Tuesday, February 10, 2026

थोडं ’अ‍ॅनालॉग’ पण जगूया

 मुलांच्या आंतरशालेय निबंध स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निबंध माझ्याकडे परीक्षणाला आले होते. गंमत म्हणजे ९ स्पर्धकांपैकी ५ जणांचे बरेचसे मुद्दे सारखे. कारण ही होती ’ए-आय’ म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेची कमाल. चॅट जीपीटी किंवा जेमिनाय किंवा अन्य एखाद्या जनरेटीव्ह ए-आयला विषय द्यायचा, उत्तर कॉपी पेस्ट करायचं की झालं. हाय काय नाय काय !

नुकतंच वकीलांच्या एका अनौपचारिक सभेत एक ज्येष्ठ वकील महोदय भाषण देत होते. खरं तर वाचून दाखवत होते. पहिलं वाक्य संपताच ते अनवधानाने म्हणाले ’फुलस्टॉप’ आणि त्यांनी जीभ चावली. सगळे हसू लागले. भाषण ए-आयकडून लिहून घेतलं होतं हे उघड झालं होतं. एका उच्चपदस्थ व्यक्तीची ही स्थिती मग तुम्हा विद्यार्थ्यांचं काय होत असेल ! 

अर्थात तुमच्यासारख्या काही मुलांना  ए-आय म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर कुठे करायचा हे समजलं आहे. चेन्नईच्या कार्तिकला ए-आयच्या मदतीने बुद्धिबळात आणखी पुढे जाता आलं. वेगळ्या पद्धतीने खेळाकडे पाहता आलं. कोल्हापूरची ईशा गोष्टी लिहिते. ए-आयने तिला गोष्टीची सुरूवात आणि शेवट करण्याच्या वेगवेगळ्या आयडिया दिल्या. नागपूरच्या स्मिताला गणिताची भीती वाटायची. ए-आय आधारित अ‍ॅपने तिची भीती गेली, उलट तिला गणित शिकताना मजा वाटू लागली. जळगावचा अतुल तर ए-आयच्या मदतीने जर्मनचे धडे शालेय वयापासूनच स्वत:चे स्वत:  गिरवतो आहे. 

अनेक शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ए-आय आधारित प्रकल्प सादर केले आहेत. बेंगळुरूचा अर्जुन पाण्याची बचत करणारा प्रकल्प घेऊन पुढे आला, तसंच काही विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि शेतीविषयक प्रश्नांवर ए-आय आधारित उपाय सुचवले आहेत. एका विद्यार्थिनीने मुलींच्या सुरक्षेसाठी एक अलार्म फीचर ए-आय अ‍ॅपसाठी सुचवलं. बातम्यांमध्ये हे प्रकल्प पाहून असं जाणवतं की भारतीय मुलं केवळ तंत्रज्ञान वापरत नाहीत, तर ए-आय च्या मदतीने समाजातल्या विविध समस्यांवर उपाय शोधत आहेत.

AI म्हणजे एक प्रकारचा संगणकीय मेंदू जो माणसाकडून मिळालेल्या माहितीवरून शिकतो. जसं आपण चुका करत शिकत जातो तसंच ए-आय देखील अनुभवातून अधिक अचूक होत जातो. जगभरातील  मुलं नकळत ए-आय सोबत मोठी होत आहेत. तुम्ही ज्या जगात वाढत आहात ते जग तुमच्या आई-वडिलांच्या बालपणापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा माहिती मिळवण्यासाठी पुस्तकं शोधावी लागत होती; चार पुस्तकातून संदर्भ मिळवावे लागत होते. आज मात्र ए-आयला एखादा अवघड प्रश्न विचारल्यावर तो सोप्या भाषेत समजावून सांगतो. . ए-आय शेफ नामक मशीनमध्ये पदार्थ घाला, मेनू निवडा आणि स्वयंपाक तयार. ऑनलाइन शिक्षण, प्रोजेक्ट्स, त्रुटी शोधणं, गृहपाठ करणं, माहिती शोधणं, भाषा शिकणं, लेखन करणं, संवाद लिहिणं, मोठ्या ग्रंथाचा गोषवारा काढणं, ग्राफिक्स, व्हिडिओ, चित्रकला, संगीत, कोडिंग, रोबोटिक्स हे सगळं या तंत्रज्ञानामुळे सहजसाध्य झालं आहे. 

इथपर्यंत ठीक आहे पण आईबाबांना वेळ नसतो किंवा काही गोष्टी त्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत तेव्हा गप्पा सुद्धा मारता येतात त्याच्याशी. 

तुम्हाला वाटतं, ए-आय किती छान आहे. तो माझी वर्गात पहिला येणार्‍या मुलाशी तुलना करत नाही, एखादे वेळी कमी मार्क मिळाले म्हणून माझ्यावर रागावत नाही. मी किती हुशार आहे, चांगला आहे याबद्द्ल उलट माझं कौतुक करतो. मग मी का करू नको त्याच्याशी मैत्री ? 

उत्तर सोपं आहे. 

त्याला भावना नाहीत. त्याला तुमचं भलं कशात आहे ते समजत नाही. आजी आजोबा, दादा ताई, आईबाबांसारखं तुमच्यावर त्याचं प्रेम नाही. वॉशींग मशीनचं काम काय असतं, कपडे धुणं. त्याच्याशी आपण गप्पा मारतो का, मैत्री करतो का? नाही, कारण ते केवळ यंत्र आहे. ए-आयला भाषेची समज असल्याने, सखोल ट्रेनिंग दिलेलं असल्याने त्याला तुमच्याशी माणसासारखं बोलता येतं पण शेवटी ते ही एक प्रकारे यंत्रच आहे. अलेक्सा ,सीरी या व्यक्ती नाहीत, ती यंत्रांची नावं आहेत. ए-आय मैत्रीचा आभास निर्माण करू शकतं, तुमच्या भावना ओळखून तुम्हाला आवडेल असा प्रतिसाद देऊ शकतं पण त्यात वैयक्तिक भावनांचा ओलावा नसतो, मायेचा स्पर्श नसतो, काळजी नसते. त्याची उत्तरं किंवा कृती म्हणजे फक्त एक तांत्रिक क्रिया असते. त्यामुळे त्याच्याशी मैत्री बित्री करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नये.  

ए-आयचा फक्त वापर करावा. तो ही योग्य पद्धतीने आणि मर्यादेत. 

२०२४–२५ मध्ये अनेक राज्य सरकारांनी डिजिटल आणि ए-आय आधारित शिक्षण पद्धतींचा प्रयोग सुरू केला. काही शाळांमध्ये तो शिक्षकांना मदत करणाऱ्या साधनासारखा वापरला जाऊ लागला आहे. शिकवण्यासाठी लागणारे व्हिडिओ, आराखडे, प्रेझेंटेशन, उदाहरणं मॅजिकस्कूल सारख्या विविध ए-आय टूल्सच्या मदतीने शिक्षक तयार करू लागले आहेत. मुलांच्या अडचणी समजून घेऊ लागले आहेत. मात्र  काही पालक आणि शिक्षकांना वेगळीच चिंता सतावू लागली आहे. ए-आय तयार आणि त्वरित उत्तरं देत असल्याने मुलांची कल्पनाशक्ती, विचारशक्ती कमी होऊ लागली आहे कारण मेंदूला काम करायची सवयच राहत नाही. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रकल्पासाठी ए-आय कडून तयार केलेला मजकूर जसाच्या तसा सादर केल्याचं दिसू लागलं. 

समजा तुम्हाला एक कागद आणि पेन्सील देऊन एखादा सीन काढायला सांगितला, तर? डोळे मिटा ,विचार करा ,काढा चित्र... 

९० % मुलं काय चित्र काढतील? डोंगर, सूर्य, उडते पक्षी, खाली नदी, बाजूला झोपडी. हो नं? वेगळं काही नाही. असं का, कारण चौकटीबाहेरचा विचार करण्याची आपली क्षमता ए-आय आणि मोबाईल सारख्या गॅजेट्सच्या अती वापराने कमी होत चालली आहे. 

भारतीय भाषांमध्ये AI उपलब्ध होणं ही खूप मह्त्वाची आणि सकारात्मक बाब आहे. मराठीत, हिंदीत किंवा इतर भाषांत प्रश्न विचारता येत असल्याने तुम्हाला शिकणं सोपं झालं आहे. मात्र काही ए-आय साधनांमध्ये ती माहिती अपुरी किंवा चुकीची असते. वाक्यरचना, व्याकरण विचित्र असतं. त्यामुळे तज्ज्ञ सांगतात की ए-आय ने दिलेली माहिती तपासून पाहण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. पुस्तकं, शिक्षक आणि ए-आय — या तिन्हींचा संगम असेल, तरच शिकणं परिपूर्ण ठरेल. कल्पना, भावना आणि अनुभव मुलांचे असतील, ए-आय फक्त साधन म्हणून काम करेल कारण संपूर्ण काम त्याला करायला लावलं तर सर्जनशीलतेला मर्यादा येऊ शकतात. 

ए-आय वापरायचं आहे ते आपला मदतनीस म्हणून , मालक म्हणून नव्हे, केवळ कॉपी पेस्ट साठी नव्हे,  

त्यासाठी कोणत्या वयात कोणतं तंत्रज्ञान योग्य- हे आधी समजून घेऊया. 

१०–१२ वर्षं :   शाळेतल्या अ‍ॅक्टिव्हिटीचे अ‍ॅप्स, गृहपाठासाठी जनरेटीव्ह ए-आय, शैक्षणिक व्हिडिओ, काही मजेदार गेम्स मर्यादित प्रमाणात.

१३–१५ वर्षं :  अभ्यास, कौशल्य शिकणं, भाषा शिकणं, थोडं मनोरंजन (मर्यादेत), वेळेचं भान महत्त्वाचं.

या वयापर्यंत पालकांसह, आईबाबांबरोबर बसून हे सगळं शिकणं, समजून घेणं, ते तंत्रस्नेही नसतील तर त्यांना सांगून त्यांच्यासमवेत हे करण्ं अपेक्षित आहे.  

१६–१८ वर्षं :  व्यावसायिक कौशल्य शिकणं, जबाबदारीनं वापर करण्यासाठी स्वतः नियम ठरवणं, करिअरसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं अभिप्रेत आहे.

वय वाढतं तसं स्वातंत्र्य वाढतं पण त्याचबरोबर जबाबदारीही वाढते. 

हे नीट माहीत असलेली मुलं सुद्धा ए-आय आणि गॅजेट्सच्या आहारी जातात. कारण..

* FOMO ( fear of missing out) - हे वापरलं नाही तर या आधुनिक जगातल्या घडामोडी मला कळणार नाहीत. मी मागे पडेन अशी भीती वाटू लागते.

* ’बोर होतंय’ म्हणणार्‍या मुलांना फोन, टॅब हातात घ्यायला सोपा. क्षणात एक नवं ,मोहक, वेड लावणारं विश्व समोर उभं राहतं. 

* सोशल मिडियावरच्या “लाईक”, “कमेंट”, “शेअर” यामुळे आपण कुणीतरी विशेष आहोत असं भासू लागतं. 

यामुळे ए-आय फीचर वापरून तयार केलेले फोटो, पोस्ट शाळकरी मुलं, मुली सोशल मिडियावर ट्रेंडच्या नावाखाली टाकतात. सायबर गुन्हेगार त्यांना हेरतात. संवाद वाढवून विश्वास संपादन करतात आणि मग त्या फोटो, माहितीचा गैरवापर होतो. कधी सेक्सटिंगसाठी, कधी धमकी देऊन पैसे उकळण्यासाठी तर कधी भुरळ घालून लैंगिक शोषणासाठी. आपल्या सुरक्षिततेसाठी आपण खाजगी डाटा अनोळखी व्यक्तीला कधीही द्यायचा नाही, खोट्या इंप्रेशनसाठी अनोळखी मित्र विनंती स्वीकारायची नाही, फोटो पब्लिक शेअर करायचे नाहीत हे तुम्ही सुद्धा समजून घेणं ही आजची गरज आहे. 

ए-आय आधारित ऑनलाईन गेमिंगचं वेड आणि वरच्या लेव्हलवर जायचा नाद, त्यासाठी लागणारे पैसे आणि त्यातून चक्क आपल्याच घरात मुलांनी केलेल्या चोर्‍या अशा गुन्ह्यांची संख्याही वाढताना दिसते आहे. 

काही अ‍ॅप्स मुलांकडून माहिती गोळा करतात, हे लक्षात आल्यानंतर सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी नियम कडक करण्यास सुरुवात केली आहे. 

ए-आयच्या अतिरेकी वापरामुळे प्रत्येक देशाचं सरकार मुलांच्या डिजिटल सेफ्टीवर गांभीर्याने विचार करू लागलं आहे. फ्रान्सने १५ वर्षांखालील सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी अनिवार्य केली आहे. चीनने विद्यार्थ्यांना गेमिंग अ‍ॅप्स वापरण्याला ठराविक तासच परवानगी दिली आहे. ऑस्ट्रेलियातील शासनाने विद्यार्थ्यांच्या इंटरनेट वापराविषयी कडक नियम पारित केले आहेत. सगळे युरोपियन देश स्क्रीन टाइम मर्यादा, डेटा सुरक्षाविषयी सजग झाले आहेत. कारण सगळ्यांना कळलंय — स्क्रोल करण्यात वेळ घालवला तर मुलांचं भविष्य कधीही घडणार नाही. उद्या तुम्हीच विचाराल, ही स्थिती येईतो तुम्ही काय केलंत ? 

भारतामध्येही काही महत्त्वाचे नियम आहेत—  मुलांसाठी अयोग्य अससेल्या कंटेंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी IT Rules २०२१ आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा २०२३ अद्यावत करण्यात आला आहे. मुलांनो, हे कायदे, या चर्चा तुमच्याविरुद्ध नाहीत, तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी आहेत.

ए-आय चा एक गंभीर सामाजिक दुरूपयोग म्हणजे चुकीची माहिती आणि बनावट सामग्री. ए-आय वापरून तयार केलेले खोटे व्हिडिओ आणि आवाज (डीपफेक) याचं प्रमाण वाढतं आहे. पंतप्रधान  मोदींचे गरबा खेळतानाचे, ट्रम्प बरोबर नाचतानाचे डीपफेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. ते बनावट असल्याचं ओळखायला शिकलं पाहिजे. कितीही मज्जा वाटली तरी ते शेअर करण्याचा मोह टाळला पाहिजे. इंटरनेटवर दिसणारी प्रत्येक गोष्ट खरीच असेल असं नाही हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. जे दिसतं आहे ते अधिकृत सोर्सकडून आलं आहे का, हे अस्सल वाटत असलं तरी बनावट (डीप फेक) तर नाही नं, ही शंका कायम मनात आली पाहिजे. फॅक्ट चेक साठी अल्ट न्यूजसारख्या अनेक वेबसाईट आहेत ज्यावरून माहितीची सत्यता तपासता येईल. 

ए-आयची नकारात्मक बाजू बातम्यांमधून जास्त दिसत असल्यामुळे पालक घाबरून जातात, गॅजेटच्या अतिवापरावरून घरात वादविवाद सुरु होतात. तुम्हाला काही चुकीची माहिती तर मिळणार नाही, फसवणूक तर होणार नाही, सायबर गुन्हेगारांचं तुम्ही सावज तर ठरणार नाही याची त्यांना सतत भीती असते. त्यांना तुमचं आरोग्य महत्त्वाचं वाटतं. बाहेर खेळायला जाणं कमी झाल्याने तुमच्या वाढत्या वजनाची चिंता वाटते. वाढलेल्या स्क्रीम टाईममुळे  तुमचे थकलेले डोळे , सतत स्क्रीनवर येणार्‍या माहितीच्या महापुराने शिणलेला मेंदू ,अपुरी झोप यामुळे त्यांना तुमच्याविषयी चिंता वाटते.  

अमेरिकेतल्या जेनेल हॉफमन नावाच्या आईने यावर एक उपाय शोधला होता. आपल्या १३ वर्षाच्या मुलाला मोबाईल फोन देताना तिने त्याला काही अटी लिहिलेलं पत्र दिलं होतं. त्या अटी आजच्या ए-आय जगातल्या तुम्हा मुलांनी समजून घ्याव्यात. 

* हा फोन तुला अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता यावा म्हणून काही काळासाठी दिलेला आहे. तुझं वागणं अयोग्य वाटलं तर तुझ्याशी चर्चा करून आम्ही तो परत घेऊ.

* ऑनलाईन काही चुकीचं दिसलं तर तू लगेच आम्हाला सांगायला हवंस. तुझे पासवर्ड आम्हाला माहीत असलेच पाहिजेत. 

* फोन लांब ठेवून मित्रांना प्रत्यक्ष भेटणं, मैदानावर जाऊन खेळणं, ट्रेकिंगला जाणं, सहलीला जाणं, निसर्गात, पुस्तकात रमणं, आमच्याशी गप्पा मारणं, हसणं, एखादी कला शिकणं जगण्यासाठी करियर इतकंच महत्त्वाचं असतं. थोडक्यात डिजिटल जगातून वेळ काढून थोडं ’अ‍ॅनालॉग’ही जगता आलं पाहिजे. 

भारतीय संस्कृतीत ज्ञानासोबत विवेक, संयम आणि दायित्व यांना महत्त्व आहे. ए-आय वापरताना ही मूल्यं अधिकच महत्त्वाची ठरतात. तंत्रज्ञान माणसाला वेगवान करू शकतं, पण त्याला दिशा माणसालाच द्यावी लागते. तुम्ही वयाच्या अशा वळणावर आहात जिथे संधी आणि आव्हानं दोन्ही समोर आहेत. ए-आय ने करियरची नवी दालनं उघडली आहेत, पण त्याचबरोबर विचारपूर्वक वापराची जबाबदारीही तुमचीच आहे. तुमचं वय कुतूहलापोटी नको ते करून पाहण्याचं आहे. ते अगदी स्वाभाविक आहे पण इथेच तोल सावरायचा आहे. त्यासाठी काही तांत्रिक बंधनं स्वत:वर घालून घ्या किंवा तुमच्या आईबाबांना नेट नॅनी, कॅनोपी सारखे पॅरंटल कंट्रोल अ‍ॅप्स, वॉचर सारखे डिव्हाईस मॉनीटरींग अ‍ॅप वापरायला सांगा. चॅट-जीपीटी मध्ये तुमचा मेल आयडी कौटुंबिक खात्याशी जोडता येतो, तुमच्या चॅटवर यामुळे आईबाबांचे नियंत्रण राहील. फॅमिली लिंक अ‍ॅपद्वारे तुमचा जेमिनाय अ‍ॅक्सेस त्यांना मर्यादित करता येईल. यामागे तुमच्यावर पाळत ठेवण्याचा हेतू नसून ही तुमची जपणूक आहे हे लक्षात घ्या.

योग्य मार्गदर्शन, प्रश्न विचारण्याची सवय आणि मूल्यांची जाण असेल, तर ए-आय तुमच्यासाठी केवळ तंत्रज्ञान न राहता उज्ज्वल भविष्याकडे नेणारा महामार्ग ठरू शकतो.

ए-आयसह चालताना डोळे उघडे ठेवणारी, मन जिज्ञासू ठेवणारी आणि माणुसकी जपणारी पिढीच खऱ्या अर्थाने उद्याचा भारत घडवेल. पटतंय का ! 

यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे. लेखाच्या सुरुवातीच्या उदाहरणातले वकील महोदय चुकून ’फुलस्टॉप’ म्हणाले होते. ए-आय वापरताना कुठे पॉज घ्यायचा आणि कुठे फुलस्टॉप लावायचा हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि नवोदितांना शिकवायचं आहे.    

Monday, January 26, 2026

महिलोन्नती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन


संत साहित्य म्हणजे केवळ भक्ती किंवा अध्यात्म नव्हे. समाजप्रबोधन हा त्याचा गाभा असतो. ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग माणसाच्या अंतरात्म्यापासून सुरू होतो हे महाराष्ट्रातली संतपरंपरा कायम सांगत आली आहे. तुकडोजी महाराज त्यापुढे जाऊन म्हणतात, ’कशास फिरतो व्यर्थ, तुझे गावच नव्हे का तीर्थ!’ 

गावाची उन्नती, गावकर्‍यांच कल्याण यातच त्यांचं आध्यात्म सामावलेलं होतं. ते राष्ट्रसंत ठरले कारण त्यांनी व्यक्ती पासून समष्टीपर्यंत जाताना गाव, समाज, राष्ट्र आणि माणूसपण अशा सर्व पातळ्यांवर विचार मांडला. त्यांच्या साहित्याने आणि वाणीने समाजाला सतत एक प्रश्न विचारला —आपण माणूस म्हणून, समाज म्हणून खरंच पुढे चाललो आहोत का?”** इथेच ते थांबले नाहीत तर  त्यांनी समाजाला परिवर्तनाचा मार्गही दाखवला आहे.त्यांच्या प्रश्नाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा घटक आहे — **स्त्री** कारण समाजाचा तो जवळपास निम्मा भाग आहे. म्हणूनच तुकडोजी महाराज थेट म्हणतात - 

महिलेविण विश्व न झाले, काय होते पुरुषाने केले 

राष्ट्रसंतांना हे स्पष्ट दिसत होतं की, ज्या समाजात स्त्री दुर्लक्षित, अशिक्षित, परावलंबी आहे, तो समाज कितीही प्रगतीची भाषा बोलत असला तरी आतून पोकळ असतो. त्यासाठी त्यांनी आपल्या साहित्यातून महिलोन्नतीची वाट दाखवली. ग्रामगीतेत या नावाचा एक स्वतंत्र अध्याय लिहीला.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजवर स्त्रियांनी कसं वागावं हेच समाज सांगत आलेला आहे  पण तुकडोजी महाराजांनी त्यांच्या साहित्यातून समाजपुरुषाला खणखणीत शब्दात सांगितलं आहे की स्त्रियांशी कसं वागावं, तिच्याविषयी नेमका काय विचार करायला हवा, तिला कसं वागवायला हवं. हेच  त्यांच्या साहित्याचं वेगळेपण आहे. 

-------------

१९७५ साल हे युनोने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर केलं. ८ मार्च हा महिला दिन निश्चित झाला आणि महिलांच्या प्रश्नांकडे जगाचं आणि आपल्या देशाचंही लक्ष वेधलं गेलं. मला नवल वाटतं की या घडामोडींच्या कितीतरी आधी १९६८ साली देह सोडून गेलेल्या तुकडोजी महाराजांनी आपल्या साहित्यातून हे प्रश्न मांडले होते आणि ते ही उत्तरांसकट. स्त्रीवाद, स्त्रीमुक्ती हे शब्द कुठेही न वापरता स्त्रीशक्ती काय आहे हे त्यांना कळलं होतं, तिचं सामर्थ्य आणि जगाला जन्माला घालणारा आणि त्याची जोपासना करणारा तिच्यातला मातृभाव कळला होता. इतक्या जवळून की तुकडोजी महाराजही भावनाविवश होऊन म्हणतात-  

तिच्या भावना गंगेचे पवाडे, वर्णिले न जाती माझ्याने 

आणि म्हणूनच या जगातलं मांगल्य, सौंदर्य जिच्या अस्तित्वामुळे आहे त्या स्त्रीची उन्नती म्हणजे समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची  उन्नती असं मुलभूत चिंतन राष्ट्रसंतांनी मांडलं. 

संती माऊलीचे रूप दिले , तरीच ते देवपणासी पावले ....       पण माउली तिथेच राहिली . 

स्त्री जर अज्ञानात, भीतीत आणि बंधनांत अडकलेली असेल, तर तिच्या हातून घडणारी पुढची पिढीही त्याच मर्यादांत अडकते. ते लिहितातम्हणतात 

देवाने निर्मिली ही क्षिती,  तिचे उदरी खाणी किती 

परि माऊली जैसी प्रेमळ दीप्ती,  कोठेच नाही 

महाराज म्हणतात. ती घरातल्या संस्कारांची शिल्पकार आहे. गर्भापासून तिचे संस्कार, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण. इथे पुत्रीची घडण लिहिलं नाहीये. पुत्राची. पुत्राला जर तिने चांगला पुरूष व्हायला शिकवलं तर समाजातल्या कितीतरी स्त्रीविषयक समस्या कमी होतील. आजच्या आत्मनिर्भर होऊ पाहणार्‍या स्त्रीशी कसं वागायचं हे पुरूषांना कळत नाही. एकमेकांना मदत करण्यात कमीपणा नाही, तिलाही तिचा अवकाश आणि पंख मिळाले पाहिजेत हे एका आईनेच आज मुलाला सांगणं आवश्यक आहे. मुळात बायकांमध्ये एक उपजत शहाणपण होतं. फक्त हे शहाणपण दाखवायला त्यांना बाहेर वाव मिळाला नाही. मिळाला तर एक स्त्री कमाल करू शकते हे त्यांनी जाणलं होतं. 

प्रल्हादाची कयाधू , छत्रपती शिवरायांची चे जिजाई, श्रीरामांची कौसल्या, श्रीकृष्णाची देवकी यांनी अक्षरश: युगपुरूष घडवले आहेत ही एका स्त्रीची ताकद आहे. आजच्या सायबर पालकत्वाची आव्हानं पेलणं तिला सहज शक्य आहे. 

------------

परंतु तिच्या ताकदीची जाणीव तिला स्वत:ला आणि समाजाला म्हणावी तशी नाही आणि म्हणून राष्ट्रसंतांनी स्त्री-शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षण म्हणजे केवळ अक्षरओळख नव्हे, त्या अर्थाने आज साक्षरता बरीच वाढली आहे पण शिक्षण म्हणजे विचारांची मशागत. माणसाची बुद्धी आणि आत्मा यांचा विकास म्हणजे शिक्षण अशी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या केली आहे. हाच विचार राष्ट्रसंत सोप्या भाषेत मांडताना म्हणतात - स्त्रीने शिकावं, विचार करावा,  प्रश्न विचारावे, अंधपरंपरेला आव्हान द्यावे, त्याज्य गोष्टी नाकाराव्या, योग्य-अयोग्याचा विवेक ठेवावा

शिक्षणामुळे स्त्रीला —स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते, आपले हक्क समजतात, आपल्यावर अन्याय झाला आहे, हे ओळखण्याची दृष्टी मिळते. अन्यथा वो जानतेही नही की वो जानते नही , और इस ना जानने को उम्रभर जिये जाते है 

काही जणांना वाटतं की वैदिक काळात होत्याच की स्त्रिया उच्चशिक्षित. ते गार्गी मैत्रेयीचे दाखले देतात. हो नक्कीच होत्या पण इस. पाचशे ते हजार मध्ये भारतावर सातत्याने होणार्‍या बाह्यआक्रमणांमुळे तिचं विवाहाचं वय कमी झालं, शिक्षणाची दारं बंद झाली आणि स्त्री माजघराकडे वळली. सुरक्षेच्या आणि योनीशुचितेच्या काळजीपोटी तिच्यावर बंधनं आली. बाईच्या जातीने कसं वागावं याचे नियम समाजापुरूषाने ठरवले. म्हणूनच ’द सेकण्ड सेक्स’ या जगप्रसिद्ध पुस्तकात लेखिका सीमान द बोव्हा म्हणते स्त्री कधी जन्माला येत नाही ती स्त्री म्हणून घडवली जाते. अगदी घरातल्या आईचंही मुलगा कसा वाढतो आहे इकडे फार लक्ष नसतं पण मुलीच्या जातीने कसं वागलं पाहिजे यावर तिचा कटाक्ष असतो. परिणामी प्रश्न तसेच राहतात. 

--------------------

आता कुठे राहिलंय तसं काही,  केवळ विशीतली सहर शेख  मोबाईल च्या स्क्रीनवर ’कैसा हराया’ म्हणताना दिसते. दुसरीकडे सर्वोच्च पदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दिसतात. स्त्रिया सायकलपासून विमानच काय अगदी युद्धनौकाही चालवतात मग अजून काय समानता बाकी आहे , कोणती प्रगती शिल्लक आहे ? 

याचंच उत्तर शोधण्यासाठी पेटीएम या कंपनीने मध्यंतरी एक प्रयोग केला होता. 

एका मोठ्या खोलीत मध्यभागी एक रेषा आखून त्यावर तीस ते पन्नास वयोगटातल्या सुशिक्षित स्त्री-पुरुषांना त्यांनी उभं केलं. त्यांना सांगितलं तुम्हाला स्पीकरवर प्रश्न ऐकू येईल , उत्तर हो असेल तर एक पाऊल पुढे जायचं, नाही असेल तर एक पाऊल मागे जायचं. मग प्रश्न सुरू झाले आणि ते पुढे मागे जाऊ लागले. सुरूवातीचे प्रश्न साधारण असे होते - वयाच्या विसाव्या वर्षापूर्वी तुम्ही दुचाकी चालवायला शिकलात का, महाविद्यालयापर्यंत तुम्ही एक तरी खेळ नियमित खेळलात का , तुमचे कपडे तुम्हाला इस्त्री करता येतात का, घरातली बिलं तुम्ही भरता का, तुमचं स्वत:चं नेट्बँकिंग अकाऊंट आहे कां,  सोन्याचा आजचा भाव तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला तुमचं पोट भरण्यापुरता स्वतःसाठी दोन वेळेचा स्वयंपाक करता येतो का ? 

इथपर्यंत स्त्री-पुरूषांमध्ये फार अंतर नव्हतं मग पुढचे प्रश्न आले, तुमचं वाहून तुम्ही स्वतः खरेदी केलं आहे का, वेळ पडल्यास स्वत: दुरूस्त करता का? काही खरेदी करायचं असल्यास तुम्ही कधी एकट्याने निर्णय घेता का ? एकट्याने बाहेरगावी जाता का? स्वत: नियोजन करून तुमचे तिकीट तुम्ही काढता/मॅनेज करता का? तुमच्या घराच्या पाटीवर तुमचं नाव आहे का? इ. इ.

अंतर वाढलं असेल की कमी झालं असेल याचं उत्तर सहज लक्षात येईल. म्हणजेच मोठे बदल झाले असले तरी खूप लहान लहान मुलभूत बदल अजून बाकी आहेत. 

---------------

आणखी एक मह्त्वाचा विचार राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला तो म्हणजे ग्रामजीवनात स्त्रीचा सक्रिय सहभाग. याचा अर्थ कागदावर महिला सरपंच आणि खुर्चीवर तिचा पती असा सहभाग नव्हे. ** राष्ट्रसंतांचं साहित्य हे केवळ वैचारिक नाही, तर अत्यंत कृतीशील आहे. त्यातून त्यांनी स्त्रियांना —  ग्रामसभेत सहभागी होण्याचं , स्वच्छता, आरोग्य, शिक्षण यामध्ये पुढाकार घेण्याचं, स्वयंशिस्त आणि स्वावलंबन विकसित करण्याचं आवाहन केलं आहे. .त्यांच्या मते, स्त्रीला निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवून खरा ग्रामविकास होऊच शकत नाही.आज आपण पंचायतराज, महिला आरक्षण याबद्दल बोलतो; पण राष्ट्रसंतांनी हे बीज अनेक दशकांपूर्वी पेरलं होतं. 

त्यांनी लिहिलं आहे, स्त्रियांच्या संघटना असाव्यात. तिळगुळ समारंभ, हळदी कुंकू, शारदोत्सव, संमेलन सभा कीर्तन कथा व्हाव्यात. हल्ली सामूहिक स्वरूपाचे असे काही कार्यक्रम राजकीय पक्ष किंवा मनोरंजन वाहिन्या घेतात. त्यात कुणी सेलेब्रिटी कलाकार असतात. त्यांनी येऊन नाचायचं, बायकांनी येऊन गाण्यांवर नाचायचं, आयोजकांनी त्यांना अत्यंत सुमार प्रश्न विचारायचे. अजूनही उखाणे स्पर्धा, थाळी सजवणे, मॅचिंग स्पर्धा यातून हे कार्यक्रम बाहेर न पडल्याने यातून कवडीचंही सक्षमीकरण होत नाही. यापेक्षा कलाधारित स्पर्धा, दर्जेदार सादरीकरण, बचतगटांचे स्टॉल्स, चांगली भाषणं यावर भर द्यावा.

याची कल्पना असल्यासारखं महाराजांनी पुढे लिहीलं आहे- स्त्रियांनी बाहेर पडावं, एकत्र यावं, आत्मभान वाढवावं, त्यासाठी वाचनालयात महिला विभाग सुरू व्हावेत. 

राष्ट्रसंत तिला कधीच “बिचारी स्त्री” म्हणत नाहीत. ते म्हणतात —स्त्री सक्षम आहे, फक्त तिच्या क्षमतेवर समाजाने विश्वास ठेवायला हवा. सन्मान हा तिचा अधिकार आहे. सन्मान म्हणजे महिला दिनाला ;तू दुर्गा तू लक्ष्मी’ असल्या पोस्ट फॉरवर्ड करणे नव्हे , सन्मान म्हणजे — तिचं मत ऐकणं,  तिच्या श्रमांना किंमत असणं, तिच्या निर्णयांना विचारात घेणं. परप्रकाशी चंद्रापेक्षा तिला स्वयंप्रकाशी काजवा होऊ देणं. तिला तिचा हक्काचा वाटा देणं.  

 शेतकरी नेते दिवंगत शरद जोशी आठवतात इथे. एका सभेत भेगाळलेल्या पायांच्या , रापलेल्या हातांच्या, डोळ्यात भीती आणि कुतूहल घेऊन बसलेल्या शेतकरी स्त्रियांना त्यांनी विचारलं, " बाईच्या जन्माला आलो याचा कधी आनंद झाला का ?" त्यावर एका बाईने अचानक एक ओळ म्हणून दाखवली "बाईच्या जल्मा नको घालू शिरीहारी , रात अन दिस परायाची ताबेदारी"  

यावरूनच जोशींनी  शेतकरी संघटनेच्या ’स्वातंत्र्याच्या कक्षा’ या संकल्पनेचा पाया घातला.  त्यानंतरच्या चांदवड अधिवेशनानंतर स्त्रियांमध्ये इतकी उमेद आली की एकीनं आपला अनुभव सांगितला- मालक म्हनलं आंगुळीचं पानी काड. म्या म्हनलं तुमचं तुमी काडा , हातचं काम टाकून मी काय बी करनार न्हाई" यातून पुढचं पाऊल नव्वदच्या दशकातलं ’ लक्ष्मी मुक्ती ’ आंदोलन . यात दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी जिचा एका चमच्यावरही अधिकार नव्हता त्या आपल्या पत्नीच्या नावे जमिनीचा सातबारा करून दिला. 

-----------

अंधश्रद्धा आणि जुनाट रूढींचे स्त्रीच्या उन्नतीतील मोठे अडथळे दूर व्हावेत हे राष्ट्रसंतांनी ठामपणे मांडलं आहे. **त्यांना ठाऊक होतं की, स्त्रीच्या पायात बेड्या घालणारी वृत्ती बहुतेक वेळा धर्माच्या आडून येते, पण ती धर्म नसते — ती अज्ञान असते.ज्या रूढी — स्त्रीला दुय्यम वागणूक देतात,  तिला पाप-पुण्याच्या भीती दाखवतात,  तिच्या प्रश्नांना “मर्यादाभंग” ठरवतात त्यांना ते विरोध करतात. त्यांच्या लेखनात वारंवार जाणवतं जिथे जिथे धर्म काही रूढींमुळे माणसाला माणूस म्हणून जगू देत नसेल, तिथे तिथे त्यांची चिकित्सा आवश्यक आहे. स्त्रीच्या बाबतीत तर त्यांचा हा विचार आणि स्वर अधिक तीव्र होतो. 

बहुतेक धर्मग्रंथात स्त्रीच्या दुय्यमत्वाचा कधी स्पष्ट तर कधी नकळत उल्लेख येतो. 

अगदी राजकारणातही सर्वत्र "आम्ही बांगड्या भरल्या नाहीत". "मर्द असशील तर माझ्याशी लढ"  अशी भाषा आपण ऐकतो. दुर्दैवाने बायका पण एखाद्याला निषेध म्हणून चोळी बांगडी पाठवतात तेव्हा त्यांना आपण आपलाच अपमान करतो आहोत हे ही कसं कळत नाही?  लोक शिव्या देताना सर्रास आई बहिणीचा उद्धार करतात. सोशल मीडियावर एखाद्या प्रसिद्ध स्त्रीच्या, अभिनेत्रीच्या, स्त्री खेळाडूच्या किंवा राजकारणातील स्त्रीच्या पोस्ट खालच्या किंवा बातमी खालच्या कॉमेंटचा दर्जा पाहिला तर आपला सर्व साधारण समाज स्त्रियांकडे आजही कशा नजरेने पाहतो ते सहज कळेल. स्त्रियांनी काय घालावं हे समाजाने ठरवू नये तसंच आपल्या पोशाख आणि देहबोलीतून आपण काय संकेत देतो आहोत आणि त्या समूहाची वैचारिक इयत्ता काय आहे याचं भान स्त्रियांनी ठेवणं गरजेचं आहे. हे भान असलेल्या स्त्रियांनाही अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येक मातेने आपल्या मुलाला स्त्री सन्मान शिकवला पाहिजे. त्याला स्त्रियांकडे पाहण्याची स्वच्छ नजर दिली पाहिजे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांचा महिलोन्नतीचा विचार दुर्दैवाने आजही तितकाच गरजेचा आहे. त्यांचं साहित्य आपल्याला जाणवून देतं की 

* स्त्री उन्नती ही तात्पुरती योजना नाही, ती मानसिकता आहे जी मातांना आपल्या मुलांमध्ये पेरायची आहे. 

* ती कायद्याने नाही, तर संस्कारांनी रुजते तसे संस्कार द्यायचे आहेत.

* ती केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीनेच  साकार होऊ शकते, हे स्व:त:च्या वार्तनातून ठसवायचं आहे.

----------------

व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन , असं हल्लीच्या आधुनिक मुली विचारतात. महाराजांनी तर हे त्याआधीच लिहून ठेवले आहे - "जे जे सुख असेल पुरुषांना महिलांचेही ते असावे अभिन्नपणे ". महाराज पुढे म्हणतात - रथाची दोन्ही चाके मजबूत करावी. माता अशा आदर्श असल्या तर त्यांच्या पोटी येणारे आदर्श संतान भारताचा वैकुंठ घडवतील.... 

शेवटी ते स्त्रीपासून स्त्रीतत्वापर्यंत जात हे ही सांगून जातात

जिकडे जातील तिकडे, स्त्रीच आहे मागेपुढे, अंतरी बाहेरी प्रकृतीचे वेढे,  जिवापाडे पडले हे 

पुरूष आणि प्रकृतीरूपी स्त्रीचं हे चिरंतन नातं समानतेचा नव्हे परस्परपूरकतेचा संदेश देतं आहे. हाच आभाळाएवढा संदेश राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून दिला, भजन कीर्तनातून त्याचा पुनरुचार केला. स्वत:चा उल्लेख करताना मात्र ते विनम्रतेने स्वत:विषयी लिहितात ’तुकड्या म्हणे’ 

 ----------------------------


परिसंवाद - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन, अकोला,  जानेवारी २०२६

Thursday, January 1, 2026

मुलाखत - मा. तारा भवाळकर


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रख्यात त्रैमासिक ’दौत लेखणी’ साठी मी घेतलेली , ज्येष्ठ सहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांची मुलाखत. 

( डॉ. तारा भवाळकर या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक, संशोधक. त्यांनी नाट्यविषयक संशोधन, लेखन तसंच स्त्री जाणिवांचा वेध घेणारंही विपुल लेखन केलं आहे. अध्ययन, अध्यापन, संशोधन आणि लेखन हा त्यांचा ध्यास आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश तसंच मराठी ग्रंथकोश या कार्यात त्यांचं विशेष योगदान आहे. )
पूर्वअनुमती घेऊन ताराताईंशी मोबाईलद्वारे संवाद साधला. त्यांनी मोकळेपणाने सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

------------------------------------------ 

प्रश्न : अ.भा.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड बहुतेक वेळी वादग्रस्त ठरते. सोशल मिडियावर त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. तुम्ही लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहात. बहुविध क्षेत्रात तुम्ही मौलिक संशोधन आणि लेखन कार्य केलेलं आहे. साहित्यक्षेत्रात तुम्हाला सन्मानाचं स्थान आहे. या पातळीवरून बघताना साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडण्याच्या प्रक्रियेबाबत तुम्हाला काय वाटतं ? 

मा. तारा भवाळकर : पूर्वी संमेलनाध्यक्ष ठरवण्यासाठी निवडणूक पद्धत होती. इच्छुक लोकांनी अर्ज करायचे आणि मग साहित्य महामंडळाचे पदाधिकारी ज्याला अधिक मतं मिळतील त्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करत. नंतर अशी राजकीय पद्धतीने निवडणूक घेण्याऐवजी अध्यक्षांची निवड सन्मानाने व्हावी व जाणकार लोकांनी ती करावी हा विचार पुढे आला. साहित्य महामंडळाने, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी एकत्र येऊन अध्यक्ष निश्चित करायचा अशी पद्धत गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. माझ्या मते ही पद्धत जास्त योग्य आहे. इंग्रजीत सांगायचे तर ’इलेक्शन पेक्षा सिलेक्शन’ किंवा ’निवडणुकीपेक्षा निवड’ ही अधिक सन्मानाची आहे कारण मागून मिळवणं हे कलावंत किंवा साहित्यिकाच्या दृष्टीने फारसं स्पृहणीय नाही. 

तशी प्रक्रिया सुरू झाली म्हणून मी अध्यक्ष होऊ शकले. निवडणुकीला उभं राहून मत मागायची पद्धत असती तर मी या जन्मी अध्यक्ष झाले नसते कारण साहित्यिकांनी /कलावंतांनी अर्ज करून काही मिळवणं, याच्या मी विरोधात आहे. 

माझी निवड झाल्यानंतर विरोधाचे सूर माझ्यापर्यंत तरी पोचलेले नाहीत. साहित्य महामंडळासह, महाराष्ट्रातल्या आणि बृहन्महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांच्या पाठिंब्याने माझी एकमताने निवड झाली , त्यांच्या अध्यक्षांची मला रीतसर पत्र आली त्यामुळे मी ते अध्यक्षपद स्वीकारलं. माझ्यासाठी हा आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावरचा एक अपघात होता. 😊

मला हे अनपेक्षित होतं कारण मी कोणत्याही गटातटात नव्हते. ती माझी प्रवृत्ती नाही आणि मला तेवढी उसंतही मिळाली नाही. अध्यक्षपद मिळाल्याने अगदी आनंदाने उड्या माराव्या असं  वाटलं नाही पण खोटं का बोला, आयुष्याच्या या टोकाला आल्यावर एवढे लोक आपल्याला लक्षात ठेवतायत याचं मला समाधान नक्कीच वाटलं. त्याबद्दल मी या क्षेत्राची कृतज्ञ आहे.  

