Tuesday, September 20, 2011

न्याय

’अजब न्याय’

कन्नड सिनेक्षेत्रातील यशस्वी अभिनेता दर्शन हा सध्या (पंचतारांकित) तुरूंगात ,जामीनाच्या प्रतीक्षेत आहे. बायको-विजयालक्ष्मीला भीषण मारहाण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीशी त्याचे संबंध असल्याच्या चर्चेमुळे पती पत्नीत या विषयावरील वाद विकोपाला गेला व त्याने बायकोला अक्षरश: झोडपून काढले. एवढेच नव्हे, याआधीही काही ना काही कारणावरून दर्शनने बायकोचा प्रचंड छळ केला होता. विस्मयाची बाब म्हणजे दर्शनच्या सिनेक्षेत्रातील मित्रमंडळींच्या दडपणामुळे याच अगतिक विजयालक्ष्मीने ’बाथरूममधे पडल्याने मार लागला’ असा जबाब दिला. तो स्वीकारला गेला नाही हा भाग अलाहिदा!
या कहाणीची दुसरी बाजू तितकीच धक्कादायक आहे. निकीता या कन्नड अभिनेत्रीवर दर्शनशी संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळे दर्शनच्या वैवाहिक जीवनातली ’शांतता व सौख्य’ भंग करण्याचे ’पाप’ निकीताने केले आहे असा ’निष्कर्ष’ कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने काढला. याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी तिच्यावर ३ वर्षाची बंदी घातली आहे. या काळात तिला काम मिळणार नाही याची ही संघटना खबरदारी घेईल. तसेच तिला कोणताही खुलासा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

वाढते विवाहबाह्य संबंध हा सामाजिक चिंतेचा विषय जरूर असावा, पण निदान सुशिक्षित, सुसंस्कृत वर्गात तरी त्यावर संबंधितांनी वैध मार्गाने तोडगा काढणे अपेक्षित असते. प्रेम, विवाह हा व्यक्तीच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे, व्यावसायिक जीवनाचा नाही. दर्शनच्या आयुष्यातील किमान या दोन स्त्रियांचे उदाहरण बघितले तर बायकोवर नवर्‍याची हुकुमशाही लादली गेली आहे आणि निकीतावर समाजातील तथाकथित नैतिक पहारेकर्‍यांची दडपशाही. जर कन्नड फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सला वैवाहिक सौहार्दाची एवढी कळकळ आहे तर दर्शनने याआधी बायकोवर केलेल्या अत्याचाराकडे डोळेझाक का केली गेली! निकीताशी त्याचे संबंध असलेच आणि हे गैर मानले तर तिच्याइतकाच दर्शनही दोषी आहे. मग त्याच्यावरही बंदी का घातली गेली नाही? मुळात असा एकांगी न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला?

संकुचित भारतीय मानसिकतेचा विचार करता दर्शनवर बायकोला ’फक्त’ मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.. त्यामुळे लोक हा प्रसंग विसरून जातील. तुरूंगातून सुटल्यावर दर्शन नव्याने चित्रपट स्वीकारेल, व चर्चेत राहिल्यामुळे कदाचित अधिकच यशस्वी होईल. निकीता बंदीच्या काळात विस्मृतीत जाईल. विजयालक्ष्मीचे भवितव्य तर आता अंधारातच आहे कारण तिने नवर्‍याविरोधात तक्रार करण्याचे भलतेच धाडस केले आहे. उच्चभ्रू(!) समाजातील ही घटना एखाद्या आदिवासी पाड्यावर किंवा दुर्गम खेड्यात, जातपंचायतीने पुरूषी निकषांवर त्याचा निवाडा करावा, अशाच पद्धतीची आहे. पाड्यावरील स्त्रीपेक्षा ’सौभाग्यवती’ विजयालक्ष्मी आणि ’वलयांकित’ सिनेअभिनेत्री निकीता यांची अवस्था वेगळी नाही.
मध्ययुगीन मानसिकतेच्या पट्ट्याने करकचून आवळलेले आधुनिकतेचे ढोल ,पुरूषी हातांनी आपण आणखी किती काळ वाजवणार आहोत!

Sunday, September 11, 2011

जयू


केव्हाही फोनवर विचारलं- ‘कशी आहेस?’ की खळाळून हसत तिचं उत्तर येतं- ‘मज्जेत." या वेळी म्हणाली ,"सध्या .......  कॉलेजला सीएचबी वर अर्थशास्त्र शिकवतेय सिनीयर कॉलेजला. ........ मध्ये पण शिकवायला बोलावतायत. पण इथेच पर्मनंट व्हायचा प्रयत्न करतेय,". जयू आणि प्राध्यापिका? कल्पनाशक्तीला प्रचंड ताण दिला तरी हे दृश्य नजरेसमोर येत नाही. 

