’तरूण भारत’ च्या वर्धापनदिन विशेषांकात (ऑगस्ट २०१६) प्रसिद्ध झालेला लेख
विनोबा आणि ग्रामोदय
’खेडय़ास देव निर्मि, नगरास निर्मि मनुज’
शहर आणि गावे यांच्यातला फरक आचार्य विनोबा भावे यांनी अशा नेमक्या शब्दात सांगितला आहे. ’ग्रामोद्धारा’चा विचार करताना विनोबांच्या प्रत्येक संकल्पनेत याच आत्मीयतेचा प्रत्यय येतो. विनोबांचा कृतीप्रवण कार्यकाळ हा मुख्यत: स्वातंत्र्यपूर्व. परंतु त्यांच्या ग्रामोद्धाराच्या बहुतेक संकल्पना आजही लागू होऊ शकतात ही बाब एकीकडे त्यांचे द्रष्टेपण दर्शवते, दुसरीकडे स्वातंत्र्यप्राप्तीला ६८ वर्ष उलटून गेली तरी आपल्या देशातल्या मुलभूत समस्या अजूनही त्याच आहेत हे कटू सत्य देखील अधोरेखित करते.
या समस्यांवर उपाय म्हणून केंद्रात सत्तेवर येताच शहरी विकासाच्या संकल्पनांवर भर देणार्या मोदी सरकारने आता ग्रामीण विकास आणि शेती विकासावर भर द्यायला सुरूवात केली आहे. ’गरीबी हटाओ’ हा नारा काही नवा नाही. शेतकरी आणि कामगारांची प्रगती, हा देशच नव्हे तर राज्य किंवा अगदी स्थानिक पातळीवरील राजकीय पक्षांचा कायमच मुख्य अजेंडा राहिलेला आहे. मात्र बहुतेक वेळा या योजना कागदावर, किंवा थोड्य़ा पुढे गेल्याच तर ’नोकरशाहीच्या लाल फीतीत’ अडकून राहिल्या आहेत, असेच आपला राजकीय इतिहास सांगतो. त्यातूनही काही योजना मुसंडी मारून पुढे गेल्याच तरीही आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात त्यांना अनेकदा खीळ बसते. शेतकर्यांचे प्रश्न उच्चस्तरावर चर्चेला येतात, एखादी ’कलावती’ राष्ट्रीय चर्चेचा विषय ठरते परंतु समस्यानिवारण मात्र होत नाही. कर्जमाफीसह अनेक उपाय अवलंबिले गेले; परंतु शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन ते सोडवता यावेत म्हणून आज ’मेक इन इंडिया’, स्टँड अप इंडिय़ा’, ’स्टार्ट अप इंडिया’, ’शून्य शिल्लक बँक खाते’ अशा विविध बहुआयामी योजना वेगाने सुरू झालेल्या दिसतायत. याशिवाय केंद्र सरकारने ‘ग्रामोदय से भारत उदय’ अभियान यंदा १४ एप्रिलला जाहीर केले आहे. पूर्वी सत्तेवर असणार्या सरकारांनी याबाबतीत काहीच प्रयत्न केले नाहीत असे नक्कीच म्हणता येणार नाही तरीही केंद्र सरकारने नव्याने घोषित केलेला ‘ग्रामोदय से भारत उदय’ कार्यक्रम या सगळ्य़ांपेक्षा वेगळा आहे.