-------------------------------------------

प्रश्न :  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या इतिहासात तुमच्यासह अवघ्या सहा लेखिकांना संमेलनाध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामागे काय कारण असावं? ताकदीने लिहिणार्‍या लेखिका कमी आहेत की हा भेदभाव आहे की हे नकळतपणे, निर्हेतुकपणे घडलं असावं ! 

मा. तारा भवाळकर : 

आपली सगळी व्यवस्था पुरूषप्रधान आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ’मेल डॉमीनेटींग सोसायटी’ आहे. स्त्रियांचं साहित्यक्षेत्रातलं काम मुळीच कमी नाही , मी तर म्हणेन अगदी लोकपरंपरेतल्या स्त्रिया सुद्धा अधिक सकस साहित्य निर्मिती करणाऱ्या होत्या, आहेत आणि त्याच्याबद्दल मी पुष्कळदा बोलले आहे, लिहिलं आहे. त्यामुळे स्त्रिया कमी पडतात असं नाही, त्यांच्याकडे कमी लक्ष दिलं जातं. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदच काय, मला कोणत्याही गावातून एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाची पत्रिका आली की त्यात हेच दिसतं म्हणजे अगदी स्त्रियांच्याच संस्था वगळल्या तर एकूणच औषधाला आपली एखादी स्त्री असते. ते ही नाव सगळ्यात शेवटी, प्रतिनिधी म्हणून. कुटुंबव्यवस्थेत सुद्धा स्त्रियांचा निर्मितीत मोठा सहभाग असतो पण त्यांना पदं देताना ही प्रवृत्ती दिसते. बायका शिकल्या सवरल्यात त्यामुळे एखादं तरी नाव असायला हवं म्हणून असतं, फारतर सल्लागार समितीत एखाददुसरं नाव असतं. स्त्रियांकडे गौणत्वाने पाहाणं इतकं नेहमीचं आहे. त्या काही बरं करू शकतात हे स्वीकारणं अवघड असल्याने अध्यक्षपदीही स्त्रियांची नावं कमीच दिसतात. बायका आपल्या नावाचा आपणहून आग्रह धरत नाहीत.

आता इंदिरा संतांचंच उदाहरण घ्या. त्यावेळी निवडणूक पद्धत होती. त्या काही स्वत: अर्ज भरणार्‍यांपैकी नव्हत्या. लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी अर्ज भरला पण ऐनवेळी त्यांना डावललं गेलं. बोलेल त्यांचे चणे विकले जातात, न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही. स्वत:हून पुढे येऊन एकतर स्त्रिया बोलत नाहीत आणि बोलल्याच तरी त्यांची बर्‍याचदा उपेक्षा केली जाते. 

प्रश्न : मग आता लायक लेखिकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी वेगळी अ.भा. संमेलनं असावीत का? किंवा काय पर्याय असावा? 

मा. तारा भवाळकर : 

वेगळी संमेलनं तर मला अजिबात मान्य नाहीत. अशा संमेलनांना मी हळदीकुंकवाचे कार्यक्रम म्हणते. राजकीय पक्षांच्या स्त्री संघटनांचे कार्यक्रम म्हणजे साड्या वाटणं, पैसे वाटणं, ते संमेलन नाही. अर्थात स्त्रियांची स्वत:ची भगिनी मंडळं, महिला मंडळं साहित्यविषयक असे काही कार्यक्रम घेत असत ,घेतात पण अ. भा. स्तरावर महिलांची वेगळी आघाडी असावी हे मला मान्य नाही. आपला समाज जर लोकशाहीवादी असेल तर त्यात प्रत्येक व्यक्तीला त्याचं स्वतंत्र स्थान आणि अधिकार आहे, त्यासाठी स्त्री ही व्यक्ती आहे हे आधी मान्य केलं पाहिजे. सरस नीरस ठरवण्याच्या स्पर्धेत तिला स्थान असावं पण राखीव जागा नको. अर्थात हे माझं मत आणि माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. इतर कुणाचं मत वेगळं असूच शकतं.

--------------------------------------

प्रश्न : तुम्ही अध्यक्षपदी असलेल्या साहित्य संमेलनाच्या तुमच्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख नव्हता यावर काहींनी टीका केली. भाषणातल्या काही मुद्द्यांची  प्रशंसा झाली. — या दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियांकडे तुम्ही कसं पाहाता? 

मा. तारा भवाळकर : 

तटस्थपणे, कारण समाजामध्ये सर्व गोष्टी सर्वांना कायम मान्य होतातच असं नाही. मी कुणाचाही अवमान केला नाही. त्यांच्या पदांचा आदरपूर्वक उल्लेख केला आहे. भारताचे सन्माननीय पंतप्रधान /राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री असं म्हटलं आहे. माझं भाषण माझ्या शब्दात यूट्यूब वर पण आहे आणि लिखित स्वरूपात संमेलनात ते प्रसिद्ध झालं आले तेव्हा कोणीही हे शब्द तिथे बघू शकतात. राज्याचे सांकृतिक प्रतिनीधी म्हणून आलेल्या पूर्वपरिचयातील शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे ही टीका झाली असावी. लोकभाषेत सांगायचं तर लोक रस्त्याच्या मधून चाललं तरी नावं ठेवतात आणि कडेकडेने चाललं तरी नाव ठेवतात. सरळ चाललं तर धट, वाकडं चाललं तर अवलक्षण. मी सरळ चालणारी आहे. शिवाय तिथे भाषण करायचंय याची मला कल्पना नव्हती, ८७ वर्षाच्या बाईकडून जो उल्लेख झाला ,खरं तर सन्मानपूर्वकच, कारण जाणीवपूर्वक नावाचा उल्लेख करणं किंवा न करणं हे मनातही नव्हतं, हे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. तरीही समाजात सर्व प्रकारची माणसं असतात, कुणाला काही गोष्टी पटल्या असतील कुणाला नसतील, त्यांचं ते स्वातंत्र्य मी मान्य केलंय. प्रशंसेबद्दल स्वाभाविकपणे आनंद वाटला. समाधान वाटलं. 

----------------------------

प्रश्न : साहित्य संमेलनाध्यक्षाची भूमिका तुमच्या मते नेमकी काय असते? त्यांच्याकडून साहित्यक्षेत्रातून सर्जनशील नेतृत्वाचीही अपेक्षा असते का? हे पद फक्त अडीच दिवसाचं उत्सवमूर्तीपद म्हणजेच औपचारिक प्रतिष्ठेचं आहे की त्यात खऱ्या अर्थाने काही बदल घडवण्याची क्षमता असते?

मा. तारा भवाळकर : 

साहित्य संमेलनाध्यक्षाला कुठलेही वैधानिक म्हणजे कायदेशीर अधिकार नाहीत. साहित्य संमेलनात कार्यक्रम काय ठेवावे, समजा एखादा परिसंवाद ठेवायचा झाला तर कुठल्या विषयावर ठेवावा,  कुठल्या वक्त्यांना ,कवींना बोलवावं हे अधिकार अध्यक्षाला नाहीत. आता हे ही अधिकार नसतील तर एका वर्षाच्या कारकीर्दीत तो काय काय करणार ! बरं, यासाठी कोणतंही बजेट किंवा अर्थसाहाय्य नसतं. अर्थात संमेलनासाठी त्यांनी माझी व्यवस्था केली, अगदी सन्मानाने केली. मुळात साहित्यक्षेत्रात पन्नास साठ वर्ष घालवलेल्या माणसाने त्या एका वर्षात काय करावं ! 

परंतु साहित्यविषयक आस्था निर्माण होईल असं वातावरण त्या काळामध्ये नक्कीच निर्माण होतं. चार माणसांच्या गाठीभेटी होतात. भाषणं होतात, मुलाखती होतात. यानिमित्ताने माझी भूमिका मला मांडता आली. वयोमान आणि प्रकृतीमुळे माझ्याच्याने प्रवास फार झाला नाही पण ज्यांना आस्था वाटली ते लोक माझ्या घरी आले, माध्यमांनी मुलाखती घेतल्या, विविध संस्थांनी भाई वैद्य, विखे पाटील असे मोठमोठे पुरस्कार घरी येऊन दिले. हा सन्मान मराठी साहित्य विश्वाने मला दिला. चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य माणसांनी दिला. याबद्दल कृतज्ञ आहे. 

आमच्या भागातील सर्व, अगदी सर्व, राजकीय, सामाजिक विचारधारांची मंडळी माझ्या घरी येऊन आदरपूर्वक भेटून गेली. समाजाच्या सर्व स्तरांमधल्या मंडळींनी, आमच्याकडच्या शेतकरी आणि कामगार संघटना, रोटरी सारख्या संस्था, वाचनालयं, प्रशासकीय संस्था, स्वच्छता कामगारांपासून कलेक्टर आणि आमचे पालकमंत्री सगळ्यांनी येऊन भेट घेतली. आत्ताच अबुधाबीच्या लोकांनी माझा व्हिडिओ केला कारण राज्यातच नव्हे देशविदेशात माझं भाषण पोचलं आहे. लंडनहून माझ्यासाठी एक काम आलं आहे, अमेरिकेहून फोन येऊन गेला. माध्यमांमुळे जगाच्या पाठीवर पोचता आलं. 

मी प्राथमिक स्तरापासून परदेशी विद्यापीठापर्यंत शिकवण्याचं काम केलेली एक शिक्षिका आहे. नोकरीच्या काळात पदं येतात आणि जातात पण मुळात मी मास्तर आहे, आता तुझ्यासमोरही मी मास्तरकीच करतेय 😊 

अनेक लायक व्यक्ती आहेत, होऊन गेल्यात याची जाणीव आहे. मी ज्यांना मानते ते लक्ष्मणशास्त्री जोशी. तेव्हा आजची माध्यमं नव्हती पण त्यांच्या ग्रंथांमधून ती माणसं आजही मार्गदर्शन करत असतात. 

-----------------------

प्रश्न - अ. भा. मराठी साहित्य संमेलन २०२५ च्या अध्यक्ष म्हणून संमेलनाचं सूप वाजल्यापासूनचा प्रवास तुम्ही सांगितलात. याशिवाय एकूण प्रवास कसा होता !

मा. तारा भवाळकर : 

मी आयुष्यात काहीही ठरवून केलं नाही. किंवा तो आळस असेल. आयुष्याला प्रामाणिकपणे सामोरी गेले, अध्यक्षपदाला सुद्धा. लेखनही मी ठरवून केलं नाही. त्या त्या वेळेला लेखनात काही विषयात रमले, जेव्हा रमावंसं वाटलं नाही तेव्हा सोडून दिलं, मग मागे वळून पाहिलं नाही. उदा: लोकांनी मला लोकसाहित्याच्या गाठोड्यात बांधलं आहे पण माझा प्रेमाचा ,आस्थेचा विषय आहे नाटक. नाट्यविषयक वाचन, नाटक शिकवणं, १४ वर्ष अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यसंस्था स्थापली, नाटकं बसवली, चर्चा केल्या, नाट्यलेखन केलं, नाट्यस्पर्धा घेतल्या. भालबा केळकरांच्या पीडीए च्या चालीवर सांगलीला एडीए स्थापन केली.अजूनही कार्यकर्ते त्याचं काम करतात. त्यात मी कृतीशील कार्य केलं, सर्व स्तरांवर. तेव्हा मी प्राध्यापक होते, प्राध्यापकाच्या आयुष्यात पीएचडी नावाचं प्रकरण येतं. सांगलीत होते. त्यानिमित्ताने विष्णुदास भावे पहिले नाटककार, त्यांनी नाटक केलं म्हणजे काय केलं या कुतूहलातून मी वाचत गेले. लोकांशी बोलत गेले. तेव्हा यांच्या नाटकांवर बरेच आक्षेप होते, ते यक्षगानातून आलं, गोव्यातून आलं इ..... शोधत गेले. 

७५ मध्ये अभिनयाचं रौप्यपदक मिळाल्यावर मी नाटक सोडलं, सूत्र सोपवली. कार्यकर्ते आजही संपर्कात आहेत पण त्यांच्यात ढवळाढवळ करत नाही. सहसा खुर्च्या सोडवत नाहीत पण मला खुर्चीत बसायला आवडत नाही. शिकवणं ..खडू, फळा, विद्यार्थी हा माझा आनंदाचा भाग होता. पदाची अपेक्षा नव्हती. म्हणून प्राचार्यपद नाकारलं. आता पाठ दुखते म्हणून खुर्ची लागते 😊

सुरूवातीला लागले ती शारीरिक शिक्षणाची शिक्षिका म्हणून. हा कोर्स केला होता त्यामुळे हल्लीच्या भाषेत पीटी टीचर म्हणून नोकरी करत करत बहिस्थ विद्यार्थीनी म्हणून महाविद्यालयाच्या परीक्षा देत होते. पदव्या बदलत गेल्या त्यानुसार नोकरी बदलत गेली. त्यामुळे शब्दश: ग्राऊंड लेव्हलपासून एम ए पीएचडी मार्गदर्शक पदापर्यंत सर्व स्तरावर शिकवत गेले. एरिझोना स्टेट विद्यापीठातही गेस्ट लेक्चरर म्हणून शिकवलं. या सगळ्याची अपूर्वाई न वाटता कर्तव्याचा भाग वाटला. 

विष्णुदासांच्या, संशोधनाच्या निमित्ताने बराच प्रवास केला, दक्षिण हिंडले. कोकणात दशावतार, कर्नाटकात यक्षगान, भोसल्यांची नाटकं... उसना बॉक्स कॅमेरा घेऊन तिकीट काढून हिंडत दक्षिणेत सर्व लोककलांचा अभ्यास केला. आताच्या भाषेत प्रयोगसिद्ध लोककलेचा. त्यातून अभिजात नाटक घडत गेलं आहे. माझा जन्म ऐशी वर्षापूर्वीच्या शेतकरी कुटुंबात, खेडयातल्या एकत्र कुटुंबात त्यामुळे ग्रामीण संस्कृती,दळण, कांडण, गाणी हे लोकजीवन जवळून पाहिलं. यातून मी घडत आले. 

मोठेपणी आपण सैद्धांतिक अभ्यास करतो तेव्हा ही जी सामग्री जमा झालेली असते त्याचे अर्थ लागतात. प्रॅक्टीकल आधी मग थेअरी. नाटकाच्या उगमाची मीमांसा हा माझ्या प्रबंधाचा विषय, त्याला मिळालेला पुरस्कार, माझं संशोधन हे सगळं नाटकाशी संबंधित आहे. नाट्य हा संस्कृतीचा मोठा भाग आहे, लोकसंकृती ही काही वेगळी आहे असं मला वाटत नाही, नाटकातून मी त्याचा सैद्धांतिक अभ्यास केला. त्यासाठी चांगलं अनौपचारिक मार्गदर्शक मिळत गेलं.

--------------------------------

प्रश्न : संमेलनाध्यक्षपदावरून तुम्ही साहित्यिक स्वायत्तता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी याकडे कसं पाहता ? साहित्यामध्ये समाजकारण असतंच. साहित्यात राजकारण असावं का? 

मा. तारा भवाळकर : 

समाजात अनेक विचारधारांची माणसं, संघटना असतात. एखाद्या संघटनेला वाटेल हे पूरक आहे,  एखाद्या संघटनेला वाटेल हे विरोधी आहे. हे कायम होत असतं. राजकारणाशी साहित्यिकाचा संबंध असू नये असं मी म्हणणार नाही पण माणूस म्हटल्यावर त्याच्याकडे विचार करण्याची शक्ती असते. माणूस ज्या परिसरात, वातावरणात वाढला असेल त्या आचार विचारांचे संस्कार त्याच्यावर घडत जातात. त्यातून ती व्यक्ती लिहीत जाते, वाचत जाते. त्यामुळे साहित्यिकांच्यामध्ये राजकीय विचारधारा असू शकते. प्रश्न असा आहे, त्याच्या साहित्यामध्ये आणि साहित्यिक आचरणामध्ये तिने ढवळाढवळ करावी की नाही. 

साहित्यात राजकारण करू नये असं मला वाटतं, कारण तो एक संस्कृतीचा भाग आहे.  संस्कृतीचं लक्षण सर्वसमावेशकता आणि समाजाला उन्नतीकडे नेणं आहे, अवनतीकडे नेणं नाही. जसा कला हा संस्कृतीचा भाग आहे तसा भाषा हा संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. भाषेमुळॆ संस्कृतीचा विकास होतो किंवा ती टिकते आहे. साहित्य हा संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे साहित्यक्षेत्र निर्लेप असावं असं मला वाटतं.

-----------------------

प्रश्न : भाषेचा उल्लेख तुम्ही केलात. मध्यंतरी महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून शिकवण्याच्या निर्णयावरून गदारोळ झाला.  शासनाला आपला निर्णय स्थगित करावा लागला. कोवळ्या वयात मुलं अनेक भाषा व्याकरणाशिवाय सहज शिकू शकतात असं समर्थकांचं मत होतं तर काहींना ते मुलांवरचं ओझं वाटलं. याविषयी तुमची भूमिका काय आहे?  

मा. तारा भवाळकर : 

एक मास्तर म्हणून आणि प्राथमिक स्तरावरही मी शिकवलेलं असल्याने मला वाटतं इतक्या लहान वयात ही सक्ती मुळीच नसावी. पहिलीतलं मूल पाच-सहा वर्षाचं असतं. त्याला ४/५ तास एका जागी मुळात बसवून ठेवणं, त्याचं अवधान केंद्रित करणं, त्याची शारीरिक,मानसिक,बौद्धिक वाढ करणं हे सोपं आहे का! शाळा, दप्तर, पुस्तक, पेन्सील या सगळ्या गोष्टी त्याला नव्या असताना त्याच्यावर भाषा लादणं हा शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने त्याच्यावर अत्याचार आहे. मूल दहा वर्षाचं होईतो मातृभाषेशिवाय कुठल्याही भाषेतून संवादही होऊ नये.  

लहान वयात मुलं भाषा शिकू/ बोलू शकतात म्हणजे काय तर त्यांना व्यवहारातली जुजबी भाषा बोलता येते, मुलभूत असं काहीही त्यांना कळण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो. पाचवीनंतर त्यांना इंग्रजी, हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवाव्या. शिवाय शिकवायच्याच असल्या तर त्यांना शेजारभाषा का शिकवू नये !

सांगली मिरजकडची माणसं दोन्ही भाषा बोलतात. नागपूरचे लोक कितीतरी हिंदी शब्द वापरतात. दोन प्रदेशांच्या सीमारेषेवरचा भाग हा द्वैभाषिक असतो. अधिकृतपणे आहे. अनेक ठिकाणी म्हणजे कर्नाटक,. महाराष्ट्रात आहे, बडोद्याला आहे म्हणजे तिथे मराठी माध्यमाचीही शाळा आहे आणि गुजराथी आहे. कर्नाटकामध्ये आमच्या बेळगाव धारवाड या भागांमध्ये , सांगलीमध्ये कन्नड मिडीयमच्या शाळा होत्या आजही एखादी आहे. 

आपण मध्यमवर्गीय चिमटीएवढे लोक आपल्या दृष्टीने विचार करतो पण समाज निरनिराळ्या स्तरात विभागलेला आहे. व्यापाराच्या निमित्ताने ,कामासाठी माणसं स्थलांतरित होत असतात. श्रमकरी माणसं, बांधकाम करणारी माणसं यांच्या पोरांनी काय करायचं ! दहा-बारा वर्षापर्यंत कन्नड मध्ये बोलणारी मुलं महाराष्ट्रात आली तर त्यांनी मराठी भाषा कशी शिकायची. शेजारभाषेचा मुद्दा उचलला गेला होता पण अडचण कुठे येते तर शिक्षक नेमणं, त्यांचं पगारपाणी याची. तो मोठा मुद्दा आहे.

दुसरी गोष्ट, ज्यांना ठराविक भाषा शिकायची आहे त्यांच्यासाठी ती ती भाषा शिकवणार्‍या संस्था आहेत. भाषाच काय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठात गणिताच्या परीक्षा देता येतात. सगळ्या पोरांवर सब घोडे बारा टक्के म्हणत सगळं न लादता त्यांना निवडीची संधी द्यावी. या भाषांचे स्वतंत्र वर्ग असतात, पुस्तकं असतात, परीक्षाप्रणाली असते. मी हिंदी प्रबोध, प्रवीण, पंडीत, अनुवाद पंडीत सगळ्या परिक्षा दिल्या. त्यातून हरिवंशराय बच्चन यांच्या ’मधुशाला’चं भाषांतर मी केलं. बिहारमधल्या एखादया कलेक्टरची महाराष्ट्रात नेमणूक झाली तर त्याला मराठी अभ्यासक्रम शिकावा लागतो. महाराष्ट्रातल्या माणसाला जर प्रशासकीय पदावर बंगालमध्ये जायचे असेल तर त्याला बंगालीचा अभ्यासक्रम करावा लागतो. 

तेव्हा अभ्यासक्रमाच्या मुक्त व्यवस्था असलेल्या संस्थांना आधी सहकार्य करा मग वरच्या स्तरावर जा. 

