Tuesday, December 6, 2016

रांग आणि आपण


नुकत्याच व्यवहारातून बाद केल्या गेलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी प्रचंड मोठ्य़ा रांगा लागल्या. आता जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी जुन्या नोटा रांगेत उभं राहून बदलून घेणं, ज्यांच्याजवळ इतर आर्थिक व्यवहाराचे पर्याय नाहीत त्यांना यासाठी प्राधान्य देणं, ही सामाजिक शिस्तीशी संबंधित साधी आणि देशहिताचीच गोष्ट आहे. परंतु या रांगातून आपल्याला दोन मनोवृतींचे दर्शन झाले. मोदीविरोधकांनी सरकारच्या या देशपातळीवरच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांची कशी गैरसोय होते आहे याची ओरड सुरू केली, ओरड करणारे सगळे रांगेत स्वत: उभे होते असे मुळीच नाही. दुसर्‍या बाजूला मोदीसमर्थकांनी या रांगेत उभं राहण्य़ाच्या सहनशीलतेची तुलना थेट सीमेवर अविरत खडा पहारा देणार्‍या भारतीय सैनिकांच्या मनोबलाशी करून आपण देशासाठी प्रचंड काहीतरी करतो आहोत असा त्याला रंग दिला. अर्थात त्या भावनेमुळे का होईना, एरवी रांगेला वैतागणार्‍या बहुसंख्य जनतेने फारशी कुरकुर न करता परिस्थितीचा स्वीकार केला हे सत्य आहे. नोटांचा पुरवठा निर्धारित वेळेत करण्य़ात काही प्रशासकीय त्रुटी जाणवत आहेत, हे काही अंशी खरे असले तरी मुळात आपल्याकडे समंजस ’रांग-संस्कृती’ नसल्याने त्राग्याची तीव्रता ’वाढवण्य़ात’ आली हे नाकारता येत नाही.

लग्नसराई किंवा शालेय सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची झुंबड उडते. सार्वजनिक बस मधे ’खिडकीतून रूमाल टाकून’ किंवा आतल्या एखाद्या भोळसर दिसणार्‍या व्यक्तीला शेजारची सीट आपल्यासाठी राखून ठेवायला बजावून, ऐटीत जाऊन जागा पकडायची भन्नाट पद्धत चढताना रांग लावण्यापेक्षा कित्ती सोपी. स्वत:ऐवजी आपल्या चपला रांगेत ठेवून स्वत: मोबाईल मध्ये डोकं घालून बाकावर बसलेल्या मंडळींचा एक फोटो मध्यंतरी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला होता. एकूणच भारतीयांना, नोटबदल घटनेसारखे अपवाद सोडले तर रांगेत उभं राहणं हे फार कंटाळवाणं, कटकटीचं तर काहींना ते चक्क कमीपणाचं वाटतं. त्यापेक्षा त्यांना अशा युक्त्या सोयीच्या(!) वाटतात. दोन इंग्रज माणसं एखाद्या काऊंटरवर काही कामासाठी गेली तर शेजारी शेजारी उभं न राहता ते एकामागे एक असे रांगेत उभे राहतात असे त्यांच्या मनोवृत्तीचे वर्णन केले जाते. इंग्रज हा देश सोडून जाताना भारतीयांवर चार बर्‍या गोष्टींची छाप सोडून गेले. त्यापैकी महत्वाच्या काही म्हणजे स्वच्छता व टापटीप याचं भान, जगण्याशी संबंधित प्रत्येक घटकातले सौंदर्य शोधण्याची वृत्ती आणि शिस्त. अर्थात त्या बदल्यात दीडशे वर्षात ते ’डुगना लगान’ घेऊन आपल्याला पुरते लुटून निघून गेले. देश स्वतंत्र झाल्यावर आपण साहेबाकडून लादली गेलेली इंग्लीश भाषा आणि क्रिकेटप्रेम पुरेपूर उचलले, पण सामाजिक शिस्त आणि प्रत्येक गोष्ट दर्जेदार करण्य़ाची वृत्ती मात्र मन:पूर्वक स्वीकारली नाही. मुंग्यांना सुद्धा ज्याचे महत्व कळते ती रांगेची शिस्त तर अद्यापही आपल्यामधे पूर्णपणे भिनलेली नाही. ’हम जहाँ खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’.. अमिताभ बच्चन यांचा हा अजरामर संवाद कृतीत आणण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेक जण आजही निकराने करत असतात.

रांगेत परिक्षा असते संयमाची, सहनशक्तीची पण आपल्याला प्रचंड घाई आहे, कशाची कोण जाणे! सिग्नलला उभ्या असलेल्या पुढच्या गाड्या जर दिवा हिरवा होण्य़ाची वाट पाहत असतील तर त्यांना ओलांडून मागच्या रांगेतील गाडीवाल्यांना पुढे जायचे असते. बरं, तेवढी आणीबाणी असेल म्हणावे तर यातल्या कित्येकांना पुढच्या चौकात थांबलेल्या मित्राला भेटून फार तर पान तेवढे खायचे असते. एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट काढावे तर तिकीट घेताना हात बाहेर येणे मुश्कील कारण बर्‍याचदा त्या लहानशा खिडकीत आपल्यासोबत मागच्या एकदोन माणसांचा हात अडकलेला असतो. गाडीत चढता उतरताना रांग लावण्य़ाऐवजी दोन्ही पार्ट्यांचा घोळका पार गाडी सुटायची वेळ येईतो दारातच एकमेकात अडकून राहतो. उच्चभ्रू लोकदेखील याला अपवाद नाहीत, विमानतळावर रांगेची शिस्त मुकाट्याने पाळणारे बरेच लोक पार्कींग करताना मात्र गाड्य़ा योग्य त्या अंतरावर रांगेत न ठेवता ’आपल्याला गाडी काढताना सोयीचे होईल ना’ एवढाच निकष वापरतात. निदान शक्य आहे तिथे थोडा धीर धरला आणि रांगेचे नियम पाळले तर फारशा समस्या निर्माण होणार नाहीत.

जिथे रांगेला पर्याय नसेल, जसे पेट्रोल भरणे किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे, तिथे रांग हाताळण्याची बहुतेक कर्मचार्‍यांची चुकीची पद्धत, लोकांची संधी साधून ’मधे घुसण्य़ाची’ मानसिकता यामुळे आपण रांग-संस्कृती विकसित करू शकलो नाही. अशा कर्मचार्‍यांनी आपल्यालाही कधी ना कधी इतर कामासाठी कुठल्यातरी रांगेत उभे राहावे लागतेच हे विसरू नये. एखाद्या कंपनीची खास ऑफर, सिनेमाचा पहिला शो यासाठी स्वेच्छेने लागणार्‍या रांगांमधे सुद्धा हाणामार्‍या, गोंधळ, गडबड होणे आपल्याला नवीन नाही. यंदाच्या नोटबदल घडामोडीत मात्र बहुसंख्य बँक कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या रांगांना अतिशय कौशल्याने जादा तास वेगाने काम करून प्रतिसाद दिल्याच्या बातम्या येत आहेत ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.

असा बदल सर्व क्षेत्रात व्हायला हरकत नाही पण आपल्यासमोर लोकांच्या रांगा लागणं हे अनेकांना भूषणावह वाटतं. उदा: बहुतांशी डॉक्टर मंडळींना व्यवस्थापकीय तंत्र वापरून रूग्णांना विशीष्ट वेळ उपलब्ध करून देणं अशक्य नसतं. पण ताटकळत बसलेल्या रूग्णांच्या रांगेची लांबी हे जणू संबंधित डॉक्टरच्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) व्यावसायिक यशाच्या मापनाचं एकक झालं आहे. रांगेच्या समस्यांवर उपाय आहेत पण शोधण्याची इच्छाशक्ती हवी. रांग बिल भरण्य़ासाठी असो, की काही आर्थिक कागदपत्रांसाठी, अनेक रांगांच्या अवाढव्य लांबीला सर्वसामान्य भारतीयांची तंत्रज्ञानविषयक अनास्था देखील कारणीभूत आहे. एकतर अंतिम मुदत संपायला आली की आपल्याला जाग येते. अनेक सुशिक्षीत लोक ’ऑनलाईन’ व्यवहार करायला अद्याप भितात. केलेच तर ’कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय निवडतात. रोख रकमेसाठी पुन्हा एटीएम ला रांग लावतात. दारिद्र्य्ररेषेखालील लोकांची हतबलता आपण समजू शकतो परंतु सुमारे २२ कोटी भारतीय (संदर्भ- द हिंदू) स्मार्ट फोन्स आणि ४० कोटी भारतीय इंटरनेट वापरत असूनही फोन अथवा नेट बँकिंग समजून घेऊन त्याचा वापर करण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. बँकेने दिलेल्या तांत्रिक सूचनांचे नीट पालन केले तर यात हॅकींगचा धोका फारसा नसतो. रोख पैसे बाळगण्य़ापेक्षा नक्कीच कमी असतो. अगदी उच्चशिक्षीत लोक सुद्धा पेट्रोल वाया घालवून, हाफ डे घेऊन धडपडत लांबवर बिल भरायला जातात, रांगेतील गर्दीच्या नावाने खडी फोडतात, पण ऑनलाईन सुविधा वापरत नाहीत. खरं तर ’व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्याइतकच ते सोपं आहे. डिजीटल मनी, प्लास्टीक मनीचा वाढता वापर रांगेची गरज, अपरिहार्य असलेल्या रांगेची लांबी आणि त्यात होणारा वेळेचा अपव्यय निश्चित कमी करू शकेल.

रांगेचे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. अनेक विकसित देशात याच्या प्रणालींचा वापर सुपरमॉल सारख्या ठिकाणी केला जातो. तरीही याच्या उपयोगितेबद्दल स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ. मार्टिन म्हणतात ,"मानवी वर्तनाचं कोडं जोवर सुटत नाही तोवर रांगेचं व्यवस्थापन या संकल्पनेत तथ्य शोधण्य़ात अर्थ नाही." आपल्याकडे मात्र रांगेच्या व्यवस्थापनचं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे दर्शनबारीतील लहानथोर सर्वांचा ’माऊली’ म्हणून एकाच पातळीवर सन्मान करणारं, विदर्भातील शेगाव येथील धार्मिक संस्थान. केरळ राज्यात पर्य़टनासाठी गेले असताना एका प्रसिद्ध मंदिरात ’तात्काळ’ दर्शन घेता यावे म्हणून आम्ही ’देणगी’ दिली. रांगेत जास्त वेळ गेला तर पुढचे स्थलदर्शन हुकेल इतक्याच हेतूने ते केले. परंतु दर्शन घेऊन बाहेर पडताना कडेवर लहान मूल घेतलेल्या स्त्रिया, वृद्ध पुरूष यांच्यासह अनेक जण लांबलचक दर्शनबारी मधे तिष्ठत उभे असलेले पाहिले आणि अतिशय अपराधी वाटले. रांगेचा फायदा सर्वाना मिळायला हवा याची नैतिक जाणीव झाली. रांगेचा अपमान करणारा, ’पुढे घुसण्याचा’ असा अधिकृत परवाना, किमान आपण तरी यापुढे घ्यायचा नाही हे मनोमन पक्के ठरवले.

रांग कुणाला चुकलीय. अगदी चार खांद्यांवरून स्मशानात जातानाही ती चुकत नाही. परंतु पाण्य़ाच्या टॅंकरसाठी किंवा सिलेंडरसारख्या मुलभूत गरजांसाठी लागणार्‍या रांगा ही मात्र देशासाठी अभिमानाची बाब नाही, अशा रांगांची आवश्यकता न उरणे ही खरी प्रगती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळॆस इंग्लंड मधे अंड्यांचा तुटवडा भासत होता. ब्रिटीश सरकारने त्यांच्या नागरिकांना सैनिकांसाठी अंडी राखून ठेवा असे आवाह्न केले. अनेक नागरिकांनी तेव्हा रांगा लावल्या, पण त्या रांगा खरेदी केलेली अंडी परत करण्य़ासाठी होत्या. ही वदंता आहे की सत्यकथा माहित नाही पण देशप्रेमी नागरिकांची अशी रांग हीच देशाची खरी संरक्षक भिंत आहे असे म्हणता येईल. आपण आपले देशप्रेम नुसत्या नारेबाजीऐवजी रांग-संस्कृतीसारख्या लहानसहान बाबी नीट जोपासून व्यक्त करायला काय हरकत आहे ! जपानच्या प्रगतीत त्या देशातील सुदृढ रांग-संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे असे मानले जाते. आपल्याकडे सुद्धा सर्वंकष प्रगतीसाठी रांगांची संख्या आणि लांबी कमी व्हावी, मानवी तास वाचावेत. अर्थात वाचलेले मानवी तास सत्कारणी लागावे हे देखील तितकेच महत्वाचे.

उच्चपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका वयस्कर स्नेह्यांना सगळे तंत्रज्ञान अवगत आहे, त्यांच्याकडे डेबिट -क्रेडिट कार्ड सगळे काही आहे. अगदी आवश्यक असेल तेव्हा ते या तंत्राचा नीट वापर करतात परंतु एरवी बँक, पोस्ट, बिलभरणा केंद्र, चित्रपटगृह अशा बहुतेक ठिकाणी ते शक्यतो चालत जातात आणि रांगेत उभे राहून आपले काम करतात. कुणाला अडचण असेल तर फॉर्म वगैरे भरायला मदत करतात. "या निमित्ताने माझा व्यायाम होतो, वेळ छान जातो, रांगेची शिस्त एकूणच आपल्या जगण्य़ात उतरते, रांगेमधे आपण कुणी ’खास’ नसतो त्यामुळे आपण ’जमिनीवर’ राहतो, मुख्य म्हणजे माणसं दिसतात, भेटतात, अनुभवता येतात आणि या सगळ्य़ात एक वेगळीच गंमत आहे." असं त्यांचं म्हणणं. अशा विचारांच्या माणसांची आपल्या देशातली रांग मात्र कधीच संपू नये.

Article published in sunday special Divya Marathi
http://digitalimages.bhaskar.com/thumbnail/703x1096/divyamarathi/epaperimages/20112016/19akola%20city-pg10-0.jpg?11

Thursday, November 10, 2016

सुरक्षा

डिसेंबर २०१२ मधले दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि कोपर्डी प्रकरण यामुळे जनमानस ढवळून निघाले. दोन्ही घटनांच्या विरोधात लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले.  दोन्ही घटना अतिशय क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणार्‍या होत्या, त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटायलाच हवे होते. परंतु अशा घटना नंतर कमी झाल्या का, तर नाही. कारण या घटनांचे मूळ ज्या मानसिकतेत आहे ती फारशी बदलली नाही.

बलात्कार हे अनेकदा फक्त वासनापूर्तीचेच साधन नसते. डिवचल्या गेलेल्या तथाकथित पुरूषार्थाच्या नावाखाली, संबंधित स्त्रीला अद्दल घडवून तिला तिची जागा (!) दाखवून देण्य़ासाठी त्याचा सर्वात सोपा उपाय म्हणून वापर केला जातो. कित्येक पुरूष एकमेकांचा बद्ला घेताना विरूद्ध पक्षातील स्त्रीचा वापर करतात. दंगल, युद्ध अशा परिस्थितीत तर शत्रूपक्षातील स्त्रियांवर बलात्कार करायला मोकळे रानच मिळते असे जगाचा इतिहास सांगतो. भारतात परिस्थिती वेगळी नाही. समाजात माजलेल्या योनिशुचितेच्या अवडंबराचा या नराधम वृत्तीच्या लोकांना फायदा मिळतो. स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांडं हेच आपण ऐकत आलो आहे. तिने ते जपलच पाहिजे, पण तिची चूक नसताना ते ओरबाडलं गेलं तर तर आता ती जगायच्या लायकीची राहिली नाही असं आजही आपला समाज मानतो. "भगवान के लिए मुझे मर जाने दो, मै बर्बाद हो गयी, किसीको मुह दिखाने के काबील नही रही" म्हणत आत्महत्या करायला निघालेल्या बटबटीत हिंदी सिनेमातील नायिका त्या मानसिकतेत भर घालतात. या योनिशुचितेच्या ओझ्यापायी मुळात कितीतरी प्रकरणे कायद्यासमोर येतच नाहीत.