एकच शाळा आणि जवळच राहत असल्याने जयूची ओळख सहावी-सातवीत असताना झाली असली तरी त्याआधीही जयू आणि तिची बहीण तिच्या आजोबांसह शाळेत जाता-येताना दिसत असत. त्या दोघी टम्म फुगलेल्या पाणीपुरीसारख्या गोलमटोल! घट्ट वेण्या- वर रिबीन लावून बांधलेल्या! कधीतरी जातायेता बोललो आणि मग रोजच शाळेत बरोबर जायला लागलो. ती मला एक वर्ष सिनीयर. भन्नाट प्रकरण.
संध्याकाळी आम्ही मुलं-मुली दोन टीम करून खेळत असू. खेळताना भांडणं झाली तर जयू मुलांशीही बिनधास्त मारामारी करत असे. भांडण आटपून घरी जाताना वळून पाहत ती ‘जा रे भाजक्या वांग्या, ए कोबीगड्डय़ा’ अशी खास विशेषणं वापरत असे. मस्तमौला म्हणतात तसं हे प्रकरण होतं. अभ्यास वगैरे करण्यात आयुष्यातले अनमोल क्षण ती व्यर्थ दवडत नसे. वाचनाचा तर तिला प्रचंड कंटाळा. फॅन्टम, चाचा चौधरी वगरे कॉमिक्स मी ‘धडाम, फटॅक’ अशा ‘साऊंड इफेक्ट’सह वाचायचे आणि तिने फक्त चित्रे पाहायची. पण त्यातली एखादी चौकट सुटली तर मात्र ती लोडाला टेकून ‘हे राहिलंय’ म्हणून सांगायची.
कलाकुसरीच्या वस्तू ती सुंदर करायची आणि आईला मदतही. तिला सातवी-आठवीतच सगळा स्वयंपाक करता यायचा. तिची ताई असेल तिच्याहून तीनेक वर्षांनी मोठी. गरीब गाय. बाबा रेल्वेत ऑफिसर. अगदी कडक स्वभावाचे! पानातली पोळी गरम नसली तर ताडकन् उठून जाणारे! ती त्यांना नीट सांभाळून घेत असे. आईला रक्तदाबापासून अनेक विकार. त्यात सतत काळजी करण्याचं व्यसन. सकाळ झाली की ‘आज पाणी येणार की नाही,  ‘कामाला बाई येणार की नाही!" काळज्या सुरु. जयूला भाऊ नसल्याने आणि तिचे बाबा दिवसभर कामामुळे बाहेर असल्याने आम्हा मैत्रिणींचा अड्डा तिच्याच घरी असायचा. पत्ते, कॅरमपासून अंगणातल्या शिवाशिवीपर्यंत, डब्बापार्टीपासून एकत्र सर्कस, सिनेमा पाहण्याच्या प्लॅनपर्यंत सारे काही तिच्याचकडे होई. प्लॅन आखणे, ते सर्वाच्या गळी उतरवणे आणि त्याला लागणारे पैसे प्रत्येकीकडून विनासंकोच मागून घेणे, यांत ती तरबेज होती.
जयू सिनेमा फारच दंग होऊन पाहायची. ‘ये तो खुशी के आसू है पगले!’ यासारखे अपेक्षित डायलॉग ती स्वत:च जोरात खिदळत म्हणायची. परंतु मागून कोणी बोलत असेल तर त्यांना ‘अहो, आम्ही तुमचे डायलॉग ऐकायला नाही काढलं तिकीट!,’ असे खुशाल ओरडायची. 
रस्त्याने जाता-येता भेटणाऱ्या प्रत्येकाशी (सर्वाबद्दल ती ‘अपडेट’ असे!) हसून बोललेच पाहिजे, असा तिचा दंडक होता. शिवाय ती त्या- त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीप्रमाणे विषय काढत असे. उदा. संसारग्रस्त बायकांना- ‘काय काकू, झाले का पापड?’, तर लहान मुलीला- ‘ए मश्त आहे हं ड्रेश तुझा!’ आणखी मोठय़ा मुला/मुलीला ‘कधी आहे परीक्षा तुझी?’ अगदी डॉक्टरांनाही- ‘त्या अमक्याला अपघात झाल्याचं कळलं का? मुंबईला नेलंय!’अशी माहिती पुरवत असे. वय, जात,लिंग, दर्जा अशी कोणतीही गोष्ट तिच्या या संवादाआड येत नसे. या संवादकौशल्यामुळे ती कुणाही अनोळखी व्यक्तीचं अख्खं खानदान माहीत करून घेई. 