उलट काय होतंय , मराठी शाळा बंद करायच्या, शाळांच्या इमारती पाडून संकुलं करायची, मास्तरांचे पगार वेळेवर होत नाहीत, अनुदान नाहीत, ६६ हजार मराठी शाळा गेल्या पाच वर्षात बंद झाल्या, यातून विकास होतो का? अभिजात वगैरे दर्जा मिळाला हे सगळं ठीक आहे पण निष्पन्न काय ! 

------------------

प्रश्न : यातून निष्पन्न काय हा विचार करताना भाषेपासून काहीसा दुरावलेला आजचा युवक डोळ्यासमोर येतो आहे. तो फारसा वाचत नाही असं दिसतं किंवा मी म्हणीन तो प्राधान्याने बरंच (पॉडकास्ट) ऐकतो आणि (व्हिडिओ) बघतो. वेगवेगळे विचारप्रवाह याच पद्धतीने त्याच्यापर्यंत पोचतात. हे त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य, पुरेसं  आहे की काळाबरोबर होणारे अपरिहार्य बदल म्हणून ते स्वीकारावं की त्याने पुन्हा वाचनाकडे वळावं म्हणून प्रयत्न, प्रयोग करायला हवेत ?

मा. तारा भवाळकर : 

वाचन कशासाठी करायचं? काहीतरी नवीन माहिती व्हावी म्हणून किंवा ज्ञान व्हावं म्हणून. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञान केव्हा होतं, त्या माहितीवर स्वतंत्र विचार केला तर. हे एकदा लक्षात आलं की मुलं ते करतात. माझ्या संपर्कात जी तरूण मुलं आहेत ती तंत्रज्ञान वापरून ऐकतात, बघतात पण त्यांना स्वत:ला तिथे काही सादर करावंसं वाटतं. माझा विभाग (अकाउंट) तिथे असावा, असं त्यांना वाटतं. मग त्याचा त्यांना अभ्यास करावा लागतो. बोलावं लागतं. आता बोलताना ते कुठली भाषा वापरणार तर ते खिचडी भाषा वापरतात. मग माझ्यासारखा मास्तर त्याला म्हणतो की ही कोणती भाषा आहे. तर तो म्हणतो, ही आमच्या जनरेशनची भाषा आहे. मग त्याला मी म्हणते की तुझ्या जनरेशनला आता तूच शिकव की चांगली भाषा कशी हवी. तुला इंग्रजीत बोलायचंय का, मग त्यावर प्रभुत्व हवं, मराठी असेल तर त्यावर. माझ्या कक्षेतल्या मुलांना हे पटतंय आणि ती मुलं हे करतायत. 

शेवटी हे आपणच त्यांना सांगितलं पाहिजे. ते ब्लॉग लिहीतात, पॉडकास्ट करतात. माध्यमं बदलत राहतात. राहणार. केवळ पाठांतर हेच माध्यम होतं एके काळी. लिपी नंतर आली, सगळ्यांना ती लिपी शिकायची सोय केव्हा उपलब्ध झाली? शाई-कागद केव्हा उपलब्ध झाले?  ज्ञानेश्वरांच्या काळात कागद दुर्मिळ होता. इसवीसनाच्या सहाव्या शतकात हॅन्डमेड पेपर म्हणजे हाताने तयार करायचा जाड  कागद उपलब्ध झाला. मुद्रणकला किती उशीरा आली. साहेब आल्यावर ! पोर्तुगीज आल्यावर! नुसतं लेखन वाचन आपण म्हटलं तरी त्यासाठी लागणार्‍या साहित्याचा आपण विचार करतो का! मुद्रणसाहित्यानंतर दृकश्राव्य साधनं आली. एकूण लिहिण्यावाचण्याची माध्यमं बदलत राहणार. 

माणूस हा आळशी प्राणी आहे 😊 आता हातात पुस्तक घेऊन वाचण्यापेक्षा त्याला ऐकणं बरं वाटतं. 

------------------

प्रश्न : पुन्हा एकदा साहित्य संमेलनाकडे वळते. याचा एक आराखडा असतो, त्यात कोणते नवे प्रवाह यावेत असं तुम्हाला वाटतं?  तुमच्या कार्यकाळात तुम्हाला कार्यक्रमांविषयी विचारणा झाली नाही असं तुम्ही म्हणालात सुरूवातीलाच पण विचारलं असतं तर तुम्ही कोणते विषय निवडले असते ? आगामी संमेलनातील विषयांबाबत तुम्हाला काही विचारणा झाली आहे का ?

मा. तारा भवाळकर : 

नाही, यंत्रणा ऐकत नाहीत असा अनुभव आहे. शिवाय विषय, गरजा काळानुसार बदलत असतात. संयोजकांना जेव्हा वाटेल की काही नवीन द्यावं तेव्हा ते देतील  नवे विषय, लोकांनी सुचवायला हवं ते. नुसता अध्यक्ष फार काही करू शकत नाही. माझ्याच काळात मला विषय विचारण्यात आले नव्हते तर आता पुढच्या काळात कसे विचारतील! 😊

------------------------------

प्रश्न : तुम्ही ठरवून काही करत नसलात तरी तुमची चाळीसहून जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. आपण मुलाखत निश्चित करत असताना तुमची व्यग्रता लक्षात आली. आजवर इतक्या उर्जेने काम करत आलात ,तुम्हाला हे सगळं कसं शक्य होतं?  सध्या काही नवे लेखनप्रकल्प सुरु आहेत का? 

मा. तारा भवाळकर : 

नवे प्रकल्प करण्याइतकी ताकद आता माझ्यात नाही. मी मघाशी सांगितलं तसं आयुष्याच्या उत्तरायणाच्या टोकावर मला हे अध्यक्षपद मिळालं आहे. साहित्यक्षेत्रात बरीच वर्ष काम केलं आहे. या वर्षभर मला सगळ्यांनी इतकं गुंतवून ठेवलंय की आता मी सर्व पातळ्यांवर थकले आहे 😊

शेवटी एकच सांगते, आता माझ्याकडून किंवा आमच्या पिढीकडून अपेक्षा करू नका, तुम्ही तरूण मंडळी काहीतरी नवीन निर्माण करा. 

------------------

मुलाखतकार - मोहिनी महेश मोडक


Sunday, August 31, 2025

Excelsior

माझ्या शाळेतल्या म्हणजे ’सेंट अलॉयसिस हायस्कूल’ मधल्या आमच्या वर्गाचं भव्य रियुनियन ठरलं होतं. काही जणांशी संपर्क होता तर काही जण अनेक वर्षांनी भेटले. आमच्या वर्गातला एक बॅकबेंचर आता मोठा उद्योगपती झालेला. त्याने पुढाकार घेऊन अगदी कॉर्पोरेट पद्धतीने झकास व्यवस्था केली होती. सगळं वातावरण शाळेच्या वेळचं. स्नॅक्स स्टॉलवर शाळेबाहेर मिळणारे चिंचगोळे, रावळगाव टाईप चॉकलेट, गावातल्या प्रसिद्ध घाशीलाल बटाटेवड्यापासून पार्श्वभूमीवर वाजणार्‍या ’मैने प्यार किया’ आणि ’बोनीएम’ मधल्या गाण्यापर्यंत सगळं जुन्या आठवणी जागवणारं. आमचा सातवीतला ग्रुप फोटो मोठ्ठा करून स्टेजवर मागे लावलेला. तोच का ते पुढे सांगते. त्यातले काहीसे बावळट पण अश्राप वाटणारे आमचे अवतार पाहताना गंमत वाटत होती. आईने हनुवटी धरून भांग पाडून दिलेली मुलं आणि दोन बो किंवा रिबिन बांधून हाताची घडी घालून बसलेल्या मुली. फोटोत आमच्या मागे शाळेची भव्य इमारत. 

रेल्वेचं आशियातलं दोन नंबरचं यार्ड असल्याने ऑफीसर्स क्लब, आखीव रस्ते, ब्रिटीश पद्धतीची अलिशान क्वार्टर्स असणारा अतिशय कॉस्मोपॉलिट्न आणि खानदेशातला तालुका असल्याने शेतीमातीत रमणारा, भरीत भाकरी, वरण बट्टीवाला अहिराणी हेलातला गल्लीबोळांचा, ग्रामीण बाज असे दोन्ही प्रवाह तापी नदीबरोबर वाहते ठेवणारं आमचं गाव. त्या गावात ही कॉन्व्हेंट १८७४ साली स्थापन झालेली. गेल्या वर्षी दीडशे वर्ष पूर्तीचा सोहळा साजरा करणार्‍या या शाळेच्या दर्जाची एकही शाळा त्या सुमारास आसपासच्या जिल्ह्यातही नव्हती.  

मला वाटतं मीच नव्हे आपण प्रत्येक जण आज जे जे काही आहोत किंवा नाही आहोत, त्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात आपली शाळा आहे, असते. तिथलं वातावरण, शिक्षक, संस्कृती, वर्गमित्र-मैत्रिणी, शाळेतल्या घटना, तिथले अनुभव ,अगदी इमारत सुद्धा, हे सगळं आपल्या आत रूजून आपण घडत जातो.  

त्यातून माझी शाळा त्या काळच्या इतर शाळांपेक्षा आणि आजच्या बाजारू कॉन्व्हेंटपेक्षा खूप वेगळी होती. विशेष कोणतीही देणगी, जास्तीचे खर्च न आकारता शाळा व्यवस्थित शासनमान्य पद्धतीने चालत असे. तिथली कडक शिस्त, नेटका ऐटबाज गणवेश, मुलामुलींना एका बाकावर बसवणे हा इतर शाळांमधल्या मुलांसाठी असूयेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा. तेव्हा चांगल्या रेल्वे वसाहती सोडल्या तर साधारण आगगाडीच्या डब्यांसारख्या एकामागेएक तीन खोल्या असलेली , बाहेरून रंग उडालेल्या भिंतींची, रात्री पिवळे बल्ब लावणारी, बाहेरच्या खोलीत लोखंडी कॉट आणि एखादी पत्र्याची खुर्ची असलेली , मागच्या अंगणात झाडाखाली बंब आणि सरपण ठेवलेली बहुतेक सगळी बुजरी बैठी घरं. शाळा एकदम चकाचक, स्वच्छ, देखणी जणू वेगळ्याच विश्वातली. 

मिशनरी शाळा असल्याने प्रवेश करताच उजवीकडे ’मदर मेरी’ चा पुतळा दिसे. डावीकडे  सायकल स्टँडजवळ साथी नावाच्या हसर्‍या नेपाळी चौकीदाराचं घर, दोन्ही हाताला तीन मजली प्रशस्त इमारती, मध्ये भव्य सभागृह आणि मागे विस्तीर्ण क्रीडांगण. प्राचार्यपदी सिस्टरची नेमणूक होई. अभ्यासक्रमात बायबलवर आधारित असलेले ’मॉरल सायन्स’ शिकावे लागे. नाताळला विशेष कार्यक्रम होत. कॅरोल्स गायली जात. येशूजन्माच्या सजावटीच्या स्पर्धा होत. जयंत सर ’जिंगल बेल’ च्या ट्यूनवर सांताक्लॉज होऊन हो हो करत नाचत येत आणि आमच्यावर खाऊची उधळण करत. हे सगळं हिंदू वा अन्यधर्मीयांच्या सणवारांच्या आड येत नसे. गणपती, शारदा बसवण्याच्या अनुभवाला मात्र आम्ही मुकलो. अर्थात कोणत्याही शिक्षणसंस्थेचे चालक, विश्वस्त ज्या धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीचे असतात त्याचा प्रभाव त्या संस्थेवर असणं नैसर्गिक आहे. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात पूजा केली म्हणून गदारोळ का केला जातो किंवा सरस्वती देवीला विद्येचं प्रतीक मानून कोणत्याही कार्यक्रमाआधी पूजन करणं यात तथाकथित पुरोगाम्यांनी आक्षेप घेण्यासारखं काय आहे हे मला कळत नाही. .

------------------

कॉन्व्हेंट असली तरी डावीकडच्या इमारतीत मराठी व उजवीकडे इंग्रजी माध्यमाचे वर्ग भरत. ’वर्गभेद’ तेव्हाही काही अंशी होता. इंग्रजी माध्यमाची काही मुलं मराठी माध्यमाच्या मुलांकडे इंग्रज ’नेटीव्हांकडे’ पाहत तसे पाहत. बर्‍याच घरातले भाऊ आमच्या शाळेच्या इंग्रजी माध्यमात आणि बहिणी मात्र मराठी माध्यमात शिकत असत. हा ’लिंगभेद’ ही कळू लागला होता. धर्मांतरित ख्रिश्चन मंडळींसाठी मराठी चर्च आणि मूळ ख्रिश्चन अँग्लोइंडियन मंडळींचं वेगळं चर्च असे. हा धार्मिक भेदही जाणवत असे. तरीही शाळेत सर्व धर्माची, जातीची मुलं एकत्र शिकत, खेळत. 

बहुतेकांचे वडील रेल्वेत नोकरी करत. रेल्वेचं स्वत:चं केंद्रीय विद्यालय (हल्लीचं सीबीएसई) होतं तरीही अधिकार्‍यांचं प्राधान्य आमच्या शाळेला असे. वडिलांच्या पदानुसार प्रवासासाठी कोणत्या वर्गाचा पास मिळतो हा तेव्हा ’स्टेट्स सिंबॉल’ असला तरी आर्थिक स्तर मैत्रीच्या आड येत नसे. बाबांना इथल्या शिस्तीचं कौतुक वाटे. मला ओरडा बसू नये म्हणून ते घरी असले तर माझ्या बुटांना चकचकीत पॉलीश करून ठेवत. दुसर्‍या तुकडीत कायम पहिल्या येणार्‍या मुलाचे वडिल जमिनदार आहेत म्हणून तो पहिला येतो, असं मी त्यांना एकदा सांगितल्यावर ’त्यापेक्षा तो तुझ्यापेक्षा हुशार आहे हे तू का मान्य करत नाहीस’ असं म्हणून त्यांनी मला निरूत्तर केलं होतं. 

शाळेत एखाद्याशी मैत्री जुळली तर जन्मभर टिकते कारण ती मैत्री होते तेव्हा आपण ’कुणी’च नसतो. गाईडच्या कॅम्पसाठी नववीतल्या आम्ही विद्यार्थिनी रेल्वेने वसईला गेलो होतो. सर्वांना आरक्षण मिळू शकलं नव्हतं. अन्य तुकडीतल्या एकीबरोबर मला बर्थ शेअर करावा लागला. त्या रात्री आमची जी काय गट्टी जमली ती आजतागायत तशीच आहे. शाळेने जीवाला जीव देणारे मित्रमैत्रिणी दिले, त्यातले बहुतेक आजही संपर्कात आहेत. कधी महिनामहिना बोलणं होत नाही, कधी वाढदिवस ते वाढदिवस बोलणं होतं पण एका फोनवर अर्ध्या रात्री उठून येतील असे त्यातले काही.. नवरा चेष्टेने म्हणतो, "सर्दी झाल्याचं टाक तुमच्या शाळा ग्रुपवर, एअर-अ‍ॅम्ब्युलंस घेऊन येतील..."

------------

शाळेच्या दोन्ही माध्यमातले दहाव्या वर्गातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी ग्रीन, रेड, ब्लू आणि यलो हाऊसचे प्रमुख असत. प्रत्येक हाउसला दर महिन्यात एक एक कामगिरी दिली जात असते. उदा: स्वच्छतेकडे लक्ष देणे, विद्यार्थ्यांचा गणवेश पूर्ण आणि नीटनेटका आहे की नाही याची तपासणी करणे, अवांतर उपक्रम आयोजित करणे वगैरे. असेंब्ली संपवून ’कम सप्टेंबर’ सारख्या झकास संगीताच्या तालावर आपापल्या वर्गात रांगेने जाताना मूड प्रसन्न होई. एका हॉलमध्ये, सभागृहात चित्रकलेच्या बानाइतकर सरांनी अतिशय रेखीव युरोपियन पद्धतीची भव्य म्युरल्स काढली होती. ती सतत नजरेला पडून चित्रकला आवडू लागली. नीट समजावी म्हणून ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या. हस्तकलेशी मात्र पत्रिका जुळली नाही. 

शाळेत पहिली घंटा म्हणजे असेंब्लीसाठी जमायची सूचना असायची. दुसर्‍या घंटेला आपण आहोत त्या ठिकाणी पुतळा होऊन थांबावं लागे. आपोआप शाळा चिडीचूप होई. तिसर्‍या घंटेला एक शब्दही न बोलता रांगेत जाऊन आम्ही उभे राहत असू आणि शाळेचे दार बंद होत असे. त्यानंतर कुणालाही आत सोडले जात नसे किंवा अघटित घडल्याशिवाय बाहेर जाता येत नसे. इतर शाळांची मुलं केव्हाही गावभर फिरत किंवा मधल्या सुट्टीत पळून जात. शाळेच्या असेंब्लीत किंवा एरवीही कुणी गोंधळ केला तर पीटीचे सर येऊन त्याला शब्दश: बडवत असत. पीटी शिकवण्यापेक्षा ते या कामासाठीच नेमले असावेत. ’हा बॉईज, एक बात का खयाल रखो’ असं ओरडून म्हटल्याशिवाय त्यांना पुढे बोलता येत नसे. एकूण गर्ल्सना काही सांगावं लागत नसावं.

अर्थात इतक्या कडेकोट बंदोबस्तातही मुलांचा वात्रटपणा जमेल तसा सुरू असे. शाळेतल्या सर, मिस (शिक्षिका) यांना टोपणनावं ठेवणे इ. शिवाय  शाळेत मजा ती काय! प्रसाधनगृहात शाळेतल्या विशिष्ट सर आणि मिसची नावे बदाम काढून लिहिणे वगैरे नेहमीचे प्रकार होतेच. इतर रूक्ष शाळांच्या तुलनेने इथले वातावरण रंगीबिरंगी होते. शिक्षिकांना पोशाखाचे बंधन नव्हते. ऐशी-नव्वदचं दशक असूनही काही ख्रिश्चन, पारशी, पंजाबी शिक्षिका स्कर्ट मिडी सारख्या पेहरावात, लिपस्टीक लावून येत. त्यांच्या पोशाख, मेकअप, पर्फ्यूमवर चर्चा करणं हा मुलींचा आवडता उद्योग असे. (आता मात्र तिथे शिक्षिकांना साड्या व त्याही एकसारख्या नेसाव्या लागतात.) इतर शाळांत गॅदरिंगच्या नाचात मुली आयब्रो पेन्सीलने मिशी काढून आणि डोक्याला फेट्यासारखी ओढणी गुंडाळून ’सजना’,’पिया’चा रोल करत. आमच्या शाळेत तसं कधीतरी होत असलं तरी मुलगे मुली एकत्रही नाचत. गावात अनेकांना हा सांस्कृतिक धक्का असल्याने ते शाळेला नावं ठेवत. मी हायस्कूलमध्ये असताना बोनीएमच्या ’रास्पुतीन’ की ’डॅडी कूल’ वर दहावीच्या मुलामुलींनी जोडीने, शेवटी आरके स्टुडिओ पोझ घेत जे इंग्रजी नृत्य केलं ते पाहून आ वासला होता. 

मुलगा-मुलगी शेजारी बसवले की बोलणार नाहीत असा तर्क असावा मात्र एकदा भीड चेपल्यावर मुलं मुली एकमेकांशी तितकीच बडबड करत. काही मोजकी अपरिहार्य टीनएजर प्रेमप्रकरणं आणि दोन चार वाह्यात मुलांचा अपवाद वगळता एकमेकांची मित्र होत. मुलांकडे कायम पुरूष म्हणून न पाहता ’माणूस’ म्हणून नकळत पाहायला शिकवलं ते याच शाळेनं. 

नववीत माझ्याशेजारी बसणारा मुलगा अगदी अबोल, साधा. अभ्यासात त्याला मी मदत करायचे पण मला पुस्तकांचं ओझं न्यायचा कंटाळा येई. मी त्याला चतुराईने पटवलं की पहिल्या ४ तासांची पुस्तकं तू आणत जा, शेवटच्या ४ तासांची मी. शेवटच्या ४ मधले ३ तास क्राफ्ट, चित्रकला, गाईड, पीटी वगैरे असल्याने वर्षभर मला एखादंच पुस्तक न्यावं लागे. दहावीनंतर तो मुलगा कुणालाही भेटलेला नाही. कधी भेटलाच तर मला त्याला उगीचच सॉरी म्हणायचं आहे.      

---------------------------

मैत्रिणी बर्‍याच असल्या तरी आम्ही तीन जणी हटकून एकत्र डबा खात असू. त्यातली एक माझ्याबाबत विशेष पझेसिव्ह होती. वर गाईड कॅम्प निमित्ताने उल्लेख केला आहे तिच्याशी माझी वाढती मैत्री पाहून हिने मला ’अब तेरे बिन जी लेंगे हम’ टाईप लांबलचक पत्र लिहीलं होतं. तिला मी तूच माझा पहला प्यार असल्याची खात्री पटवल्यावर ती शांत झाली. ते पत्र आठवून आता तिलाही खूप हसू येतं. आम्ही तिघी आजही जवळच्या मैत्रिणी आहोत. 