अत्याचाराच्या प्रत्यक्ष घटनेनंतरच्या संशयित नजरांनी, टोचून बोलण्याने त्या मुलीला जगण्यापेक्षा मरण अधिक सोपे वाटते. तिचं आणि तिच्या घरच्यांचंही जगणं मुश्किल करून टाकणार्‍या या समाजाला, कोण काय शिक्षा देतो?  स्त्रीच्या मदतीला कायदे आहेत पण ते राबवणारी यंत्रणा पुरूषप्रधान मानसिकतेचीच बळी आहे. ’सुनता है आज कौन द्रौपदी की चीख को..हर जगह दुस्सासन सिपहसालार नजर आते है’ अशी एकंदर परिस्थिती आहे. तेव्हा बलात्काराबद्दल शक्य तितकी कडक शिक्षा व्हावी व त्या तरतुदीत असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला हवेत. परंतु तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ. राममनोहर लोहिया असे म्हणत की, ’बलात्काराने स्त्री भ्रष्ट होत नाही’ असा संकल्प स्त्रियांना व सर्व समाजानेही करायला हवा. कायद्यात बलात्कार करणारा पुरुष गुन्हेगार मानण्यात येतो. स्त्री निर्दोष असते. मग जे कायद्याने मान्य केले आहे ते समाजाने का मान्य करू नये !"
तेव्हाच त्याविरुद्ध तक्रार करायला स्त्रिया न घाबरता पुढे येतील, साहजिक पशुवृत्तीला जरब बसेल आणि असे कृत्य करण्याची कुणाची सहजपणे हिंमत होणार नाही.  बलात्काराने स्त्रीच्या सामाजिक स्थानाला अजिबात धक्का लागत नाही हे एकदा कळले तर किमान सूडभावनेने होणारे बलात्कार निश्चितच कमी होतील. अर्थात हे घडण्य़ासाठी आपल्याला स्वत:ला काही न रूचणारे, आपल्या मूल्यांना-परंपरांना धक्का देणारे प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तर शोधावी लागतील.

शक्ती मिल घटनेतील छायाचित्रकार तरूणीने यावरचं उत्तर शोधलय. बलात्काराच्या घटनेनंतर तीही हादरली पण तिने स्वत:वर वैद्यकीय उपचार करून घेतले. खंबीर मनाने कायद्याचा पाठपुरावा करून त्या नराधमांना कारागृहात पाठवून तिने तिच्या करियरला पुन्हा जिद्दीने सुरूवात केली आहे. तिच्या बाबत ही घटना घडली तेव्हा ही मुलगी तिच्या कामाचा भाग म्हणून चित्रण करण्य़ासाठी ’शक्ती मिल’ परिसरात गेली होती. त्यावर बरेच जण म्हणाले मुलीच्या जातीने अशा नोकर्‍या करूच नये. अशी उत्तर ऐकल्यावर वाटतं, स्त्रियांना माजघराच्या अंधारातून बाहेर आणून जगातला सूर्यप्रकाश दाखवणार्‍या आगरकर, कर्वे, फुले या सार्‍यांच्या कष्टावर हे लोक बोळा फिरवत आहेत. बरं, मग घरातच असणार्‍या स्त्रिया ,मुली तरी सुरक्षित असतात काय? कित्येकींवर त्यांच्या घरातल्यांनीच किंवा जवळच्या नातेवाईकांनी अत्याचार केल्याच्या केसेस समोर आल्या आहेत. तेव्हा आता तरी स्त्रियांनी काय करावं हे त्यांना ठरवू देत. आर्थिक गरज, शिक्षणाचा उपयोग, काही करून दाखवायची जिद्द यातल्या कुठल्याही कारणाने असो, बाहेर पडणार्‍या स्त्रीला मनात एक भीतीचं ओझं सतत बाळगावं लागतं. फक्त नोकरदार स्त्रियाच असुक्षित आहेत असे नाही तर गृहिणींनाही ही भीती चुकत नाही. खेड्यातून स्त्रियांसाठी सोयींचा प्रचंड अभाव आहे.- दूरवरून पाणी आणणार्‍या, अंधारात -पहाटे प्रातर्विधीसाठी अडोशाला जाणार्‍या महिला-मुलींवर अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना कशी जागी होणार.

या संदर्भात वाचलेली एक कविता अशी आहे.
’लक्ष्मणाने सीतेसाठी ओढली एक रेषा..लक्ष्मणरेषा
तिने ती ओलांडली आणि घडले ..रामायण
आम्हासाठी दाही दिशा लक्ष्मणरेषा
त्या ओलांडाव्याच लागतात
रावणांना सामोरे जावेच लागते
फरक इतकाच की घेत नाही  पोटामधे...भुई दुभंगून’
काही गैर घटना घडली तर धरणीने पोटात घ्यावे अशी आळवणी करण्य़ाचे दिवस आता संपावेत. 'उठो द्रौपदी वस्त्र सम्हालो.. अब गोविंद ना आयेंगे' हे स्त्रीने नीट समजून घ्यावं.
आजच्या मुलींनी आपल्या करियरला, जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जावं. मोबाईलवर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करावा. गुन्हेगारावर पटकन फवारता येतील असे स्प्रे उपलब्ध आहेत ते जवळ ठेवावे. महत्वाचे नं जवळ ठेवून, फोनद्वारे घरच्यांच्या संपर्कात राहून, सावध-सतर्क राहून ,विचार करून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर मुलींची सुरक्षितता या मुद्द्याचा वेळॆशी संबंध राहणार नाही. यासाठी सर्वात महत्वाच्या २ गोष्ट समाजाने स्वीकारल्या पाहिजेत, पहिली म्हणजे जे संस्कार आपण मुलींवर करतो तेच मुलांवर करायला हवेत. कुठेतरी वाचलेले हे वाक्य तर फारच महत्वाचे- 'मुलीचे चारित्र्य घड्याळाचे काटे ठरवत नाहीत.'
हे समजून घ्यायला हवे. या बाबतीत आशेचा किरण म्हणजे एमएआरडी सारख्या संघटना, ज्याद्वारे अनेक समंजस पुरूष महिलांच्या पाठीशी उभे राहत आहेत.

बलात्कार हे स्त्रीच्या मानभंगाचं टोक मानलं तरी दररोज घडणारे घरगुती हिंसाचार स्त्रीचं मानसिक खच्चीकरण स्लो पॉयझनिंग सारखं करत असतात. तक्रार केली तर पहिले बोट तिच्याच चारित्र्यावर रोखले जाते. आधी तिला बर्‍याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्यापैकी सर्वात पहिला आक्षेप समाजातून नोंदला जातो तो तिच्या पोषाखावर. फक्त पोषाखामुळे अत्याचार होत नाहीत- तसे असते तर लहान बालिका, वृद्धा, मतीमंद मुलींवर अत्याचार नसते झाले. इंटरनेटवर पॉर्न साईट्स, तर मोबाईल वरचे पॉर्न व्हिडीओ याचं प्रमाण प्रचंड आहे. त्या माध्यामावर कुणाचा अंकुश नाही. अशा वातावरणात ज्या वासनांध पुरूषांचा सांस्कृतिक गुणांक कमी आहे, त्यांना पाश्चात्य किंवा वेगळा पोशाख केलेल्या मुलींकडून अश्लील संकेत मिळत असल्याचा ग्रह होतो आणि अनेकदा त्याची परिणीती छेडछाड, विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंत होते हे सत्य आहे. तेव्हा तत्वत: पेहरावामुळे बलात्कार होतात हे तर्काला धरून नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपण जेथे जात आहोत तेथे आपला पोशाख अनुचित वाटणार नाही ना याचे भान स्त्रियांनी ठेवणे आणि आपल्या देहबोलीतून, शब्दांमधून, पोषाखातून चुकीचा संदेश जात नाही ना याची काळजी घेणे भाग आहे .ते अत्याचारामागचं एकमेव कारण नसलं तरी स्रीला उपभोग्य वस्तू मानणार्‍या आपल्या समाजातल्या वाढत्या स्त्री अत्याचारांमागच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं. त्याचबरोबर बहुसंख्य विकसित देशात स्त्रीने कोणता पोशाख घातला आहे, यावरून तिचं चारित्र्य कधीही जोखलं जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं आणि असं असूनही तेथील स्त्री अत्याचारांचं प्रमाण भारतापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ही समस्या भारतात कमी होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते लैंगिक शिक्षण. त्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. योग्य लैंगिक शिक्षणामुळॆ मनात निर्माण होणार्‍या वासनेचे दमन करण्यासाठी एखाद्या स्त्रीला अवजारासारखे वापरणे म्हणजे पुरूषार्थ नव्हे ही समज येते. वासनेमधली नैसर्गिकता स्वीकारून ती उर्जा सकारात्मक कार्याकडे कशी वळवता येइल याची जाण येते किमान ती हाताळता येतेआणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री फक्त मादी नसून मन, भावना असलेली हाडामासाची माणूस आहे याचे लख्ख भान येते.

स्त्रियांना कायद्याची फारशी माहिती नसते शिवाय आजही कोर्टाची पायरी शक्यतो चढू नये अशी वृत्ती आहे. त्यामुळे अनेक गुन्हे गुलदस्त्यातच राहतात. अपराध्याला कायद्याने शिक्षा झाली तर निर्दोष असणारी परंतु फिर्याद करणारी स्त्री ही आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावून बसते.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
अशी तिची अवस्था असते. उदाहरण द्यायचं तर, ‘हुंडाप्रतिबंधक कायदा’ सुरू होऊन बरेच दिवस झाले पण रोज वर्तमानपत्रात आपण हुंड्यासंबंधीच्या विविध बातम्या वाचतो असतो. मग असे वाटते की, तेव्हा लागू केलेला हुंडाप्रतिबंधक कायदा कुठे गेला ? आता घरगुती छळ - महिला सुरक्षा कायदा अमंलात आलेला आहे. या कायद्यामध्ये शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक व भावनिक, आर्थिक छळ तसेच छळाची धमकी देणे यासारख्या गोष्टींचा समावेश, शिक्षणव्यवस्थेत जाण्यास मनाई करणे, विशिष्ट व्यक्तीसोबत विवाह करण्यास राजी करणे, आत्महत्येची धमकी देणे यासारख्या बाबींचा समावेश होतो. पण हा कायदा खरेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांपर्यंत जाऊच द्या, शहरी महिलांपर्यंत तरी पोहोचला आहे का ? अश्लीलताविरोधी कायदा सुद्धा आपल्याकडे आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणाऱ्याला वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना फक्त महिला पोलिस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापू्र्वी अटक क,रू शकतात. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.

लोकशाही जगाच्या पाठीवर अवतरल्या नंतरच स्त्रीला माणूस आणि नागरिक मानले पाहिजे असा विचार मूळ धरू लागला. सर्वच लोकशाही राष्ट्रात घटनेने आणि कायद्याने स्त्रीला नागरिक मानून समान स्थान दिले असले तरी आपल्याकडे ते फक्त कागदोपत्री. घरात वडील आईचा नकार सहन करू शकत नाही, तिची चारचौघात अक्कल काढतात हे पदोपदी दिसत असल्याने एखाद्या मुलीने आपल्याला नकार द्यावा, कोणत्याही बाबतीत वरचढ व्हावे हे मुलांना सहन होत नाही. त्यामुळे सर्वात आधी कुटुंबसंस्थेत लोकशाही खर्‍या अर्थाने रूजवायचे आव्हान आज आपल्यापुढे आहे. त्यासाठी समाजरचनेत काही बदल करावे लागतील. (उद्धृत संदर्भ - स्त्रिया आणि सुरक्षितता - दिव्य मराठी, मधुरिमा) अमुक कामे पुरूषांची आणि अमुक स्त्रियांची ही चौकट सुद्धा हळूहळू मोडावी लागेल. सुदैवाने मंद गतीने का होईना आजच्या तरूणांमधे बदल होतो आहे. घरावरच्या पाटीवर ते सहचारिणीचे नाव सन्मानाने आवर्जून लिहू लागले आहेत. एकूण स्त्री ला सुरक्षितपणे जगता यावं यासाठी समाजाने बदलायला हवं.

स्त्रिया याच समाजाचा सुमारे ५०% भाग आहेत, म्हणजे स्त्रीनेही बदलायला हवंच. समानता फक्त सोयीपुरती वापरण्य़ाची गोष्ट नाही ,त्यामुळे अनेकदा असेही वाटते, की काही स्त्रियांना समान अधिकार, स्वातंत्र्य, समता नको आहे का, की त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची त्यांना भीती वाटते? मुलीचा बाप अगतिक असतो असे मानले तरी शिकलेल्या व कमावणाऱ्या मुलींनी अगतिक का व्हावे ? हुंडा घेणाऱ्या मुलाशी आम्ही लग्न करणार नाही अशी भूमिका त्यांना का स्वीकारता येऊ नये? मी एक आई म्हणून -मुलाला फक्त पुरूष म्हणून आणि मुलीला फक्त स्त्री म्हणून न घडवता एक समंजस, संवेदनशील, खुला विचार करणारा माणूस म्हणून घडवीन असा विचार आजच्या स्त्रीने का करू नये? स्त्रीला एक सन्मानाचं सुरक्षित आयुष्य़ पुरूषांच्या सहकार्याशिवाय लाभणं शक्य नाही. स्त्रियांच्या उन्नतीसाठी कित्येक पुरूषांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. स्त्री पुरूष समन्वयातूनच एका सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते परंतु काही करंट्या पुरूषांनी स्त्रीच्या अस्मितेला लावलेली ही कीड आता मुळापासून उपटण्य़ासाठी मुलींनी स्वत:ला बद्लायला सुरूवात करायला हवी. शिक्षणाची आस, संस्कार आणि वाचनाची कास धरलेल्या मुलीचं व्यक्तिमत्व लखलखीत होतं. योग्य आहार घेतला, खेळाला, शारिरिक चापल्याला आयुष्यात स्थान दिलं तर धडाडी वाढते. जगाबरोबर ताठ मानेने चालण्याचं आणि समोरच्याच्या नजरेला नजर भिडविण्याचे बळ तिच्यात येते. कोणीतरी मदतीला येईल, यापेक्षा मी स्वत: कशी सक्षम, समर्थ होईन यासाठीही ती जागरूक राहते. परप्रकाशी चंद्र होण्यापेक्षा ती स्वयंप्रकाशी काजवा झाली तरी हरकत नाही. आत्मभान जागा असेल तर त्या तेजस्वी स्त्रीचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही.

स्त्री सुरक्षा म्हणजे फक्त स्त्री देहाची सुरक्षा नाही तर तिच्या आत्मसन्मानाचे जतन, संवर्धन. भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. ही स्त्री शक्ती आता फक्त प्रतीकात्मक न राहता अस्तित्वात यावी.