शेजारी वा ओळखीचे किल्ली त्यांच्याकडे ठेवून गावाला जात. ते परतायच्या दिवशी ही त्यांच्या घरी पाणी भरून ठेवी. कधी पोळ्याही करून ठेवी. गावाहून आल्यावर दमलेली असते बाई- याची तिला त्या वयातही जाण होती. (या तिच्या सवयीवर फिदा झालेलं एक घर आता तिचं सासर आहे. असो.) पुलंच्या ‘नारायण’सारखी ती मदत करी. पण ‘परोपकारी गंपू’सारखी निरपेक्ष नाही; तर तिला त्याची पावती कौतुकरूपाने हवी असायची. ‘त्यांनी नंतर तुला साधा चहाही विचारला नाही,’ म्हणून चिडवले की- ‘आपल्याला नसतेच अपेक्षा! पण पद्धत म्हणून काही असते की नाही?,’ म्हणत जयू फणफण करणार! शिवाय पुढच्या वेळेस- ‘चिकाची चव पण दिली नाहीत तुम्ही. या वेळेस मात्र विसरू नका,’ असं सरळ त्यांना सुनवायलाही ती कमी करायची नाही.
कॉलेजमध्येही ती गुटगुटीतच दिसे. त्यावरून ‘काय झालं, बाळ रडत होतं..’ असं ग्राईप वॉटरच्या जाहिरातीतल्यासारखं कुणी चिडवू लागलं की ‘एक कानाखाली दे त्याला,’ असं सणसणीत प्रत्युत्तर ती देत असे. पण त्यातल्याच एखाद्याशी नंतर तिला बोलताना किंवा नोट्सची देवाणघेवाण करताना पाहून मी थक्क होत असे. ‘एकटा मुलगा वाईट नसतो. पण ग्रुपमध्ये उगाचच तो असं वागतो,’ असं मानसशास्त्रीय कारण ती तेव्हा देई. रविवारी आम्ही तापीवर फिरायला जात असू तेव्हा ‘वाचलेल्या पुस्तकातल्या गोष्टी सांग,’ अशी तिची फर्माईश असे. तिला शेरलॉक होम्सच्या किंवा मतकरींच्या भयकथा आवडत. त्याच मग ती रंगवून इतरांना सांगे. रोजचा पेपरही ती वाचत नसे पण  एकदा तिच्या कॉलेजमधली मैत्रीण अद्याप मी पु.लं वाचलेच नाहीत म्हणाली, तेव्हा ही मला डोळा मारत तिला म्हणाली..."अय्याss तू पु.लं वाचले नाहीस, मग जगण्याला अर्थ काय तुझ्या!!"

आम्ही काही दिवस समितीची शाखा घेत असू. तेव्हा तिच्या नेतेगिरीला रंग चढे. ती गायचीही छान. आमचे समितीत जाणे पुढे जमेनासे झाले तरी एक काकू आम्हाला पकडून नेहमी काहीतरी गळ घालत. त्या येताना दिसल्या रे दिसल्या की ही ‘खतरा’ असं ओरडून मला ओढत दिसेल त्या घरात शिरे. आणि त्या दिसेनाशा होईपर्यंत त्या घरी गप्पा ठोकीत बसे. (ते घर अर्थातच तिच्या ओळखीचे असे.) सार्वजनिक गणपती आणि नवरात्रात ती घरी सापडत नसे. रांगोळी काढण्यापासून महाप्रसादात वाढण्यापर्यंत, काकडआरतीपासून दांडिया खेळण्यापर्यंत सगळ्यात ती पुढे. गुलालात माखून मुलांमध्ये ती बिनधास्तपणे वावरत असे. गणपती उत्सवातील एका फॅन्सी ड्रेस स्पध्रेत तिने ‘वेडी’ची भूमिका केली होती. गर्दीतून स्टेजवर तिने अशी काही एन्ट्री घेतली, की अर्ध्या प्रेक्षकांनी दचकून किंकाळ्या फोडल्या. निवडणुका आल्या की आमच्या प्रभागातल्या आवडत्या उमेदवाराचा अगदी हिरीरीने प्रचार करायची आणि तो निवडून आल्यानंतर त्याच्या विजयमिरवणुकीत गाडीच्या टपावर त्याच्या शेजारी बसून वगैरे v ची खूण करत असे. (प्रभागातल्या सगळ्यांची खरं म्हणजे त्या उमेदवारापेक्षाही तिच्याशी जास्त ओळख असावी) मी तिला गंभीरपणे यात करिअर कर असे सुचवित असे. त्यावर "जाऊ दे ग, आम्ही मागून सतरंज्या उचलण्यातच हुशार" असे ती म्हणे.