वाजपेयीजींना ’अजातशत्रू’ मानले गेले आणि स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्या योजनांकडे देशातील जनतेने कायम ’निखळ’ आणि सकारात्मक दृष्टीने पाहिले, तरीही त्यांच्या सरकारला २००४ मध्ये पायउतार व्हावे लागले. ’शायनिंग इंडिया’ शब्दप्रयोग आणि त्यातून झालेला भ्रमनिरास हे यामागील कारण असावे असे राजकीय विश्लेषक म्हणतात. हे विचारात घेता नव्या मोहिमेसाठी मोदी सरकारने ‘ग्रामोदय’ शब्दाला केंद्रस्थानी ठेवून मगच ‘भारत उदय’ ही भावना स्पष्ट केली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पातही या भावनेचे प्रतिबिंब उमटले होते. म्हणूनच देशातील अडीच लाख ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत पाच वर्षांसाठी 2 लाख 292 कोटी रुपये अनुदानाच्या स्वरूपात दिले गेले आहेत. ग्रामोदय हा शब्द बहुपदरी आहे. त्यात शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांबरोबरच सामाजिक समरसता, सामाजिक न्याय, दलित आणि आदिवासी समुदायांना प्रतिनिधीत्व अशा अनेक प्रश्नांची उकल करण्य़ाचा सरकारचा मानस आहे. यातून ग्रामीण विकासाचे ध्येय गाठले जाणार की सत्तर वर्षांच्या राजकीय इतिहासाप्रमाणे या योजना मूठभर लोकांच्याच हिताच्या ठरणार ही शंका ’दुधाने तोंड पोळलेल्या’ बहुसंख्य भारतीयांच्या मनात आहे. या योजना कागदावरून सरकारी कार्यालयापर्यंत तर पोचल्या आहेत परंतु आता त्यांचं यश लोकसहभागावर अवलंबून आहे. राजसत्ता लोकमताच्या आणि लोकसहभागाच्या आधारे उत्तम कार्य करू शकते, पण लोकमत निर्माण करण्याचे काम ऋषीच करू शकतात असं म्हटलं जातं. आज अशा ऋषींची वानवा आहे, म्हणूनच मागे वळून विनोबांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाच्या, ग्रामोदयाच्या विचारांना समजून घेण्य़ाची गरज निर्माण झाली आहे.
विनोबांच्या ’सर्वोदय’ या संकल्पनेतच ग्रामोदयाचाही समावेश होतो. ’अधिकाधिकांचे अधिकाधिक सुख’ या उपयुक्ततावाद्यांच्या मूळ सूत्रापेक्षा किंवा जेरेमी बोथॅम च्या ’बहुजनांचे कल्याण’ या संकल्पनेपेक्षा सर्वोदयाचे उद्दिष्ट्य़ अधिक व्यापक आहे. सर्वांचा अभ्युदय, व्यक्तीची स्वायत्तता आणि शासनमुक्त समाजाचा आग्रह धरणारा हा सिद्धांत आहे. येथे शासनमुक्त म्हणजे मनमानी कारभार असा अर्थ नसून शास्ते आणि आणि शासित असा विभाग न करता स्वयंशासित समाज असा अर्थ विनोबांना अभिप्रेत होता. जातीभेद आणि पिळवणूक यांना थारा नसलेला, सत्य, अहिंसा आणि साधनशुचिता या पायावर उभा असलेला नवा समाज निर्माण करणे म्हणजे सर्वोदय. विनोबा राज्यांच्या राजकारणापेक्षा सहकाराच्या राजकारणाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी ग्रामोद्धारासाठी निर्धारित केलेली नियोजनाची मूलतत्वे समजावून घेतली तर हे लक्षात येते. विनोबा म्हणत "प्रत्येक हाताला काम हेच रोजगार योजनेचे उद्दिष्ट्य़ असायला हवे. उत्पादकता हा एकमेव निकष काम देताना लावण्य़ात आला तर ती योजना सर्वसमावेशक म्हणता येणार नाही. प्रत्येक शासकीय योजनेने तळागाळातील जनता आणि वंचितांच्या उत्थानाला प्राधान्य द्यायला हवे. कुणीही बेकार आणि भुकेले राहणार नाही याची काळजी घेतली गेली तरच त्या नियोजनाला अर्थ आहे. मुलभूत गरजांची पूर्ती केल्याशिवाय ’जीवनमान उंचावण्यासाठी नियोजन’ ही संकल्पना कुचकामी ठरेल. " असे ते म्हणत. नियोजनाचे देखील विकेंद्रीकरण व्हायला हवे असा त्यांचा आग्रह होता कारण बहुतेक सर्व योजना या शहरी शासकीय कचेर्यात बसून आकाराला येतात, प्रत्येक गावाचे प्रश्न आणि गरजा सारख्याच नसतात त्यामुळे अशा सरसकट राबवलेल्या योजना यशस्वी होत नाहीत. गावपातळीवर त्यांचे नियोजन झाले तरच विकासाकडे वाटचाल होऊ शकेल. " ’व्यक्ती’ पेक्षा समूहाला महत्व देणारे नियोजन हवे. मोठमोठ्या योजनांचा अवलंब करण्य़ाआधी लघुप्रकल्पांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी आवश्यक ते कौशल्य निर्माण केले तरच मोठ्य़ा योजना कार्यान्वित होऊ शकतील. आर्थिक विकेंद्रीकरणासाठी किमान कौशल्यावर आधारित ग्रामोद्योग ,कुटीरोद्योग, लघुउद्योगांना चालना देणारे आर्थिक नियोजनच खरा विकास घडवू शकेल," हे विनोबांनी पारतंत्र्याच्या अंतिम दशकात सांगितले होते. आज हीच संकल्पना स्वीकारून सरकारने आरेखित केलेल्या ’स्कील इंडिया’ योजनेत, बेकार पदवीधरांची फौज वाढवण्य़ापॆक्षा नव्या युगाची कौशल्ये आत्मसात केलेली तरूणाई निर्माण करण्य़ावर भर दिला जातो आहे.
ग्रामोद्धाराचा खोलवर विचार करताना विनोबा एक प्रणाली मांडतात. ते म्हणत, "सृष्टीत सर्ग-प्रलय झाले तरी ज्ञानी अडोल असतो, असे गीतेत म्हटले आहे. तीच स्थिती नकारात्मक अर्थाने खेड्यांची झाली आहे आणि हे सारे अज्ञानामुळे." १९३५ साली पवनार येथे एका प्रवचनात विनोबा म्हणाले होते, "अज्ञान दूर करायचे तर जीवनात ३ प्रधान गोष्टी असायला हव्यात. त्या म्हणजे ’उद्योग, भक्ती आणि शिक्षण’. देशात आळसाचे वातावरण फार आहे, निरूद्योगी वृत्ती हा प्रगतीमार्गातला अडसर आहे. तेव्हा सतत कार्यरत राहा. दुसरं भक्ती, म्हणजे कर्तव्यशून्यता नव्हे तर दिवसभर पवित्र उद्योग करून ती सेवा आत्मपरिक्षणासह देवाला अर्पण करणे. तिसरं शिक्षण, सातत्याने ज्ञान मिळवत राहायला हवे." विनोबा म्हणत ,"हिंदुस्थान कृषीप्रधान म्हटला जातो पण त्याचा उद्धार केवळ शेतीवर होणे नाही. आपापल्या उद्योगात तरबेज होण्य़ासाठी प्रत्येकाला विज्ञान शिकायलाच हवे. उदा: गृहिणीला सुद्धा स्वयंपाकघरात कोणत्या खाद्यात किती उष्मांक(कॅलरीज), ओज(प्रोटीन्स) किती, स्नेह(फॅटस) किती, कोणाला कसा आहार योग्य याचे शास्त्रीय ज्ञान हवे. माझा चरखा मोडला तर काम बंद न करता तो माझा मला दुरूस्त करता आला पाहिजे. विंचू चावला तर रडत बसण्यापॆक्षा मला त्यावर उपचार करता आले पाहिजे. उद्योग आणि विद्या वेगळे नाहीत. उद्योगाशी नित्य परिचय राहिला नाही तर ज्ञान मागासते, मग जुन्या ज्ञानावरच काम भागवले जाते, हे उपयोगाचे नाही. ’कराग्रे वसते लक्ष्मी’ ..म्हणजे बोटाच्या अग्रभागी लक्ष्मी आहे असे आपण मानतो मग त्या बोटात उत्तम कलाकौशल्य नको? अन्यथा तुमचे स्वराज्य केवळ स्वप्नातीलच आहे असे खेदाने म्हणावे लागेल. श्रमाला नुसत्या वाड्मयात प्रतिष्ठा आहे, ती जगण्यात उतरली पाहिजे."
आजही खरा भारत वसतो तो खेड्य़ांमधूनच. २०११ च्या जनगणनेनुसार सव्वा करोड भारतीयांपैकी ८३.३ करोड भारतीय खेड्य़ात राहतात. शहरांच्या लोकसंख्येत गेल्या दशकात सातत्याने वाढ झाली आहे तर खेड्यांची लोकसंख्या २.३५ ट्क्क्य़ाने घटली आहे. रोजगार मिळवण्यासाठी शहरांकडे जाणारे आणि कधीही न परतणारे लोंढे वाढतच आहेत. कृषीक्षेत्र भरवशाचे वाटेनासे झाल्याने ४०% शेतकर्यांनी शेती व्यवसाय सोडून दिला आहे. फेडरेशन ऑफ इण्डियन फार्मर्स ऑर्गनायजेशन (फिफो) च्या अहवालात भूमि अधिग्रहणामुळे देशातली १२ लाख हेक्टर कृषि योग्य जमीन कमी झाल्याचा उल्लेख आहे. तरीही देशाच्या लोकसंख्येच्या ५८.४ % हून अधिक जनतेचे उपजीविकेचे मुख्य साधन आजही शेतीच आहे त्यामुळे विकसित भारताचं मूळ शोधायचं असेल तर ’खेड्यांकडे चला’ हा संदेश पुन्हा एकदा समजून घेणे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात विनोबांनी १९४० साली केलेले ग्रामोदयातील अडसरांचे विवेचन,ग्रामीण विकासाच्या मार्गावरचे दिशादर्शक म्हणायला हवे. विनोबा म्हणत, "१० पैकी १ माणूस शहरात राहतो तर ९ खेड्य़ात. शेतकर्याला दोन देव आहेत एक पाऊस पाडणारा, दुसरा भाव ठरवणारा." शेतीसुधारणेविषयी ते अनेक उपयुक्त सल्ले देत, उदा: अखेरची वेचणी संपताच पर्हाटी तुम्ही काढून का टाकत नाही. अन्यथा ती जमिनीचा कस शोषते.
पण तरीही सारे प्रयत्न करून पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव येत नाही. आर्थिक विवंचनेपायी शेतकरी आज आत्महत्येच्या टोकाला जातो तेव्हा विनोबांनी कित्येक वर्षे आधीच या समस्येचा उहापोह केलेला दिसतो. विनोबा म्हणत, "खेड्य़ातली लक्ष्मी जाते कुठे, त्या वाटा बंद करा म्हणजे ती खेडयात राहील. ती बाहेर जाते ते या ५ मार्गांनी १) बाजार २) लग्न व्यवहार ३) सावकार ४) सरकार ५) व्यसने
१) बाजाराचेच पाहा, उस येथे करायचा पण साखर बाहेरून आणायची, भुईमूग येथे पिकवायचा पण तेल बाहेरून आणायचे. गावातच गूळ तयार झाला, तेलघाणी असली, विणकर असले, गोपालन झाले तर बाहेरच्या बाजाराची गरज काय. राखुंडीचे दंतमंजन करा, बाभळीच्या काडीचे ब्रश करा, मंगलकार्याला आम्रपल्लव वापरा, गावातल्या कुंभाराचेच घडे रांजण वापरा. मीठ मसाले रॉकेल सारख्या दोन चार गोष्टी सोडल्या तर सारे काही गावात तयार करता आले पाहिजे. परस्पर व्यवहार सुरू झाला तर ’महाग’ हा शब्द ही हद्दपार होईल. ही सहकार्याची भावना लोप पावली आहे."
अर्थात आजच्या चंगळवादी युगात गरजा इतक्या कमी ठेवणे विनोबांसारख्या योग्यालाच शक्य आहे. त्यांच्या गरजा इतक्या कमी होत्या की गांधीजींनी आदेश देईपर्यंत ते साधा चष्मा आणि चपला देखील वापरत नव्हते अशी आठवण सोपानदेव चौधरींनी लिहून ठेवली आहे. पण याचा मथितार्थ खेड्यांनी स्वयंपूर्ण व्हावे हा आहे. इंधनासाठी सौर उर्जा, बायोगॅस सारखे पर्याय अधिकाधिक वापरावे. स्वयंपूर्णतेचा एक भाग म्हणून विनोबा खादीचा पुरस्कार करत. त्यावर ’खादीचीही गादी बनू शकते’ अशी उपहासाने टीका होत असे. यावर विनोबा म्हणत,"तसे तर द्राक्षाचेही मद्य बनू शकते पण ते बनवू नये आणि मग त्याची गणना द्राक्षातही होऊ नये."
२) लग्न समारंभांसाठी कर्ज काढणे हे आजही सर्रास चालते. विनोबा म्हणत ’समारंभ जरूर करा पण तो खर्च सामूहिक असेल मग लग्न कुणाचेही असो. कुणी आपल्या पैशाने लग्न केले तर ते पाप, अपमान समजा. याची परिणीती कर्जबाजारीपणा कमी होण्यात होते की नाही बघा." सामूहिक विवाह हा याच प्रकारचा उपाय सुरूवातीला सफल झाला परंतु आता तो ही राजकीय महत्वाकांक्षेचा बळी होऊ लागला आहे. ’आपण यथेष्ट जेवणे, उरले ते वाटणे, परंतु वाया दवडणे, हा धर्म नव्हे ’(इति समर्थ रामदास) हे उदाहरण विनोबा समारंभातील उधळपटटी बाबत नेहमीच देत.
३) सावकार म्हणजे गरीब कामकर्यांच्या मानेवरले जोखडच. विनोबा म्हणत,"वरील गोष्टी केल्या तर सावकारीचा पाश सैल नक्कीच होईल. सावकारांच्या, मालगुजारांच्या दलालीमुळे पीडित जनतेच्या परिस्थितीची सरकारला जाणीव होत नाही , ते सरकारची ढाल बनतात." एकदा एका मालगुजाराने मला हे हक्क ईस्ट ईंडिया कंपनीने ’यावच्चंद्रदिवाकरौ’ दिले आहेत असे म्हणून तसा कागद दाखवला . यावर विनोबांनी म्हटले,"अशी वेळ पौर्णिमा सोडली तर रोजच येत असते, तिथे तुझ्या कागदाची काय बिशाद. बदल हा जीवनाचा भाग आहे, कधी काळी मालगुजारी पद्धत काही सदहेतूने सुरू करण्य़ात आली असेल आज ती तशी नाही, मग ती बदलायला पाहिजे."
४) पुढचा मुद्दा, सरकार- येथे विनोबांना तेव्हाचे इंग्रज सरकार म्हणायचे असले तरी तो मुद्दा आजही अप्रस्तुत ठरत नाही कारण सरकार आणि शेतकरी यांच्यातले नाते आजही फारसे बदललेले नाही. पॅकेजच्या तात्पुरत्या मलमपट्टीचे उपाय शोधल्याने मूळ जखम अद्याप भरलेली नाही. दुसर्या बाजूला जेव्हा खेड्यांचा विकास हे फक्त सरकारचे काम आहे अशी आपण अपेक्षा करतो तेव्हा एका प्रवचनातील विनोबांचे विचार स्मरतात, ते म्हणत," गोकुळावर संकट आले तेव्हा गोवर्धन उचलताना श्रीकृष्णाने सर्वांच्या हाताची अपेक्षा केली, शेवटी त्यांची करांगुली होतीच. कृष्णाचे महत्व त्याने गीता सांगितली म्हणून नव्हे तर ती कृतीत उतरवली म्हणून. द्वारकेचा राणा झाल्यावरही तो गवळ्य़ात येऊन राही, गाई चारी, शेण काढी, मजुरांचा प्रतिनीधी म्हणून वागे." आजच्या लोकप्रतिनीधींनी आणि आपण जनतेने देखील यातून बोध घ्यायला हवा. सरकारी योजना आणि ग्रामीण जनता यांना जोडणारा दुवा म्हणजे ग्रामसेवक. वर्धा येथे त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात विनोबा म्हणतात, "खेडयातील लोक निरक्षर, म्हणजे आपल्या अल्प स्वल्प विद्येने काम चालून जाईल असे समजू नका, ती माणसे व्यवहारात आणि कास्तकारीत हुशार असतात. प्रत्येकातला गुण शोधला तर तुमचे कार्य सोपे होईल" तर १९३७ सालच्या वर्धा येथील शेतकरी परिषदेत बोलताना विनोबा ग्रामीण जनतेला मोलाचा सल्ला देतात, "मागण्या अशा कुशलतेने मागाव्यात की ज्यांना आपण मते देऊन सरकारात पाठवले आहे त्यांची झोप घेण्याची सोय राहू नये पण त्यांचे बळही कमी होऊ नये" प्रत्येक खेडे हे जणू एक राष्ट्र समजून त्याची संपत्ती कशी वाढॆल याचा सामुदायिक दृष्टीने विचार झाला पाहिजे यावर विनोबा भर देत.
५) विनोबा म्हणतात, "ग्रामोदयाच्या आड येणारा पाचवा मुद्द म्हणजे व्यसन - मुस्लीम धर्म दारू पिणे हराम मानतो तर हिंदू धर्म त्याला पंचमाहापातकातील एक पाप मानतो. तरीही विडी, दारूचे व्यसन कमी होत नाही". आज त्यात गुटखा आणि माव्याची भर पडली आहे. यावर बंदी घातली तरी चोरट्या मार्गाने हे सारे सुरूच राहते. हे कमी की काय म्हणून शेतीच्या बांधावरून, वाटेहिस्स्यावरून, खोट्या प्रतिष्ठेपायी, अगदी क्षुल्लक कारणांवरून विकोपाला जाणारी भांडणॆ, हे देखील एक प्रकारचे व्यसनच. विनोबा म्हणत, "गावातील चार सभ्य माणसांच्या मदतीने भांडणॆ गावातच सोडवा. कोर्ट कचेरीत वेळ दवडू नका, कृष्णाने वणवे गिळले म्हणजे काय तर खेड्य़ांना जाळून टाकणारी भांडणॆ मिटविली, हे समजून घ्या."
याशिवाय ग्रामोदयाच्या वाटेतील धोंड म्हणजे अनारोग्य, हे विनोबा कळकळीने सांगत. ते सांगत, "खेडयातील अनारोग्याची ३ मुख्य कारणे म्हणजे
१) अस्वच्छ राहणी- अंगावर चार तांबे ओतणे म्हणजे आंघोळ नव्हे तर शरीराची संपूर्ण स्वच्छता हवी. उघड्य़ावरील शौचविधीमुळे सोनखत वाया जातेच पण अनारोग्य वाढते, आणि धर्महानि हे तिसरे पाप लागते.
२) पिण्यास अयोग्य पाणी - ते उकळून गाळून प्यायला हवे.
३) अयोग्य आहार -खराब झालेले अन्नग्रहण, भाजीचा कमी वापर, दुध दुभत्याचा कमी वापर हे त्रिदोष आपल्या आहारातून काढा. लहानशा वावरात गरजेपुरत्या भाज्या, धान्य पिकवून कुटुंबाच्या खाण्य़ाचा किमान प्रश्न सोडवा." एकंदर विनोबांनी जगण्य़ाशी संबंधित सर्व पैलूंचा विचार यात केला आहे असे दिसते.