-Lokmat Diwali 2016

Friday, August 12, 2016

विनोबा आणि ग्रामोदय


’तरूण भारत’ च्या वर्धापनदिन विशेषांकात (ऑगस्ट २०१६) प्रसिद्ध झालेला लेख
विनोबा आणि ग्रामोदय


’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’ शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे. ’ग्रामोद्धारा’चा विचार करताना विनोबांच्या प्रत्येक संकल्पनेत याच आत्मीयतेचा प्रत्यय येतो. विनोबांचा कृतीप्रवण कार्यकाळ हा मुख्यत: स्वातंत्र्यपूर्व. परंतु त्यांच्या ग्रामोद्धाराच्या बहुतेक संकल्पना आजही लागू होऊ शकतात ही बाब एकीकडे त्यांचे द्रष्टेपण दर्शवते, दुसरीकडे स्वातंत्र्यप्राप्तीला ६८ वर्ष उलटून गेली तरी आपल्या देशातल्या मुलभूत समस्या अजूनही त्याच आहेत हे कटू सत्य देखील अधोरेखित करते.
या समस्यांवर उपाय म्हणून केंद्रात सत्तेवर येताच शहरी विकासाच्या संकल्पनांवर भर देणार्‍या मोदी सरकारने आता ग्रामीण विकास आणि शेती विकासावर भर द्यायला सुरूवात केली आहे. ’गरीबी हटाओ’ हा नारा काही नवा नाही. शेतकरी आणि कामगारांची प्रगती, हा देशच नव्हे तर राज्य किंवा अगदी स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचा कायमच मुख्य अजेंडा राहिलेला आहे. मात्र बहुतेक वेळा या योजना कागदावर, किंवा थोड्य़ा पुढे गेल्याच तर ’नोकरशाहीच्या लाल फीतीत’ अडकून राहिल्या आहेत, असेच आपला राजकीय इतिहास सांगतो. त्यातूनही काही योजना मुसंडी मारून पुढे गेल्याच तरीही आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात त्यांना अनेकदा खीळ बसते. शेतकर्‍यांचे प्रश्न उच्चस्तरावर चर्चेला येतात, एखादी ’कलावती’ राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरते परंतु समस्यानिवारण मात्र होत नाही. कर्जमाफीसह अनेक उपाय अवलंबिले गेले; परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते सोडवता यावेत म्हणून आज ’मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिय़ा’, ’स्टार्ट अप इंडिया’, ’शून्य शिल्लक बँक खाते’ अशा विविध बहुआयामी योजना वेगाने सुरू झालेल्या दिसतायत. याशिवाय केंद्र सरकारने ‘ग्रामोदय से भारत उदय’ अभियान यंदा १४ एप्रिलला जाहीर केले आहे. पूर्वी सत्तेवर असणार्‍या सरकारांनी याबाबतीत काहीच प्रयत्न केले नाहीत असे नक्कीच म्हणता येणार नाही तरीही केंद्र सरकारने नव्याने घोषित केलेला ‘ग्रामोदय से भारत उदय’ कार्यक्रम या सगळ्य़ांपेक्षा वेगळा आहे.

वाजपेयीजींना ’अजातशत्रू’ मानले गेले आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्या योजनांकडे देशातील जनतेने कायम ’निखळ’ आणि सकारात्मक दृष्टीने पाहिले, तरीही त्यांच्या सरकारला २००४ मध्ये पायउतार व्हावे लागले. ’शायनिंग इंडिया’ शब्दप्रयोग आणि त्यातून झालेला भ्रमनिरास हे यामागील कारण असावे असे राजकीय विश्लेषक म्हणतात. हे विचारात घेता नव्या मोहिमेसाठी मोदी सरकारने ‘ग्रामोदय’ शब्दाला केंद्रस्थानी ठेवून मगच ‘भारत उदय’ ही भावना स्पष्ट केली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पातही या भावनेचे प्रतिबिंब उमटले होते. म्हणूनच देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी 2 लाख 292 कोटी रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिले गेले आहेत. ग्रामोदय हा शब्द बहुपदरी आहे. त्यात शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, दलित आणि आदिवासी समुदायांना प्रतिनिधीत्व अशा अनेक प्रश्नांची उकल करण्य़ाचा सरकारचा मानस आहे. यातून ग्रामीण विकासाचे ध्येय गाठले जाणार की सत्तर वर्षांच्या राजकीय इतिहासाप्रमाणे या योजना मूठभर लोकांच्याच हिताच्या ठरणार ही शंका ’दुधाने तोंड पोळलेल्या’ बहुसंख्य भारतीयांच्या मनात आहे. या योजना कागदावरून सरकारी कार्यालयापर्यंत तर पोचल्या आहेत परंतु आता त्यांचं यश लोकसहभागावर अवलंबून आहे. राजसत्ता लोकमताच्या आणि लोकसहभागाच्या आधारे उत्तम कार्य करू शकते, पण लोकमत निर्माण करण्याचे काम ऋषीच करू शकतात असं म्हटलं जातं. आज अशा ऋषींची वानवा आहे, म्हणूनच मागे वळून विनोबांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या, ग्रामोदयाच्या विचारांना समजून घेण्य़ाची गरज निर्माण झाली आहे.

विनोबांच्या ’सर्वोदय’ या संकल्पनेतच ग्रामोदयाचाही समावेश होतो. ’अधिकाधिकांचे अधिकाधिक सुख’ या उपयुक्ततावाद्यांच्या मूळ सूत्रापेक्षा किंवा जेरेमी बोथॅम च्या ’बहुजनांचे कल्याण’ या संकल्पनेपेक्षा सर्वोदयाचे उद्दिष्ट्य़ अधिक व्यापक आहे. सर्वांचा अभ्युदय, व्यक्तीची स्वायत्तता आणि शासनमुक्त समाजाचा आग्रह धरणारा हा सिद्धांत आहे. येथे शासनमुक्त म्हणजे मनमानी कारभार असा अर्थ नसून शास्ते आणि आणि शासित असा विभाग न करता स्वयंशासित समाज असा अर्थ विनोबांना अभिप्रेत होता. जातीभेद आणि पिळवणूक यांना थारा नसलेला, सत्य, अहिंसा आणि साधनशुचिता या पायावर उभा असलेला नवा समाज निर्माण करणे म्हणजे सर्वोदय. विनोबा राज्यांच्या राजकारणापेक्षा सहकाराच्या राजकारणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी ग्रामोद्धारासाठी निर्धारित केलेली नियोजनाची मूलतत्वे समजावून घेतली तर हे लक्षात येते. विनोबा म्हणत "प्रत्येक हाताला काम हेच रोजगार योजनेचे उद्दिष्ट्य़ असायला हवे. उत्पादकता हा एकमेव निकष काम देताना लावण्य़ात आला तर ती योजना सर्वसमावेशक म्हणता येणार नाही. प्रत्येक शासकीय योजनेने तळागाळातील जनता आणि वंचितांच्या उत्थानाला प्राधान्य द्यायला हवे. कुणीही बेकार आणि भुकेले राहणार नाही याची काळजी घेतली गेली तरच त्या नियोजनाला अर्थ आहे. मुलभूत गरजांची पूर्ती केल्याशिवाय ’जीवनमान उंचावण्यासाठी नियोजन’ ही संकल्पना कुचकामी ठरेल. " असे ते म्हणत. नियोजनाचे देखील विकेंद्रीकरण व्हायला हवे असा त्यांचा आग्रह होता कारण बहुतेक सर्व योजना या शहरी शासकीय कचेर्‍यात बसून आकाराला येतात, प्रत्येक गावाचे प्रश्न आणि गरजा सारख्याच नसतात त्यामुळे अशा सरसकट राबवलेल्या योजना यशस्वी होत नाहीत. गावपातळीवर त्यांचे नियोजन झाले तरच विकासाकडे वाटचाल होऊ शकेल. " ’व्यक्ती’ पेक्षा समूहाला महत्व देणारे नियोजन हवे. मोठमोठ्या योजनांचा अवलंब करण्य़ाआधी लघुप्रकल्पांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण केले तरच मोठ्य़ा योजना कार्यान्वित होऊ शकतील. आर्थिक विकेंद्रीकरणासाठी किमान कौशल्यावर आधारित ग्रामोद्योग ,कुटीरोद्योग, लघुउद्योगांना चालना देणारे आर्थिक नियोजनच खरा विकास घडवू शकेल," हे विनोबांनी पारतंत्र्याच्या अंतिम दशकात सांगितले होते. आज हीच संकल्पना स्वीकारून सरकारने आरेखित केलेल्या ’स्कील इंडिया’ योजनेत, बेकार पदवीधरांची फौज वाढवण्य़ापॆक्षा नव्या युगाची कौशल्ये आत्मसात केलेली तरूणाई निर्माण करण्य़ावर भर दिला जातो आहे. 

ग्रामोद्धाराचा खोलवर विचार करताना विनोबा एक प्रणाली मांडतात. ते म्हणत, "सृष्टीत सर्ग-प्रलय झाले तरी ज्ञानी अडोल असतो, असे गीतेत म्हटले आहे. तीच स्थिती नकारात्मक अर्थाने खेड्यांची झाली आहे आणि हे सारे अज्ञानामुळे." १९३५ साली पवनार येथे एका प्रवचनात विनोबा म्हणाले होते, "अज्ञान दूर करायचे तर जीवनात ३ प्रधान गोष्टी असायला हव्यात. त्या म्हणजे ’उद्योग, भक्ती आणि शिक्षण’. देशात आळसाचे वातावरण फार आहे, निरूद्योगी वृत्ती हा प्रगतीमार्गातला अडसर आहे. तेव्हा सतत कार्यरत राहा. दुसरं भक्ती, म्हणजे कर्तव्यशून्यता नव्हे तर दिवसभर पवित्र उद्योग करून ती सेवा आत्मपरिक्षणासह देवाला अर्पण करणे. तिसरं शिक्षण, सातत्याने ज्ञान मिळवत राहायला हवे." विनोबा म्हणत ,"हिंदुस्थान कृषीप्रधान म्हटला जातो पण त्याचा उद्धार केवळ शेतीवर होणे नाही. आपापल्या उद्योगात तरबेज होण्य़ासाठी प्रत्येकाला विज्ञान शिकायलाच हवे. उदा: गृहिणीला सुद्धा स्वयंपाकघरात कोणत्या खाद्यात किती उष्मांक(कॅलरीज), ओज(प्रोटीन्स) किती, स्नेह(फॅटस) किती, कोणाला कसा आहार योग्य याचे शास्त्रीय ज्ञान हवे. माझा चरखा मोडला तर काम बंद न करता तो माझा मला दुरूस्त करता आला पाहिजे. विंचू चावला तर रडत बसण्यापॆक्षा मला त्यावर उपचार करता आले पाहिजे. उद्योग आणि विद्या वेगळे नाहीत. उद्योगाशी नित्य परिचय राहिला नाही तर ज्ञान मागासते, मग जुन्या ज्ञानावरच काम भागवले जाते, हे उपयोगाचे नाही. ’कराग्रे वसते लक्ष्मी’ ..म्हणजे बोटाच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे आपण मानतो मग त्या बोटात उत्तम कलाकौशल्य नको? अन्यथा तुमचे स्वराज्य केवळ स्वप्नातीलच आहे असे खेदाने म्हणावे लागेल. श्रमाला नुसत्या वाड्मयात प्रतिष्ठा आहे, ती जगण्यात उतरली पाहिजे."

आजही खरा भारत वसतो तो खेड्य़ांमधूनच. २०११ च्या जनगणनेनुसार सव्वा करोड भारतीयांपैकी ८३.३ करोड भारतीय खेड्य़ात राहतात. शहरांच्या लोकसंख्येत गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे तर खेड्यांची लोकसंख्या २.३५ ट्क्क्य़ाने घटली आहे. रोजगार मिळवण्यासाठी शहरांकडे जाणारे आणि कधीही न परतणारे लोंढे वाढतच आहेत. कृषीक्षेत्र भरवशाचे वाटेनासे झाल्याने ४०% शेतकर्‍यांनी शेती व्यवसाय सोडून दिला आहे. फेडरेशन ऑफ इण्डियन फार्मर्स ऑर्गनायजेशन (फिफो) च्या अहवालात भूमि अधिग्रहणामुळे देशातली १२ लाख हेक्टर कृषि योग्य जमीन कमी झाल्याचा उल्लेख आहे. तरीही देशाच्या लोकसंख्येच्या ५८.४ % हून अधिक जनतेचे उपजीविकेचे मुख्य साधन आजही शेतीच आहे त्यामुळे विकसित भारताचं मूळ शोधायचं असेल तर ’खेड्यांकडे चला’ हा संदेश पुन्हा एकदा समजून घेणे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात विनोबांनी १९४० साली केलेले ग्रामोदयातील अडसरांचे विवेचन,ग्रामीण विकासाच्या मार्गावरचे दिशादर्शक म्हणायला हवे. विनोबा म्हणत, "१० पैकी १ माणूस शहरात राहतो तर ९ खेड्य़ात. शेतकर्‍याला दोन देव आहेत एक पाऊस पाडणारा, दुसरा भाव ठरवणारा." शेतीसुधारणेविषयी ते अनेक उपयुक्त सल्ले देत, उदा: अखेरची वेचणी संपताच पर्हाटी तुम्ही काढून का टाकत नाही. अन्यथा ती जमिनीचा कस शोषते.

पण तरीही सारे प्रयत्न करून पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव येत नाही. आर्थिक विवंचनेपायी शेतकरी आज आत्महत्येच्या टोकाला जातो तेव्हा विनोबांनी कित्येक वर्षे आधीच या समस्येचा उहापोह केलेला दिसतो. विनोबा म्हणत, "खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे, त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी १) बाजार २) लग्न व्यवहार ३) सावकार ४) सरकार ५) व्यसने
१) बाजाराचेच पाहा, उस येथे करायचा पण साखर बाहेरून आणायची, भुईमूग येथे पिकवायचा पण तेल बाहेरून आणायचे. गावातच गूळ तयार झाला, तेलघाणी असली, विणकर असले, गोपालन झाले तर बाहेरच्या बाजाराची गरज काय. राखुंडीचे दंतमंजन करा, बाभळीच्या काडीचे ब्रश करा, मंगलकार्याला आम्रपल्लव वापरा, गावातल्या कुंभाराचेच घडे रांजण वापरा. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल. ही सहकार्याची भावना लोप पावली आहे." अर्थात आजच्या चंगळवादी युगात गरजा इतक्या कमी ठेवणे विनोबांसारख्या योग्यालाच शक्य आहे. त्यांच्या गरजा इतक्या कमी होत्या की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. पण याचा मथितार्थ खेड्यांनी स्वयंपूर्ण व्हावे हा आहे. इंधनासाठी सौर उर्जा, बायोगॅस सारखे पर्याय अधिकाधिक वापरावे. स्वयंपूर्णतेचा एक भाग म्हणून विनोबा खादीचा पुरस्कार करत. त्यावर ’खादीचीही गादी बनू शकते’ अशी उपहासाने टीका होत असे. यावर विनोबा म्हणत,"तसे तर द्राक्षाचेही मद्य बनू शकते पण ते बनवू नये आणि मग त्याची गणना द्राक्षातही होऊ नये."
२) लग्न समारंभांसाठी कर्ज काढणे हे आजही सर्रास चालते. विनोबा म्हणत ’समारंभ जरूर करा पण तो खर्च सामूहिक असेल मग लग्न कुणाचेही असो. कुणी आपल्या पैशाने लग्न केले तर ते पाप, अपमान समजा. याची परिणीती कर्जबाजारीपणा कमी होण्यात होते की नाही बघा." सामूहिक विवाह हा याच प्रकारचा उपाय सुरूवातीला सफल झाला परंतु आता तो ही राजकीय महत्वाकांक्षेचा बळी होऊ लागला आहे. ’आपण यथेष्ट जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे, हा धर्म नव्हे ’(इति समर्थ रामदास) हे उदाहरण विनोबा समारंभातील उधळपटटी बाबत नेहमीच देत.
३) सावकार म्हणजे गरीब कामकर्‍यांच्या मानेवरले जोखडच. विनोबा म्हणत,"वरील गोष्टी केल्या तर सावकारीचा पाश सैल नक्कीच होईल. सावकारांच्या, मालगुजारांच्या दलालीमुळे पीडित जनतेच्या परिस्थितीची सरकारला जाणीव होत नाही , ते सरकारची ढाल बनतात." एकदा एका मालगुजाराने मला हे हक्क ईस्ट ईंडिया कंपनीने ’यावच्चंद्रदिवाकरौ’ दिले आहेत असे म्हणून तसा कागद दाखवला . यावर विनोबांनी म्हटले,"अशी वेळ पौर्णिमा सोडली तर रोजच येत असते, तिथे तुझ्या कागदाची काय बिशाद. बदल हा जीवनाचा भाग आहे, कधी काळी मालगुजारी पद्धत काही सदहेतूने सुरू करण्य़ात आली असेल आज ती तशी नाही, मग ती बदलायला पाहिजे."
४) पुढचा मुद्दा, सरकार- येथे विनोबांना तेव्हाचे इंग्रज सरकार म्हणायचे असले तरी तो मुद्दा आजही अप्रस्तुत ठरत नाही कारण सरकार आणि शेतकरी यांच्यातले नाते आजही फारसे बदललेले नाही. पॅकेजच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे उपाय शोधल्याने मूळ जखम अद्याप भरलेली नाही. दुसर्‍या बाजूला जेव्हा खेड्यांचा विकास हे फक्त सरकारचे काम आहे अशी आपण अपेक्षा करतो तेव्हा एका प्रवचनातील विनोबांचे विचार स्मरतात, ते म्हणत," गोकुळावर संकट आले तेव्हा गोवर्धन उचलताना श्रीकृष्णाने सर्वांच्या हाताची अपेक्षा केली, शेवटी त्यांची करांगुली होतीच. कृष्णाचे महत्व त्याने गीता सांगितली म्हणून नव्हे तर ती कृतीत उतरवली म्हणून. द्वारकेचा राणा झाल्यावरही तो गवळ्य़ात येऊन राही, गाई चारी, शेण काढी, मजुरांचा प्रतिनीधी म्हणून वागे." आजच्या लोकप्रतिनीधींनी आणि आपण जनतेने देखील यातून बोध घ्यायला हवा. सरकारी योजना आणि ग्रामीण जनता यांना जोडणारा दुवा म्हणजे ग्रामसेवक. वर्धा येथे त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विनोबा म्हणतात, "खेडयातील लोक निरक्षर, म्हणजे आपल्या अल्प स्वल्प विद्येने काम चालून जाईल असे समजू नका, ती माणसे व्यवहारात आणि कास्तकारीत हुशार असतात. प्रत्येकातला गुण शोधला तर तुमचे कार्य सोपे होईल" तर १९३७ सालच्या वर्धा येथील शेतकरी परिषदेत बोलताना विनोबा ग्रामीण जनतेला मोलाचा सल्ला देतात, "मागण्या अशा कुशलतेने मागाव्यात की ज्यांना आपण मते देऊन सरकारात पाठवले आहे त्यांची झोप घेण्याची सोय राहू नये पण त्यांचे बळही कमी होऊ नये" प्रत्येक खेडे हे जणू एक राष्ट्र समजून त्याची संपत्ती कशी वाढॆल याचा सामुदायिक दृष्टीने विचार झाला पाहिजे यावर विनोबा भर देत.
५) विनोबा म्हणतात, "ग्रामोदयाच्या आड येणारा पाचवा मुद्द म्हणजे व्यसन - मुस्लीम धर्म दारू पिणे हराम मानतो तर हिंदू धर्म त्याला पंचमाहापातकातील एक पाप मानतो. तरीही विडी, दारूचे व्यसन कमी होत नाही". आज त्यात गुटखा आणि माव्याची भर पडली आहे. यावर बंदी घातली तरी चोरट्या मार्गाने हे सारे सुरूच राहते. हे कमी की काय म्हणून शेतीच्या बांधावरून, वाटेहिस्स्यावरून, खोट्या प्रतिष्ठेपायी, अगदी क्षुल्लक कारणांवरून विकोपाला जाणारी भांडणॆ, हे देखील एक प्रकारचे व्यसनच. विनोबा म्हणत, "गावातील चार सभ्य माणसांच्या मदतीने भांडणॆ गावातच सोडवा. कोर्ट कचेरीत वेळ दवडू नका, कृष्णाने वणवे गिळले म्हणजे काय तर खेड्य़ांना जाळून टाकणारी भांडणॆ मिटविली, हे समजून घ्या."

याशिवाय ग्रामोदयाच्या वाटेतील धोंड म्हणजे अनारोग्य, हे विनोबा कळकळीने सांगत. ते सांगत, "खेडयातील अनारोग्याची ३ मुख्य कारणे म्हणजे
 १) अस्वच्छ राहणी- अंगावर चार तांबे ओतणे म्हणजे आंघोळ नव्हे तर शरीराची संपूर्ण स्वच्छता हवी. उघड्य़ावरील शौचविधीमुळे सोनखत वाया जातेच पण अनारोग्य वाढते, आणि धर्महानि हे तिसरे पाप लागते.
२) पिण्यास अयोग्य पाणी - ते उकळून गाळून प्यायला हवे.
३) अयोग्य आहार -खराब झालेले अन्नग्रहण, भाजीचा कमी वापर, दुध दुभत्याचा कमी वापर हे त्रिदोष आपल्या आहारातून काढा. लहानशा वावरात गरजेपुरत्या भाज्या, धान्य पिकवून कुटुंबाच्या खाण्य़ाचा किमान प्रश्न सोडवा." एकंदर विनोबांनी जगण्य़ाशी संबंधित सर्व पैलूंचा विचार यात केला आहे असे दिसते.

स्वराज्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून सुटका नव्हे तर , बृहदारण्यक उपनिषदानुसार स्वराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे स्वत:वरील नैतिक नियमन, हा अर्थ प्रत्येक नागरिकाने समजून घेतल्याशिवाय कोणतीही शासकीय योजना पूर्णपणे यशस्वी होणे शक्य नाही. विनोबा आवाह्न करत, "ज्यांना संपत्तीदान, भूदान, ग्रामदान करणे शक्य आहे त्यानी ते करावे, शक्य नसल्यास किमान श्रमदान करावे." अर्थात या सार्‍या गोष्टी आदर्शवत वाटाव्यात अशी आजची परिस्थिती आहे. राजकीय अनिच्छेमुळे रस्ते ,वीज, पाणी या साध्या सोयी अद्याप सहज उपलब्ध झालेल्या नाहीत. आजही व्ही.एस. नायपॉल सारखे लेखक विनोबांना भाबडे ठरवतात, १३ वर्ष भारत पालथा घालून मिळवलेल्या भूदानात काहींनी नापिक जमीन देऊन केलेली फसवणूक किंवा जमिनीचे वाटप करताना आलेल्या त्रुटी या सार्‍य़ामुळॆ ते रॅशनॅलिझम पासून दूर असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो. ’सब भूमी गोपालकी’ मानणार्‍य़ा या आकाशपुत्राचे समाजवादी तत्त्वज्ञान अनेक भांडवलवादी विचारांना आजही मान्य नाही परंतु त्यांचा व्यक्तीपेक्षा समूहाला प्राधान्य देणारा विचार अंतिमत: भारतीय संस्कृतीच्याच शाश्वत मूल्यांना जाऊन मिळतो हे त्यांचे विरोधक देखील नाकारत नाही. मी ऐवजी ’आम्ही’ म्हणजेच ’वाताशी’ या शब्दाचा वापर करणारा जपान आपल्या तुलनेने वेगाने प्रगतीपथावर गेला हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. भारतात ज्ञानधारा आणि दानधारा अखंड वाहत्या राहाव्या ही विनोबांची तळमळ होती. ’वैराग्याचे नाव घ्या, किंवा वैभवाचे नाव घ्या पण वैषम्याचे नाव घेऊ नका-’ हे विनोबांचे धोरण स्वीकारायला विरोधकांचीही ना नसावी.

आज ग्रामीण आणि उपेक्षित भारताला मोदी सरकारने केंद्रस्थानी मानले आहे. पंचायती राज मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालय अशा तीन केंद्रीय मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या योजना तडीस नेण्याचे उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकांमधील यशाने मनोबल उंचावलेल्या भाजपला नंतरच्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले की, ‘जमिनीवरील’ राजकारणात अजून बराच टप्पा गाठणे बाकी आहे. ’स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेन’ इतकाच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामोदय आहे. ’ग्रामोदय से भारत उदय’ हे अभियान सफल झाल्यास केवळ घोषणांपुरताच मर्यादित असलेला ग्रामीण भाग आणि कृषीव्यवसाय खर्‍या अर्थाने विकासाच्या केंद्रस्थानी येऊ शकेल. हे अभियान पंचायती राज पद्धतीला सक्षम करेल, सामाजिक समरसता, महिला सशक्तीकरण आणि शेतकर्‍यांची स्थिती वृद्धींगत करेल. हे सारे विनोबांच्या ’सर्वोदय’ या कल्पनेचेचे भाग आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. खेडी स्वयंपूर्ण झाली तर ती वाढत्या जागतिकीकरणाच्या वादळात सहज तग धरू शकतील कारण त्यांचे बाह्य अवलंबित्व कमी झालेले असेल. त्यासाठी ज्या कल्पनाशक्ती आणि समुदायवृत्तीची गरज आहे, तिचा पुरस्कार विनोबा सातत्याने करत होते. 

अर्थात सरकारच्या या सगळया बाह्य प्रयत्नांना यश येणयासाठी एक आंतरिक बदल जनतेत होणॆ गरजेचे आहे, तो म्हणजे समग्र विचार. विनोबांचे सारे तत्त्वज्ञान या मुद्द्यात एकवटले आहे. एकदा प्रवासात सूत कातत असताना दृष्टीदोष आणि हलत्या गाडीमुळॆ सूत तुटत होते .विनोबा ते जोडून घेत होते. त्यावर हे बघणारा एक सुशिक्षित प्रवासी त्यांना न राहवून म्हणाला,"ते सूत तसेच जाऊ दिले तर वेळ वाचेल आणि त्या वेळात अधिक सूत कातता येईल, हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हिताचे नाही का?" यावर विनोबांनी मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले,"एकांगी(अंशिक) आणि परिपूर्ण अशी २ अर्थशास्त्रे असतात. जेव्हा आपण असे अगदी ५ टक्के देखील वाया जाऊ देतो तेव्हा त्याचा अर्थ कापसाच्या लागवडीखालील १०० एकरापैकी ५ एकर जाळून टाकले गेले, तांतीचे १०० पैकी ५ कारखाने बेकार झाले. कारखान्याच्या १०० इमारतींपैकी ५ पाडून टाकल्या..असा होतो. जेवताना पात्रात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्‍याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्‍या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, म्हणूनच कोणत्याही गोष्टीकडे समग्रतेने पाहिले पाहिजे." या समग्रतेचा स्वीकार केल्याशिवाय संपूर्ण ग्रामोदय अवघड आहे.

विनोबांची विचारपद्धती इतकी सखोल आहे ती गीतेच्या प्रेरणेमुळे. त्यामुळॆच विनोबांचा वैयक्तिक मोक्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक मोक्षाशी समव्याप्त झाला होता असं ग.प्र.प्रधान नोंदवून ठेवतात. जातीभेद निर्मूलन, दारूबंदी, ग्रामसफाई आणि नई तालीम - ही गांधीजींच्या वैचारिक वारशातून स्वीकारलेली त्यांची सामाजिक विकासाची चतु:सूत्री असो वा भूदान, ग्रामदान, सर्वोदय या सारख्या योजना, या सार्‍यांच्या मुळाशी ग्रामोदयाची तीव्र आस आणि गीतेतून उपजलेलं मानवजातीचं कल्याण हीच निरलस भावना होती. स्त्री असो वा पुरूष, दलित असो सावकार, अडतदार असो वा मजूर, राजकीय नेता असो वा खेड्यातला अंतिम वंचित माणूस ..या सार्‍य़ांना कवेत घेऊन, त्यांना त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजावून सांगण्य़ाची ताकद मातृहॄद्यी विनोबांच्या गीतेवर आधारलेल्या साहित्यात, प्रत्यक्ष कार्यात आणि विचारसंपदेत आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानेच मानवकल्याण साधता येईल ही भूमिका असणार्‍या, या आधुनिक संताला आणि ग्रामोदयाच्या प्रणेत्याला स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी का होईना आपण समजून घेत आहोत आणि त्यांच्या संकल्पना काही अंशी तरी देशपातळीवर कृतीत आणू पाहत आहोत हे शुभचिन्ह म्हणायला हवे.

संदर्भ-
’जीवनदृष्टी’ - विनोबा भावे
"Selections from Vinoba"- विश्वनाथ टंडन
आधुनिक भारतातील राजकीय विचार - भा. ल भोळे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, August 10, 2016

सावळे की गोमटे


महाराष्ट्र टाईम्स मधे (3-7-2016) प्रसिद्ध झालेला माझा लेख ’सावळे की गोमटे’
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03072016013013

सध्या प्रसिदधीच्या ’हवेत’ असलेला विनोदी कार्यक्रम एका उपग्रहवाहिनीवर सुरू आहे. त्यातले दोन गुणी कलाकार व्यावसायिक गरजेतून स्वत:च्याच काळ्य़ा रंगावर बरेचदा विनोद करतात. या वर्षी एप्रिल महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडला पराभवाची धूळ चारून क्रिकेट २०-२० विश्वचषक घेऊन गेला. भारतीय क्रिकेटरसिकांनी आपला संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमधे पोचू न शकल्याच्या उद्वेगाला वेस्टइंडिज संघावर मनमुराद विनोद करून वाट करून दिली. ह्यातील बहुतेक विनोद त्यांच्या काळ्या वर्णाला उद्देशून होते. अर्थात या विनोदांमागे द्वेषभावनेपेक्षा टीम इंडिय़ाच्या अपयशामुळे आलेले नैराश्य होते कारण ते शल्य बोथट होताच सोशल माध्यमांवर प्रसारित होणारे वर्णविषयक विनोद आपोआप थांबले. मात्र अशा घटनांमधून काळ्य़ा रंगाकडे चेष्टेने, कुत्सितपणे, नकारात्मक दृष्टीने पाहण्य़ाची भारतीय मानसिकता अधोरेखित होते. हा सामना इंग्लंड जिंकला असता तर त्यांच्यावरही नक्कीच विनोद झाले असते पण ते त्यांच्या ’गोरेपणा’वरून नाही. कारण ’गोरा’ हा आपल्या बहुसंख्य ’ब्राऊन’ भारतीयांच्या ’स्वप्नातला’ आवडता रंग आहे. आपल्या जैविक, भौगोलिक परिस्थितीला आणि निसर्गदत्त मेलॅनिनला न जुमानता आपल्याला काहीही करून अधिकाधिक गोरे व्हायचे आहे.

विश्वविख्यात मुष्टीयोद्धा मोहम्मद अली उर्फ कॅशियस क्ले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना बालवयात नेहमी प्रश्न पडायचे, ’देवाचा पुत्र असलेला येशू असो वा नाताळचा सांताक्लॉज, सगळे गोरेच कसे! यातलं कुणीच आपल्यासारख्या काळ्य़ा रंगाचं का नाही?". अखेर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अव्वल ठरून या जगाला दाखवून दिले की ’ब्लॅक सुपरहिरो’ही असू शकतो. याउलट विठूरायाला आळवणारा ’सावळे सुंदर..रूप मनोहर’ हा संत तुकाराम यांचा अभंग असो, ’सावळा ग रामचंद्र’ सारखे गदिमांचे गीत असो किंवा ब्रजवासी कान्हावर रचलेला ’ज्यों ज्यों बूड़े श्याम रंग, त्यों-त्यों उज्जवल होय’ असा दोहा असो, सगुण ईश्वराचे सावळे स्वरूपच भारतीय समाजाने भक्तिभावाने, कौतुकाने स्वीकारलेले दिसून येते. मार्को पोलो च्या ( पेंग्वीन प्रकाशन १९५८, आर लेथम यांनी अनुवादित केलेल्या) सफरनाम्यामधे १३ व्या शतकातील भारताचे वर्णन आहे. ’येथे कृष्णवर्णीय व्यक्तींना अधिक सामाजिक प्रतिष्ठा असल्याचे दिसून येते ,त्यांच्या ईश्वराचा रंग काळा-सावळा मानला जातो हे कदाचित यामागील कारण असावे’ असा त्यात उल्लेख आहे. मग आजच्या भारतीय समाजाला मानवाचे काळे-सावळे रूप का आवडेनासे झाले असावे! गोर्‍या रंगाचे आकर्षण आर्य-द्रविड संघर्षाच्या काळापासूनचे मानले जात असले तरी भारतात ते पोर्तुजीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश आक्रमणामुळे वाढत गेले आणि ब्रिटीश राजवटीपासून खर्‍या अर्थाने रूजले. ’जेत्यांचा’ वर्ण आपल्यालाही लाभावा यासाठीच्या धडपडीला गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणार्‍या क्रीम्सच्या जाहिराती खतपाणी घालू लागल्या. ब्रिटीश देश सोडून गेले परंतु जागतिकीकरणापासून भारतीयांच्या मनाचे ’अमेरिकीकरण’ होऊ लागले. अमेरिकन जीवनशैली आणि त्यांचा गोरा रंग याचे गारूड बहुतेक विकसनशील देशांप्रमाणे भारतीय जनमानसावर देखील पडले. आज अमेरिकेतील काळा-गोरा भेद वरकरणी संपुष्टात आला आहे असे वाटत असले तरी तेथील लॉ स्कूल चे प्राध्यापक जोनी हर्श यांच्या अहवालानुसार, अमेरिकेत जगभरातून स्थलांतरित होणार्‍या कामगारवर्गापैकी गोर्‍या मंडळींना होणारी कमाई इतरांपेक्षा १६ ते २३ % अधिक आहे. अमेरिकेत मार्टीन ल्यूथर किंग सारख्या नेत्यांना या समस्येविरोधात द्यावा लागला तसा लढा देण्य़ाइतका हा प्रश्न, भारतात सामाजिक स्तरावर तीव्र नव्हता. लैंगस्टन ह्यूज या निग्रो कवीची
’मी आहे निग्रो.. काळ्याशार रात्रीसारखा काळा’
अशी विमनस्कपणे लिहीलेली, वर्णविषमतेतून वाट्याला आलेल्या भोगाची दाहकता मांडणारी कविता भारतीय साहित्यात फारशी उमटली नाही. परंतु भारताभोवती वेटोळे घालून बसलेल्या जातीभेदाला वर्णभेदाचीही दाट किनार आहे हे आपण नाकारू शकत नाही.

भारतात फॅशन, उपग्रह वाहिन्या, सिने जगत यासारख्या क्षेत्रात आजही गौरवर्णीयांना प्राधान्य मिळते. त्या क्षेत्राभोवती असलेल्या वलयामुळॆ सर्वसामान्य प्रेक्षकांना गोरेपणाची भुरळ पडते. गोरेपणा देण्य़ाचा दावा करणार्‍या प्रसाधनांची निर्मिती करणार्‍या कंपन्या, हमखास यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तुमचा रंग गोरा असायला हवा, हे समाजमनावर बिंबवू लागल्या. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवं हे त्या जाहिरातीतून ठासून सांगू लागल्या. १९७८ ला पहिले व्हाईटनींग क्रीम भारतीय बाजारपेठेत आले. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता ,तो आता ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. या महागड्या क्रीम्सच्या किंमती ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी सध्या चार ते दहा टक्के प्रमाणात स्टेरॉइडच्या मलमामध्ये स्वस्त पण घातक मिश्रणे बाजारात आली आहेत. ही खरं तर अॅलर्जीसाठी वापरावयाची मलम चेहऱ्यावर वापरल्याने त्यातल्या स्टेरॉइडमुळे त्वचा लाल होणे, त्यावर पुरळ येणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत अशा रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असल्याचे मत त्वचारोगतज्ञ नोंदवतात. २००५ सालापासून तर भारतीय पुरूषांसाठी गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणारी खास ’मर्दोवाली’ क्रीम्स बाजारात आली आहेत.

शाहरूखसारखे कलाकार गोरेपणाच्या क्रीमची ट्यूब आपल्याकडे भिरकावतात आणि जाहिरातीतून सांगतात, "यशासाठी मेहनतीपेक्षा महत्वाचं काहीतरी आहे ते म्हणजे गोरेपण." आपण सुंदर दिसावे ही स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध ’गोरेपणाशी’ जोडून आपण आपलीच फसवणूक करून घेत आहोत. एखादे मूल जन्माला आले की त्याचा रंग पाहून बर्‍यावाईट प्रतिक्रिया दिल्या जातात. बायको काळी आहे म्हणून तिला ’टाकून दिल्याच्या’ बातम्या आपण वाचतो त्यातला नवरा स्वत: देखील काळा असतो. तरीही लग्नविषयक जाहिरातींमधे ’गोरी बायको हवी’ असे लिहीण्य़ात काही गैर आहे असे अजिबात मानले जात नाही. मुलगी सावळी असली तरी सामाजिक दडपणामुळे तिचा उल्लेख ’गव्हाळ वर्णाची’ असा केला जातो. अगदी भावंडांमधेही एखादे मूल तुलनेने काळे असेल तर त्याच्या रंगाचा वारंवार अपमानास्पद उल्लेख होतो. अशावेळी काळ्या सावळ्या रंगाच्या लोकांच्या मनात अतिशय न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. काळ्या रंगामुळे निर्माण होणारी हीनत्वाची भावना, कुचंबणा दुर्लक्षित करता येणार नाही. याचे खोलवर होणारे सामाजिक परिणाम भीषण असू शकतात.

नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी ३ वर्षांपूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मी मेनन ही सावळी भारतीय तरूणी टीकेला वैतागून भारताबाहेर गेली आणि सुपरमॉडेल झाली. अमेरिकेत ओप्रा विन्फ्रेमुळे कृष्णवर्णीय महिलांचा आत्मसन्मान दुणावला. अमेरिकेचे पहिले ’काळे’ अध्यक्ष बराक ओबामा आत्मविश्वासाने सांगतात, ’बी कंफर्टेबल इन युअर स्कीन’. ऑस्ट्रेलियातल्या टेक्‍सास विद्यापीठातील तिघींनी देखील ‘काळ्या रंगातही सौंदर्य असते‘ हे ठामपणे सांगणारी "अनफेअर अँड लव्हली‘ ही ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. ‘हो, आम्ही सुंदर आहोत, कारण आम्ही सावळ्या आहोत.‘ हे या मोहिमेचं घोषवाक्य. ‘रंगभेद हा सामाजिक कलंक आहे.‘ हे बजावणारी ही चळवळ गोरेपणाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देते आहे. भारतात असेच आशेचे किरण आता दिसू लागले आहेत. येथील प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन गोरेपणा देणार्‍या प्रसाधनांच्या जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे. तिने मेकअपच्या मदतीने रंग उजळवण्याची तयारी दाखवली नाही तर तिला समाजाच्या खालच्या स्तराचे प्रतिनिधित्व करणार्‍या भूमिकाच मिळू शकतात असे तिला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत तिच्या मुलाखतीसह प्रसिद्ध झालेला तिचा फोटॊ संगणकाच्या मदतीने ’गोरा’ करण्यात आला होता. तिने त्यावर आक्षेप घेऊन तो फोटो मूळ जसा होता तसा प्रसिद्ध करायला लावला. ’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची ही खंदी प्रचारकर्ती म्हणते, "आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या."

आपण आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी ही साधी सहज मानवी भावना आहे पण ही भावना अवघे आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! आपले दिसणे हेच फक्त आपले जगणे आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपण कधी करणार की नाही ! आपण माणसं आहोत की फक्त ग्राहक! " देशाची ’आंतरिक प्रगती’ अशा अनेक मूल्यांवर अवलंबून असते. वर्ण, वंश, जात यासारख्या गोष्टींना आपण अजूनही महत्व देत राहिलो तर समाजामधली आपसातली तिरस्काराची भावना संपणार कशी! घानाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने येत्या ऑगस्ट २०१६ पासून हायड्रोक्विनन हा ब्लीच करणारा घटक पदार्थ असलेल्या सर्व सौंदर्यप्रसाधनांवर बंदी जाहीर केली आहे. हायड्रोक्विननमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात आणि त्यामुळॆच घाना सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातही जनहितार्थ असे निर्णय घेतले जातील का!
आजचा भारतीय समाज रातोरात बदलला नाही तरी येणारी पिढी तरी काळ्या रंगाला गोर्‍या रंगाइतकीच प्रतिष्ठा बहाल करेल का!
कवी बोरकरांच्या ’देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे ,सावळे की गोमटे या मोल नाही फारसे’.. या ओळींचा अर्थ आपल्याला उमगेल का!

Tuesday, May 10, 2016

शनि आणि आत्मसन्मान


"’काका हलवाईच’ का? आता ’काकू हलवाई म्हणा. चितळे बंधूच का?चितळे ’भगिनी’ म्हणा, इ-मेल का? आता ’फिमेल’ म्हणा’ वगैरे छापाच्या तृप्ती देसाई आणि मंदीर प्रवेशासाठी लढा देणार्‍या बायकांवरील विनोदांची सध्या चलती आहे. चला, श्री आणि जान्हवी सुटले. विनोद हवेच, त्याने तणाव हलका होतो, गंमत वाटते पण काही जण आता सभ्यतेची पातळी ओलांडून बोलू किंवा पोस्ट करू लागले आहेत. ’आता बापाच्या श्राद्धाला स्त्रियाही टक्कल करणार काय’, यासारख्या शब्दात त्यांची आणि पर्यायाने स्त्री वर्गाची खिल्ली उडवली जात आहे. तर्कहीन आक्षेप घेतले जात आहेत. चारित्र्यहननापासून अर्वाच्य शिव्यागाळीपर्यंत शस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. एक साधा अधिकार मागितला यात समाजाने इतका थयथयाट करण्य़ासारखे आहे तरी काय हे मला कळू शकलेले नाही. व्यक्तीश: माझ्यासाठी ’शनी’ हा एक ’ग्रह’ आहे, साहजिकच त्याचे ’दर्शन’ अवकाश विभागाच्या दुर्बिणीमधून घ्यायचे असते. तरीही शनीचा चौथरा, एखादा गाभारा, किंवा देवस्थानातल्या प्रवेशासाठी या स्त्रियांनी केलेलं बंड हा टवाळीचा विषय नक्कीच नाही. ’शनी मला नाकारत असेल तर मीच त्याचं दर्शन नाकारते,’ असा आक्रमक पवित्रा घेऊ शकणार्‍या काही तरूणींना अशा आंदोलनांची गरज वाटत नाही. ’धार्मिक परंपरा निमूटपणे पाळायलाच हव्यात’ असं म्हणणार्‍या स्त्रियांनाही डोक्याला ’नसते ताप’ नको आहेत. या दोन टोकांमधल्या, ’का?’ हा प्रश्न मनात येऊ लागलेल्या, सर्वसामान्य स्त्रियांसाठी हा लढा आहे हे मुळात लक्षात घ्यायला हवे.

अर्थात हे पटवून देण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्या स्त्री संघटनांनी विवीध व्यासपीठांवरून करायला हवा होता. त्यांना आपली भूमिका आक्रस्ताळेपणा न करता, वैचारिक चर्चा करून, ठामपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडता आलेली नाही , त्यामुळॆ या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा मिळवण्यात त्या कमी पडल्या. यामागे त्यांचा केवळ तात्कालिक आवेश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. स्त्रियांच्या प्रश्नांची सखोल जाण किंवा पुढच्या वाटचालीबद्दल स्वच्छ भूमिका तृप्ती देसाई आणि मंडळींच्या विचारात दिसून येत नाही. आपण हिंदूविरोधी नाही हे सिद्ध करायला आता दर्ग्यात प्रवेश करून दाखवायलाच हवा अशा स्वत:च निर्माण केलेल्या भोवर्‍यात त्या गरगरत आहेत. त्यांनी आपले भरकटत चाललेले तारू वेळीच सावरायला ह्वे आहे. अन्यथा मंदिरप्रवेश हा प्रतीकात्मक लढा न राहता, स्त्रियांना प्रवेश नाकारलेल्या जागांची यादी करणॆ आणि तिथे प्रवेशाची मागणी करत ठिय्या देणे हेच त्यांचे अनुत्पादक जीवितकार्य होऊन बसेल. त्यांची उर्जा अधिक विधायक कामांऐवजी ह्यातच खर्च होईल. त्यामुळे एकूणच त्यांच्या आंदोलनाची पद्धत आणि दिशा योग्य आहे किंवा नाही याबद्दल दुमत असू शकते, पण हेतूबद्दल शंका घेणे, हीन टीका करणे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला शोभत नाही.

’पुरोगामी विचारसरणी' हे महाराष्ट्राचे नेहमीच एक वैशिष्ट्य़ मानले गेले आहे. परंतु मुलभूत मूल्यांशी फारकत घ्यायची असेल तर महाराष्ट्राने स्वत:ला पुरोगामी नेमके कशासाठी म्हणवून घ्यायचे, फक्त नेत्यांच्या भाषणापुरते?  प्रत्येक धर्मात कोणत्या तरी काळी काही कारणामुळे पडलेला पायंडा आधी प्रथा मग नियम मानला जाऊ लागतो. तो कालसुसंगत आणि तर्कशुद्ध आहे काय, हे आपण तपासायचे की नाही? मूल्ये शाश्वत असली तरी त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे तपासले गेले नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एके काळी सर्वात महत्वाची ठरलेली पुरोगामी विचारसरणी नव्या विचारप्रवाहांसह पुढे जाणे थांबवून गाळासारखी साचून राहील. तसे घडू नये म्हणून काही नाकारलेली सत्ये एका टप्प्यावर स्वीकारावी लागतात तर काही बदलांचे स्वागत करावे लागते. जुनाट विचारांची कावड झापडे बांधून वाहणार्‍यांचा प्रवास अखेर विनाशाकडे होतो हा जगाचा इतिहास आहे. मग ’धर्माची चिकित्सा’ हे अतिशय महत्त्वाचे मूल्य ’आमच्या भावना का दुखावल्या’ या बडग्याखाली चिरडले जाऊ द्यायचे का! खरं म्हणजे मागे वळून पाहिलं तर गेल्या शंभर वर्षापासून सुरु असलेल्या कठोर धर्मचिकित्सेमुळे हिंदु समाजाचे नेहमीच भले झाले आहे.

’पण मग बायका पुन्हा कर्मकांडाकडेच तर जात आहेत, मग ही कसली डोंबलाची धर्मसुधारणा!’ असा जोरदार आक्षेप घेतला जातो आहे. आस्तिक समाजाच्या ’देव’ या संकल्पना विविध स्वरूपाच्या असतात. आस्तिकतेमुळे जगणं आश्वासक होतं. मात्र बहुसंख्य आस्तिक हे कर्मकांड मानणारे असतात. त्यातूनही महिलांवर कर्मकांडांचा आणि त्यातून तयार झालेल्या धार्मिक संकेतांचा प्रचंड पगडा असतो. आयटी इंजिनीयर मुलींनाही डिझाईनर नऊवारी नेसून केलेल्या पूजाअर्चेचे फोटो शेअर करायला आवडतात. जगण्य़ातल्या समस्यांशी लढताना काव्य शास्त्र विनोदातील आनंदापासून अजून खूप दूर असलेल्या ग्रामीण महिला व्रतवैकल्यांच्या निमित्त्याने थोडीफार हौसमौज करून आपला आनंद शोधतात ही वस्तुस्थिती आहे. इथवर कर्मकांडांचा त्यांना स्वत:ला किंवा समाजाला त्रास नसतो. मात्र कर्मकांडाच्या कह्यात गेलेल्या महिला ’साडेसातीतून’ सुटका होण्य़ासाठी शनीला साकडे घालतात, मासिक धर्माच्या काळात त्या देवालयात पाऊल टाकत नाही. असे नियम स्त्रियांनी मोडले तर ’पाप’ लागते हे त्यांच्या मनावर पक्के बिंबलेले आहे. काहींची तर हे नियम ’देवानेच’ केले आहेत अशी ठाम समजूत आहे. आंदोलनकर्त्यांना विरोध करणार्‍या महिला याच मानसिकतेच्या बळी आहेत. परंतु कायद्याने खणखणीतपणे आणि विश्वस्तांनी नाईलाजाने का होईना, प्रवेशाला दिलेल्या परवानगीमुळे एवीतेवी कर्मकांडे सोडू न शकणार्‍या श्रद्धाळूंना एक नवा दॄष्टीकोन तर गवसला. तो म्हणजे, ’काळानुसार विचार आणि नियम बदलणे म्हणजे पाप नाही, धर्म ही पुरूषांची मक्तेदारी नाही आणि स्त्रिया अपवित्र नाहीत, त्यांनाही दर्शनाचा समान अधिकार आहे.’ शनीला तेल वाहत राहणे कालांतराने बंद होईलही पण निदान आपण अपवित्र असल्याची भावना या स्त्रियांच्या मनातून आज जात असेल तर ते सुचिन्ह नाही का! तरी देखील, ’हाजी अली दर्गाप्रवेशाचं नाव काढताच पाहा, कडव्या मुस्लीम संघटना कशा चवताळून उठल्या, एकत्र झाल्या, नाहीतर आपण! ’ अशी अजब मते व्यक्त होतात तेव्हा खेद वाटतो. धार्मिक कट्टरतेचे समर्थन करून आपल्याला तालिबानकडे वाटचाल करायची आहे काय? या घडामोडींमुळे उलट हिंदु धर्म हा काळानुसार बदलणारा सहिष्णु धर्म आहे हे सिद्ध करता आले आहे. पूर्वीचे शाहबानो, आजचे शायराबानो प्रकरण किंवा दर्गाप्रवेश विरोध पाहता मंदीर प्रवेशाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे हिंदू धर्माचे काही बिघडले तर नाहीच उलट हिंदू धर्माची मान उंचावली हे लक्षात घ्यायला हवे. मग ही प्रगतीशील धर्मसुधारणा नव्हे काय?

दुसर्‍या बाजूला, कर्मकांडाशी संबंधित अधिकार मागितल्याने, स्त्री-पुरूष समानतेच्या प्रश्नासाठी गंभीरपणे लढणार्‍या चळवळींची यामुळे हानी झाली असे काही बुद्धीवादी मंडळींना भय वाटू लागले आहे. उलट ज्या सर्वसाधारण महिला अशा चळवळींना ’नास्तिक शहरी बायकांचा गट’ समजून त्यापासून चार हात दूर राहत होत्या, त्या या निमित्त्याने बदलाची भाषा शिकू लागल्या आहेत. कमीत कमी चाकोरीबाहेरचा विचार करू लागल्या आहेत. त्यांना कर्मकांडापासून पूर्णत: तोडण्याचा हेका धरला तर स्त्रीवादी चळवळी आणि सर्वसामान्य स्त्रिया यांच्यातली दरी कधीच भरून निघणार नाही. प्रस्तुत समाजव्यवस्थेतच समानतेचा आग्रह धरण्य़ाच्या उद्देशाने, स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मंदिरप्रवेशासाठी याचिका दाखल करून समंजस मार्ग निवडला. धर्म नाकारून आततायी क्रांती करण्य़ापेक्षा धर्मातील कालबाह्य रूढींना फाटा देऊन हळूहळू बदल घडवणे अधिक व्यवहार्य आहे हा विचार या निमित्त्याने रूजतो आहे.

तरीही ’आत्ताच बरे यांना हे सुचले’ असा सवाल केला जातो आहे. याची सुरूवात नेमक्या कोणत्या घटनेने झाली ते आठवून पाहा, एक मुलगी चुकून चौथर्‍यावर गेली तर तो चौथरा गोमूत्राने ’शुद्ध’ करण्यात आला, याला स्त्रियांनी अपमान समजायचा नाही का? ज्या स्त्रियांना स्वेच्छॆने नियम पाळायचेत त्यांनी पाळावे, परंतु स्त्री प्रवेशाने ती जागा अपवित्र होते या अंधश्रद्धेला आव्हान द्यायचे की नाही? मग सावित्रीबाई, जिजाऊंची जयंती-पुण्य़तिथी साजरी करायची कशाला? कर्वे ,फुले, आगरकरांचा वारसा सांगायचा, तो कशाला? ’बरं, मिळाली ना एकदाची परवानगी, मग आता जाणार आहेत का या ’दांभिक’ बायका रोज दर्शनाला?’ असा प्रश्न विचारणार्‍यांना हे ’प्रतीकात्मक’ दर्शन होते हे कळायला हवे. स्त्रियांना देवाजवळ प्रवेश हवा आहे तो फक्त धार्मिक भावनेपोटी नाही. दलित हिंदूंना प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह आठवा. त्यांनी सांगितले होते ’आम्हाला देवाचे दर्शन घेऊन काहीही पुण्य कमवायचे नाही, परंतु ’प्रवेशबंदी’ हा अपमान आहे, कलंक आहे, तो आम्हाला पुसायचा आहे’.

सध्या विरोधकांमधे प्रत्येक घटनेचा दोष मोदींना देण्याची आणि मोदी समर्थकांनी सगळ्य़ाचे खापर गेल्या ६० वर्षाच्या अकार्यक्षमतेवर फोडण्य़ाची स्पर्धा सुरू आहे. अशा काही मंडळींना हे विरोधकांचे राजकीय कारस्थान वाटते. या बायकांना प्यादे म्हणून वापरून फडणीस सरकारविरूद्ध केलेलं षडयंत्र वाटते. तसे असेल तर उलट हे पुरोगामी बदल फडणीस सरकारच्या पथ्यावरच पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सकारात्मक कौल दिला होता. विरोध केला तर प्रतिगामी ठरू या भीतीने का होईना ,या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे निर्णय फडणीस सरकारच्या कार्यकाळात झाल्याने उलट त्या सरकारला याचे श्रेय जाते आहे. थोडक्यात विरोधकांनी सरकारच्या शिरपेचात आयता तुरा खोवून दिल्याबद्दल समर्थकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. आंदोलनकर्त्या स्त्रियांचा हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, असा काहींचा आक्षेप आहे. आंदोलनकर्त्या संघटनेतील फूट आणि दर्शनाला सर्वात आधी पोचायची चढाओढ बघता यात तथ्य असावे. परंतु ’२४ तास काय बरे दाखवावे’ या चिंतेत असल्याने देसाई यांच्या प्रत्येक शब्दाला ’मथळा’ बनवणार्‍या माध्यमांची ही देण आहे. अर्थात ही प्रसिद्धी देसाईंना पूनम पांडे छाप सवंग पद्धतीने फुकटात मिळालेली नाही. या बदल्यात धमक्यांचे फोन, शारिरीक मारहाण आणि मानसिक दडपणाचा ’आहेर’ त्यांना समाजाने दिला आहे. शिवाय ’आपण काय जेवलो, आत्ता काय करतोय’ हे जगाला सतत सांगून प्रसिद्धीचा खटाटोप करण्य़ाच्या फेसबुकी जमान्यात समाजात काही सकारात्मक बदल घडवून प्रसिद्धी मिळवणे केव्हाही श्रेयस्कर!

या बायकांवर बहुतेक जणांचा आरोप आहे असा आहे की, ’ मंदीर प्रवेशाचा हट्ट कशाला? स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्य़ासाठी छळ अशा शंभर समस्या आहेत, त्या सोडवा ना आधी’ हातात कधीही बॅट न धरलेली मंडळी ’धोनीचे’ काय चुकले यावर तावातावाने चर्चा करतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आपण स्वत:लाच विचारावं, १०० तल्या एका तरी प्रश्नाला या महिलांनी हात घातला. आपण यातल्या किती प्रश्नांना भिडलो? आयुष्यात एका तरी ध्येयासाठी आपण असा जिगरबाज लढा दिला आहे काय? नसेल तर हरकत नाही, आपलं रोजचं काम नीट करणं सुद्धा कमी महत्वाचं नाही पण जे त्या पलीकडे काही करू पाहतात त्यांच्यावर किमान विखारी टीका करून आपण त्यांचं खच्चीकरण करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांशी संबंधित तमाम समस्यांच्या मुळाशी ’स्त्री दुय्यम आणि अपवित्र आहे’ ही घट्ट बसलेली भावना आहे, ती आपापल्या बुद्धी आणि कुवतीनुसार उखाडण्य़ाचा प्रयत्न तरी करण्य़ाचे धाडस या महिलांनी दाखवले आहे. वर्षानुवर्षे बंद असलेली दारे किलकिली करण्य़ाचा प्रयत्न केला तर ती करकर वाजणारच पण त्याशिवाय नवे मार्ग चोखाळता येत नाहीत. आपण अशा धडपडींना, अडखळत्या पावलांना समजून घ्यायला हवे. बदल पचवून पुढे जायला हवे, हेच खर्‍या प्रगत आणि प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. तेव्हा मंदिर अथवा गाभारा अथवा दर्गा प्रवेश हे अंतिम ध्येय नाही हे देसाईंनी समजून घ्यावे. त्याचबरोबर आपण देखील हा आत्मपरिक्षणाच्या मार्गावरचा केवळ एक टप्पा मानायला हवा.

हे खरय की हा हक्क झगडून मिळवल्याने आजच्या स्त्रियांच्या दैनंदिन जगण्यात फारसा (टीकाकारांच्या मते ’कवडीचा’) दर्शनी फरक पडलेला नाही. परंतु आत्मसन्मानाच्या भानाचा दिवा असाच अंतरी पेटता राहिला तर त्या प्रकाशात निदान पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या पाऊलवाटा निश्चित उजळून निघतील.

Sunday, April 17, 2016

विराट विचार


http://epaperdivyamarathi.bhaskar.com/akola/354/17042016/0/1/ published in Divya Marathi

  नुकताच क्रिकेट २०-२० विश्वचषक २०१६ सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीपर्यंतच पोचू शकला मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. क्रिकेटप्रेमी भारतीयांना तेव्हा आनंदाचे उधाण आले होते आणि त्या भावनांना सर्वांनी सोशल मिडीयावर वाट करून दिली. कथित प्रेमप्रकरणामुळे विराटबद्दलच्या संदेशांमधे अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले. एका मर्यादेपर्यंत गंमत म्हणून हे ठीक होते. परंतु अनेक संदेशांमधे सभ्य विनोदाची पातळी ओलांडली गेली. अश्लाघ्य पद्धतीने टीकाटीप्पणी केली गेली तेव्हा मात्र ही परिस्थिती विराटने अतिशय खंबीरपणे हाताळली. या अतिरेकामुळे उद्विग्न होउनही त्यांने खणखणीत शब्दात सुशिक्षितांना त्यांच्या वाढत्या ‘सवंग’पणाची जाणीव करून दिली. ‘‘माझ्या खेळातील गुण-दोषांनंतर अनुष्काला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या लोकांची मला कीव कराविशी वाटते. अशा व्यक्ती जर स्वत:ला सुशिक्षित समजत असतील तर ही शरमेची बाब आहे.’’असे त्याने सुनावले. अनुष्काशी त्याचे ‘ब्रेक-अप’ झाले की नाही ही खाजगी बाब चघळणार्‍यांना चपराक देत कोहली म्हणाला, "तिने मला कायम प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनच दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी टीकेचे लक्ष्य करत असेल तर ते कसे वाटेल, याचा एकदा विचार करा’’

ज्या सोशल मिडीयातून विराट-अनुष्का वर कॉमेंट्स झाल्या त्याच सोशल मिडीयाचा वापर करून विराटने सर्वांना भानावर आणले. याची प्रशंसनीय परिणीती म्हणजे भारतीय संघ वेस्ट इंडीजविरूद्धचा सामना हरल्यानंतर विराट-अनुष्कासंबंधात एकही पोस्ट आली नाही. आपल्या परिचयातील सहकारी किंवा नातलग स्त्रिया, मैत्रिणी यांची आपल्यामुळे अकारण बदनामी होत असेल तर त्यांची प्रतिष्ठा कशी जपावी याचा धडाच यानिमित्त्याने विराटने घालून दिला. विराट एक उत्तम खेळाडू आहेच पण तो विचारांनीही उमदा आहे हे त्याने त्याच्या सडेतोड वक्तव्याने आणि नेमक्या कृतीने दाखवून दिले आहे. आजचे तरूण विराटला आदर्श (आयडॉल) मानत असतील तर त्यांनी फक्त त्याच्या खेळाचे, केशरचनेचे किंवा त्याच्या हातांवरील टॅटूचे अनुकरण न करता त्याच्या विचारांचे आणि वर्तनाचे अनुकरणही करायला हवे.

हल्ली ’व्हायोरिझम’ म्हणजेच ’दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात डोकावायचे आणि त्यातून विकृत आनंद मिळवायचा’ ही वृत्ती वाढत चालली आहे. विकृतीच्या टोकाला न जाता कमी अधिक प्रमाणात ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात असते, पण त्यावर मात करणे आणि सामाजिक संकेत जपणे यालाच आपण सुसंस्कृतपणा म्हणतो. दुर्दैवाने सोशल मिडीयासारखे हत्यार मिळाल्याने ही दडपलेली भावना अजूनच वर येऊ लागली आहे. याच व्हायोरिझम चा वापर करून ’बिग बॉस’ सारख्या कार्यक्रमांचे उखळ पांढरे होते कारण आपल्या मनोरंजनाच्या कल्पना सवंग होऊ लागल्या आहेत. समाजधुरीणांसह प्रत्येक संवेदनशील व्यक्तींने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्य पुरूषांनाही याचे चटके बसू लागले आहेत. परंतु याचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे महिलांविषयक वाढते सायबर गुन्हे. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाला यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण यांची मी मुलाखत घेतली होती. त्यांनी खंत व्यक्त केली की सायबर सेल, ’दृष्टी’ सारखे अ‍ॅप, ’जागर तरूणाईचा’ यासारखे उपक्रम असे पर्याय देऊनही मुली-महिला तक्रार करायला पुढे येत नाही. मुळात गुन्हे कमी होण्य़ासाठी ,झालेच तर दाद मागण्य़ासाठी आणि समाजभान जागे करण्यासाठी मुलींना त्यांच्या परिचित सहकारी-नातलग पुरूष, महाविद्यालयीन मित्रांकडून विराटसारखी भक्कम साथ मिळायला हवी. तसे घडले तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.

Saturday, March 19, 2016

कारागृहातील साहित्य

’शोला शोला रटते रटते लब पर आंच न आये
एक चिंगारी लब पर रख दो लब फौरन जल जाये’

संत कबीर यांचा हा सुरेख दोहा. अनुभूतीतून उमटणारं सच्चेपण मांडणारा. प्रतिभा जर प्रखर अनुभवाच्या मुशीतून गेली तर त्यातून निर्माण होणारं साहित्य अधिक तावून सुलाखून अविष्कृत होतं हे सांगणारा. कारागृहासारख्या विपरीत पार्श्वभूमीचा विचार केला तर अशा परिस्थितीत होणारी साहित्यनिर्मिती अस्सल असते. लेखकाच्या वैचारिक प्रकृतीनुसार वेगवेगळी असली तरी ती जीवनाला थेटपणे भिडते. बोथस या सहाव्या शतकातील रोमन तत्त्ववेत्त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा फर्मावण्यात आली. त्या तुरूंगवासात लिहीलेलं ’कॉन्सोलेशन ऑफ फिलॉसॉफी’ हे कारागृहातलं पहिलं महत्वपूर्ण लेखन मानलं जातं. कारागृहातलं साहित्य( प्रिझन लिटरेचर) या विषयावरचं रिव्काह झिम या आयरिश लेखिकेचं ’consolations of writing' हे पुस्तक गेल्या जानेवारीत प्रकाशित झालं. कधी मृत्युच्या काळ्या छायेमधे तर कधी सश्रम यातना सहन करत तुरूंगवास भोगणार्‍या विख्यात व्यक्तीं यात व्यक्त झाल्या आहेत. यात सामाजिक मान्यता आणि मतांतरे यावरचं ऑस्कर वाईल्ड आणि जॉन बन्यान यांचं लेखन आहे, मादाम रोलंड तसेच अ‍ॅन फ्रँक यांचं बखरवजा लेखन आहे, जीन कॉसोचं हुकूमशाहीविरोधातील कवन आहे, प्रायमो लिव्हाईचं हत्याकांडाच्या सामाजिक परिणामांवरचं लिखाण आहे, ओ हेन्रीच्या भावनांचं प्रकटीकरण आहे. लेखक कोणत्या परिस्थितीत लिहीतो याने साहित्याच्या आस्वादात फरक पडतो का, एखाद्या रम्य स्थळी-घरी-किंवा अभ्यासिकेत बसून लिहीणे आणि कारागृहात सजा भोगत असताना लिहीणे यात नेमका काय फरक असतो? स्वातंत्र्याचा संकोच झाल्याने लेखकाच्या मांडणी, शैली, भाषेला अधिक धार चढते का अशा प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात दडली आहेत. काही उत्तरे व्यक्तीसापेक्ष असली तरी बंदिवासात लिहीलेलं साहित्य आणि जीवन हे एकमेकांच्या अतिशय निकट असतात, ते साहित्य गांभीर्याची डूब असलेलं आणि वास्तवाशी निगडीत असतं, हे यातलं समान सूत्र आहे.