एकदा कशावरून तरी तिला प्रचंड हसू आलं म्हणून गल्लीच्या कोपऱ्यावर खुशाल पोट धरून गुडघे खाली टेकवून हसत बसली. वर बाजूने जाणाऱ्या स्कूटरवाल्याच्या चमत्कारिक चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, ‘जा- जा काका तुम्ही. मी अगदी नॉर्मल आहे.’ सामाजिक संकेत नावाच्या प्रकाराशी तिला घेणंदेणं नव्हतं. ज्या क्षणी जे करावंसं वाटेल ते ती बिनधास्त करी. मात्र, परीक्षेचा निकाल जवळ आला की ती मला चोरून गणपतीला प्रदक्षिणा घालत असे. एकदा तिला असं करताना पकडल्यावर ती उलट मला म्हणाली, ‘याने चांगला व्यायाम होतो." मी त्यावरून पुढे तिला खूपदा चिडवलं होतं. 
कधी मला पेरुची बर्फ़ी किंवा तत्सम नवा पदार्थ देई. ’दीड तास लागला आटवून करायला,"असे थकून म्हणे. मी तिला चिडवायला म्हणायचे ’या पेक्षा थेट नुसता गोड पेरूच का खाऊ नये...’ मग ती माझ्या अरसिकपणावर मला लेक्चर देई. कधी कुठल्यातरी ’चेन मार्केटिंग’ च्या जाळ्यात अडकून मला म्हणे ’ही पॉलिसी काढली ना तर आपल्याला अमुक जीबी जागा इंटरनेटवर फुकट मिळेल.’ मी विचारलं "बर, मग त्या जागेचं तू काय करणार? लोळणार की लोणचं घालणार?" की ती निरूत्तर होऊन कुरकूरत म्हणे ’मला वाटलंच तू टाचणी लावणार..." 
कुणाला मेंदी काढून दे, कुठले तरी मणी आणून वॉलपीस कर, टाकाऊचे टिकाऊ कर असं तिचं सतत सुरू असायचं. ’तुझ्या वाचनाने फक्त तुला आनंद मिळतो पण अशा वस्तूंमुळे करणार्‍या आणि पाहणार्‍या दोघांनाही आनंद मिळतो’ असा तिचा बिनतोड युक्तीवाद असायचा. मी पुढे शिकायला बाहेर गेले तरी संपर्क होताच, घरी आले की मी आधी तिच्याकडे धाव घेई. एरवी ती मला तिच्या सुंदर अक्षरात आमच्या ’कोड’ भाषेत (अगदी प्रत्येक व्यक्तीच्या टोपणनावाचा वापर करून) लांबलचक पत्रे लिहायची. त्यात,’ राजीव गांधी कित्ती स्मार्ट दिसतो,नाही! ” इथपासून कोणाकडे लग्न ठरलं, तिने केलेलं रुखवत कसं सगळयांना आवडलं इथपर्यंत किंवा बप्पी लाहिरी चे ’मामामिया पॉम पॉम’ ह्याला काय गाणं म्हणतात का, या संतापापासून ते तिच्या कॉलेजच्या निवडणुकीतील राजकारणापर्यंत ’anything under the sky', मजकूर नुसता गळत असे.

जयूच्या बाबांना प्रथम वर्गाचा रेल्वेचा पास मिळे. प्रवासात ते त्यांचा लाडका पामेरिअन कुत्राही सोबत घेऊन जात. एकदा ती, तिची आई, आजी आणि हे श्वानमहाशय असे चौघे तिच्या काकांकडे निघाले होते. या सर्वाचे पास होते, पण आजीचे तिकीट काढायचे राहिले होते. हे लक्षात येताच जयू पळत गेली. तोवर इकडे गाडी सुटली. धावत येऊन कशीबशी तिने गाडी पकडली खरी; पण फलाट संपताना तिला बाकीची मंडळी खालीच चक्रावलेल्या अवस्थेत उभी असलेली दिसली. झाले! तिने गाडीची साखळी ओढली. गाडी थांबताच खाली उडी टाकून ती फलाटाकडे धावली. टी. सी. आणि रेल्वे पोलिस तिच्या मागे. त्यांना तिने ‘मेरा कुत्ता नीचे रह गया था,’ असे कारण सांगताच त्यांनी ‘ट्रेन क्या तुम्हारे.. ’ म्हणून ओरडायला सुरुवात केली. हीऽऽ गर्दी जमली. काकांच्या (तिचे बाबा) ओळखीच्या अधिकाऱ्यांमुळे तिची यातून कशीबशी सुटका झाली. 

एके दिवशी रेल्वेस्टेशन कॅन्टीनवर भरदुपारी काही गुंडांनी हल्ला केला. कॅशच्या चाव्या देण्यास नकार दिल्याने जयूच्या बाबांना त्यांनी चांगलीच मारहाण केली. मुंबईला काही दिवस त्यांना उपचार घ्यावे लागले. शिवाय कोर्ट केस! तशात त्यांची बदली झाली! काकूंना आधीच बरेच आजार होते. या प्रसंगानंतर तर अतिताणामुळे त्या गेल्याच. अशातच ताईचे लग्न होऊन ती प्रसूतीसाठी माहेरी आलेली. काका आधीच धक्क्यात. मदतीला जवळचे कुणी नातेवाईक नाहीत. अशावेळी जयूच्या खंबीरपणाने आम्ही थक्क झालो. आम्ही मैत्रिणी आणि तिने मिळून घर सावरलं. आपल्या धाकटय़ा असण्याचा बाऊ न करता ती माय, मावशी सगळं काही झाली.  घरातल्या कामांप्रमाणेच ती बाहेरचं कोणतंही काम बोलक्या स्वभावामुळे आणि ओळखींमुळे सहज करून टाकी. काम होत नसेल तर आत शिरून थेट मुख्य साहेबांशी बोलायलाही ती भीत नसे. स्वत:बरोबर ‘लगे हाथ’ इतरांचीही कामं करू देई. अगदी पोस्टात जातानाही ती शेजारीपाजारी विचारी- ‘टाकायचंय का काही पत्र?’ मोलकरणीकडचे लग्न असो, कॉन्व्हेंट शाळेतील जुन्या मत्रिणी / रेल्वेतील ख्रिश्चन मंडळींची ख्रिसमस पार्टी असो वा एखाद्या घरचे कुळाचार, मावंद- ती घरचं कार्य असल्यासारखी आपुलकीने व सहजतेने वावरे.

