Friday, May 11, 2018

आंजर्ले

चोविशीपर्यंत माझा कोकणाशी अजिबातच संपर्क किंवा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे कोकणविषयक माझ्या कल्पना अगदी पुस्तकी होत्या. लहानपणी त्या ’श्यामची आई’ पुस्तकात आलेल्या वर्णनावर आधारलेल्या होत्या. त्यात नंतर वाढत्या वयानुसार ’तुंबाडचे खोत’, गारंबीचा बापू', पुलंची ’म्हैस’ कथा आणि ’अंतू बर्वा’ या व्यक्तिचित्राची भर पडली. त्यामुळे कोकणात सगळी इरसाल माणसेच राहतात असे मनात पक्के बसलेले. प्रत्यक्ष पाहिल्यावर कळले की तो फक्त पुलंच्या शैलीचा प्रभाव होता. माणसे ही शेवटी सगळीकडे सारखीच असतात. निसर्गसुंदर परिसर, त्याचे वर्णन याबाबतीत मात्र  मनातले कोकण आणि नंतर प्रत्यक्ष पाहिलेले कोकण.. त्यात अर्थात नवर्‍याचे आजोळ, आंजर्लेही आलेच, यात अजिबात फरक नव्हता. विशेषत: उंचावरून दिसणारा आंजर्ल्याचा इंग्लीश C आकाराचा किनारा केवळ अद्भुत. आजच्या भाषेत, फेसबुकच्या कव्हर फोटोला शोभेल असा.


गावात मात्र आता थोडा फरक जाणवतो. तीन वर्षापूर्वीच्या आंजर्ले भेटीत वाढ्त्य़ा पर्यटनामुळे झालेले बदल प्रकर्षाने जाणवले. पहिल्या भेटीत अनुभवलेली दुपारची नीरव शांतता, इतकी नीरव की वाडीत एखादा नारळ पडला तरी आवाज यावा... आता गाड्यांच्या कचाकच दाबलेल्या ब्रेकच्या आवाजात नाहीशी झालेली होती. त्यातच शनिवार-रविवार जोडून आल्याने पर्यटकांची संख्या अजूनच जास्त असावी.

पहिल्यांदा आंजर्ल्याला आम्ही दोघच गेलो होतो. मामांचं टुमदार घर, लगतचं सुरेख प्रशस्त देवीचं देऊळ, आजूबाजूची गच्च झाडी हे सगळं पाहताना अप्रूप वाटलं. खान्देश आणि विदर्भात इतकी हिरवाई कधीच पाहायला मिळत नाही. कोकणी पदार्थांशी संबंध फक्त मिरगुंड आणि उकडीच्या मोदकांपुरता. त्यामुळे गुरगुट्या भात, त्यावर रवाळ तूप ,मेतकूट, पोह्याचा पापड अशी मामांच्या घरची पहिली कोकणी न्याहारी मला अजून आठवते. मी नवी सून असल्याने मामींवर छाप पाडण्य़ाच्या प्रयत्नात ’द्या, मी फणस चिरते’ म्हणाले खरी, पण ते चिकट खाजरे प्रकरण आपले काम नोहे हे मला लगेच लक्षात आलं. दुसरं काम खोबरे खवणे, तेही इवल्याशा विळीवर बसून सफाईने करणे मला जरा कठीणच वाटले. मामी मात्र हे अगदी सहज करत होत्या. खांदेशी तिखटाची जीभेला सवय, पण फारसे मसाले न वापरलेला त्यांचा कोकणी स्वैपाक अतिशय वेगळा पण रूचकर वाटला. डोंगरावरच्या आमराईतले आंबे, गरे, फणसपोळ्या, खांडवी यांच्या चवीबद्दल तर काय सांगाव!

मामांचं कौलारू घर, पडवीतला झोपाळा, माळा असलेली काहीशी अंधारी खोली, दोन पाख्यांची दारं.. सगळं पाहात मी कुतूहलाने वर चढून माळ्य़ावर डोकावून आले. प्रत्येक घराची स्वत:ची एक कहाणी असते.

