Thursday, June 19, 2014

गुंतता गुणांकात...


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २९ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

आयटी क्षेत्रातल्या नोकरीमुळे पायाला चाक लागलेला माझा एक तरुण नातलग. दौरे , प्रोजेक्टची डेडलाईन या सगळ्यात श्वास घ्यायची त्याला फुरसत नाही. त्याचं म्हणणं , ' तुज सगुण म्हणू की निर्गुण रे ' असले प्रश्न पडायचं का त्याचं वय आहे ? आणि असलंच तरी या निवृत्तीनंतर किंवा फावल्या वेळात करायच्या गप्पा आहेत. ' त्याला विचारलं , हा विषय जर तुझ्या ' कॉर्पोरेट ट्रेनिंगचा ' भाग असेल तर वाटेल ना तुला त्यात रस ?'

कॉर्पोरेटक्षेत्रात पूर्वी कर्मचाऱ्यांचा ' आय क्यू ' ( बुद्ध्यांक) वाढावा (पर्यायाने उत्पादनक्षमता वाढेल) म्हणून प्रयत्न केले जात. मग ' ईक्यू ' ( इमोशनल कोशंट-भावनांक) वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र या क्षेत्रात इतक्या वेगवेगळ्या सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीच्या व्यक्तींची सरमिसळ असते , की त्यातच कामाचा ताण , वैयक्तिक-कौटुंबिक प्रश्न , या सगळ्यात भोवंडून गेलेले काही जीव आत्महत्येच्या टोकालाही जातात. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा ' स्पिरीच्युअल कोशंट ' म्हणजेच ' एसक्यू ' किंवा ' आध्यात्मिक गुणांक ' वाढावा म्हणून कंपन्या प्रशिक्षण देऊ लागल्या आहेत. एकदम जादू होऊन ' आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन ' वगैरे त्यातून कळले नाही तरी आतली तगमग कमी होण्यासाठी याची निश्चितच मदत होते. जगातल्या वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची , धार्मिक विचारप्रवाहांची , ध्यान संकल्पनेची ओळख करून दिली जाते. बाकी अभ्यास पुढे तुमचा तुम्ही करणे अपेक्षित असते. खरंतर घराघरातील धर्मग्रंथांत , अक्षर वाङ्मयात , वडीलधाऱ्यांच्या संस्कारात एसक्यूचा अभ्यासक्रम ठासून भरलाय. याशिवाय पूर्वी कीर्तन-भारूड-प्रवचनं अशी माध्यमं वापरली जात. मात्र हीच गुटी कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या आधुनिक वेष्टनामधून दिली किंवा एखाद्या लेखकाने इंग्लिश पुस्तकातून दिली तर ती लगेच तरुणाईला आवडू लागते. तसे का होईना , पण या एसक्यूकडे गांभीर्याने पाहणे महत्त्वाचे. आपली अस्तित्वशक्ती काय असावी ? ती ' सगुण , निर्गुण की त्याचा संगम ' हे कोडेही मग उलगडता येईल.

सगुण नाशवंत आणि निर्गुण शाश्वत हे तर्कदृष्ट्या सर्वांना मान्य असते. पण म्हणून सगुणाचे सौंदर्य आणि निर्गुणाची गूढ ओढ दोन्ही कमी होत नाही. आध्यात्मिक गुणांक (एसक्यू) जसजसा वाढत जाईल तसतसा सगुणाच्या प्रेमाचा आनंद घेताना ' शेवटी हे तर प्रतीक आहे , मग तरी आपण यात का गुंततो आहोत ? या सगळ्या उपचारांना खंरच काही अर्थ आहे का ?' अशी संभ्रमावस्था हळूहळू दूर होऊ शकते. कुणी मानसपूजा करावी , कुणी षोडशोपचारे , कुणी एखाद्या प्रकल्पासाठी जीवन झोकून कार्याने पूजा बांधावी , कुणी उत्सव साजरा करावा , कुणी तेजाला वंदावे , कुणी मूर्तीला. नितळ , स्वच्छ मनाला सगुणाची जडलेली सवय म्हणजे अपराध वाटत नाही. तुकाराम महाराज तर म्हणतात ' अद्वैती तो नाही माझे समाधान। गोड हे चरणसेवा तुझी॥ '

आयक्यूसारख्या शास्त्रीय कसोट्या आध्यात्मिक गुणांकाला लावता येणार नाहीत. कृतीला असलेली विचारांची बैठक किती पक्की हा मात्र चांगल्या एसक्यूचा निकष असू शकतो. एसक्यूबरोबर मानसिक स्वास्थ्य वाढते आणि प्रसन्नतेचा शिडकावा होतो हे निर्विवाद.