काकांनी आता जयूसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. ते भारी स्थळे पाहत. तेव्हा जयू म्हणायची, ‘यांची मुलगी बीकॉम सेकंड क्लास आणि जावई शोधताएत लॉर्ड फॉकलंड! रेल्वेतला नवरा हा तिचा ‘मि. राईट’ होता. का, तर प्रवासाला वर्षातून तीन पास आणि सहा पीटीओ मिळतात म्हणून! एखाद्या मुलाच्या (स्थळाच्या) घरी गेल्यावर तिचे ‘गृहकृत्यदक्ष्यत्व’ ठसवायला काका चक्क तिलाच चहा करायला सांगायचे. ती (आयुष्यात प्रथमच पाय ठेवलेल्या त्या घरात) वैतागून चहा करायची. पण लाजण्याबिजण्याच्या भानगडीत न पडता उलट त्या मुलाकडच्यांचीच मुलाखत घ्यायची. जणू काही जयूच त्या मंडळींना ‘बघायला’ आली आहे.
नंतर मात्र जयूने एका मैत्रिणीच्या भावाशी (रेल्वेशी प्रतारणा करून) प्रेमविवाह केला. सासर घरालगत होतं, म्हणजे बाबांची काळजी नाही. ती त्यांच्या मुलाच्या भूमिकेत शिरली. ज्यांच्याशी जमलं नाही त्यांच्याबद्दलचा राग वा विषाद तिच्या शब्दांत चुकूनही कधी डोकावत नाही. लग्नानंतर तिने आपलं वजन उतरवलं. सटरफटर नोकऱ्याही केल्या. पुढे मुलगी झाल्यावर मुलीसाठी वेळ हवा म्हणून नोकरी हा विषय बाजूला सारला. नवऱ्याच्या प्रोत्साहनाने तिने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं ,अर्थशास्त्राची तासिका तत्त्वावर प्राध्यापिका झाली! परंतु कायम केलं नाही तर सरळ शिक्षिका होईन शाळेच्या मुलांमध्ये रमेन म्हणायची. विद्यार्थ्यांचा उत्तम फीडबॅक तिनं मिळवला. 
मधे फोनवर सांगत होती ’पी एच. डी करायच म्हणतेय.....’.तिने ग्रामीण बॅंकेपासून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेपर्यंत कोणताही विषय घेतला तरी मला धक्का बसला नसता (त्यासाठी थेट ओबामाना भेटायलाही ती बिचकणार नाही. ती त्या मुलाखतीत विनोद करून त्यांना ’द्या टाळी’ सुद्धा म्हणेल आणि व्हाईट हाऊसच्या किचनमधे जाऊन चहा सुद्धा करून आणेल असे मी तिला गमतीने म्हणायचे. ’न्यूनगंड’ नावाचा शब्दच तिच्या डिक्शनरीत नाही.) मला आश्चर्य वाटतं ते याचं की तिचा हा कायापालट काही एका रात्रीत झालेला नाही, हे सगळ तिच्याआतच कुठेतरी विस्कळीत रूपात दडलेलं होतं पण तिला ते गवसत नव्हतं. अर्थात ही नवी ती मला जितकी भावते तेवढीच आधीची ती ही प्रिय होती...कारण आतून ती अजूनही तश्शीच आहे. ’परवाच्या अर्थसंकल्पावर मत काय मॅडम आपले?’ अशी मी चेष्टा करताच ’मी फक्त चॅनेल्सना ’बाईट’ देते’ असे म्हणत हसत होती. 

सगळ्या जगात मी तिला सर्वात जास्त ओळखते असे ती माझ्याबद्द्ल नेहमी सांगते. पण ती तिला स्वतःला तरी कुठे ओळखू शकली होती! मी बाहेरुन तिचा कोषातून बाहेर पडण्याचा प्रवास पाहिला, तिच्या आत मात्र एक निसर्गदत्त फुलपाखरु सतत भिरभिरताना दिसायचं.
कृत्रिम मुखवटय़ांच्या आजच्या जगात दुर्मीळ असलेलं जयूचं निखळ हास्य, ‘कोण काय म्हणेल?’ याचा निरर्थक विचार न करता संवादाच्या पुलाने, मदतीच्या हाताने जग जोडून.. खरं तर स्वत:कडे ओढून घेण्याच्या तिच्या स्वभावामुळे ती मला जास्त प्रिय आहे. तिच्यातल्या उत्साहाच्या आणि ऊर्जेच्या उसळत्या कारंजात तिच्या सहवासातला प्रत्येकजण तसाच चिंब होऊन जातो. आजची एका मुलीची आई असलेली जयू.. आतून अजूनही तश्शीच आहे! प्रफुल्लित, पारदर्शक आणि कायम मज्जेत!! माझ्या मनातले बरेच ’जीबी’ तिने कायमचे व्यापलेत आणि (तिच्या परवानगीने) आमच्या मैत्रीच्या पॉलिसीमुळे,आज इंटरनेटवर हे काही ’के.बी’ तिच्यासाठी.......!! 
०८/०९/२०११
---------------------------
लोकसत्ता- लोकरंग ’सर्किट’ सदरात प्रसिद्ध झालेला लेख
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=181045:2011-09-08-10-59-48&Itemid=1