आईंच्या तोंडून त्यांच्या आई, दादा, त्यांची आजी यांच्याबद्दल काही ना काही किस्से ऐकलेले.अतिशय कडक, संतापी स्वभावाचे दादा म्हणजे सासूबाईंचे वडील. मुलाबाळात राबून दमून गेलेली आणि घरच्या रामरगाडयात दुर्लक्ष झाल्याने डोळा गमावलेली त्यांची घाबर्‍याघुबर्‍या स्वभावाची आई. दूधदुभतं, पैपाहुणा बघणारी खमक्या स्वभावाची आजी  ही न पाहिलेली माणसे कशी असतील, ती तिथे कितीतरी वर्ष वावरली असतील असे काही काही विचार मनात आले.

सासर्‍यांनी दादांच्या आणि एकूणच जावई भूमिकेतून पाहिलेल्या आंजर्ल्याच्या जुन्या म्हणजे तब्बल ४०-४५ वर्षांपूर्वीच्या कितीतरी धमाल आठवणी सांगितलेल्या. त्या त्यांच्याच शब्दात.
--------------------------------------------------
"कडयावरच्या गणपतीचे दर्शन झाले. मुरडीच्या बनूआत्या पेंडसेंकडे जाऊन झाले की नंतर मात्र पुढे ओसरीत बाकड्य़ावर बसून झोपाळ्य़ावर झोके घेत सुपारी कातरत असलेल्या दादांशी गप्पा मारणॆ हाच एकमेव कार्यक्रम असे. त्यातही अधूनमधून बर्‍यापैकी मनोरंजन होत असे. समोरच्या रस्त्यावरून येणारा जाणारा फक्त ’दादा हो ssss ’ म्हणून आवाज देणार आणि दादा त्याला प्रतिसाद म्हणून ’हो sss ’ असा आवाज देणार ही सहज संपर्काची प्रथा मला फार आवडली.
मधेच काही लोक विशेषत: कोळी, दादांना भविष्य विचारावयास येत असत. त्यावेळची प्रश्नोत्तरे तर फारच गमतीदार असत. दादांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाला अजिबात चॅलेंज न करता त्यांची क्षमा मागून खाली काही मासलेवाईक प्रश्नोत्तरे देत आहे.
प्र. १ चेडवाचे (मुलीचे) लग्नाकरता गेल्या सालपासून प्रयत्न चालू आहेत, कधी हुईल?
उत्तर - या वर्षी पण अजून ग्रह बराबर नाहीत, तरी देवीला नवस बोला आणि मजबूत प्रयत्न करा, पुढल्या वर्षीपर्यंत नक्की होईल.
प्र. २ समुद्रात होडी कधी टाकू ?
उत्तर - (पंचांगात बघून) अजून ४ दिवस थांब, ५ व्या दिवशी टाक ( दादा दापोलीच्या दैनिकातील हवामानाचा अंदाज न चुकता वाचत असत)
प्र. ३  हर्णेला आपलं स्वत:चं घर आहे, ,मालकीची होडी आहे हे समजावून सांगितलं तरी पोरगा ऐकत नाही. नोकरीच करायची म्हणतो. २ दिवस झाले रागावून घरातून निघून गेला, कुठे शोधावा.
उत्तर -  (पंचांगात बघून) उत्तर दिशेला शोध घ्या. (कोकणातला कोळी तरूण रागावून नोकरी शोधायला मुंबई शिवाय कुठे जाणार..)

एकदा यात्रेच्या वेळी आंजर्ल्याला होतो. गाव जेवणाचा मुख्य दिवस होता. मी ओसरीवर बसलो होतो. इतक्यात भाऊसाहेब टिळक छाप पुणेरी पगडी,धोतर, पायात पुणेरी जोडा, हातात काठी अशा थाटात आतून आले व मला बरोबर घेऊन समोरच्या घरात जेथे जेवणावळीचा स्वैपाक सुरू होता तेथे पोचले. तिथे ८-१० जण आपल्या कामात मग्न होते. ’काय सगळे व्यवस्थित सुरू आहे ना?’ असा टिळकछाप आवाजात प्रश्न विचारून २-४ मि. तिथे थांबून आम्ही परत आलो. 
नंतर असे कळले की त्यावेळी तसा प्रश्न करण्य़ाचा मान काळे घराण्यातील पुरूषाला आहे. परंतु या प्रश्नाला उत्तर देण्य़ाचा किंवा प्रश्नकर्त्याकडे किमान पाहण्याचा मान तिथल्या कुणाला नसावा याची गंमत वाटली. यात्रेत असेच काही गमतीदार मान पाहवयास मिळाले. 