तर हायस्कूलला असताना डबा ग्रुपमधली ती तिसरी गुजराथी मैत्रिण म्हणाली ’आता ९ वी पासून माझी शाळा बंद, माझं राजस्थानला लग्न करणार आहेत.’ मला धक्का बसला. तिच्या वडिलांचं उत्तम चालणारं उपाहारगृह होतं. मी तिरीमिरीत थेट त्यात शिरून त्यांना भेटले. ’हे कसं चुकीचं आहे’ असं माझ्या तेव्हाच्या कुवतीनुसार कळवळून त्यांना सांगायचा प्रयत्न केला. ’वो जाने दो बेटा, बर्फी खाओ’ म्हणत एकीकडे गल्ला मोजत त्यांनी हसून माझी बोळवण केली. विशेष म्हणजे तिलाही या निर्णयाचं दु:ख वगैरे झाल्याचं दिसलं नाही. त्यानंतर ती आजतागायत भेटलेली नाही. याउलट शिकण्याची आवड असलेली, आईविना जगणारी एक निर्धन मैत्रिण काही तरी निमित्त होऊन जळून वारली. तिचं आकस्मिक जळणं हे गूढच राहिलं. तिला रेल्वे हॉस्पीटलला भेटायला गेले तेव्हा जे काही पाहिलं त्यानंतर कितीतरी रात्री झोपच आली नाही.         

शाळेत इतक्या शिक्षकांचा सहवास लाभला, ग्रुप फोटो तर दरवर्षी त्या त्या वर्गशिक्षकांबरोबर काढण्याची शाळेची प्रथा होती पण रियुनियन मधे जो फोटो व्यासपीठावर लावण्यासाठी निवडला होता त्यामागे कारण एकच .. त्यात होत्या आमच्या सगळ्य़ांच्या लाडक्या ’जोशी मिस’.

आम्हाला त्या तीन वर्ष क्लासटीचर म्हणून लाभल्या. उंच, सशक्त बांध्याच्या, गोर्‍यापान, हसर्‍या, रूबाबदार, पांढर्‍या होत चाललेल्या पण डाय न केलेल्या कुरळ्या केसांची आखूड वेणी घालणार्‍या, कुठलाही दागिना न घालणार्‍या आणि साध्या कॉटनच्या पण सतेज रंगांच्या साड्या नेसणार्‍या जोशी मिस मला नेहमीच खूप आवडायच्या. त्या मराठी शिकवायला आल्या. त्यातला व्याकरणाचा भाग सुद्धा मला मजेदार वाटू लागला. ह्रस्व ,दीर्घाचे नियम असोत किंवा गद्य. कविता शिकवताना त्या आम्हाला थेट त्या वातावरणात घेऊन जात. कुणाचं उद्धृत वापरलं आणि नाव लिहिलं नाही तर ती चोरी असते, शब्दाचे अर्थ त्याच्या वाक्यातल्या जागेनुसार कसे बदलतात असं काय काय सांगत. त्यांच्यामुळे मला ’भाषा’ हे प्रकरण भलतंच आवडायला लागलं. मग दादाने वाचनालयातून आणलेली मॅक्झीम गॉर्कीची "आई" कादंबरी वाचली, बरीचशी कळली नाही पण त्यांना मी ती वाचल्याचं काहीतरी तीर मारल्यासारखं ऐटीत सांगितलं होतं. 

शाळेत अ‍ॅंग्लोइंडियन ख्रिश्चन मुलांच्या फाडफाड इंग्रजीमुळे आम्ही त्यांना बिचकायचो. एका सिनीयर हाऊस-प्रमुख मुलीने माझा ’बो’ लावायचा राहिला म्हणून मला असेंब्लीच्या बाहेर घालवले. मी लावला होता पण त्याचं बक्कल तुटलं म्हणून तो पडला, हे काही मला तिला इंग्रजीत सांगता आलं नाही. उशीरा वर्गात आल्यावर मिसला काय ते कळलं, त्यांनी आधी त्या मुलीला बोलावून अस्खलित इंग्रजीत तिची हजेरी घेतली. ती गेल्यावर मला जवळ बोलवून खडसावलं,"इंग्रजी बोलता येत नाही यात काय कौतुक आहे? लिहीता येते तर बोलता का येत नाही? त्यासाठी तू वेगळे काय प्रयत्न केलेस? नुसता शाळेतला नंबर पुढे काही उपयोगी नसतो" वगैरे.

दुसर्‍या दिवशी त्यांनी दोन छोटी इंग्रजी पुस्तकं मला आणून दिली, महिन्याअखेरीस परत कर म्हणून बजावलं. पुढच्या असेंब्लीत त्यांना वचन दिल्याप्रमाणे इंग्लीशमधे बातम्या सांगितल्या म्हणजे नुसत्या वाचून दाखवल्या.पहिलीत ताठ उभं राहून टिळकांवर भाषण केल्यापासून वक्तृत्वाची भीती मेली होती पण इंग्लीशमधे !! जोशी मिसमुळे त्या भाषेची भीती एकदम कमी झाली. त्यांना तो विषय आम्हाला शिकवायला मिळाला नसला तरी इंग्रजी माध्यमाच्या सिनीयर मुलांनी ’कुसुमाग्रज, बोरकर, विंदा’ इ.च्या सोप्या किंवा बालकवितांवर आणि मराठी माध्यमातल्यांनी ’वर्डस्वर्थ, बायरन, शेले’ इ.च्या सोप्या कवितांवर प्रोजेक्ट करायचा अशा अफलातून कल्पना फक्त त्यांनाच सुचायच्या.

’टिट्बिट्स’ नावाचं एक मासिक पत्रक शाळेत निघत असे. त्यात मराठी विभाग सुरू झाला तो जोशी मिसमुळेच. त्याची मी संपादक होते. त्यासाठी त्या छान विषय सुचवायच्या. त्यांची मी आवडती आहे याचा मला अभिमान वाटायचा. खेळ वगळता कोणत्याही स्पर्धेत, गॅदरिंगमधे मी भाग घेतला नाही असं कधी झालंच नाही. एके वर्षी काही कारणाने मी ऑडीशन देऊ शकले नाही. नंतर जोशी मिसजवळ रडून-पडून मी एकदाची त्यात वर्णी लावली पण मला अगदीच फुटकळ भूमिका मिळाली. काय तर म्हणे येशूच्या जन्माने आनंद झालेला निळा ढग! पुढे तो मेंढपाळाचा सीन सुरू आणि मागे (आम्ही) रंगीत ढग मंडळींनी या विंगेकडून त्या विंगेकडे नुसतं हात हलवत विहरत जायचं. एकही संवाद नाही. शिवाय ढग असल्याने तोंडाला कापूस सगळा. ते नाटक झालं, मी जोशी मिसजवळ जाऊन फुरंगटून उभी राहिले. त्या मला निदान ’चंद्र’ करू शकल्या असत्या. माझी तेवढी वट त्यांच्याकडे नक्कीच होती. मी कुरकूर केल्यावर त्या म्हणाल्या ते नेमकं नाही पण त्याचा सारांश आठवतोय.. "नेहमी आपणच मुख्य भूमिकेत असू असं नसतं. अशाही अनुभवाची एक गंमत असते.आवडीच्या प्रत्येक स्पर्धेत भाग मात्र घेत राहायचा "

माझी एक मैत्रिण छान नाचायची. तिने एकदा गॅदरिंगसाठी ठेक्याचं हवं म्हणून कुठलं तरी भप्पी लाहिरीचं गाणं निवडलं. मिसने तिला ऑडीशनमध्येच रिजेक्ट केलं. ती रागावली ,रडली. तुला त्या गाण्याचे शब्द कळतात का? ते तुझ्या वयाला शोभणारे नाहीत, असल्या गाण्यांवर बाहेरही कुठे नाचायचं नाही. शास्त्रीय नृत्य शिक, वेस्टर्नही शिक पण कॉमनसेन्स वापरून वगैरे त्यांनी दुसर्‍या दिवशी तिला जवळ बोलावून समजावलं.

एका सुट्टीनंतर आमची गणिताची पुन्हा परीक्षा घेण्यात आली, का तर ’पेपर उडून गेले’. गणिताच्या मिस म्हणे सुटीत ट्रीपला गेल्या होत्या आणि रेल्वेगाडीत खिडकीपाशी बसून पेपर तपासत होत्या, जोरदार वारा आला आणि बरेचसे पेपर भुर्र उडाले. तेव्हा सोशल मिडिया असता तर त्यांचं किती ट्रोलींग झालं असतं कल्पना करवत नाही. अर्थात प्रिन्सिपल सिस्टरची त्यांना खूप बोलणी बसली. मामाकडची सुटीची धमाल सोडून चरफडत मी (आणि सगळेच) परीक्षा द्यायला आले. जोशी मिसला म्हटलं की मला आता काही आठवत नाहीये. त्या म्हणाल्या-गणित हा विषय असा आहे की समजलं असलं की आठवावं लागत नाही. मग मात्र मी गणितं चक्क पाठ करते हे त्यांना सांगून टाकलं आणि त्या अवाक झाल्या. एका प्रख्यात सरांकडे ताबडतोब शिकवणी लावा असं त्यांनी थेट आईला भेटून सांगितलं. त्या सरांच्या अद्भुत कौशल्यामुळे मला फाडफाड गणितं येऊ लागली. दहावीत गणितात दीडशेपैकी केवळ एक मार्क गमावला, याचं श्रेय त्यांच्याइतकंच जोशी मिसचं आणि थोडं त्या पेपर उडवणार्‍या वार्‍याचंही.

या सगळ्याचा परिणाम असेल, दहावीत तालुक्यात मुलींमधून पहिली आले. यानिमित्त मला आणि वर्गात दुसरा आलेल्या माझ्या एका वर्गमित्राला त्यांनी छोटीशी पार्टी दिली. त्यांच्या घरी. आजवर आईबाबांबरोबर कुणाकडे तरी जाणार्‍या मला हे फार भारी वाटलं. त्यांच्या आतल्या गॅलरीत त्यांनी खुर्च्या मांडल्या होत्या. काचेच्या बशीत बरंच काय काय खायला ठेवलं होतं. वर्गातल्या दोन टीचभर मुलांसाठी! 

मला अप्रूप वाटलं. त्यांच्या घरातल्या काचेच्या कपाटात पुस्तकं रचलेली. स्वत: सुबक विणकाम केलेल्या कोचावरच्या उशा. घरी एकट्या असून सदासतेज, समाधानी, आनंदी. पुढे काय करणार याबद्दल त्या आणि तो मित्र बरंच काही बोलले ,एरवी सतत बडबडणारी मी मिसकडे नुसती बघत बसले होते.

--------------------------

रियुनियनला आम्ही त्यांना सन्मानाने घेऊन आलो. त्यांनी सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारल्या. त्या आता थकल्या आहेत पण त्या आहेत ही भावनाही खूप उबदार आहे. 

त्या भेटल्याच नसत्या तर... ! Excelsior हे बोधवाक्य (शब्द) कृतीत आणणार्‍या या शाळेत आईबाबांनी मला घातलं नसतं तर! निम्नमध्यमवर्गीय घराबाहेरचं आणि मध्यमवर्गीय वाड्याबाहेरचं जग कदाचित कळलं नसतं. जन्मभर पुरेल इतका आत्मविश्वास मिळाला नसता. निवडीचे अनेक प्रसंग आले, मग तो आयुष्याचा जोडीदार असो, व्यवसाय असो, गाव असो, भोवतालची माणसं असो, भूमिका घेणं असो... तेव्हा कामी येणारा ठामपणा मनात रूजला नसता. आपल्या कक्षा रूंदावण्याची आणि त्याचबरोबर मर्यादांचा स्वीकार करण्याची हिंमत झाली नसती. शब्दांवर प्रेम करण्यातली गंमत कळली नसती. एका टप्प्यावर पुढे सगळा अंधार दिसत असताना, नैराश्य या शब्दाचा वाराही न लागता, there is always a tomorrow ही उमेद मिळाली नसती. 


Monday, June 30, 2025

’मिसेस’ आणि गरम गरम फुलके

’मिसेस’ हा आरती कादव दिग्दर्शित हिंदी चित्रपट ’झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झाला. २०२१ मध्ये ’अ‍ॅमेझॉन प्राईम’ वर प्रदर्शित झालेल्या जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट ’द ग्रेट इंडियन किचन’ चा ’मिसेस’ हा रिमेक आहे. मूळ सिनेमा हिंदी व काही दाक्षिणात्य भाषांमध्ये डब झाला असला तरी उत्तरेतील प्रेक्षकांपर्यंत फारसा पोचला नव्हता. ती उणीव ’मिसेस’ने भरून काढली.  

मूळ सिनेमातल्या निमिशा सजायन आणि सूरज वेंजारमुडू या मुख्य पात्रांइतकाच जिवंत अभिनय ’मिसेस’ मध्ये सान्या मल्होत्रा आणि निशांत दहियाने केला आहे. कंवलजीत सिंगने त्यांना उत्तम साथ दिली आहे. रिमेक म्हटल्यावर तुलना आलीच. दाक्षिणात्य सिनेमा्ला उत्तर भारतीय रूपडं देताना काही सांस्कृतिक संदर्भ बदलणं आलं. यात ’मिसेस’ पूर्ण यशस्वी झाला आहे पण ’द ग्रेट इंडियन किचन’ मध्ये मुलभूत प्रश्न ज्या धारदार पद्धतीने दाखवण्यात आला आहे त्याची धार ’मिसेस’ मध्ये काहीशी बोथट झाली आहे. मूळ सिनेमातला प्रश्न वैश्विक असला तरी ग्रामीण पार्श्वभूमीमुळे व प्रत्ययकारी चित्रणामुळे त्या प्रश्नाची तीव्रता अधिक जाणवते. तुलनेने शहरी स्त्रीला त्या प्रश्नावर उत्तर शोधणं किंबहुना हा प्रश्न उद्भवण्यापूर्वी त्यावर विचार करणं शक्य असूनही हिंदीतली आधुनिक नायिका मल्याळी ग्रामीण सिनेमातल्या नायिकेसारखीच वागते हे पचवणं जरा कठीण गेलं. ’हे जग आता बदललं आहे’ असं भासणार्‍या प्रत्येकाला  ’मिसेस’ भानावर आणतो. 

मुळात, काय आहे यात मांडलेला प्रश्न ! साधी सरळ आनंदी स्वभावाची नायिका लग्नानंतर एका सुखवस्तू कुटुंबात, उराशी स्वप्नं कवटाळून प्रवेश करते. सासूला बाहेरगावी जावे लागल्याने घराची जबाबदारी नायिकेवर येते. नवरा आणि सासर्‍यांना सगळं काही हातात मिळण्याची सवय आहे. मासिक धर्माच्या काळात मात्र यातून सुटका आहे. ती ही बाईला विश्रांती मिळावी या हेतूने नव्हे तर घर विटाळू नये या भावनेतून. ताटाभोवतीचं खरकटंही तसंच टाकून घरातले पुरुष दररोज निवांत जेवून उठून जातात. ’आपल्याच घरातलं काम आहे- त्यात काय इतकं’ म्हणून गृहित धरलं जातं. नवर्‍याचा संबंध शेजे आणि पेजेच्या गरजेपुरताच. नोकरीच्या इच्छेला घरच्या पुरुषांनी गोड शब्दात दिलेला नकार,माहेरच्यांची तिने सासरी जुळवून घ्यावं अशी सूचना. एका क्षणी तिच्या भावनांचा उद्रेक होतो. त्याची परिणती कशात होते, ती काय निर्णय घेते, त्याने कसा आणि किती फरक पडतो हे सिनेमात पुढे पाहता येईल. तिला ती गवसते हा सिनेमाचा उत्कर्षबिंदू महत्वाचा. 

आता या कथानकातून ध्वनीत होणार्‍या आशयाकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. "घरातल्या बाईने गरमागरम फुलके (किंवा दोसे) करून वाढावेत या भारतीय पुरूषांच्या अपेक्षेमुळे भारतीय स्त्रीची ’उर्जा’ त्यातच खर्च होते त्यामुळे तिची उत्पादकता व इतर क्षेत्रात काही करू पाहण्याची क्षमता कमी होत जाते”, अशा अर्थाचं विधान एका राजकीय नेत्याने मध्यंतरी केलं. ते वाचून त्यांच्या स्त्रियांच्या आकांक्षांचा विचार करण्याचं कौतुक वाटू लागणार तोच पुढे वाचलं, "त्यापेक्षा पुरूषांनी पोळ्या (रोटी) खाव्यात." पोळ्या एकदम करून ठेवता येतात आणि सतत स्वयंपाकघरात जावं लागत नाही. पण म्हणजे फुलके,पोळ्या, दोसे जे काय करायचं ते शेवटी करायचं बाईनेच आहे. किरण बेदींना एका मुलाखतीत विचारण्यात आलं , "रिकामा वेळ मिळाला तर कोणती डिश करायला तुम्हाला आवडतं?" त्या म्हणाल्या "पुरूष अधिकार्‍याला ’रिकामा वेळ मिळाला तर त्यात काय करता’ असं तुम्ही विचारलं असतं. डिश बनवणं हे इथे माझ्याबाबतीत गृहित का धरलं आहे ?"   

महानगरी गगनचुंबी इमारतींपासून पाड्यावरच्या झोपड्यांपर्यंत पसरलेल्या आपल्या महाकाय देशातल्या बहुसंख्य घरात गृहित धरलेल्या स्त्रिया सापडतील. काही लोकांचं म्हणणं. या सिनेमातला नायक पण काम करतोच आहे नं. मल्याळी सिनेमात तो शिक्षक तर हिंदी आवृत्तीत तो प्रथितयश डॉक्टर आहे. पुरूषाने बाहेर आणि स्त्रीने घरात राबावं या श्रमविभागणीत गैर काय आहे? घरची आर्थिक आघाडी सांभाळणार्‍या पुरुषांना असाच कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. 

हे अमान्य असलेले काही स्वघोषित संस्कृतीरक्षक सिनेमा प्रदर्शित होताच पुढे सरसावले. त्यांच्या म्हणण्यानुसार या सिनेमातले पुरूष काही दारूडे वगैरे नाहीत. बायकोला मारझोड करणारे नाहीत. सभ्य आहेत. घरात सुबत्ता आहे. बाईकडून फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा आहे. बाई तर गृहलक्ष्मी असते. हे असलं भलतं काहीतरी बायकांच्या डोक्यात भरवण्याची परदेशी खूळं आणि स्त्रीमुक्तीच्या फालतू कल्पनांना विरोध केलाच पाहिजे. असले सिनेमे म्हणजे आपल्या महन्मंगल संस्कृतीविरोधातली षडयंत्र आहेत.”-असा त्यांचा दावा. 

वरपांगी ’फक्त घर नीट सांभाळण्याची अपेक्षा’ योग्यच आहे पण इमोशनल अ‍ॅब्युज किंवा भावनिक छळ हा या मंडळींच्या गावीही नाही. आवडो की नावडो स्वयंपाक, घरकामात आपलं ध्येय, महत्वाकांक्षा, करियर-व्यवसायाचा विचार दाबून ठेवून आणि हे करायची ’परवानगी’ मिळालीच तर घर नीट सांभाळण्याची कसरत करताना बायका झिजून पिचून जाताना दिसतात. कित्येक उत्तम खेळाडू महिला लग्नानन्तर ’गरम फुलक्यां’च्या गडबडीत सरावाला वेळ न मिळू शकल्याने करियर सोडून देतात. काही जणी मुलांसाठी नोकरी सोडतात. वर्गातल्या मुलांना वर वर जाताना मुक्याने पाहतात. हुशार असूनही संशोधनासारख्या वेळखाऊ प्रांतात किंवा डिमांडिंग स्वरूपाच्या उच्चपदाच्या नोकर्‍या न करता जमेल तेवढंच करियर करतात. त्यातूनही परिचयातील गृहिणींच्या तुलनेत आपण घरी कमी वेळ देतो हा अपराधीभाव उरात घेऊन जगतात. 

अशा स्त्रियांची मनोव्यथा व्यक्त करण्यासाठी ,पुरुषांनी घरकाम /स्वयंपाक करण्यात विनोद आहे असं वाटणार्‍यांसाठ हा सिनेमा निर्मिलेला आहे. ’वेडिंग’ नामक भपकेबाज समारंभात आपले कपडे, दागिने, मेकअप कसा असावा याचा मुली जितका विचार करतात त्याच्या निम्मा जरी विचार त्यांनी ’मॅरेज’ म्हणजे ’सहजीवना’विषयी केला, त्याविषयी भावी जोडीदाराशी चर्चा केली तरच लग्नसंस्था सशक्त होण्याची आणि समाजाला स्त्रियांनाही ’समान संधी’ मिळायला हव्यात याचे भान येण्याची शक्यता आहे. ’मिसेस’ सिनेमा अशा सगळ्या तरूणींसाठी आणि त्यांचीही काही स्वप्न असतात हे समजू न शकणार्‍या तरूणांसाठी आहे. 

हा सिनेमा एवढंच सांगू पाहतो - आयते पानात पडणारे गरम गरम फुलके पुरूषांइतकेच बायकांनाही आवडतात. 😉


Wednesday, June 25, 2025

कथा

 प्रसिद्ध कथालेखिका नीलिमा बोरवणकर, व्यासंगी लेखक नारायण कुलकर्णी-कवठेकर यांच्याशी झालेल्या चर्चा, प्रख्यात लेखिका कविता महाजन यांची लेखनविषयक मते, वाचलेल्या काही दर्जेदार कथा आणि त्या संग्रहांच्या प्रस्तावना या सगळ्य़ातून मला जेवढे कळले त्याचे सार मी ’कथा कशी असावी’ या संदर्भात लिहिते आहे. मी यातील तज्ज्ञ वगैरे अजिबात नाही, केवळ अभ्यासक म्हणून लिहिते आहे.