---------------
वरचा लेख २०११ सालचा आहे. लोकसत्तेला याचं संपादित व्हर्शन पाठवण्याआधी तिला फोन केला. तुला आधी वाचायला पाठवू का, विचारलं. ती म्हणाली, "तू लिहिला आहेस नं, बस. मग आता थेट पेपरमध्येच वाचेन" मला नि:शब्द केलं तिनं. लेख प्रसिद्ध झाला त्यादिवशी काय काय प्रतिक्रिया आल्या ते नंतर मला फोनवर भरभरून सांगत होती.
दरम्यान आमची तशीच मस्ती, गप्पा कधी प्रत्यक्ष भेटीत, कधी फोनवर सुरु होत्या. 
१७ डिसेंबर २०१७ -  शाळेतले काही जण भेटणार होतो म्हणून एका वर्गमित्रासह आधी  जयूकडे गेले मग तिच्यासह आम्ही शाळेत गेलो. कॉलेजमध्ये सीएचबी शिकवायचा कंटाळा आल्याने जयूने आमचीच शाळा जॉइन केली होती. मुलं ख्रिसमसपूर्व स्पर्धांच्या तयारीत होती. जयूभोवती "मिस मिस प्लिज सी धीस" करत गराडा घालत होती. मी निघताना मला म्हणाली, "उन्हाळ्यात मुलांना घेऊन माहेरी जाणार असशील तर माझं आणि मुलीचंही रिझर्वेशन कर. काकूला सर्प्राईज देते." 
मी २०१८ च्या फेब्रुवारीच्या १ तारखेला म्हणजे दीडच महिन्यानी तिला फोन केला , रिझर्वेशन करतेय, करु नं तुमचंही. तर म्हणाली, "नको करूस. माझ्या सासूबाईंना बरं नाही, मलाही बरं नाही पण काळजीचं कारण नाही. किडनी स्टोनचंच आहे काहीतरी. औषध घेते आहे. पुढच्या वर्षी नक्की येईन" मी ट्रीटमेंटचं नीट विचारून नाराजीनेच फोन ठेवला. 
दोन दिवसांनी एका वर्गमित्राचा ,ज्याला जयू राखी बांधत असे, फोन आला - जयू गेली. विश्वास बसेना. आपली जयू ?
तो हो म्हणाला. मी ताबडतोब निघाले. पुढचं सगळं निरर्थक आहे. ती आता या जगात नाही एवढंच सत्य आहे. 



Friday, August 19, 2011

अण्णा

अण्णांच्या आंदोलनाने आपल्याला काय दिले !


(Photo coutesy : google)

अण्णा हजारेंच्या बाजूने आणि विरोधी भूमिका घेणारे असे दोन गट सध्या नागरी समाजात पडले आहेत.
अण्णा विरोधी गटातील काही लोक सध्या सरकारात असलेल्या पक्षाशी बांधिलकी असलेले, आहेत त्या कायद्यांची नीट अंमलबजावणी करायचे सोडून या नव्या विधेयकाची गरजच काय असे वाटणारे किंवा अण्णांचा हेतू उदात्त असला तरी ते मुळात एवढ्या मोठ्या आंदोलनाचे नेते होण्यास पुरेसे बौद्धिक सामर्थ्य त्यांच्यात आहे काय याबाबत साशंकता वाटणारे आहेत. तर त्यातील काहींना अण्णा ज्या पद्धतीने त्यांच्या समितीचे विधेयक पारित व्हावे म्हणून दबाव आणत आहेत ते लोकशाहीविरोधी वाटते आहे.
अण्णांच्या बाजूने असलेल्या गटात काही तज्ज्ञ व्यक्ती आहेत तर बहुसंख्य समर्थकांचा साधारण रोख एक सभ्य, वयस्कर कार्यकर्ता पोटतिडकीने भ्रष्टाचाराला वेसण घालण्याचा प्रयत्न करतो आहे तेव्हा त्यांना साथ देणे आपले नैतिक कर्तव्य आहे असा आहे. यात सगळेच धुतल्या तांदळाचे आहेत असेही नाही. काहींना सरकारी लोकपाल विधेयक वा अण्णांच्या समितीचे जनलोकपाल विधेयक यातील फरकाविषयी फारसे माहीत करून घेण्यात स्वारस्य नाही. त्यात काही राजकीय पोळ्याही भाजल्या जात आहेत.
लोकपाल विधेयकाबाबत सरकार आणि अण्णा गटात दुमत आहेच. पंतप्रधानपद लोकपाल कक्षेत आणावे काय? लोकपालमध्ये सात सदस्य असावेत की अकरा? त्यांची निवड कशी व्हावी? त्या पद्धतीवर सरकार, सत्तेमधील पक्षांचे वर्चस्व असायला हवे काय ? भ्रष्ट न्यायाधीशांविरोधात चौकशी करण्याचे अधिकार लोकपाल पदाला असावेत काय? तपासकार्यात सीबीआयचा समावेश असावा काय ? खुद्द लोकपालानेच भ्रष्टाचार केल्यास त्याला पदच्युत करता येईल काय ? या मुद्यांवर वादविवाद होत राहतील, आणि व्हावेत कारण ते निरोगी लोकशाहीचे एक वैशिष्टय आहे. सरकार झुकेल, सिब्बल नवे मुद्दे मांडतील, अण्णा पुन्हा आग्रही भूमिका घेतील, २४ तास बातमी देणार्‍या दूरचित्रवाणी वाहिन्यांचा काही दिवसांचा प्रश्न मिटेल..