एका दिवाळीत दादांच्या एकसष्टीनिमित्त सगळी मुलं, सुना, लेकी, जावई एकत्र जमले होते. पहिल्याच दिवशी अभ्यंग स्नान, फराळ झाल्यानंतर आम्ही पाचही जावई व मेहुणे भाऊसाहेबासह वर्तमान तरी बंदरावर फिरावयास गेलो. तिथे सगळ्य़ांनी किमाम युक्त पान खाल्ले आणि ते भाऊ काळेंना इतके लागले की ते खोकून खोकून बेजार झाले. तशातच किमाम पानाची नशा चढल्याचे सोंग सगळ्य़ांनी करावयाचे ठरले. (चरस हेरॉइनच्या आताच्या जमान्यात किमामची नशा हा टिंगलीचा विषय व्हावा) 
ठरल्याप्रमाणॆ घरी येता येता सर्वांचा नाट्यप्रयोग सुरू झाला. भाऊसाहेबांना पानाचा खरोखर त्रास होतच होता त्यामुळॆ त्यांना अभिनयाची गरज नव्हती. बापू जोशी अतिउत्साहात अतिरंजित अभिनय करत होते. भाऊ ओक कसलेले नाट्यकलावंत त्यामुळे त्यांच्या अभिनयाविषयी बोलायलाच नको. अण्णा रानडे पूर्णपणे फितूर झाले होते. नशाखोरीचे नाटक ही त्यांना पापाची भावना वाटत होती. त्यामुळे ते हळूच त्यांच्या बायकोला खूण करून हे खोटे खोटे चालल्याचे दर्शवत होते. मी आणि पटवर्धन किमामच काय पण तंबाखूचे पान देखील अधूनमधून खात असू. त्यामुळे किमामच्या नशेचा नेमका काय अभिनय करावा अशा गोंधळलेल्या अवस्थेत जसे सुचेल तसे करत होतो. अशा रितीने काळ्यांच्या घरात काही वेळ का होईना पण नुसता गोंधळ उडाला होता. समस्त महिला वर्ग तर भयंकर संतापलेला होता. आपल्या माहेरी जावयांनी सगळी इज्जत घालवली या जाणीवेतून त्या नवर्‍याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होत्या. 
दादाही काही वेळ हा सर्व प्रकार बघून गोंधळले होते पण लवकरच खरे काय ते त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सासूबाईंना आदेश दिला "सगळेजण उन्हातून आले आहेत, छानसे थंडगार लिंबू सरबत द्या सगळ्यांना" आम्हालाही हा ईलाज मनापासून आवडला. पुढील दहा मिनीटात सरबत पोटात जाताच पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही नाटक संपविले.
पण आमच्यापेक्षाही महिलावर्गाचे संतापण्य़ाचे नाटक जास्त चांगले झाले होते असे माझे आजही मत आहे. असो.

असाच स्मरणशक्तीला आणखी ताण दिल्यास अजून काही घटना आठवतीलही. पण सर्व आठवणी सांगायच्या नसतात. काही तर आवर्जून विसरायच्याच असतात. :-)
------------------------------------------------------------
हं, तर मी मामांच्या घराबद्दल सांगत होते. मामांच्या घरा समोरचं घर पण अतिशय देखणं.. ’कोकण’ हा शब्द उच्चारून डोळे मिटले, तर जसं घर डोळ्यासमोर उभं राहील, अगदी तसं. मला चित्रं बरी काढता येतात. मला या घराचं, रस्त्याचं चित्र काढायचंय म्हटल्यावर नवर्‍याने धावत जाऊन माझ्यासाठी ताबडतोब स्केच बुक, पेन्सील वगैरे आणून दिली होती. अर्थात ते सुरूवातीच्या दिवसातच वाट्य़ाला येणारं कौतुक होतं हे मला लवकरच कळून चुकलं. नंतरच्या आंजर्ले भेटीत जुळ्य़ांना सांभाळण्य़ाच्या गोंधळात निसर्गाबिसर्गाचे चित्रातून कौतुक करायच्या मनस्थितीत मी (आणि माझे कौतुक करायच्या मनस्थितीत नवरा) मुळीच नव्हते, असो.