स्वराज्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून सुटका नव्हे तर , बृहदारण्यक उपनिषदानुसार स्वराज्य म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे स्वत:वरील नैतिक नियमन, हा अर्थ प्रत्येक नागरिकाने समजून घेतल्याशिवाय कोणतीही शासकीय योजना पूर्णपणे यशस्वी होणे शक्य नाही. विनोबा आवाह्न करत, "ज्यांना संपत्तीदान, भूदान, ग्रामदान करणे शक्य आहे त्यानी ते करावे, शक्य नसल्यास किमान श्रमदान करावे." अर्थात या सार्या गोष्टी आदर्शवत वाटाव्यात अशी आजची परिस्थिती आहे. राजकीय अनिच्छेमुळे रस्ते ,वीज, पाणी या साध्या सोयी अद्याप सहज उपलब्ध झालेल्या नाहीत. आजही व्ही.एस. नायपॉल सारखे लेखक विनोबांना भाबडे ठरवतात, १३ वर्ष भारत पालथा घालून मिळवलेल्या भूदानात काहींनी नापिक जमीन देऊन केलेली फसवणूक किंवा जमिनीचे वाटप करताना आलेल्या त्रुटी या सार्य़ामुळॆ ते रॅशनॅलिझम पासून दूर असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जातो. ’सब भूमी गोपालकी’ मानणार्य़ा या आकाशपुत्राचे समाजवादी तत्त्वज्ञान अनेक भांडवलवादी विचारांना आजही मान्य नाही परंतु त्यांचा व्यक्तीपेक्षा समूहाला प्राधान्य देणारा विचार अंतिमत: भारतीय संस्कृतीच्याच शाश्वत मूल्यांना जाऊन मिळतो हे त्यांचे विरोधक देखील नाकारत नाही. मी ऐवजी ’आम्ही’ म्हणजेच ’वाताशी’ या शब्दाचा वापर करणारा जपान आपल्या तुलनेने वेगाने प्रगतीपथावर गेला हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. भारतात ज्ञानधारा आणि दानधारा अखंड वाहत्या राहाव्या ही विनोबांची तळमळ होती. ’वैराग्याचे नाव घ्या, किंवा वैभवाचे नाव घ्या पण वैषम्याचे नाव घेऊ नका-’ हे विनोबांचे धोरण स्वीकारायला विरोधकांचीही ना नसावी.
आज ग्रामीण आणि उपेक्षित भारताला मोदी सरकारने केंद्रस्थानी मानले आहे. पंचायती राज मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय आणि पेयजल व स्वच्छता मंत्रालय अशा तीन केंद्रीय मंत्रालयांच्या एकत्रित प्रयत्नांमधून या योजना तडीस नेण्याचे उद्दिष्ट आहे. लोकसभा निवडणुकांमधील यशाने मनोबल उंचावलेल्या भाजपला नंतरच्या विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले की, ‘जमिनीवरील’ राजकारणात अजून बराच टप्पा गाठणे बाकी आहे. ’स्मार्ट सिटी आणि बुलेट ट्रेन’ इतकाच किंबहुना त्याहूनही अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ग्रामोदय आहे. ’ग्रामोदय से भारत उदय’ हे अभियान सफल झाल्यास केवळ घोषणांपुरताच मर्यादित असलेला ग्रामीण भाग आणि कृषीव्यवसाय खर्या अर्थाने विकासाच्या केंद्रस्थानी येऊ शकेल. हे अभियान पंचायती राज पद्धतीला सक्षम करेल, सामाजिक समरसता, महिला सशक्तीकरण आणि शेतकर्यांची स्थिती वृद्धींगत करेल. हे सारे विनोबांच्या ’सर्वोदय’ या कल्पनेचेचे भाग आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. खेडी स्वयंपूर्ण झाली तर ती वाढत्या जागतिकीकरणाच्या वादळात सहज तग धरू शकतील कारण त्यांचे बाह्य अवलंबित्व कमी झालेले असेल. त्यासाठी ज्या कल्पनाशक्ती आणि समुदायवृत्तीची गरज आहे, तिचा पुरस्कार विनोबा सातत्याने करत होते.