हे सूत्र वैश्विक असलं तरी प्रस्तुत लेखात फक्त निवडक भारतीय लेखकांच्या कारागृहातील साहित्याचा विचार केला गेला आहे. भारतात विशेषत: स्वातंत्र्यपूर्व काळात कारागॄहात असताना अनेक मान्यवरांनी अतिशय दर्जेदार, उत्तम साहित्यिक मूल्य असलेलं आणि वैविध्यपूर्ण लेखन केलेलं आहे. कारावासातल्या एकांतात स्वत:ला एकाकी वाटू न देता, निराश न होता तो वेळ मनन, चिंतन आणि लेखनाला देण्य़ाला या मंडळींनी प्राधान्य दिले, ते केवळ या सर्व व्यक्ती असामान्य होत्या म्हणूनच. स्वातंत्र्योत्तर काळातल्या कारागृहातील साहित्यनिर्मितीची पार्श्वभूमी ही त्यापेक्षा वेगळी होती आणि आहे. देशांतर्गत समस्यांमधून निर्माण झालेली अस्वस्थता त्या लेखनामधून जाणवते.

कारागृह म्हणजे प्रतिकूलतेचा कहर. अशा स्थितीत महाकाव्याची रचना महाकवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. लालित्यपूर्ण पण ओजस्वी शब्दरचना, भावनांची उत्कटता, प्रासादिकता त्यांच्या साहित्यकृतींमधे नेहमीच आढळते पण त्याहीपलीकडे जाऊन सावरकरांची लेखणी मनाचा ठाव घेते ती तर्कशुद्धपणे मांडलेले स्पष्ट विचार आणि  खणखणीत अभिव्यक्तीमुळे. ’तुजसाठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण’ इतका दिव्य समर्पण भाव मातृभूमीप्रती व्यक्त करणार्‍या सावरकरांना ब्रिटिश सरकारने दोन जन्मठेपेची म्हणजे तब्बल पन्नास वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावून अंदमानच्या काळ कोठडीत डांबले. इथल्या अमानुष छळाला कंटाळून कित्येक कैदी आत्महत्या करीत किंवा विकल स्थितीत मरणाची याचना करत. सावरकरांना आठ बाय सहाच्या खोलीत डांबलेले होते. इतक्या विदारक स्थितीतही त्यांच्या प्रतिभेला काव्य स्फुरे. ’कमला’ आणि ’गोमंतक’ या महाकाव्यांची निर्मिती इथेच झाली. मृत्यूच्या दाढेत असूनही विजीगिषु वृत्तीने महाकाव्य लिहिणारे सावरकर हे जगातले एकमेव उदाहरण असावे. सावरकरांना काव्य सुचले तेव्हा त्यांनी जणू आभाळाला "माझा कागद होशील काय?' असे विचारले असणार अशी कल्पना करून लोककवी मनमोहन यांनी
"आभाळ म्हणाले ’नाही’ भूमीही म्हणाली ’नाही'।
मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही"
अशी बोलकी कविता लिहीली आहे.
’कमला’ या काव्यसंग्रहातील
’अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची’
यासारख्या ओळीतून त्यांचा तेजस्वी ’राष्ट्रवाद’ प्रत्ययाला येतो.
अंदमानातली त्यांची शिक्षा दहा वर्षानंतर काहीशी शिथील झाली. लेखन साहित्य मिळू लागले. अंदमानातच सावरकरांनी उर्दू भाषेत गझलाही लिहिल्या होत्या, तब्बल 80 वर्षांनंतर या गझलांची त्यांच्याच अक्षरातली वही मुंबईच्या स्वातंत्र्यवीर स्मारकाला मिळाली. अंदमानच्या तुरुंगातले लेखनिक प्यारेलाल यांच्याकडे सावरकरांनी ही वही दिली होती. या गझलेत आनंद आहे, विषाद आहे पण निराशा नाही. काळ्या पाण्याची शिक्षा हे देशसेवेकडे जाणारे , भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी उचललेले पहिले पाऊल अशा भावभावनांचा समुच्चय म्हणजे या गझला. जगाच्या अंतिम दिवशी देखील मी उच्चरवाने हेच सांगत असेन की मी हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थान माझा आहे, असं सांगणारी सावरकरांची प्रतिभा आपल्याला विस्मयचकित करून जाते. ते लिहीतात
’यही पाओगे मेहशरमें जबां मेरी, बयां मेरा,
मै बंदा हिंदवाला हूँ, या हिंदोस्तां मेरा पहले।’

सावरकरांच्या जाज्वल्य देशाभिमानाच्या, कडव्या राष्ट्रवादी भूमिकेच्या तुलनेत विनोबा भावे वेगळे, ’सब भूमी गोपालकी’ या विचारधारेचे प्रणेते. वैदिक परंपरेचे आणि भारतीय संस्कृतीचे उद्गाते विनोबा म्हणजेच विनायक नरहरी भावे यांच्या बाबतीत त्यांनी एरवी केलेंलं लेखन आणि कारागृहात केलेलं लेखन यात दर्जात्मक, भावनात्मक फरक नाही. लेखकाचं दैनंदिन आयुष्य आणि कारागृहातलं आयुष्य़ यात तफावत असेल तर त्यानुसार साहित्याचं आकलन बदलतं. विनोबांच्या गरजा इतक्या कमी होत्या की त्यांच आश्रमातलं साधं शुचिर्भूत सश्रम जीवन आणि कारगृहातलं जीवन यात फारसं अंतर नव्हतं. गरजा कमी म्हणजे इतक्या कमी की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. त्यांची शैली कधीच परिस्थितीनुसार बदलली नाही, ती कायम मॄदु होती. तरीही विनोबा म्हणत, तुरूंगाशिवाय इतकं आत्मपरिक्षण, इतकी अध्यात्मिक साधना झाली नसती. तुरूंगालाच तपोभूमी मानून त्यांनी साहित्यसेवा केलेली आहे. लेखणी आणि वाणीच नव्हे तर हा देहच सेवेचे एक साधन आहे अशी त्यांची भूमिका होती.
विनोबा म्हटले की सर्वप्रथम आठवते ती गीताई, आपल्या आईला सहज आकलन व्हावे या हेतूने सुलभ मायमराठीत श्रीमद्भगवद्गीतेचा विनोबांनी केलेला ओघवता अनुवाद. तांत्रिकदृष्टया विनोबांनी गीताई कारावासात असताना लिहीलेली नाही. परंतु ते धुळ्याच्या कारागृहात असताना १९३२ साली ती प्रसिद्ध झाली. झेंडा सत्याग्रहानंतर नागपूरच्या कारागृहात असताना त्यांनी ’ईशावास्य वृत्ती' हे पुस्तक लिहीलं. हे पुस्तक म्हणजे ’जगावं कसं’ याचा एक वस्तुपाठच आहे. जीवनशास्त्र खच्चून भरलेल्या ईशावास्य उपनिषदातील १८ मंत्रांची सहज उकल या पुस्तकात आहे. एका वाक्यात सांगायचं तर आपल्यात ’शहाणीव’ निर्माण करण्याचं काम हे पुस्तक करतं. ’स्थितप्रज्ञ दर्शन’ हे विनोबांचं कारागृहातलं आणखी एक महत्वाचं साहित्य. स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिरबुद्धी. गीतेतील आदर्श पुरूष विशेष. शिवणी कारागृहात दिलेल्या प्रवचनांचं हे संकलन. या पुस्तकाने आजच्या चंगळवादी जीवनामुळे सैरभैर झालेली मनं निश्चितच निवतील.
ब्रिटीशांविरूद्ध केलेल्या निदर्शनांमुळे ते धुळयाच्या कारागृहात डांबले गेले तेव्हा त्यांनी गीतेवर अभ्यासपूर्ण पण सोप्या भाषॆत प्रवचने दिली. सानेगुरूजींसारख्या सिद्धहस्त व्यक्तिने ती टिपून घेतली, त्याचेच पुस्तक म्हणजे गीता प्रवचने. याचे श्रोते म्हणजे संतमहंतांबरोबरच कारागृहातले सेवक आणि इतर कैदी देखील. उपनिषदांचे उपनिषद असलेली गीता सांगताना या सार्‍यांचा श्रमपरिहार करण्य़ाची, आत्मपरिक्षणाला भाग पाडण्याची शक्ती विनोबांच्या निरूपणात होती. गीतेचं आणि त्यांचं नात त्यांच्या शब्दात सांगायचं तर ’गीताई माझी माऊली... मी तिचा बाळ नेणता, पडता रडता... घेई उचलुनि कडेवरी’. अर्थात विनोबांचा सर्वसंगपरित्यागाचा आनंद भोगणारा आत्मा जिवंतपणीच इतका मुक्त होता की त्यांना हा देह म्हणजेच एक प्रकारचा तुरूंग भासत असावा, या अर्थाने विनोबांचं सगळच साहित्य हे कारागृहातलं साहित्य म्हणायला हवं.

’गीता’ हाच प्राण असलेल्या विनोबांच्या साहित्याच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळकांनी मंडाले येथील तुरूंगवासात असताना लिहीलेल्या ’गीतारहस्या’तून गीतेचे वेगळेच पैलू समोर येतात. याचे कारण विनोबा आणि टिळक यांची वैचारिक बैठक भिन्न होती. टिळकांचा गीतेकडॆ पाहण्य़ाचा दृष्टीकोन तर्कनिष्ठ होता तर गांधीच्या आणि विनोबांच्या गीता विवेचनानुसार , गीता हा नुसता धार्मिक ग्रंथ नसून आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं ते एक कविकल्पित रूपक. मूळ गीता निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे हा टिळकांच्या ’गीतारहस्य’ ग्रंथाचा गाभा आहे. यात गीतेचा महाभारताशी असलेला संबंध स्पष्ट करत अनुवाद केलेला आहेच त्याशिवाय गीतेचे अंतरंग व बहिरंग परीक्षण विवेचन स्वरूपात केलेले आहे.
बहिरंगपरीक्षणात गीतेचा काळ, गीतेच्या इतर टीकांचा विचार, गीता व महाभारत, गीता व उपनिषदे, गीता व ब्रह्मसूत्रे, भागवतधर्माचा उदय व गीता, गीता व बौद्ध ग्रंथ, गीता व बायबल, पौर्वात्य आणि पाश्चिमात्य विचारधारांची तुलना अशा अनेक विषयांवर यात लोकमान्यांनी विद्वत्तापूर्ण भाष्य केले आहे. टिळकांचा झंझावाती कार्यकाळ बघता तुरूंगवासामुळेच हा भव्य लेखनप्रकल्प पूर्ण होणे शक्य झाले असावे. त्याअर्थी ही इष्टापत्ती म्हणता येईल.

किंग्जफोर्ड या न्यायाधिशाने बंगालच्या फाळणीला विरोध करणार्‍या तरुणांना फटक्यांची शिक्षा सुनावली होती; साहजिकच या काळातले टिळकांचे अग्रलेख अधिकच जहाल होत गेले. न्यायमूर्ती दावर यांनी २२ जुलै १९0८ रोजी टिळकांना सहा वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. मंडालेच्या तुरुंगात पोचेतो त्यांची सक्तमजुरीची शिक्षा एका ठरावाने रद्द होऊन साध्या कैदेची केली गेली, हा त्यातल्या त्यात दिलासा. मंडाले आणि काही काळ मेकटिलाच्या तुरुंगात असताना त्यांनी ‘वेदांग ज्योतिष’ आणि ‘गीतारहस्य’ या दोन ग्रंथांचे लेखन केले. हिंदू धर्माचा इतिहास, भारताचा रामायणपूर्व इतिहास, शांकरदर्शन, प्रांतिक कारभार, हिंदू कायदा, शिवाजी महाराजांचे चरित्र अशा अनेक विषयांवर लिहीण्य़ाचा त्यांचा मानस होता. परंतु कैद साधी असली तरी हा तुरूंग किती भयानक होता त्याचा अनुभव त्यांच्यानंतर पाच वर्षांनी त्याच कारागृहात गेलेल्या सुभाषचंद्र बोस यांना आला. मंडालेची हवा इतकी खराब असताना एवढे बौद्धिक श्रम करणे लोकमान्यांसारख्या एखाद्या ज्ञानयोग्यालाच शक्य आहे, असे त्यांनी म्हटले होते. लोकमान्यांनी परदेशी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून गीतेवरचे भाष्य लिहिले आणि स्वतःचे तत्त्वज्ञान निर्माण केले. भारतीय तत्त्वज्ञान श्रेष्ठ होते, हे जागतिक संदर्भ देऊन सिद्ध करतानाच सर्वसामान्यांच्या जिज्ञासेला जागवेल आणि शमवेल अशा शब्दांत त्यांनी या ग्रंथाचे लेखन केले. लोकमान्यांनी भगवद्गीतेवर जवळ जवळ २० वर्षे चिंतन-मनन-मंथन केले होते त्यामुळेच हा ग्रंथ इतका सरस सिद्ध झाला. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी लोकमान्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिला असला, तरी एकंदर सामाजिक परिस्थिती बघता आजच्या काळात त्या ग्रंथातील तत्त्वज्ञानाची तितकीच आवश्यकता आहे.

पं. जवाहरलाल नेहरूंच्या कारागृहातील लेखनाचा पिंड मात्र अध्यात्मिक किंवा धार्मिक चिंतनाचा नव्हता. ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भात त्यांना विशेष रूचि होती. सुरूवातीला ब्रिटीशांच्या कलाकलाने घेऊन आपल्या मागण्या रेटून धरणार्‍या कॉंग्रेसने १९३२ मधे नेहरूंच्या नेतॄत्वाखाली खणखणीतपणे पूर्ण स्वराज्याची मागणी करून स्वतंत्रपणे झेंडा फडकावला. ब्रिटीशांनी यावर दडपशाहीचे तंत्र अवलंबले आणि नेहरूंची रवानगी तुरूंगात झाली. त्याआधी नेहरू नुकताच युरोप दौरा करून आले होते. सुमेरियन, युरोपियन संस्कृतीची निरीक्षणे आणि इतिहासाच्या दांडग्या अभ्यासातून नैनी व डेहराडून येथील तुरूंगात असताना विश्लेषकाच्या भूमिकेतून त्यांचं ’Glimpses over world history' हे जगाच्या इतिहासाचं ओझरतं दर्शन घडवणारं पुस्तक साकार झालं. हे पुस्तक त्यांनी त्यांच्या मुलीला, इंदिरा गांधींना उद्देशून लिहीलेल्या पत्रांच्या स्वरूपात आहे. प्राचीन भारतीय इतिहास किती समृद्ध होता याची जाणीव तोवर फक्त अभ्यासकांपुरती मर्यादित होती. या पुस्तकाच्या निमित्त्याने त्याचं दर्शन जगाला घडवता आलं.