घर बघून मग आम्ही मागच्या वाडीत गेलो. वाडी हे प्रकरण पण मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिले. उंचच उंच नारळ सुपारीच्या झाडांमधून सोनेरी प्रकाशाच्या तिरीप येत होत्या. गच्च भरलेली अशी हिरवीगार वाडी, त्यात खेळवायच्या पाण्य़ाच्या पाईपची मोठी धार, अधूनमधून फुलझाडं ..बघावं तिथे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्य़ा छटा.. मन ’निवणं’ म्हणजे काय हे तिथे कळले. वाडी संपते न संपते तोच समुद्राची गाज जोरात ऐकू यायला लागली. नजर जाईल तिथवर पसरलेला चंदेरी चमचमता समुद्र. चक्क घराला अटॅच्ड समुद्र !!! याहून वेगळं सुख ते काय! त्यानंतरची आंजर्ला भेट मुलांसह, तेव्हा सर्वात आवडलेले आणि नव्याने जाणवलेले दृश्य म्हणजे ’टेकडी गणपती’च्या स्पॉटवरून खाली दिसणारा निळाशार समुद्राचा तुकडा.. त्यातल्या नावा.. आणि तशाच छटांचं आभाळ. गाडीने तिथून खाली उतरताना निथळत्या पावसात पाहिलेली इरली घेतलेली तुरूतुरू चालणारी सडसडीत कामसू माणसं. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलांना दचकून जाग आली ती देवीच्या देवळात वाजू लागलेल्या नगार्‍याने. हे सगळं त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. ’गणपतीचं पाऊल’ आणि त्यांच्या आजीची ’खांबेटे शाळा’ पाहताना मुलांना गंमत वाटली. रात्रीच्या वेळी काहीशी गूढ वाटणारी वाडी. ’रात्रीचं तिकडे जाऊ नका’ असं मामांनी बजावल्याने तरीकडच्या रस्त्यावर आम्ही जेवणं आटोपून टॉर्च घेऊन चक्कर मारायला गेलो, वीज गेली असावी. जनावराची थोडी भीती मनात होती. तेव्हा बाहेरून साधारण सारखीच दिसणारी माडात दडलेली कौलारू घरं, त्यात लुकलुकणारे कंदील आणि बहुतेक घरांच्या पडवीत बसलेली वयस्कर जोडपी. कोकणचं ते वास्तव.. आता पर्यटनामुळे वाढलेल्या संधी बघता थोडंफार बदलायला लागलंय.

शेवटची आंजर्ला भेट आठवते तेव्हा आम्ही शब्दश: तिन्हीत्रिकाळ समुद्रावर जात होतो. पहाटे लवकर उठून पाहिलेला कोवळ्य़ा किरणांमधला सतेज समुद्र, उन्ह वाढ्त गेल्यावरचा लखलखणारा, डोळे दिपवणारा समुद्र आणि मावळतीच्या वेळचा मंद चमकणारा समुद्र.. प्रत्येक वेळी निराळा भासणारा.  हर्णे वरून पुढे जाताना तो चमचमता समुद्र आणि कोळ्य़ांनी जमा केलेले माशांचे रूपेरी चकाकते ढीग आणि केळशीकडे जाताना गाडी बराच वेळ समुद्राला समांतर जात असते ते  दृश्य तर मला नेहमीच आठवतं.


 नवर्‍याचं आजोळ कोकणात नसतं तर कधीतरी फिरायला म्हणून कोकणात नक्की गेलो असतो पण त्या टूरीस्ट रिसॉर्टच्या आठवणींना नात्यांचा नैसर्गिक गंध लाभला नसता.

Thursday, May 10, 2018

तंत्रज्ञानाच्या बेड्या



उन्हाने भाजून निघालेल्या जमिनीवर पडणार्‍या अनपेक्षित सरींनी वातावरणात उधळलेला मृद्गंध. तो श्वासात खोल भरुन घेताना अर्धमिटल्या डोळ्यांना खिडकीतून दिसणार्‍या झाडावर पानांच्या आडोशाखाली पिवळसर गुलाबी मानेचा वेगळाच चिमुकला पक्षी! तेवढ्यात फोनची बीप.. मैत्रिणीने व्हॉट्सऍपवर पाठवलेला फोटो.. तिला रिप्लाय करेतो मनात येतं या पक्ष्याचा फोटो ’Treat to senses.. hues on this cutie's feathers with a petrichor all around' असल्या एखाद्या भारी कॅप्शनसह पोस्ट करावा का! तितक्यात एक इ-मेल पॉप-अप, कुठलासा निरर्थक मेसेज.. मग कामासंबंधी राहिलेले एक-दोन फोन. तोवर चहा निवला आणि तो पक्षी केव्हा उडून गेला ते तर कळलच नाही. फोनकडे बघत राहिले. तो माझ्यासाठी आहे की मी त्याच्यासाठी आहे?