१) कथा आणि गोष्ट यात फरक असतो. ’आटपाट नगर होतं. तिथे एक अमुकतमुक राहत होता... ,किंवा ’एक होता राजा, एक होती राणी, एकदा काय झालं... आणि ते सुखाने नांदू लागले’ ही झाली गोष्ट. केवळ घटनांची मालिका. कथा नव्हे. आज बहुतेक जण याच पद्धतीने पात्रांची, फार तर ते राहत असलेल्या गावाची ओळख करुन देऊन, एकामागे एक प्रसंग रचून, सुखांत किंवा दु:खांत करुन त्या पुरचुंडीला कथा समजताना दिसतात. कथेच्या आत अर्थातच गोष्ट असते पण तो केवळ कथेचा कच्चा माल असतो. 

२) कथा लेखनाचा असा एखादा साचेबद्ध आराखडा नसतो. ती कुठेही उगम पावून कुठेही लुप्त होऊ शकते. उदा: ’शेवग्याच्या शेंगा’ कथेची सुरुवात ’वडिलांच्या अस्थी आळंदीला पोचवून श्रीनिवास आताच आला होता’ अशी आहे. इथे अगोदरच काय घडले आहे ते एका वाक्यातून वाचकाला कळते.  

’देवगडच्या दुसर्‍या अंगाला माणसाचा हात न फिरलेला समुद्र अस्ताव्यस्त पसरलेला आहे’ ही कमल देसाईंच्या ’प्लॅस्टिकचे विश्व’ या कथेची सुरुवात वाचकाला थेट त्या निर्मनुष्य किनार्‍यापाशी घेऊन जाते. 

जी. एंच्या ’राधी’ या कथेची सुरुवात अशी आहे ’महादेव गल्ली ही वीतभर रुंद. घरे अमोरासमोर इतकी जवळ होती की...’ वाचकाला ती गल्ली ’दिसते’. अशी सुरुवात वाचकाला त्या पात्रापाशी , त्या जागेपाशी घेऊन जाते मग तो कथेत गुंतत जातो.

पुढे लेखकाच्या कुवत आणि शैलीनुसार कथा वेगवेगळ्य़ा पद्धतीने पुढे सरकत जाते. तिचा गाभा, आशय वाचकाला भिडतो का, हे सर्वात महत्वाचे. 

३) कथेचे साधारणपणे चार घटक असतात अ) कथाबीज - कथेचा आत्मा . जे लेखकाला सांगायचंच. एका वाक्यात. ते त्याच्या मनाशी स्पष्ट हवं. उदा: पुलंच्या ’म्हैस’ कथेला मानवी स्वभावाचे नमुने आणि प्रतिक्रियांवर कोणताही आव न आणता भाष्य करायचे आहे. पुलंच्या असामान्य शैलीमुळे ते नमुने लख्ख दिसतात. कथेला असलेली कोकणाची पार्श्वभूमी परप्रांतीयांनाही अनुभवता येते. प्रसंगवर्णनातली खोच, गंमत रुक्ष स्वभावाच्या वाचकालाही हसायला भाग पाडते.

ब) पात्रे - हे कथाबीज ज्यांच्याद्वारे उलगडणार आहे ती पात्र. त्यांचे वर्णन इतके सक्षम हवे की ती डोळ्य़ासमोर त्यांचे सगळे रंग लेवून उभी राहिली पाहिजेत. उदा: मिरासदार ’नव्याण्णवबादची सफर’ या कथेतल्या नाना घोडके या पात्राबद्दल लिहितात ’माणगावात नाना घोडके नावाचा अप्रतिम इसम राहत असे. हा अगदीच बोंबिलभिक्या असून दिसावयासही बेंगरुळ असे. वाळलेल्या चिपाडाच्या अंगात एक सदरा घातला, धितर अडकवले तर ते जसे सुरेख दिसेल, तसा हा दिसत असे. त्याच्या दोन्ही गालाची धीटपणॆ वर आलेली हाडे इतकी ठसठशीत दिसत होती की त्याच्या तोंडामध्ये एक लहानशी काठी या गालापासून त्या गालापर्यंत आडवी करुन घातली आहे, असे वाटावे.’ थोडक्यात ते पात्र वाचकाला स्वच्छ दिसले पाहिजे. शिवाय पात्रांना नावे देताना काळजी घ्यायला हवी. ते ते नाव त्या त्या पात्राच्या व्यक्तिमत्वाला, त्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पार्श्वभूमीला साजेसे असायला हवे. तरचे ते पात्र ’दिसेल’.

क) घटना/ प्रसंग - त्या पात्रांचे वर्तन, स्वभावातील कंगोरे, विचारपद्धती दाखवणार्‍या घटना किंवा प्रसंग वाचकाला त्यात गुंतवून ठॆवायला हव्यात. दि.बा.मोकाशींच्या ’आता आमोदे सुनासि आले’ कथेत एकुलत्या मुलाच्या मृत्युचे दु:ख गिळून शिवाच्या अडलेल्या गायीला सोडवायला जाणारा रामजी, ती पावसाळी रात्र, जीवाच्य आकांताने वेणा देणारी गाय आणि रामजीचे प्रयास वाचकाला एकाच वेळी श्वास रोखून धरायला लावतात, दग्ध करतात, जगण्यामरण्याच्या सीमेवर नेऊन अंतर्मुख करतात. 

ड) संवाद - खर्‍या अर्थाने कथेचा वेग अवलंबून असतो तो संवादांवर. ’भुजंग’ या शंकर पाटील यांच्या कथेचे बलस्थान आहे ते ग्रामीण बोलीतले आर्त आणि सहज संवाद. या संवादांची भाषा पात्रांनुसार अचूक असायला हवी. केवळ आनीपानी लिहिल्याने ती बोलीभाषा होत नाही, किंवा जड शब्द वापरल्याने ती शहरी होत नाही. त्याला प्रादेशिक गंध असायला हवा. ते संवाद कथेच्या ओघात यावेत आणि कथेचा ओघ पुढे घेऊन जाणारे असावेत.

कथा जिथे घडते ते स्थळ, काळ, घटनांमधले अंतर, पात्रांच्या वयातील अंतर यात तर्कदृष्ट्या गोंधळ नसावा. एका नाटकात सिद्धहस्त लेखिकेने ज्या देशात, ज्या काळात नाट्य घडवले तिथल्या चलनाऐवजी चुकीचा उल्लेख केल्याने तिला टीकेला सामोरे जावे लागले. हाच नियम कथेलाही लागू होतो. कथा घडते त्या काळाचा अभ्यास, संदर्भ शोधून त्यावर सर्व बाजूंनी विचार करुन मगच कथा लिहायला हवी. 

कथालेखकाची स्वत:ची अनोखी शैली हा कथेचा यूएसपी/ सर्वात मह्त्वाचे वैशिष्ट्य असते. मतकरींच्या गूढकथेत दोनचार वाक्यातच ते जबरदस्त वातावरण निर्मिती करत. मंगला गोडबोले एखाद्याच मिश्कील, मार्मिक वाक्यातून संस्कार आणि आधुनिकतेच्या कात्रीत सापडलेल्या मध्यमवर्गी पात्रांच्या जगण्यातला गोंधळ अचूक मांडतात. बाबुराव बागुलांच्या ’मरण स्वस्त होत आहे’ मधल्या मोजक्या प्रसंगांमधून मुंबईचं बकालपण थेट अंगावर येतं. ठराविक असा आराखडा अपेक्षित नसला तरी गुंतागुंत-उकल, कलाटणी, स्वभावाचे कंगोरे, निसर्गचित्रण, भौगोलिक संदर्भ, प्रादेशिक रंग, जगण्य़ाचे सूक्ष्म चित्रण, त्यातले नाट्य, एखादी भावस्थिती यातलं आवश्यक ते योग्य जागी आढळलं नाही तर ती कथा अपुरी वाटते. फसते. 'वाचनीयता' हा गुण त्यात असलाच पाहिजे. अजून किती पानं आहेत असं वाचकाला वाटलं तर कथा फसली. कविता महाजन म्हणत ’फुटकळ लिहिण्याच्या धोक्यातून वेळीच सावध करणारे आणि सतत ताळ्यावर आणणारे माजगावकरांच्या सारखे प्रकाशक मला मिळाले’. प्रत्येकाला असा गुरु मिळत नाही तेव्हा लेखक म्हणून आत्मपरिक्षण करणे हाच सर्वात सोपा मार्ग होय.

उत्तम कथेचे असे काही सूत्र नसते. तो दरवेळी एक वेगळा प्रयोग असतो. पण वाचकाच्या काळजात तो प्रयोग रुतायला हवा. सिनेमा फक्त पटकथेतून, संवादातून पुढे जात नाही तर तिथे कॅमेरासुद्धा एका अर्थी बोलत असतो. त्यामुळे कथेकडे पाहण्य़ाची लेखकाची नजर सर्वात महत्वाची. सॉमरसेट मॉम बद्दल वाचनात आलेल्या आख्यायिकेनुसार एका व्याख्यानात तो म्हणाला की कथेमध्ये चार गोष्टी हव्यात. - दर्जा/ खानदानीपणा, अध्यात्म/ ईश्वरी विचार, लैंगिकता/ मानवी भाव आणि रहस्य. तेव्हा एक मुलगी उठून म्हणाली की हे चारही पैलू तिच्या कथेत आहेत. सगळ्यांना उत्सुकता वाटल्यामुळे तिने ती कथा वाचून दाखवली. ती अशी - 

एकदा एक राजकन्या (खानदानीपणा) देवाला म्हणाली, " देवा, (अध्यात्म) मी गरोदर आहे" (लैंगिकता) पण मला होणार्‍या बाळाच्या वडिलांचं नाव माहीत नाही (रहस्य) आता ही कथा आहे का! त्यामुळे उत्तम कथेचे घटक वगैरे शब्दांकडे केवळ वाचकांपर्यंत कथा प्रभावीपणे पोचवण्याचे माध्यम म्हणून पाहायला हवे. ते काही गणिती सूत्र नव्हे. 

कथेबरोबर त्या वेळचा समाज, समाजजीवन हे नाटकातल्या नेपथ्यासारखे सोबत आले पाहिजे. निव्वळ रंजकतेपलिकडे वाचकाला त्या कथेतून काही मिळाले,  ती कथा पंचेंद्रियांनी अनुभवता आली तरच कथा यशस्वी झाली. 


Tuesday, May 20, 2025

इकिगाई

 

हेक्टर गार्सिया, फ्रान्सिस मिरेलस

निरोगी, आनंदी आणि कार्यक्षम दीर्घायुष्याचं जपानी रहस्य

जपानी लोक असं मानतात की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच. या पुस्तकासाठी इकिगाई या संकल्पनेची माहिती गोळा करत असताना लेखकाने शतायुषी लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य जाणलं. ते त्यांनी या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. या पुस्तकामुळे आपल्यालाही आपला इकिगाई सापडायला नक्कीच मदत होईल.

* शारीरिक स्वास्थ्यासाठी ८० टक्क्यांचं रहस्य.

* उत्साही शरीर, उत्साही मन.

* तणावाचा फायदा घेण्याची कला.

* स्टीव्ह जॉब्ज यांचे जपानी संस्कृतीवरील प्रेम.

* लोगोथेरेपी आणि मोरिता थेरेपी.

* तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा संगम.

--------------

रोज सकाळी उठल्यावर तुम्ही स्वत:ला  ’आला बॉ अजून एक दिवस अंगावर’ असं म्हणता की ’अहा, सुरु झाला एक नवा कोरा दिवस’ असं म्हणता. तुमचं उत्तर दुसरं असेल तर तुम्हाला तुमची इकिगाई बहुतेक गवसली आहे. ती अधिक अचूक उमजावी म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचायला हवं, तुमचं उत्तर जर पहिलं असेल तर मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. 

जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिएँ, असं आपण म्हणतो. बहुसंख्य जपानी लोकांची जिंदगी मात्र लंबी आणि बडी दोन्ही असते, जपानमध्ये समाधानी, कार्यक्षम आणि दीर्घायुषी लोकांचे प्रमाण जगाच्या तुलनेने जास्त आढळून येते. ओकिनावा भागात शतायुषी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. यामागे इकिगाई म्हणजेच जगण्याची सकारात्मक प्रेरणा आहे हे लक्षात आल्यावर लेखकद्वयीने अनेक शतायुषी जपानी लोकांच्या मुलाखती घेतल्या, चर्चा केली आणि त्यातून हे पुस्तक साकार झालं. यातली इकिगाईची जादू अनेकांना भावली आणि पुस्तकाचा जगभरात अनेक भाषातून अनुवाद होत गेला.

माणसाची सगळी धडपड अमरत्वाकडे पोचण्य़ासाठी असते. ययातिची प्रातिनिधीक कथा आपल्याला माहित आहे. तंत्रज्ञान आणि वैद्यकशास्त्र वेगाने अत्याधुनिक होत चालले आहे त्यामुळे आपली जिंदगी गेल्या पिढीच्या तुलनेने ’लंबी’ होत चालली आहे. रे कर्झवेल या संशोधकाच्या मते काही दशकात आपण खरोखरच हवे तितके जगू शकू पण बहुसंख्य जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कितीही प्रगती केली तरी आपल्या नव्या पेशी तयार होण्याची प्रक्रिया १२० वर्षांनी थांबतेच त्यामुळे त्यापुढे जगणे शक्य नाही. 

मन, मेंदू आणि शरीर 

जपानबरोबरच जगात काही बेटांवरदेखील सुखी दीर्घायू माणसं आढळतात. संशोधनाअंती असा निष्कर्ष निघतो की यांच्या जिवलग मित्र-मैत्रिणींचा घट्ट ग्रुप, उत्तम कौटुंबिक नातेसंबंध ,आहारात भाज्यांचं पुरेसं प्रमाण पुरेसं, भरपूर चालणं, तणावमुक्त जीवनशैली.

शरीर- 

प्रत्येक वेळी ८०% पोट भरेल इतकाच आहार घ्या. पोटभर जेवणे, आग्रह करकरुन वाढणे हे आपल्या भारतीय संस्कृतीत फार महत्वाचे मानले जात असले तरी शरीराला हानीकारक आहे. स्क्रीनटाईम शक्य तितका कमी करा, भरपूर चाला. लवकर निजा लवकर उठा. पुरेशी झोप घ्या. आपली दिनचर्या तपासा. शरीर उत्साही असेल तरच आपलं मन टवटवीत राहील. 

मेंदू- 

मन:शांती ही शरीरस्वास्थ्याइतकीच मेंदूच्या कार्यक्षमतेवर अवलंबून आहे. चाकोरीत फिरणार्‍या मेंदूवर गंज चढतो आणि त्या व्यक्तीला हळूहळू जगण्याचा कंटाळा येऊ लागतो. मेंदू कार्यक्षम राखण्यासाठी नवीन विषयांचे वाचन, प्रशिक्षण, त्यावर चर्चा, बौद्धिक खेळ, नवनव्या लोकांना भेटणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे इ. आवश्यक आहे. मेंदूची कवाडे जगाकडे उघडणे गरजेचे आहे. त्याने जगण्यात चैतन्य येते, उत्साह येतो. 

मन- 

मोई म्हणजे जिवलगांचा कंपू. समान आवडीच्या, एकाच ध्येयासाठी काम करणार्‍या गटासह आपले जवळचे नाते आपल्याला जीवनाशीही नकळत बांधून ठेवते. मोई हा काहीसा आपल्या बीसीसारखा प्रकार आहे. मोईतले सदस्य दर भेटीत ठराविक पैसे जमा करतात आणि गरजेनुसार ते परतफेडीच्या अपेक्षेसह एखाद्या सहकार्‍याला देतात. यातून त्याला आर्थिक आणि मानसिक दिलासा मिळतो.

आपल्या मनावर वेगवेगळे ताण असतात. हे ताण नीट हाताळू न शकणारे लोक अकाली प्रौढ दिसू लागतात. त्यातले काही ताण जगताना भेडसावणार्‍या गंभीर समस्या, अभाव, अडचणी, क्लेशदायक घटना, असुरक्षिततेची भावना, नात्यातला दुरावा, वियोग, पराजय इ. मुळे उद्भवतात. तर काही ताण आपल्यातले चिंतातूर जंतू स्वत:च निर्माण करतात. उदा: सोशल मिडियावर कमी लाईक्स आले म्हणून खंतावणे, इतरांशी सतत स्पर्धा करणे इ. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते ’माईंडफुलनेस’ हा यावर उपाय आहे. प्रत्येक क्षणाचा समरसून आनंद घेण्याची क्षमता आपण जितकी वाढवू शकू तितकी आपण तणावावर आधिकाधिक मात करु शकू. हातून गेलेल्या गतकालाबद्दल हळहळ आणि हातात नसलेल्या भविष्याबद्दल हुरहूर वाटत राहिल्याने आजचा, आत्ताचा क्षण निसटून तर जात नाहीये ना याबाबत आपण सजग राहिलो ताण निश्चित कमी होईल. अर्थात हे प्रयत्नपूर्वक साध्य करावे लागेल पण याची परिणीती एका निरामय आणि दीर्घायू जीवनात होईल हे नक्की. 

लोगोथेरपी ते इकिगाई

सिग्मंड फ्रॉइड एकदा म्हणाले होते ,"भिन्न स्वभावाच्या/विचारांच्या काही माणसांना उपोषणाला बसवा. भुकेच्या तीव्रतेबरोबर आतला खरा माणूस बाहेर पडू लागेल. सगळी प्रचंड भुकेली माणसं शेवटी एकाच पातळीवर येतील.’ परंतु हिटलरच्या क्रूर छळछावणीतील वेगवेगळ्या अनुभवांमुळे माणसाची एखाद्या घटनेला प्रतिसाद देण्याची पद्धत त्याच्या आत्मबलावर अवलंबून असते हे व्हिक्टर फ्रँकलने स्वत: अनुभवले, पाहिले होते त्यामुळे त्यांना हे पटले नाही. आत्मबल वाढवणारी लोगोथेरेपी त्यांनी विकसित केली. लोगो म्हणजे ग्रीकमध्ये अर्थ. लोगोथेरपी म्हणजे जीवनाचे उद्दिष्ट्य, जीवनाचा अर्थ शोधणे. या थेरपीचे तीन टप्पे सांगितले जातात. 

पहिला टप्पा- कोणत्याही परिस्थितीत कार्यमग्न राहून अर्थपूर्ण काम करत राहणे. 

दुसरा टप्पा- यशाचे परिमाण आपले आपण ठरवणे. 

तिसरा टप्पा- परिस्थिती आपल्या हातात नसली तरी तिला कसा प्रतिसाद द्यायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असते हे समजून घेणे. 

इकिगाई हे लोगोथेरपीच्या मार्गावरचे अंतिम ध्येय आहे. इकिगाई मन आणि मेंदूबरोबरच शरीरस्वास्थ्याचाही विचार करते. 

सापेक्षतावाद आपल्याला माहित आहे. तापलेल्या वस्तूला एक मिनिट स्पर्श करा. ते मिनिट युगांचं वाटेल. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एक तास घालवला तर तो तास एका मिनीटातच संपल्यासारखा वाटेल. आपण कशात जास्त रमतो? आपण वेळेकडे कसे पाहतो, त्या त्या वेळेत कोणते काम निवडतो, ते किती कौशल्यपूर्ण त-हेने करतो, किती लक्षपूर्वक करतो, त्यात कसा आनंद मिळवतो याचा शोध घेतला तर आपल्याला आपली इकिगाई सापडणे सोपे होईल. एकदा एखादे कौशल्य आत्मसात झाले तर पुढचे ध्येय निश्चित करुन आपल्या ठराविक साच्यापलिकडचे एखादे कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करावा. एकाच वेळी अनेक कामे करणे हे खरे तर कसब नव्हे. मुळात आपण एकावेळी अनेक कामे केल्याने आपली कार्यक्षमता उलट कमी होते. एका वेळी एकाच कामावर लक्ष केंदित करुन मन विचलित होऊ न देता ते पूर्ण केले तर अधिक चांगले परिणाम दिसून येतात. आपण इकिगाईच्या अधिक जवळ पोचतो.


Wednesday, April 16, 2025

सायबर विश्व आणि सामान्य माणूस

 ३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी आणि एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी, घराला साहित्यिक नाव देणारी मध्यमवर्गी पिढी संपली. नंतर आली नव्वदच्या दशकातल्या जागतिकिकरणामुळे झालेल्या उलथापालथींनी काहीशी गडबडून गेलेली, मुलगा परदेशी, त्यातूनही अमेरिकेला जावा अशी स्वप्न बघणारी, ब्लॉकमध्ये राहणारी ’हॉटशॉट’ पिढी. आणि मग आली आजची तथाकथित ग्लोबल, डिजिटल पण फोमोने (फिअर ऑफ मिसिंग आऊट) ग्रासलेली ’सायबर’ पिढी. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये तिरकं उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून म्हणजे सेल्फीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा सामान्य माणसाच्या पिढ्यांचा हा प्रवास फक्त फोटोंपुरता मर्यादित नाही. पूर्वी रात्र आणि दिवस हेच काळाचे मुख्य भाग होते. आता स्वेच्छेने या तंत्रज्ञानापासून अंतर राखून राहणारे, समूह माध्यमांना (सोशल मिडिया) आपल्या आयुष्यात लुडबूड करु न देणारे काही अपवाद वगळले तर आजच्या पिढीचं जगणं ’ऑनलाईन’ आणि ’ऑफलाईन’ या दोन पटात विभागलं गेलं आहे. 