याच तुरूंगवासातल्या पुढच्या काळात त्यांनी ’ Towards freedom' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहीलं. हे पुस्तक त्यांनी पत्नी कमला नेहरूंना अर्पण केलं आहे. पूर्ण स्वराज्याच्या मागणीची पार्श्वभूमी या शीर्षकामागे होती. नेहरूंची वैयक्तिक आणि कॉंग्रेसची एकूणच जडणघडण कशी होत गेली, नेहरूंवर असलेला गांधीजींचा प्रभाव आणि वेगळेपण, त्यांना टिळक तसेच ना. गोखले यांच्याबद्दल असलेलं वैचारिक आकर्षण अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह त्यांनी यात केला आहे. नेहरूंची विचारपद्धती समजून घेण्य़ासाठी अभ्यासकांना हे पुस्तक महत्त्वाचे वाटते. या तुरूंगातल्या सुटकेबरोबरच हे पुस्तक विराम घेतं. १९४२ च्या ’चले जाव’ चळवळीतील सहभागामुळे नेहरूंवर कडक कारवाई होऊन त्यांना अहमदनगर येथील तुरूंगात ठेवण्यात आले. या सलग चार वर्षाच्या तुरूंगवासात नेहरूंनी पुढे अतिशय गाजलेले ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहीले. ब्रह्मांडाच्या उत्पत्तीपासून भारताच्या स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा आलेख यात मांडलेला आहे. यात प्राचीन, मध्ययुगीन काळापासून ते १९४५ पर्यंतचा भारताचा इतिहास सामावलेला आहे. प्रचंड आवाका असलेल्या या ग्रंथलेखनासाठी मौलाना आझाद तसेच गोविंद वल्लभ पंत यांची नेहरूंना मोलाची मदत झाली. याशिवाय 'bunch of old letters' हे एस.गोपालन यांनी संपादित केलेलं, पं. नेहरूंच्या कारागृहातून लिहीलेल्या विवीध पत्रांचं संकलन हे देखील नेहरूंचं कारावासातलं लेखन म्हणता येईल. नेहरूंचे एरवीचे काहीसे राजेशाही पद्धतीचे ऐटबाज जीवन आणि ब्रिटीशांकडून त्यांना जहाल क्रांतीकारकांच्या तुलनेत मिळणार्‍या सवलती यामुळे त्यांना बंदिवासात लेखन करणं सहजसाध्य होतं असं मानलं जातं. परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीनंतर ब्रिटीशांचा प्रचंड रोष त्यांना पत्करावा लागला, शिवाय त्यांची पुस्तक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर थेट भाष्य करणारी असल्याने ब्रिटीश सरकारची करडी नजर आणि सहकार्यात अनेक अडचणी यावर मात करतच नेहरूंना आपलं लेखन पूर्ण करावं लागलं.
स्वातंत्र्यपूर्व काळातल्या या महानुभावांच्या कारावासातल्या लेखनाने समाजाला जागतिक स्तरावर भारताची मान उंचावणार्‍या आशयगर्भ साहित्याची अपूर्व भेट दिली.

कारावासाचा अर्थ फक्त गजामागचं कोंडलेलं जीवन इतकाच न घेता लेखन स्वातंत्र्यावरील बंधन, वैचारिक मुस्कटदाबी किंवा अभिव्यक्तीविरोध असा घेतला तर १९७५ मधील आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यकृतींना देखील कारागृहातील लेखन म्हणता येईल. आणीबाणीत अविष्कार स्वातंत्र्यासाठी तुरूंगवास पत्करणारे महत्त्वाचे लेखक म्हणजे विनय हर्डिकर. या अनुभवावरचे त्यांचे ‘जनांचा प्रवाहो चालला’ हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे. हेमिंग्वेच्या ‘फेअरवेल टू आर्म्स’ ही हेमिंग्वेची युद्धात निर्वासित झालेल्यांच्यावर लिहीलेली कादंबरी. या लेखनावरच्या चित्रपटातील एक प्रसंग हर्डीकरांनी लिहीला आहे. अर्धमेल्या अवस्थेतील एक बाई घोडागाडीतून जात आहे. तिच्या मांडीवर बाळ आहे. एका खड्ड्यातून गाडी जात असताना ते बाळ निसटून खाली पडतं. क्षणभर तिचा चेहरा वेदनेने पिळवटतो आणि परत निर्विकार होतो. संवेदना गोठलेल्या त्या आईला जीवाच्या आकांताने ते बाळ उचलून घ्यावंसं वाटत नाही. युद्धामुळे किंवा टोकाच्या सामाजिक परिस्थितीत कशी बधिरता येते असं दिग्दर्शकाने यातून दाखवलं. हर्डीकर म्हणतात की आपल्या लेखकांनी तर अनुभवाची धग सोसण्याआधीच आविष्कार स्वातंत्र्याचं, मुलभूत हक्काचं मांडीवरचं मूल खाली पडू दिलं.
शासकीय दबावतंत्राला तळपत्या शब्दात विरोध करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांची आणीबाणी काळातील भाषणं व लेखांचे छोटेखानी पुस्तक ‘मुक्ता’ 1977 मध्ये पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केले. त्यात दुर्गाबाईंनी एरवी विचारस्वातंत्र्याचा उद्घोष करणारे तेंडुलकरांसारखे साहित्यिक सार्वत्रिक बंदी आल्यावर मूग गिळून गप्प का बसले, असा खडा सवाल केला आहे. याच पुस्तकात दुर्गाबाईंनी लेखनावर आलेल्या बंधनांना ठाम विरोध करताना म्हटलं आहे, ‘लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात. आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार-मुक्त विचार-हे मानले पाहिजेत.’

महाराष्ट्रातल्या ‘मुक्त साम्यवादी गटा’शी जोडले गेलेले, साठीच्या दशकात मराठी अनियतकालिकांमध्ये कवितालेखन करणारे एक महत्त्वाचे कवी तुळसी परब. त्यांच्या 'धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता' या दुसऱ्या कवितासंग्रहातील कविता या कारावासातील कविता म्हटल्या जातात. प्रेम आणि मृत्यु सारख्या जाणिवांवर असलेला सामाजिक आणि राजकीय अंकुश यातून दिसून येतो. बंदिवासातील दबावाचे वातावरण आणि त्यात होणारा कवीचा मानसिक कोंडमारा या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. आणीबाणीविरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या पुन:स्थापनेकरता संघर्ष करताना कारावास भोगणार्‍या अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्त्यांच्या आठवणी, तसेच कारावासातील नोंदी स्फुट स्वरूपात ठिकठिकाणी प्रसिद्ध झाल्या आहेत. या संकलित स्वरूपात प्रसिद्ध झाल्यास या विषयाचा आणखी एक लुप्त पैलू उजागर होईल.
या उलट स्वातंत्र्योत्तर काळापासून आजवर जे साहित्यिक पुरस्कारांसाठी, अनुदान किंवा शिष्यवृत्तींसाठी लांगूलचालन करत शासनकर्त्यांना रूचेल पचेल अशीच साहित्यनिर्मिती करत आले त्यांनी मात्र आपले साहित्य स्वह्स्ते कारावासात डांबले असेच म्हणायला हवे.

आजही कारावासातल्या अनुभवांवर किंवा प्रत्यक्ष कारावासात साहित्यनिर्मिती होते आहे. अर्थात आज तुरूंगात डांबले जाणारे कैदी हे बहुतांशी गुन्हेगार किंवा आरोपी असतात, ती पूर्वीसारखी राजकीय नजरकैद नाही आणि त्या बंदिवासामागे पूर्वीसारखे उदात्त ध्येय नाही. साहजिकच उन्नत आंतरिक प्रेरणेतून, वैचारिक मंथनातून साकार झालेल्या तत्कालिन साहित्याची आणि आजच्या तुरूंगवासात केलेल्या लेखनाच्या गुणवत्तेची तुलना होऊ शकत नाही. आज जागतिकीकरणाने जगण्य़ाचे संदर्भच बदलून टाकले आहेत. तत्कालिन साहित्यातून विस्तारत गेलेला मानवतेचा विशाल पट संकोचत जाऊन विश्वमानवाचा प्रवास ’मी’ वर येऊन स्थिरावल्याचे चित्र दिसते आहे. या सार्‍या छटांचा परिणाम साहित्याच्या दर्जावर होत गेलेला दिसून येतो.

 क्षणिक रागाच्या भरात ज्यांच्या हातून विघातक कृती घडली आणि कैद वाट्याला आली अशा कित्येकांनी कालांतराने पश्चातापदग्ध मनस्थितीत कवितेतून भावनांना वाट करून दिली. त्या कवितांना प्रस्थापित साहित्यिक परिमाणात मोजता येणार नाही. अशा कवितांचे संकलन म्हणजे उत्तम कांबळे यांनी संपादित केलेला ’गजाआडच्या कविता' हा काव्यसंग्रह. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरीत कायम करण्य़ाचं आमिष दाखवून शिक्षण संस्थेच्या चालकानं एका होतकरू तरूणाला पाच वर्ष फुकट राबवून घेतलं, वर डोनेशन या गोंडस शब्दाआड लाच घेतली आणि नंतर त्याच्या तोंडाला पाने पुसली. पुरावा नसल्याने पैसाही परत मिळेना तेव्हा संतप्त मनोवस्थेत या तरूणाने संस्थाचालकाचा खून केला. अशा घटना कवितेत कुठं कुठं झिरपताना दिसतात. मूल्यांना पायदळी तुडवून व्यवस्था पुढे जात असेल तर गुन्ह्यांकडे वळणारी पावले ही त्याची अपरिहार्यता तर नाही! ही सारी तगमग, असहाय्यता, उद्रेक सारं काही या कवितांमधून डॊकावतं. मराठीच नव्हे, तर अन्य भाषांतही असा संग्रह प्रसिद्ध झालेला नाही. तुरुंगातले सगळेच कैदी दोषी असतात असं नाही. ""मी जेव्हा तुरुंग महा निरीक्षकपदाची सूत्रं स्वीकारली, तेव्हा ज्यांच्यावर आरोप सिद्ध झालेले नाहीत असे ६५ टक्के कैदी तुरुंगात होते, त्यांच्या खटल्यांचा निकाल लागायचा होता,‘‘ असं उद्धव कांबळे यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सांगितलं आहे. कायद्याने गुन्हेगार ठरलेल्या, किंवा खटला प्रलंबित झाल्याने अंधारलेलं आयुष्य जगणार्‍या अशा कित्येकांच्या काळजातल्या संवेदनशीलतेवर त्यांच्या कवितेने कवडसा पाडला आहे.

अस्तित्वाच्या प्रयोजनाचा शोध आणि त्यातून होणारा माणूसपणाचा बोध हे सत्र साहित्यात निरंतर सुरू राहील. कारागृहातल्या एकांतवासामुळे घडणारे आत्मपरिक्षण आणि गजाआडच्या जगातले अनोखे अनुभव यामुळे या शोधाला एक सत्यनिष्ठ आणि अधिक गहिरा आयाम लाभतो हे निर्विवाद.


(पूर्वप्रसिद्धी -तरुण भारत विशेषांक)
पं.नेहरुंच्या लेखनाबाबत चर्चा- संदर्भ- अभ्यासक श्री. राज कुलकर्णी



Tuesday, March 15, 2016

किताबे (भावानुवाद)


पुस्तकं.. बंद कपाटाच्या काचेआडून डोकावणारी
जगाकडे आसुसून बघणारी..  पुस्तकं !
आता महिनोन् महिने भेट होत नाही.. माणसांशी
पुस्तकांच्या सान्निध्यातल्या उबदार तिन्हीसांजा
खिळल्यायत आता.. संगणकाच्या थंड पडद्यावर.
बेचैन.. अस्वस्थ झालीयत पुस्तकं.
ग्लानीत नकळत अवतरतात ..कपाटातून मेजावर
वाट बघत राहतात..आशेनं.. 
कुणी तरी चाळेल म्हणून

ज्या गाथा गायल्या त्यांनी ..एके काळी
ज्यांनी भारलेलं असायचं.. सारं घर
त्याचा मागमूसही
नाही उरला कुठे.
ज्यांच्या कथा असत..त्यात गुंफलेल्या
ती नातीसुद्धा आता छिन्नविछिन्न.. उसवलेली.
नकळत मी उलटलंच एखादं पान.. 
तर
ऐकू येतो..  त्यातून एक अनावर हुंदका.
शब्दांचे विखरून गेलेले मोती तेवढे घरंगळतात.. पानांवरून.
पर्णहीन फांद्यांसारखी.. ती शुष्क बोडकी अक्षरं
ज्यावर बहरतही नाही.. प्रतिभेची कोवळी पालवी
काचपात्रांच्या दिमाखापुढे
निष्प्रभ झालेल्या मातीच्या भांड्यासारखी...
निरूपयोगी.. केविलवाणी.. 
पुस्तकं !

पानं उलटताना जाणवणारी.. संमोहित करणारी..
हरवली ती आगळीवेगळी चव.
आता बोटं फक्त क्लिक करतात...निमिषार्धात
अन उलगडत जातं एक अफाट विश्व.. संगणकाच्या पडद्यावर
पुस्तकांशी असलेलं ते नातं.. 
उत्कट 
हळुवार
आपुलकीचं
संपलं...!!

वाचता वाचता निद्रेच्या कुशीत शिरताना.. हृदयाशी बिलगलेली पुस्तकं
कधी मांडीवर घेऊन.. तन्मय होऊन.. अनुभवलेली पुस्तकं
कधी दुमडलेल्या गुडघ्यांवर ठेवून .. तर कधी
घनदाट लिंबाच्या निवांत छायेत...भान हरपून वाचलेली पुस्तकं.
हरवला.. त्यांचा तो अलवार तरल स्पर्श.
’ज्ञान’ वगैरे...  आजही मिळवता येतंच की
पण 
त्या अवीट.. अबोल स्मृतींच्या पाकळ्या
पुस्तकातून जपलेल्या.. सुगंधी पानखुणा
पुस्तकं मागता घेताना, पडल्यावर हलकेच उचलून देताना
फुलत जाणार्‍या नवथर नात्यांच्या 
त्या नाजूक कळ्या
त्यांचं काय !! 
त्या कधीच उमलणार नाहीत आता
कदाचित.

( गुलजार यांच्या ’किताबे’ या कवितेचा मी केलेला भावानुवाद)

Friday, January 22, 2016

स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची (अनुवाद)


स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची

ऐकलय का कधी
पुरूषांपेक्षा वेगळया..
अशा स्त्रीच्या भावविश्वाबद्दल....?

घर, प्रेम, समाज याशिवाय..
तिची स्वत:चीही जमीन असल्याचं
सांगू शकता तुम्ही...
एखाद्या स्त्रीला?

देऊ शकता
युगानुयुगे स्वत:चं घर शोधणार्‍या
एखाद्या अस्वस्थ स्त्रीला
तिच्या घराचा पत्ता?

कसं शक्य होतं असेल स्त्रीला
आपल्या भावजीवनात
रममाणं होणं..
अन त्याच क्षणी ते सारं पुसून टाकणं !
केलात विचार कधी..?

स्वप्नात एखादीमागे धावताना..
पाहिलत कधी तुम्ही तिला
नात्यांच्या युद्धभूमीवर..
स्वत:शीच लढताना?

शरीराच्या भूगोलापल्याड जाऊन
तिच्या मनाची गाठ उकलून..
जाणून घ्यावासा वाटला कधी...
तिच्या आतला.. उफाळणारा इतिहास?

वाचलात कधी
मौनाच्या उंबरठ्य़ाआड दडलेला
’ब्र’ उच्चारायाला आसुसलेला.. तिचा चेहरा?

तिच्यात वंशाचं बीज रूजवताना
अनुभवलत कधी..
तुमच्यामधे खोलवर विस्तारत..
सामावत गेलेल्या..तिच्या मुळांना ?

उमगलं कधी तुम्हाला
एका स्त्रीभोवती गुरफटलेलं..
नात्यागोत्याचं व्याकरण ?

उलगडता येईल तुम्हाला
एखाद्या स्त्रीला?
येईल का करून पाहता
एका स्त्रीच्या नजरेतून ...
’स्त्रीत्वा’ची व्याख्या?

आणि नसेल जमत यातलं काहीच..
तर
काय माहितीये हो तुम्हाला
एका ’स्त्री’बद्दल !!
शेजे आणि पेजेच्या गरजेपलीकडे..???

मूळ संथाली कवयित्री : निर्मला पुतुल
अनुवाद : मोहिनी मोडक