच आहे.

हीच खवैयेगिरी आता रसिकतेची मर्यादा ओलांडू लागल्याचे दिसते आहे. इंदौरजवळच्या एका ’ढाणी’ मधे आम्ही जेवायला गेलो असताना वीस एक पदार्थांनी गच्च भरलेले ताट त्यांनी (तिकीट सारखेच असल्याने) लहान मुलांसमोरही ठेवले. जेवण सुरू करण्यापूर्वीच आम्ही त्यातले पदार्थ कमी करण्याची विनंती केली. ते चकित झाले पण त्यांनी केले काहीच नाही. मोठया माणसांनाही एवढे पदार्थ खाणे शक्य नव्हते. न राहवून आम्हीच ते काढून ठेवले आणि मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे (उत्तर भारतात) विचारून वाढणे हा पाहुण्यांचा अपमान समजला जातो(!) देशभरात कित्येक उपहारगृहांमधे रोज असे कितीतरी अन्न वाया जात असणार!
आपल्याकडे एकूणच (उत्तर भारतातच नव्हे) आग्रहाचा आणि मानपानाचा अजब संबंध लावला गेला आहे. "घर म्हणून" थोडंसं अन्न उरवण्यासाठी जास्त रांधण्याची देखील काही घरी पद्धत असते. उरलेल्या अन्नापासून थालीपीठासारखे पौष्टिक पदार्थ करून ते अन्न संपवले जाते, निदान गरीबांना दिले जाते, की सरळ टाकून दिले जाते? "आमच्याकडे सकाळची भाजी संध्याकाळी चालत नाही", "आम्ही मोजून स्वयंपाक करत नाही" असं कौतुकाने सांगितलं जातं. यात काही गैर नाही पण उरलेल्या अन्नाचे काय केले जाते? एखादेवेळेस गमतीखातर पैज लावून खवय्यांची स्पर्धा ठेवली जाते. तेवढे अन्न जिरवण्याची ताकद असलेल्या मंडळींनी ते खायला हरकत नाही. काही जण संकोची स्वभावाचे असतात तेव्हा थोडा आग्रह करण्यात वेगळीच आपुलकी आणि आनंद असतो पण बर्‍याचदा त्याचा अतिरेक होतो. अखेर ते अन्न पानात टाकून दिले जाते.


पंगतीत फार आग्रह होतो त्यापेक्षा "स्वरूची भोजन" ही नामी कल्पना आहे असे आधी वाटायचे पण ही बुफेची पद्धत मोजक्या लोकांसाठी ठीक आहे. समारंभात आपल्याकडे शेकडो लोक जेवायला बोलावले जातात. पुन्हा पुन्हा रांगेत जाण्यापेक्षा आत्ताच सगळे ताट खच्चून भरून घ्यावे असे लोकांना वाटते. खाण्याचे किती प्रकारचे स्टॉल्स समारंभात होते हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे ताटात पंजाबी भाज्या, मराठी झुणका-भाकर, बंगाली मिठाई खर्‍या अर्थाने "समरस" झालेले असतात. हे कमी की काय म्हणून चायनीज पदार्थ, चाट, आईस्क्रीम.. यादी संपत नाही आणि ताटातले पदार्थ देखील! साहजिक ते तसेच टाकून दिले जातात. उत्तम दर्जाचे पण मोजके पदार्थ करण्याचा पायंडा पाडणे आणि खाऊ शकू एवढेच पानात वाढून घेणे खरच इतके कठीण आहे?

आपल्या देशात कित्येक लोक अर्धपोटी झोपत असतात, गरिबी-कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. (एकात्मिक बालविकास योजना अपुरी पडते आहे) कुपोषणामुळे भारतातील जवळपास 42 टक्के मुले आरोग्यपूर्ण नाहीत, ही वस्तुस्थिती चिंतेत टाकणारी आहे, असे पंतप्रधानांचे या वर्षारंभीचे (१०-१-१२) वक्तव्य आहे. असे असताना अन्न टाकून देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे काय? कुणी काय आणि किती खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अन्नाची नासाडी हा नक्कीच सामाजिक प्रश्न आहे. शेगाव संस्थानच्या भक्तनिवासातील भोजनालयात भोजन सुरू असताना एक जण एक पाटी घेऊन थोडा थोडा वेळ प्रत्येक टेबलजवळ थांबतो. "हा प्रसाद आहे, उष्टे टाकून त्याचा अपमान करू नये" अशा आशयाचा मजकूर त्यावर असतो. आमटे परिवाराच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीतील भोजनालयाबाहेर, अन्न वाटप केंद्राकडे खुरडत जाणार्‍या कुपोषित बालकाचा फोटो लावला आहे. (या फोटोस पुलित्झर पारितोषिक मिळाले असून बालकाची अन्नान्न दशा पाहून व्यथित झालेल्या त्या फोटोग्राफरने अखेर आत्महत्या केली असेही तेथे लिहीले आहे) तो फोटो पाहिल्यानंतर कुणी अन्न वाया घालवण्याची शक्यता नाही. परंतु अशा फोटोतून संदेश द्यावा लागावा यातच सारं आलं.

गांधीजी पाणी पिताना तहान भागेल एवढेच पाणी पेल्यात घेत असत. अन्नाच्याही बाबतीत हा संस्कार होणे अत्यावश्यक आहे. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" इतका अलिप्त विचार श्लोकांमधून आपल्याकडे रूजवला गेला. गोळवलकर गुरूजींसारख्या संवेदनशील व्यक्ती देशातील उपाशी जनतेच्या विचाराने विकल होऊन एकभुक्त राहत असत. "मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातूनी देशसेवा, म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा" असा असामान्य विचार करणारे लोकही आपल्याच देशातले. "कशासाठी- पोटासाठी" म्हणणारा चाकरमानी एवढा उदात्त विचार करू शकत नसला तरी त्याला अन्नाची आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या कष्टांची किंमत आहे. मात्र प्रतिष्टेच्या नावावर अन्न उधळून देणारे काही धनदांडगे एकीकडे आणि अन्नाला मोताद समाज दुसरीकडे हे चित्र देखील आपल्याच देशातले आहे. स्वत:च्या भुकेबरोबरच इतरांच्या भुकेची जाणीव ठेवून वेळप्रसंगी घासातला घास दुसर्‍याला देणे ही आपली संस्कृती आहे. आपला प्रवास प्रकृतीकडून संस्कृतीकडे होण्याएवजी विकृतीकडे तर होत नाहीये ना!

पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि