Saturday, March 19, 2016

कारागृहातील साहित्य

’शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाये’

संत कबीर यांचा हा सुरेख दोहा. अनुभूतीतून उमटणारं सच्चेपण मांडणारा. प्रतिभा जर प्रखर अनुभवाच्या मुशीतून गेली तर त्यातून निर्माण होणारं साहित्य अधिक तावून सुलाखून अविष्कृत होतं हे सांगणारा. कारागृहासारख्या विपरीत पार्श्वभूमीचा विचार केला तर अशा परिस्थितीत होणारी साहित्यनिर्मिती अस्सल असते. लेखकाच्या वैचारिक प्रकृतीनुसार वेगवेगळी असली तरी ती जीवनाला थेटपणे भिडते. बोथस या सहाव्या शतकातील रोमन तत्त्ववेत्त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. त्या तुरूंगवासात लिहीलेलं ’कॉन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी’ हे कारागृहातलं पहिलं महत्वपूर्ण लेखन मानलं जातं. कारागृहातलं साहित्य( प्रिझन लिटरेचर) या विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक गेल्या जानेवारीत प्रकाशित झालं. कधी मृत्युच्या काळ्या छायेमधे तर कधी सश्रम यातना सहन करत तुरूंगवास भोगणार्‍या विख्यात व्यक्तीं यात व्यक्त झाल्या आहेत. यात सामाजिक मान्यता आणि मतांतरे यावरचं ऑस्कर वाईल्ड आणि जॉन बन्यान यांचं लेखन आहे, मादाम रोलंड तसेच अ‍ॅन फ्रँक यांचं बखरवजा लेखन आहे, जीन कॉसोचं हुकूमशाहीविरोधातील कवन आहे, प्रायमो लिव्हाईचं हत्याकांडाच्या सामाजिक परिणामांवरचं लिखाण आहे, ओ हेन्रीच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, एखाद्या रम्य स्थळी-घरी-किंवा अभ्यासिकेत बसून लिहीणे आणि कारागृहात सजा भोगत असताना लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या अतिशय निकट असतात, ते साहित्य गांभीर्याची डूब असलेलं आणि वास्तवाशी निगडीत असतं, हे यातलं समान सूत्र आहे.

हे सूत्र वैश्विक असलं तरी प्रस्तुत लेखात फक्त निवडक भारतीय लेखकांच्या कारागृहातील साहित्याचा विचार केला गेला आहे. भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी अतिशय दर्जेदार, उत्तम साहित्यिक मूल्य असलेलं आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेलं आहे. कारावासातल्या एकांतात स्वत:ला एकाकी वाटू न देता, निराश न होता तो वेळ मनन, चिंतन आणि लेखनाला देण्य़ाला या मंडळींनी प्राधान्य दिले, ते केवळ या सर्व व्यक्ती असामान्य होत्या म्हणूनच. स्वातंत्र्योत्तर काळातल्या कारागृहातील साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी ही त्यापेक्षा वेगळी होती आणि आहे. देशांतर्गत समस्यांमधून निर्माण झालेली अस्वस्थता त्या लेखनामधून जाणवते.

कारागृह म्हणजे प्रतिकूलतेचा कहर. अशा स्थितीत महाकाव्याची रचना महाकवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. लालित्यपूर्ण पण ओजस्वी शब्दरचना, भावनांची उत्कटता, प्रासादिकता त्यांच्या साहित्यकृतींमधे नेहमीच आढळते पण त्याहीपलीकडे जाऊन सावरकरांची लेखणी मनाचा ठाव घेते ती तर्कशुद्धपणे मांडलेले स्पष्ट विचार आणि  खणखणीत अभिव्यक्तीमुळे. ’तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण’ इतका दिव्य समर्पण भाव मातृभूमीप्रती व्यक्त करणार्‍या सावरकरांना ब्रिटिश सरकारने दोन जन्मठेपेची म्हणजे तब्बल पन्नास वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावून अंदमानच्या काळ कोठडीत डांबले. इथल्या अमानुष छळाला कंटाळून कित्येक कैदी आत्महत्या करीत किंवा विकल स्थितीत मरणाची याचना करत. सावरकरांना आठ बाय सहाच्या खोलीत डांबलेले होते. इतक्या विदारक स्थितीतही त्यांच्या प्रतिभेला काव्य स्फुरे. ’कमला’ आणि ’गोमंतक’ या महाकाव्यांची निर्मिती इथेच झाली. मृत्यूच्या दाढेत असूनही विजीगिषु वृत्तीने महाकाव्य लिहिणारे सावरकर हे जगातले एकमेव उदाहरण असावे. सावरकरांना काव्य सुचले तेव्हा त्यांनी जणू आभाळाला "माझा कागद होशील काय?' असे विचारले असणार अशी कल्पना करून लोककवी मनमोहन यांनी
"आभाळ म्हणाले ’नाही’ भूमीही म्हणाली ’नाही'।
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही"
अशी बोलकी कविता लिहीली आहे.
’कमला’ या काव्यसंग्रहातील
’अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची’
यासारख्या ओळीतून त्यांचा तेजस्वी ’राष्ट्रवाद’ प्रत्ययाला येतो.
अंदमानातली त्यांची शिक्षा दहा वर्षानंतर काहीशी शिथील झाली. लेखन साहित्य मिळू लागले. अंदमानातच सावरकरांनी उर्दू भाषेत गझलाही लिहिल्या होत्या, तब्बल 80 वर्षांनंतर या गझलांची त्यांच्याच अक्षरातली वही मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकाला मिळाली. अंदमानच्या तुरुंगातले लेखनिक प्यारेलाल यांच्याकडे सावरकरांनी ही वही दिली होती. या गझलेत आनंद आहे, विषाद आहे पण निराशा नाही. काळ्या पाण्याची शिक्षा हे देशसेवेकडे जाणारे , भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी उचललेले पहिले पाऊल अशा भावभावनांचा समुच्चय म्हणजे या गझला. जगाच्या अंतिम दिवशी देखील मी उच्चरवाने हेच सांगत असेन की मी हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थान माझा आहे, असं सांगणारी सावरकरांची प्रतिभा आपल्याला विस्मयचकित करून जाते. ते लिहीतात
’यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयां मेरा,
मै बंदा हिंदवाला हूँ, या हिंदोस्तां मेरा पहले।’

सावरकरांच्या जाज्वल्य देशाभिमानाच्या, कडव्या राष्ट्रवादी भूमिकेच्या तुलनेत विनोबा भावे वेगळे, ’सब भूमी गोपालकी’ या विचारधारेचे प्रणेते. वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलेंलं लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक, भावनात्मक फरक नाही. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार बदलली नाही, ती कायम मॄदु होती. तरीही विनोबा म्हणत, तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.
विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. परंतु ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ’ईशावास्य वृत्ती' हे पुस्तक लिहीलं. हे पुस्तक म्हणजे ’जगावं कसं’ याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. ’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.
ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात डांबले गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली. सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तिने ती टिपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना या सार्‍यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात होती. गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर ’गीताई माझी माऊली... मी तिचा बाळ नेणता, पडता रडता... घेई उचलुनि कडेवरी’. अर्थात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा, या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

’गीता’ हाच प्राण असलेल्या विनोबांच्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरूंगवासात असताना लिहीलेल्या ’गीतारहस्या’तून गीतेचे वेगळेच पैलू समोर येतात. याचे कारण विनोबा आणि टिळक यांची वैचारिक बैठक भिन्न होती. टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता तर गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पित रूपक. मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा टिळकांच्या ’गीतारहस्य’ ग्रंथाचा गाभा आहे. यात गीतेचा महाभारताशी असलेला संबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहेच त्याशिवाय गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण विवेचन स्वरूपात केलेले आहे.
बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांची तुलना अशा अनेक विषयांवर यात लोकमान्यांनी विद्वत्तापूर्ण भाष्य केले आहे. टिळकांचा झंझावाती कार्यकाळ बघता तुरूंगवासामुळेच हा भव्य लेखनप्रकल्प पूर्ण होणे शक्य झाले असावे. त्याअर्थी ही इष्टापत्ती म्हणता येईल.

किंग्जफोर्ड या न्यायाधिशाने बंगालच्या फाळणीला विरोध करणार्‍या तरुणांना फटक्यांची शिक्षा सुनावली होती; साहजिकच या काळातले टिळकांचे अग्रलेख अधिकच जहाल होत गेले. न्यायमूर्ती दावर यांनी २२ जुलै १९0८ रोजी टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात पोचेतो त्यांची सक्तमजुरीची शिक्षा एका ठरावाने रद्द होऊन साध्या कैदेची केली गेली, हा त्यातल्या त्यात दिलासा. मंडाले आणि काही काळ मेकटिलाच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ आणि ‘गीतारहस्य’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. हिंदू धर्माचा इतिहास, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, प्रांतिक कारभार, हिंदू कायदा, शिवाजी महाराजांचे चरित्र अशा अनेक विषयांवर लिहीण्य़ाचा त्यांचा मानस होता. परंतु कैद साधी असली तरी हा तुरूंग किती भयानक होता त्याचा अनुभव त्यांच्यानंतर पाच वर्षांनी त्याच कारागृहात गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांना आला. मंडालेची हवा इतकी खराब असताना एवढे बौद्धिक श्रम करणे लोकमान्यांसारख्या एखाद्या ज्ञानयोग्यालाच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. लोकमान्यांनी परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हे जागतिक संदर्भ देऊन सिद्ध करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला जागवेल आणि शमवेल अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते त्यामुळेच हा ग्रंथ इतका सरस सिद्ध झाला. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी एकंदर सामाजिक परिस्थिती बघता आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची तितकीच आवश्यकता आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंच्या कारागृहातील लेखनाचा पिंड मात्र अध्यात्मिक किंवा धार्मिक चिंतनाचा नव्हता. ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात त्यांना विशेष रूचि होती. सुरूवातीला ब्रिटीशांच्या कलाकलाने घेऊन आपल्या मागण्या रेटून धरणार्‍या कॉंग्रेसने १९३२ मधे नेहरूंच्या नेतॄत्वाखाली खणखणीतपणे पूर्ण स्वराज्याची मागणी करून स्वतंत्रपणे झेंडा फडकावला. ब्रिटीशांनी यावर दडपशाहीचे तंत्र अवलंबले आणि नेहरूंची रवानगी तुरूंगात झाली. त्याआधी नेहरू नुकताच युरोप दौरा करून आले होते. सुमेरियन, युरोपियन संस्कृतीची निरीक्षणे आणि इतिहासाच्या दांडग्या अभ्यासातून नैनी व डेहराडून येथील तुरूंगात असताना विश्लेषकाच्या भूमिकेतून त्यांचं ’Glimpses over world history' हे जगाच्या इतिहासाचं ओझरतं दर्शन घडवणारं पुस्तक साकार झालं. हे पुस्तक त्यांनी त्यांच्या मुलीला, इंदिरा गांधींना उद्देशून लिहीलेल्या पत्रांच्या स्वरूपात आहे. प्राचीन भारतीय इतिहास किती समृद्ध होता याची जाणीव तोवर फक्त अभ्यासकांपुरती मर्यादित होती. या पुस्तकाच्या निमित्त्याने त्याचं दर्शन जगाला घडवता आलं.