आयुष्य सोपं आणि सुखकर व्हावं म्हणून तंत्रज्ञान हवच पण त्याने गुंता आणखी वाढत असेल तर ! सकाळी उठल्यावर एखादा महत्त्वाचा एसएमएस पाहायचा राहून तर नाही ना गेला किंवा काल रात्री केलेल्या पोस्ट्सला किती लाईक्स आलेत, किंवा त्या अमक्याला किती कमी आले ते पाहायचं राहिलं असेल तर जगबुडी होईल की काय अशा गडबडीने त्यात डोकं घातलं जातं. नाटक/सिनेमा बघताना सुद्धा मोबाईलचे स्क्रीन चमकत असतात. दवाखाने, बस स्टॉप, कुठलीही वेटिंग रूम... तरूणाईच्या माना कायम मोबाईल किंवा लॅपटॉपमधे खुपसलेल्या किंवा आय-पॉडच्या तारा कानात खुपसलेल्या. स्वत:च्या विश्वात गुंग झालेले बधीर चेहरे. शेजारी कोण बसलय पत्ता नाही. गाडीच्या खिडकीतून दिसणारा उत्फुल्ल धबधबा सोडून फेसबुकवरच्या कुणा मित्राच्या बहिणीने अपलोड केलेल्या धबधब्याच्या फोटोला ’लाईक’ करायची घाई जास्त. अमेरिकन प्रवासी आज्यांची फोटो काढण्याची धांदल बघून पुलंनी ’अपूर्वाई’ मधे गमतीने म्हटलं होतं, ही सगळी दृष्य आता प्रत्यक्ष डोळ्यांनी न पाहता, बहुतेक अमेरिकेला परतल्यावर त्या निवांतपणे त्याचे फोटो पाहत बसतील.

आपणही या जगाकडे फक्त तंत्रज्ञानाच्या चष्म्यातूनच पाहायला लागलो आहोत का! वस्तुस्थितीपेक्षा आपल्याला व्हर्च्युअल (आभासी) रिऍलिटी जास्त आवडायला लागली आहे का! हाडामासाच्या माणसाशी सरळ संवाद करण्याची आपली क्षमता आणि इच्छाशक्ती मावळत तर नाही ना चालली ! आपापली ’स्पेस’ या नावाखाली आपला प्रवास एकटेपणाकडे तर होत नाहीये ना! सोशल नेटवर्किंगमधल्या स्वत:च्या कृत्रिम प्रतिमेच्याच तर आपण प्रेमात पडत नाही आहोत ना !

मागच्या पिढीचं कुठे अडलं या सगळ्या उपकरणांवाचून पण आज त्यांना भांबावल्यासारखं होतंच ना. एटीएम मशीन मधून पैसे काढताना दहादा खात्री करतात ते, बिचकत बटणं दाबतात, ऑनलाईन बिलं भरण्यापेक्षा ’वेळ आहे भरपूर’ हे कारण सांगत रांगेत जाऊन उभे राहतात. नेटबॅंकिंग पेक्षा तिकडे स्वत: जाऊन व्यवहार करणच सोपं वाटतं त्यांना. माझ्यात आणि नव्या तंत्रज्ञानातही वयोपरत्वे ही तफावत पडणारच ना! त्यापासून दूर राहायची आहे माझी तयारी ? की त्या भीतीने मी त्याच्या आत्ताच आहारी जातेय.

तंत्रज्ञान हे एक साधन आहे, साध्य नाही, आयुष्य व्यापून टाकेल इतकं महत्त्वाचं नाही. इतकी इलेक्ट्रीसीटी, वेळ आणि मानवी तास त्यात वाया घालवण्याइतकं तर नाहीच नाही. ते वॉशींग मशीन किंवा फूड प्रोसेसर सारखं मदतनीसाचं काम करत असेल तर ठीक आहे पण ते मलाच त्याचा गुलाम करत असेल तर! तुम्ही  मोबाईल वापरत नसाल, फेसबुकवर नसाल म्हणजे तुम्हाला अस्तित्वच नाही असं तंत्रज्ञान म्हणत असेल तर ! त्याचा प्रभाव इतका जोरदार आहे की ते ओढूनच नेतं तुम्हांला. नवनवी मॉडेल्स बाजारात रोरावत येतात. तुमच्या गरजा इतर कोणीतरी ठरवत असतं.
मग यावर उपाय काय?  माझ्या गरजा काय आहेत? ते मी ठरवीन. त्या कशा पूर्ण करायच्या? हे ही! संयमाचं महत्त्व माझी संस्कृती हजारो वर्षांपासून सांगतेय.. मग कुठे थांबायच हे मला ठरवता आलं पाहिजे.
माझ्यासाठी काय जास्त महत्त्वाचं आहे, माझी माणसं, माझे छंद, माझं काम! मग त्यांच्याशी जोडणारा पूल एवढीच भूमिका आणि किंमत मी तंत्रज्ञानाला द्यायला हवी, गुलामीच्या बेड्या तोडायला हव्यात आणि हे मी आजच करायला हवं, नव्हे आत्ताच.
---------------------------------
(free image source- google )

Saturday, March 31, 2018

मुखवट्यांच्या जगात वावरताना



हल्ली कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की सगळ्यात आधी एकमेकांचे सोशल मिडीया प्रोफाईल, विशेषत: फेसबुक बघितले जातात. तिथे तुम्ही स्वत:ला कसे सादर करता, काय पेहराव करता, कुणाबरोबर असता, कोणते कार्यक्रम पाहता, कसे विचार करता हे सारं जोखून पुढे जायचं की नाही हे ठरवण्यात येतं. कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा नेमणुकीआधी आता लिंक्ड-इन सह उमेदवाराचे फेसबुक प्रोफाईल तपासले जाते. पती पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स तुम्हाला ’ओळखून’ असतात असं गमतीने म्हटलं जात असलं तरी त्यात अतिशयोक्ती नाही. हे इथेच थांबत नाही. ..

सध्या केंब्रिज अ‍ॅनालिटिका प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सोशल मिडिया वापरुन मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होते आहे. व्यापारी कंपन्याही साधारण हेच करत असतात. आपली माहिती मिळवून नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून आपल्याला भावतील अशा उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. साम्यवादाची नकारात्मक बाजू अधोरेखित करणारे ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ आजच्या भांडवलवादी सोशल साईट्सलाही लागू होते आहे.

याबाबत काही लोकांना असे वाटते की आपल्या डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाहीये मग घाबरायचं कशाला!, काहींना तर स्वेच्छेने करायचय शेअर तर काहींचं म्हणणं जगात असुरक्षितता कुठे नसते! हे खरं असलं तरी या भूमिकेमुळे माहितीच्या गैरवापरासाठी आवश्यक असलेला डाटा पुरवायला आपण नकळत हातभार लावत असतो. 'माहिती' हाच अशा प्रकारच्या अनैतिक सायबर व्यवसायाचा कच्चा माल आहे, तो आपण नकळत पुरवतो. सोशल साईट्स व त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करण्याइतकाच महत्वाचा मुद्दा हा आहे की या बाजारात आपण स्वत:चा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर होऊ द्यायचा की नाही. एका मर्यादेपर्यंत ते आपल्या हातात नाही कारण आपण सोशल मिडियावर खातं उघडताना किमान माहिती देतो. सर्च इंजिन वापरतो, अ‍ॅप्स वापरतो, तेव्हा बहुतेक वेळा आपणच आपला डाटा वापरण्य़ाची ’आय अ‍ॅग्री’ असे क्लिक करुन परवानगी देत असतो. 