अर्थात सरकारच्या या सगळया बाह्य प्रयत्नांना यश येणयासाठी एक आंतरिक बदल जनतेत होणॆ गरजेचे आहे, तो म्हणजे समग्र विचार. विनोबांचे सारे तत्त्वज्ञान या मुद्द्यात एकवटले आहे.
एकदा प्रवासात सूत कातत असताना दृष्टीदोष आणि हलत्या गाडीमुळॆ सूत तुटत होते .विनोबा ते जोडून घेत होते. त्यावर हे बघणारा एक सुशिक्षित प्रवासी त्यांना न राहवून म्हणाला,"ते सूत तसेच जाऊ दिले तर वेळ वाचेल आणि त्या वेळात अधिक सूत कातता येईल, हे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हिताचे नाही का?" यावर विनोबांनी मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले,"एकांगी(अंशिक) आणि परिपूर्ण अशी २ अर्थशास्त्रे असतात. जेव्हा आपण असे अगदी ५ टक्के देखील वाया जाऊ देतो तेव्हा त्याचा अर्थ कापसाच्या लागवडीखालील १०० एकरापैकी ५ एकर जाळून टाकले गेले, तांतीचे १०० पैकी ५ कारखाने बेकार झाले. कारखान्याच्या १०० इमारतींपैकी ५ पाडून टाकल्या..असा होतो. जेवताना पात्रात काही टाकले तर त्यामुळे शेतकर्याच्या बैलापासून पाकसिद्धी करणार्या आईपर्यंत अनेकांची मेहनत आपण बुडवतो आहोत असा त्याचा अर्थ होतो, म्हणूनच कोणत्याही गोष्टीकडे समग्रतेने पाहिले पाहिजे." या समग्रतेचा स्वीकार केल्याशिवाय संपूर्ण ग्रामोदय अवघड आहे.
विनोबांची विचारपद्धती इतकी सखोल आहे ती गीतेच्या प्रेरणेमुळे. त्यामुळॆच विनोबांचा वैयक्तिक मोक्ष भारताच्या राजकीय आणि सामाजिक मोक्षाशी समव्याप्त झाला होता असं ग.प्र.प्रधान नोंदवून ठेवतात. जातीभेद निर्मूलन, दारूबंदी, ग्रामसफाई आणि नई तालीम - ही गांधीजींच्या वैचारिक वारशातून स्वीकारलेली त्यांची सामाजिक विकासाची चतु:सूत्री असो वा भूदान, ग्रामदान, सर्वोदय या सारख्या योजना, या सार्यांच्या मुळाशी ग्रामोदयाची तीव्र आस आणि गीतेतून उपजलेलं मानवजातीचं कल्याण हीच निरलस भावना होती. स्त्री असो वा पुरूष, दलित असो सावकार, अडतदार असो वा मजूर, राजकीय नेता असो वा खेड्यातला अंतिम वंचित माणूस ..या सार्य़ांना कवेत घेऊन, त्यांना त्यांच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजावून सांगण्य़ाची ताकद मातृहॄद्यी विनोबांच्या गीतेवर आधारलेल्या साहित्यात, प्रत्यक्ष कार्यात आणि विचारसंपदेत आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानेच मानवकल्याण साधता येईल ही भूमिका असणार्या, या आधुनिक संताला आणि ग्रामोदयाच्या प्रणेत्याला स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी का होईना आपण समजून घेत आहोत आणि त्यांच्या संकल्पना काही अंशी तरी देशपातळीवर कृतीत आणू पाहत आहोत हे शुभचिन्ह म्हणायला हवे.
संदर्भ-
’जीवनदृष्टी’ - विनोबा भावे
"Selections from Vinoba"- विश्वनाथ टंडन
आधुनिक भारतातील राजकीय विचार - भा. ल भोळे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------