या सगळ्याच्या पलिकडे जाऊन अण्णांच्या आंदोलनामुळे बर्‍याच सकारात्मक गोष्टी घडत आहेत असे म्हणायला वाव आहे

प्रत्येक देशातील नागरी समाज हा त्या त्या देशाच्या समाजस्वास्थ्याचा निर्देशांक मानला जातो. भारतातील नागरी समाजात, विशेषत: तरूण वर्गात भारताबद्दल आज पराकोटीची अनास्था आणि औदासिन्य दिसून येते. याचे एक प्रमुख कारण आहे भ्रष्टाचार!
याला आळा घालण्यासाठी पहिले लोकपाल विधेयक १९६९ मध्ये म्हणजे ४२ वर्षांपूर्वीच राज्यसभेत मांडले गेले. ते मंजूर न झाल्याने १९७१, १९७७, १९८५, १९८९, १९९६, १९९८, २००१, २००५ आणि २००८ मध्ये तेच लोकपाल विधेयक पुन:पुन्हा मांडण्यात आले. राजकारण्यांना गैरसोयीचे असल्याने अद्यापही ते मंजूर झालेले नाही कारण आजवर एवढा जनाधार या विधेयकाला मिळालाच नाही. आज काही नव्या मागण्यांसह जन लोकपाल विधेयकासाठी नव्याने प्रयत्न सुरू झाले आहेत हे निश्चीत स्वागतार्ह आहे. नवी क्रांती, दुसरे गांधी अशी अतिशयोक्तीपूर्ण विशेषणे टाळली तर हतबल झालेल्या भारतात भ्रष्टाचाराच्या विरोधात कायदा होऊ शकतो ही उमेद आज नागरी समाजात निर्माण झाली आहे यात शंका नाही.

याआधीचे लढे हे विवीध लोकांच्या मागण्या-हक्कांना वाचा फोडण्यासाठी होते. स्त्रीमुक्ती ,दलितमुक्ती चळवळींपासून जयप्रकाश नारायण यांचं ‘संपूर्ण क्रांती आंदोलन’,मेधा पाटकरांचं ‘नर्मदा बचाव’ आंदोलन किंवा सुंदरलाल बहुगुणांचं ‘चिपको’ आंदोलन असो वा शरद जोशी यांचं शेतकरी आंदोलन . सरकारचं लक्ष त्यांच्या प्रश्नाकडे वेधण्यात ते कमीअधिक प्रमाणात यशस्वी ठरले पण यांनी संसदेच्या चौकटीला अण्णांच्या आंदोलनाप्रमाणे बोट लावलं नाही त्यामुळे काही लोकशाहीवादी बुद्धीजीवी अण्णांच्या आंदोलनावर नाराज आहेत. आपलं सरकार (आजचेच नव्हे, आजवरचे) हे कार्यक्षम आणि जबाबदार असतं, हे विधेयक वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलं नसतं तर ही वेळ आज आलीच नसती ही वस्तुस्थिती इथे स्वीकारणं भाग आहे. घटनेतील काही बाबी जर कालशरण असतील तर त्यात सर्वसामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी बदलाची अपेक्षा असणारच. गेल्या साठ-बासष्ट वर्षांत विविध संघटना, संस्था, कार्यकर्ते भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या पदरात आजवर काय पडले! त्यांना बुलंद सामुदायिक ’आवाज’ मिळवून देण्याचं काम अण्णांच्या सर्वसमावेशक आंदोलनाने केलं आहे. संसद व सरकारला न्यायव्यवस्था सुधारू शकत नसली तरी सुस्त व्यवस्थेला गदागदा हलवण्याचं काम अण्णांच्या आंदोलनाने केलं आहे.