मग आपल्या हातात उरते काय? डिलिट-फेसबुक या हॅशटॅग ट्रेंडमध्ये सामील व्हायचे, किंवा एकूणच सोशल मिडीयापासून लांब राहायचे हा एक पर्याय आहे परंतु काळाबरोबर चालणे ज्यांना आवश्यक वाटते त्यांना तो रुचणार नाही. शिवाय सोशल मिडीयाचे अनेक फायदेही आहेत. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी इतका प्रभावी पर्याय दुसरा नाही. काल ऑर्कुट होतं, आज फेसबुक आहे, उद्या आणखी काही असेल. आपले खासगीपण जपून त्या त्या तंत्रावर स्वार होण्याचे कसब मिळवायला हवे. आपण भुरळ घालणार्‍या-कामुक आवाहन करणार्‍या असुरक्षित लिंक्सवर ’चोरुन’ (!) क्लिक करत नाही ना, https न वापरणार्‍या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार करत नाही ना, अनावश्यक आणि क दर्जाचे अ‍ॅप्स डोळे झाकून वापरत नाही ना हे पहावे. आपला डिजिटल वापर होत असल्याचे जाणवले तर याच माध्यमाचा वापर करुन आवाज उठवायला हवा, तसा फीडबॅक आणि रेटिंग द्यायला हवे. उदा: ग्राहकाचे मोबाईल बॅटरी स्टेटस जाणून घेऊन त्यानुसार भाडे वाढवणार्‍या एका टॅक्सी-सेवा कंपनीला ग्राहकांनी हा प्रकार बंद करायला नुकतेच भाग पाडले आहे.

आपल्या हातात असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विवेकाचा वापर. आयुष्यात खुट्ट झाले तरी ते सोशल मिडियाद्वारे जगाला ओरडून सांगणे, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता बाळगणे, सुरक्षेचे बेसिक सेटिंगही न वापरणे, शहानिशा न करता ’फॉरवर्डेड अ‍ॅज रिसीव्ह्ड’ च्या ढालीखाली वाटेल ते पोस्ट करणे, स्वत:सह इतरांचाही धोका वाढवणारी फेसबुकवर असलेली फालतू क्विझ खेळणे हे आपण थांबवणार की नाही! असे करुन आपली माहिती नकळत आपणच वाजतगाजत उपलब्ध करुन देत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकेषणेचा मोह टाळणे. सोशल मिडीया वापरणारे लोक बर्‍यापैकी सुशिक्षित असले तरीही आपली वट दाखवणारी मित्रयादी फुगवण्य़ाच्या नादात किंवा भाबडेपणामुळे हुरळून जाऊन कित्येकजण फेक अकाउंट्सचे सावज होतात. ही बनावट खाती तर आपल्या मित्रयादीत शिरुन आपल्या डाटाचा थेट दुरुपयोग करत असतात, फायदा घेत असतात. बहुतांशी सायबर गुन्हे अशा खात्यांमार्फत घडतात.

भारतात आज फेसबुकवर सुमारे २० कोटी तर ट्वीटरवर सुमारे ३ कोटी वापरकर्ते आहेत. यातली किमान दहा टक्के खाती बनावट आहेत. अशी खाती तयार करणार्‍यांचे हेतूनुसार ४ गट करता येतील. अ) केवळ गंमत, कुतूहलापोटी. इंटरनेटवर तांत्रिक करामती करुन पाहताना खरे अकाउंट अडचणीत येऊ नये म्हणून किंवा विशिष्ट विचारधारेचा पुरस्कार करण्यासाठी. ब) चॅटिंगद्वारे महिलांशी घसट वाढवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्यासाठी, राजकीय डावपेचाचा भाग म्हणून किंवा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्य़ासाठी क) अमुक इतके लाईक्स, फॉलोअर्स खात्रीने मिळवून देतो असे सांगणार्‍या व त्याबदल्यात घसघशीत मोबदला घेणार्‍या मार्केटिंग कंपन्यांद्वारे बॉट्सचा वापर करुन खोटे संख्याबळ दाखवण्यासाठी. (नुकतेच एका राजकीय पक्षाने फेसबुकपेज सुरु केले आणि एका रात्रीत पाच लाख लाईक्स मिळवून दाखवले) ड) पैसे लुबाडणे, अश्लील मेसेज करणे, मॉर्फिंग केलेले संभाषण-फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्य़ाची भीती दाखवून प्रत्यक्ष लैंगिक शोषण करण्यासाठी, ड्रग्ज किंवा तत्सम अनैतिक व्यापारात ओढण्यासाठी इ.
पहिल्या गटाच्या लोकांचा फारसा त्रास होत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते. इतर तीन गट मात्र आपल्या जगण्यात प्रचंड उलथापालथ घडवू शकतात तेव्हा त्यांचा हेतू ओळखून वास्तव जगात अपरिचित लोकांसह वावरताना आपण जशी खबरदारी घेतो तशीच आभासी जगातही घेणं ही आपल्या हातातील तिसरी गोष्ट.