अस्तित्वाचा शोध


लहानपणी चांगलं, वाईट यातला भेद समजायला सोपे व्हावे म्हणून मोठी मंडळी, 'असं केलं तर देवबाप्पा रागावेल' असा धाक घालतात. देवघरात पाहून हा देवबाप्पा म्हणजे 'अमूक अमूक' असे चित्र, प्रतिमा किंवा मूर्ती डोळ्यासमोर येते. वेद-उपनिषदांनी ईश्वर या संकल्पनेला रूपरेषा दिली तर पुराणकथांनी त्याला विविध आकार दिले. देवबाप्पाचे हे आकार मनामनात मूर्त स्वरूपात इतके कोरले गेले आहेत की या आकारांची मनावरची पकड सैल करून निराकाराकडे प्रवास करणं अवघड आहे. निर्गुणाचा शोध घ्यायचा तर माध्यम हवे आणि ते तर सगुण असते. असा हा पेच आहे.

या प्रवासाची सुरुवात क्लिष्ट आहे. सगुणाच्या सुरक्षित दृश्यकोषाला भेदून निर्गुणाच्या अवकाशाला गवसणी घालायचे काम सोपे कसे असणार! गरुडाच्या मादीची पिल्लांना पहिला आणि शेवटचा धक्का देताना अशीच मनोवस्था असते. आपल्या पिल्लाला ती हळूहळू घरट्याच्या कडेला सरकवत नेते. उंचावर बांधलेल्या त्या घरट्याच्या खाली, वर, सभोवताली, पिल्लू पडलेच तर त्याला झेलायला हवेशिवाय दुसरं काही नसतं. पण त्या धक्क्यातून सावरताना ते पिल्लू पहिल्यांदा पंख पसरणार असतं. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी त्याला आपल्या पंखांचं महत्त्व कळायला हवं. मादी एक एक करून पिल्लांना धक्का देते आणि उंच आकाशातली त्यांची गरूडभरारी नजरेत साठवून घेते.
सगुणाकडून निर्गुणाकडे होणारा प्रवास काहीसा असाच असतो. भयमुक्तीचा हा क्षण कुणाला एखाद्या उंच पर्वतशिखरावर झेंडा रोवताना गवसतो, कुणाला बंगी जंप करण्यासाठी स्वत:ला खोल दरीत लोटून देताना गवसतो, कुणाला अशक्यप्राय अंतर धावून, पोहून पार करताना गवसतो, कुणाला हृदयाचा वेध घेणाऱ्या एखाद्या अनवट सुरावटीत, कुणाला एखाद्या संशोधनाच्या ध्यासात, कुणाला आपली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून समाजकार्याला वाहून घेण्याच्या निर्णयात तर कुणाला प्रपंचात राहूनही राग-द्वेषासारख्या विकारांवर नियंत्रण ठेवता येण्याची शक्ती मिळण्यात गवसतो.

या सगळ्या कृतींमधे एक साम्य आहे. सर्वत्र आढळणाऱ्या ईश्वरी अंशाचा असा विविध स्वरूपात अनुभव घेता येणं ही आनंदाची परमावधी आहे. विज्ञान त्याला तेजस्वरूप किंवा ऊर्जास्त्रोत मानते, निरीश्वरवादी त्याला निसर्गस्वरूप मानतात, तर ईश्वरवादी त्याला आत्मस्वरूप मानतात. शोध तेजाचा असो, निसर्गातल्या गुपितांचा असो वा आत्म्याचा; हा प्रवास अलौकिक आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जातानाचा विलयबिंदू कळत नाही; कारण मानवी अस्तित्व या दोहोंचा सुरेख संगम आहे. जसे एखादे फूल. फुलाचा नुसता आकार किंवा नुसता सुगंध पुरेसा नाही. रूप-रंग आणि सुगंध हे सारे मिळूनच फुलाला अस्तित्व प्राप्त होते. पूर्णत्व मिळते. बालकाचा गोंडसपणा त्याच्या लडिवाळ रूपाबरोबरच त्याच्या निरागस हास्यात असतो. सगुणाची मिठी सैल करायची म्हणजे त्याचा त्याग करायचा असे नाही तर त्याच्यातच अडकणाऱ्या मनाला या सुगंधाची, हास्याची ओळख करून द्यायची आहे.
 मूर्त तू मानव्य का रे, बालकाचे हास्य का? या इथे अन त्या तिथे रे,सांग तू आहेस का?