अर्थशास्त्राच्या पिरॅमिड रचनेत श्रीमंत अग्रभागी, सामान्य माणूस मध्यभागी आणि दारिद्यरेषेखालचा वर्ग तळाला असे धरले तर हा मधला भाग देशाची प्रत ठरवतो असं म्हणता येईल. देशाची गुणवत्ता तिथल्या सामान्य माणसाच्या वर्तनावरुन ठरते. उच्चभ्रू समाज हा विश्वसंस्कृतीचे प्रतिनिधीत्व करत असतो तर तळागाळातला समाज हा मुलभूत प्रश्नांशी झगडताना मूल्य, संस्कृती वगैरे जीवनाचे चोचले पुरवू शकत नाही म्हणूनही असेल कदाचित. आज सामान्य माणसाच्या जीवनशैलीचे ढोबळमानाने ’सायबररहित’ जीवनशैली आणि ’सायबरसहित’ जीवनशैली हे दोनच प्रकार उरले आहेत असे वाटू लागले आहे. या मधल्या भागातही खरं तर त्रिस्तरीय रचना आहे. तंत्रज्ञान आणि जगणं याची गल्लत न करणारी ’सायबररहित’ जीवनशैलीचं प्रतिनिधीत्व करणारी अपवादात्मक मंडळी पहिल्या स्तरात आहे. तंत्रस्नेही असलेले, नवनवी तांत्रिक उपकरणं वेगाने हाताळू शकणारे, ’ऑनलाईन’ विश्वात लीलया वावरणारे यात दुसर्‍या स्तरावर आहेत. ही दोन्ही प्रकारची मंडळी देशाच्या महाकाय लोकसंख्येच्या तुलनेत अगदी मोजकी आहेत. कामापुरतं तंत्रज्ञान हाताळता येणारे, अपुर्‍या माहितीमुळे तांत्रिक उपकरणांबद्दल प्रचंड कुतूहल पण भीती असलेले, ऑनलाईन विश्वाशी जुळवून घेण्याच्या धडपडीत या भीतीचं सावट ऑफलाईन जगताना देखील मनावरुन दूर करु न शकणारे या उतरंडीच्या तळाशी आहेत. बहुसंख्य सामान्य माणसं या मधल्या भागाच्या तिसर्‍या स्तरात आहेत. यात निम्नमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आहेत आणि बर्‍याच प्रमाणात उच्चमध्यमवर्गीय देखील. निमशहरी, शहरी आणि काही प्रमाणात ग्रामीण देखील.

मधल्या भागातल्या या मध्यमवयीन सामान्य माणसाला कसेही करुन वरच्या स्तरावर जायचे आहे. पिरॅमिडच्या टोकाला पोचायचे आहे. तिथली जीवनशैली हे त्याचे स्वप्न आहे. त्यामुळे तिचे अनुकरण करताना त्याला अप्राप्य असलेला किंवा क्वचित होणारा विमान प्रवास फेसबुकवर चेक-इन करायचा असतो. आहे. बार्बेक्यू नेशनमध्ये मित्राने दिलेल्या पार्टीचा ग्रुप सेल्फी इन्स्टावर अपलोड करायचा असतो. हॉटेलचे ऑनलाईन बुकींग करायचे असते. किंडलवरुन पुस्तक चाळायचं असतं. रेल्वे प्रवासातल्या एखाद्या अडचणीबद्दल पटकन संबंधित अधिकार्‍यांना ट्वीट करायचं असतं. जीपीएसच्या मदतीने नव्या जागी अचूक पोचायचं असतं. फूडअ‍ॅप वरुन पिझ्झा मागवायचा असतो. जाहिरातीतून दिसणारे ओट्स, टोफू, ऑलिव्ह ऑईल, ब्रोकोली, किवी असले अभारतीय पदार्थ वापरणं ’इन’ असल्यामुळे ते ऑनलाईन मागवायचे असतात नाहीतर आपण बॅकवर्ड पालक ठरु अशी भीती वाटत असते. याशिवाय विवाहजुळणीच्या अ‍ॅपवरुन जोडीदार शोधायचा असतो. कामाचे अ‍ॅप्लिकेशन्स फॉर्म्स ऑनलाईन भरायचे असतात आणि आपल्याला मिळालेली लेटेस्ट माहिती व्हॉट्सअ‍ॅप वरुन इतरांना सर्वात आधी पाठवायची असते.. हे सगळं करता यावं म्हणून घेतलेला पण दोन वर्षातच आउटडेटेड झालेला मोबाईल बायबॅक करुन नवा मोबाईल, ऑफर संपायच्या, इन्स्टॉलमेंटवर अ‍ॅमेझॉनवरुन विकत घ्यायचा असतो. 

अर्थात यात लिंगभेद उरलेला नाही. २०१३ पर्यंत पुरुषांची मक्तेदारी असलेली ऑनलाईन खरेदी महिलाही करताना दिसू लागल्यात. घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्‍या बहुतेक महिलांकडे आता स्वत:चा स्मार्ट फोन आलेला असतो. येत्या वर्षाअखेरीस ऑनलाईन खरेदी करणार्‍या महिलांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असं इकॉनॉमिक्स टाईम्स सांगत असतो. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश असतो. त्यांनाही पिंटरेस्टवर नव्या पर्सेसची डिझाईन शोधायची असते. यू ट्यूबवर पाहिलेले पाव घरी करुन पाहायचे असतात. मिंत्रावरुन घेतलेल्या टॉपमधला फोटो फेसबुकवर मैत्रिणींना टॅग करुन अपलोड करायचा असतो. मग त्याला आलेले लाईक्स थोड्य़ा थोड्या वेळाने तपासायचे असतात. झालंच तर त्यावरील प्रत्येक कमेंटला थँक्यू म्हणायचे असते. 

दुसर्‍या बाजूला हेच सायबर जग अनेक सामान्यांना असामान्य करत असतं. लिहितं करत असतं. त्यांना जागतिक ओळख मिळवून देतं. त्यांच्या शब्दाला, कृतीला व्हायरल करुन चळवळीचं रुप देतं. त्याच्या प्रतिक्रियांची दखल घेऊन आक्षेपार्ह जाहिराती मागे घ्यायला लावतं. राजकारण घुसळून टाकतं. सामान्य माणसाला तुच्छ लेखणार्‍या भल्याभल्यांना थेट सवाल करतं, उत्तरं द्यायला बांधील करतं. नवी उमेद, यूअर स्टॊरीसारख्या ब्लॉगवर सामान्य माणसाच्या यशोगाथा झळकवतं. स्वतः अपंग असून मन:पूर्वक रुग्णसेवा करणारा एखादा डॉक्टर इथे भेटतो. मुलींच्या नावाच्या पाट्या घराघरात लावून त्यांना मानसन्मान प्राप्त करून देणारे दादाभाऊ भेटतात. मासिक पाळीच्या काळात मुली गैरहजर राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळेत चेंजिंग रूमची व्यवस्था करणारी एखादी शिक्षिका इथे भेटते. स्वतःचं मूल कर्णबधीर असलेले आणि इतर कर्णबधीर मुलांसाठी काम करणारे पतीपत्नी भेटतात. शाळेच्या परिसरातल्या गुटखा विक्रेत्याला विद्यार्थ्यांचं नुकसान करण्यापासून परावृत्त करून भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू करून देणारा एखादा शिक्षक इथे भेटतो. आपले विचार नीट मांडू न शकणार्‍या ग्रामीण तरुणाच्या शेतीच्या नव्या प्रयोगाला इथे शब्दबद्ध केलं जातं. वेगवेगळया ग्रुप्सवर घनघोर चर्चा घडतात. अव्यक्त राहिलेल्या स्त्रियांना स्वत:चा अवकाश इथे मिळतो. त्यांच्यातल्या कलाकाराला प्रतिसाद मिळतो. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्‍या अनेक प्रश्नांची उत्तरं दृक् श्राव्य स्वरुपात यू ट्यूबवर मिळतात. शिक्षणाची नवनवी दालनं खुली होतात. जगभरातली शहरं, संग्रहालयं घरबसल्या पाहता येतात, शासनाचे प्रकल्प सर्वसामान्यांपर्यंत पोचतात. त्याच्या छोटेखानी घरगुती उद्योगाला अर्थकारणाच्या नव्या संधी उपलब्ध होतात. रत्नागिरीतला आंबा थेट न्यूयॉर्कला पोचतो तर चुकतमाकत इंग्रजी बोलणार्‍या राजस्थानी महिलेच्या ऑनलाईन कुकिंग क्लासमध्ये फ्रेंच शेफ प्रवेश घेतात. हेच सायबर जग एखाद्या आपत्तीनंतर अनेक सामान्यांचे मदतीचे हात पीडितांपर्यंत पोचवतं. परदेशी आप्तांना व्हर्च्युअली शून्य भौगोलिक अंतरावर आणून नव्याने त्यांच्याशी नातं जोडून देतं. सामान्य माणसाला आपणही कुणीतरी आहोत अशी मानसिक उभारी देतं.

अर्थात या सायबर विश्वात रुळताना सुरुवातीला त्याची त्रेधा उडते. तो एटीएममधून पैसे काढताना दहादा खात्री करतो, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा त्यासाठी हाफ डे टाकून रांगेत जाऊन उभा राहतो. पण कधी गरज, कधी क्रेझ म्हणून वापरता वापरता सामान्य माणसाला हळूहळू बर्‍याच गोष्टी करता येऊ लागतात. आजवर त्याच्यासाठी स्वप्नवत असलेलं ऑनलाईन जग त्याच्या बोटाच्या इशार्‍यावर उपलब्ध झालेलं असतानाच कोविडचा प्रादुर्भाव त्याच्या जगण्यालाच नव्हे तर अवघ्या जगाला ग्रासून टाकतो आणि आजवर गमतीचं वाटणारं ऑनलाईन जग त्याच्या ऑफलाईन जगात रोरावत शिरतं. घरात अडकलेल्या सर्वांना सतत ऑनलाईन राहणं हाच बाहेरच्या जगाशी स्वत:ला जोडण्याचा मार्ग उरतो. पर्याय म्हणून याआधी उपलब्ध असलेलं ऑनलाईन शिक्षण आता अपरिहार्य होतं. त्याला पगार कपातीच्या अडचणीतच लॅपटॉपच्या खरेदीला प्राधान्य द्यावं लागतं. कामाशिवाय उरलेल्या वेळेत हाती घेतलेल्या पुस्तकात त्याचं मन रमत नाही. तो सतत मोबाईलमध्ये डोकावतो आणि तेच करणार्‍या आपल्या मुलाला स्क्रीन टाईम वाढल्याबद्दल रागावतो. ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही जगांची सीमारेषा पुसट व्हायला लागते. सकाळी तो दूरदर्शनवर रामायण बघतो आणि रात्री फुकट प्लॅन संपायच्या आत नेटफ्लिक्ससारख्या ओटीटीवरच्या वेब सिरिजचे एकामागून एक सीझन्स. त्यातलं शिवीगाळ, हिंसाचार आणि उत्तेजक दृश्यांनी भरलेलं कथानक त्याला परकं वाटत राहतं पण वरच्या स्तरात जायचं असेल तर हे सगळं पाहाणं क्रमप्राप्त असतं. 

‘मागणी तसाच पुरवठा’ आम्ही करतोय असे म्हणून कलाकार त्यांच्या व्यावसायिक हतबलतेचे आणि माध्यमं त्यांच्या सर्जनशीलतेच्या मर्यादांचे खापर सरसकट प्रेक्षकांच्या माथी फोडत राहतात. विषमता असलेल्या या देशातील सामान्य जनतेला कोणते आणि कसे संदेश द्यायचे हा मोठा बिकट प्रश्न नक्कीच असला तरी सवंग करमणुकीखेरीज पर्याय नसावा असं कोणतंही सांस्कृतिक दारिद्र्य भारतात नसतं. पण बहुतेक माध्यमसम्राटांसाठी भारतीय सामान्य माणूस हा माणूस नसून फक्त आणि फक्त ग्राहक असतो. कोणत्याही धर्मगुरू किंवा राजाने उपभोगली नसेल एवढी सत्ता माध्यमसम्राटांच्या हातात असते. मनोरंजनाच्या बाजारात नैतिकतेचा विचार करण्याइतकी उसंत त्यांना नसते.

माहितीच्या आणि मनोरंजनाच्या महापुरामुळे कोविड आधीच लागण झालेला फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट) नामक आजार सामान्य माणसाला ग्रासू लागतो. घरात अडकलो असू वा कामापुरतं बाहेर जात असू ,जगाबरोबर ऑनलाईन धावायच्या स्पर्धेत त्याला मागे पडायचं नसतं. सगळं काही आपल्याला सर्वात आधी कळलं पाहिजे याने तो पछाडून जातो. ते आपल्याला सर्वात आधी कळलं आहे हे इतरांना कळल्यावर ऑनलाईन जगातला रुबाब वाढत असल्याने त्याला ते घाईने फॉरवर्ड करायचं असतं. शिवाय लिहिता येणारा किंवा गुगल करुन कॉपी पेस्ट करणारा प्रत्येक जण स्वत:ला लेखक समजू लागतो. त्याला लाईक्स मोजण्याचा नार्सिसिस्ट नाद लागतो. चांगली पदवीधर व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ अतर्क्य मेसेज धडाक्यात पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवते. घंटानादाचा गर्भित अर्थ दुर्लक्षित करुन त्याने निर्माण झालेल्या कंपनांच्या तीव्रतेमुळे कोरोनाचे विषाणू मरुन जाणार असल्याचा भाबडा आनंद तो बुद्धी गहाण टाकून अभिमानाने शेअर करतो. एकच मेसेज स्वामी विवेकानंदांपासून, आईनस्टाईन ते विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावानिशी तर कधी निनावी पुढे पाठवताना आता तो बिचकत नसतो. टिकटॉकवर बंदी घालणं अयोग्य आहे म्हणणार्‍या कुणा एका आभासी व्यक्तीशी तो आपल्या हातातल्या चिनी बनावटीच्या मोबाईलवरुन तावातावाने वाद घालतो. दिवसातले जवळपास सहा तास त्याची मुलं समाज माध्यमं वापरत असतात. तो स्वत: किमान चार तास आणि सामान्य ज्येष्ठ नागरिकही प्रचंड फावला वेळ हाताशी असल्याने जुजबी मोबदल्यात मिळणारी अमर्याद करमणूक स्क्रोल करण्यात साधारण २ ते ३ तास सहज घालवतात असं या क्षेत्रातले अभ्यासक सांगतात. मात्र माहितीच्या ढिगार्‍यात गुदमरुन अनेकदा तो आतून अस्वस्थ होतो. ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच.

कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की तो सगळ्यात आधी त्यांचं सोशल मिडीया प्रोफाईल बघतो. पती, पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स त्याला ’ओळखून’ असतात. त्याच्यासारख्या भाबड्या मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होत जाते. व्यापारी कंपन्याही हेच करत असतात. त्याने नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून त्याच्याशी निगडीत उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार त्याच्यावर होऊ लागतो. ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ समाज माध्यमांवरही लागू होते आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. काल पहिल्यांदाच ज्याच्याशी व्हॉट्स अ‍ॅपवर चॅट केले ती व्यक्ती दुसर्‍या दिवशी फेसबुकच्या ’पीपल यू मे नो’ मध्ये लगेच दिसणं याला तो योगायोग समजतो. 

सुरुवातीला त्याला वाटत असतं की आपल्या वैयक्तिक माहिती मध्ये /डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाही, आपल्या दोनचार एफडी, इवलीशी पुंजी. मग घाबरायचं कशाला! त्यामुळे बहुतेक वेळा आपला डाटा वापरण्य़ाची परवानगी ’आय अ‍ॅग्री’ असे क्लिक करुन तो स्वत:च देत असतो. संख्येने सर्वाधिक असलेल्या सामान्य माणसाची वैयक्तिक 'माहिती' हा सायबर व्यवसायाचा कच्चा माल  तो स्वत:च पुरवत असतो. समाज माध्यमं आणि त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करताना तो हे विसरतो की ’फुकट’ या लेबलखाली आलेली सुविधा त्याचा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर करत असते. 

मग एके दिवशी, संगणकातले बहुतेक सॉफ्टवेअर फुकट वापरताना त्याला बरं वाटत असलं तरी पैसे उकळण्यासाठी रॅन्समवेअरचा वापर करणारे सायबर गुन्हेगार त्याच्या किंवा त्याच्या कंपनीच्या संगणकापर्यंत त्या मार्फत पोचतात. कधी त्याला त्याच्या बँकेकडून खाते अपडेट करायचे असल्याने माहिती विचारणार्‍या मेल येतात. बँकेकडून अशी माहिती ऑनलाईन विचारली जात नसते हे विसरुन ,शहानिशा न करता तो माहिती पाठवतो. त्याच्या खात्यातून कष्टाने साठवलेले काही हजार रुपये काढले गेल्याचा एसएमएस पाहून तो हबकतो. त्याच्या बायकोने कधीतरी नकारात्मक मेनोपॉजल मूडमध्ये अनोळखी व्यक्तीशी फेसबुक मेसेंजरमध्ये अभावितपणे केलेल्या भावनिक चॅटचा फायदा घेऊन कुणीतरी तिला मानसिक त्रास देऊ लागतं. ती सैरभैर होते. विद्या वॉक्सचं नवं गाणं, सुपरहिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेली त्याची मुलगी फ्रेंडलिस्ट मोठी दिसावी म्हणून, चाहत्यांना नाराज कसं करायचं म्हणून इन्स्टा वर अनोळखी मित्रविनंत्या स्वीकारते. त्यातल्याच कुणीतरी तिचं फेक प्रोफाईल करुन त्यावर वाटेल तसे फोटो आणि मजकूर टाकलेला पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा भाऊ सायबर कॅफेत फॉर्म भरुन झाल्यावर लॉगआऊट न करताच घाईने निघतो. दुसर्‍या दिवशी त्याला त्याच्या इनबॉक्समध्ये त्याने इतक्यात कधीतरी क्लिक केलेल्या पॉर्नसाईटचे डिटेल्स जगजाहीर करु अन्यथा अमुक पैसे या खात्यात पाठवा, असा धमकीचा मेल आलेला दिसतो. 

’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईच्या हाय सोसायटीत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचंय,’ असं म्हणत आजवर ज्या सामान्य माणसाने सायबर जगाकडे कधी गांभीर्याने पाहिलेलं नसतं तो अशा एखाद्या घटनेने खडबडून जागा होतो. आजवर त्याच्यासाठी सायबर गुन्हेगारी म्हणजे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमातल्या कथा. बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग. त्या अजब दुनियेशी त्याचा फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. पण आता सायबर विश्व एखाद्या चक्रीवादळासारखं त्याचं जगणं स्वत:सोबत वेगाने फरफटत घेऊन जात असतं. सायबर गुन्हेगारी त्याच्या चिमुकल्या घराचा उंबरठा ओलांडून आत आलेली असते.

जसं फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, ब्रेकचा नीट वापर, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं तसंच सायबर विश्वात वावरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. असतो. मग सामान्य माणसाच्या हातात काय असतं! ग्राहक म्हणून जागं राहणं. विवेकाचा वापर करणं. आयुष्यात खुट्ट झालं तरी ते समाजमाध्यमावर ओरडून सांगण्याचा मोह आवरणं, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता न बाळगणं. सुरक्षेचे बेसिक सेटिंग वापरणं. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी समजून उमजून समाज माध्यमाचा वापर करणं. असुरक्षित लिंक्सवर क्लिक नं करणं. https न वापरणार्‍या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार टाळणं. अनावश्यक आणि क दर्जाचे अ‍ॅप्स इन्स्टॉल न करणं. दरवेळी फीडबॅक आणि रेटिंग बघणं. आभासी आणि वास्तव जगातली सीमारेषा पुन्हा एकदा ठळक करणं. त्यासाठी नुसतं डिजिटली साक्षर न होता डीजिटल व्यवहारज्ञान मिळवणं. 

सॉक्रेटिसने कोणत्याही संवादापूर्वी स्वत:ला तीन प्रश्न विचारायला सांगितले आहेत. सायबर विश्वात कोणतीही भर घालताना किंवा काही फॉरवर्ड करताना त्याने त्यात थोडे बदल करुन हे प्रश्न स्वत:ला विचारावे. ही माहिती खरी आहे का? या माहितीमुळे कुणाचे अकारण नुकसान तर होणार नाही ना? ही माहिती पाठवणं खरंच इतकं आवश्यक आहे का? यापैकी एक उत्तर जरी नकारार्थी आलं तर ’एंटर’ बटण दाबायचा मोह त्याने आवरणं. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife या टॅगसारखं आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य आनंदाने जगायला शिकणं. 