लिबीयाचे गडाफी किंवा इजिप्तचे मुबारक यांच्या विरोधातील आंदोलनांप्रमाणेच कोणत्याही पक्षाचा झेंडा न नाचवता कळीच्या प्रश्नांसाठी भारतीय जनता रस्त्यावर उतरू शकते, एवढेच नव्हे तर कोणताही विध्वंस न करता तरूणाई शक्तीप्रदर्शन करू शकते हा एक सकारात्मक संदेश या आंदोलनाच्या समर्थकांनी नकळत दिला आहे. आजवर क्रिकेट विश्वचषक जिंकला तरच तरूणाई देशभर सामूहिकरित्या रस्त्यावर येत होती. नागरी समाजात अमेरिकेच्या व्हिसा कडे डोळे लावून बसलेल्या तरूणांमधे देशाशी निगडीत प्रश्नाबद्द्ल व्यापक प्रमाणात संवेदनशीलता निर्माण झाली आहे. हा तात्कालिक प्रभाव असू शकतो पण पेरलेल्या काही बिया तरी त्यातून रूजतील. किरण बेदी, स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर, स्वामी अग्निवेश, मॅगसेसे पुरस्कार विजेते अरविंद केजरीवाल, कपिल देव, मनेका गांधी यांच्या सारख्या वलयांकित पण निस्पृह प्रतिमेच्या व्यक्तींच्या पाटिंब्यामुळे ह्या लढ्याला नागरी समाज विरूद्ध सरकार असा रंग देणे अनुचित आहे. सहावे वेतन आयोग उपभोगणार्‍या किंवा आयटी मधे चांगले ’पॅकेज’ असणार्‍या नागरी व्यक्तीला भ्रष्टाचाराची झळ बसतेच पण त्याहीपेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या विधवेला, सरकारी मदत म्हणून मिळणार्‍या हजार-पाचशे रूपयाच्या धनादेशासाठी तालुक्याच्या गावी जावे लागते आणि धनादेश देऊ करणार्‍या साहेबाला त्याबदल्यात शंभर-दोनशे रूपये द्यावे लागतात. तेव्हा हा लढा नागरी समाज लढत असला तरी तो तिच्यासाठीही लढला जातो आहे.

राजकारणी आणि शासकीय कर्मचारी तेवढे भ्रष्ट आहेत आणि सामान्य माणूस साधाभोळा असे अजिबात नाही. सामान्य माणसालाही पैसा कोणत्या मार्गाने मिळवला याच्याशी घेणेदेणे नाही तर त्याच्या वाटपाच्या पद्धतीमधे रस आहे. काम झाले तर साहेबाला द्यायच्या भेटी, हुंडा, ’मता’चा मोबदला, आरक्षित डब्यात बसू द्यावे म्हणून दिलेली चिरीमिरी, वाहतूक पोलिसाच्या हातात सरकवलेली ’पत्ती’ अशा अनेक रूपांनी तो स्वत: भ्रष्टाचार करत नसला तरी त्याला नकळत खतपाणी घालत आलेला आहे. काळा पैसा हा केवळ स्वीस बॅंकेत नसून सामान्य माणसाच्या अशा नोंदविरहीत आर्थिक व्यवहारातून देशांतर्गत प्रवास करत असतो. या व्यवहारामागे बर्‍याचदा अगतिकता असते कारण याची पाळेमुळे शेवटी व्यवस्थेलाच जाऊन भिडतात. त्या व्यवस्थेला बदलण्याची सुरूवात स्वत:पासून व्हायला हवी आहे, निदान ही जाणीव-मानसिकता या निमित्त्याने माध्यमातून झडणार्‍या चर्चांमधून बर्‍याच प्रमाणात निर्माण झालेली आहे.

अण्णांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा ठेका घेतला आहे का असे विचारणार्‍यांनी तो ठेका स्वत:कडे घ्यावा, त्यांना कोणी रोखले आहे? इतर ही अधिक महत्वाचे प्रश्न आहेत असे वाटणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे की अगदी स्त्री-भ्रूण हत्येच्या(गैरमार्गाने गर्भलिंगनिदान) समस्येपासून बेरोजगारी,दारिद्र्य अशा अनेक प्रश्नांचे मूळ भ्रष्टाचारातच सापडते.
अण्णा जादूगार नाहीत की हे आंदोलन म्हणजे पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले त्यानुसार, ’जादूची कांडी’ नाही. ’वित्तेषणा’ ही गरज जोवर मानवाला भासत राहिल तोवर भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन प्रत्यक्षात शक्य नाही, रातोरात तर नाहीच नाही, ही एका परिवर्तनाची केवळ नांदी आहे. हे विधेयक अगदी अण्णांच्या समितीच्या मतानुसार स्वीकृत झाले तरी ’who will watch the watchman' हा प्रश्न उरतोच, भ्रष्टाचार अमुक टक्के कह्यात येईल असे ठामपणे सांगणे भाबडेपणाचे ठरेल, पण त्यावर अंकुश बसेल, भ्रष्ट देशांच्या यादीत किमान पहिल्या शंभर देशांमधून (आज ८७ व्या क्रमांकावर असणार्‍या) भारताचे नाव वगळले जाईल, आजोबांच्या काळातील घोटाळ्यांचा-प्रकरणांचा निवाडा नातवाच्या काळात न होता निश्चीत कालमर्यादेत होईल हे ही तितकेच खरे. ’कुणीतरी काहीतरी केले पाहिजे’ अशा शिळोप्याच्या चर्चा करण्यापेक्षा थेट ’भ्रष्टाचार’ या विषयाला भिडून त्याला राष्ट्रीय स्तरावर ऐरणीवर आणण्याचे श्रेय अण्णांनाच जाते यात दुमत नसावे. निष्क्रीय होत चाललेल्या भारत देशात यानिमित्त्याने घडून येणारी सकारात्मक उलथापालथ हीच या आंदोलनाची फलश्रुती आहे.