मुळात सर्वसामान्य व्यक्तींनी अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट सरळ डिलिट कराव्यात. मात्र व्यावसायिक हेतूसाठी सोशल मिडीया वापरणार्‍यांना, सामाजिक कामात अग्रेसर असणार्‍यांना, किंवा कलाकारांना, कवी-लेखकांना असं करुन चाहत्यांना नाराज करता येत नाही. मग तंत्रमैत्री नसलेल्यांनी सोशल मिडियावरील बनावट खातेदारांना ओळखायचं कसं?
एखाद्या मादक मॉडेलचा फोटो प्रोफाईलला वापरुन पुरुषांना आणि साध्या बाईचा फोटो वापरुन महिलांना मित्र-विनंती पाठवली जाते. प्रोफाईल फोटो कृत्रिमरित्या आकर्षक केलेला वाटत असेल तर तो डेस्कटॉपवर ओढून गुगल इमेज सर्चवर ड्रॉप केला की गुगल त्या फोटोबद्दल अधिक माहिती देतं. बनावट खातेदार कुटुंब, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी यांच्यासह काढलेले फोटो पोस्ट करत नाहीत. मित्रयादी- फार लहान (१०० च्या आत) किंवा फार मोठी (हजारावर) असते. मित्रयादीत सामाईक मित्र शोधावे, ज्यांना आपण या व्यक्तीबद्दल विचारणा करू शकतो. ते नसतील आणि जगभरातले, चित्रविचित्र वाटणारे लोक यादीत असतील तर सावध व्हायला हवं. अशा व्यक्तींचा इंट्रो-परिचय त्रोटक असतो किंवा त्यात संगती आणि तथ्य जाणवत नाही. ४०-५० किंवा अधिक व्यक्तींना वारंवार टॅग केले जात असेल तर संशयाला जागा आहे. त्यांच्या टाईमलाईनवर फारशा पोस्ट्स नसतात. थोड्याफार असल्यास कोणत्या विषयावरच्या आहेत, त्यातली भाषा योग्य आणि फोटो असल्यास ते सभ्य आहेत हे पाहावे.

अशी व्यक्ती आपल्याला मित्र म्हणून हवी आहे का हे आपण स्वत:ला विचारावे. उत्तर नकारार्थी असेल तर रिक्वेस्ट डिलिट करावी, चुकून स्वीकारली गेली असेल तर ताबडतोब अनफ्रेंड करावे, तरीही रिक्वेस्ट येत असेल तर ब्लॉक आणि रिपोर्ट करावे. अकाउंट खरे असले तरी एखाद्या व्यक्तीकडून भारंभार लाईक्स, सवंग किंवा असंबद्ध कॉमेंट्स येत आहेत, इनबॉक्सवर गुलूगुलू बोलण्य़ाचा प्रयत्न होतो आहे असे जाणवले तर स्क्रीनशॉट्स घेऊन लगेच ब्लॉक आणि सकारण रिपोर्ट करावे. म्हणजे त्या अकाउंटवर साईटद्वारा योग्य ती कारवाई केली जाईल. सायबर गुन्हा नोंदवतानाही याचा उपयोग होऊ शकेल. वैयक्तिक मेसेजेसला उत्तर देणं टाळावे. गरज नसताना लोकेशन देऊ नये. भावनिक संवादात गुरफटू नये. आर्थिक तपशील शेअर करु नयेत. पब्लिक सेटिंग ऐवजी फ्रेंड् सेटिंग करावे. जनता-चोर-पोलिसांचा खेळ कधी न संपणारा आहे, तो सोशल मिडियावरही खेळला जातो आहे इतकच. विचार ठाम असले आणि तारतम्य बाळगले तर आपण आपलं डिजिटल पाकीट सांभाळून सोशल मिडियावरच्या मुखवट्यांच्या जत्रेत खर्‍या चेहर्‍याने मजेत वावरू शकतो.

#CyberSecurity #CyberCrime #SocialMedia #FriendRequest #FakeAccounts #MaharashtraTimes
#सायबर_सिक्युरिटी #सायबर_क्राईम #सोशल_मिडिया #महाराष्ट्र_टाईम्स