सायबर तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. सामान्य माणसाने इतकी उर्जा, वेळ आणि मानवी तास त्यात अनुत्पादकपणे वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करतं तोवर ते नक्कीच उपयोगी आहे पण ते त्याच्या विळख्यात खेचून त्याला त्याचा गुलाम करत असेल तर! त्याच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असेल तर! तर त्याने हे थांबवायला हवं. त्याच्या गरजा काय आहेत हे त्याने ठरवावं. संयमाचं महत्त्व त्याची संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायचं हे त्याला ठरवता आलं पाहिजे. ’यंत्रात’ परिवर्तीत होऊ घातलेल्या या माणसाला त्याच्या आतल्या समुद्राची गाज ऐकता यावी. त्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित व्हायला हवी. अन्यथा भारतीय समाजाचं शरीर आधुनिक साधनांच्या साहाय्याने जगत राहील पण त्याचा आत्मा हरवलेला असेल. ’आपली मूल्य बदलत चालली आहेत का, आपल्या वैयक्तिक आयुष्यातले ताण त्यामुळे वाढत आहेत का, आपलं सहजीवन त्यामुळे अस्थिर होतं आहे का, ’जीपीएस’च्या कक्षेबाहेरही एक विशाल जग आहे हे आपण विसरलो आहोत का, आपल्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, वास्तवातली आपली माणसं, आपले छंद, आपलं काम की आभासी जग!’ हा विचार त्याला करता आला पाहिजे. ऑनलाईन, ऑफलाईन जगात स्विच ऑन ,स्विच ऑफ करता आलं पाहिजे. कसं! तर ’रस्त्यावरून मिरवणूक जरी गेली ना, तरी उघडू नये दार. पण सामीलच व्हावे वाटले मिरवणुकीत तर जमावाच्या हाकेची वाटही पाहू नये’, असं ‘चर्चबेल’मधील एका लेखात ग्रेस म्हणतात तसं.

या दोन्ही जगांना जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत त्याने सायबर तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे त्याने लवकर करायला हवं, नव्हे आत्ताच.


Saturday, March 15, 2025

सावध ऐका पुढल्या हाका

’ऑनलाईन’ शिकणार्‍या शाळकरी मुलांना सुद्धा सायबर सुरक्षेचे बेसिक नियम एव्हाना माहित झाले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या जनहितार्थ केलेल्या जाहिरातीतून अमिताभ बच्चन ते नियम आपल्याला कळकळीने सांगत असतात. १) आपले पासवर्ड परक्या व्यक्तीला कधीही कळू देऊ नका २) इंटरनेटवर जर आर्थिक व्यवहार करीत असाल तर आपला ओटीपी म्हणजे वन टाईम पासवर्ड कुणाला सांगू नका आणि ३) आपली वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर कुणालाही देऊ नका. खरे तर आपल्याला हे इतके पक्के पाठ झाले आहे मग तरीही सायबर गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का घडत असावेत! विशेषत: कोविड काळात आपल्या भारतात सायबर गुन्हेगारीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची दोन कारणे आहेत. आपली फसवणूक होत असल्याचा क्षण अगदी व्यवहारचतुर लोकांना देखील सहजपणे ओळखता येत नाही. नजर हटी दुर्घटना घटी. दुसरे कारण आहे सायबर जगाच्या अंडरवर्ल्डबद्दल, अंधार्‍या कोपर्‍यांबद्दल, नव्या धोक्यांबद्दल जनतेची अनभिज्ञता. (लेखाच्या शेवटच्या भागात आपण याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया)

सायबर गुन्हेगारांना आपली माहिती मिळते कुठून ?

जॉर्ज ऑरवेल या प्रसिद्ध लेखकाने ’१९८४’ या पुस्तकातून साम्यवादी सत्तेच्या विळख्यात स्वातंत्र्य आणि समतेची भाबडी स्वप्ने पाहणार्‍या जनतेला ‘बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ ही जाणीव करुन दिली होती. आज ’बिग ब्रदर’ची जागा गुगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुकसारख्या बलाढ्य अशा सायबर कंपन्यांनी घेतली आहे. आपण कुठे राहतो, काय करतो, आपल्या कुटुंबात कोण कोण आहेत, आपण काय खातो, काय पितो, कुठे जातो, कोणत्या वस्तू वापरतो, आपल्या आवडीनिवडी काय आहेत, आपण कोणाशी बोलतो, इतकेच नव्हे तर काय बोलतो, इंटरनेटवर काय सर्च करतो हे सगळे या बिग ब्रदर्सना माहित असते. अगदी नवराबायको किंवा घरातली माणसे जितकी एकमेकांना ओळखत नसतील तितक्या या सायबर कंपन्या आपल्याला ’ओळखून’ असतात असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. आपण इंटरनेटरवर जेव्हा ’फ्री’ म्हणून काही वापरत असतो तेव्हा आपण त्याचा असा मोबदला नकळत देत असतो. कोणतेही मोफत अ‍ॅप इन्स्टॉल करतेवेळी आपण ’आय अ‍ॅग्री’ यावर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्या अ‍ॅपला आपले फोनबुक, गॅलरी, मोबाईलमधल्या फाईल्स वापरण्याची स्वत:च परवानगी देत असतो. बहुतेक जणांना सोशल मीडियावर व्यक्त व्हायला आवडते, सोशल मीडियाचा उद्देशच तो आहे. पण याचा अतिरेक होऊन आपल्या आयुष्यात खुट्ट जरी वाजले तरी त्यांना ते जगाला ओरडून सांगायचे असते. त्यामुळे ’हॅविंग पिझ्झा विथ अमुकतमुक’ किंवा ’ट्रॅव्हलिंग टू बंगलोर’ अशी पोस्ट टाकून सतत आपले अपडेट जगाला देण्याच्या सवयीतूनही ही माहिती सायबर जगात पोहचत असते. म्हणजे एका अर्थी या नव्या बिग ब्रदरच्या नजरकैदेत आपण स्वखुशीने उडी मारत असतो. 

ही सर्व माहिती म्हणजेच ज्याला डेटा असे म्हटले जाते, त्यात दोन गटांना स्वारस्य असते. एक म्हणजे मार्केटिंग कंपन्या, त्यांच्यासाठी आपण केवळ ग्राहक असतो आणि फक्त नफा कमावणे हा त्यांचा उद्देश असतो. दुसरा गट आहे, तो सायबर गुन्हेगारांचा, त्यांना सावज शोधण्यासाठी ह्या माहितीचा  उपयोग होतो. मग ह्यावर उपाय काय? हे सगळे वापरायचेच नाही! अर्थातच नाही.  कधीतरी अपघात होईल म्हणून जसे आपण प्रवास करणे थांबवत नाही. तसेच इंटरनेट वापरणे आपण थांबवायचे नाही. कारण इंटरनेटविना जगणे म्हणजे प्रगतीच्या वाटा स्वत:हून बंद करणे. इंटरनेटचा वापर अधिकाधिक स्मार्ट पद्धतीने करणे आणि सावधगिरी बाळगणे हाच यावर उपाय आहे. 

सायबर गुन्हेगार कोण असतात!

हे अतिशय उच्चशिक्षित असतात, त्यांना हॅकिंगचे उच्च तंत्रज्ञान अवगत असते असे बहुतेकांना वाटते परंतु बरेचदा हे गुन्हेगार जुजबी तांत्रिक ज्ञानाच्या साहाय्याने सावजाला हेरतात आणि लुबाडतात. गुन्हेगारी वृत्ती याच्या मुळाशी असते. झारखंडमधले जमताडा, राजस्थानमधले भरतपूर किंवा दिल्लीजवळचे नोएडा ही सगळी गावे सायबर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध आहेत. भारतात होणार्‍या एकूण सायबर गुन्हेगारीमध्ये 98% सायबर गुन्हे हे भारतीयांनीच केलेले असून 96% सायबर गुन्हे पुरुषांनी केलेले असतात. हे सायबर गुन्हेगार आपल्या अवतीभोवती सुद्धा असू शकतात. समाजविघातक वृत्तीचे लोक, व्यवसायातील स्पर्धक, काढून टाकल्यामुळे राग किंवा डूख धरलेले माजी कर्मचारी, कुतूहल किंवा गंमत म्हणून हॅंकिंग करून पाहणारे विद्यार्थी, प्रेमप्रकरणातून किंवा दुखावले गेल्याने सूड उगवण्यासाठी देखील गुन्हेगारी मनोवृत्तीचे लोक असे गुन्हे करत असतात. मुखवटे धारण करणे आभासी जगात अतिशय सोपे असल्याने गुन्हेगारांचे फावते. 

सायबर गुन्हेगारीचे आर्थिक फसवणुकीपलिकडे कोणते प्रकार असतात!

लव्हबग 2000 किंवा वॉनाक्राय 2017 असे सायबर अ‍ॅटॅकस् (रॅनसम वेअर) जगभर गाजले आहेत. मोठमोठ्या वित्तसंस्था, कॉर्पोरेट्सची गोपनीय माहिती एन्क्रिप्ट करुन/ चोरुन ती डिक्रिप्ट करण्याच्या बदल्यात बिटकॉईनसारख्या डिजिटल चलनात खंडणी वसूल करणे असे या गुन्ह्यांचे स्वरूप असते. हॉलीवूडच्या सिनेमातून आपण याची झलक पाहतो मात्र इथे आपण सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या सायबर धोक्याबद्दल बोलत आहोत. असे गुन्हे मुख्यत: तीन प्रकारचे असतात. १) आर्थिक लुबाडणूक जी हॅकिंग किंवा फिशिंगद्वारे केली जाते. २) मानसिक छळ, जो ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंगद्वारा केला जातो. आणि ३) लैंगिक शोषण, जे फोटो मार्फिंग किंवा वैयक्तिक माहिती चोरून ब्लॅकमेलिंग पद्धतीने केले जाते. अगदी ड्रग रॅकेटमध्ये ओढण्यात त्याचे पर्यावसान होऊ शकते. 

सायबर धोके टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी! 

दुसर्‍याच्या मोबाईल किंवा संगणकावरून सोशल मीडिया किंवा बँक अकाउंट वापरणे टाळायला हवे आणि वापरलेच तर ताबडतोब लॉग आऊट करावे. कुणीही सहज ओळखेल असा पासवर्ड नसावा. साधारणत: बायकांना आपल्या नवर्‍याचे किंवा मुलांची नावे पासवर्ड म्हणून वापरण्याची हौस असते. पुरुष बरेचदा त्यांच्या आवडत्या स्त्रीचे नाव वापरतात. त्यांना ओळखणार्‍या व्यक्ती किंवा हॅकर्स ते गेस करू शकतात आणि तुमचे अकाउंट भलत्याच व्यक्तीच्या ताब्यात जाते. याला हॅकिंग म्हणतात. बहुतेक लोक आपल्या पोस्टचे सेटिंग कायम पब्लिक ठेवतात. गुन्हेगार त्याचा वापर करून प्रोफाईल व इतर फोटो कॉपी करून त्यासारखेच दिसणारे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. याला क्लोनिंग म्हणतात. मूळ अकाउंटवरील मित्रांची नावे पाहून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मग त्यांना ’मी अपघातात सापडलो आहे, मला मदत करा’ यास्वरुपाचे खोटे मेसेज पाठवले जातात. जेव्हा कुणी पैशाची मागणी करत असतो तेव्हा आपले कान टवकारलेच गेले पाहिजेत. अशा वेळी शहानिशा केल्याशिवाय कोणतेही व्यवहार केले जाऊ नयेत.

लैंगिक शोषण करणारे गुन्हेगार फोटो मॉर्फिंगचा वापर करतात. परंतु मुळात त्यांना हे फोटो उपलब्ध कसे होतात? बहुतेक महिला किंवा मुली आपल्या फोटोंचे प्रोफाईल सेटिंग हे पब्लिक राहू देतात. त्यामुळे ते कुणीही डाऊनलोड करू शकतो. त्याचा दुरुपयोग करू शकतो. खात्री न करता स्वीकारलेली फ्रेंड रिक्वेस्ट अनेकदा गुन्ह्याचे मूळ ठरते. 

सुशिक्षित लोक सायबर गुन्ह्यांना कसे बळी पडतात! 

सायबर गुन्हेगार सावजाच्या मानसिक स्थितीचा व्यवस्थित अभ्यास करतात. 11 ते17 वर्षे या वयोगटातल्या मुला-मुलींना इंस्टाग्राम किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर, तरुण मुलींना साधारणत: विवाह नोंदणी स्थळांच्या वेबसाईटवर तर मध्यमवयीन महिला तसेच पुरुषांनासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून फेक मित्र बनून जाळ्यात ओढले जाते. सोशल मिडीयावर महिलांशी संवाद साधताना त्यांच्या संवेदनशीलतेचा, मानसिक अवस्थेचा गैरफायदा घेतला जातो. हार्मोनल त्रासामुळे किंवा आयुष्यातल्या ताणतणावांमुळे कुणी आपल्याशी थोडेसे सहानुभूतीने बोलले किंवा प्रशंसा केली की नकळत त्या मोकळेपणाने बोलू लागतात. विश्‍वास संपादन केल्यावर हे संभाषण पुढे अत्यंत खाजगी स्तरावर नेले जाते. कालांतराने ही माहिती उघड करण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण केले जाते तर कधी परदेशातून भेटवस्तू पाठवल्याचे सांगून ती सोडवून घेण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या खात्यांमध्ये रकमा भरायला सांगितल्या जातात. विवाहविषयक वेबसाईटवर आपण उच्चशिक्षित सुस्थापित एनआरआय आहोत असे भासवून आधी लग्न ठरवणे आणि गोड बोलून पैशाची मागणी करणे असे प्रकार अनेकदा घडतात. पुरुषांनाही महिलांच्या नावाने मित्र विनंती पाठवून लुबाडले गेल्याच्या अनेक घटना घडत असतात. मध्यमवयीन लोक फारसे तंत्रस्नेही नसतात, त्यांना मुलाचा मित्र वगैरे असल्याचे सांगून गोंधळात टाकून घाईने पासवर्ड किंवा ओटीपी विचारला जातो. त्यामुळे सायबर जगात वावरताना आपला मेंदू हा सतत सजग राहिला पाहिेजे.

‘फ्री’ ह्या शब्दाबद्दल असलेले आकर्षण हे आर्थिक फसवणूक होण्यामागचे अत्यंत महत्त्वाचे कारण आहे. फ्री भेटवस्तू घ्यायला कोणत्याही लिंकवर जाणे, फ्री वायफाय वापरणे टाळायला हवे. वेबसाईटवर आर्थिक व्यवहार करताना वेबसाईटच्या नावाआधी https/लॉकची खूण बघायला हवी. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर मेन्यूकार्डवरचे सगळे पदार्थ आपण खात नाही. आवडेल तेवढेच निवडतो. दुर्दैवाने इंटरनेट किंवा सोशल मीडियावरती आपण अशी निवड करत नाही. केवळ क्षणिक आनंदासाठी 80 व्या वर्षी आपण कसे दिसू, किंवा मागच्या जन्मी आपण कोण होतो अशी तथ्यहीन माहिती देणारे अ‍ॅप त्याचे रेटिंग न पाहता इन्स्टॉल करून घेऊन सायबर धोक्याची पातळी आपण स्वत:च वाढवत असतो. अँटिव्हायरस सारख्या सुरक्षेच्या उपायांवर खर्च करायला बरेच जण तयार नसतात, याकडे गांभीर्याने पाहायला हवे. 

डार्क वेब आणि सायबर अंडरवर्ल्ड

हिमनगाचा जेमतेम 1/3 भाग आपल्याला पाण्याच्या वर दिसतो. तसेच आपण वापरतो, वावरतो ते सरफेस वेब हे फक्त 4% आहे. इंटरनेटचा उरलेला 96% भाग म्हणजे डीप वेब. इथपर्यंत सर्च इंजिन पोहोचू शकत नाही. या डीपवेबच्या अगदी तळाशी आहे सायबर जगाचे अंडरवर्ल्ड म्हणजेच डार्क वेब. पूर्वी जगाचे राजकारण किंवा समाजकारण हे तेलाभोवती केंद्रित असायचे. जगात जी काही युद्धे होतात ती बरेचदा ’तेल’ ह्या प्रश्‍नामुळे निर्माण झालेली असतात. आता जगाचे जे काही राजकारण, समाजकारण आहे ते डेटाभोवती गुंफलेले आहे. येत्या काळातील युद्ध ही सायबर वॉर असतील आणि ती या डार्कवेबच्या माध्यमातून होतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

पुढच्या जगाचे जाऊ द्या, सायबर वापरकर्ता म्हणून विचार केला तर आपल्याला विशेष महत्त्वाची न वाटणारी आपली माहिती या वेब अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड किंमतीला विकली जाते. म्हणजे आपले नाव, गाव, पत्ता, आधारकार्ड, पॅननंबर अशी माहिती 10 ते 20 रुपयाला. आपल्या डेबिट/क्रेडिट कार्डचा नंबर आणि नाव सुमारे 200 रुपयांना. कार्डची एक्स्पायरी डेटसारखी माहिती अजून जास्त किमतीला तर पासपोर्टसारखे दस्तावेज तब्बल 10000-15000 रुपये प्रति व्यक्ती विकले जातात. हे दर गरजेनुसार वाढत जातात. इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवरती बर्‍याचदा ओटीपी विचारला जात नाही, अशा ठिकाणी या माहितीचा गैरवापर केला जातो. सावधगिरी म्हणून इंटरनॅशनल कार्डवर स्पेंडिंग मर्यादा कमीत कमी ठेवणे, इंटरनॅशनल व्यवहाराचे सेटिंग एरवी ऑफ ठेवणे एवढे मात्र आपण नक्की करु शकतो.

‘डिपफेक’- सायबर जगातला एक नवा, भयावह धोका 

यूट्युबवर बीबीसाचा ओबामांवरील एक व्हिडिओ आहे. यात ओबामा आपल्याशी संवाद साधताना दिसतात. व्हिडिओत शेवटी सांगण्यात येते की तुम्ही ज्यांचे बोलणे ऐकले त्यांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यांचा आवाज, त्यांचा चेहरा जरी ओबामांसारखा असला तरी ते ’सिंथेटिक’ ओबामा होते. युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या संशोधकांनी विविध व्हिडिओंमधून ओबामांचे चौदा तासांचे फुटेज घेऊन त्याच्यातून ओबामांची उच्चार करण्याची पद्धत, त्यांचे हावभाव, आवाज ह्याचे नमुने घेऊन व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीच्या मदतीने हे सिंथेटिक ओबामा तयार केलेत. थोडक्यात याचिं देही याचिं डोळा पाहिलेला व्हिडिओही खोटा, नकली असू शकतो. वलयांकित प्रसिद्ध व्यक्तींच्या विरोधात या तंत्राचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात वापर होणार असल्याची शक्यता असल्याने संशोधकांनी त्याबाबत सावध करण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली आहे. व्हिडिओतील व्यक्ती खरी की सिंथेटिक हे ओळखण्याचे सध्यातरी केवळ ब्लिंक आय टेक्नॉलॉजी हे एकच तंत्रज्ञान आहे आणि तेही हा फरक अद्याप शंभर टक्के अचूकतेने शोधू शकलेले नाही. फोटो मॉर्फिंगची ही पुढची पायरी आहे. फोटो मॉर्फिंगमध्ये बरेचदा एका व्यक्तीचे अर्धनग्न शरीर आणि दुसर्‍या व्यक्तीचा चेहरा मर्ज केला जातो. या बाबतीत रिव्हर्स इमेज चेकिंगचा वापर करून फोटो बनावट असल्याचे ओळखता येऊ शकते पण डिपफेक मध्ये हे मिक्सिंग अतिशय बेमालूमपणे केले जाते. 

सायबर गुन्हेगारांनी ह्या डिपफेकचा वापर कोविड काळात केल्याची नोंद आहे. काही जवळच्या व्यक्तींचे आवाज आपण अगदी झोपेतही ओळखू शकतो. न्यूयॉर्क टाईम्समधील एका बातमीनुसार सीइओच्या आवाजात कंपनीच्या एका महत्वाच्या अधिकार्‍याला फोन करण्यात आला आणि प्रचंड मोठे आर्थिक व्यवहार करायला सांगण्यात आले. बोलणार्‍या व्यक्तीचा आवाज, शैली अत्यंत परिचयाची असल्याने संशयाला जागा नव्हती, व्यवहार केले गेले आणि नंतर ’तो मी नव्हेच’ हे सीइओ ने स्पष्ट केल्यावर फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. आजवर लांब कुठेतरी घडणारे हे गुन्हे आपण ग्लोबल खेड्याचा भाग असल्याने आपल्याही उंबरठ्याशी येऊन पोचले आहेत. याची नोंद आपण वेळीच घेणे निकडीचे आहे.  

सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधला संघर्ष अनादि काळापासूनचा आहे. सायबर जग त्याला अपवाद नाही. इथले गुन्ह्यांचे प्रकार आणि सावज हेरण्याच्या क्लृप्त्या तंत्रज्ञानाइतक्याच वेगाने वाढत आणि बदलत जाणार आहेत. आपण स्वत:ला सुजाण आणि जबाबदार नागरिक समजत असू तर डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार व्हायला आपले सायबर साक्षर असणे पुरेसे नाही. सायबरधोक्यांबाबत सावध असणे तितकेच महत्वाचे आहे. विवेकी मन, तर्कशुद्ध विचार करणारा चाणाक्ष मेंदू आणि या दोहोंच्या ताब्यात असलेले प्रत्यक्ष क्लिक करणारे मनगट या त्रयीवरच सायबर जगातला आपला निर्धोक आणि आत्मविश्वासपूर्ण वावर अवलंबून आहे.