(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २२ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

आनंद हा चंदनासारखा


शाळकरी वयाच्या भाचीने सहज प्रश्न केला, ' जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण? ' तिच्या वयाचा विचार करता तिला ऐहिक श्रीमंतीच अभिप्रेत होती. त्यामुळे तिला उत्तर दिले, ' वॉरन बफे किंवा बिल गेट्स. ' त्यावर तिचा प्रश्न, ' ते इतके श्रीमंत कसे? '... चिमुकल्यांचे प्रश्न कधी कधी आपल्याला अंतर्मुख करून जातात. लक्ष्मी हे धनवृद्धीचं केवळ प्रतीक मानायचं, की तिला पुराणकथांचे संदर्भ देऊन देवीच्या स्वरूपात बघायचं? वैभवाप्रति कृतज्ञता म्हणून सोनं-नाण्याचं पूजन करायचं की सतत काम करत राहून ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' म्हणत खऱ्या अर्थाने लक्ष्मी वाढवायची? थोडक्यात, लक्ष्मी या संकल्पनेचा सगुण स्वीकार करायचा की निर्गुण? सगुण स्वीकारात आपसूक लीनता येते. पण निर्गुण स्वीकार करणाऱ्या आणि जगभरात व्यवसाय नेणाऱ्या नारायण मूर्तींसारख्या लोकांवरही तिचा वरदहस्त आहे आणि सगुण स्वीकार करणाऱ्या कित्येक धनदांडग्यांकडे तिने अचानक पाठही फिरवलेली आहे. सरस्वती देवीला सगुण स्वरूपात न अनुभवताही जगभरातल्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या रूपात तिचीच उपासना केली आणि आपल्या शोधांनी मानवजातीचं कल्याण केलं.

खरं तर लक्ष्मीतत्त्व असो वा सरस्वतीतत्त्व; ते आपल्या ' मनगटात, बुद्धीत आणि आत्म्यात, ' म्हणजे आपल्यातच सामावले आहे. या तत्त्वाचे आणि मानवाचे अद्वैत आहे. परंतु सगुण म्हटले की ते ' दिसते ', अनुभवल्यासारखे भासते. निर्गुण म्हटले की ते शोधावे लागते, उलगडावे लागते. कदाचित म्हणूनच सगुणाचा स्वीकार सार्वत्रिकरित्या सहजपणे होतो. निर्गुणाचा स्वीकार म्हणजे अश्रद्धा असा एक अपसमज आहे. मात्र संतसाहित्यापासून या निर्गुण स्वरूपाचाच पाठपुरावा केलेला आढळून येतो.
' मनें कल्पिला विषयो सोडवावा। मनें देव निर्गुण तो वोळखावा।
मनें कल्पितां कल्पना ते सरावी। सदा संगती सज्जनाची धरावी॥ '
या श्लोकात समर्थ हेच अधोरेखित करतात. ईश्वरतत्त्वाची मनाने रचलेली प्रतिमा, मनाचीच कल्पना सोडून द्यावी. ईश्वरतत्त्वाचे निर्गुण स्वरूप जाणून घ्यावे. द्वैत मानले की ' तो ' आणि ' मी ' हा भेद आला. द्वैत सोडले की तोच मी हे जाणवते; पण या जाणिवेत अहंभाव नसावा. मन नितळ करून साऱ्या स्वनिर्मित कल्पना दूर कराव्या.

एका मंदिरात गीतेतील निवडक श्लोकांचे इंग्रजी भाषांतर कोरलेले आहे. त्यात निर्गुण शब्दाचे भाषांतर 'व्हॉईड ऑफ गुण' असे लिहिले होते. समर्थांच्या शब्दांच्या पार्श्वभूमीवर ' गुण ' म्हणजे जणू कल्पनेचेच कंगोरे. सज्जन सहवासाने हे कंगोरे वितळवणे सोपे होते, तशी बुद्धी निर्माण होते. ज्यांना सगुण साधनेने ऊर्जा मिळते, पुजेच्या उपचारांनी मांगल्याची अनुभूती मिळते, सण-वार साजरे करण्यातून आयुष्यात चैतन्य फुलल्यासारखे वाटते त्यांनी अवश्य सगुण स्वरूपात त्या ईश्वरतत्त्वाची आराधना करावी. त्या आराधनेतून मिळणारा आनंद उत्सवाच्या रूपाने एकमेकांना वाटला जातो. आनंद हा चंदनासारखा असतो. त्याचा टिळा दुसऱ्याला लावताना आपली बोटेही सुगंधाने माखून निघतात. मात्र त्याचबरोबर या साऱ्या बाह्यकृतींपलीकडे असलेल्या निर्गुण ईश्वरतत्त्वाचा शोध घेणे थांबवू नये. समाधानाचे, मन:शांतीचे केंद्र अंतिमत: तेथेच आहे.


(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)