याच तुरूंगवासातल्या पुढच्या काळात त्यांनी ’ Towards freedom' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहीलं. हे पुस्तक त्यांनी पत्नी कमला नेहरूंना अर्पण केलं आहे. पूर्ण स्वराज्याच्या मागणीची पार्श्वभूमी या शीर्षकामागे होती. नेहरूंची वैयक्तिक आणि कॉंग्रेसची एकूणच जडणघडण कशी होत गेली, नेहरूंवर असलेला गांधीजींचा प्रभाव आणि वेगळेपण, त्यांना टिळक तसेच ना. गोखले यांच्याबद्दल असलेलं वैचारिक आकर्षण अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यांनी यात केला आहे. नेहरूंची विचारपद्धती समजून घेण्य़ासाठी अभ्यासकांना हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. या तुरूंगातल्या सुटकेबरोबरच हे पुस्तक विराम घेतं. १९४२ च्या ’चले जाव’ चळवळीतील सहभागामुळे नेहरूंवर कडक कारवाई होऊन त्यांना अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. या सलग चार वर्षाच्या तुरूंगवासात नेहरूंनी पुढे अतिशय गाजलेले ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहीले. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा आलेख यात मांडलेला आहे. यात प्राचीन, मध्ययुगीन काळापासून ते १९४५ पर्यंतचा भारताचा इतिहास सामावलेला आहे. प्रचंड आवाका असलेल्या या ग्रंथलेखनासाठी मौलाना आझाद तसेच गोविंद वल्लभ पंत यांची नेहरूंना मोलाची मदत झाली. याशिवाय 'bunch of old letters' हे एस.गोपालन यांनी संपादित केलेलं, पं. नेहरूंच्या कारागृहातून लिहीलेल्या विवीध पत्रांचं संकलन हे देखील नेहरूंचं कारावासातलं लेखन म्हणता येईल. नेहरूंचे एरवीचे काहीसे राजेशाही पद्धतीचे ऐटबाज जीवन आणि ब्रिटीशांकडून त्यांना जहाल क्रांतीकारकांच्या तुलनेत मिळणार्‍या सवलती यामुळे त्यांना बंदिवासात लेखन करणं सहजसाध्य होतं असं मानलं जातं. परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीनंतर ब्रिटीशांचा प्रचंड रोष त्यांना पत्करावा लागला, शिवाय त्यांची पुस्तक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर थेट भाष्य करणारी असल्याने ब्रिटीश सरकारची करडी नजर आणि सहकार्यात अनेक अडचणी यावर मात करतच नेहरूंना आपलं लेखन पूर्ण करावं लागलं.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या महानुभावांच्या कारावासातल्या लेखनाने समाजाला जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणार्‍या आशयगर्भ साहित्याची अपूर्व भेट दिली.

कारावासाचा अर्थ फक्त गजामागचं कोंडलेलं जीवन इतकाच न घेता लेखन स्वातंत्र्यावरील बंधन, वैचारिक मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्तीविरोध असा घेतला तर १९७५ मधील आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यकृतींना देखील कारागृहातील लेखन म्हणता येईल. आणीबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारे महत्त्वाचे लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेल्या अवस्थेतील एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर बाळ आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते बाळ निसटून खाली पडतं. क्षणभर तिचा चेहरा वेदनेने पिळवटतो आणि परत निर्विकार होतो. संवेदना गोठलेल्या त्या आईला जीवाच्या आकांताने ते बाळ उचलून घ्यावंसं वाटत नाही. युद्धामुळे किंवा टोकाच्या सामाजिक परिस्थितीत कशी बधिरता येते असं दिग्दर्शकाने यातून दाखवलं. हर्डीकर म्हणतात की आपल्या लेखकांनी तर अनुभवाची धग सोसण्याआधीच आविष्कार स्वातंत्र्याचं, मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं.
शासकीय दबावतंत्राला तळपत्या शब्दात विरोध करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांची आणीबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटेखानी पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यात दुर्गाबाईंनी एरवी विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे तेंडुलकरांसारखे साहित्यिक सार्वत्रिक बंदी आल्यावर मूग गिळून गप्प का बसले, असा खडा सवाल केला आहे. याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेल्या बंधनांना ठाम विरोध करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’

महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी जोडले गेलेले, साठीच्या दशकात मराठी अनियतकालिकांमध्ये कवितालेखन करणारे एक महत्त्वाचे कवी तुळसी परब. त्यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता म्हटल्या जातात. प्रेम आणि मृत्यु सारख्या जाणिवांवर असलेला सामाजिक आणि राजकीय अंकुश यातून दिसून येतो. बंदिवासातील दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. आणीबाणीविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या पुन:स्थापनेकरता संघर्ष करताना कारावास भोगणार्‍या अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या आठवणी, तसेच कारावासातील नोंदी स्फुट स्वरूपात ठिकठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. या संकलित स्वरूपात प्रसिद्ध झाल्यास या विषयाचा आणखी एक लुप्त पैलू उजागर होईल.
या उलट स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर जे साहित्यिक पुरस्कारांसाठी, अनुदान किंवा शिष्यवृत्तींसाठी लांगूलचालन करत शासनकर्त्यांना रूचेल पचेल अशीच साहित्यनिर्मिती करत आले त्यांनी मात्र आपले साहित्य स्वह्स्ते कारावासात डांबले असेच म्हणायला हवे.

आजही कारावासातल्या अनुभवांवर किंवा प्रत्यक्ष कारावासात साहित्यनिर्मिती होते आहे. अर्थात आज तुरूंगात डांबले जाणारे कैदी हे बहुतांशी गुन्हेगार किंवा आरोपी असतात, ती पूर्वीसारखी राजकीय नजरकैद नाही आणि त्या बंदिवासामागे पूर्वीसारखे उदात्त ध्येय नाही. साहजिकच उन्नत आंतरिक प्रेरणेतून, वैचारिक मंथनातून साकार झालेल्या तत्कालिन साहित्याची आणि आजच्या तुरूंगवासात केलेल्या लेखनाच्या गुणवत्तेची तुलना होऊ शकत नाही. आज जागतिकीकरणाने जगण्य़ाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. तत्कालिन साहित्यातून विस्तारत गेलेला मानवतेचा विशाल पट संकोचत जाऊन विश्वमानवाचा प्रवास ’मी’ वर येऊन स्थिरावल्याचे चित्र दिसते आहे. या सार्‍या छटांचा परिणाम साहित्याच्या दर्जावर होत गेलेला दिसून येतो.

 क्षणिक रागाच्या भरात ज्यांच्या हातून विघातक कृती घडली आणि कैद वाट्याला आली अशा कित्येकांनी कालांतराने पश्चातापदग्ध मनस्थितीत कवितेतून भावनांना वाट करून दिली. त्या कवितांना प्रस्थापित साहित्यिक परिमाणात मोजता येणार नाही. अशा कवितांचे संकलन म्हणजे उत्तम कांबळे यांनी संपादित केलेला ’गजाआडच्या कविता' हा काव्यसंग्रह. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरीत कायम करण्य़ाचं आमिष दाखवून शिक्षण संस्थेच्या चालकानं एका होतकरू तरूणाला पाच वर्ष फुकट राबवून घेतलं, वर डोनेशन या गोंडस शब्दाआड लाच घेतली आणि नंतर त्याच्या तोंडाला पाने पुसली. पुरावा नसल्याने पैसाही परत मिळेना तेव्हा संतप्त मनोवस्थेत या तरूणाने संस्थाचालकाचा खून केला. अशा घटना कवितेत कुठं कुठं झिरपताना दिसतात. मूल्यांना पायदळी तुडवून व्यवस्था पुढे जात असेल तर गुन्ह्यांकडे वळणारी पावले ही त्याची अपरिहार्यता तर नाही! ही सारी तगमग, असहाय्यता, उद्रेक सारं काही या कवितांमधून डॊकावतं. मराठीच नव्हे, तर अन्य भाषांतही असा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही. तुरुंगातले सगळेच कैदी दोषी असतात असं नाही. ""मी जेव्हा तुरुंग महा निरीक्षकपदाची सूत्रं स्वीकारली, तेव्हा ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत असे ६५ टक्के कैदी तुरुंगात होते, त्यांच्या खटल्यांचा निकाल लागायचा होता,‘‘ असं उद्धव कांबळे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितलं आहे. कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या, किंवा खटला प्रलंबित झाल्याने अंधारलेलं आयुष्य जगणार्‍या अशा कित्येकांच्या काळजातल्या संवेदनशीलतेवर त्यांच्या कवितेने कवडसा पाडला आहे.

अस्तित्वाच्या प्रयोजनाचा शोध आणि त्यातून होणारा माणूसपणाचा बोध हे सत्र साहित्यात निरंतर सुरू राहील. कारागृहातल्या एकांतवासामुळे घडणारे आत्मपरिक्षण आणि गजाआडच्या जगातले अनोखे अनुभव यामुळे या शोधाला एक सत्यनिष्ठ आणि अधिक गहिरा आयाम लाभतो हे निर्विवाद.


(पूर्वप्रसिद्धी -तरुण भारत विशेषांक)
पं.नेहरुंच्या लेखनाबाबत चर्चा- संदर्भ- अभ्यासक श्री. राज कुलकर्णी



Tuesday, March 15, 2016

किताबे (भावानुवाद)


पुस्तकं.. बंद कपाटाच्या काचेआडून डोकावणारी
जगाकडे आसुसून बघणारी..  पुस्तकं !
आता महिनोन् महिने भेट होत नाही.. माणसांशी
पुस्तकांच्या सान्निध्यातल्या उबदार तिन्हीसांजा
खिळल्यायत आता.. संगणकाच्या थंड पडद्यावर.
बेचैन.. अस्वस्थ झालीयत पुस्तकं.
ग्लानीत नकळत अवतरतात ..कपाटातून मेजावर
वाट बघत राहतात..आशेनं.. 
कुणी तरी चाळेल म्हणून

ज्या गाथा गायल्या त्यांनी ..एके काळी
ज्यांनी भारलेलं असायचं.. सारं घर
त्याचा मागमूसही
नाही उरला कुठे.
ज्यांच्या कथा असत..त्यात गुंफलेल्या
ती नातीसुद्धा आता छिन्नविछिन्न.. उसवलेली.
नकळत मी उलटलंच एखादं पान.. 
तर
ऐकू येतो..  त्यातून एक अनावर हुंदका.
शब्दांचे विखरून गेलेले मोती तेवढे घरंगळतात.. पानांवरून.
पर्णहीन फांद्यांसारखी.. ती शुष्क बोडकी अक्षरं
ज्यावर बहरतही नाही.. प्रतिभेची कोवळी पालवी
काचपात्रांच्या दिमाखापुढे
निष्प्रभ झालेल्या मातीच्या भांड्यासारखी...
निरूपयोगी.. केविलवाणी.. 
पुस्तकं !

पानं उलटताना जाणवणारी.. संमोहित करणारी..
हरवली ती आगळीवेगळी चव.
आता बोटं फक्त क्लिक करतात...निमिषार्धात
अन उलगडत जातं एक अफाट विश्व.. संगणकाच्या पडद्यावर
पुस्तकांशी असलेलं ते नातं.. 
उत्कट 
हळुवार
आपुलकीचं
संपलं...!!

वाचता वाचता निद्रेच्या कुशीत शिरताना.. हृदयाशी बिलगलेली पुस्तकं
कधी मांडीवर घेऊन.. तन्मय होऊन.. अनुभवलेली पुस्तकं
कधी दुमडलेल्या गुडघ्यांवर ठेवून .. तर कधी
घनदाट लिंबाच्या निवांत छायेत...भान हरपून वाचलेली पुस्तकं.
हरवला.. त्यांचा तो अलवार तरल स्पर्श.
’ज्ञान’ वगैरे...  आजही मिळवता येतंच की
पण 
त्या अवीट.. अबोल स्मृतींच्या पाकळ्या
पुस्तकातून जपलेल्या.. सुगंधी पानखुणा
पुस्तकं मागता घेताना, पडल्यावर हलकेच उचलून देताना
फुलत जाणार्‍या नवथर नात्यांच्या 
त्या नाजूक कळ्या
त्यांचं काय !! 
त्या कधीच उमलणार नाहीत आता
कदाचित.

( गुलजार यांच्या ’किताबे’ या कवितेचा मी केलेला भावानुवाद)